Tuesday, February 28, 2017

प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....

डिस्क्लेमर: खालील प्रसंगातील पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा माझ्याशी कणभरही संबंध नाहीये. तसे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि असलाच कुणाशी संबंध तर तो तुमच्याशी असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे पोस्ट वाचून झाल्यावर एकदा स्वतःला आरशात जरूर पाहून घ्या. 

वेळ: अमेरिकेतील रविवार सकाळ , भारतातील रविवार संध्याकाळ
कल्पनाने कॉन्फरन्स कॉल सुरु केला. कॉल सुरू होतानाच पुन्हा एकदा तिने ऐकले, 'प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....'
सगळं जग त्या म्यूटवरच चालू होतं....

कल्पना: 'हाय, धिस इज कल्पना. एनिवन देअर?'
कुणाचंही उत्तर आलं नाही तसे तिने स्पीकर चालू करून म्यूटचे बटण दाबले.
'अरे तिला भूक लागली असेल तो फॉर्म्युला मिक्स करून देना तेव्हढा?' तिने नवऱ्याला सांगितलं.
'किती घालायचं पाणी?' त्याने ओरडून विचारलं.
'बघ ना तूच त्यावर सूचना दिल्या आहेत.' ती आतल्या खोलीतून ओरडली.
'हाय' फोनवर आवाज आला तसे तिने अनम्यूट करून,'हाय धिस इज कल्पना व्हूज देअर?' विचारलं.
'हाय कल्पना धिस इज कृष्णा. हाऊ आर यू?', कृष्णाने विचारले.
'आय एम गुड. हाऊ आर यू?' तीन विचारले.
'गुड ...गुड.....', कृष्णा.
'गुड...' कल्पना.
इतके गुडगुड होईपर्यंत तिकडे कल्पनाच्या पोरीने भोकाड पसरलं होतं. कल्पनाने रूमचा दरवाजा लावून घेतला.
'सो व्हॉट इज द स्टेट्स ऑफ द प्रोग्रॅम नाऊ?' तिने विचारले.
'या इट इज टेस्टेड. नीड यूर इनपुट. आय सेंट यू अन ईमेल. कॅन यु चेक?', कृष्णा.
ती मेल चेक करेपर्यंत त्याने म्यूट केले होते.त्याचा बायकोने त्याला हाक मारली होती.
'डिनर इज रेडी....', बायको.
त्याने फोन चालू असल्याने हातानेच सांगितले आणि भूक लागल्याची खूण केली. ती राईस सांबार आणायला किचनमध्ये गेली.
'कृष्णा, ये इसमे कुछ टेस्ट केसेस मिसिंग लग रहे है?', कल्पनाने दार उघडून आत आलेल्या पोरीला तोंडावर बोट ठेवून 'शूSS' करून अनम्यूट केले होते.
मग कृष्णाने अनम्यूट केले. तोवर स्वयंपाकघरात दोन तीन वाट्या प्लेट पडल्याचा आवाज आला. त्याने हातात लॅपटॉप घेऊन जाऊन बायकोला रागाने हातवारे करूनच विचारले, 'काय झाले?'.
तिच्या हातात विसळलेली अजून २-४ भांडी होती.
'सॉरी अबाऊट द्याट.' कृष्णा.
'इट्स ओके. तो वो टेस्ट केसेक का...',कल्पना.
'येस, आय विल ऍड मैनाक हियर. कॅन यु होल्ड?',कृष्णा.
'येस प्लिज..',कल्पनाने असे म्हणत पुन्हा फोन म्यूट केला आणि मघापासून समोर उभ्या असलेल्या मुलीला मांडीवर घेतलं आणि बाटली हातात घेऊन दूध पाजू लागली. मागून आलेल्या नवऱ्याकडे तिने रागाने पाहिलंच.
दोनेक मिनिटांनी...
'हाय धिस इज मैनाक. येस कल्पना. व्हॉट इज मिसिंग?', मैनाक.
कल्पनाने अनम्यूट करून बोलायला सुरुवात केली. दूध बऱ्यापैकी पिऊन झाल्यामुळे मुलगी मांडीवरून पळून गेली होती. हातातली बॉटल खाली ठेवून ती बोलली,'मैनाक, I had told you to add exception scenarios and negative test cases too.'.
 'Yes Kalpana, sorry, but I didn't get a chance to work on that today.', मैनाक बोलला. रविवारी दिवसभर काम करून त्याला आधीच चिडचिड होत होती. अजूनही तो ऑफिसमध्येच होता.
त्यांचे बोलणे होईपर्यंत कृष्णाने म्यूट करून सांभार राईस हातात घेतला होता. सांबार भुर्रकन ओढताना त्याला जोरजोरात ठसका लागला.
तो पाणी घ्यायला जाणार इतक्यात कल्पना म्हणाली,'So you should have checked with Krishna for someone to help you.' कृष्णा आपले नाव घेतल्यावर तिथेच थांबला. बायकोला 'पाणी आणशील का?' विचारायचे तर ती तिची सिरीयल सुरु करून बसली होती.
त्याने उबळ तशीच दाबली आणि बोलला,'येस कल्पना, पर अभी सब बिझी है. कोई और इसमें लेकर आना मुश्किल है.' कसंबसं ते वाक्य पूर्ण करून त्याने फोन म्यूट केला आणि जोरजोरात खोकत किचनमध्ये गेला. त्याच्या बायकोने,'होपेलेस आहेस' टाईप्स लुक दिला आणि पुन्हा टीव्हीत डोकं घातलं.
तिकडे मैनाकच्या मैनेने संध्याकाळपासून एका पाठोपाठ फोनचा सपाटा सुरु केला होता. त्यानेही फोन म्यूट करून तिचा फोन घेतला.
'अरे बाबा I am in a meeting.' त्याने वैतागून सांगितले.
'I knew it,  you didnt even want to go out with me.' मैना.
'I do dear. But give me 10 mins, I'll be there.', त्याने गयावया केली.
'ok, I'll wait for another 10. Not more.', मैना.
'थँक्स डिअर', मैनाक.
हे चालू असताना, कृष्णाने प्रोजेक्ट प्लॅन ओपन केला आणि प्रत्येकाचे काम काय आहे हे सांगायला सुरुवात केली.
'कॅन यु सी माय स्क्रीन?',कृष्णा.
'येस, येस....' कल्पना म्हणाली. पण तोवर तिच्या नेटवर्कला काही प्रॉब्लेम आला आणि आता ती कितीही बोंबलली तरी तिचा आवाज पलीकडे जात नव्हता. तिने कॉल बंद करून पुन्हा सुरु केला. तेव्ह्ढ्यातही तिने किचनमध्ये भाजी गॅसवरून उतरून कट्ट्यावर ठेवली, पोळ्यांची कणिक भांड्यात घेतली.
कॉल सुरू केल्यावर सर्वांचे पुन्हा एकदा 'हाय हाय' झाले.
'नाऊ कॅन यु हिअर मी?' तिने सर्वाना विचारले.
'येस' म्हणून कृष्णाने पुन्हा स्क्रीन शेअर केली. तो स्क्रीनवर काहीतरी दाखवत बोलत आहे तोवर त्याच्या स्क्रीनवर एका मित्राचा मेसेज दिसला,'नेक्स्ट विकेंड पार्टी पक्का ना?'.
त्याने घाई घाईने मेसेज बंद केला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. पण मित्राला काही चैन नव्हती.
'इस बार, वेट बार चाहिये पार्टी में. मैं तो मंडे छुट्टी लेनेवाला हूं...तू भी ले लेना...', मित्राचे एकामागे एक मेसेज येतच होते आणि कृष्णा धडाधड ते बंद करत होता.
शेवटी त्याने 'Do not disturb' स्टेट्स लावून बोलायला सुरुवात केली.
'कल्पना, See, कोई और रिसोर्स नहीं है अभी.'.
'But the client needs it done this week.', ती वैतागली. शिवाय मागे नवरा पोरीला सोडून स्वतःचे आवरायला गेला होता. पोरीने हिच्या लॅपटॉपचा चार्जर काढून घेतला होता. लॅपटॉप मरायला टेकला होता.
तिकडे म्यूटवर मैनाक, घडयाळाच्या काट्याकडे बघत बसला होता. त्याच्या मित्राने त्याला कॅन्टीन मधून पोहे आणून दिले. 'थँक्स यार' म्हणत पोह्याचे दोन घास खाल्ले. रात्रीची जेवायची वेळ झाली तरी अजून सुट्टी झाली नव्हती. पोटात कावळे जोरजोरात कोकलत होते.
'Yaar, she is waiting for me for an hour, can you hold this for a minute? Let me freshen up and come? If they call me, just dont say anything.' म्हणत मैनाकने हेडफोन मित्राच्या कानाला लावला आणि अजून दोन घास तोंडात घालत बाथरुमकडे पळाला.
मागे कल्पना आणि कृष्णा आणखी कुणाला काम लावता येईल त्याचा हिशेब करत होते.
'I think Reena would be good fit, she has worked on this project.',कल्पना.
'वो शादी के लिये जा रही है नेक्स्ट वीक', कृष्णा .
'ओह...फिर तो मैनाक कोही ये काम खतम करना पडेगा. मैनाक... मैनाक.... कॅन यु हिअर मी?',कृष्णाने विचारले.
आता मित्राला फोनवर काही बोलताही येईना. समोरून मैनाक पळत येताना दिसला. तोवर...कल्पनाच्या पोरीने भाजीचं भांडं कट्ट्यावरून खाली ओढलं होतं. नवरा कुठे दिसत नव्हताच.
'ओके असाईन इट टू मैनाक. I need to go now....' म्हणत कल्पनाने फोन बंद केला.
मैनाकने फोन अनम्यूट केला तेंव्हा कृष्णा त्याला म्हणाला,'मैनाक I need you to finish this work as soon as possible. I'll send you the details in an hour.'
इतका वेळ जागेवर नसल्याने त्याला काही बोलताही येईना. तिकडे मैनेचा फोन येतंच होता.
त्याने 'ओके' म्हणून फोन ठेवून टाकला आणि मैनेचा फोन घाईने उचलला.
कृष्णाने अजून दोन वडे सांबार मध्ये घेतले आणि टीव्ही बघत खात बसला. कल्पना पोरीला आणि किचन साफ करत बसली.
तिच्या नवऱ्याने, कृष्णाच्या बायकोने आणि मैनेने,'संपला एकदाचा कॉल' म्हणून दीर्घ श्वास घेतला.


विद्या भुतकर.  

Monday, February 27, 2017

Friday, February 24, 2017

स्वप्नाळू : भाग ४ (अंतिम )

        पुढचे अनेक दिवस असेच सरले. कुणीच कुणाचा रुसवा काढायला आलं नाही की गेलं नाही. मुक्ताने एक दोनदा मेसेज केले होते केदार आणि नितिनलाही पण त्याच्यावर कुणाचंच उत्तर आलं नव्हतं. ज्याला त्याला विचार करायला वेळ दिला पाहिजे आणि आपणही घेतला पाहिजे हे मुक्ताला कळत होतंच. ऑफिस तर चालूच होतं. 
असेच एक दिवस जेवताना पूनमने तिला विचारलं,"काय गं किती दिवस अशी गप्प राहणार आहेस? काही सांगत पण नाहीस. "
ती बोलत असतानाच मुक्ताने आपल्या डब्यातली भाजी पूनमला वाढली. ते पाहून पूनम पुढे म्हणाली,"हे बघ मला नुसतं असं खायला घालून मी शांत होणार नाहीये. तुझं काय चाललंय ते सांगशील का?" 
शेवटी मुक्ता बोलायला लागली,"अगं खरं सांगायचं तर भांडण असं कुणाचंच कुणाशीच झालं नाहीये पण प्रत्येकाला माहितेय काय घडलं आहे ते. मला कळलंच नाही कधी त्याच्यात जीव अडकला. नसते उद्योग. कुठे एकदाचं माझं काम मार्गी लागत होतं तर मधेच दुसरंच काहीतरी उद्भवलं. "
पूनम,"मग तुला केदारशी लग्न करायचं नाहीये का? तसं त्याला क्लिअर सांगून टाक ना? आता त्याच्याशी संबंध ठेवायचेच नाहीत तर मग हॉटेलच्या कर्जाचंही बघ बाई. आणि असंही तुम्ही एकत्र काम कसं करू शकणार आहे हे सर्व झाल्यावर?"
मुक्ता वैतागली,"पूनम अगं केवळ, लग्न आणि हॉटेल हाच मुद्दा नाहीये. आमची इतक्या वर्षाची मैत्री आहे ती अशीच तोडायची का? सगळा गोंधळ आहे नुसता. " तिने डबा बंद केला आणि पूनमच्या जेवणाची वाट बघत बसली. 
"नितीनशी तरी बोललीस का? तो काय म्हणतोय?"पूनमने विचारलं. 
"तो काय बोलणार? आमचं त्या दिवसानंतर काहीच बोलणं नाहीये. मुळात असेही आम्ही बोलत कुठे होतो जास्त?" तिने उपहासाने वाक्य टाकलं.
"जाऊ दे उगाच त्रास करून घेऊ नकोस, मी आहे ठीक आता." म्हणत मुक्ता उठलीच. पूणमलाही मग तिच्या सोबत निघावं लागलं. 
        मुक्ताचं मन आजकाल स्वयंपाकात रमत नव्हतं. त्यामुळे काहीतरी बनवून टाकायची ती आणि बाकी बराचसा वेळ विचार करण्यात. पण जित्याची खोड कशी जाणार? मन रमवण्यासाठी तिने मसाले बनवायला सुरुवात केली. धणे-जिऱ्याची पूड, गोडा मसाला, भरल्या वांग्यासाठी मिक्स ओला मसाला हे तिचं चालू झालं. मधेच तिने भाजणीसाठी डाळी, तांदूळ, ज्वारी सगळं धुवून भाजून घेतलं. धान्य भाजता भाजता ती केदारच्या प्रपोजलचा विचार करत होती आणि तिला एकदम काही आठवलं.
तिने केदारला फोन केला त्याने उचलला नाहीच.
मग मेसेज केला,"एकदा तरी बोलायला संधी देणार आहेस की नाही?"
यावर मात्र उत्तर आलं होतं,"बोल". 
तिने मग त्याला परत कॉल लावला. यावेळी त्याने उचलला.
"मला तुला भेटायचं आहे. " तिने अधिकाराने सांगितलं. 
"पण..." तो. 
"पण-बीण काही नको. आपण काही लहान मुलं नाहीयेत हे असं कट्टी करून बसायला. तू येणार आहेस की नाही सांग? तुझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवते." 
त्याने नाराजीनेच 'हो' म्हणून सांगितलं. 
तिने अधीरतेने त्याच्यासाठी पनीर मसाला आणि पुलाव बनवायला घेतला. तिच्या वागण्यात जरा चंचलता आली होती. तो आल्या आल्या तिने हसून दार उघडलं. त्याचा चेहरा अजून रुसलेलाच. 
ती," काय रे काही लागलंय का?" त्याने नकाराने मान हलवली. 
"मग इतका चेहरा पाडून का बसला आहेस? हास की?" तिने त्याला चिअर अप केलं. 
"हे बघ केदार, तू ना मला कन्फ्युज केलंस. आणि हो, एक चूकही केली आहेस त्या दिवशी प्रपोज करताना.", ती बोलली.
त्याने वर पाहिलं. 
"हे बघ तू मला आधी लग्नाचं विचारलंस आणि मग बिझनेस बद्दल. बरं, हे दोन्ही एकत्र तर केलंच शिवाय हेही म्हणालास की तुम्ही मुली फार सेंटी असता, उगाच इमोशनल होऊन बिझनेस करता. आणि आता तू काय करत आहेस? तुला सांगते, आपण हे बिझनेस आणि लग्नाचं एकत्र काढायलाच नको होतं."
"आणि नितीनसोबत चालेल?" त्याने कुत्सितपणे विचारलं. 
"अरे थांब ना! मला बोलू दे. हे हॉटेल माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही तितकंच महत्वाचं आहे, होय ना?" तिने विचारलं.
"हम्म..", तो.
 "आणि माझ्या लक्षात आलं की आपण ते 'झालं तर दोन्ही नाहीतर काहीच नाही' असा विचार करून काहीच बोलत नाहीये. बरोबर ना?"
"ह्म्म्म" तो हुंकारला. 
"म्हणजे बघ, जर फक्त लग्नाचा विषय असता तर आपण तेव्हाच बोलून मोकळे झालो असतो ना? पण तू तरी माझ्याशी भांडून, संबंध तोडलेस का? नाही ना? आणि बिझनेस असता केवळ तर जरा समजून-समजावून पुन्हा बोलून आपलं स्वप्नं पूर्ण केलं असतं. बरोबर की नाही? मला वाटतं, आपण सध्या लग्न हा विषय थोडा बाजूला ठेऊ, तुला काय वाटतं?"
"असा कसा बाजूला ठेवू मुक्ता?" त्याने चिडून विचारले. 
"कसा म्हणजे? लग्न झालंय का आपलं? बोलू ना त्या विषयावर परत. पण आता ही भेळमिसळ नको असं मला वाटतं. मी जर अशी इमोशनल झाले असते तर तू म्हणाला असतंस की नाही मला? उगाच इमोशनल होऊ नको म्हणून? हे बघ थोडा विचार कर. माझ्याइतकंच तुझंही ते स्वप्न आहे. आपण आपली स्वप्नं अशी पूर्ण करायच्या वयात हे काय भांडण घेऊन बसलोय? दोन मुलं बिझनेस करतात तेंव्हा काही वाद झाले तर ते सोडवून पुन्हा एकत्र येतातच ना? आपणही असेच मित्र आहोत आधी आणि मग बाकी सर्व. हे बघ मी तुला उगाच काहीतरी सांगत नाहीये. लग्नाचा विषय नसता तर आपण बाकी कुठलंही भांडण सोडवलंच असतं ना? मग हेही तसंच समज. तू विचार कर, हवा तेव्हढा वेळ घे. आपण पुन्हा बोलू, पण हे असं उगाच न बोलता सोडून देणं मला काही पटत नाही. "
ती ताटं घेत असताना त्याने तिला थांबवलं, म्हणाला,"मी निघतो. नंतर जेऊ कधी एकत्र." 
तिने 'बरं' म्हणून पटापट डबे काढले आणि त्याला सर्व नीट पॅक करून दिलं. तो तिचं इतकं नीटनेटकं पॅकिंग बघून हसला. तीही त्याला उमजून हसली आणि 'बाय' म्हणाली. 

          तो गेल्यावर तिच्यावर मोठ्ठ काम होतं. तिने गाडी बुक केली आणि नितीनच्या शेतावर जायला निघाली. दोन तासाचा प्रवास होता, कधी एकदा तिथे पोचतो असं तिला झालं होतं. तो तिथे असेल-नसेल माहित नाही, पण त्याला भेटणं गरजेचं होतं. शेतावर पोचल्यावर तिने तो कुठे आहे म्हणून एका पोराला विचारलं, त्याने सांगितलं तशी ती चालत राहिली. त्याने बोलवूनही आपण कधीच इथे आलो नव्हतो यावर तिला स्वतःचाच राग येत होता. कुठेतरी दूर तिला त्याची आकृती दिसली. इतक्या दिवसांनी त्याला पाहून उगाच भरून येईल म्हणून तिने दोन क्षण दूरच थांबून घेतलं. 
         त्याच्याजवळ आल्यावर तिने त्याला मोठ्ठ स्माईल दिलं, त्यानेही नाईलाजाने. आपले विचार, भावना आतमध्ये दाबून कशा ठेवायच्या हे त्याला चांगलंच माहित होतं. तिने त्याला 'कुठेतरी बसूया का?' विचारलं. तो तिला घेऊन बांधावरच्या उंबराच्या झाडाखाली आला. दोघेही थोडी मोकळी जागा पाहून बसले.
तिने त्याच्याकडे डोळेभरून पाहिलं आणि म्हणाली,"अख्खं आयुष्य संपलं ना तरी एक शब्द बोलला नसतास तू, ना माझ्याशी ना माझ्याबद्दल. बरोबर ना?"
तो मान खाली घालूनच बसलेला. 
"त्यादिवशी तू पहिल्यांदा माझ्या हातचं जेवलास आणि मन तृप्त झालं. कुणीतरी असं माणूस आपलं असावं असं वाटलं. पुढे तुझं तुझ्या शेतांवरलं प्रेम, त्यासाठी घेतलेले कष्ट हे सर्व आवडत होतंच. त्यादिवशी तू भाज्या घेऊन आलास आणि जणू तुझ्यासोबतचं आख्खं आयुष्य डोळ्यासमोरून गेलं. पण तू निघून गेलास, केदारही चिडून गेला आणि वाटलं, किती ते नुकसान?" 
"एक स्त्री म्हणून आपल्या माणसानं आपल्या हातचं जेवण पोटभरून खावं यासारखं सुख नाही. ते मला तुझ्यात दिसलं. पण मग केदारही माझा मित्र आहेच. त्यानेही मला खूप काही दिलंय, शिकवलंय. या एका सुखासाठी ते सर्व तोडायचं नव्हतं मला. आणि सर्वात महत्वाचं सांगू का? तू, मी, केदार आपण सगळे स्वप्नाळू लोक आहोत. तू तुझ्या शेतावर जितकं प्रेम करतोस तितकंच माझं माझ्या प्रत्येक पदार्थावर आहे आणि तितकंच केदारचं त्याच्या बिझनेसवर. मी विचार केला, आपल्या भावनांमध्ये आपल्या स्वप्नांना का आपण चिरडायचं? इतकी लहान थोडीच आहेत ती? वर्षानुवर्षे मनात जपलीत, त्याच्यासाठी इतके कष्ट घेतलेत. मग ते इतक्या सहज का सोडून द्यायचं? तुला तुझा हा शेतीचा व्यवसाय वाढवायचा आहे तसेच आम्हालाही हॉटेलचा. उगाच तीन पार्टनरमध्ये एक मुलगी आहे म्हणून सगळे घोळ का? आपल्याला इतके परफेक्ट पार्टनर कुठेच मिळणार नाहीत. मग ते सोडून, आपलं इतकं मोठं नुकसान का करून घ्यायचं? आणि जेवायचंच म्हणशील तर एकदा हॉटेल सुरु झाले की तू एकदा काय रोज येऊन जेवलास तरी चालेल. होय ना?"
त्याने वर पाहिलं, तिच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठांवरच हसू दोन वेगळ्या गोष्टी करत होतं. ती बोलतच राहिली,"नितीन, मला सध्या या कुठल्याच भावनांमध्ये अडकायचं नाहीये. मी माझं स्वप्न इतक्या सहज हातचं नाही जाऊ देणार. तुला खरंच योग्य वाटलं तर अजूनही आपण तसेच पार्टनर राहू जसं आधी ठरलं होतं. पुढच्या आठवड्यात हॉटेलच्या राहिलेल्या कामांसाठी वेगाने सुरुवात करणार आहे मी. तू आलास तर खूप आनंद वाटेल मला. तुझ्या या शेताने, मैत्रीने खूप आनंद दिलाय मला, तो असाच मिळू दे... येते मी. " 

ती उठली आणि पुन्हा म्हणाली,"येऊ मी?". तसा नितीनही उठला. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि 'हो' म्हणाला. बांधावरून काठाला येईपर्यंत दोघेही न बोलता चालत राहिले. तिची कॅब तिथेच होती अजून. ती निघाली आणि तोही वळला. दूरवर पसरलेल्या आपल्या हिरव्यागार शेताकडे पाहात राहिला आणि ती वळून त्याच्याकडे.... पण तिच्या लक्षात आलं होतं तिच्यासाठी तिचं स्वप्न बाकी सर्वांपेक्षा मोठं होतं. ती केवळ एक वेळ होती, स्वप्नांपासून भरकटल्याची. आयुष्य अजून खूप मोठं आहे, आपली स्वप्नं अशीच सोडून देण्यासाठी.

ती डोळे पुसून पुन्हा स्थित झाली. तिला आता घाई झाली होती आपलं स्वप्न पूर्ण करण्याची. 

समाप्त.

विद्या भुतकर. 


Thursday, February 23, 2017

स्वप्नाळू : भाग ३

       ती रात्र वगळता मुक्ता पुन्हा तिच्या विश्वात रमली होती. एके दिवशी सकाळ सकाळी फोन चेक करताना मुक्ताला एक मेसेज दिसला, नितीनचा. तिने उघडून पहिले तर त्यात फोटो होता वालाच्या शेंगाचा त्याच्या रोपट्यासहित. धुक्यातल्या त्या सकाळच्या फोटोमध्ये शेंगांवरचं दव खुलून दिसत होतं. त्या वाफ्यात भरभरून आलेल्या शेंगा पाहून तिला आनंद झाला. तिने हसून त्याच्या मेसेजला 'गुड मॉर्निंग' असं उत्तर पाठवलं. दिवस सरताना तिने अजून एक मेसेज त्याला केला, एक फोटो. ती आठवणीने वालाच्या शेंगा बाजारातून घेऊन आली होती. तिने त्याची वाफवून भाजी केली, कारळ्याची चटणी, बाजरीची तीळ पेरून भाकरी केली.  त्याचा एक छान फोटो काढून तो तिने पाठवला होता. त्यानेही मग त्यावर स्मितहास्य असलेला स्मायली पाठवला आणि 'गुड नाईट' ही लिहिलं होतं. 
       केदार आणि तिची बाकी कामे चालूच होती. एका जुन्याच हॉटेलला विकत घेऊन दुरुस्ती आणि नवीन रूप द्यायचं ठरलं होतं. मुक्ताची उत्सुकता शिगेला लागली होती. कधी होणार हे सगळं आणि कधी एकदा आपलं स्वप्न पूर्ण होणार असं तिला राहून राहून वाटत होतं. केदारनेही सर्व प्रोजेक्टचे बजेट काढले. प्लॅनिंग मध्ये काय काय कधी झाले पाहिजे हे पाहिले. रोज प्लॅन्स बनवून आणायचें आणि त्यावर चर्चा करायची. कामांसाठी किती लोक लागतील, काऊंटरवर कोण असणार, टायमिंग काय ठेवायचे, इ. तो तिला विचारत असायचा.
एकदा तो म्हणालाही,"तुला माहितेय ना? जेवण बनवणे हा हॉटेलचा फक्त एक भाग आहे?"
तिने नुसती मान हलवली.
"People management लागतं खूप त्याला. खूप प्रॉब्लेम्स असतात त्यात. मदतीला लोक लागतात, त्यांना आपण आपल्याला लागणारे काम शिकवण्यात वेळ जातो मग तेच शिक्षण घेऊन ते सोडून जातात. मी बरंच रिसर्च केला आहे."
"तू केलंयस ना? मग मला काय टेन्शन आहे?" ती म्हणाली.
"अगं आपल्याला अगदी प्रत्येक प्लेटसाठी किती खर्च येतो, किती ओव्हरहेड आहे आणि किती फायदा होईल हे सर्व पहायला लागेल. "
"बघू ना मग? तू का चिंता करतोस?" तिने विचारलं.
"असं नाही मुक्ता, पण तू इतके लाईट घेऊन नकोस हे सर्व. तुझं स्वप्न हे हॉटेल आहे तसंच माझंही आहे 'एक यशस्वी व्यवसाय' म्हणून. " तो काळजीने म्हणाला.
तिने मग त्याला समजावलं,"मला माहीत आहे रे. तू अभ्यासही किती मन लावून करायचास. म्हणून तर आपण इतके परफेक्ट पार्टनर आहोत. बरं, आय प्रॉमिस, मी माझ्याकडून सर्व लागेल ती माहिती देते मी तुला. चालेल?"
त्याने हसून मान हलवली.
         एका जाहिरात कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याने. रोज वेगवेगळ्या आयडिया घेऊन तो मुक्ताकडे यायचा. तिने सांगितलं तसे काम करायला सुरुवात केली. एकेक पदार्थ बनवून त्यांचे प्रमाण मोजून पाहायची, दोन लोकांना किती लागते, ४ जणांची ऑर्डर आली तर काय? केटरिंग साठी कुणी विचारले तर दर काय? असे अनेक विचार तिच्या डोक्यात असायचे. कधी नितीनला भाज्यांचे दर विचारायची. कुठली भाजी किती दिवस टिकते, हेही विचारायची. हळूहळू ती तिच्याकडून जमेल तशी माहिती केदारला देत होती. 
     इकडे, मुक्ता आणि नितीनचा हळूहळू रोजचा नियमच झाला. रोज सकाळी मेसेजचा आणि संध्याकाळीही. सकाळ सकाळी शेतातून येणाऱ्या ताज्या फोटोंमध्ये कधी त्याचा हात फक्त दिसायचा. त्याचे ते हात तिच्या साठी 'कष्टाची' एक ओळख बनले होते. तो मात्र क्वचितच दिसायचा. दिसला तरी ते फोटोसाठीचं हसू त्यात नसायचं. तिच्या फोटोंमध्येही केवळ एकाहून एक सरस पदार्थ दिसायचे. जणू त्यांच्या भाज्यातून, जेवणातून ते एकमेकांचं हसू पाहत होते. बाकी मग शब्दांची गरज कुणाला होती? केवळ 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट' पुरेसे होते. आता केदारलाही काही अंधारात ठेवलेलं नव्हतंच कुणी. काही विषय निघाला की त्यावर तिघांचं बोलणं व्हायचंच. पण या दोघांची भाषा मात्र त्याला कळली नव्हती.निदान त्यांना तरी असंच वाटलं होतं. 
      असेच एक दिवस संध्याकाळी मुक्ता टीव्ही बघत बसलेली असताना दारावरची बेल वाजली. दार उघडले तर नितीन उभा होता. हातात एक जाड कापडाची पिशवी भरगच्च भरली होती. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.
तो आत येता येता म्हणाला,"सॉरी ना सांगता आलो पण फोन बंद पडला होता आणि रात्रीच परत जायचं आहे. पण या भाज्या इतक्या ताज्या होत्या की..... ".
        तिला स्वष्टीकरणाची गरज नव्हतीच. तिने पिशवीतले हरभऱ्यांचे डहाळे, वाटाण्याच्या शेंगा, गाजरे सगळं एका भांड्यात काढलं होतं. तिने चहा ठेवला. त्याने हात धुवून, डहाळे विसळून घेतले आणि हरभरे सोलायला सुरुवात केली. तिनेही भाकरी थापल्या, भात लावला, उडिदाच्या डाळीची आमटी केली. त्याने सोललेले हरभरे खलबत्यात भरडून घेतले. तिने भाजीला फोडणी टाकली, उकळलेल्या भाजीवर मस्त तवंग आला. मसाल्याच्या वासाने त्याला थोडा ठसका लागलाच आणि फोडणी चांगली बसली हे पाहून ती हसली. 
ती काकडी, गाजर चिरून घेईपर्यंत त्याने ताटे, वाट्या घेतले. ती त्याला म्हणाली,"तू बैस मी नंतर बसते." 
त्याने विचारलं, "का?" परत काही विचार करून म्हणाला,"केदारसाठी का?" 
       तिने नुसतीच मान हलवली आणि त्याला ताट बनवून दिले. गरम गरम भाकरी, हरभऱ्याची भाजी, आमटी त्याने भरपेट जेवण केलं. ती केवळ लागेल तसं वाढत राहिली. आणि तो जेवत राहिला. त्याच्या मन लावून जेवण्याकडे ती मन लावून पहात होती. मधेच तिने,"कसं झालंय?" विचारलं. त्याने एकदाच मान वर करून डोळ्यात डोळे घालून सांगितलं,"चांगलं झालंय की" आणि पुन्हा तो जेवणात गुंगला. जेवण होतं आलं इतक्यात बेल वाजली आणि दोघांची तंद्री भंग पावली. ती पटकन उठून गेली आणि दार उघडलं. केदारच होता. 
तो आत आला आणि नितीनला पाहून म्हणाला,"अरे तू कधी आलास? मला फोन नाही केलास?"
तीच बोलली मधे,"हां, मी पण हेच म्हणलं तर म्हणाला फोन बंद पडलाय.". 
"आणि तुझा?" केदारने तिला विचारल्यावर मात्र काही उत्तर तिच्याकडे नव्हतं. 
ती घाईने म्हणाली,"बस, जेवायला थांबलीय मी." 
नितीनच्या चेहऱ्याने मात्र वेगळंच उत्तर दिलं होतं. तिने दोघांचं ताट वाढून घेतलं. 
पहिला घास घेतला आणि तिने केदारला विचारलंही,"कसं झालंय?". 
त्यानेही नेहमीसारखंच उत्तर दिलं होतं,"नेहमीसारखंच ...छान". तिला ओल्या हरभऱ्याची भाजी किती आवडते हे त्याला चांगलंच माहित होतं. 
ती पुढे बोलत राहिली,"हे बघ, नितीन गाजरं, वाटाणा सगळं घेऊन आलाय. उद्या पुलाव करू लग्नात असतो ना तसला?"
त्याने मान हलवली आणि न बोलता जेवत राहिला. नितीनचं जेवण झाल्यावर तो हात तसेच धरून दोघांची वाट बघत बसून राहिला. 
जेवण झाल्यावर मुक्ता आवरत असतानाच नितीन म्हणाला,"चला मी येतो परत उशीर होईल सकाळी पाणी द्यायचंय. पालक, मेथी द्यायची आहे एका हॉटेलला." 
"बरं" म्हणून ताटं उचलून केदारने सिंकमध्ये घेतली आणि सवयीप्रमाणे धुवायला सुरुवात केली. 
नितीनने रिकामी पिशवी घडी घालून हातात घेतली आणि दारात आला. तशी मुक्ताही बाहेर आली. 
दाराच्या चौकटीत उभे राहून तिने त्याला 'बाय' म्हटलं. 
तो तिच्याकडे पहात क्षणभर थांबला आणि "धन्यवाद" म्हणून निघून गेला. 
          ती आत आली आणि मुकाट्याने आवरू लागली. थोड्या वेळाने केदार निघून गेला. आज एक वेगळीच निशब्द रात्र होती. 
         दुसरा दिवस तसा उदासच उजाडला. कितीतरी वेळ मुक्ता आपल्या फोनकडे पाहत राहिली. आज गुड मॉर्निंग मेसेज आलाच नव्हता. आपण केदारच्या सोडून त्याच्या मेसेजची वाट पाहतोय हा विचार करून तिला स्वतःचीच लाज वाटली क्षणभर. पण तरीही नितीनचा विचार येतच राहिला. त्याचं ते शांत असणं, आपण केलेला स्वयंपाक पॉट भरून जेवणं तिला सुखावत होतं. कुठलेही शब्द न बोलता त्याने भाजी आणली आणि आपण त्याच्यासोबत वाहवत गेलो असं तिला वाटलं. पूनमच्या फोनने तिची विचारांची चक्रं थांबली.
"काय गं अजून आली नाहीस ऑफिसला?", पूनमने विचारलं. 
"हा जरा उशीर झाला रात्री आवरायला. निघतेच आहे."
परत विचार करून ती म्हणाली,"मी आज जरा सुट्टीच घेते. बरं वाटत नाहीये." 
"काय गं एकदम काय झालं? सगळं ठीक आहे ना? केदार थांबला होता वाटतं रात्री?" पूनमने लाडाने विचारलं. 
"तू पण ना? गप बरं. दमलेय जरा सारखी धावपळ पण चालू आहे ना हॉटेलसाठी." मुक्ता म्हणाली. 
        फोन बंद करून ती बराच वेळ पडून राहिली. काही सुचेनासं झालं म्हणून उठली किचनमध्ये जाऊन आधी चहा ठेवला. कॅलेंडर पाहिलं तर आज चतुर्थी होती. तिने साबुदाणा शोधून भिजवला, बटाटे मोजून ठेवले. तिथेच असलेलं रताळे चिरून त्यांना तुपात परतायला सुरुवात केली. थोडा गूळ चिरून त्यांना लालसर परतले. चहा झाला तशी तो घेऊन कॅलेंडर हातात घेऊन बाल्कनीत बसून राहिली. हॉटेलचं वेळापत्रक तिने कॅलेंडरवरच लिहिलेलं होतं. आज मेनूकार्डच्या प्रिंटिंगच्या आधी त्याचे डिझाईन चेक करायला जायचं होतं. चहा घेतल्यावर तिला थोडं बरं वाटलं. विचार करून तिने केदारला फोन लावला. केदारने फोन उचलला नव्हताच. तिने त्याला मेसेज केला,"डिझाईन अपॉइंटमेंट ३pm". थोडा वेळ फोन हातात धरून उत्तराची वाट बघत राहिली. पण काही उत्तर आले नव्हते. टाईमपास म्हणून तिने नितीनने पाठवलेले फोटो चाळायला सुरुवात केली. एकेका फोटोकडे पाहून तिला काहीतरी आठवत होतं आणि थोडंसं का होईना हसू येत होतं. 
       दिवस असाच आळसात गेला. रताळ्यांवरच तीच दुपारचं जेवण झालं. कुणाचाही फोन, मेसेज नाहीच. ३ वाजताची अपॉइंटमेंट तिने फोन करून कॅन्सल केली. आपण हे करत आहोत या विचाराने तिला स्वतःवरच चीड आली. थोडं बरं वाटावं म्हणून ती बाहेर पडली, मिरच्या, कढीपत्ता, उपवासाची भाजणी घेऊन घरी आली. भिजलेल्या शाबुदाण्यात तिने हिरवी मिरची आणि जिऱ्याचे वाटण घातले, मीठ, कूट, साखर, उकडलेला बटाटा,कोथिंबीर  घातलं. सर्व एकजीव करून त्याचे वडे तळून घेतले आपल्यापुरतेच. सोनेरी रंगाचे ते एकसारखे वडे पाहून ती स्वतःवरच खूष झाली. 'वडे बाकी हजार हॉटेल्स मध्ये मिळत असले तरी लोकांनी माझ्या हातचे वडे खायला यातला हवं' असा विचार करून उगाचच हसली. जेवण करताना फोन चाळताना केदारचं उत्तर आलंच नव्हतं हे पाहून पुन्हा ती निराश झाली. 
"आपल्याला खरंच काय हवंय आणि काय नको हे विचार केलेच पाहिजेत आणि तेही लवकरच" हे तिला कळून चुकलं होतं.

क्रमशः

विद्या भुतकर.

स्वप्नाळू : भाग २

        आदल्या रात्री गप्पा मारण्यात बराच उशीर झाला त्यामुळे मुक्ताला उठायलाही उशीर झालाच होता. तिने पटापट आवरायला सुरुवात केली. डोक्यात केदारचे, लग्नाचे विचार होतेच. पण शाळेच्या पहिल्या दिवशी असावी तशी उत्सुकता तिला आपल्या हॉटेलबद्दल वाटत होती. उशीर झाल्यावर 'फोडणीची खिचडी' हे तिचं नेहमीच ठरलेलं. तिने सगळ्या डाळी, खास खिचडीसाठी ठेवलेला तुकडा तांदूळ भिजवले. लाल सुक्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे सर्व काढून ठेवले. मधेच तिला वाटलं,'ही खिचडी तर आपल्या मेनूवर पहिल्या नंबरवर असली पाहिजे'. फोडणीत खरपूस लसणाचा वास आला आणि ती खूष झाली. तिने डब्यात खिचडी नेली की बाकी मित्र मैत्रिणीही मागून घेत त्यामुळे जरा जास्तच बनवली होती. घरातून निघताना लिंबाचं गोड लोणचं, भाजलेले पापड आणि शेंगदाण्याची चटणी आठवणीने डब्यात घेतली. आजचा दिवस एकदम मस्त सुरु झाला होता.
        ऑफिसमध्ये जाताना केदारला कॉल करायला ती विसरली नव्हती. पोचल्यावर तिने लगेचच मॅनेजरसोबत मिटिंग ठरवून टाकली होती. उगाच परत उशीर नको म्हणून. जरा मेल चेक करून झाल्यावर तिने मैत्रिणीला,पूनमला, 'चल कॉफी घेऊ' म्हणून हलवलं. तिलाही काहीतरी स्पेशल दिसत होतं. दोघी कॉफी घेऊन शेजारच्याच टेबलजवळ बसल्या. पूनमने भुवया उंचावल्या तशी ती बोलू लागली.
"काय केदारने प्रपोज केलं."
"काSSSSSSS य?", पूनम ओरडली तशी तिने तिला हात दाखवून शांत बसवलं. आणि अचानक आपण लाजतोय याची तिला जाणीव झाली. तिचा तो लाजरा हसणारा चेहरा पाहून पूनमने तिला मिठी मारली आणि पार्टीही मागितली.
"तुला ना? नुसत्या पार्ट्या पाहिजेत" मुक्ता बोलली.
"पार्टी तो बनती है यार. इतकी मोठी न्यूज अशीच सांगतेस?",पूनम एकदम हायपर झालेली.
"त्याने अजून एक गोष्ट सांगितली आहे" मुक्त पुढे बोलली.
"काय अजून गुड न्यूज?", पूनमला एकेक धक्के बसत होते. मुक्ताने तिला मग हॉटेलबद्दलही सांगितले.
"बस यार पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजेच", पूनम म्हणाली.
"ओके जाऊ विकेंडला नक्की.आज आधी काम तरी करू.आणि हो तुझी आवडती खिचडी आणली आहे. " म्हणून मुक्ताने तिला उठवले.
"हां आता नुसत्या खिचडीवर भागणार नाहीये हा." पूनम बोलतच होती.
       दोघी जागेवर आल्या तर मिटिंग होती एक. तिथे गेल्यावर त्या महिन्यात वाढदिवस असलेल्या लोकांसाठी केक आणला होता. एकूण काय आनंदच आनंद. असेही काम करायची इच्छा कुणाला होती म्हणा. पण या असल्या मीटिंगमध्ये उगाच पुढे होऊन काम करायला नको वाटायचं तिला. दरवेळी आपणच पुढे होऊन का केक वाढायचा सर्वाना? "मुलगी म्हणून मी इथेही हे वाढण्याचे काम का करावे?" असं ती नेहमी पूनमला म्हणत असे. पण आज तो विचार सोडून ती केक घेऊन जागेवर गेली आणि पुन्हा एकदा आपल्या विचारांच्या कोशात निघून गेली. काल जितके आपण प्रॅक्टिकल बोलत होतो त्यापेक्षाही जास्त जवळीक केदारबद्दल जाणवत आहे हे पाहून तिला कसलं तरी समाधान वाटलं होतं.
        दुपारच्या मस्त जेवणानंतर ती मॅनेजरकडे गेली. तिला स्वतःला तर बिझनेसची माहिती होतीच पण त्याच्याकडूनही कर्जाबाबत लागेल ते तिने विचारून घेतले.  पुढच्या सहा महिन्यांत हॉटेलचं सर्व काही पक्कं करायचं तिने ठरवलंच होतं. मॅनेजरशी बोलल्यावर पुन्हा एकदा तिने केदारला फोन केला. तिच्या बोलण्यात थोडा फरक तिला जाणवत होताच. 'केदारचा विचार करून आपण लाजतोय का उगाचच?' म्हणून ती स्वतःवरच रुसलीही. हळूहळू तिला आता केदार 'आपला' असण्याचीही सवय झाली होती.
        एकदा सुरुवात झालीये म्हटल्यावर दोघेही कामाला लागले होते. पुढचे काही दिवस मग हॉटेलसाठी जागा शोधण्यात, इंटेरियर डिझाईनरशी बोलण्यात आणि मेनू ठरवण्यात गेले. दोघे बसून सविस्तर चर्चा करत, जाहिरातींसाठी वेगवेगळ्या कल्पना मांडत. तर कधी कॉलेजमध्ये शिकलेल्या एखाद्या विषयावरून वाद घालत. हॉटेल हे आता केवळ एक स्वप्न न राहता ध्येय बनलं होतं.

असेच एक दिवस संध्याकाळी तिला केदारचा फोन आला,"घरी आहेस ना? मी एका मित्राला घेऊन येतोय. जेवायलाच असेल तो."
तिने काही विचारण्याआधी त्याने फोन ठेवला होता. आता नेहमीप्रमाणेच काहीतरी खास 'साधी' डिश करावी असं तिच्या मनात आलं होतं पण, 'मित्रासाठी हे असं रोजचं जेवण बनवतेस का?' म्हणून केदार चिडेल की काय असा विचार केला आणि तिने, पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि वरण भात असा बेत आखला. इतक्यात पुन्हा त्याचा मेसेज आला,"पिठलं भाकरी करशील का?"
ती जरा दचकली. आजपर्यंत कधीही केदारने तिच्याकडे स्वतःहून पिठल्याची मागणी केली नव्हती. पण आता विचारलंच आहे तर मग काय? तिने हिरव्या मिरच्या, लसूण ठेचले, तेलात जिरे, मिरच्या लसूण परतला. कांदा हलकासा भाजला. भरडलेले दाणे त्यात घातले. जोरजोरात ते पिठलं तिने घोटलं. बाजूला भाकरी थापल्या. मऊ भात केला. भरलेल्या मिरच्या तळल्या. स्वयंपाक करणे हे जणू तिच्यासाठी ध्यानधारणाच होती एक प्रकारची.  'असा कोण मित्र आहे ज्यासाठी त्याने पिठलं मागितलं असावं' हा विचार मात्र तिच्या डोक्यात राहून राहून येत होता.

       केदार आणि त्याचा मित्र लवकरच घरी पोचले. तिने पाहिलं तर समोर एक माध्यम बांध्याचा, मळकट टी-शर्ट- जीन्स घातलेला आणि अगदी 'उन्हाने रापलेला' म्हणावा तसा रंग असलेला तरुण उभा होता. आत आल्यावर त्याने ओळख करून दिली,"हा नितीन, माझा शाळेतला मित्र. आणि ही मुक्ता."
'हाय' म्हणून दोघेही सोफयावर बसले. तिने आल्याचा चहा ठेवला. केदार तिला सांगत होता,"नितीन आणि मी दहावी पर्यंत सोबत होतो. शाळेनंतर याने कृषी कॉलेजमधून पदवी घेतली आणि जवळच्याच एका गावाकडे जमीन विकत घेतली. पहिले काही वर्ष नुकसान झालं त्याचं बरंच कर्जही होतं पण पठ्ठ्या काम करत राहिला आणि आता हळूहळू ऑरगॅनिक भाज्याचे पीक घेत आहे. हुशार आहे हा आपला मित्र. त्याच्या शेतांवर घेऊन जाईन तुला एकदा. "
तो कौतुक करताना नितीन मात्र शांत बसून होता. त्याच्या वागण्यातून त्याचं शांत व्यक्तिमत्व दिसत होतं.
पुढे केदारच बोलला, "आपल्याला हॉटेलसाठी असाच माणूस पाहिजे. खात्रीशीर, माहितीतला आणि जवळचा. देणार ना रे आम्हाला भाज्या?"
तो पुन्हा हसला आणि मान होकारार्थी हलवली.
पुढे मग मुक्ता बोलली,"मला वर्षभरात येणाऱ्या सर्व भाज्यांचे वेळापत्रक हवंय. म्हणजे कुठल्या महिन्यात काय पीक येतं आणि त्यानुसार मेनू बनवायचा आहे. बाकी वर्षभर ठेवायचे पदार्थ असतीलच. पण मला शेंगसोला, हुरडा, वालाची,पातीची भाजी, भरीत, पिठलं, नाचणीची भाकरी, ओल्या हरभऱ्याची भाजी, अंबाड्याची भाजी असे अनेक पदार्थ हवे आहेत. सोबत उसाचा रस, कैरीचं पन्हं हे सर्वही हवं आहे. " त्याने पुन्हा मान हलवली.
तिच्याकडून त्याने मग एक पेन आणि पेपर मागितला. दर महिन्याचा रकाना बनवून एकेक पिकाची यादी तो करू लागला. बाकी नेहमी येणाऱ्या भाज्या, फळे यांची वेगळी यादी केली आणि तिच्या हातात दिली. त्याच्या यादीतल्या गोष्टी पाहून ती खुश झाली.
"आम्ही भाज्या रोज पहाटे आणून देऊ. त्याज्या. या यादीनुसार तुम्ही मेनू बनवा. आणि काय पायजे तसं फोनवर कळवत जा म्हणजे तयारी ठेवता येईल." तो एकदम हळू स्थिर आवाजात बोलला.
त्याने पिकांसाठी करत असलेल्या प्लॅनिंग त्यांना समजावलं. कीटकांचा बंदोबस्त, खतपाणी कसं लागतं सर्व सांगितलं. बराच वेळ गप्पा मारण्यात गेला. तिने ताटं घेतली.
तिने बनवलेलं गरम गरम पिठलं, भाकरी, नाचणीचा पापड, कैरीचं लोणचं, गरम भात सर्व अगदी मन लावून तो खात होता. मधेच तिने त्याला विचारलंच,"कसं झालंय?" तो 'चांगलं आहे' म्हणून पुन्हा खाण्यात गुंगला. त्याने अजून भाकरी मागून घेतली. ती देताना तिला त्याचे चिरा गेलेले हातही दिसले. मग हळूहळू कष्टाच्या खुणा ती त्याच्या शरीरावर पाहून लागली. पायाला पडलेल्या भेगा, बाह्यांच्या बाजूला काळ्या पडलेल्या रंगाची रेष, मातकटलेले केस, आत गेलेत म्हणावं इतके सुकलेले गाल आणि त्यात त्याचं ते मन लावून जेवणं. तिच्या मनात ते चित्र पक्कं बसलं. जेवण झाल्यावर तो निघाला. दोघांचे नंबर त्याने घेतले. त्यांना व्हाट्स अँप वर ऍड केलं.
      निघताना तो एकदम तिच्याकडे बघून बोलला,"जेवण छान झालं. अगदी आईची आठवण झाली. आमची आई गावाकडची. ती गेली ७ वर्षं झाली. आज तिच्या हातचं जेवण आठवलं. धन्यवाद. " त्याचे पाणावलेले डोळे तिला दिसले आणि कसंतरी झालं. केदार त्याला सोडायला खाली गेला आणि ती बराच वेळ नितीनचा विचार करत बसली. कुणाला तरी आपल्या हातचं जेवण इतकं सुख देऊ शकतं या विचाराने तिला समाधान वाटलं.
क्रमश:
विद्या भुतकर.

Tuesday, February 21, 2017

स्वप्नाळू : भाग १

मुक्ताने केदारला फोन केला,"अरे मी काय म्हणत होते? आपण बाहेर जायलाच पाहिजे का?"
केदार वैतागला पण आज तिचा वाढदिवस होता. त्यामुळे तिला जे हवं तेच करणं योग्य होतं.   
खरंतर त्याला माहित होतं तिचं पुढचं वाक्य पण तरीही त्याने शांतपणे विचारलं,""मग काय हवं आहे तुला? ". 
        मुक्ता आणि केदार हे दोघे MBA चे मित्र. पुण्यात त्यांच्या बॅचमधले ते दोघेच होते त्यामुळे नियमित भेटीगाठी वाढल्या आणि मैत्री सवय कधी बनली त्यांना कळलंच नाही. आजही तिच्या वाढदिवसाला नेहमीप्रमाणे ते दोघेच होते. बाहेर जेवायला जाणे हा नेहमी वादाचा मुद्दा असायचा. सगळ्या जगाच्या एकदम उलट यांचा न्याय होता. केदारला बाहेर जाणं आवडायचं तर मुक्ताला त्याच्या उलट. बँकेची नोकरी चालू असली तरी जेवण बनवणे, लोकांना खाऊ घालणे, वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकणे हे तिचे आवडते उद्योग. त्यामुळे आजही तिने बाहेर जाण्यापेक्षा काहीतरी घरीच बनवावं असा विचार केला होता. 
ती बोलली,"अरे मस्त कांद्याची पात मिळाली येताना आणि हिरव्या मिरच्या पण. तू ये ना, भाकरी, कांद्याची पात, ठेचा करू. भारी होईल जेवण ना?"       
आता पुण्यात अशी मुलगी भेटणे हे निव्वळ अशक्य आहे. पण केदार तिला रोज स्वतः भेटत असल्याने अशी व्यक्ती अस्तित्वात आहे हे शेवटी मान्य केलं होतं. त्याने तासाभरात पोचतो म्हणून फोन ठेवला. इकडे मुक्ताने मोठ्या उत्साहात जेवण बनवायला सुरुवात केली. ताजी पात, मिरच्या पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटत होतं. पातीला लसूण आणि काळ्या मसाल्याची फोडणी तिने दिली, वरून भाजलेल्या दाण्याचा भरडलेला कूट पेरला. दुसऱ्या भांड्यात तिने तेलात जिरे, लसूण परतला, वरून हिरव्याकंच मिरच्या टाकल्या आणि परतायला सुरुवात केली. घर हळूहळू मिरचीच्या खाटाने भरून गेलं. पण ती तिच्या नादातच. भाकरी थापता थापता ती विचार करत होती तिच्या सो कॉल्ड हॉटेलचा. मनातल्या मनात तिने अनेकदा मेनूची उजळणी केली असेल. 
मुक्ताला एक शुद्ध मराठी जेवण असलेलं हॉटेल सुरु करायचं होतं. रोजच्या नोकरीतून केवळ चांगले पैसे साठवणे आणि पुढे व्यवसायात जोडणे हा एकच हेतू होता तिचा. जेवण बनवताना तिचा तोही हिशोब लावून झालाच. किती पैसे जमा झाले, अजून किती दिवस नोकरी करायची, हॉटेलला जागा कुठे बघायची सगळे विचार चालूच होते इतक्यात बेल वाजली. केदारच होता. तिने दार उघडलं आणि त्याचा चेहरा थोडा उतरला. जेवण बनवण्यात तिचा पार अवतार झाला होता. 
"निदान आज तरी जरा चांगले कपडे घालायचेस ना?" त्याने वैतागून विचारले. 
"आधी आत तर ये." ती हसून म्हणाली. 
आल्या आल्याच त्याला मिरच्यांच्या वासाने जोरात ठसका लागला. तिने पळत जाऊन पाणी आणलं. 
ती म्हणाली,"बघ कशा तिखट मिरच्या आहेत. छान ठेचा होतो याचा.बैस पाच मिनिटं झालंच आहे जेवण आता." 
 त्याला बाहेर बसवून ती किचनमध्ये आली. मिरच्या भाजल्या होत्या. त्यात कोथिंबीर, लिंबू पिळून तिने सर्व मिश्रण खलबत्त्यात घेतलं. केदार मागून आला आणि हसला. तिने वळून पाहिलं. 
"कुठल्या जमान्यात राहतेस तू ना?" तो हसत बोलला. 
"अरे तुला नाही कळणार, ठेचलेला ठेचाच भारी लागतो. तू गप्प बैस ना? मी करतेय ना?", ती. 
बराच वेळ ठेचा कुटून तिने तो वाटीत काढून घेतला. 
ताटात पातीचा बारीक कांदा, ठेचा, भाकरी आणि पातीची भाजी ठेवली आणि ते पाहून खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतच राहिला होता तो. दोघेही जेवायला बसले तसे तिनं विचारलं,"कसं झालंय?". 
तो,"नेहमीप्रमाणेच, छान झालंय.". 
तिनेही मग जेवायला सुरुवात केली. 
विचार करून तो पुढे बोलला,"पण खरं सांगू का तुला, मला कधी कधी वाटतं तू काहीतरी वेगळं ट्राय कर."
ती,"म्हणजे?"
तो,"म्हणजे तुझं हे मराठी जेवण छानच असतं गं. पण आज काल कॉन्टिनेन्टल लागतं लोकांना इथे. मग हे असं जेवण म्हणजे 'थाळी सिस्टीम' मध्ये अजून एक भर असं होऊन जाईल. तुला काय वाटतं."
तिने असा विचार कधी केलाच नव्हता, तिच्यासाठी तर स्वतः बनवलेली प्रत्येक भाजी आणि भाकरी स्पेशलच होती 
ती गप्प बसली. त्याला मग उगाच आपण बोललो असं वाटलं. 
जेवण झाल्यावर तिने गव्हाची गरम गरम खीर खायला आणली आणि जगात दुसरे काहीही नाहीये असा चेहरा करून मन लावून ती खात बसली. तिच्या या 'फूड कोमाची' त्याला चांगलीच माहिती होती. त्याने बराच वेळाने तिला हाक मारली,"मुक्ता..." तिने दचकून मान वर केली."... तुझ्यासाठी आज २ प्रपोजल आहेत." ती बावरली आणि तिने हातातली वाटी बाजूला ठेवली, तसा तोही पुढे झाला. तिच्यासमोर गुढग्यावर बसला. तिचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला,"माझ्याशी लग्न करशील?". 
तिला या प्रश्नाची अपेक्षा होतीच पण तो असा अचानक आल्यावर थोडी घाबरली. 
"गेल्या कित्येक वर्षाची आपली मैत्री अशी एकाच टप्प्यावर किती दिवस ठेवणार आहे?", तो. 
"हो रे बरोबर आहे. पण कधीकधी वाटतं आपण पर्याय नाही म्हणून सोबत आहोत की काय?", तिने स्पष्ट विचारलं. 
"असं काय बोलतेस? आपण काही छोटया गावात राहात नाही जिथे पर्याय नसतील. ते शोधायचे असते तर मिळालेही असतेच की.", तो. 
"हां तेही आहेच. तुला खरंच असं वाटतं आपण लग्न करावं?" तिने विचारलं. 
"मला वाटतं, का नाही? आपले घरचे असेही विचारत आहेतच लग्नाचं. आणि मला तरी आपण दोघे एकमेकांना अनुरूप वाटतो सगळ्याच बाबतीत. तुला काय वाटतं?", तो. 
लग्नाबद्दल इतकं प्रॅक्टिकल बोलतोय हे दोघांनाही जाणवत होतं पण 'ते असंही घरच्यांनी केलंच असतं, मग आपण का नाही?' असा विचार करून तीही बोलत राहिली. 
"हो अनुरूप तर आहेच रे. शिवाय इतके वर्षांची ओळख आहे आपली. एकमेकांना सहन करू शकलोय इतके दिवस हे काय कमी आहे?" ती हसून बोलली. 
"बस मग ठरलं तर, आपण घरी बोलू आणि सर्व पक्कं करून टाकू." तो फायनल बोलला आणि तिनेही मान हलवली. 
"बरं अरे ते दुसरं प्रपोजल काय ते सांगितलं नाहीस?" तिने विचारलं. 
"अरे हां विसरलोच. या पहिल्याच्या टेन्शनमध्ये होतो. पण तू एकदम कूल होतीस हा. आवडलं आपल्याला." तो पुढे बोलला,"अगं मी तुझ्यासाठी एक बिझनेस प्रपोजल पण आणलंय."
बिझनेस म्हटल्यावर ती सावरून बसली. 
तो," तू पैसे साठवत आहेस माहितेय मला. पण मीही तुझ्या हॉटेलमध्ये गुंतवणूक करायची म्हणत आहे. आपल्या MBA चा तरी कधी फायदा होणार? मी ५०% तरी पैसे देईन यात."
ती हे ऐकून एकदम खूष झाली. ते बघून तो म्हणाला," अरे हो, इतकी तर तू लग्नाच्या प्रपोजललाही एक्ससाईट नाही झालीस." 
"गप रे तू बोल पुढे." ती रागावली. 
"मी गुंतवणूक करेन आणि बिझनेस म्हणून फायद्यासाठी योग्य ते निर्णय घेतानाही सहभाग घेईन."
ती एकदम घाबरली तसा तो म्हणाला,"डोन्ट वरी, मेनू सोडून बाकी निर्णय. मुक्ता मला माहित आहे, हे तुझं स्वप्न आहे. त्यामुळे तू त्यात रमशील आणि तुझा तो हक्कही आहे. मी फक्त तुझ्या स्वप्नाला माझा हातभार लावतोय इतकंच."
ती हसली, त्याच्यासोबत राहण्याच्या तिच्या निर्णयाचा तिला पुन्हा एकदा आनंद झाला. 
"पण खरं सांगू का? तुम्ही मुली ना फार स्वप्नाळू असता. आता तुला हे लोकांना जेवण करून देण्यात आनंद होतो वगैरे ठीक आहे पण त्यात फायदा तोटा बघावं लागतंच. आणि हॉटेल सुरु झालं की त्यात बरेचदा यांत्रिकपणाही येतो. तेव्हा मात्र माघार घेऊ नकोस हा." त्याने तिला बजावलं. 
पण ती तिच्या स्वप्नांतच रेंगाळत होती. 
"मी बरीच माहिती काढलीय. जागा शोधू आपण, बाकी गोष्टी पण फायनल केल्या पाहिजेत. मी तर भाज्यांसाठी सुध्दा माणूस बघून ठेवलाय." तो तिच्याकडे बघत बोलला. हे ऐकून मात्र मुक्ता जाम खुश झाली होती. पटकन उठून ती त्याच्या शेजारी बसली, त्याच्या हातात हात घेऊन तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. त्यानेही तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला,"हैप्पी बर्थडे डिअर". 

क्रमशः 

विद्या भुतकर.

Thursday, February 16, 2017

एक होता हिवाळा
         मधे म्हणाले तसे सध्या सतत बर्फ चालूच आहे गेले काही दिवस. रोज बर्फाचे आणि इथल्या निसर्गाचे वेगळे रूप दिसत राहते. मागच्या आठवड्यात स्नो स्टॉर्म होते. सतत २४ तास बर्फ पडला. आदल्या दिवशीच लोकांनी जाऊन दुकानातून खाण्याचे सामान इ घेऊन आले, शाळांना सुट्ट्या, मग दिवसभर घरात बसून राहायचं हे सर्व झालं. माझ्यासारख्या लोकांना जे घरी बसून काम करू शकतात किंवा ज्यांना सुट्टी पडली तरी चालू शकते अशांना इतका त्रास होत नाही, जितका रोजगारावर काम करणाऱ्या लोकांना होतो. किंवा ज्यांना बर्फात ड्राईव्ह करून जावेच लागते किंवा बर्फ काढणे हेच ज्यांचे काम असते. 
       यावेळी एका मित्रांच्या घरची लाईटही गेली होती आणि घर प्रचंड थंड पडले होते. ज्यांना पर्याय असतात त्यांचे चालून जाते पण असे लोक जे थंडी सहन करू शकत नाहीत किंवा ज्यांचे कुणी नाही किंवा ज्यांना एखाद्या हॉटेलात जाऊन राहणे परवडणार नाही अशा लोकांना त्रास आहेच याचा. तर निसर्गाच्या अनेक भयानक रूपांपैकी हेही एक. जे समोर आल्यावरच त्याच्या शक्तीची प्रचिती येते. पण त्याचसोबत वादळ शमल्यावर त्याचं सौन्दर्यही दिसून येतं. तितकंच शांत आणि सुंदर. असेच काही फोटो गेल्या काही दिवसांतले. इथल्या उंच झाडांच्या प्रेमात आहे मी. त्यांच्यामुळे हा गाव जरा जास्तच खुलून येतो हे नक्कीच, उन्हाळा हिवाळा किंवा पानगळ कुठलाही ऋतू असो.

विद्या भुतकर.









Wednesday, February 15, 2017

एका लग्नाची भन्नाट गोष्ट

     जात्यावर हळद दळली, मुहूर्तमेढ रोवली, बायकांची गाणीही म्हणून झाली. गावातल्याच फोटोग्राफरनं सगळ्या बायकांचा एकेक फोटो काढला. '१०० रुपयाला एक फोटो' म्हटल्यावर शैलाक्कानं तिचा आणि सुनेचा वेगळा फोटो घ्यायचा विचार रद्द केला. आता गाडीत बसून निवांत नाश्ता करायचा या विचारानं ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. सुनेलाही तिने जवळ बसवलं. बाकी मांडव बांधून झाला होता. आता कसं लगीनघर वाटत होतं. पक्याच्या आईला, काकीला, काय करू अन काय नको असं झालेलं. नवरदेवाची आई म्हणून मान असला तरी काम सरता सरत नव्हतं. सगळे आहेर, बस्ता, पाहुणचार यातून कधी सुटतो असं तिला झालं होतं. मनात हजार वेळा तिने देवीला साकडं घातलं होतं,"हे लगीन पार पडू दे, पोराला घेऊन पयलें तुझ्या दारात येऊन तुझी साडी चोळी करतो बघ".
       दुपारी ४ ला गाडी निघणार होती मुलीच्या गावात जायला. काकीनं हजारवेळा तरी शिव्या घातल्या होत्या मनात,'मेल्याना कितीदा म्हटलं हिकडं करून द्या लगीन पण नाय. " अण्णाही वैतागले होते, अण्णाही एकेका पोराला कामं सांगून दमले होते. त्यांनी तिला शांत केलं. "जाऊ द्या ओ. किती चीडनार अजून? आता ते लोक आडूनच बसले तर काय करनार? नायतर मग आपल्याला करायला लागला अस्ता खर्च हितला. त्यापेक्षा गाडी घिऊन जायचं आणि गाडी घिऊन पोरीला आणायचं. बास !". काकी जरा शांत झाली. आता दोन दिवसांसाठी अशी हिम्मत सोडून चालणार नव्हती. तिनं पुन्हा एकदा घरात, ओसरीवर, स्वंयपाकघरात फेरी मारली. तिच्या भैनीच्या पोरीने तिला समजावलं,"मावशे बास की आता. परत हितंच यायचं हाय. आणि काय राह्यलं तरी आपन पोराकडंच हाय. असा रुबाब तरी कधी करनार?". तेही बरोबरच होतं म्हणा, मुलाची आई म्हणून रुबाबात राह्यचं सोडून काकीला सामान न्यायची, सगळं ठीक होण्याची काळजी.
       तिने घड्याळात पाहिलं, पाच वाजून गेले होते. सगळे पै-पाहुणे दारात जमा झाले. बाहेरगावच्या लोकांना सकाळ सकाळी दणकून जेवण घातलं होतं अण्णांनी. सगळे सुस्तावले होते. गाडी आली तशी सगळे खडबडून हलले. पक्याच्या हातावर काढलेली मेंदी अजून तशीच होती. चार गोळे का होईना काढायलाच पाहिजे होते ना? त्यामुळे बाकी पोरांनीच सामान उचललं. पक्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्स मध्ये बसला तसं काकीनं त्याला अडवलं, म्हटली,"एक मिनिट दम काढ". पक्यानं,"आता काय" म्हणून तोंड वाकडं केलं. ती घाईत घरात गेली, खडेमीठ-चार लाल मिरच्या घेऊन आली, ४-५ उठाबशा काढत, पुटपुटत त्यांचं मीठ काढलं आणि म्हणाली,"आमच्या गाडीत बस. उगा पोरा-सोरांच्या बर्बर मजा मारत बसू नका. आमच्या गाडीत दोन-चार तरणी पोरं पायजेल का नको?". पक्या आता वैतागला होता पण काकी लई दमली होती काम करून, तिला काय बोलणार म्हणून गप बसमध्ये बसला.
      बाकी बायकांनी, पुरुषांनी जागा पकडल्या, पिशव्या ठेवल्या. शैलाक्कानं पन आपली आणि सुनेची जागा पकडून घेतली. तिला आतल्या बाजूला बसवून ती बाहेरच्या सीटवर बसली. पुन्हा एकदा उठून पिशवी खाली घेऊन चाचपडली, परत ठेवली आणि खाली बसली. सुनेनं नुसतंच बघितलं आणि बाहेर बघायला लागली.
 शेजारच्या सीटवरल्या एका बाईनं विचारलं,"काय शैलाक्का, झाला का सासूबाई? काय म्हटला सुनेचं नाव ते?". शैलाक्कानं नाव सांगितलं,"जानवी".
ती बाई बोलली,"अस्स. चांगलं नाव हाय की".
शैलाक्कानं कौतुकानं सांगितलं,"होय, आम्हीच ठेवलंय. मला ती शिरेल मधली लै आवडली हुती बगा. मग म्हणलं, हेच ठेवायचं नाव सुनेचं. "
सून तिकडून थोडंसं हसली, नाईलाजाने. जागेवरून हात जोडून नमस्कार केला. तसं शैलाक्का म्हटली,"असं काय पुडाऱ्यागत हात जोडतेया, वाकून कर.या आपल्या पक्याच्या मावशी हायेत." म्हणून स्वतः उठून बाजूला झाली. तिकडे त्या बाईंनी,"असू दे असू दे" म्हटलं तरी सुनबाई उठल्या, बसमध्येच वाकून नमस्कार केला आणि पुन्हा जागेवर बसल्या.
"पोरगा आला न्हाई ते?" त्या बाईंनी विचारलं.
"हां त्याला जरा काम होतं. मग म्हटलं हिला तरी नेतो. नवी सुनबाई जरा समाजात चार लोकांची ओळख व्हायला पायजे ना? म्हनून घेऊन आलो मग."
त्या बाईंनी मान हलवली.
       गाडी भरली, बारकी पोरं उगाच उड्या मारत होती, त्यांना त्यांच्या आयांनी गप्प बसवलं, नारळ फुटला आणि देवीचं नाव घेऊन गाडी निघाली. सगळा मिळून ६ तासांचा रस्ता. पण रस्त्यात जेवण खाणं करून पुढं जायला वेळ होणारच होता. 'पहाटे पहाटे गाडी पोचायलाच पायजे' असा विचार करून काकीने एक सुस्कारा उसासा सोडला. जरा सगळे स्थिर झाल्यावर तिनं एक मोठी पिशवी पक्याला वरून काढायला लावली. त्यातनं एकेक करत बुंदीचे लाडू आणि चिवड्याचं पाकीट तिने मागे पाठवायला सुरुवात केली. शैलाक्काने सुनेला एक देऊन आपलं लगेचच उघडलंही. बकाणा भरत तिने शेजारच्या मावशींशी बोलायला सुरुवात केली. सुनबाईंनी दोन चार घास खाल्ले आणि पाकीट पुढच्या जाळीत ठेवलं. खाऊन हळूहळू करत सगळे पेंगले.

दोनेक तासांनी सुनबाईंनी शैलाक्काला हळूच हलवलं,म्हणाली,"आत्याबाई जायचं होतं. " "कुठं?" विचारल्यावर तिने करंगळी दाखवली.
"आता कुटं ? जरा दम काढ." म्हणून शैलाक्काने तिला गप्प बसवलं. ती गप्प बसली, कशीतरी अर्धातास कळ काढून तिने पुन्हा उठवलं, म्हणाली,"लै घाईची लागलीय." कुटं आडोश्याला थांबली तरी चालंल". तिचा चेहरा पाहून शैलाक्का उठली, तिने काकीला उठवून कानात सांगितलं, मग काकींनी पक्याच्या कानात. पक्याने पुढे जाऊन गाडी एका ठिकाणी थांबवली. त्या दोघी उतरल्या तशा अजून दोन चार बायका उतरून आडोशाला जाऊन आल्या. जानवी येईपर्यंत शैलाक्का बाहेर उभ्या राहिल्या. सगळे आत येऊन पुन्हा गाडी सुरु झाली. त्यात अर्धा तास तरी गेला होता. आत येऊन शैलाक्का शेजारच्या मावशीला सांगू लागली,"तुम्हाला म्हनून सांगते. दोन दिवस झाले सारकी ही अशी जायला लागलीया. आता येऊन डॉकटरला दाखवाय पायजे."
         आपल्याबद्दल असं लोकांशी बोललेलं जानवीला अजिबात आवडलं नाही. ती मान फिरवून बाहेर बघत बसली. तासाभरात गाडी पुन्हा थांबवायची वेळ आली. आता मात्र जानवीचा चेहरा रडवेला झाला होता. तिला पाहून पुन्हा गाडी थांबवली. एका तरण्या पोरीनं म्हटलंही,"मी जाते सोबत", तर शैलाक्काने काही ऐकलं नाही. स्वतःच तिच्यासोबत जाऊन आली. दोघी आत आल्यावर गाडी सुरु झाली. आत बाहेर जाताना, सगळे लोक आपल्याकडे बघत आहेत हे पाहून दोघीना अजूनच अवघडल्यासारखं झालं होतं. अजूनच आता सगळे जागे झाले होते आणि भूकही लागली होती. .पुढे पोरांनीच थोडं बघून एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबल्यावर सगळ्यांसाठी एकेक थाळी सांगून पक्याने मेंदीचे हात धुतले. आणि जेवायला बसला.
        तिकडे सगळ्या बायकांनी टेबल जोडून आपला घोळका बनवला. सगळ्या गप्पा मारत जेवल्या. कुणी आपल्या पोरांना खायला घातलं. कुणाला उलटी झाली म्हणून काहीच खाल्लं नाही. जानवीलाही जेवण काही जाईना. उगाचच चिवडून तिने रोटीचे चार घास खाल्ले आणि गप्प बसली. आता मात्र शैलाक्काला पोरीची काळजी वाटायला लागली. घरी गेल्यावर तिची दृष्ट काढायचं तिने मनोमन ठरवलंही. आता सगळ्यांचं जेवण झाल्यावर सगळे पुन्हा एकदा बाथरूमची फेरी मारून आले. आत गेलेल्या जानवीची वाट बघणाऱ्या शैलाक्काला चैन पडेना. शेजारीच असलेल्या काकीशी ती बोलायला लागली. आपल्यामुळे उशीर होतोय हे तिला कळत होतं. काकीला म्हणाली," आता महिनाभरच झाला लग्नाला. म्हटलं जरा सगळ्यांशी ओळख पाळख हुईल पोरीची. पण उगाच आनलं असं वाटाय लागलंय. काय खाईना, पिईना. आनी सारकी जायला लागलीय. काय कळंना."
काकींला स्वतःच्या टेन्शनमध्ये हिच्याकडे लक्ष लागत नव्हतं. काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली,"हां आल्यावर डॉकटरला दाखवा. नायतर तिकडे गेल्यावर त्याच गावात जमलं तर जाऊन या. बघू कुणी भेटलं तर."
शैलाक्काने मान हलवली.
पुन्हा विचार करत काकी म्हणाली,"दिवस तर गेलं नसतील?"
        अरेच्चा हा विचार तिने केलाच नव्हता. आता तिला सगळी चिन्हं दिसायला लागली आणि शैलाक्का खूष झाली. पोरगी बाहेर आल्यावर दोघी गाडीत बसल्या आणि गाडी सुरु झाली. तरण्या पोरांनी गाण्यांच्या भेंड्या सुरु केल्या आणि मागे बसून बायकांनी गप्पा. या दोघी सासू-सुना फक्त ऐकत होत्या. मधेच जानवीने हळूच गाणं सांगितलं,"हमें तुमसे प्यार कितना.." तिच्या बारीक आवाजाकडे लक्ष जाणं अवघडंच होतं. शेजारच्या मावशीने आग्रहाने तिला गाणं म्हणायला लावलं. तेव्हढं गाणं सांगून ती पुन्हा बाहेर बघू लागली. मध्ये एकदा जानवीने सासूला उठवलंच. यावेळी मात्र तिने पुढच्या पोराला पण सोबत घेतलं. रात्रीच्या अंधारात दोघी कुठे एकट्या जाणार म्हणून. यावेळी तिने पोरीला बाहेरच्या बाजूला बसवलं आणि झोपी गेली.
     बराच वेळाने पोरांचा उत्साह सरला. काकीने सगळयांना 'उद्या कामं हायेत मुकाट्याने झोपा' म्हणून गप्प बसवलं. लाईट बंद झाले. हळहळू करत सगळी गाडी शांत झाली. रात्रीच्या गुडूप अंधारात कधीतरी सगळ्यांची गाढ झोप लागलेली असताना त्या पोरीने पुन्हा सासूला हलवलं. आता मात्र शैलाक्काला झोप आवरत नव्हती. जानवींने समोरच्या पोराला उठवलं. तिने हळूच सासूला सांगितलं,"आत्याबाई हे दोघं आहेत झोपा तुम्ही." तिनेही पडत्या फळाची आज्ञा म्हणून एकदा फक्त उभ्या राहिलेल्या पोरांकडे पाहिलं आणि 'बरं' म्हणून झोपून गेली. ड्रायवर लाईट लावणार इतक्यात पक्याने त्याला थांबवले,"'इतक्या रात्री लाईट नगू लावूस' म्हणून. गाडी थांबली, अंधारात चाचपडतच ती, ते पोरगं आणि पक्या उतरले.  दहा मिनिटाने तिघे आत आले आणि 'चल रे' म्हणून पोराने सांगितल्यावर गाडी सुरु झाली.
       पुढचे तीन तास मात्र शैलाक्काची झकास झोप झाली. गाडी मुलीच्या गावात येऊन पोचली होती. गाडी थांबल्या थांबल्या अचानक धाडकन तीन पोरं उठून दार उघडून पळत सुटली. पेंगलेल्या वऱ्हाडाला काय झालं ते नक्की कळलं नाही. ड्रायवर एकदम ओरडला,"चोर चोर" म्हणून. सगळे एकदम दचकून जागे झाले. शैलाक्काला तर काही कळत नव्हतं. तिने शेजारी पाहिलं तर पोरगी शेजारी नव्हती. पटकन पिशवी वरून काढली आणि पाहिलं तर पोरींचे सगळे सोन्याचे दागिने गायब होते. तिने तिथेच हंबरडा फोडला,"कुठं गेली रे माझी पोर? चोरांनी धरलं का काय तिला? सगळे दागिने बी गेले की रं."
तिचा आवाज ऐकून सगळे आपापल्या पिशव्या बघत असताना एकदम काकी ओरडली," आरं देवा. हा काय घात झाला रं?". तिच्या हातात एक कागद होता. अण्णांनी तो कागद हातात घेऊन वाचला,"अवो अक्का तुमची सून आमच्या पोराबर पळालीया. "
"अन्ना काय पन बोलू नका" म्हणून शैलाक्का ओरडली.
अण्णा पुढे बोलले,"म्हनं त्यांचं प्रेम होतं अधिपासुन. तिच्यावर शंका आली म्हून बापानं घाईनं लग्न केलं आनी तुम्ही माझं पैशापायी, म्हनं. आमी लग्न करणार हाय. आमाला शोधू नका असं लिहलय बघा तुम्हीच. "
काकीला तर चक्करच आली होती आणि शैलाक्का आपली रिकामी पिशवी हातात घेऊन उध्वस्त बसली होती.
आता त्यांना शोधणार तरी कुठे आणि कसं हे कुणालाच कळत नव्हतं. ड्रॉयव्हरलाही नक्की कुठे गाडी थांबवली ते आठवत नव्हतं आणि हे असं होऊच कसं शकतं यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नव्हता.

तिकडे पक्या आणि जानवी, नाही नाही, मेघा केंव्हाच दूर निघून गेले होते. अनेक प्रयत्नांनी का होईना ते एकमेकांना कायमचे भेटले होते.

विद्या भुतकर.

Tuesday, February 14, 2017

शेअरिंग: एक आवडता उद्योग

         आपल्याला आयुष्यात नसते उद्योग करायला लै जोर असतो. शेअरिंग म्हणजे तर आवडता उद्योग. :) अगदी पोराच्या 'डायपर रॅश' क्रीमबद्दलचं आपलं मतही एकदम उत्साहाने देणार. आधी कधी इतकं लक्षात आलं नव्हतं, पण एकूणच मी मला एखादी गोष्ट आवडली असेल किंवा नसेल तर त्याबददलचं मत लगेच मित्र-मैत्रिणींना वगैरे सांगून टाकते. म्हणजे मला आवडलंय तर बाकीच्यांना ते समजलं पाहिजे ना? आणि नसेल तर त्यांचा तरी त्यांचाही त्रास वाचेल असं माझं स्पष्ट मत असतं. तर अशीच 'स्पष्टं' मी ऊठसूट देत असते. 
         या मत देण्याच्या यादीत बऱ्याच गोष्टी येतात. मुलं, त्यांचे अनुभव आणि त्यानुसार लागणाऱ्या सर्व गोष्टींबाबत तर देतेच. पण एखादे हॉटेल, शॉपिंग मॉल, एखादा कपडा, एखादे पुस्तक अशी बरीच मोठी यादी आहे. आता हा विषय निघाला तो म्हणजे गाण्यांवरून. अनेकदा आपण एकदम विचारतो, "अरे तू हे गाणे ऐकलंस का?" आणि मग गप्पा सुरु होतात. काल असंच एका मैत्रिणीला दोन चांगली गाणी 'नक्की ऐक' म्हणून सांगितलं. तिनेही लगेच त्यातलं एक ऐकून घेतलं आणि खूष झाली, "अरे कसलं भारी गाणी आहे म्हणून". मग मी उत्साहात अजून दोन-चार सांगितली. आता हे गाणी शेअर करणं तसं नवीन नाही. पण समोरच्या व्यक्तीने ते लगेच ऐकून त्यालाही आवडले म्हणजे जणू आपण स्वतःच गाणं लिहिलंय, गायलंय अशा टाईपचा आनंद होतो. खरं की नाही?
         असे लगेच ऐकणारे लोक म्हणजे अशा शेअरींग टाईप लोकांचे फेव्हरेट. त्यांना मग जितके जास्त माहिती देता येईल ती द्यायची. तेही ऐकून घेतात आणि लगेच एखादी वस्तू किंवा जे काही असेल ते अनुभवतात. कधी कधी या शेअरिंग मध्ये साध्या रेसिपीज वगैरे असतात किंवा त्याच्या छोट्या टिप्सही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरंच एखाद्याचा पदार्थ चांगला झाला की केव्हढा तो आनंद होतो, दोन्ही पार्टीना. रेसिपी किंवा टिप्स जाऊ दे, एखादा पदार्थ ठराविक पद्धतीनेच कसा खाल्ल्यावर भारी लागतो हेही मी सांगितलंय आणि ऐकलंय. म्हणजे उदा: गुलाबजाम गरम करून आणि आईस्क्रीम, तूप मीठ भरलं वांग आणि भात(तोही कोरडा), असे अनेक. मग समोरच्याला ते आवडलं की अजून मस्त. सानुला मी अनेकवेळा असं सांगत असते, 'हे असं खाऊन बघ भारी लागतं'. :) 
       आता सगळ्यांच लोकांमध्ये हे असे गुण दिसत नाहीत. अनेकजण समोरच्याचे मुकाट्याने ऐकून घेतात. 'मी असे करते' किंवा 'तसे बनवते' वगैरे अजिबात बोलत नाहीत. तर असेही काही असतात जे समोरच्याने सांगितले की लगेच त्याला पर्याय सांगतातच. 'मी असे करते' म्हटलं की 'त्याऐवजी असे करून बघ', आपण एक गाणं सांगितलं की त्यापेक्षा हे अजून भारी आहे असे अनेक पर्याय त्यांच्याकडे असतात. :) असतो एकेकाचा स्वभाव. पण माझ्यासारखे जे काही असे उत्साही लोक असतात जे सर्व बाबतीत मत/सूचना देतातच, त्यांच्याकडे पाहून कधी कधी साशंक लोकांना सारखे वाटत राहते,'अरे हा इतका त्या प्रॉडक्ट बद्दल का सांगतोय? नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असणार'. अशा वेळी मात्र मी धडा शिकले आहे, कितीही वाटलं तरी गप्प बसायचं. काही अडत नाही आपल्या सूचनांशिवाय कुणाचं. :) अर्थात तसं ठरवलं तरी मूळ स्वभाव जात नाहीच. 
         आजकाल तर फोटो, जोक्स, कविता, गोष्टी कितीतरी गोष्टी शेअर केल्या जातात. एखादा जोक ओठांवर एकदम हसू आणतो तर एखादी गोष्ट रडू. पण आपल्या माणसांनी ते शेअर केल्यावर ते अजूनच खास बनतं. असो. एका गाण्याच्या गप्पांवरून हे विचार मनात आले म्हणून लिहिले. बाकी, त्याच मैत्रिणीला लगेच एक मूव्हींची यादी पण दिली आहे. :) आणि तिचीही घेतली आहे. :) अशा गोष्टीत जे सुख असतं ते किती लहान असलं तरी इतकं सहज मिळून जातं, नाही का? तुम्ही अशा काय गोष्टी किंवा वस्तू किंवा अनुभव शेअर करता का? इथेही लगेच सांगून टाका. चान्स मिळाला तर का सोडा? 

विद्या भुतकर.
      
   

Monday, February 13, 2017

'बिडी' ची जोडी

येडी बिडी झालीस का काय?
साडी बिडी मिळायची नाय. 
गाडी बिडी गेली अंगावर?
काडी बिडी हाय का ?
शिडी बिडी लागलं त्याला!
जोडी बिडी जमायची नाय.  


आयुष्यात 'बिडी' ची जोडी किती वेळा जमवली असेल मोजायला हवं. :)

विद्या भुतकर.

Sunday, February 12, 2017

चौकट

      फेब्रुवारी हा इथल्या थंडीतला सर्वात त्रासदायक महिना.  या वर्षी तशी थंडी कमी असली तरी या महिन्यात बऱ्यापैकी बर्फ पडत आहेच. मागच्या वेळी बर्फ पडला तेंव्हा मुलांनी मस्त घरासमोर घसरगुंडी करून मजा केली. ते खेळत असताना, रविवार दुपार असल्याने मी जेवण बनवत होते. दुपारीही मी मस्त झोप काढली आणि मुलं बाहेर खेळून आली. यावेळी शेजारच्या काकांनी त्यांना त्यांची स्लेड उधार दिली होती आणि त्यामुळे स्वनिकच्या तोंडावर मस्त स्नो उडून चेहरा लाल झाला होता. घरी आल्या आल्या त्याने तक्रार केली,"आई तू का आली नाहीस?". खरंतर माझ्या लक्षातच नाही आले की आपणही जायला हवे होते. त्याने आग्रहाने सांगितलं,"पुढच्या वेळी मात्र तू यायचंस आणि त्या स्लेड वर पुढे बसायचं." मीही तेव्हा 'हो' म्हणून सोडून दिलं.
         त्यानंतर महिनाभर काही स्नो झाला नाही. मागच्या आठवड्यात स्नो झाल्यावर पुन्हा मुलं बाहेर पडत होती आणि मी त्यांना आतूनच बाय करत होते. पण अचानक मागच्या गेली केलेलं प्रॉमिस लक्षात आलं आणि पटकन कपडे बदलून बाहेर गेले. त्यांच्यासोबत दोन वेळा स्लेडवरून गेलेही. स्वनिक म्हणाला तसं, पुढे बसून. मला जाम भीती वाटत होती. आणि मजाही. त्यामुळं जोरात ओरडून खाली जात होते. खूप वर्षांनी बर्फात खेळले असेन. तेंव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली, त्याबद्दलच लिहायचं होतं.
         याआधीही मी मोठ्या राईड्स मध्ये गेले आहे. आणि मी इतकी काही भित्री नाही. पण कधीतरी काहीतरी बदललं. कसं ते मलाही कळलं नाही, पण 'मला हे जमत नाही' ,  'मला थंडी आवडत नाही', 'मला बर्फात काही जमत नाही' अशी काही वाक्य समोर म्हणली नसतील तरी डोक्यांत नक्कीच येऊन गेलीत. आणि मी स्वतःला कधी स्वतःच ठरवलेल्या चौकटीत बांधून घेतलं हे कळलंही नाही. परवा ती स्लाईड करताना ते जाणवलं. आता मी काही इतकी शूरवीर होऊन उगाच बर्फात जाणार नाही, पण आधीपेक्षा नककीच जास्त जाईन, असं ठरवलंय.
         हेच नाही अशा अनेक गोष्टी असतात त्याच्या चौकटीत आपण स्वतःला कधी अडकवतो हे कळतच नाही. उदा: 'मला हा रंग आवडत नाही', 'मला भात खाल्ल्याशिवाय जमतच नाही', 'व्यायाम करणं मला कधी जमलंच नाही' किंवा 'हे असले कपडे मी घालतच नाही' अशी वाक्य आपण कधी बोलायला लागतो कळतंच नाही. मी अनेक आईबाबांना पाहिलं आहे, अगदी माझ्याही, जे 'आम्हाला हे असंच लागतं' किंवा 'हे मला जमणार नाहीच' अशी वाक्यं बोलताना. आणि परवा ते मीही करत होते. खरंतर मला वाटतं, या गोष्टींचीं सुरुवात अशीच होते जिथे कधीतरी कामामध्ये असताना एखाद्या गोष्टीला प्राधान्य देत नाही किंवा 'खरंच मी काहीतरी वेगळं करावं का?' असा विचार करायला वेळ घेत नाही. तिथून मग पुन्हा पुन्हा तीच गोष्ट घडताना आपण त्याचा विचार करायचं टाळतो आणि ती कधी सवय होऊन जाते आणि पुढे अलिखित नियम हे आपल्यालाही कळत नाही.
        आपण स्वतःला कुठल्या चौकटीत अडकवत आहोत हे एकदा जाणून घ्यायला हवं आणि त्याच्यावर काही प्रयत्नही केले पाहिजेत, तरच मजा आहे. नाहीतर १५ वर्षांपूर्वी आपण जी गोष्ट आवडीने करायचो ती कधी हरवून गेली हे कळणारही नाही. नाही का?

विद्या भुतकर.

Wednesday, February 08, 2017

Sunday, February 05, 2017

सो...... सी यू.....अगेन?

         ती मैत्रिणीसोबत आली. छातीत अजूनही धडधड होतंच होतं. आपण योग्य करतोय का? उगाच नसत्या उत्सुकतेपोटी चुकीच्या ठिकाणी तर जात नाहीये ना? बरं नुसती उत्सुकता नव्हती आज तर मैत्रिणीने, मिहिकाने जबरदस्तीच केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून मिहिका तिची जवळची मैत्रीण झाली होती. खरंतर मिहिकाचे वागणे, दिसणे, बोलणे पाहून 'आपण अशा मुलींशी मैत्री करतंच नाही' असं पक्कं मत तिने बनवलं होतं. पण हॉस्टेल वरच्या त्यांच्या सहा महिन्याच्या सहवासात मैत्री कधी झाली तिलाही कळले नव्हते.

"हे बघ तू उगाच सॅटरडे नाईटला अशी आंटी सारखी रूमवर बसू नकोस हा.", मिहिकाने तिला डिवचले.
"मी आंटी वगैरे नाहीये. आणि मला बरीच कामं पडलीत. सोमवारी घालायला एक कपडा नसतो मग. तू जाऊन ये ना? मग आपण इथेच पिक्चर बघू. "
"पिक्चर? इथे तुझ्या लाईफचा पिक्चर ब्लॅक व्हाईट झालाय आणि तू पिक्चर काय बघते? ते काही नाही आज तू यायचंच पार्टीला माझ्याबरोबर.", मिहिका हट्टाने बोलली.
"अगं पण माझ्याकडे कपडेही नाहीयेत चांगले.", तिने मिहिकाच्या पार्टी ड्रेसकडे पाहून सांगितलं.
"तू का काळजी करते? मी आहे ना? आपण सर्व करू, तू बस हां बोल.",मिहिका.
"बरं बाई चल, हां.  एकदाच हं पण. परत नाही येणार मी तुझ्यासोबत. मला हे असले प्रकार आवडत नाही जास्त." तिने सांगितले.
"एक बार आके तो देख जानी ....." मिहिका खूष झाली.
   
        तिचाच एक ड्रेस तिने स्मिताला दिला. पण स्मिता अगदी सामान्य उंचीची, सामान्य व्यक्तिमत्व असलेली आणि तितकीच साधी राहणारीही. कधी मेकअप वगैरे करणेही जमायचं नाही तिला. 'उगाच कशाला असल्या गोष्टीत वेळ घालवायचा' असं तिला वाटायचं. मिहिका हिच्यापेक्षा उंच, रंगाने सावळी असली तरी स्मार्ट आणि चुणचुणीत होती. तिच्या मेकअप करण्याच्या कलेला स्मिताने अनेकदा मनोमन सलाम केला होता.
         आज स्वतःवर प्रयोग होताना पाहून तिला स्पेशल वाटलं. चेहरा उजळ वाटत होता. ते ओठ तसेच ठेवणे, केसांना पोनीमध्ये घट्ट न बांधता मोकळे सोडणे, सारखे त्यांच्याशी चाळा करणे किंवा अगदी तोंडावर येत असताना स्टाईल मध्ये मागे करणे वगैरे तिला काही झेपत नव्हतं. त्यात मिहिका उंच असूनही तिचा ड्रेस अगदीच हिच्या गुढघ्यांपर्यंत येऊन थांबला होता. त्याला सावरत, खाली ओढत चालणं अजूनच अवघड होतं. पुढे काय होणार? या विचारातून बाहेर पडेपर्यंत रिक्षा क्लबसमोर येऊन उभी राहिली होती.
          रिक्षावाल्याचे पैसे देत तिने मोठ्या बिल्डिंगकडे पाहिलं. तिथे पोचण्यासाठी मोठ्या रस्त्यापासून किलोमीटरभर तरी आत आले होते ते. त्यामुळे 'गडाचे दरवाजे बंद झालेत' असं फिलिंग तिला आलं. मिहिका तिला सांगत होतीच, हे कर, ते करू नकोस इ. तिनेही हिंदी पिक्चर अनेकवेळा पाहिलेले. त्यानुसार, समोर दारात मोठा रांगडा माणूस सिक्युरिटीसाठी होताच. त्याला पाहून तिला थोडं सुरक्षितही वाटलं. काही झालंच तर याला बोलावू मदतीला, टाईप्स. आत जाताना मात्र थोडी धाकधूक जास्त वाढली. तिच्या आजूबाजूने अगदी गळ्यात पडून जाणारे मुलं-मुली बघून काय मत करावं हे तिलाही कळत नव्हतं. एकदा तिथे गेलं की,'मी यातली नाहीच' म्हणण्यात काही अर्थ नसतो. लॉबीमधून आत जाताना तिने तिथल्या प्रशस्त कमानी आणि इंटेरियर चे मनोमन कौतुक केले.
        दोघीही पार्टी हॉल मध्ये गेल्या. क्लबच्या त्या मोठया पार्टी हॉलमध्ये गेल्यावर मिहिकाने तिच्या मित्रांशी ओळख करून दिली. रुबीन, महेश, शान्क्स म्हणजे शशांक. तर त्या 'शान्क्सची' पार्टी होती. अजूनही एकदोन मुली आल्या. एका टेबलाभोवती त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली. या अशा ठिकाणी मोठ्या आवाजात चालणाऱ्या म्युझिकमध्ये अनोळखी लोकांशी काय बोलायचे हा तिला प्रश्न पडला. तरीही त्यांनी तिला सहभागी करून घ्यायचा प्रयत्न केलाच. 'तू काय करतेस?', 'ऑफिस कुठे आहे?', 'मूळची कुठली?' असे जुजबी प्रश्न तिला विचारले. तिनेही त्यांना मोजकंच उत्तर दिलं. ज्या शान्क्सची पार्टी होती तो मात्र बराच वेळ फोनवर होता. त्याला तिच्या येण्याने काहीच फरक पडला नव्हता, चांगला किंवा वाईटही. तिनेही त्याला 'हॅपी बर्थडे' इतकंच बोलून मिहिकाशी बोलणं सुरु ठेवलं.

        मधेच त्याने सगळ्यांना विचारलं, 'काय घेणार?'. सर्वांनी काही बोलायच्या आधीच तिने सांगितलं,"पाणी ". तो हसला, ती शरमली.
मिहिका तिला म्हणाली,"अरे इथे पाणी असं मिळणार नाही. बाहेर मशीनला बॉटल विकत घ्यावी लागेल. चल मी येते तुला पाहिजे तर. "
स्मिता,"नाही नको, मी कोल्ड्रिंक घेईन मग."
बाकिच्यांनीही त्यांचे ड्रिंक्स सांगितले. त्याने 'ओके' म्हणून चालायला सुरुवात केली. मागून मिहिका त्याच्याकडे पळत आली आणि त्याच्यासोबत चालत राहिली.
"नई है यार?",मिहिका.
"अरे पण इतकं माहित नाही? गांव से आयी है क्या?", शशांक.
"बरं जाऊ दे. फोन आला का 'तिचा'?",
"नाही. नाही यायची ती यार . जाऊ दे. उगाच ब्रेकअप नंतर पण ती येईल अशी काही एक्सपेक्टशन का ठेवायची?" शशांक.
"अरे, पण आपली जुनी फ्रेंडशिप आहे. अशीच वाया गेली?"
"तू पण ना? काय पण 'उच्च' विचार करतेस. चल तुझं 'कोल्ड्रिंक' घेतो." तो उपहासाने बोलला. मिहिका हसली.
           तिकडे स्मिताला मात्र चैन पडत नव्हती. एक तर आवरण्यात दोन तास गेलेले आणि यायचं टेन्शन होतंच त्यामुळे दोन-चार तासात काहीच खाल्लं  नव्हतं. तिला प्रचंड भूक लागली होती. इकडे काय खायची खास सोय दिसत नव्हती. हे लोक कधी जेवणार हे विचारायची सोयही नव्हती. सगळे एकदम निवांत होते. जोरात चाललेल्या गाण्यांवर पाय हलवत एकाच जागी उभे होते. तिला मात्र त्या दारूचा वास, सिगारेटचा भरलेला धूर, सर्व नको वाटत होतं. पार्टीत 'आपल्या शेजारीच असलेल्या लोकांशी बोलायला ओरडायला का लागतं?' हे तिला पटत नव्हतं. त्यात शेजारी डान्सच्या नावावर चाललेले एकेक प्रकार पाहून मान कुठे करायची तेही कळत नव्हतं. त्यांचे कपडे, ड्रिंक्स, तो वास सर्वच असह्य झालं तिला. त्यांतच मगाशी कुत्सितपणे हसलेल्या शशांकचा चेहरा आठवून तिला स्वतःवरच चिडचिड झाली. आजूबाजूला पाहून तिला आपण चुकीच्या जागी आलोय अशी एका क्षणात अनुभूती झाली आणि ती ताडकन निघाली.

मिहिका आणि शशांक परत आले तेंव्हा स्मिता जागेवर नव्हती.

मिहिकाने रुबीनला घाबरून विचारलेही,"स्मिता किधर है?" त्याने खांदे उडवले.

तिच्या मैत्रिणीची नैतिक किंवा कसलीच जबाबदारी त्याची नव्हती.

तो पुढे बोलला,"वो अचानक निकल गई. मुझे लगा बाथरूम गई होगी."

मिहिकाने ट्रे खाली ठेवून बाथरुमकडे धाव घेतली. तिथल्या सर्व स्टॉलवर ठोकून काहीही प्रतिसाद मिळाला नाही म्हटल्यावर तिने हातातला फोन पहिला. फोनवर अजिबात रेंज नव्हती. फोन घेऊन ती बाहेर येऊन कॉल लावण्याचा प्रयत्न करत होती. समोर तिला शशांक दिसला.

"नाही आत पण?" त्याने विचारले.
तिने मान हलवली. "असं काय करते ही? सांगायची काही पद्धत?"
तिला काळजीत पाहून "तू दुसऱ्या साईडच्या बाथरूममध्ये बघून ये मी बाहेर बघतो" म्हणून तो बाहेर पडला.

इकडे तिकडे बघत असताना, क्लबच्या बाहेरच्या बागेत एका बेंचवर त्याला ती दिसली. त्याने सुस्कारा सोडला. आधी त्याने बाहेरून मिहिकाला कॉल लावला, कॉल लागत नव्हताच.
मग त्याने धावत जाऊन मिहिकाला सांगितले,"ती आहे बाहेर."
ती बाहेर यायला निघाली. शशांक बोलला,"तू थांब इथेच, माझ्यामुळे तुमचा सर्वांचा पण मूड खराब नको. मी तिच्याबरोबर बसतो बाहेर. मला असेही पार्टीत इंटरेस्ट नाहीये आज. "
"कमॉन शान्क्स !" मिहिका बोलली.
"इट्स ओके. आय एम फाईन" बोलून पुन्हा बाहेर गेला घाईघाईनेच.
 'ही आता पुन्हा गायब होती की काय?' अशी भीती होती त्याला. सुदैवाने ती अजूनही तिथेच होती. तो धावत तिच्या शेजारी जाऊन बसला. ती एकदम दचकली. तिने वर पाहिलं आणि तिच्या डोळ्यातले टपोरे थेंब त्याला दिसले. केवळ २-४ वाक्य बोललेल्या मुलीला कसे आणि काय बोलणार हा प्रश्न त्याला पडला. ती तशीच बसून राहिली. तोही बराच वेळ बसला.
मग त्याने तिच्या गुढग्यावर हात ठेवून बोलायला सुरुवात केली,"दोन महिन्यांपूर्वी माझं ब्रेकअप झालं माझ्या गर्लफ्रेंडशी." तिने इतका वेळी खाली घातलेली मान वर काढली. तिने त्याच्या हातापासून तिचा पाय बाजूला केला. तो हसला.
"हसलास का?"
"काही नाही. तुला बघितलं तेंव्हाच लक्षात आलं माझ्या तू एक टिपिकल मिडलक्लास मुलगी आहेस."
"मग? व्हाट्स रॉंग विथ दयाट?"
"नथिंग. पण माझा अंदाज बरोबर होता हे कळल्यावर.... "
 ".... आनंद झाला. बरोबर? मलाही झाला, तू श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहेस हे ओळखून. "
 "अच्छा? मी श्रीमंत आहे? हा बरोबर ओळखलंस. पण बिघडलेला कशावरून? "
"कशावरून म्हणजे? तुझा अटीट्युड दिसतो ना बोलताना. मघाशी ... पाणी म्हटल्यावर... "
"अच्छा ते? मग क्लबमध्ये कुणी पाणी मागतं का?"
"पण मग तहान लागल्यावर काय करायचं?"
"ड्रिंक्स आहेत ना? "
"म्हणजे आजार एक आणि औषध वेगळंच? मला तहान लागलेली असताना पाणीच लागतं."
"हेच ते मिडलक्लास विचार..."
"असू दे ना? तुला काय प्रॉब्लेम आहे?"
"सॉरी. काहीच प्रॉब्लेम नाहीये.  जाऊ दे. पण तू अशी निघून का आलीस?"
"मला तिथे श्वास घेता येत नव्हता. गुदमरल्यासारखं झालं. म्हणून आले. "
"आणि रडत का होतीस?"
ती हळूच बोलली,"मला भूक लागली होती."
"काय SSSSS ?" तो जोरात हसला.
"का ? इतकं काय झालं हसायला?"
"भूक लागली तर खायला घ्यायचे ना? लहान बाळ आहेस का रडायला?"
"साधं पाणी मागितलं तर इतकं हसलास तू. जेवण मागितलं तर सगळे अजून काय बोलले असते काय माहित?"
"हहंम्म...सॉरी. परत नाही हसणार. आत चल, खाऊन घे. "
"नाही मी आत परत जाणार नाहीये. "
"हा काय हट्ट आहे?", तो चिडून बोलला.
"मी बाहेर पडले तिथून तेव्हाच म्हटलं, परत असल्या ठिकाणी पाय पण ठेवणार नहिये.  "
"अरे पण जेवणार कुठं मग?"
"रूमवर जाऊन मॅगी खाईन पण इथे खाणार नाही. "
"बरं. मग काय इथेच बसणार पार्टी संपेपर्यंत?"
"हो. चालेल मला. इथे शुद्ध हवा तरी आहे. यु हो अहेड."
" अरे इथे मी होस्ट आहे पार्टीचा."
"मग मी काय करू?"
"काय म्हंजे? मला पटत नाहीये तुला असं एकटीला इथे सोडून जाणं. "
ती हसली,"इट्स ओके" म्हणाली.
मग तोही बसूनच राहिला बराच वेळ. शेवटी तो उठला, म्हणाला,"चल."
"कुठे? मी आत येणार नाहीये."
"खायला जाऊ बाहेर कुठंतरी."
"आता या वेळेला?"
"मग काय? माझी गाडी रुबीनला सांगतो आणायला. मी टॅक्सी ने सोडेन तुला."
ती उठली. "कुठे जाणार?  "
"इथून मेन रोडला ढाबा आहे तिथे खाऊ."
दोघेही चालू लागले. त्याने खिशातून सिगारेट काढली आणि पेटवली. तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा खाली मान घालून चालत राहिली.
त्याने विचारलं,"तू काय करतेस इथे?"
"काय म्हणजे? नोकरी करते, मघाशी सांगितलं की."
"हा सॉरी लक्ष नव्हतं. "
"बरोबर माझ्यासारख्या मुलीकडे कोण लक्ष देणार?"
"तसं नाही. मी जरा टेन्शनमध्ये होतो. "
"ओह ते गर्लफ्रेंडचं?"
"ह्म्म्म..."
"पण तू अशा गोष्टींचा इतका विचार करतोस?"
"म्हणजे काय? का नाही करणार? "
"आय मीन, तुझ्यासारखा मुलगा सेंटी विचार करेल असं वाटत नाही."
"श्रीमंत असले की भावना नसतात का?"
"सॉरी! "
"इट्स ओके. ब्रेकअप नंतर पहिलाच बर्थडे आहे ना म्हणून जरा जास्त वाईट वाटलं."
"आता मला खरंच वाईट वाटतंय रूडली बोलल्याबद्दल तुला."
"मीही तसेच वागत होतो तुझ्याशी, सो फाईन."
"बरं ते जाऊ दे, कसा आहे तो ढाबा?" तिने विचारले.
"ठीक ठाक आहे. एकदा उशिरा मी आणि नुपूर गेलो होतो. चांगला होता." त्याने विचार करत सांगितले.
"नुपूर कोण?"
"...... "
"ओह तीच का ती? सॉरी आज सर्वच चुकीचे प्रश्न विचारतेय."
दोघेही चालत ढाब्यापाशी येतात. बाहेरच एका टेबलवर बसतात. ती मेनूकार्ड बघते. तो फोनकडे बघत बसतो अजूनही.
"४ रोटी, पनीर बटर मसाला, डाळ फ्राय, जीरा राईस", तिने ऑर्डर दिली.
"और कुछ मॅम? वेटरने विचारले.
"हां रोटी, बटर रोटी. आणि पेप्सी २. पाणी थंड." तिने लिस्ट संपवली.
तिची ऑर्डर किती वेळ चालू आहे ते बघून त्याने शेवटी फोनमधून मान वर काढली. तिने काय काय मागवलंय ते ऐकून हसला.
"आता काय झालं?" तिने विचारलं.
"पनीर बटर मसाला ! जेवणाची चॉईस पण एकदम सूट करते तुला.. यू आर सो टिपिकल."
ती चिडली. "पण मला आवडत असेल हे सर्व तर? बाकी लोकांचं मला काय करायचंय?"
"बरं जाऊ दे. ......" त्याने वेटरला हाताची दोन बोटे वर करून परत बोलावलं.
"एक चिल्ड बियर लाना" त्याने सांगितलं.
तशी ती एकदम उठली. "काय झालं?" त्याने विचारलं.
"हे बघ तू ड्रिंक घेणार असशील तर मी जाते माझी मी आताच. उशिरा जाण्यापेक्षा आता गेलेलं बरं. "
"अरे पण बियर हे काय 'ड्रिंक' आहे का?", त्याने विचारलं. 
"माझ्यासाठी आहे. म्हण 'सो टिपिकल'... ", ती चिडून बोलली.
त्याने घड्याळ पाहिलं, ११ वाजले होते. त्याने मग वेटरला 'कॅन्सल कर दे' असं सांगितलं. ती बसली.
"तू फारच बोअर आहेस." त्याने तिला म्हटल्यावर ती परत उभी राहिली.
"बरं.... तोंड बंद करूनच बसतो. बास? " त्याने मस्करीत म्हणलं. ती हसली.
लवकरच जेवण आलं आणि तिने ताव मारायला सुरुवात केली. तो तिच्याकडे बराच वेळ बघत राहिला. मधेच ब्रेक घेत तिने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं,"खा की. काय झालं?"
"नाही जेवण संपलं तर अजून रडशील. म्हणून थांबलोय." तो हसत बोलला.
तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा खायला सुरुवात केली.
"तू डाएट वगैरे काही करत नाही का?" त्याने तिला विचारलं.
"कशाला? मी काय इतकी जाड नाहीये." ती वैतागून म्हणाली.
"हो, पण बिनधास्त बटर घेऊन २-३ रोटी, राईस खाणारी मुलगी मी बरीच वर्षं बघितली नाही. तू पहिलीच."
"पाहिलंस ना आता? जेव मुकाट्याने." ती चिडून भात खात बोलली. त्यानेही मग थोडा भात खाऊन घेतला.
 तिने बिल भरायला पर्स काढली तर तो म्हणाला," आज माझा बर्थडे आहे अजून. आजची पार्टी माझीच."
तेंव्हा तिच्या लक्षात आलं, त्याचा वाढदिवस आहे हे आपण पूर्ण विसरून गेलोय. तिने मग पुन्हा आईस्क्रीम मागवलं आणि 'याचे पैसे मी देणार' हेही सांगितलं.
बाहेर थंड हवा होतीच. आईस्क्रीम खाऊन बाहेर पडले तशी तिला अजून थंडी वाजू लागली. तिच्या त्या छोट्या, बिनबाह्यांच्या ड्रेसचा तिला राग येऊ लागला. ती आपल्या तळहाताने दंड चोळू लागली. तो तिच्याकडे पाहून पुन्हा हसला. "आता काय झालं?" तिने विचारलं.
"जमत नाही तर मग असले ड्रेस का घालायचे?" त्याने विचारलं.
"घातला कधीतरी, चूक झाली. परत नाही घालणार ! चिडचिड नुसती! "
त्याने तिला आपले जॅकेट काढले आणि "घे " म्हणून सांगितले.  तिने मानेनेच दिला.
त्यानेही मग पुन्हा घालून घेतले. फोनवरून त्याने कॅब साठी कॉल केला.
"दहा मिनिटात येत्ये कॅब" त्याने तिला सांगितलं. तिने मान हलविली.
"तुझा कोणी बॉयफ्रेंड नसेलच?" त्याने तसे विचारल्यावर ती पुन्हा चिडली.
"हो नाहीये. कारण मी मिडलक्लास आहे. बरोबर ना?"
"अरे चिडते काय? तो असता तर तू एकटी कशाला आली असती, म्हणून विचारलं. मी काय एव्हढा वाईट वागलो का इतका वेळ? "
तिच्या हे ध्यानातच आलं नव्हतं.
नरम आवाजात ती बोलली,"सॉरी. तुझं का ब्रेकअप झालं म्हणे?"
"असंच काहीतरी. जाऊ दे ना ते. " त्याला बोलायचं नव्हतं.
"बाकी घरी कोण असतं?", तिने विचारलं.
"बहीण, भाऊ आई वडील सगळे आहेत."
"अच्छा? मग इथे काय करतोयस? त्यांच्यासोबत जायचं ना? का बोलत नाही त्यांच्याशी पण?"
"त्यांनी काल रात्रीच केलं सेलिब्रेशन, आज मित्रांसोबत जाणार म्हणून."
"ओह ओके."
"पैसे असले की नाती नाहीत असं असतं का? आख्खी फॅमिली तेव्हढीच क्लोज आहे मला."
"अरे चांगलंच आहे की. मी असंच विचारलं."
त्याने सिगारेट काढली. ती पेटवणार तेव्हढ्यात तिने,"लगेच ओढलीच पाहिजे का?" असं विचारलं.
"तुम्ही मुली जरा नीट बोललं की लगेच एकदम 'आई' टाईप होता. एकदम कॉमन मॅन मेन्टॅलिटी. दारू पिऊ नको, सिगरेट ओढू नको. तू कोण माझी मला ऑर्डर देणारी? " त्याचा आवाज ऐकून ती गप्प बसली. समोरून येणाऱ्या कॅबच्या उजेडात तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसलं.
दोघेही कॅब मध्ये बसले. त्याने तिच्या रूमचा पत्ता द्यायला सांगितलं. दोघेही गप्प बसून राहिले रूमवर पोहोचेपर्यंत. त्याने तिला खाली उतरु दिले. तोही मागून उतरला. तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.
त्याने हात पुढे केला आणि 'थँक्स' म्हणाला. तीही मग हात मिळवून 'ओके' म्हणाली.
"गेले काही दिवस खूप त्रास होत होता या ब्रेकपचा. आजचा दिवस कसा जाईल भीती होती. 'तिच्या'शी रिलेटेड कुठल्याही व्यक्तीबरोबर थांबायची इच्छा नव्हती. पण एका अनोळखी व्यक्तीबरोबर अशी एक संध्याकाळ गेली. कशी होती यापेक्षा ती सरली हे बरं झालं. सो थँक्स ! ", तो मनापासून बोलला.
ती बोलली," आजपर्यंत मीही अशी कुठे क्लबला गेले नव्हते. तिथलं वातावरण बघून परत जाईन असं वाटत नाही. त्या अशा एका वेगळ्या दिवसाची आठवण म्हणून तू नक्कीच राहशील. पण इतक्या परक्या आणि माझ्यापेक्षा इतक्या वेगळ्या माणसासोबत एक संध्याकाळ सरली. मी घरी नीट पोचले इतकंच बास आहे."
त्याने एक मिनिट थांबून विचारलं,"सो... सी यू..... अगेन?
"सी यू नेव्हर. ", ती एकदम बोलली.
त्याचा चेहरा एकदम उतरला.
ती घाईने बोलली," अरे ऐकून घे. तू मला सांग किती वेगळे आहोत आपण. "
तोही हा विचार करून तो हसला.
ती बोलत राहिली, "आजची रात्र, अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी बोलले. नाहीतर तू तरी माझ्यासारख्या मुलीला इतकं एन्टरटेन केलं असतंस का? "
त्याने मान हलवली.
ती पुढे बोलली, " ती परिस्थिती पुन्हा ती कधी येईल असं वाटत नाही. सो, मला नीट आणून सोडलंस, थँक्स. आणि सी यू नेव्हर."
तोही मग निवळला.
तिचा पुढे आलेला हात आपल्या दोन्ही हातात घेऊन एक क्षण पकडला आणि
म्हणाला,"सी यू नेव्हर डियर". तीही थोडंसं हसली. तो कॅब मध्ये जाऊन बसला. तिला कॅबच्या खिडकीतून त्याने 'बाय' केले आणि ती वळली.

एक गोष्ट सुरु व्हायच्या आधीच संपली होती. :)

विद्या भुतकर. 

Friday, February 03, 2017

Thursday, February 02, 2017

अराजकता आणि असुरक्षितता !

       गेल्या काही दिवसांपासून पाहतेय, माझ्यासारखेच अनेक लोक 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे प्रत्येक विषयावर आपले मत देत आहेत. त्यामध्ये, स.ली. भ. ने बाजीराव मस्तानी मध्ये जे काही दाखवलं ते चूक हे आधीच ठरवून, नंतर त्याचंच कौतुक करणारे लोक पाहिले. दुसऱ्याने आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं, बायकोचे कुठले फोटो पोस्ट करायचे, कुठल्या देशातील लोकांना मुव्ही मध्ये घ्यायचे किंवा नाही, आणि आता त्या नवीन मुव्ही मध्ये जे काही 'सो कॉल्ड' शूटिंग होत आहे त्यावरही मत आहेच. बर नुसते मत नाही, आता तर मारहाणही होत आहे. म्हणजे साध्या माणसाच्या आयुष्यात रोजच्या जीवनात इतके काही घडत असताना या सर्व गोष्टींचा विचार करण्याचा त्रास का?  
       आपल्या शेजारच्यांनी जाऊ दे मुलांनीही त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवायचे हे ठरवले तर त्यात आपण काही बोलू शकत नाही. का? तर तो त्यांचा प्रश्न आहे. मग कुणी आपल्या मुलाचे नाव अमुकतमुक ठेवले तर आपला काय संबंध? खरं सांगायचं तर आपल्याकडे मुलीला 'लग्न झाल्यावर नवऱ्याकडे जाऊन काय हवं ते कर' असं म्हणणारे अनेक आईवडील असतात. आणि खरंच नवऱ्याला चालतंय ना? मग आम्ही कोण बोलणारे असे म्हणून नंतर गप्पही बसतात. पण तेच एखाद्याने आपल्या बायकोसोबतचा फोटो टाकल्यावर त्याला वाटेल ते कमेंट लिहिणे याला काय अर्थ आहे?  
      परवा पासून जी पद्मावतीच्या सेटवरचा प्रसंग आणि त्यांवर नंतर लोकांचे आलेले कमेंट पाहून खरंच कळत नाही की लोक कुठे चालले आहेत? एखाद्या चित्रपटात काय दाखवले आहे हे पाहिल्याशिवाय कसे कळणार आहे? आणि त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे अजून. आणि आपल्याकडे मस्ती च्या सिरीजसारखे असणारे गलिच्छ चित्रपट चालतात, मग अजून प्रदर्शितही न झालेल्या चित्रपटासाठी एकदम मारहाण? कधी कधी प्रश्न पडतो हे असे कोण लोक असतात ज्यांना आपल्या पोटापाण्याचे सोडून बाकी प्रश्न महत्वाचे आहेत? आणि समजा असतील तर मग तक्रार करा पोलिसात, शूटिंग वर बंदी आणा, असे अनेक पर्याय आहेत त्यासाठी. कुठला तरी हेतू या लोकांच्या मनात नक्कीच असणार असं मला तरी वाटतं आणि त्यांना प्रसिद्धी देऊन, त्यावर चर्चा करून आपण त्यांना अजून खतपाणी घालतो. 
       मध्ये पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर, एका चित्रपटावर अनेक विरोध झाले, वाद झाले. त्यानंतर अजून दोन पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित झाले. त्यावेळी हा असाच गोंधळ का नाही केला गेला? म्हणजे देशभक्ती फक्त १५-२० दिवसच टिकते का? आणि दोन महिन्यात, दुसरे चित्रपट कसे १०० कोटीच्या घरात जातात यावर चर्चा करतात. का? विरोध करायचाच तर सर्वांनाच करायचा, सरसकट. उगाच नुसते मीडियामध्ये नकारात्मक कमेंट टाकून नंतर पिक्चर बघायला जायचे नाही. आपल्या नकारात्मक वागण्याचा लोकांवरही सामुदायिक परिणाम होत असतो याचा विचार कुणी करतं  का? 
        तामिळनाडू मध्ये जल्लीकटूच्या समर्थनासाठी इतके मोर्चे निघाले. मग त्यांनी काढले म्हणून केरळमध्ये अजून एका खेळासाठी निघाले. उद्या पुन्हा दहीहंडी किती थरांची करायची यासाठी निघतील. अजून मराठा मोर्चा वगैरे आहेच. मला असं वाटतंय की एखाद्या देशात इतकी अराजकता का? कोणी मुद्दाम हे सर्व तर करत नाहीये ना? आपण या अशा अनेक आवाहनांच्या आहारी जाऊन आपणच कुठल्या मोठ्या कारस्थानाला बळी पडत नाहीये ना हा विचार जरूर करायला हवा.
       दोन तीन दिवसांपूर्वी एका मुलीची  इन्फोसिस ऑफिस मध्ये हत्या झाली. त्यावरून आम्ही बोलत होतो की मुलींना अशा शिफ्ट मध्ये येऊ द्यायचं की नाही? मी म्हणले का नाही यायचं त्यांनी? जर एखादा मुलगा शिफ्ट मध्ये काम करू शकतो तर मुलीलाही करता आले पाहिजे. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, तिचे काम नाही? हा, त्या सुरक्षिततेसाठी उपाय जरूर करू शकतो, पण एखादा वाटेल त्या नजरेने मुलीकडे बघतो म्हणून त्याला शिक्षा न देता मुलींचे काम बंद करणे हा उपाय नक्कीच नाही. आता वरच्या आणि या हत्येचा संबंध तसा पाहिला तर काहीच नाही. पण मला प्रश्न पडलाय, लोकांना एखाद्याच्या बायकोचे फोटो कसे किंवा एका राणी पद्मावती बद्दल सिनेमात काय दाखवलं जावं किंवा नाही याची इतकी काळजी असते, तेच लोक स्त्री सुरक्षा आणि त्यांचा सन्मान अशा महत्वाच्या विषयांवर प्रत्यक्षात का काम करत नाहीत? 
        खरं सांगते आजकाल अजिबात बातम्या वाचायची इच्छा होत नाही. कुठलीही बातमी काही ना काही कारण असल्याशिवाय समोर येत नाही. मीडियावरचा तर विश्वास उडतच आहे, पण लोकांच्या चांगुलपणावरचाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला अतिशय असुरक्षित वाटते आजकाल, सगळीकडेच. फक्त ते तसं वाटू देण्याचा प्रयत्न कोणी मुद्दाम करत आहे का हे मात्र जरूर वाटत राहतं. तुम्हाला काय वाटतं? 

विद्या भुतकर.