Wednesday, October 31, 2007

श्री तशी(?) सौ

आरती रागारागाने घरी परतली, तिच्यामागून संदेशही.
आरती तणतणत म्हणाली,"तुला सांगितलं होतं आज मला त्या खेळात भाग घ्यायचा आहे. दरवेळी तुझं हे आपलं असंच. काय बिघडलं असतं तुझं? बायकोसोबत कशात भाग घ्यायला नको. बाकी चार मित्र भेटले की काहीही खेळायला तयार."
"अगं असं नाही. पण हे असले खेळ नुसते टाईमपास म्हणून असतात. तू ते जरा जास्तच मनावर घेतेस. मग जिंकलं तरी चार दिवस त्याच गोष्टीवर बोलणं आणि हरवल्यावर तर विचारायलाच नको. खायला मिळालं तरी नशीब मग.मागे एकदा रस्सीखेच मध्ये त्या काळेने मला हरवलं तर तू रोज मला खायला घालून नको करून सोडलंस. आता तूच सांग तो 'केव्हढा' आणि त्याच्यासमोर मी 'एव्हढासा' . तू काय मला चिरमुऱ्याचं पोतं बनवणार होतीस?"
काळेचं नाव घेतल्यावर आरतीला तो प्रसंग आठवून हसू आलं. बिचारा संदेश, किती प्रयत्न करत होता दोर ओढण्याची. आणि त्याची झालेली धावपळ.
आज झालं काय होतं? त्यांच्या सोसायटीचे स्नेहसंमेलन होतं. दर दोनेक महिन्यांत त्यांच्या सोसायटीतील लोक हे असले काही कार्यक्रम आयोजित करत. काहीवेळा चार लोकांत मिसळल्याबद्दल संदेशला आनंद व्हायचा तर आजच्या सारख्या काहीवेळा त्याच्या डोक्याला त्रासच जास्त व्हायचा.आज या संमेलनात, एक खेळ होता. काही जोडप्यांनी स्टेजवर यायचं.प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्नावली देणार आणि प्रत्येकाची उत्तरे त्यांच्या साथीदाराने दिलेल्या उत्तरांशी पडताळून पाहायची. हा खेळ तसा 'घातक'च होता, म्हणजे जर तुम्ही दिलेली उत्तरे तुमच्या बायकोशी जुळली नाहीत की आली ना पंचाईत. मग काय घरात भांडणेच. 'तुला माझ्याबद्दल इतकंही माहीत नाही?','हेच ओळखलंस का तू मला इतक्या वर्षात?','तुझे माझ्याबद्दल काय विचार आहेत ते कळलं मला आज!' ,इ.इ. आता अशा खेळात भाग घेऊन भांडण होण्यापेक्षा भाग न घेतलेलाच बरा, असा सोप्पा विचार संदेशने केलेला. पण यावेळी खेळात भाग घेतला नाही म्हटल्यावर आरतीचा पारा अगदीच वर गेलेला. तिला सारखे आठवत होते, मागच्या वेळी ती शेजारची ज्योत्स्ना कशी मिरवत होती जिंकल्यावर.
आरती म्हणाली,"घरी दोघं एकमेकांचं तोंड नाही का बघेनात, आमच्यासमोर नुसती 'प्रेमं' यांची.('प्रेमं' हा आरतीचा आवडता शब्द, रागात असतानाचा.) मग चिडचिड नाही होणार? तरी बरं आपलं लव्ह मॅरेज आहे म्हणून,नाहीतर अजून किती ऎकून घ्यायला लागलं असतं तिचं काय माहीत? "
"अगं पण जाऊ दे ना आता. तू कशाला जास्त त्रास करून घेतेस", असं म्हणून संदेशने टि.व्ही. सुरू केला.
ते पाहून आरतीला अजूनच राग आला. तिने शेवटी मनातल्या मनात ठरवलेच की पुढच्या वेळी आपण खेळात भाग घ्यायचाच आणि जिंकायचेच.दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आरतीच्या डोक्यात तोच विचार आला. तिने ठरविले की संदेशला माझ्याबद्दल काय माहीत आहे, नाही ते नंतर बघू, निदान मी तरी सुरुवात करते. संदेश ऑफिसला जायची तयारी करत होता. बराच विचार करूनही आरतीला संदेशचा आवडता रंग काही आठवेना. तिने त्याला आवरून घरातून बाहेर पडताना पाहिलं आणि जाणवलं याला तर कुठलाही रंग चांगला दिसतो. तिने त्याला आजपर्यंत अनेक शर्ट भेट म्हणून दिले होते, पण त्याने एकदाही हा चांगला नाही, आवडला नाही म्हणून नाक मुरडलं नव्हतं. अर्थात त्याला तरी कुठे लक्षात आहे माझा आवडता रंग. ......माझा आवडता रंग???ह्म्म्म्म्म?? तिलाही आता आठवेना की तिला नक्की कुठला रंग आवडतो. तिच्या कपाटात तर एव्हढे कपडे होते. उलट एखाद्या रंगाची साडी नाहीये म्हणून तिने संदेशला ती घ्यायला लावली होती. आता आली ना पंचाईत. तात्पुरता तिने त्या प्रश्नाचा नाद सोडला आणि कामाला लागली.
दोन दिवसात तिचा उत्साह थोडाफार ओसरला होता. संदेशला तर काय बरेच होते, असे स्फोटक विषय न निघतील तेच चांगले. तरीही त्याला मधून-मधून आरतीचे प्रश्न ऎकून शंका यायची की ही अजून त्या खेळाचा विचार करतेय की काय? तिने एकदा दोनदा त्याला विचारलं की 'तू आजकाल काही खेळायला जात नाहीस पूर्वीसारखा', 'तुला गाणं कुठलं आवडायचं रे?', 'तुझ्या नवीन बॉसचं नाव काय', इ.इ. तसे ते दोघं घरी आल्यावर गप्पा मारायचे की आज दिवसभरात काय काय झालं, पण लग्नाला ३-४ वर्षे झाल्यावर त्यातली उत्सुकता तशी जरा कमीच झालेली. तिला आधीचे, प्रेमात पडल्यावरचे, लग्नानंतरचे दिवस आठवले आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं सगळं व्हावं, प्रेमाने रहावं असं वाटू लागलं आणि ती तसा प्रयत्नही करू लागली. त्याच्यातील बदल लक्षात घेता-घेता तिला हे ही जाणवलं की तिच्यामध्येही बरेच बदल झालेत.तिच्या आवडी-निवडी थोड्या बदलल्या आहेत. पूर्वी ती ज्या छोट्या गोष्टींमध्ये रस घ्यायची ते कमी झालंय, तर तिचा उतावळेपणाही संदेशसोबत राहून कमी झालाय. या सगळ्यात दोन महीने कधी उलटून गेले कळलंच नाही. तिच्या शेजारणीनेच तिला आठवण करून दिली, "मग काय यावेळी घेणार ना भाग कार्यक्रमात? भेटू मग उद्याच. "
"हो, नक्की", आरती तिला म्हणाली, तर " आज संदेशशी बोलावंच लागेल. त्या खडूस जोत्स्नाने परत जाणून-बुजून आठवण करून दिलीय. सारखी खाजवून खरूज काढायची सवयच आहे तिला." असं मनातल्या मनात म्हणाली.
रात्री झोपताना संदेशला सांगितल्यावर तो हसायला लागला.
"अजून तुझ्या डोक्यातून ते खूळ गेलं नाही? तुला मी परत सांगतोय असल्या या खेळांनी का आपलं प्रेम किती आहे हे कळतं?" संदेश.
"पण मला उद्या त्या जोत्स्नाला उत्तर द्यायचंय." आरती म्हणाली.
"अगं तिला काही काम नाहीये. तू कशाला असल्या लोकांकडे लक्ष देतेस? आपण लहान आहोत का असले खेळ खेळायला?", संदेश.
"जाऊ दे तुला नाही कळणार. किती वेळा सांगितलं मी की मला आवडतं असल्या गोष्टीत भाग घ्यायला. आणि अशीच आहे मी, लहान म्हण की अजून काही. त्यात काही बदल नाही होणार. " आरती जवळ जवळ रडतच बोलली. थोडा वेळ ती त्याच्याकडे न बघता पडून राहिली. त्याच्याकडून काहीच उत्तर येत नाहीये म्हटल्यावर तिने वळून पाहिलं तर संदेश चक्क गाढ झोपला होता. आता मात्र तिला अगदीच राहवेना. त्याला आत्ताच्या आत्ता हाक मारून उठवायची इच्छा होतं होती आणि हे सांगायची की 'मला एखादी गोष्ट करायची आहे तर मला साथ देण्यासाठी, माझं मन राखण्यासाठी का होईना करावीस ना? अगदी हा हट्ट आहे म्हणू, पण मग तू माझा नवरा आहेस म्हणूनच तुझ्याकडे हट्ट करतेय ना?'. पण यातलं काहीच न बोलता ती उठून बाहेरच्या खोलीत आली.
आधीचे दिवस तिला आठवत होते जेव्हा संदेश, त्याची इच्छा असताना, नसतानाही तिच्याशी बोलायला मिळावं म्हणून तिच्यासोबत जात असे. तर अशा काही कार्यक्रमात मजा म्हणून भागही घेतला होता. त्या आठवणी काढता काढता तिला जरासं बरं वाटू लागलं आणि तिने ठरवलं की उद्याही आपण आधीसारखाच भाग घ्यायचा आणि आधीसारखीच मजाही करायची. मग तिने एक वही पेन घेतलं आणि गेल्या काही खेळांमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं काय असतील हे लिहायला घेतलं.
१.आवडती भाजी:.....ह्म्म्म... तशी मी केलेली कुठलीही भाजी त्याला आवडतेच. :-) आता मीच चांगलं जेवण बनवते तर त्याला आवडणारच ना? की त्यालाच कटकट करायची सवय नाहीये?...जाऊ दे पुढचा प्रश्न बघू..
२. आवडतं गाणं: कधी तरी म्हणाला होता मला 'मेरी दुनिया है तुझ मे कही....' पण आजकाल काय आवडतं माहीत नाही. तसंही मी जी गाणी लावते ती ऎकतोच ना तो?
३. त्याच्या बॉसचं नाव: पिल्लई की काही तरी म्हणाला होता. मध्ये काही तरी म्हणत होता की नवीन साहेब येणार आहे म्हणून.गेल्या काही दिवसांत,या भांडणात त्याला विचारलंही नाही त्याचं काय झालं म्हणून.
असा विचार करताना तिला कळलं की त्याचे जे गुण तिला आवडले होते ते अजूनही तसेच आहेत. तो तर अजिबातच बदलला नाहीये. त्याचा स्वभावच मुळी कधी कटकट न करणारा, आनंदी आणि दुसऱ्यांनाही त्रास न देणारा. आधीही त्याला जास्त उत्साह नसायचा असल्या गोष्टीत भाग घ्यायचा,मीच तर त्याला ओढून न्यायचे. तेव्हा उलट त्याचं असं स्वत:त आनंदी राहणं आवडायचं. मला जरा ऑफिसमध्ये काम जास्त झालं की मी किती त्रास देते घरी, हा मात्र काही न बोलता राहतो. आता तिला स्वत:वरच राग यायला लागला, त्याच्यावर चिडल्याबद्दल. त्याच्याबाबत त्या खेळातले प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार? आणि त्याच्याविरुद्ध मी. मला कधी कुठला रंग आवडेल, तर कधी कुठला पदार्थ, तर कुठला सिनेमा याचा काही नेम नाही. माझ्या आवडी निवडी बदलत राहतात, तर तो तरी काय उत्तर देणार.बिचारा संदेश.....असाच काहीसा विचार करत आरती झोपून गेली.
सकाळी तिला असं सोफ्यावर झोपलेलं पाहून संदेशला कळलं की बाईसाहेब रात्री नीट झोपलेल्या दिसत नाहीयेत. मग त्याला तिच्याजवळ पडलेलं वही-पेन दिसलं. त्याच्यावर तिने खरडलेल्या ओळी पाहून थोडंसं हसू आलं आणि तिच्या या बालिशपणावर प्रेमही. ती अशी उत्साही, अवखळ, बालिश होती म्हणून तर मला आवडली. आणि आता तिने बदलावं अशी मी तरी अपेक्षा का करावी. आरती म्हणत होती ते बरोबर होतं, तिच्या समाधानासाठी का होईना मी हो म्हणायला हवं होतं. आज सकाळी एकदम त्याच्या प्रेमालाही भरतं आलं होतं म्हणा ना. त्याला एक कविता आठवत होती,
"तू आहेस तुझी, तुझ्या स्वप्नांची
तू असतेस बऱ्याच
वेळा तुझ्या कल्पनांची,
तुझ्या भावनांची आणि
केवळ तुझ्या कवितांची.

या सर्वांहूनही वेगळी असतेस
तू तुझ्या अनेक प्रिय व्यक्तींची,
त्यांच्यासोबतच्य़ा तुझ्या क्षणांची,
हरवून गेलेल्या त्यांच्या काही आठवणींची.

या सर्वांचा खूप हेवा वाटतॊ,
पण राग येत नाही,
कारण तू 'त्यांचं' असणं हेच
तुझं 'तू' पण आहे.
प्रत्येकवेळी तुझ्या नव्या रूपांना पाहताना,
मी मनापासून भुललो आहे. "
सकाळी अगदी आयता चहा हातात मिळाल्यावर आरतीलाही हसू आलं होतं. गेली रात्री गेली, आजचा दिवस नवीन या उत्साहाने तीही सगळं विसरून कामाला लागली. सगळं आवरून घराबाहेर पडताना संदेश म्हणाला,"तुला एक सांगू आरती? मला असं वाटतं वयानुसार प्रत्येक माणसांत, त्याच्या आवडी निवडीत थोडाफार फरक होतंच असतो. हे असले प्रश्न माझ्या तुझ्यावरील प्रेमाचं मोजमाप करू शकत नाहीत. वयानुसार,बदललेल्या आवडी निवडींसहित आपल्या प्रेमाला कसं स्वीकारतॊ यातच खरी परीक्षा असते. आणि काहीही झालं तरी, कितीही वय झालं तरी तूच माझी ऐश्वर्या आणि तूच माझी आवडती भाजी ! खाऊ का तुला?" असं म्हणत त्याने तिला जवळ ओढून घेतलं आणि आरती प्रेमाने त्याच्या मिठीत विसावली होती.

-विद्या.

Wednesday, October 24, 2007

मन वढाय वढाय...

ब्लॉग आणि तोही भर दुपारी ऑफिसमधे :-) बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळालीय. :-)) अर्थात त्याआधी मेल लिहिणे, चेक करणे, हा पेपर ,तो पेपर सगळं उघडून झालं.म्हटलं चला जरासं लिहूनही बघावं. खरंतर मी विचार करत होते की आता लिहीन....तर ते घरी गेल्यावरंच....पण त्याआधीच संधी मिळाली. तर त्याचं असं झालं.....एकाच कंटाळवाण्य़ा प्रोजेक्टवर काम करून मी बरीच कंटाळले. मधे मेघनाने एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं तसं पळून जाण्यात काय मजा आहे, स्वत:ला प्रूव करूनच जायचं असा अट्टाहासही केला. आणि खरंच एकेका दिव्यातून पार पडत एक प्रोजेक्ट पूर्ण केलाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, वेळ आल्यास कुठलीही गोष्ट स्वत: अभ्यास करूनही पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तर मिळालाच पण न कंटाळता काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंदही.
त्यात १०० वेळा 'Are you there?' असं विचारल्यावर एकदाच उत्तर देणारा , बग आहे हे माहीत असूनही तॊ शेवटपर्यंत न कळवणारा, आणि शेवटी त्याला सांगण्य़ापेक्षा स्वत:च मेलेलं बरं असा वाटणारा भारतातील एक टीममेंबर. कितीही वेळा प्रोजेक्टचं स्टेट्स सांगितल्यानंतरही मग याचं काय आणि त्याचं काय असं विचारून पिडणारां मॅनेजर, आणि सगळ्य़ा कटकटीतून बाहेर पडलेतर मग Time Sheet Defaulter म्हणून आलेला एखादा फालतू मेल...अशा सगळ्या दिव्यातुन पार पडत शेवटी काल डेमो पण पूर्ण झाला आणि आता जरा कुठे हुश्श होतंय असं वाटलं.
हे सगळं होतं असतानाच एक गोष्ट जाणवली होती. एव्हढी मरमर करूनही मिळावी तितकी शाबासकी नाहीच...आणि ती कधी मिळणारही नाही हे कळलं तेव्हाच यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तसं बरंच अवघड वाटत होतं, दोन वर्ष अगदी घर ,रोजचा येण्याजाण्याचा रस्ता काय, काहीच बदलावं लागलं नाही. अशा स्थिरतेकडून अस्थिरतेकडे जायला मन धजावत नव्हतं. पण प्रत्येक वेळी एक असा क्षण येतो ना तेव्हा वाटतं की बस्स...खूप झालं आता. सुदैवाने म्हणा तसा क्षण लवकरच आला आणि मग पावलं हळूहळू त्या मार्गाने वळू लागली. आता हो-नाही करत माझी रीलीज पक्की झाली, लवकरच माझ्या जागी येणाऱ्या माणसाची पण आयात झाली. मग काय, त्याला फक्त काय काय केलंय ते सांगायचं आणि सुटायचं. त्यातही १०-१२ documents वाचायला दिले की आपली अजून थोडी सुटका. गेले दीडेक आठवडा तेच करत आहे. :-) एक-दोन तास बडबड करायची, काही documents लिहून ठेवायची,इ.इ.
खरं सांगायचं तर त्यातही मी जाणार म्हटल्यावर असं वाटलं की मी अचानक विरुद्ध गटात आलीय आणि माझ्यासोबत मॅनेजरबद्द्ल गॉसिपिंग करणारी मुलगी, मी काही issues अर्धवट तर टाकत नाही ना हे बघण्यासाठी एकदम दुसऱ्या गटात गेली. लोक कसे फिरतात ना? असो. इतके दिवस प्रोजेक्टवर काम केल्यावर सगळं दुसऱ्याच्या हातात देणंही अवघड जात होतं. वाटलं ही गोष्ट करताना आपल्याला किती कष्ट पडले होते, ती केली तेव्हा कसे प्रोब्लेम आले होते. :-) हे सगळं सोडून देणं जितकं सोप्पं वाटलं होतं तितकं नाहीये हे ही जाणवलं. असो, या सगळ्य़ांपेक्षा आता फक्त १५-२० दिवस राहिलेत घरी जाण्यासाठी हेच महत्वाचं वाटतंय आणि बाकी सगळं फालतू वाटत आहे. कुणाचं आपल्यावाचून अडणार आहे? आता घरी जाऊन हे करणार, ते करणार, अशी दिवास्वप्नं बघत आहे. :-) कधी कधी तर मी १५-२० दिवसांत घरी असेन या कल्पनेनंच काही काम सुचत नाही. असो... इतके दिवस सरले..हेही सरतील.... :-))

आता मात्र लिहीन ते.....घरी गेल्यावरच........

-विद्या.

Monday, October 08, 2007

दोन टोकं

तू आणि मी... किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? त्याशिवाय का आपण भेटत राहिलो दर थोड्या दिवसांनतर, ते ही परत तोंडही पहायचं नाही असं ठरवून. हां, नाही म्हणायला मला एक वाटायचं, आपण दोघेही जरा वेडे होतोच. सुरुवातीला एकमेकांसाठी आणि नंतर..... ते सुरुवातीचे स्वप्नातले दिवस सोडले तर बाकी काय होतं सांग ना? आपल्या आवडी-निवडी, स्वभाव सगळंच वेगवेगळं होतं. तरीही किती विचित्र असतं ना माणसाचं मन? दरवेळी त्या मंतरलेल्या दिवसांच्या मागे मागे धावून पुन्हा तुझ्याकडे यायचे आणि तूही माझ्याकडे. मग थोडे दिवस पुन्हा तो खेळ, एका हव्या असलेल्या, हरवलेल्या स्वप्नाला नवीन जोमाने एकमेकांत शोधायचं. साहजिकच तीच भांडणं, तोच अपेक्षाभंग आणि तेच अजूनच दुखावलेलं मन. पुन्हा एकदा वेगळं होणं, थोड्या दिवसांनी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेत परत येण्यासाठी. तुला नंतर कळलंच असेल म्हणा, मला तुझ्या आधीच कळला हा खेळ. तेव्हापासून तर तुझी चिडचिड अजूनच वाढली माझा तटस्थपणा बघून.तुला काय त्रास होत असेल चांगलंच कळत होतं मला, पण मी तरी काय करणार होते? तुला समजावणं अवघड होतं रे, हे असं धावणं किती व्यर्थ आहे. पण मागच्यावेळी भेटले तेव्हा, तुझ्या डोळ्यांत तो शोध थांबलेला दिसला आणि किती बरं वाटलं, माझ्यासाठी नव्हे, तुझा त्रास, छळ अखेर संपला म्हणून.
पण खरं सांगू? त्या रात्री झोप लागली नाही मला. शेवटी दोन टोकं जोडणारा धागा तुटला होता.
-विद्या.

Wednesday, October 03, 2007

जे जे उत्तम...

नंदनने टॅग केल्यावर जरा गडबडलेच होते. :-) हो, नुसत्या छान,सुंदर अशा प्रतिक्रिया देताना सोप्पं असतं पण जावे त्यांच्या वंशा..... असो. मी त्याच्या 'जे जे उत्तम' या उपक्रमाबद्दल बोलतेय.
त्याच्या म्हणण्यानुसार...."पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "
तर मी बराच बिचार केला की कुठला उतारा द्यावा बरं इथे.पण मला काही केल्या आठवेनाच एखादं पुस्तक आणि आठवलं तरी ते आता जवळ नसल्याने त्यातला उतारा देणं अवघडच होतं. विचार केला त्याला सांगाबं की 'मी जेव्हा भारतात परत जाईन ना, तेव्हा लिहिते,चालेल का?' :-) पण तेही योग्य वाटेना. तेव्हाच मला गेल्या काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाची अर्धवट का होईना PDF फ़ाईल वाचायला मिळाली होती ती आठवली. ज्यादिवशी ती मिळाली तेव्हाच वाचून पूर्ण केली होती आणि त्यातलाच एक उतारा जो मला कित्येक दिवस अस्वस्थ करत राहिला.
-----------------------------------------------------------------
".......आप्पांना मृत्यू मोठा छान आला. ....डॉक्टर मला म्हणाले,"त्यांना आलेला ऍटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळा राहतीलसे". आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पानी प्राण सोडला.
बिच्याऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती, वाचा, भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पैसा, मनुष्यबळ, काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले.तिथे सगळी मुले, नातवंडे, लेकी, सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होती. कामे वाटून घेऊन करत होती. तिऱ़्हाईताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान! कुणी कमी पडून देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुद्धीने, नाईलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करत होती, अद्याप करतेय. समजा, तिच्याऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार, सेवासुश्रुषा, नवसायास करत राहिली असती. तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षाच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वत:चे औषधपाणी स्वत;च करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करयेत आणि दुसरं कुणी तिची सेवासुश्रुषा करतंय असं दृष्य प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न मानवणारी. आणि दुर्दैवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्यासेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.
आई गेली. मुलेबाळे,नातवंडे,लेकीसुना, अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता त्याबद्दल लिहून मी दु:ख उकरून काढतेय,का? हे दु:खं नव्हे, हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलट्सुलट विचारांचा, भावनाम्चा गुंता आहे. तो सोडवता आला तर पहावा, त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रत्न करावायासाठी हा सारा खटाटोप. या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत, दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन.उरलेल्या वेळात माझ्या सव्त:च्या व्यापातच गुंतले होते, घर संसार,प्रुफे, नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोट्या व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगैरे-वगैरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आनंत्रिंसाठीचे वगैरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमात काही अडथळा तर येणार नाही? ऎनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण किती स्वार्थी, कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. ..."
".....मी म्हणे लहानपणी लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वत:ची, चुलत दिराची, बरीच मुलेमाणसे घरात होती. स्वैपाकपाणी, आले-गेले, सर्वांचा अभ्यास करून घेणे, सणवार, एअव्हढ्या मोठ्या घर संसारात त्याकाळच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार, जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील! माझ्यापुरते तरी कृतद्न्यतेच्या भावनेने मी तिच्यासाठी काही करायला नको का?आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार? ...."
पुस्तक - आहे मनोहर तरी
लेखिका - सुनिता देशपांडे
-------------------------------------------------------
मी बऱ्यापैकी ब्लॉगवर पाहिलंय की कुणी यांना टॅग केलं नाहीये ना तरी चुकून चुकल्यास चु.भू.दे.घे.
केतन(बरेच दिवसांत तुझं लिखाण वाचायला मिळालं नाहीये..यानिमित्ताने....)
अमित(तुझा 'पुस्तकांची मांदियाळि' मला खूप आवडला म्हणून हा खो.)
कोहम(तुझाही वाढदिवसानंतर हा पहिला पोस्ट होईला ना?:-) या पोस्टमधे काय असेल याची उत्सुकता आहे.)
स्वाती(तुझ्या अनेक सुंदर कवितांसारखी याचीही वाट पहात आहे.)
बडबडी स्नेहल(तुझ्या आवेशपूर्ण लेखांसारखाच एखादा आवेशपूर्ण उताराही वाचायला मिळावा ही सदिच्छा.)

-विद्या.