Thursday, November 30, 2017

रुंबा

    काल आमच्या घरी एक नवीन मशीन आलं, iROBOT Roomba. गेल्या दोनेक वर्षांपासून ऐकलं होतं आणि लोकांकडे पाहिलंही होतं. खरं सांगायचं तर कॉलेजपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हा माझा आवडता विषय. माणसाचा मेंदू एका सेकंदात किती विचार करतो आणि किती निर्णय घेतो याचा अंदाज AI शिकताना येतो. समजा, तुम्ही गाडी घेऊन एका चौकात उभे आहात, आता तुमचा ग्रीन सिग्नल लागणार पुढच्या पाच सेकंदांत, समोरच्या बाजूचे लोक अजूनही जात आहेतच, शेजारी उभा राहिलेला गाडीवाला नुसता पेटलाय कधी एकदा रस्ता पार करतोय यासाठी, तुम्ही त्याच्याकडे, त्याच्या मागे असलेल्या मुलीकडे, समोर उभ्या असलेल्या काकूंकडे बघता. आता सिग्नल ग्रीन झाल्यावर आपण गाडी दामटेपर्यंत अनेक निरीक्षणं करुन, गाडी किती वेगात सुरु करायची आणि कुठून काढायची, तिथून निघून पुढे जिथे जायचं आहे तिथे पोहोचायला किती वेळ लागेल इथंपर्यंत सर्व विचार एका सेकंदात होऊ शकतात. 
        आता हेच सर्व एका मशीनला करायचं असेल तर? प्रत्येक शक्यता पडताळून, आजूबाजूचं अंतर मोजून, बाजूच्या लोकांच्या वेगाचा अंदाज घेत एक सिग्नल पार करण्यासाठी एक मशीन बनवायचं झालं तर त्यात लाखो, करोडो शक्यता त्या मशीनला फीड कराव्या लागतील आणि त्यासर्वांतून त्याने योग्य ती सिलेक्ट करुन पुढे जावं लागेल. हे मशीन बनवण्यासाठी किती वेळ लागेल माहित नाही(गूगलला विचारावं लागेल त्यांच्या 'मॅनफ्री' कार बद्दल. तर एकूण काय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खायचं काम नाहीये. 
       आता गोल गोल फिरणारं चक्रासारखं जमिनीवरचा कचरा साफ करण्यासाठी असलेलं हे मशीन जे आमच्याकडे फायनली घेतलं त्याचंही असंच आहे. त्याला घरातल्या पसाऱ्याचा, वस्तूंचा आणि खुर्ची वगैरेचा अंदाज घेऊन साफ करायला एक तासभर लागतो, त्यातही मधेच तो आपली लाईन सोडून वाकडा चालत जाऊन दुसऱ्या खोलीत घुसतो आणि माझ्यातल्या थोड्याफार 'शिस्तप्रिय' व्यक्तीला त्याचा त्रास होतोच. एक रूम आधी कर ना ! सारखे माझे विचार गप गिळावे लागतात. आज माझी एक काळी मेटलची क्लिप गिळून अडकून बसल्यावर तक्रार केलीच. चार वेळा रीसेट करुनही का चालत नाही म्हटल्यावर ती चेक केलं तर क्लिप मिळाली. ती क्लिप मीच उचलायची तर मग हे मशीन कशाला ना? या असल्याचं कारणांनी आजवर तो घेतला नव्हता. असो. 
       शेवटी आणलाच आहे. आता तो आल्यापासून आमच्या घरात मी सोडून तीन वक्ती जरा जास्तच उत्साहात आहेत, कोण ते सांगायला नकोच. नवऱ्याने त्याचा लगेच फोनवर, वायफाय वर सेटअप केला तर मुलं स्वतःच तो उचलून उचलून त्यांना हव्या त्या ठिकाणी तो ठेवत आहेत. आपणच त्याच्या मागे फिरत कचरा उचलतो की नाही बघत आहेत. या सर्वात माझी चिडचिड एका गोष्टीवर होत आहे ती म्हणजे मुलांची त्या मशिनप्रती वागणूक. ते जणू आपल्या घरातील पाळीव प्राणीच आहे असं वागत आहेत. तेच कशाला काल मीही नवऱ्याला म्हणाले की,"त्याला आता तिकडच्या खोलीत नेऊन सोड'. आज मुलीने शाळेत सांगितलंही, आमच्याकडे नवीन 'पेट' आणलं आहे रुंबा नावाचं.

       नजीकच्या काळात रोबॉट, किंवा उत्तर देणारी मशिन्स, प्रोग्रॅम्स वाढलेत आणि ते वाढतच राहतील. हळूहळू त्यांची 'इंटरऍक्टिव्ह' असण्याची शक्ती वाढेल तसे लोकांशी बोलणं, वगैरे वाढत जाईल. आजवर काही बेसिक गोष्टी होत्या, उदा: पूर्वी अलार्म क्लॉक होतं, आता फोन किंवा मायक्रोवेव्ह सारखी उपकरणं असतात. त्यांच्याशी बोलणारे लोक पाहिलेत मी. आमचा मायक्रोवेव्ह किंवा वॊशिंग मशीन एकदा काम झालं की दर मिनिटाला ओरडत राहतो, मीही वैतागून 'गप रे !' म्हणते. हे बघून माझी मुलगीही एकदा अशीच सकाळी ओरडली होती मायक्रोवेव्ह वाजला तेव्हा. पुढे एका मित्रांकडे गेलो तर तिथे 'ऍलेक्सा' होती.ती म्हणजे, अमेझॉनचं तुमच्याशी बोलणारं मशीन. 'ऍलेक्सा, किती वाजलेत?' म्हटलं की ते सांगणार. मुलांनां सुरुवातीला त्याचं कौतुक वाटलं पण नंतर त्यांनी, 'अलेक्सा' म्हणून खेकसून बोलायला सुरुवात केली. खूप चिडले होते मी ते पाहून. 

      पुढे अशाच काही ठिकाणी अनुभव आले जिथे मशीनवर खेकसून बोललं जाताना पाहिलं. त्यामुळे ते घरात नकोच असं वाटलं. एकदा मुलाने मला विचारलं होतं,'आई व्हाय डू यु हेट सीरी? ती तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे म्हणून का?" त्याला काय उत्तर द्यावं कळलं नाही. :) कारण माझ्यापेक्षा हुशार लोक मला आवडत नाहीत हे त्याने कुठून जाणलं असेल याचा विचार मी करत होते. :) असो. तर एकूणच आपल्याला उलट उत्तर न देणाऱ्या वस्तूवर, व्यक्तीवर वाढलेला उद्धटपणा मला अजिबातच आवडला नव्हता आणि नाहीये. हेच त्यांचं मी प्राण्यांच्या बाबतीतही पाहिलं आहे, बरीच मुलं पाळीव प्राणी हवाय म्हणतात पण घरी असल्यावर त्याला त्रासही देतात. किंवा ऑर्डर सोडल्यासारखे बोलतात,"डॉगी सिट!" वगैरे. हा उद्धटपणा वाढतच जातो कारण ते प्राणी उलटून उत्तर देत नाहीत. पुढे जाऊन सांगायचं तर घरात कामाला येणाऱ्या मावशी किंवा घरकामासाठी कायमस्वरुपी ज्यांच्याकडे लोक असतात त्यांची मुलं त्या लोकांशीही अशीच वागताना पाहिलीत. आम्हालाही मुलांना मावशींशी नीट बोलण्यासाठी रागवावे लागले आहे. आई-वडील घरातील एकाद्या मोठ्या व्यक्तीला मान देत नसतील तर मुलंही तशीच वागतात हेही पाहिलं आहे. 

       मुलं मोठी होईपर्यंत हे मशीन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली उपकरणं वाढतच जाणार आहे.  लहान असताना, मोठ्यांशी आदराने वागायचं, उलट उत्तर द्यायचं नाही हे शिकवलं जायचं.आजच्या पिढीतल्या मुलांना या गोष्टी शिकवणं अजूनच अवघड जाणार आहे. व्यक्तीचा आदर, पाळीव प्राण्यांना योग्य वागणूक वगैरे तर शिकवावं लागेलच . शिवाय आता ही मशीन्सही. टेक्नॉलॉजि वापरु नये असं मी म्हणणार नाहीच, पण त्यातून मुलांवर होणारे संस्कार बदलत नाहीयेत ना हे नक्कीच पाहायला हवं. हे मीच नाही तर इथे अनेक लोकांचं निरीक्षण आहे. आपल्या घरात अशा गोष्टी आणतांना या सर्व गोष्टींची जाणीव आपण ठेवावी लागेल. मुलांच्या वागण्यात थोडाफार जरी फरक जाणवला तर योग्य तेंव्हा त्यांनाही त्या गोष्टींची जाणीव करुन दिली पाहिजे. असो. त्यासाठी मलाही आमच्या घरातल्या मायक्रोवेव्हवर ओरडणं बंद करायला लागेल. :) आणि तुम्हालाही 'प्लिज होल्ड द लाईन' म्हणणाऱ्या ऑटोमेटेड आवाजाला "नाही करणारा जा" म्हणणं बंद करावं लागेल. 

https://media.tenor.com/images/4f6c04229c827878f82c3b786ca31e9e/tenor.gif

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, November 28, 2017

जिव्हाळ्याच्या गोष्टी

       आज पिठलं बनवत होते, गाठीचं, म्हणजे ज्यात बारीक बारीक गाठी दिसतात असं. मला ते घोटलेलं आवडत नाही. असो. तर ते बनवताना त्यात मी भरडलेले शेंगदाणे टाकते. ते माझ्याकडे असलेल्या कुटामधून निवडून टाकत होते. त्यावरून पुढे मग बरंच काही आठवलं. आणि वाटलं 'शेंगदाणे' या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण अजून लिहिलं कसं नाहीये? म्हणून सुरुवातीपासून सुरवात करतेय. 
       तर शेंगदाणे सासरी आणि माहेरीही जिवाभावाचा विषय. आम्ही शाळेत असताना आमच्या शेतात भुईमूग लावला जायचा. त्यात पावसाळ्यात निघणाऱ्या भुईमुगाच्या विशेष आठवणी आहेत. काढलेल्या शेंगा घरी आल्यावर सुकवणे म्हणजे कठीण काम. कधी बायकांकडून शेंगा काढून आणलेल्या असायच्या तर कधी डहाळ्यांच्या शेंगा तोडून काढलेलंही आठवतं. दारात सुकायला टाकायच्या म्हटलं तरी पावसाकडे सारखं लक्ष ठेवायला लागायचं. पाऊस आला की ती ताडपद्री, पोती पटापट आत उचलून न्यायला लागायची. आणि मग ओल्या झाल्या शेंगा तर कधी भुरा आला की अजून चिडचिड. एकूणच ते चिखल असलेल्या शेंगा म्हटलं की नको वाटायचं. तरीही पावसाळ्यात भाजलेल्या शेंगा खाल्ल्या जायच्याच. :) 
        एकदा शेंगा सुकल्या की मग वर्षभर त्याच वापरात यायच्या. शनिवार- रविवारी, आई शेंगा घेऊन बसायची, आम्हाला खूप राग यायचा, पिक्चर बघताना शेंगा सोलायला लागतात म्हणून. पण पिक्चर संपेपर्यंत भांडंभर दाणे होऊन जायचे. शिवाय त्यात शनिवार असेल तर उपवासाच्या खिचडीसाठी कूटही करून व्हायचा. कूट बनवतानाही मला तेव्हाची आठवण येते. दादांना खिचडीत दाण्याचे कण आलेले आवडत नाहीत त्यामुळे त्याच्या खिचडीचा कूट बारीक असतो एकदम. तर सोमवारी आईच्या उपवासाच्या खिचडीत भरडलेला कूट असायचा जो मला आवडतो. असो. ओल्या शेंगा घरी आल्यावर त्या मोठ्या भांड्यामधे मीठ घालून शिजवून, सुकवल्या जायच्या. अशा सुकलेल्या शेंगांचे दाणे इतके भारी लागायचे. दादा नेहमी खायचे आणि अर्थातच आम्हीही. कोरेगांव मध्ये तेलाच्या गिरणही आहेत. एकदा तर दिवाळीला घरच्या शेंगदाण्याचे तेलही बनवून आणले होते. अर्थातच आता घरी शेंगतेल वापरले जात नाहीच, तब्येतीच्या कारणांनीं. पण अशा काही लहानपणीच्या आठवणी शेंगदाण्याचा. 
        सासरीही जवळजवळ सर्वच भाज्यांत शेंगदाणे किंवा कूट वापरला जातो. बाय द वे, आमच्याकडे 'दाणे' म्हणत नाहीत, 'शेंगदाणे'च म्हणतात. :) असो. तर नवऱ्यालाही कशातही शेंगदाणे घातलेले चालतात. मला वाटतं जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक पोह्यांमधले शेंगदाणे आवडीने खाणारे आणि दुसरे न खाणारे. :) मला वाटतं की सतत दाणे तोंडात येत असल्याने पोह्यांची चव जाते, तर नवऱ्याला वाटतं की प्रत्येक घासात दोन-चार दाणे तरी आलेच पाहिजे. त्याचा एक साऊथ इंडियन मित्र म्हणतो की, 'तू काय चहातही शेंगदाणे घालून खाशील'. तर कुठल्या भाज्या किंवा पदार्थांत किती प्रमाणात शेंगदाणे किंवा कूट घातला पाहिजे या गोष्टीवर अनेकवेळा काथ्याकूट होतोच. उदा: उपिटात शेंगदाणे घालायचे की नाही? वाटाणा-बटाटा-फ्लॉवर भाजीत कूट घालायचा की नाही, वगैरे. एकदा एका मैत्रिणीकडे त्याला भेंडीची भाजी आवडली होती. घरी आल्यावर म्हणाला, 'छान झाली होती'. का? तर अर्थातच त्यात कूट घातला होता. :) सासर जळगावचं असल्याने एक गोष्ट मात्र नक्की सवयीची झाली ती म्हणजे वांग्याच्या भरतात घातले जाणारे शेंगदाणे. आमच्याकडे घालत नाहीत. पण खानदेशी भरीत आवडीने खाते आणि बनवले तरी तसेच बनवते. 
         इथे माझ्याकडे शेंगदाणे एकदा भाजले की त्याचा लगेचच कूट करावा लागतो, नाहीतर नंतर कूट करायला काहीही शिल्लक राहात नाही. कारण पॅन्ट्री मध्ये त्या डब्याशेजारीच गुळाची ढेपही असते. :) त्यामुळे भाजतानाच जे काही मिळतील ते. मुलंही शेंगदाणे भाजायला घेतले की एकदम धावत येतात, अर्थातच बाबावर गेलेत हे सांगायची संधी मी सोडत नाही. कूट करण्यातही ठराविक आवडीनिवडी असतात. वर म्हणाले तसे, आईला भरडलेला आवडतो, तर वडिलांना बारीक, सासूबाई दाणे कमी तावावर भाजतात, त्यांना जास्त काळपट रंगाचा कूट आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या दाण्यांचा कूट एकदम सफेद आणि एकसारखा बारीक केलेला असतो. काही लोकांना मायक्रोवेव्ह मध्ये भाजतानाही पाहिले आहे. मला मात्र भांड्यात आणि थोडे जास्त भाजलेले दाणे आवडतात. त्यांच्या कुटामुळे वांग्याची भाजी किंवा सिमला मिरचीची सुकी भाजी वगैरेला छान रंग येतो. नाहीतर कूट सफेद असेल तर भाजीचा रंग ही फिका होतो असे मला वाटते. त्यात, नवऱ्याचं म्हणणं असतं की कशाला ती टरफलं सोलायची, मला मात्र तसाच कूट करणं जमत नाही. अगदीच घाई असेल तरच केला जातो. 
       अर्थात आमच्या घरात शेंगदाणे किंवा कूट नाही म्हणजे 'आणीबाणी' च  आहे असं मानलं जातं हे वेगळं सांगायला नको. काही वर्षांपूर्वी शेंगदाणे खूप महाग झाले होते. अगदी बदाम आणि शेंगदाण्याची किंमत एकच झाली होती. सोळा डॉलरचे ४ पौंड(म्हणजे दोन किलोही नाही). फार वाईट दिवस होते, त्याने घरात शेंगदाणे आणणं कमी झालं नव्हतंच, तरीही झळ लागली होतीच. भारतात गेले की सासूबाई हमखास विचारतात, 'तुला न्यायला कूट करुन देऊ का?'. मी त्यांना सांगत राहते की असतो माझ्याकडे, तुम्ही काळजी करु नका. :) वडील महाबळेश्वरला गेले की तिथं जे मीठ लावून भाजलेले शेंगदाणे मिळतात ते खास जावयासाठी घेऊन येतात. आणि हो, शेंगदाण्याची सर्व प्रकारची चिक्की. (किती ते लाड त्याचे, वगैरे डोळे फिरवणारा स्मायली टाकला पाहिजे इथे. असो.) 
        वर सुरुवात करताना म्हटलं होतं ना, माझ्या पिठल्यात भरडलेले शेंगदाणे टाकत होते. तर तुम्हीही टाकून बघा. माझ्या आजोळी सांगलीला जे पिठलं करतात ना त्यात असायचे, तर आईकडे पिठलं भाकरीसोबत बाजूला घेऊन खायचे. मी मात्र त्यातच घालते. तर त्या पिठल्यावरुन इतकं सगळं रामायण लिहिलं. पण असतात अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी, ज्याच्या त्याच्या. :) तुमच्याही असतीलच. 

विद्या भुतकर. 

Sunday, November 26, 2017

स्वप्नपूर्ती

       हा वीकेंड मध्ये अमेरिकेतील खरेदीचा मोठा इव्हेन्ट म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे' होता. तो खरंतर इथल्या 'थँक्स गिव्हिंग' या सणाच्या (गुरुवारच्या) दुसऱ्या दिवशी असतो(अर्थातच फ्रायडे कम्स आफ्टर थर्सडे !). पण झालंय काय, इथल्या मोठं मोठ्या रीटेल दुकानांच्या सेलच्या जाहिरातींमुळे मुळात खास घरातील जवळच्या माणसांबद्दल असलेला हा सण गर्दी, पैसे आणि खरेदीसाठी असलेल्या लांबलचक रांगांमध्ये हरवून गेलाय. गुरुवारी खरंतर अनेक लोक आपल्या घरी/गावी परत जातात, मोठाली पंगत होते, जे कोणी आदरातिथ्य करत आहे ती व्यक्ती सर्व जेवण बनवते, वगैरे. 
        आता हा गुरुवारचा दिवस संपला की शुक्रवारी खरेदी असेल तर समजूही शकतो. पण लोकांनी आजकाल गुरुवारी संध्याकाळपासूनच दुकानं उघडी ठेवायला सुरुवात केलीय. त्यात बंपर सेल्स लावलेत. त्यामुळे, यातील अनेक मध्यमवर्गीय लोक समजा मॉल मध्ये काम करत असतील तर त्यांना बिचाऱ्यांना घरातील लोकांसोबत जेवण करुन लगेच कामावर जावे लागणार किंवा जो घरी राहण्याचा आनंद आहे तो घ्यायचा असेल तर खरेदीला मुकावं लागणार. एकूण काय तर १५ ऑगस्टला पावसाळी सेलसाठी गर्दी करण्यासारखा हा प्रकार. असो. 
          आम्ही अमेरिकन नसल्याने कुठलेही बंधन नसून, अगदी गुरवारपासूनच खरेदीला जायचो पूर्वी. त्यात मग एखादी वस्तू स्वस्तात मिळाली की खूप आनंद मिळायचा. हे सगळं हळूहळू कमी होत गेलं. याला दोन कारणं, बरेचसे सेल खरेतर लोकांना फसवणारे असतात. त्यापेक्षा कमी किमतीत तीच वस्तू आधी किंवा नंतर मिळू शकते. उदा: थंडी संपल्यावर स्वेटर्सचा असणारा सेल. आणि दुसरे म्हणजे केवळ सेल आहे म्हणून उगाचच नको आहेत त्या गोष्टीही खरेदी केल्या जातात. मग उगाच सोमवारी पैसे खर्च केल्याचा पश्चाताप होतो. त्यामुळे अगदी खरेच हवे असेल काही आणि खरेच त्याची किंमत एरवीपेक्षा कमी असेल तरच ते घ्यायचं असं अगदी ठरवून, ठराविकच गोष्टी घेतल्या. 
         आता हे सर्व पारायण ऐकवण्याचं कारण म्हणजे, अनेकवेळा मागे वळून बघते तेव्हा 'लहानपणापासून पाहिलेली स्वप्नं' हा आयुष्याचा एक मोठा भाग दिसतो. पुढे जाऊन त्यातील काही स्वप्नं खरंच पूर्ण झाली हा विचार केला तर अजून आनंद वाटतो. त्यामध्ये इतक्या ठराविक गोष्टी होत्या. उदा: शाळेत असताना शेजारच्या मुलीचं आहे तसलंच दप्तर आपलंही असावं किंवा एखादा तेंव्हा मिळणारा कंपास बॉक्स किंवा ठराविक ब्रँडची सायकल. तेंव्हा माझ्या मैत्रिणीकडे एक सोन्याची अंगठी होती. मला खूप आवडायची. पुढे कॉलेजला गेल्यावर आईने अंगठी घेऊन दिली तेंव्हा मी अगदी त्याच टाईपची अंगठी घेतली आणि गेले वीस वर्षं ती घालत आहे. ती अंगठी माझं एक स्वप्नं पूर्ण झाल्याची निशाणी आहे. :) 
        कॉलेजमध्ये असताना एक मॅडम बायॉलॉजि शिकवायच्या. प्रत्येकवेळी त्या एखादी नवीन साडी नेसून यायच्या. अगदी चापून चोपून नेसलेली असायची ती. एकदा असंच गंमत म्हणून त्या एखादी साडी परत केव्हा नेसतात हे पाहिलं होतं. कमीत कमी एक महिनाभर तरी त्यांची साडी परत नेसली जायची नाही. मोजून ५-६ ड्रेस असण्याचे दिवस ते.  वाटायचं मी मोठी झाले की अशाच खूप साड्या घेणार विकत आणि अजिबात रिपिट करणार नाही महिनाभर तरी. आता ते आठवलं तर हसू येतं कारण आता इथे साड्या नेसणं होत नाही त्यामुळे वर्षातून मोजून २-३ साड्या घेतल्या जातात आणि अगदी तितक्याच वेळा नेसल्या जातात. आणि भारतात असताना नेसल्या तरी त्यासाठी लागणार वेळ, मुलांचं आवरायचं, कुठेही पोहोचायला झालेला उशीर हे पाहून सोपा मार्ग अवलंबला जातो, ड्रेस घालण्याचा. :) 
       पूर्वी ड्रेससाठीही वेगवेगळ्या दुकानांत फिरणे, मटेरियल आवडलं तरी ओढणी न आवडणे किंवा व्हाईस वर्सा प्रकार झाले आहेत. त्यात सर्वात हौसेचा ड्रेस होता तो म्हणजे, 'हं दिल दे चुके सनम' च्या स्टार वाल्या ओढणीचा. स्वप्न पुरं झालं खरं पण एका धुण्यातच त्या ओढणीचं लक्तर झालं होतं.पुढे कुणाचे तरी बघून मला कॉटनचे ड्रेसेस घालण्याची फार आवड निर्माण झाली. नुकतीच नोकरी लागली होती तेंव्हा. त्यामुळे ड्रेस बाहेरुन इस्त्री करूनही घ्यायचे. भारी वाटायचं स्टार्च वाली ओढणी घेऊन कडक ड्रेस घालून जायला. त्यात मग लखनवी ड्रेसची हौस झाली. सलग वेगवेगळ्या रंगाचे लखनवी ड्रेसेस घेऊन झाले. तरीही एक मात्र स्वप्न आहे जे अजून पूर्ण झालं नाहीये किंवा त्याला मुहूर्त लागला नाहीये. एक लाईट पिंक कलरची कॉटनची लखनवी साडी घ्यायची आहे. ते या भारतवारी मधेही पूर्ण नाही झालं. आता पुढच्या वेळीच. 
         अमेरिकेत आल्यावर वेगळीच वेडी स्वप्नं होती. उदा: एका कॉफी शॉपमध्ये एकटंच बसून कॉफी प्यायची. :) आता विचार केला तरी हसू येतं.  कदाचित 'दिल चाहता है' च्या तन्हाई गाण्याच्या इफेक्ट असेल. पण कॅनडा मध्ये असतांना जवळजवळ महिनाभर अशी एकटी बसून कॉफी प्यायचे. (कॉफी कुठली, हॉट चॉकलेट, इथली कडू कॉफी झेपायला १२ वर्षं गेली.) अजूनही डाऊनटाऊन मध्ये बाहेर बघत एकटक कॉफी प्यायला मिळाली तर भारी वाटतं.
       दुसरं स्वप्न म्हणजे, एअरपोर्ट वर लॅपटॉप घेऊन बसायचं. आता स्मार्ट फोन आल्यामुळे हे अगदीच येड्यागत वाटत असेल. पण एकटं स्टाईलमध्ये एअरपोर्ट लॅपटॉप घेऊन बसायचं होतं एकदा मला. ते पहिल्यांदा जेव्हा केलं ना? खूप भारी वाटलं होतं. एकूणच भारतात जाताना मोठ्या विमानप्रवासात झालेले आईवडिलांचे, मुलांचे हाल यामुळे त्यातली मजा आता गेली आहे. :) आता कदाचित 'बिझनेस क्लास' मध्ये बसायला मिळणे हे फारतर लिस्टवर टाकू शकते. आणि हो, एखाद्या सेलेब्रिटीला भेटणे. म्हणजे, आपण बसलोय आणि शेजारच्या सीटवर अमिताभ बच्चन येऊन बसलाय वगैरे. :) 
        अमेरिकेत आल्या आल्या तिसरं स्वप्न होतं ते म्हणजे लाल रंगाची कन्व्हर्टिबल स्पोर्ट्स कार घेणे. तेंव्हा बजेट मध्ये बसेल अशी साधी 'बेज' रंगाची कार घेतली. अर्थातच तिच्यासमोरही उभे राहून मोठ्या अभिमानाने फोटो काढला होता. कारण आयुष्यातील पहिली कार होती ती. पुढे इथे राहायला लागल्यावर बजेट आणि उपयुक्तता हे सर्व विचार करूनच कार घेतली गेली. पण आल्या आल्या एका मुलीचा वेडेपणा म्हणून वाटणारं जे स्वप्न होतं ते अजूनही अपूर्णच आहे. 
        कॉलेजमध्ये माझ्या रूममध्ये स्टीव्ह आणि मार्क वॉ असलेलं एक पोस्टर लावून ठेवलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाच्या रंगीत पुरवणीत पीटर इंग्लंड च्या जाहिरातीचं होतं बहुतेक ते. त्यात ते दोघे उभे आहेत आणि मध्ये एक भारी वॉर्डरोब आहे ज्यात निरनिराळ्या रंगाचे सूट, टाय, वगैरे ठेवले आहेत. मी म्हणायचे असा वॉर्डरोब नवऱ्याचा असेल तर माझा किती भारी असेल. :) अर्थात तसा तो कधी मिळेल की नाही माहित नाही. कारण त्यासाठी तेव्हढे कपडे, आणि ते ठेवण्यासाठी लागणारं कपाट असणारं घर अजूनतरी केवळ स्वप्नांतच आहे. आणि हो, पूर्वी वाटायचं, खूप भारी उंच टाचेचे चप्पल घ्यावेत वगैरे. आता पाठदुखते म्हणून मुकाट्याने एकच सूट होईल अशी सपाट चप्पल घातली जाते.  त्यामुळे कदाचित तिथंपर्यंत जाऊ की नाही हेही माहित नाही. 
       तर ही अशी अनेक स्वप्नं. अगदी खूप  प्रकारच्या रंगाचं कलेक्शन (रंगपेटी, ब्रश), हँडमेड पेपर्स, एखादी घरात असावीशी लायब्ररी आणि हो तिथे बसून वाचण्यासाठी एक आरामखुर्ची, बाहेर पडणारा पाऊस, हातात पुस्तक आणि कॉफीही. कुणाचं काय तर कुणाचं काय.  एखाद्याला मित्रासारखी बाईक हवी असते, कुणाला साडी तर कुणाला अभिमानाने मान ताठ करता यावी अशी मुलं. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर वेगवेगळी स्वप्नं पाहिली. त्यातली काही खरी झाली, मागे वळून पाहताना काहींवर हसू आलं तर कधी डोळ्यांत पाणी, कधी पैसे हाती आल्यावर गरजेचं वाटेनासं झालं आणि कधी जे हवं होतं ते मिळाल्याचं समाधानही मिळालं. अर्थात प्रत्येक स्वप्न भौतिक गोष्टींबद्दल असतंच असंही नाही. 
         वर त्या शॉपिंगबद्दल लिहिलं होतं ना? त्यात ही अशी स्वप्नं बसत नाहीत. त्यामुळे कदाचित खरेदी करुनही तो आनंद मिळत नाही. वीकेंडला खरेदीसाठी समोर अनेक गोष्टी येऊनही टाळल्यामुळे जुन्या काही स्वप्नांची पुन्हा आठवण झाली. आता पुढची काय आहेत ते एकदा विचार करुन, लिहून ठेवली पाहिजेत, कारण स्वप्नपूर्तीची मजा बाकी कशातच नाही. :) 

विद्या भुतकर. 

Monday, November 20, 2017

छोटेसे बहीण भाऊ

        गेले काही दिवस झाले घरात जोरदार वाद चालू आहेत. आमचे धाकटे चिरंजीव त्यांच्या दीदीच्या शाळेत जायला लागल्यापासून. शाळा सुटली की आम्ही जाईपर्यंत शाळेतच असतात. जिथे मग ते दोघे दोन वेगवेगळ्या रुममधे असतात पण एकमेकांना भेटू शकतात किंवा खेळूही शकतात. आता पहिला आठवडाभर दीदीने समजून घेतलं की भाऊ लहान आहे आणि त्याला आपण सोबत खेळू देऊ. पुढे दोन महिने झाले तरीही तेच चालू राहिल्याने दीदीने आता असहकार पुकारला आहे. मग अर्थातच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळायला येऊन न देणे, रागावणे, आमच्याकडे तक्रार करणे असे प्रकार चालू आहेत. तर चिरंजिवांचे दीदीबद्दल गाऱ्हाणे चालू आहेत. दीदी खेळायला घेत नाही, नीट बोलत नाही, मित्रमैत्रिणींनाहि खेळू देत नाही वगैरे. आता आई-बाबा म्हणून कुणाची बाजू घ्यायची हा मोठा प्रश्न पडला आहे. 
        खरं सांगायचं तर आमच्या घरात मी सर्वात मोठी असल्याने या सर्व प्रसंगातून मी गेले आहे. बहीण-भाऊ मधल्या सुट्टीत सोबत असणे, किंवा त्यांना शाळेत जाताना-येताना सोबत घेऊन येणे हे केलं आहे. आणि त्याबद्दल राग येऊन अनेकदा आईकडे तक्रार केली आहे. भाऊ लहान असताना आजोबा म्हणायचे की त्याला सायकल बसव पण तू सायकल चालवू नकोस, हातात धरून चालत जा. म्हणजे डबलसीट बसून चुकून तो पडायला वगैरे नको. हे असले प्रकार करताना खूप चिडचिड व्हायची. त्यात भर पावसात, छत्री धरायची, सायकल धरायची की स्वतःला सांभाळायचे की भावाला. अशी तारांबळ व्हायची. हे सर्व आजही सांगताना डोळ्यासमोर येतं. इतकं डोक्यात पक्कं बसलंय. 
         आता एक आई म्हणून याचा विचार करताना वाटतं, मुलगा लहान आहे, त्याला तेव्हढीच दीदीची सोबत होईल तर किती बरं आहे. अजून नवीन मित्र-मैत्रिणीही नाहीत. बिचारा एकटा बोअर होतो. मग मुलीला सांगायला जावं तर ती म्हणते पण वेगवेगळ्या तुकड्यातील मुलामुलींना एकत्र खेळणं अलाऊड नाहीये. आणि तिचंही बरोबर आहे, त्याने मोठ्या मुलांसोबत न खेळता स्वतः नवीन मित्र बनवले पाहिजेत, नवीन लोकांत कसं वावरायचं शिकलं पाहिजे. शेवटी आम्ही तोडगा काढला, तीन पैकी एकच दिवस त्याने तिच्याकडे जायचं आणि बाकी दिवस नवीन फ्रेंड्स बनवायचे. दोघांनीही 'डील' म्हणून अटी मान्य केल्या. म्हटलं, सुटलो. 
       मागच्या आठवड्यात एकदा स्वनिक बोलला, "आई आज दीदी माझ्याशी खूप छान वागली.". म्हटलं,"काय केलं?". तर म्हणाला,"मी एकटा बसलो होतो बसमध्ये तर ती येऊन माझ्याशेजारी बसली.". ते ऐकलं आणि एकदम पाणीच आलं डोळ्यांत. कितीही चिडली तरी दीदीने भावाची काळजी केलीच होती. आणि त्यालाही ते जाणवलं होतं. किती छोट्या गोष्टींनी फरक पडतो या वयात. वाटलं, याच पुढे जाऊन आठवणी बनणार आहेत.

      कसं असतं ना? मी लहान असताना कितीही चिडले, तरी आता त्याच आठवणी सोबत आहेत. आणि आता कितीही इच्छा असली तरी तीन वेगवेगळ्या देशातून आम्ही वर्षातून एकदा एकत्र भेटूही शकत नाही. 

विद्या भुतकर. 

Sunday, November 19, 2017

हनम्या

      हनम्या उठला तर तांबडं फुटलं हुतं. दारात दोन कुत्री अंगावर चढून सकाळच्या पारीच सुरु झाल्याली. त्यांच्या केकाटन्यानंच जाग आल्याली. 'आरं हाड !' म्हणत त्यानं एक दगड हनला. पर त्यान्ला लईच जोर आल्याला. ती काय जाईनात. हनम्यानं त्यांचा नाद सोडला आन कांबरून उचलाय सुरुवात केली. घोंगड्याची वळकटी बांधून कोपऱ्यात लावली. गोधडीची शिस्तीत घडी केली. त्यावर उशी ठिवून दोन्ही एका कोनाड्यात ठेवलं. झोपेतच तंबाकूचा तोबरा भरून त्यानं लोटा हातात घेतला. परसाकडला जाऊन यीस्तवर उजाडलं हुतं. 
परतीच्या रस्त्यावरच त्याला मामा दिसला. मामा म्हंजी त्याचाच मामा गावाच्या वेशीकडं जाताना दिसला.

"काय मामा, कुटं चाल्लासा इतक्या सकाळच्याला?", हनम्यानं इचारलं.

"लेकीकडं जातुया, लै दिस झालं नातवंडांना बघून बी.",मामा म्हनला.

"बरं या घरी सावकाश, परत आला की", हनम्या.

"व्हय येतु की, आता बस चा टायम झालाय.", मामा म्हनला आणि तडक चालाय लागला.

हनम्या कितीतरी येळ मामाकड बगत हुभा राह्यला. 'वय झालं मामाचं' त्यानं इचार केला. काळं पडल्या धोतराचा सोगा हातात धरून चाल्ला हुता. वयानं पाटीला कुबड आल्यालं. 

किती येळा सांगितलं हनम्यानं,"मामा काटी घ्याची हातात, आता काय सोळावं लागलं न्हाय तुला.". पन ऐकल त्यो मामा कसला.
मामाचा इचार करताना त्याला त्याची लेक बी आटवली. आई झाली दोन पोरांची. अल्कीला करून घ्यायची हुती हनम्याला. पर त्याच्या आयला लै माज आपल्या पोराचा.

भावाला म्हनली, "घरातला तुझा हिस्सा बी दे तर तुझी पोरगी कर्तू."

मामा बी काय कमी चेंगट नव्हता. एका इधुराला करून दिली आपली लेक कमी पैशात पर 'भनीला हिस्सा देनार न्हाय' म्हनला.
         
       मागनं हिरो होंडाचा मोटा हॉर्न पडला आन हनम्या जाग्याव आला. घरापाशी आला तर निस्ता पसारा पडल्याला. त्यानं खराटा घिऊन दारासमूरचा कचरा लोटला. कालची भांडी बी तशीच भाईर पडल्याली. ती इसळून घेतली घमेल्यातल्या पान्यानं आणि भांड्यांची टोपली घिऊन तो घरात शिरला. खोलीच्या मोजून दोन खिडक्या त्यानं उगडल्या.  डिचकीभर पानी गरम करून घेतलं, बादलीत घालून मोरीत अंगावर पानी वतून घेतलं. माय पडलेलीच हुती. म्हातारीला उजेडानं तिला जाग आली. 

"च्या कर्तुस का जरा?" तिनं झोपेतंच इचारलं.

"ठिवतू की, तू उठ तरी. दूध घिऊन येतो. ", हनम्या म्हनला. कालचा धुतलेला पायजमा सुकलाच नव्हता. त्यानं हाप पॅन्ट घातली. 

म्हातारीनं जीव खाऊन हात खाली टेकला आन धडपडत उठली. तिच्या पातळाचा सोगा निगालेला. कसाबसा तो धरत तिनं मोरी गाटली. म्हातारीला चालवत नव्हतं मग तशीच बसून राह्यली हनम्याला हाक मारत. हनम्यानं घरी यिऊन म्हातारीला बगितलं तसा घाबरलाच.

"काय झालं गं. ", त्यानं इचारलं.

"काय हुनार? त्यो बोलवत न्हाय तंवर बसायचं हितंच. ", म्हातारीला जीव नकुसा झालेला.

तिला हाताला धरून आनला अन तिच्या हातरुणात ठेवत, 'गप पड' म्हनला.

       धुतलेल्या भांड्यातनं त्यानं च्याचं भांडं काडलं. त्याचा बुडाशी राह्यलेला साबन बगून पुन्हा धुतलं. त्या भांडयावरचा काळा थर बगून त्याला लै वैताग यायचा पर किती बी घासलं तरी काय निगत नव्हता. त्यानं स्टो पेटिवला. च्या ठिवून  त्यानं भाजीची निवडाय घेतली. टोपलीतला लसून सोलून टेचला, मिरच्या तोडल्या, म्हातारीला च्या दिऊन कसंतरी भाजीचं काम पन उरकलं. पावसानं वैताग आनलेला हनम्याला. लौकर उरकून मेंढरं घिऊन शेतात जायचं हुतं त्याला. त्यानं चार भाकरी थापल्या. म्हातारीचं ताट तिच्या शेजारी ठिवलं, पान्याचा तांब्या बी ठिवला. एका कागदात आपल्या भाकरी भाजी घालून गुंडाळून घेतल्या. डोक्यावर गोनपाट टाकलं आन निघाला. 

"येतो गं म्हातारे" म्हनत त्यानं पायतान चढवली.
      भायीर येताच शेजारच्या गाडीनं त्याच्या पॅंटीवर चिकल उडिवला. हनम्यान चार शिव्या हानल्या. चिक्लाचा लागलेला डाग बगून त्याचा संताप झाला. परत घरात जाऊन त्यानं वल्ला पायजमा घातला. त्याला लै राग त्या पायजम्याच्या. म्हाताऱ्याचा हुता ना. परत भाईर जाऊन म्हशीला सोडलं, मेंढरं बरुबर घितली आन हाकाय लागला. शाळीला चाल्याली पोरं हुंदडत हुती. मधीच एकानं म्हशीला हात लावला, तसा हनम्या चिडला.

"आरं जा की मुकाट्यानं. लाथ बसली की कळल मग.", हनम्या वराडला तशी पोरं खिदळत पळून गेली.

रस्ता पावसानं वल्ला झाल्येला. बगल तिकडं चिकुल निस्ता. हनम्याला पाऊस नकुसा व्हायचा.  चिकचिक, भरलेली कापडं , डास, माशा, सगळीकडं घान निस्ती. हनम्यानं मेंढरं शेताकडं वळवली. एकरभर जागा त्याची. बापानं तेव्ढंच काय ते मागं सोडलेलं. मेंढरं बांधावर सोडून कडंकडंनं शेतात घुसला. चिकलानं भरल्यालं पायतान हातात घिऊन मऊ मातीतनं कोपऱ्याव आला. पाटाच्या पान्यात पायतान साफ केलं. बायका भुईमुगातलं तण काढत बसल्या हुत्या. त्यानं नजर फिरवली आन तिथंच दगडाव बस्तान टिकवलं.

"काय म्हणतेंय मावशे? लेकीला नाय आनलं आज? ",हनम्यानं बाजूला नजर टाकत इचारलं.

"तिला घरीच ठिवून आलोय. कंबर दुखतीया म्हनं तिची. तिच्यासारक्या तर्न्यानी असं म्हनल्याव आम्ही म्हाताऱ्यांनी कुटं जायचं?", मावशी दमली खुरपं चालवून. 

हनम्याला तिच्या पोरीची गोरी, नाजूक कम्बर आठवली. खुरप्यानं गवत काडता काडता चार वेळा ती पदर सारका करायची. तरी पोट, कंबर दिसायचीच.

"सविताबाई बी नाय का आज?", हनम्या.

"तिला बी ताप आलाय म्हनं. कसलं डोंबलाचं ताप? हिचं काय वय झालं व्हय? तुमच्याइतकी तर आसल की? ", मावशी म्हनली.

"तुमचं किती झालं म्हनायचं?", मावशी.

"झालं की चाळीसच्या वर दोन-चार झाली असतील.",हनम्यानं हिसाब केला.

"लै वाईट झालं बाईचं. पन्नाशीचा बी नसंल पाव्हना? असा हुब्या हुब्या गचकला.",  मावशी इचारच करत हुती. हनम्याला कवापासनं वाटत हुतं तिला इचारावं रातीचं पन हिम्मत झाली नाही. त्यात रात्रीचं म्हातारीला सोडून कसं जानार? 

"म्हातारी काय म्हनती?", मावशीनं इचारलं.

"हाय जित्ती, त्यो कधी बोलवतुय याची वाट बघत.", हनम्या.

"व्हय, लै वय झालं तिचं. एकंद नातवंड बघावं अशी लै इच्छा म्हातारीची....", मावशी म्हनली.

"आता नावंच 'हनमंत' ठिवल्यावर काय व्हायचं?", हनम्या हसत बोल्ला. त्याचं पिवळं दात एकदम भायीर आलं. 

"या जन्मात काय लगीन जमायचं न्हाय आता.  मागील त्ये समदच मिळतंय व्हय मानसाला? मला बी लई काय काय पाहिज्ये हुतं. ", हनम्या म्हनला. 

"पन तुमी लई काळजी करता म्हातारीची. इतकं कोन करत न्हाय आजच्या कलीयुगात.", मावशी. 

"काय करनार? तिनं जनम दिलाय तर कराय लागनारच. दुसरं कोन हाय तिला तरी?", हनम्या म्हनला. 
     मग त्यानं तंबाकू हातात चुरली, चुन्याचा टवका लावला. चिमूटभर मावशीला दिली आन उरलेला तोबरा भरून बसून राह्यला. मावशीबी कामाला लागली. भुईमूग तरारला हुता. यंदाला पाऊस बी बरा झालाय. 'चार पैसं आलं तर दोन नवी कापडं घ्यायची' हनम्यानं ठरवलं. दुपार झाली तसं हनम्या उटला.

"चल मावश्ये जरा मेंढरं फिरवून आंतु. उद्याच्याला येतु पैसं घिऊन. जरा हात हालवा बिगीबिगी. ", म्हनत चालाय लागला.

       बांधाकडनं शेत वलांडत मेंढरं घिऊन फिरत राह्यला. रस्त्यात कुनी कुनी भेटलं त्याची चवकशी करत राह्यला. आबाच्या शेताव आबा दिसल्यावं हनम्याला बरं वाटलं.  आबाची पोरं शेतात हुंदडत हुती. त्यातलं एक 'काका' करत पळत आलं.
"काय रं शाळा न्हाय का तुम्हास्नी?", हनम्यानं इचारलं.

"न्हाय, आज दांडी. ", पोरगं नाकातला शिंबुड हातानं पुसत बोललं.  हनम्यानं दोन बोटांत पोराचं नाक पकडून जोरात शिंकारलं, शिंबुड शेतात फेकून हात आपल्या सदऱ्याला  पुसला. पोरगं परत चिकलात पाय तुडवाय गेलं. हनम्यानं परत तोंड वाकडं केलं. आबा डोक्यावर गवताची थप्पी घेऊन आला.

"काय रं, कुटं निगाला?", आबा.

"असाच आलु भेटाय. गळती थांबली का घराची?", हनम्या.

"व्हय, रातच्याला वरनं ताडपत्री टाकली तवा कुटं थांबलं पानी.", आबा बोलला.

"बरं झालं निदान झोपशील तर गप.", हनम्या.

"व्हय, तुजं बराय बग, बायका पोरं नाय कोन तरास द्याय. हिथं बायकोनं जीव नकुसा केला छत दुरुस्त करंस्तवर.", आबा बोलला.

हनम्यानं फकस्त मान हलवली.

        बोलत बोलत दोगांनी एका ठिकानी बसून डबा खाल्ला. त्यानं आबाच्या शेतातनं पावटा, मिरच्या  निवडून टोपलीत भरून घेतल्या आन घरच्या रस्त्याला निगाला. मधीच एका लोंढ्याजवळ तर्नी पोरं-पोरी दिसली. धबधब्यात भिजून निगल्याली. चालून हनम्याच्या पायाचं तुकडं पडल्यालं. त्यानं म्हशीला खुटीला बांधलं आन शिरप्याच्या टपरीचा दगड पकडला. 'च्या दे रं जरा', म्हनत हनम्या त्या भिजल्याला पोरींकडं बगाय लागला.

"काय म्हून भिजत असतील रं?", त्यानं शिरप्याला इचारलं.

"कुनास ठावं. पर आपलं पोट चालतंय न्हवं. गप आपला च्या द्यायचा, कनीस द्यायचं, पैकं घ्यायचं.", शिरप्या त्या पोरांकडं बगत बोलला.
        मेंढराकडं डोळा ठेवत हनम्यानं च्या घितला आन तिथंच बसून राह्यला. ढग भरून आलं तसं हनम्या उटला. मेंढरं, म्हशीला हाकत घराकडं चाल्ला. घरात घुसून त्यानं पयला बलब लावला, हात पाय घासून धुतलं, देवाला दिवा पेटिवला. म्हातारी पडूनच हुती. तिच्याकर्ता च्या केला. तिचं दुपारलं ताट धुतलं आन पुना सैपाकाला लागला. म्हातारीला ताट केलं. कसंबसं उटून तिनं चार घास खाल्लं.

"मामा भेट्ल्याला सकाळी.", हणम्यानं म्हातारीला वरडून सांगितलं.

"काय म्हनला?", म्हातारी.

"अल्कीकड निगालेला. नातवांना भेटाया. ", हनम्या.

"लेकीची लय वड त्याला. पन पैका ज्यादा प्यारा त्याला. न्हाईच दिला त्येनं शेवटी हिस्सा. मग म्या पन त्येचीच भन हाय. ", म्हातारी.

"आता परत बोलाय लाव नगंस मला. समद्या जगाची पोरं झाली. पर तुज्या हट्टापाई मी असा बसलूया. तुज्यामुळंच झालंय समदं. आता एकटाच मरायचो मी.", हनम्या चिडला. म्हातारी गप बसली.  

        हनम्यानं  बी मुकाट जेवन उरकलं. भांडी टोपल्यात घालून भाईर ठिवली आन बारक्या रेडिओवर बातम्या ऐकत बसला. रात झाली तसा हनम्यान दिवा ईजवला. डोळं मिटलं पर झोप लागंना. मावशीची पोरगी, सविता, त्या भिजलल्या पोरी सगळ्या डोक्यात यायल्या. त्यानं कूस बदलली पर झोप लागंना.

तवर म्हातारीनं हाक मारली, "हनम्या, हनम्या  ".

हनम्याला लै राग आल्येला म्हातारीचा. ती हाका मारतच राह्यली.

हनम्या उठला रागानं,'मरत बी न्हाय एकदाची. काय सुक म्हनून न्हायच नशिबात.'. 

"आलो आलो वरडू नगंस आता" बोलत तिच्याकडं गेला. 

       म्हातारी वरडतंच हुती. हनम्याचा राग डोस्क्यात गेला आन त्यानं तिचं नरडंच धरलं. 
"गप बस की." म्हनत हात गल्यावर पकडला. म्हातारीचा जीव घाबरला. तिनं त्याच्या हातावर हात धरला पन जोर लागंना. तिचं पाय लटपटलं. 'हनम्या' म्हातारीनं परत बारीक हाक मारली. तिच्या डोळ्यांत पानी आल्यालं. हनम्या जाग्याव आला, त्यानं हात मोकळा केला. म्हातारीनं जोराचा शवास घितला.

"पानी दे रं मला. यम आला हुता वाटतं. सुटलोच असतो आज.", म्हातारी म्हनली. 
हनम्याचं डोस्क जरा थंड झालं. त्यानं तिला पानी दिलं. तिचं डोळं पुसलं. तिला कांबरून घातलं आन परत जाग्याव जाऊन पडला. 
'वाचली आज म्हातारी' म्हनत हनम्यानं  पुना मुश्किलीनं डोळं मिटलं. हळूहळू डोळ्यावं झापड याय लागली. 
पुना अल्की समोर आली, तिचं हासनं दिसलं , तिचं बोलनं आटवलं, आन पुना त्याचा हात पायजम्यात गेला. 
हनम्याचा आजचा दीस तरी संपला हुता. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Monday, November 06, 2017

तो, ती आणि किशोर

गुलाबी थंडीची ती रात्र. तो गाडी चालवत होता. ती बराच वेळ शेजारी बाहेर बघत बसली होती. मध्येच तिने सीडींचा बॉक्स काढला. शोधत शोधत ती 'किशोर कुमार' लिहिलेल्या सीडीवर थांबली. तिने सीडी टाकली आणि पहिलंच गाणं ..... 'मेरे मेहबूब इनायत होगी...... '  लागलं. 
'वाह ....!' ती उद्गारली. तिच्या 'वाह' वरच त्याला कळलं ती आता नॉर्मल होत आहे. 

       एकेक गाणं येऊ लागलं तशी ती त्या गाण्यांसोबत आपल्या भसाड्या आवाजात गाऊ लागली. तो हळूच हसलाही. तिने ते पाहिलं होतं. पण समोरच्या गाण्याचे बोल सोडून त्याच्याशी बोलायला ब्रेक घ्यायची तिची इच्छा नव्हती. 
'.......तुम जो केह दो तो आज की रात चाँद डूबेगा नहीं ईईईई ' . गाडी गर्दीतून वाट काढत घरी चालली होती. 
'इस मोड से जाते है...... ' तिने तान घेताना हातांनाही वळण दिलं होतं. 'इन रेशमी राहों में एक राह तो वो होगी.......  तुम तक जो पहुँचती है........ उस मोड़ से जाते  है एएए ....... '. एकापाठोपाठ एक गाणं चालू होतं. 

ती अशी गाण्यांत गुंतली की तो नेहमी हसायचा. इतकं काय त्या गाण्यात अडकायचं? आहे आवाज सुंदर आणि शब्दही... पण इतकं काय असतं त्या गाण्यात, मला नाही कळत', तो म्हणायचा. 

'जाऊ दे तुला कळणार पण नाही. असते एखाद्याची आवड. आणि तुला सांगू, नाहीच आवडलं प्रत्येक गाणं तरीही एखादं गाणं असतंच असं, ते स्वतःला लागतं ना तेव्हाच त्यातला भाव जाणवतो, दुखतो, मनात राहतो. पण तुला काय?' म्हणत ती पुन्हा गुणगुणायला लागायची. 

तोही तिचा वेडेपणा आहे म्हणून सोडून द्यायचा. 

आज मात्र तिचा आनंद पाहून त्यानेही तिला साथ दिली होती, 'आज रपट जाये तो हमें ना उठइयो            आ हा..ओ हो...... " स्टिअरिंग वरचा एकेक हात उचलत त्याचा डान्स पाहून ती हसली. शेवटी घर आलं. तिला गाणी सोडून घरात जायची इच्छा होत नव्हती. एरवी तिने गाणं पूर्ण होईपर्यंत थांबायचं म्हटलं की त्याला चिडचिड व्हायची. घराजवळ येऊनही गाडी चालू ठेवून उगाच काय बसायचं. घराजवळ आल्यावर आज पुन्हा तेच होणार तिला वाटलं. गाणं चालू असतानाही त्याने गाडी बंद केलीच. ती गप्प बसली. पण निघताना त्याने ती सीडी काढून घेतली. घरात येऊन तिने चप्पल कपाटात ठेवले, हातातलं सामान फ्रिजमध्ये ठेवायला गेली तेव्हढ्यात म्युझिक सिस्टीम अर्धवट राहिलेलं गाणं सुरु झालं होतं. ती खूष होऊन हॉलमध्ये आली. तोही हसला. 

'आपकी आँखो में कुछ.... ' सुरु झालं होतं. ती त्याला म्हणाली,'मला ना खूप इच्छा होती माझ्यासाठी कुणीतरी हे गाणं म्हणावं."

'अच्छा?', त्याने विचारलं. 

तेव्हढ्यात गाणं पुढे सरकलं होतं. 'लब हिले तो मोगरे के फूल खिलतें कही....' पर्यंत आल्यावर आपल्या भसाड्या आवाजातून मोगऱ्याची नाही, तर झेंडूची फुले पडतील असं तिला वाटून हसू आलं. तोही तिचा विचार ओळखून तिच्याकडे बघून हसला. पुढे मग प्रत्येक गाण्यांत गमती सुरु झाल्या.

         त्यांचा पायांवर पाय ठेवून डान्स सुरु असतानाच 'अभिमान' मधलं गाणं सुरु झालं. 
'ओ ...... आ ....... तेरे मेरे मिलन की ये रैना..... ' आणि तो थबकला. 
तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..... 
          
          आज तिच्या डॉक्टरकडे जाऊन आले होते ते. गेल्या ८-१० वर्षांतल्या अनेक व्हिझिट्स पैकी अजून एक. अनेक उपचार, औषधं, आय व्ही एफ, आणि अनेक वेळा झालेलं मिस-कॅरेज. त्यातून होणारे अनेक प्रश्न आणि प्रॉब्लेम्स. तिचा प्रत्येक वेळी होणारा हार्मोनल इम्बॅलन्स. प्रेग्नन्ट असताना उंचावलेल्या अपेक्षा आणि होणारा अपेक्षाभंग. त्यातून होणारी तिची चिडचिड, मग भांडणं. तिला आलेलं एकाकीपण, घरातली सुन्नता. सगळं गेल्या काही वर्षांपासून चालू होतं. शेवटचा एक प्रयत्न करायचा आणि त्यातून काही अपेक्षा नाही ठेवायची हेही ठरवून यावेळी आय व्ही एफ साठी ते गेले होते. दरवेळी तीन महिन्यांतच मिस-कॅरेज व्हायचं. आज चार महिने उलटून गेले होते आणि आज तपासून आल्यावर सर्व काही ठीक आहे म्हणून डॉक्टरनी सांगितलं होतं. 
आज खूप दिवसांनी त्यांच्या घरातली ती भयाण शांतता भंग पावली होती. 

मागे गाणं चालूच होतं आणि त्याचा आवाज दाटला होता,'जैसे चन्दा खेले बादल में... '. 

ते गाणं त्याच्या मनाला भिडलं होतं. 

विद्या भुतकर. 

Sunday, November 05, 2017

तरीही ......रांधा वाढा .....

लग्नाच्या आधी एक दोनदा संदीपकडे त्याच्या एका मित्राचा डबा राहिला होता आणि त्याच्या बायकोने वारंवार त्याची आठवण करून दिली होती. तेव्हा वाटलं, इतके डबे असतात लोकांकडे, एका डब्याने लगेच काय होणारेय? पुढे लग्नानंतरही आईने काही स्टीलच्या वाट्या वगैरे दिले होते आणि त्यावर आवर्जून माझं नाव टाकलं होतं, तर काही ठिकाणी फक्त नवऱ्याचंच. त्या नावात किती शुद्धलेखनाच्या चुका होत्या ते सांगायला नकोच. पण मी आईला म्हटलं होतं, अगं नाव कशाला टाकायला पाहिजे भांड्यांवर? मी तर त्यावर चारोळी पण केली होती: 

"आयुष्यभर संसाराचं गाडं 
दोघांनी मिळून रेटलेलं 
तरी मुलांपासून भांड्यांपर्यत 
सगळीकडे, त्याचंच नाव टाकलेलं." :) 
भारी आहे ना? :) असो. 

        जशी संसारात रुळले, या सर्व गोष्टींचा अनुभव येत राहिला आणि भांडी हा जरा जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे हे कळलं. शिकागो सोडून पुण्याला येताना अनेक भांडी सोडून द्यावी लागली किंवा मित्र-मैत्रिणींना दिली. तेव्हा अगदी वाईट वाटत होतं, आपलं म्हणून असलेलं एखादं भांडं किती जीव लावतं वगैरे वाटून. कितीही सामान जास्त झालं तरी मुलांची आवडीची वाटी, किंवा ताट हे मात्र आवर्जून घेतलं होतं. पुण्यात राहिल्यावर अनेकदा अनेक लोकांकडे पदार्थांची देवाण घेवाण झाल्यावर त्यावर टाकलेली नावंच उपयोगी पडली. आजही अनेक भांडी मी जपून ठेवली आहेत. त्यात एखादं माहेरहून आलेलं असेल तर बासच ! माझं जाऊ दे, मी लहानपणी ज्या छोट्या ताटलीत जेवायचे ती ताटलीही आईकडे अजून आहे. म्हणजे बघा. 

         भांडी कितीही जवळची असली तरी ती घासणे हा मात्र राष्ट्रीय पातळीवरचा विषय होऊ शकतो. भांड्याला मावशी ३ दिवस आल्या नाहीत तर ...... ?? ऐन पाहुणे यायच्या दिवशीच तिने कलटी दिली तर? असे गहन प्रश्न मी इथे काढणार नाही. माझे प्रश्न साधे आहेत? पाहुणे म्हणून एखाद्याकडे गेलेले असताना तुम्हाला भांडी घासायला लागली तर? सुनबाई घरात असताना सासूने भांडी घासली तर? बायको घरात असताना नवऱ्याला भांडी घासायला लागली तर? एकूण काय तर भांडी घासणे हे कमीपणाचे काम आहे. अगदी हिंदी पिक्चर मधेही निरुपा रायला गरीबीची पराकाष्ठा म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरची भांडी घासायला लागणे. आजकाल इतका त्यावेळी मावशींना भाव नसल्याने तसे सीन्स घेतले असावेत. 

       जोक्स अपार्ट, बायकांनीच भांडी घासली पाहिजेत असा अलिखित नियम कधी बनला? पूर्वी त्या घराबाहेर पडत नसत, किंवा कामाची विभागणी घरची स्त्रीनं आणि बाहेरची पुरुषांनी अशी केल्यामुळे त्या करत असतील. पण आज, नोकरी करून घरी आल्यावरही मावशी आल्या नसतील तर भांडी कोण घासतं? बाई आली नाहीये याचा त्रास स्त्रीला होतो का पुरुषाला? पुरुषांसाठी हा मानाचा विषय का आहे? 

         आमच्या घरी डिशवॉशर आहे, ज्यात भांडी खरकटं काढून, विसळून लावावी लागतात. जेवणं झाली की मुलं पुस्तकं वाचत बसतात. मी भांडी विसळून देते आणि तो मशीनमध्ये व्यवस्थित रचून ठेवतो. त्याने विसळलेली मला आवडत नाही तर मी रचलेली भांडी त्याला आवडत नाहीत. एकूण काय, तर आम्ही आमच्या रोलमध्ये खूष आहोत. तरीही नवरा भांडी घासतो, किंवा मदत करतो यात ग्रेट काय आहे? अनेकदा, तीन तास उभे राहून केलेल्या स्वयंपाकासाठी मला मिळणाऱ्या कौतुकापेक्षा तो भांडी आवरतो किंवा मदत करतो याचंच कौतुक लोकांना जास्त असतं? एकदा तर एका ठिकाणी, 'मी मदत करते म्हटलं' तर 'राहू दे, तुला सवय नाहीये' असंही ऐकायला लागलं आहे.   नवरा म्हणतो,'सोडून दे'. मी म्हणते, का सोडून द्यायचं? असं काय आहे भांडी घासण्यात की जे मी केलं नाही म्हणून मला ऐकून घ्यावं लागतं आणि तू करतोस म्हणून तुझं कौतुक होतं? 

         घरात कुठली भांडी कुठे आहेत, हे नवऱ्याला माहित आहे यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे? म्हटलं, १० बाय १२ च्या किचनमध्ये मोजून ८-१० कपाटं, त्यात कुठलं भांडं कुठे आहे हे घरात राहून माहित नसावं एखाद्याला? असं असेल तर घरात राहता की हॉटेलात असा प्रश्न विचारला पाहिजे. मी म्हणतच नाही की भांडी घासणे हे काही महान कार्य आहे. जेवण करतो तर मग भांडीही घासावीच लागणार? नाईलाज म्हणून का होईना ते करावंच लागतं. उलट जेवण झाल्यावर तितकीच हालचालही होते म्हणून अनेकदा आम्ही कितीही कंटाळा आला तर उरकून घेतो. शिवाय सकाळी पसरलेला कट्टा पाहून चिडचिड होते ते वेगळंच. नाईलाजाने का होईना करावं तर लागतंच. पण ते बायकांनीच करावं असं कुठे म्हटलंय? 

        आजही आपल्याकडे हे कमीपणाचं काम म्हणून घरच्या बाईला करावं लागतं. अनेकदा पुरुष स्वतःचं ताट उचलूनही सिंकमध्ये टाकत नाहीत. भारतात ही असमानता तर मी पाहिलीच आहे. पण अमेरिकेत राहूनही अनेक लोकांनी जे प्रश्न विचारलेत किंवा आश्चर्य व्यक्त केलं आहे त्यावरून वाटतं की कितीही शिका, बाहेर पडा, नोकरी करा नाहीतर अजून काही, लोकांचे विचार मात्र बदलत नाहीत. ही असमानता मात्र कधी कमी होणार नाही. ती अशा छोट्या छोट्या गोष्टींतून दिसतंच राहते. गेल्या काही दिवसांपासून यावर जास्तच अनुभव आले म्हणून शेवटी लिहिलंच. 

विद्या भुतकर.