Tuesday, March 27, 2007

तू !

तू आहेस तुझी, तुझ्या स्वप्नांची,
माहित आहे मला
आहेस तू त्या पावसाची,
ज्याच बरसणं भुलवितं तुला.
त्या गोड-गुलाबी थंडीची,
जिच्या कुशीत अलगद शिरावसं वाटतं तुला.

तू असतेस बऱ्याच वेळा
तुझ्या कल्पनांची,तुझ्या भावनांची
आणि केवळ तुझ्या कवितांची.
या सर्वांहूनही वेगळी असतेस तू
तुझ्या अनेक प्रिय व्यक्तींची,
त्यांच्यासोबतच्य़ा तुझ्या क्षणांची,
हरवून गेलेल्या त्यांच्या काही आठवणींची.

या सर्वांचा खूप हेवा वाटतॊ,
पण राग येत नाही,
कारण तू 'त्यांचं' असणं
हेच तुझं 'तू' पण आहे.
प्रत्येकवेळी तुझ्या नव्या रुपांना पाहताना,
मी मनापासून भुललो आहे.

पण हे असं भुलतानाही...
माझं 'मी' पण संपत नाही,
तू कधीतरी माझी असावीस
असं वाटल्यावाचून राहत नाही.
खरंच, तुझ्या सर्व क्षणांहूनही वेगळा
असा एखादा क्षण येईल?
जो तुला केवळ
माझीच आठवण करून देईल?

-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, March 20, 2007

व्यवहार

त्याचं म्हणणं मला
कधी पटलंच नाही,
अंतर वाढलं म्हणून
प्रेम कमी होतं का काही?

म्हणे या जगात
कुणाचं कुणावाचून अडत नाही,
पण तू सोबत नसशील
तर आयुष्यात राहतं का काही?

म्हणे, देऊ तेव्हढं सर्वांना
परत मिळतंच असं नाही,
पण माझं प्रेम तुझ्यापेक्षा
कमी होतं का जराही?

म्हणे, आजचा क्षण आपला
बाकी कशाचीच शाश्वती नाही.
माहीत नव्हतं,त्या क्षणासारखाच
तू ही परत येणार नाही.

तू सांगितलेली प्रत्येक गोष्टं
जरी पटली नाही,
ठेच लागून धडपडताना
जगाने शिकवले बरेच काही.

म्हणे, भावनेपेक्षा
व्यवहारातच आहे सारं काही.
मग आज माझ्या सुकलेल्या डोळ्यांत
पाण्याची तुला अपेक्षा का राही?

काळाबरोबर विसरून जाशील सारं
तूच म्हणालास ना हेही?
कसं सांगू, जवळ नसलास तू तरी
येतोस माझ्या स्वप्नात आजही.

-विद्या.

Friday, March 16, 2007

मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !

इंजिनीयरींगच्या दुसऱ्या वर्षाची गोष्ट, एका रविवारची. माझ्या जीवलग मैत्रिणी माझ्याकडे येवून मला म्हणाल्या की आम्ही Sorry म्हणायला इथे आलो आहोत. मला कळत नव्हतं की हे कशावद्दल? तर त्या म्हणाल्या, 'आम्ही तुला सोडून सिनेमाला गेलो होतो,ते ही तुला खोटं सांगून.' (आज विचार करता मला हसू येतं की तेव्हा आपण किती बावळट होतो आणि किती छोट्या-छोट्या गोष्टीही 'महाभयंकर' वाटायच्या तेव्हा. :-) ) हा किस्सा आजही मला आठवतो म्हणजे मी हे सांगायला नको की मला किती वाईट वाटलं होतं त्यादिवशी.त्यानंतर पुढची ३ वर्ष आम्ही हसत-खेळत,भांडत,मजा करत काढली. आम्ही सगळ्याजणी आजही तितक्याच प्रिय आणि जवळ आहोत एकमेकींच्या.
खरंतर माझ्या मैत्रिणींनी मला त्या दिवशी सांगितलं नसतं तर मला कळलंही नसतं आणि माझ्या मनात ते राहिलंही नसतं.पण मग त्यांनी ते सांगायला हवं होतं की नको?सांगितल्यामुळे आम्ही अजूनच दूर गेलो असतो तर? किंवा न बोलल्याने मनातली अढी अजूनच वाढते , तसे आम्हीही दुरावलो असतो तर? की बोलल्यामुळेच मनातंलं सगळं बाहेर येऊन मनही आभाळासारखं निरभ्र होतं?असे अनेक प्रश्न मनात येतात. त्या एकाच बाबतीत नाही, तशाच अनेक घटना घडल्यात, घडतात आणि हा प्रश्न पुन्हा सामोरा येतो.
माझं म्हणाल तर, मला काहीही मनात ठेवता येत नाही. चूक माझी असेल तरी किंवा समोरच्याची एखादी गोष्ट पटली नाही तरी. ती व्यक्ती प्रिय असेल तर अजिबातच नाही. मग मी लवकरात लवकर सगळं सांगेपर्यंत डोक्यातून विचार जात नाहीत. पण कधीकधी होतं काय की समोरच्या माणसाने सहज बोललेली गोष्ट आपल्याला लागते (त्याच्या नकळतही) त्यामुळे त्याने असं बोलण्याचा काय हेतू होता हे कळत नाही आणि ते कळलं नाही तर गैरसमजामूळे मन अजूनच दुखावतं. बरं स्पष्ट सांगायचं तरी त्यात 'तुला असं वाटलंच कसं' असं बोललं की आपणच चुकीचा विचार केल्याचा त्रास. :-( मला वाटतं की तुम्ही जर आपलं मत समोरच्या माणसाला स्पष्ट सांगू शकत नसाल तर ते नातं मनमोकळं होईल का? मग तुमच्या ऒफिसातल्या साहेब/सहकाऱ्यापेक्षा हे नात वेगळं होईल का?
दोघंही आपल्या जागी बरोबर असतात. मग चुकतं कुणाचं आणि त्याचा नात्यांवर होणारा परिणाम टाळायचा कसा? Love makes people do crazy things.:-) मला वाटतं एकमेकांबद्दलचं प्रेम,नात्याबद्दलचा आदर, समजून घेण्याची (बरेचदा माफ करण्याचीही) इच्छा असेल तर हे नक्कीच होऊ शकतं. कधीकधी स्वाभिमानही आडवा येतो तर कधी तो नुसताच अहंकार असतो. तेव्हा डोळे बंद करून त्या व्यक्तीबरोबर घालवलेले आनंदाचे,दु:खाचे,प्रेमाचे क्षण आठवले ना, मग सगळं मनातलं मळभ दूर होतं. राहते ती फक्त इच्छा पुन्हा एकदा नातं होतं तसं करण्याची. मग जे वाट्लं ते स्पष्टपणे सांगून मोकळं व्हायचं. स्वीकारायचं, सोडून द्यायचं की मनावर घ्यायचं हे सारं समोरच्यावर सोडायचं. खरंच जर ते नात जवळंच असेल तर तो फक्त एक क्षण बनतो एकमेकांना अजूनच जवळ आणणारा. मग अशीच अडथळ्यांची शर्यत पार करुन नात्यांची वीण अजूनच घट्ट होते. :-) होय ना? या बाबतीतच 'मरासिम' अल्बममधील गुलजार साहेबांनी म्हटलेली ही काही वाक्ये. मला खूपच आवडतात.
"मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !
अक्सर तुझको देखा है की ताना बुनते
जब कोई टूट गया या खत्म हुआ
फ़िर से बांध के और सिरा कोई जोड के उस्मे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने मैं लेकीन
एक भी गांठ गिरह बुंतर की
देख नही सकता है कोई
मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकीन उस्की सारी गिरहें साफ़ नजर आती हैं मेरे यार जुलाहे !
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !"
-विद्या.

Friday, March 09, 2007

गटबदल

काही काळापूर्वी मी एक लघुकथा लिहीली होती, 'त्रिशंकू'. त्याचा नायक आमच्य़ा ऑफिसमधला 'खलनायक'च (आमचा बॉस) होता. दोन आठवड्यापूर्वी आम्हाला कळलं की त्याचा 'मायबाप' बॉस आता बदलणार आहे आणि काय आश्चर्य, साहेबांची गाडी कधी नव्हे ते आमच्या छोट्याशा खुराड्याकडे (cubicle) कडे वळली. आम्हाला दुपारी जेवायला बरोबर येणार का विचारल्यावर तर नशिबच उजाडले. आता त्याने थोडा फार प्रयत्न केला आमच्या गटात यायचा पण पहिल्या २-४ दिवसातच त्याला आम्ही आमच्या गटातून कटाप केले होते. आणि त्याच्या कारवाया जाणल्यानंतर तर त्याला पुन्हा सामावून घेणे 'मुश्किल ही नही नामुमकीन' होते. पण आता त्याचे छायाछत्र हरविल्याने तो अगदीच बिचारा, फारच गरीब वाटत होता. त्याच्याकडे पाहील्यावर मला 'गटबदला' चा एक उत्तम नमुना मिळाला होता.
तसे भारताच्या इतिहासाच्या पुस्तकातच हे गटबदलाचे धोरण शिकविले जाते. मग ते मुघलांना शरण जाणारे असो वा इंग्रजांना. आज काल तर राजकारणी लोक घर बदलावे तसे पक्ष बदलतात.मग आमचा हा छोटा बॉस काय चीज आहे?कामापेक्षा बाकीच्या लोकांबद्दलच्या चहाड्या वरच्या साहेबाकडे करणे हेच त्याचं मुख्य काम असे. आणि आता तोच बदलल्यामुळे त्याला पुन्हा एकदा कुणाला तरी हाताला धरण्याची गरज भासत असावी.असो. आता नवीन माणूस नवं धोरण याप्रमाणे आमच्या यादीतील कामांची priority बदलली आणि नवीन साहेबाला खूश करण्यासाठी त्याची धावपळ सुरु झाली. आम्ही काय? आहे ते काम करणे आणि ५ वाजता घरी जाणे हे धोरण कायम ठेवलं आहे. :-) पण मला त्याचं आश्चर्य वाटलं जेव्हा एका जुन्या कामाचं श्रेय घेण्यासाठी सध्या तो आमच्या जुन्या साहेबाशीच स्पर्धा करु लागला. तसं पाहीलं तर काम करणारे आम्ही डेव्हलपर्स, आणि भांडण यांचं. :-) असो.
मला असं वाटतं की जर त्यानी खरचं काम केलं असतं तर त्यांना त्यांच श्रेय आपोआपच मिळालं असतं, त्यासाठी भांडायची गरज लागली नसती. (पण मला काय वाटतं याने कुणाला काय फरक पडतो म्हणा. ) अजून एक गोष्ट, जर त्याचे आपल्या जुन्या साहेबाशी चांगले नाते असते तर दोघांनाही एकमेकांबद्दल आदर वाटला असता आणि त्यांची मैत्री कायम राहिली असती. पण केवळ कामापुरता संबंध ठेवून स्वत:च्या कामापुरते गोड बोलणा़ऱ्या या लोकांना किती खरे मित्र लाभत असतील?मला मान्य आहे की मलाही आता शाळेत,कॊलेजसारखे जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी येथे मिळणार नाहीत. पण मग हे नुसतं नाटकी आयुष्य किती दिवस चालणार? त्यापेक्षा स्पष्टपणे,प्रामाणिकपणे वागणं सोपं नाही का? साहेबाची हांजी-हांजी केल्याने तुमचा फायदा होतंही असेल. पण तो किती दिवस? कधी ना कधी तर स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर एखादी गोष्ट मिळवावी असं या लोकांना वाटत नसेल काय?
बरं हे लोक जसे स्वत: वागतात तसेच बाकीचेही असतील असंच त्यांना वाटत राहतं आणि त्यांची असुरक्षिततेची भावना जास्तच वाढते. उदा: आमच्या या म्यानेजरला नेहमी वाटत असतं की आम्ही त्याला सर्व माहिती देत नाहीये, किंवा तो कामावर आला नसेल तर आम्हीही घरुनच काम करत आहे. याचं कारण? तो स्वत: तसेच करतो, वागतो. मग पुन्हा एकदा टीममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, एकाची माहिती दुसऱ्याला विचारणे, यासारख्या गोष्टी आल्याच. हा सर्व त्रास घेण्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांवरही त्याने विश्वास ठेवला तर त्याची कामे सोपी होतील असं नाही वाटत?
अशा लोकांची अजून एक मानसिकता म्हणजे 'Scarcity Mentality'. ही संकल्पना 'Seven habits of the Highly Effective People' मध्ये मी वाचली होती. (पुन्हा एकदा हे पुस्तक वाचायला हवं. चांगला होतं. :-) ) मी माझ्या त्या म्यानेजर मध्ये हीच मानसिकता पाहतेय.तर अशी मानसिकता असलेले लोक आपल्या सहकाऱ्यापेक्षा वरचढ दिसण्यासाठीही असं वागत असतील. त्याच्या अशा विचारांमुळे कुणाचेही मनमोकळे कौतुक करणे, एखाद्याला त्याच्या कामात सपोर्ट(मदत?) करणे हेही जमतच नाही.(अशा लोकांचा बाकीच्यांना किती त्रास होतो हे कळतंय. त्यामुळे मी तरी अशी मानसिकता नसण्याचा प्रयत्न करतेय.)
This is how the author defines Scarcity Mentality people.
"They see life as having only so much, as though there were only one pie out there. And if someone were to get a big piece of the pie, it would mean less for everybody else. .........
.....People with a Scarcity Mentality have a very difficult time sharing recognition and credit, power or profit -- even with those who help in the production. They also have a very hard time being genuinely happy for the successes of other people -- even, and sometimes especially, members of their own family or close friends and associates. It's almost as if something is being taken from them when someone else receives special recognition or windfall gain or has remarkable success or achievement. "
आता मला काय कुणालाही आपल्या साहेबाला शिव्या घालायचं काम दिलं तर याहूनही मोठा निबंध होईल.:-) शिवाय कामाशी संबंधित कुठल्याही बाबीचा विचार जास्तवेळ करु नये, नाही तर मग आयुष्यच कचेरीमय होऊन जातं. पण गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या काही घटनांमुळे मनात हे सगळे विचार आले आणि ते लिहिले. असो.
या गटबदलाने मलाही काही गोष्टी शिकवल्या Corporate Culture बद्दल. पण सध्यातरी एव्हढंच. I am a good learner. :-) त्यामुळे पुढेही नवीन शिकवण मिळेलच, तेव्हा लिहीन. मी कुठेतरी वाचलं होतं की नोकरी करणारे बरेच लोक केवळ आपल्या उच्चाधिका़ऱ्याला ( बॉसला ) कंटाळून नोकरी सोडतात. आज-काल मी ही किती टिकेन याचाच विचार चालू आहे. :-) कृष्णाला काय जात होतं हो म्हणायला,'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' .आता मध्येच कृष्ण कुठून आला?(:-?) आपलं नाही बाबा खडूस लोकांशी जमत, खोटं-खोटं हसून काम करवून घेणं जमत आणि चुगल्या करून साहेबाला खूश करणंही नाही. बघू किती दिवस या वातावरणात टिकतो ते. जमलं तर राह्यचं नाही तर जायचं. :-) असो,मी माझं Corporate प्रवचन थांबवते आता आणि कामाचं बघते. :-ड हो ना, blog लिहायचे अजून तरी काही पैसे मिळत नाहीत,त्यामुळे काम करणं आवश्यक आहे.
-विद्या.

Tuesday, March 06, 2007

एक अर्धी पोस्ट...

रात्री ११ वाजता सिनेमा संपला आणि आम्ही दोघं घरी येण्यासाठी गाडीत बसलॊ. आम्ही प्रत्येकवेळी घरी जाताना आमचा वाद व्हायचा एका कारणावरून. परत यायला त्या थिएटरकडून दोन रस्ते होते, एक आम्ही डोळे झाकूनही घेऊ शकतो असा आणि दुसरा फक्त अस्तित्वात आहे हे माहीत होतं. त्यामुळे रात्री ११ नंतर माहीत नसलेल्या रस्त्यावरून जायची माझी इच्छा नसायची आणि त्याला तो रस्ता कसा आहे तो पहायचाच होता. आज तर पाऊसही पडत होता. शेवटी माझं न ऎकता त्याने दुसऱ्या रस्ता पकडला. मग थोडे अंतर गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटून त्याने मला गाडीतला नकाशा काढायला सांगितला. मग मी आपण सध्या कुठे आहे,कुठे जायचे आहे हे पहात चुकत, धडपडत जवळ जवळ दीड तासाने घरी पोहोचलो.मी त्या दिवशी बराच वाद घातला(नेहमीप्रमाणे :-) ) की नेहेमीचा रस्ता असताना नवीन शोधायची काय गरज आहे हे कळत नव्हतं.
मला वाटतं माझ्यासारखेच कितीतरी लोक मी आजू बाजूला पाहते आहे.बहुतेक, आयुष्य खूपच सरळ, सोपं झालंय.(Touch wood :-) ) अर्थात ते सरळ होणं ही इतकं सोप्पं नव्हतं पण गेलं एक वर्ष आरामात गेलंय आणि हात खरंच सोन्याचे झालेत की काय असं वाटतंय. कधी काहीतरी करायची, वेगळं करायची इच्छा असते तर कधी-कधी तो नुसता सिनेमाचा 'After effect' असतो. पण होतं काहीच नाहीये. चार लोक चालतात त्याच सरधोपट मार्गाने चालायचं, पैसे मिळवायचे आणि आपले सोन्याचे हात अजूनच जपायचे.पुढे जाताना जरा कुठली वेगळी वाट समोर दिसली की पुन्हा एकदा मागे जायचे आणि अजून एक जुनीच वाट शोधायची. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत झटत राह्यचं आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे असं आज-काल का होत नाही याचा विचार करतेय.
"तुटण्याचा फुटण्याचा,
देहाला छंद हवा.
सोन्याच्या हातांना
घामाचा गंध हवा !"
-माधव मुतालिक


माझ्या जुन्या डायरीमध्ये ही नोंद सापडली मला.मी कॊलेज मध्ये असताना एक कविसंमेलन नियोजित केलं होतं आणि माधव मुतालिक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.त्या समारंभानंतर मी माझी ती डायरी त्यांच्या स्वाक्षरीसाठी घेऊन गेले होते. तेव्हांची ही नोंद. मला आठवत नाहिये मला त्यांच्या या ओळींचा अर्थ किती समजला होता आणि हे ही माहित नाही की कुठल्या अर्थाने त्यांनी त्या ओळी लिहील्यात.पण आज त्याच वाचताना बरेच विचार डोक्यात येत आहेत आणि आता तरी ते लिहणं जमत नाहीये.
जाऊ दे. आज एव्हढंच.
-विद्या.