Wednesday, March 29, 2017

उन्हाळ्याची सुट्टी

          गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या वाढत्या त्रासाबद्दल आणि योग्य ती काळजी घेण्याबद्दल अनेक मेसेज वाचले. त्यावरून डोक्यात उन्हाळयाच्या सुट्टीचे विचार मनात यायला लागले. खरंतर पाऊस, पहिला पाऊस, पावसातलं प्रेम, हरवलेला पाऊस, डोळ्यातला पाऊस आणि त्यावर अनेक कवितांचा पाऊस दरवर्षी नेमाने येतो. तिकडे शिवाजीनगरला पाऊस पडला की इकडे वारज्यात दहा बातम्या आणि २-४ कविता धपाधप येतात.   आता इतकी सवय झाली आहे की लोकांच्या पोस्ट वाचून पावसाचा अंदाज येतो इकडे मला अमेरिकेत राहूनही. :) असो. तर मुद्दा असा की पावसाबद्दल जितकं लिहिलंय मी स्वतः तितकं कधी उन्हाळ्याबद्दल लिहिलं नाहीये, किंबहुना अजिबातच नाही. म्हणून म्हटलं या सर्व आठवणींची एक पोस्ट लिहावीच.  एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे या पोस्ट मध्ये 'गेले ते दिवस' असा सूर नसून 'आठवणी मांडण्याचा' विचार आहे. मला वाटते की प्रत्येक ऋतूची वेगळी एक गमंत असते ती प्रत्येकजण अनुभवत असतो. त्यासाठी लहानपणच हवे असे नाही. आताही ती येतेच, कधी मुलांचे पोहणे पाहण्यात, त्यांच्यासाठी आईस्क्रीम बनवण्यात किंवा त्यांच्या सुट्ट्या ते कसे घालवतात हे पाहण्यात. असो. 
           तर मला आठवणारा उन्हाळा म्हणजे परीक्षा संपल्यावरचा. तोवर परीक्षेच्या विचारांनी म्हणा किंवा अजून काय पण त्या परीक्षा संपली की उन्हाळा हे गणित डोक्यात एकदम पक्कं. तर शेवटचा पेपर टाकून घरी आलो की फार भारी फीलिंग असायचं. एकदम मोकळं मोकळं. काय करू काय नको असं व्हायचं. एकदा दोनदा तर आईने पापडाचे पीठ मळून ठेवलेलं होतं. आम्ही घरी आलो की लाटायला घेण्यासाठी. इतक्या वर्षात अजूनही माझी चिडचिड विसरले नाहीये त्यावर. दोन मोठी आकर्षणं असायची, टीव्ही आणि दुसरं पुस्तकं. टीव्हीवर फक्त दूरदर्शन त्यामुळे मर्यादितच पर्याय असायचे. पण त्यापेक्षा बरेच दिवस अभ्यासामुळे शेजारी पडूनही वाचता ना आलेलं पुस्तक बिनधास्त वाचायचं असायचं. तो त्या पहिल्या दिवसाचा उत्साह म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होती माझ्यासाठी. 
          पुढे मग रोज सकाळी लायब्ररीमध्ये जाऊन दोन तरी पुस्तकं घेऊन यायची. जेवण झालं कि दुपारी वाचत बसायची हे ठरलेलं. सायकलवरून जाताना डोक्यावर तापलेलं ऊन असायचं. घरात आल्याआल्या डोळ्यासमोर अंधारीच यायची. लायब्ररीयन माझी चांगली मैत्रीणच झाली होती. वेगवेगळ्या वयात वाचलेली निरनिराळी पुस्तकं आजही आठवणीत आहेत. दुपारी घरी अनेकदा आई हाक मारायची आणि ओरडायची की उत्तर देत का नाहीस म्हणून आणि मी चिडायचे की मला ऐकूच आली नाही. इतकी त्या वाचनात गुंग असायचे. अनेकदा भाऊ-बहीण, चुलत/आते  भाऊ-बहीण यांच्या सोबत खेळायचं सोडून बसायचे. स्वामी, श्रीमान योगी,पुलं, गंगाधर गाडगीळ यांची पुस्तके आणि बरेच काही वाचल्यावर, त्यात काय वाचलं हे मैत्रिणीला रोज सांगण्याची आठवणही आहे एक. त्या छोट्याशा गावातल्या लायब्ररीने खूप काही दिलं. आजही ते सोबत आहे आणि राहील. 
           पुस्तकं यायच्या आधी एकी खास आठवण म्हणजे आजोबांच्या सोबतची सकाळ. आम्ही आवरत असताना दारात कारंजाच्या झाडाखाली खुर्ची घेऊन आजोबा बसायचे. पेपर वाचत बसायचे. आणि दारातून सायकलवरून टोपली घेऊन जाणाऱ्या प्रत्येक  माणसाला हाक मारायचे. गावठी आंबे असायचे त्यात. माणूस थांबला की आबा आम्हाला,आईला हाक मारायचे. आम्ही मग आंबा चाखून बघणार. दर वगैरे आबाच ठरवणार. कधी कधी तर आम्हाला न विचारताच घेऊन टाकायचे. मग घरात एखाद्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक डझन आंबे असायचे. लहान असताना आम्ही रोज सकाळी दात घासून एकदम आंबे खायलाच बसायचो. दुपारी जेवणातही आमरस असायचा. अर्थात त्यासाठी खास रसाचे आंबेच लागायचे. नाहीतर मग चाखून खायचे आंबेच जास्त. सुट्टी संपायला येईपर्यंत आंबे खाण्याचा उत्साह पार संपून जायचा. 
         आंबे सोडले तर दुसरं आकर्षण होतं ते वेगवेगळ्या कलाकुसरीचं. कापडावर धागे विणून पिशवी बनवायची, रेशमी धागे जोडून वर्तुळावर नक्षी करायची असे छोटे मोठे उद्योग आई करायला द्यायची. पण ते पूर्ण कधी केल्याचं आठवत नाहीये. एक मात्र आठवतं ते म्हणजे दारातले चमेलीचे वेल. दोन दारांच्या दोन मजल्यापर्यंत उंच गेलेले वेल होते. सकाळी उठून दार उघडलं की वाऱ्यासोबत त्याचा घमघमाट यायचा. आम्ही बहिणी आवरून फुलं वेचायच्या घाईत असायचो. का तर जास्तीत जास्त ताजी फुले गोळा करून मोठ्यातला मोठा गजरा कोण बनवणार याची स्पर्धाच असायची. बनवलेला गजरा मळून संध्याकाळी गावातच चक्कर व्हायची, कधी काकूंकडे किंवा लायब्ररीत, नाहीतर भाजी आणायला. मोगरा, चमेली आणि त्यांचे सुवास आजही उन्हाळ्याची आठवण ताजी टवटवीत करतात. 
         दुपारचं जेवण करून आतल्या खोलीतल्या काळ्या फरशीवर पडून टीव्ही बघायला, झोपायला भारी वाटायचं. आजही घरी गेले की त्या खोलीत डाराडूर झोप लागते. संध्याकाळी कधी कधी सायकली घेऊन शाळेच्या ग्राऊंडवर फेरी मारायला जायचो. कधी चालत जायचो. तर कधी दारातच गप्पा मारत बसायचो. संध्याकाळी दुसरं आकर्षण असायचं ते म्हणजे दारातून जाणाऱ्या आईस्क्रीमच्या गाडीचं. आबांना गाडी दिसली की ते थांबवायचेच. नाहीतर आम्ही पोरं होतोच आठवण करून द्यायला. जवळजवळ रोज स्टीलच्या छोट्या वाटीतून आवडत्या चवीचं आईस्क्रीम खायला मिळणं हा त्या काळातला सर्वात मोठा आनंद.
        रात्र होईल तसे घरात खूप गरम व्हायला लागायचं. केव्हा एकदा जेवण उरकून बाहेर येऊन बसतोय असं व्हायचं. पंखा कितीही मोठा ठेवला तरी कासावीस व्हायचं. टिव्हीवर जेवताना जे काही पाहिलं तितकंच. मग अंगणात येऊन बसायचो. बरेचदा लाईटही जायचीच. त्यामुळे अंगणात बसून आकाशाकडे पाहायला भारी वाटायचं. तितकं ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहून खूप वर्षं झाली. लहान असताना आबा गोष्टी सांगायचे. एकच गोष्ट थोडीफार बदलली तर 'तुम्ही काल असं सांगितलं होतं' म्हणून भांडायचो. उन्हाळ्यांत दारासमोरून उसाचे ट्रक, बैलगाड्या भरभरून जायचे. बैलगाड्या तर आम्ही मोजायचो एका वेळी किती जातात म्हणून. मग मागून एखादा ऊस काढून घ्यायचा. कधी ४-५ काढले तर ते गुऱ्हाळात घेऊन जाऊन रस काढून किटलीतून घेऊन यायचो. जवळच्याच गावात साखर कारखाना असल्याने तिथल्या मळीचा वासही ओळखीचा झाला होता. रात्र चढेल तसा तो वासही वाढायचा. 
        आम्ही जेवणानंतर कधी चालत जायचो तर काळ्या कुळकुळीत रस्त्यावरून चप्पल काढून चालायला भारी वाटायचं. जितके जोरात पळत जाऊ तितका जोरात अंगाला वारा लागणार.पण घरी आले की तितकेच जास्त गरमही व्हायचे. थोडी वर्षं आम्ही अंगणात गाद्या टाकून, मछरदाणी लावून झोपायचोही. तेव्हा रात्र वाढेल तसा लागणारा गार वारा कधी झोप घेऊन यायचा कळायचं नाही. जाग यायची तेव्हा उन्हं चढलेली असायची. तर कधी ६-६.३० लाच उजेडामुळे जाग यायची. मग आम्ही घरात जाऊन झोपायचो. :) कधी कधी मात्र वळवाच्या पावसाने एकदम धावपळ व्हायची आम्ही झोपेतून उठून कसेबसे आत पळत जाऊन गाड्या टाकून पुन्हा झोपून जायचो. एका रात्री बाहेर झोपलेलो असताना, मला काहीतरी अंगावर आहे असे जाणवले म्हणून ओरडले तर एक माणूस माझ्या गळ्यात चाचपत होता. पुढे काय झाले माहित नाही. बहुतेक तो चोर पळून गेला. पण तेव्हापासून बाहेर झोपणे बंदच झाले. अजूनही कधी ते आठवले तर एकदम भीती वाटते. अनेक वर्षात असा वाईट अनुभव पहिल्यांदाच आला होता. आता मात्र रात्री दारांना कुलूप लावून झोपावे लागते आई-दादांना. चोरीचे प्रमाण जास्तच वाढले आहे गावात. असो.
         सातवीच्या उन्हाळयात घरी कॅरम आणला. आई दादा दोघेही उत्तम कॅरम खेळायचे. दिवसभर आम्ही शिकायचो आणि भाऊ-बहिणी, घरात येणारे पाहुणे सर्व खेळायचे. रात्री मात्र आई, दादा आणि आम्ही चौघांपैकी दोन असे मिळून डाव मांडला जायचा. तेव्हा मजा यायची खूप. घरात पत्ते तसे कमी खेळले जायचे. दादांना जास्त आवडायचे नाहीत त्यामुळे. कधी कधी सख्खे,चुलत, आते भावंडं मिळून लपाछपी, पळापळी खेळायचो तर कधी उगाच शेतात भटकलोही आहे. अर्थात केवळ खेळच नाही तर अभ्यासही व्हायचा. आजोबा चुलत बहिणीला इंग्रजी किंवा संस्कृत शिकवायचे. मी तिच्याहून एकच वर्षाने लहान. त्यामुळे तिच्यासोबत मलाही बसवायचे. त्यामुळे इंग्रजी आणि संस्कृत सुट्टीमध्ये आणि परत पुढच्या वर्षी असं शिकले आहे. माझी खूप चिडचिड व्हायची सुट्टीत अभ्यास करावा लागतो म्हणून पण तेव्हा जे शिकले त्याने खूप काही मिळालं. मुख्य म्हणजे आजोबांच्या आठवणी. :) 
          मे मध्ये निकाल लागायचे, कधी खूष तर कधी नाराज व्हायचे. पण सुट्टीत पुन्हा विसरून जायचे. मेच्या शेवटी मात्र उन्हाने, दमट वातावरणाने आणि मोठ्या सुट्टीचा कंटाळा यायचा. शाळेचे वेध लागायचे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कधी एकदा शाळा सुरु होते असं व्हायचं. अर्थात अभ्यास, रुटीन यामध्ये यायला मन थोडं त्रास द्यायचं. शाळा सुरु झाली की महिन्याभरात सुट्टीबद्दल विसरूनही जायचे. किती छान होतं ते सारं. 
         इथे लिहिल्या इतक्या सगळ्या गोष्टी एकाच वर्षातल्या नसून अनेक वर्षांच्या आठवणींचा संग्रह आहे. माझ्या त्या काळातल्या छोट्या जगातल्या मोठया गोष्टी आहेत. आता विचार केला तर वाटतं तेव्हा हे सर्व अनुभवलं यासारखं सुख नाही. आता धावपळीत असा निवांत क्षण मिळत नाही. मुलांना त्यांच्या सुट्टीचा आनंद घेता यावा अशी खूप इच्छा असते, आहे. मागच्या वर्षी त्यांच्या सुट्टीत २ महिने भारतात राहिलो. दोघेही अजून त्या सुट्टीच्या आठवणी काढतात. त्यांनाही माझ्यासारखं काहीतरी आठवणीत ठेवण्यासारखं मिळावं, आमच्याकडून दिलं जावं हीच अपेक्षा आणि प्रयत्न आहे. आज या लिखाणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान वाटलं. आता मी या वर्षीच्या आमच्या सुट्टीची वाट बघतेय.
:) 

विद्या भुतकर.

Tuesday, March 21, 2017

सिनेमाच्या गंमती

         लग्न व्हायच्या आधी आणि मुले होईपर्यंत आयुष्यात बऱ्याच मारामाऱ्या केल्या. एखादी ट्रिप किंवा ट्रेक किंवा मुव्ही पाहायला जाताना, पुढे काय होईल किंवा उद्या ऑफिस आहे तर मग आज नको असे फालतू विचार मनात कणभरही आले नाहीत. हे असले प्रकार सुरु झाले ही मुलं झाल्यावर. आता अचानक कुठेही बाहेर पडायला, रात्री उठून कुठेतरी लॉँग ट्रिपला, ड्राईव्हला वगैरे जाता येत नाही. एक दिवस जरी कुठे जायचं म्हटलं तरी लढाईला चालल्यासारखे सर्व सामान घेऊन जावे लागते आणि कितीही घेतले तरी जे नाहीये तेच बरोबर हवे असते.
         सर्वात जास्त फरक पडला तो म्हणजे आमच्या टीव्ही बघण्याला आणि उठून लगेच एखादा सिनेमा बघायला जाण्याला. गेल्या ७-वर्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिले त्यातले हिंदी तर अजून कमी. मुलांसोबत हिंदी चित्रपट पाहणे म्हणजे अतिशय त्रासाचं काम आहे एकतर त्यांना बरोबर शु-शी लागते, कंटाळा येतो, भीती वाटते, रडू येते. मागे 'प्रेम रतन धन पायो' बघायला जाऊन आलो तर मुलगा डोक्याला हात लावून बसला होता पुढचा अर्धा तास. तेव्हा तर ४ च वर्षाचा होता. :) असो. तर मुद्दा असा की एकूण बाहेर मुव्ही बघायला जाणे बंदच झाले आहे. 
        पण मला 'बद्रीनाथ की दुल्हनिया' बघायला जायची खूप इच्छा होत होती. पहिला आठवडा 'राहू दे' म्हणून सोडून दिला पण मागच्या शुक्रवारी मात्र राहवले नाही अजून एक आठवडा थांबले तर इथे थिएटर मधून तो सिनेमा गेलेला असतो.संध्याकाळी ७.१० झाले होते. म्हटले काहीही करून जायचेच. ८.१५ चा शो होता आणि पोचायला ४५ मिनिटे लागणार होती. तिथेही सीट्सना नंबर देत नाहीत. हाजीर तो वजीर. त्यामुळे लवकर पोहोचणं आवश्यक होतं. अजून जेवणही झालं नव्हतं.. एकदा जायचं म्हटल्यावर, पटकन ऑनलाईन तिकीट बुक केले. सकाळचा पास्ता गरम करून दोन डब्यांत भरला, एकेक संत्रं आणि पाणी घेतलं. कपडे बदलून १० मिनिटांत निघालो. मुलांना गाडीतच पास्ता आणि संत्रे खायला दिले. थिएटरला पोचलो ८.१० पर्यंत. आम्ही जेवण केलेलं नव्हतंच. पॉपकॉर्न आणि कोल्ड्रींक घेऊन आत गेलो आणि ५-१० मिनिटांत पिक्चर सुरु झाला. गर्दी कमी होती त्यामुळे सीटही चांगले मिळाले. पिक्चरही आवडला त्यामुळे एकूणच सर्व नीट झाले म्हणायचे. 
       आता यात काही खूप महान कार्य केले नाहीये पण मला वाटतं की या अशा अनेक छोट्या का होईना प्रत्येकाचा वेगवेगळ्या सिनेमाच्या आठवणी असतात. एकदा भारतात असताना मुलं लवकर झोपली म्हणून अचानक कुठला तरी सिनेमा पाहायला गेलो. दोन लागले होते, त्यातला 'खूबसूरत' पाहून परतलो. असे क्षण कमीच पण अविस्मरणीय असतात. म्हणजे कुणी पैसे नसताना उधार घेऊन पाहायला गेल्याची गोष्ट, कुणी एका गाण्यासाठी १० वेळा पाहायला गेल्याची तर हं आपके सारख्या सिनेमाला आख्खी फॅमिली घेऊन गेल्याची असो. तिकीट मिळालं नाही तर ब्लॅकने पाचपट दार देऊन पाहिल्याची आठवण. अगदी लास्ट मिनिट दोन टोकांनी धावत-पळत येऊन पिक्चर पहिल्याच्या आठवणी तर कुणाची आत जाऊन झोपल्याची आठवण. फर्स्ट दे फर्स्ट शो पाहायचाच म्हणून हट्ट करून अगदी पहिल्या रांगेतून पाहिल्याचंही ऐकलंय. अशा अनेक. 
        सिनेमा असा पाहणं यात खास काय असतं माहित नाही, पण ते लक्षात मात्र राहतं. तुमच्याही अशा काही गमती असतील तर जरूर सांगा. :) 

विद्या भुतकर.


अस्तित्व


Monday, March 20, 2017

स्वप्ना आणि सत्या- भाग ७

दोघेही एका हॉटेलमध्ये समोरासमोर बसलेले.
ती: मघाशी त्या दोघांना पाहिलंस?
तो(घास खाता खाता): कोण?
ती: तेच रे टेबलच्या एका बाजूला बसले होते?
तो: ओह.. मला नाही आवडत हे असलं.
ती: आता त्यात काय?
तो: समोरासमोर बसायचं, हे काय एका बाजूला बसायचं?
ती: मग प्रेमात असतं.
तो: आपण नव्हतो का कधी प्रेमात?
ती: असं काय अरे? किती क्यूट दिसत होते दोघं.
तो: क्यूट?
ती: मग काय? आपण पण होतो की असेच.
तो: हां पण हा असला फालतूपणा कधी केला आपण पब्लिकमध्ये?
ती: विसरलास? असा टेबलाखालून धरलेला हात?
तो(हसून): ते होय? आता ते लग्नाआधी होतं.
ती: मग आता लग्न झाल्यावर?
तो: आता काय? कधीही धरता येईल.
ती: मग का नाही धरत?
तो: हे काय नवीन?
ती: लग्न झालं म्हणजे या साध्या गोष्टी संपल्या?
तो: मी कुठे असं म्हणतोय? पण तू माझी बायको आहेस ते दाखवायची काय गरज आहे?
ती: पण मी म्हणते दाखवलं तर काय बिघडलं?
तो: माझं प्रेम आहे हे तुला दाखवायला ते चार चौघात कशाला सांगितलं पाहिजे? घरीही सांगता येतं !
ती:  पण समजा बाहेर हात धरला तर असं काय पाप लागतं? बायकोच आहे ना?
तो: तुझं ना? काहीही असतं? चार लोकांत हे असं वागणं शोभतं का?
ती: बरोबर. तुला माहितेय लग्नाआधी मीच नको म्हणायचे, कारण तेव्हा तू हक्काचा नव्हतास.पण हक्काच्या माणसाकडून हक्काचा हात मिळणं वेगळंच असतं. जाऊ दे तुला नाही कळणार.
तो: आणि या उलट 'आपलं माणूस आहे' हा स्टॅम्प लावायची गरज मला वाटत नाही. ते ज्याला कळायचं त्याला माहित असलं म्हणजे झालं. जाऊ दे तुला नाही कळणार.

दोघेही मुकाट्याने ताटात बघून जेवत राहिले. आज पुन्हा एकदा स्वप्नं आणि सत्याचं भांडण झालं होतं.


विद्या भुतकर.

Thursday, March 16, 2017

हसरं बाळ

        सकाळी जाग आली तसे निशाने पलीकडे घड्याळाकडे पाहिले. अलार्म चुकलाच होता. नवरा आणि बाळ दोघेही गाढ झोपलेले होते. ती हळूच उठून बाथरूममध्ये गेली आणि बाहेर आली तर झोपलेल्या विनयच्या बाजूला विहान इकडे तिकडे गंमत पहात लोळत पडला होता. तिला पाहिल्यावर तो आपलं बोळकं दाखवून हसला. त्याच्या मोठाल्या डोळ्यांत चमक आली. त्याच्या केवळ हसण्यानेही दिवस छान वाटतो हे तिला पुन्हा एकदा जाणवलं. 
तिनेही हसून,"ए ढमू उठलास होय? तरी किती हळू जायचं माणसानं? हां?" असं म्हणत त्याला हातात घेतलं. त्यानेही सकाळ सकाळी छान झोप झाल्याचं एक मोठठं हसू तिला दिलं. तिने त्याच्या वाढलेल्या कुरळ्या केसांच्या बटांमधून हात फिरवून त्याचे केस मागे घेतले आणि त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.
        तिच्याजवळ आल्यावर पुढे काय होणार हे त्याला माहीतच होतं. तिनेही मग गादीवर मांडी ठोकली आणि त्याला दूध पाजायला सुरुवात केली. त्यानेही घाईघाईने दूध प्यायला सुरुवात केली. 
त्याचे केस कुरवाळत तिने विचारलं,"इतकी भूक लागली होती होय?". 
        भुकेचा भर कमी झाल्यावर दूध पिता पिता तो हाताने तिच्या गळ्यापाशी चाचपडू लागला. तिनेही मग सवयीने गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या हातात दिलं त्याच्याशी चाळा करत करत तो दूध पिऊ लागला. त्याचं चालू आहे तोवर निशाने विनयकडे पाहिलं. रात्री उशीरपर्यंत आवरा आवर करत बसला होता. तिने हलकेच आपला हात त्याच्या छातीवर ठेवला, तसा विनय एकदम दचकून उठला.
"अरे झोप झोप. तुम्ही बाप लेक दोघं सारखेच. कणभरही आवाज नको तुम्हाला की स्पर्श. असली कसली झोप ती?", निशा वैतागली.
विनय डोळे चोळत उठून बसला आणि म्हणाला,"अगं, कामं आहेत अजून बरीच. रात्री जरा कुठं आवरून झालं बाहेरचं. अजून थोड्या खुर्च्या हव्यात आणि ती भाड्याने सांगितलेली भांडीही घेऊन यायचीत."
"मला माहितेय, तरी मी अलार्म लावला होता. कधी बंद केला कळलं पण नाही. याचं पिऊन झालं की मी पण आवरते.",निशाने सांगितले.
१५-२० मिनिटांनी तिने विहानला पाजायचं बंद केलं. "चला महाराज, बास आता."
विनयकडे पाहून म्हणाली,"अरे याचं फीडिंग बंद  केलं पाहिजे. वर्षाचा होत आला."
विनयने त्याला हातात घेत म्हटलं,"हो.... मोठठे झालो आता आम्ही. दूध भाता खाणार, भाजी पोळी खाणार...."
विहानने त्यालाही मोठठं बोळकं काढून दाखवलं.
निशा आपला गाऊन बंद करत उठली आणि बाथरुमकडे गेली, आज भरपूर कामं होती. जाताना वळून म्हणाली,"आता बाप लेक एकदम रात्रीच भेटाल म्हणजे मला?"
विनयने विचारलं,"म्हणजे?"
"म्हणजे, लोक असले की मला कोण ओळख देतंय? ना तू ना तुझा लेक."
तसा विनय हसला हातातल्या विहानकडे बघत म्हणाला,"मग काय? हसरं बाळ आहे आमचं ते..."
तिने मान हलवली आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला.
          अर्ध्या तासात सर्व आवरून निशा किचनमध्ये गेली. सासूबाईंना म्हणाली,"तुम्ही कधी उठला? मला उठवायचं ना? गजर कधी झाला कळलंच नाही. "
त्यावर त्या म्हणाल्या,"असू दे गं. मी रात्री लवकर झोपले होते. दिवसभर आहेच काम परत."
त्यांनी आंघोळ करून कुकर लावला होता. कणकेचे मोठे गोळे मळून ठेवले होते. तिने विचारलं,"मी काय करू?"
"बटाट्याच्या भाजीचा कांदा चिरतेस का?" तिने मान हलवली आणि ८-१० कांदे चिरायला घेतले. सासूबाईंनी मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व सामान गोळा करायला सुरुवात केली.
        आज त्यांची नुकतंच लग्न करून गेलेली मुलगी विशाखा, तिच्या सासरचे ८-१० लोक, दुसरी मुलगी, तिचे कुटुंबीय घरी येणार होते. लग्नाला महिना पालटून गेला होता. लग्नाच्या घाईतून सर्व जरा रिकामे झाल्याने पुन्हा हा भेटीचा कार्यक्रम ठरला होता. घरातली साफ सफाई वगैरे निशा आणि विनयने रात्रीच केली होती. दोन्ही मुलींच्या सासरचे येणार म्हणून सासूबाई जरा जास्तच काळजीत होत्या. सून आणि मुलगा मात्र जमेल तितकं काम करत होतेच.
        सासू सुना जोमाने स्वयंपाकाला लागल्या होत्या. विनय, सासरे बाहेरचं सामान आणायला गेले होते. स्वयंपाक चालू असताना विहानची लुडबुड चालू होतीच. तिनेही त्याला २-३ वाट्या, चमचे खेळायला दिले होते. पण त्यावर थोडेच त्याचं भागणार होतं. कपाटातल्या वस्तू, कांदे बटाटे सर्व बाहेर येत होतं. मध्ये दोन तीन वेळा पडलाही तो आणि थोडा रडलाही. तिने त्याला काम करता करताच काखेत धरून ठेवलं पण कामापुढे थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतंच. तोही वेडा लगेच रडू विसरून पुन्हा तेच खेळ खेळत होता. लवकरच सासरे घरी आले तसं तिने त्यांच्या हातात एका ताटलीत थोडे पोळीचे तुकडे त्याला भरवण्यासाठी दिले आणि पुन्हा ती कामाला लागली.
        थोरली विश्पला लवकरच आली. सोबत नवरा, सासू सासरे आणि दीड वर्षाचा मुलगा होता. लेक आली तसे सासूबाईंनी हातचे काम सोडून नातवाला हातात घेतले. पण नातू लगेच रडायला लागला. 
मुलीने समजावले,"अगं गाडीत झोपला होता ना? थोड्या वेळात येईल तुझ्याकडे."
थोडे नाराज होत सासूबाई पोळ्या लाटायला बसल्या. वर उभे राहून निशा एका बाजूला भाजी परतत होती तर एकीकडे पोळ्या भाजत होती. नणंदेने पुढे होऊन विहानला हातात घेतले. तोही गेला लगेच तिच्याकडे. 
"काय करतो रे लबाडा....?" म्हणत तिने मोठी पापी घेतली. त्याने पुन्हा आपलं बोळकं दाखवलं. तशी नणंद म्हणाली,"वहिनी दात नाही आले याला अजून? ऋषीला तर ७व्या-८व्या महिन्यांतच यायला लागले होते."
"हां विचारलं होतं मी डॉक्टरांना तर म्हणाले, 'होतं असं. थोडे पुढे मागे झाले तरी चालते.'" निशाने तिला सांगितलं.
"पण बरंय, त्यामुळेच याची तब्येत अशी छान आहे. नाहीतर ऋषी बघा, किती खायला दिलं तरी तसाच. लवकर दात यायला लागले आणि तब्येत उतरली.",नणंद म्हणाली. तिने सासऱ्यांच्या हातातली ताटली घेऊन विहानला भरवायला सुरुवात केली. बोलत बोलत त्याची एक पोळी सम्पलीही.
"चांगलं आहे हो, दात नसूनही त्याने पोळी संपवली?" ताटली ओट्यावर ठेवत नणंद म्हणाली.
'आपल्या पोराला उगाच ही बाई दृष्ट लावतेय' वाटून निशाने मान फिरवली.. क्षणभर तिला विहानचा रागच आला. त्याला काय सारखं दिसेल त्याला बघून दात काढायचे असतात? आणि त्यात आवर्जून खाऊही खायचा? काय गरज असते त्याला?
पण पाहिलं तर तो पुन्हा आपल्या उचापत्या करायला पळून गेला होता. ढुंगण मागे काढत स्वतःला सावरत दुडूदुडू धावणाऱ्या पाठमोऱ्या विहानला पाहून तिला त्याला एकदम हातात उचलून घ्यायचा मोह झाला. पण काय करणार? काम होतं. निशा त्याच्याकडे पहात पुन्हा पोळ्या भाजू लागली.
         उरलेले सर्व पाहुणे आले. ताटं वाढली गेली. विनय आणि सासरेही आग्रहाने सर्वांना वाढत होते. निशा आत बाहेर करत हवे नको ते पहात होती. मधेच तिने विचारलं,'विहान कुठेय?' तर तो नव्या जावयाच्या मांडीवर बसून त्याच्याशी खेळत होता. 
मधेच मोठी नणंद येऊन म्हणाली,"वहिनी जरा वरण भात देता का एका ताटात? ऋषीने काहीच खाल्लं नाहीये मघापासून." 
निशाने तिला ताट आणून दिलं. नणंदेच्या पदराला लटकलेला ऋषी तिला दिसला. तिने घ्यायचा प्रयत्न केला पण तो काही कुणाकडे जात नव्हता. त्याची कुरकुर चालूच होती. किचनच्या एका कोपऱ्यात बसून तिने ऋषीला मागे लागून एकेक घास भरवायला सुरुवात केली आणि निशाला 'आपल्या पोराला अनेक वर्ष पाहिलं नाहीये' असं वाटलं. भाजी वाढायला म्हणून बाहेर गेली तर तो आता जावयाच्या मांडीवर बसून त्याच्या ताटातलं श्रीखंड खात होता. ती समोर आली तसा हसलाही.
तिने विचारलं,"घेऊ का?"
तसे जावईबापू म्हणाले,"मस्त खेळतोय तो माझ्यासोबत. असू दे."
आता तेच असे म्हटल्यावर काय करणार? ती मुकाट्याने निघून गेली. मनातल्या मनात हसणाऱ्या विहानला तिने एक चिमटा देखील काढला. निदान रडला म्हणून तरी माझ्याकडे येईल या विचाराने.
आत आली तर नणंद म्हणाली,"बरंय वहिनी तुम्हाला विहानकडे बघायला लागत नाही. नाहीतर हा.. सारखा मला चिकटलेला."
तिला वाटलं पटकन बोलून टाकावं,'उलट तुमचंच बरं आहे, तुमच्याजवळ तरी आहे, मला तर पोराला बघायलाही मिळालं नाहीये'. 
पण ती गप्प बसली.
       पाहुण्यांची जेवणं उरकली तेव्हांच ३ वाजून गेले होते. सासूबाई जेवायला बसू लागल्या. निशा 'येतेच' म्हणून बाहेर गेली.  पुन्हा एकदा विहानला शोधलं आणि त्याला मांडीवर घेऊन जेवायला बसली. पण त्याचं आईकडे लक्ष कुठे होते? तो ताटातल्या वाटीत हात घालू लागला तसे विनय म्हणाला,"थांब मी बघतो त्याला. तुम्ही नीट जेवण करून घ्या."
तिने नाईलाजाने त्याला विनयकडे दिले आणि म्हणाली,"तो प्याला नाहीये अजून. मी घेते त्याला जेवले की.. झोपवू नको त्याला."
तो,"अगं, आता तूच म्हणतेस ना बंद करायचे आहे? मग कशाला? मी झोपवतो त्याला. त्याने खाल्ले आहे आमच्यासोबत. तू जेव."
        ती मग नणंदा, त्यांच्या सासूबाई, संपली सासू या सर्वांशी गप्पा मारत जेवली. 
नंदेने विचारलेच,"वहिनी अजून बंद नाही झालं फीडिंग?". 
ती नाईलाजाने बोलली,"नाही अजून, जमतंच नाहीये. रात्री रडतोच."
नंणद म्हणाली,"ते होणारच. पण करायला लागेलच ना?"
       ती गप्प बसली. करायला तर लागणारंच होतं. भांडी, किचन आवरून निशा बेडरूममध्ये आली तर बेडवर दोन्ही बाजूनी उशा लावून विहान गाढ झोपला होता. आपल्याशिवायच तो झोपला म्हणून तिला कसंसं झालं. दोन क्षण त्याला पाहून ती पुनः पाहुण्यांशी बोलायला निघून गेली. नाही म्हणता म्हणता चहा पाणी करून सर्वाना निघायला संध्याकाळ होऊन गेली. जाता जाता प्रत्येक पाहुण्यांनी विहानला हातात उचलून घेतलं, त्याची पापी घेऊन त्याच्या हातात ऐपतीप्रमाणे एकेक नोटही टिकवली. पाहुणे गेल्यावर घर एकदम रिकामं झालं आणि मागे राहिली ती विहानची गडबड आणि बडबड. गप्पा मारत सगळेच त्याच्याकडे पहात बसले. 
"किती धडपड याची? सगळ्यांकडे राहिला, नाही?" सासूबाईं कौतुकाने म्हणाल्या. 
"हो ना, मी घ्यायला गेलो तर भाऊजींकडून यायलाच तयार नाही?", विनय पुढे बोलला. 
"कसा त्यांच्या मांडीवर बसून त्यांच्याच ताटातून त्यांच्या हातून जेवला.", सासूबाई बोलल्या. ती सर्वांचे बोलणे ऐकत चालत फिरत राहणाऱ्या विहानकडे कौतुकाने बघत राहिली. सासूबाईंनी पटकन जाऊन मीठ आणलं आणि नातवाची दृष्ट काढली अगदी सगळी सगळी बोटं मोडली. 
रात्र झाली तसे निशाला मात्र तिला राहवेना. जरा घाईनेच विहानला घेऊन बेडरूम मध्ये आली. सकाळपासून त्याला दूध न दिल्याने तिची छाती भरून आली होती. तिला आता दुखायला लागलं होतं. त्याला दूध देणे हा तिच्यासाठी आता नाईलाज होता. त्यात हा असा खेळकर पोरगा अजूनही गोड  गोड हसून खेळत होता. गादीवर ती बसल्यावर मात्र विहानला आईची आठवण झाली. तिच्याकडे येऊन आपले इतकुसे हात घेऊन तो तिच्या गळ्यात पडला. 
"इतका वेळ आईची आठवण नाही का आली?", ती रागानेच त्याला बोलली. त्यावरही त्याने आईला खळखळून हसून दाखवलं. मग भरल्या डोळ्यांनीच तिने त्याला दूध पाजायला घेतलं. 
        त्यानेही इतक्या वेळाने मिळालेला तो पान्हा घाईघाईने प्यायला सुरुवात केली. तिला राहून राहून रडू येत होतं. त्याच्या केसांत हात घालून ती त्याला गोंजारत होती आणि तोही तिच्या मंगळसूत्राशी चाळा करत दूध पीत होता. 
विनय आत आला तर त्याला कळेना ही रडतेय का? 
तो म्हणाला," अगं वेडाबाई रडतेस काय? तो हट्ट करत होता का प्यायला?"
तिने नाकारत मान हलवली. 
"मग?", विनय, "मग रडतेस का?" 
"सकाळपासून याला आईची आठवण आहे का बघ की?", ती रडत बोलली. 
"अगं पण त्यात इतकं रडण्यासारखं काय आहे?", त्याने विचारलं. 
"तुला नाही कळणार ते?", ती. 
"मग समजावून सांग ना?" तो हट्टाने म्हणाला. 
"अरे, विहान मोठा होतोय तसा तो आपल्या पायावर उभा राहील, स्वतः सर्व करेल."
"अगं पण त्याला अनेक वर्ष आहेत." विनय बोलला. 
"हो ना. पण आज हे असं त्याला दूध पाजण्यात जे आईपण आहे ती जवळीक कशी मिळणार परत? मी किती विचार करतेय बंद करायचं आहे. पण रात्र होत आली की जीव राहात नाही. आज त्याला लोकांशी खेळताना पाहिलं, जेवताना अगदी झोपताना पाहिलं तेंव्हा वाटलं तो मला सोडून किती सहज राहू शकतो. त्यात तो इतका हसरा मग काय? असाही सगळ्यांकडे राहतो. हे चार क्षणच काय ते फक्त माझे. आम्हाला दोघांना ही अशी जवळीक परत कधी मिळणार आहे? पण तरीही हे मला बंद करावंच लागणार आहे ना? आज ना उद्या? तो पुढे निघून जाईल आणि मी मात्र आई म्हणून इथेच असेन त्याला उराशी धरून. जन्माला तेंव्हा नाळ तोडताना इतका त्रास नाही झाला रे जितका यावेळी होईल." तिला रडू अनावर झालं होतं. दूध पिऊन समाधानाने झोपलेल्या आपल्या बाळाला तिने पुन्हा एकदा पाहिलं मनभरून आणि त्याला बराच वेळ तशीच धरून बसली.

विद्या भुतकर. 
          
      

Thursday, March 09, 2017

मावशी ती मावशीच असते

       मागच्या वर्षी भारतात जाताना एक काळजी होती,'मावशी' झाल्याची. आता यात काळजी करण्यासारखं काय ते पुढे कळेलच. पण मावशी म्हटलं की मला आमची मावशी आठवते. आई आणि मावशी या पाच भावानंतरच्या दोन मुली, त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक होती आणि आजही आहे. दोघीही बहिणी,'आपल्याला आईने जावई कसे अगदी सारखे शोधून दिले आहेत' म्हणत अजूनही नवऱ्यांच्या गोष्टी एकमेकींना सांगत बसतात. आई धाकटी, त्यामुळे मावशींमध्ये असलेला समंजसपणा तो आम्हालाही कायम दिसत राहिला , अजूनही दिसतो. 
       तर आम्ही लहान असताना वर्षातून एकदाच जाणं व्हायचं आजोळी, तिथेच मावशीही जवळच राहायची त्यामुळे सर्वांना भेटून व्हायचं मावशीकडून निघताना, रिक्षा पकडायला, बसटॉपवर येताना ती रस्त्यांत कोपऱ्यावरच्या बेकरीत थांबून आमच्यासाठी नानकटाईची बिस्किटं घेऊन द्यायची. त्याकाळी ती पर्वणीच होती. अशा मावशीकडे असल्याच्या अनेक आठवणी आहेत त्यातली ही पहिली. पुढे मी कॉलेजला तिकडेच राहायला गेले आणि बरेच वेळा शनिवारी-रविवारी खूप कंटाळा आला रूमवर की मावशीकडे जायचे. मावशीच्या हातचा चहा, साबुदाण्याची खिचडी, अजून बरंच काही आवडीने खायचे. अगदी एका आंब्याच्या सीझनमध्ये माझ्यासाठी आठवणीने आंबे आणले होते आणि लपवून ठेवले होते. मी वासाने बेजार. शोधून मिळेनात. सगळ्यांनी हसून घेतलं. पण शेवटी आमरस खाऊनच रूमवर गेले. 
       तर हे असे अनेक लाड, हौस मावशीकडे पुरवली गेली, ज्या परिस्थितीत, जशी जमेल तशी. त्याचसोबत हक्काने रागवलीही. एकदा कॉलेजमध्ये असताना एक मुव्ही आधी पाहून आले होते. मैत्रीण विचारायला आली म्हणून पुन्हा गेले. मावशीने नाही म्हटले होते जायला पण तरी गेले. परत आल्यावर रागावलेली मावशी पाहून भीती वाटली आणि अजूनही तो प्रसंग विसरणार नाही, कारण अशा अजून २-३ वेळाच ती माझ्यावर चिडली असेल. कॅम्पस मधून नोकरी लागली तेंव्हाही किती उत्साहाने भेटायला गेले होते. प्रत्येक परीक्षेत टेन्शन आले की तिच्याकडे जाऊन बसायचे रूमवरन. तर अशी आमची मावशी लाड पुरवणारी आणि रागावणारीही, परीक्षेत धीर देणारी. 
     पुढे माझी मुलं झाली तेंव्हा दोन्ही बहिणी मावशा झाल्या. सानूचे खाणे-पिणे, आजारपण, लाड सर्व पुरवलं त्यांनी आधी वाटायचं तिचे इतके लाड करतात तर स्वनिकला स्वीकारतील का? पण त्यालाही भेटल्या आणि त्याला एकदम आपलंस केलं. दोघांनाही त्यांच्याकडे देऊन मी अनेकवेळा बाहेर गेले आहे. त्यांच्यासोबत पोरांना सोडून एकदम बिनधास्त व्हायला होतं. सानू ६-७ वर्षाची होईपर्यंत घरात ही दोनच मुलं, मावशी मामाकडून लाड करवून घेणारी, पण त्याचसोबत कधी त्यांचं चुकलं तर रागावणारी. आम्ही इथे असतानाही त्यांच्याची बोलणारी मावशी. 
      गेल्या वर्षी मी मावशी झाले, मोठी मावशी. मी अमेरिकेत असल्याने बाळाला भेटायच्या वेळेपर्यंत ते एक वर्षाचं झालं. आम्ही दोघीही सुट्टीला भारतात गेल्यावर भेट होणार होती. वाटलं, आपल्या मावशीने जे प्रेम दिलं, माझ्या मुलांना त्यांच्या मावशांनी जे प्रेम दिलंय तसं आपल्याला देता येईल का? विशेषत: स्वतःची मुले असल्यावर त्याची तुलना त्यांच्याशी होईल का असे अनेक प्रश्न मनात होते. त्या मुलाचे मनसोक्त लाड करता येतील का असे वाटत होते. की आपल्या मुलांसारखे त्यालाही वळण लावण्याचा प्रयत्न करू? असे अनेक विचार करत आमची भेट झाली. 
      बाबू,म्हणजे भाचा आजारी पडला होता भारतात येताना त्यामुळे तो कुणालाच हात लावू देत नव्हता आणि आईला तर सोडतही नव्हता. पण मी गेले आणि त्याला घेतलं तर एकदम लगेच माझ्याकडे आला. आणि पुढचे दोन दिवस मला चिकटून राहिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले कसा काय माझ्याकडे गेला म्हणून. मीही छोट्या बहिणीला चिडवत राहिले की बघ तुझ्याकडे येत नाहीये पण माझ्याकडे आलाय. मग पुढे त्याला झोपवायचा प्रयत्न करणे, किंवा त्याला नुसते हातात धरून बसणे, त्याला बरं वाटावं म्हणून काही उपाय करणे किंवा खेळवणे यात मनातल्या सर्व शंका पळून गेल्या होत्या. त्यानंतर प्रत्येकवेळी भेटल्यावर तितक्याच लाडाने तो माझ्याकडे आला, राहिला आणि मलाही त्याला धरून बसावसं वाटत राहिलं. एक दिवस बहीण त्याला घरी सोडून बाहेरही जाऊन आली. 
          हे सगळं इतक्या सहजपणे झालं. जमेल की नाही अशा अनेक शंका मनात घेऊन बसले होते त्या किती सहजपणे दूर झाल्या. मी माझ्या मावशीच्या भूमिकेत नकळत शिरून गेले होते स्वतःलाही न जाणवता. भारतात असताना सर्वजण समोर असताना ही नाती सहजपणे अनुभवता येतात. पण हे असे वेगवेगळ्या देशात असताना अशी प्रेमाची नाती इतक्या दूर असतात, मग त्यात आपल्या मनात शंका येणं मला स्वाभाविक वाटतं. पण शेवटी मावशी ती मावशीच असते. तिचं प्रेम बहुतेक आईसारखंच आपोआप येत असावं.  

विद्या भुतकर.


Wednesday, March 08, 2017

आधीच भरलं वांगं त्यात थालीपीठ

       शीर्षक वाचून काय काय विचार केले असतील माहित नाही. भरलं वांगं हेच मुळात इतक्या लोकांचं आवडतं आहे आणि थालीपीठही. आजची ही पोस्ट आहे भरल्या वांग्याच्या थालीपीठाची. घरी अजूनही आई कधी कधी शिल्लक राहिलेल्या वांग्यांची, दोडक्याच्या भाजीची कधी आमटीची भाकरी करते. भाकरीच्या पिठात ती राहिलेली थोडीशी भाजी, तिखट, कांदा, कोथिंबीर घालून मोठ्या भाकरी थापते. आम्ही घरी असताना आवडीने अशा भाकरी खायचो त्यावर भरपूर तूप किंवा लोणी घेऊन. इथे माझ्याकडे भाकरीचे पीठ नियमित नसते, जे थोडंफार भारतातून आणते ते संपून जातं. घरून आणलेलं भाजणीचं पीठ मात्र मी फ्रिजर मध्ये ठेवून पुरवून वापरते. आता भाजणीचं पीठ पुरण्यास मुख्य कारण म्हणजे मी प्रत्येक वेळी थालीपीठ करताना भाजणीच्या पिठात थोडी कणिक, तांदळाचं पीठ, बेसन अशी भर घालून मळते त्यामुळे ते थोडे जास्त दिवस पुरतं.
       तर एकूण काय की मला अशा मसाल्याच्या भाजीच्या भाकरी करता नाही आल्या तरी थालीपीठ मात्र नक्की करते. कालच वांगी करताना थोडा जास्त रस ठेवला होता. भाजीही आज सकाळी डब्यात न नेता फ्रिज मध्ये ठेवली होती संध्याकाळी थालीपीठ करायची म्हणून. आज ती बनवताना आठवणीने थोडे फोटो काढून घेतलेत. कदाचित अनेक जणी करतही असतील. आजच एका मैत्रिणीशी बोलताना लक्षात आले की ती तव्यावरच थापते. माझ्या सासूबाईही तव्यावरच थापतात. त्यामुळे गरम तवा थोडा थंड करून करेपर्यंत बराच वेळ जातो. इथे मी फोटो इन्वा व्हिडीओ मध्ये आई करते तसे कापडावर थापून तव्यात टाकायची कृती देत आहे. सुरुवातीला थोडे हळू होते पण एकदा हात बसला की एकावेळी दोन तव्यात थालीपीठे पटापट होतात.

साहित्य: शिळी शिल्लक राहिलेली मसाल्याची भाजी,
एक बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर चिरून, धणे-जिरे पूड, मीठ, हळद, हिंग, १ चमचा तिखट,४ चमचे तीळ, भाजणीचे पीठ(भाजीत मावेल इतपत, साधारण एक वाटी भाजीमध्ये २ वाट्या पीठ मावते).
कृती: भाजी पूर्णपणे चुरून पिठात आधी मिस्क करून घ्यावी.
पीठ कोरडे असतानाच त्यात हळद, तिखट, हिंग, मीठ, तीळ, कांदा, कोथिंबीर, धणे-जिरेपूड सर्व साहित्य कालवून घ्यावे.
एका वाटीत थोडे गरम पाणी घेऊन पिठात लागेल तसे घालून पीठ मळून घ्यावे. (मी सर्व पीठ पातळ करत नाही. सर्व पीठ घट्ट मळून घेते आणि लागेल तसे प्रत्येक गोळा थापताना त्यात पाणी घालते.)
गॅसवर तवा किंवा जाड बुडाचा पॅन ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
एका ताटात एक रुमाल किंवा सुती कापड ओले करून पसरून घ्यावे. ( माझ्याकडे सध्या रुमाल नसल्याने मी जाडजूड टीशू पेपर आहेत बाऊंटी ब्रँड चे ते दुहेरी करून वापरते. ८ थालीपिठांना टिकतात. )
कणकेचा गोळा थोडे पाणी लावून त्या रुमालावर हातानं थापून पसरवावा. चार ठिकाणी भोके पाडून पुन्हा एकदा त्या थापलेल्या  थालीपिठावर पाणी मारून रुमाल ओला करून घ्यावा. (याने थालीपीठ रुमालावरून अलगद सुटून येते तव्यात.
रुमाल दोन्ही टोकांना धरून थालीपीठ तव्यात पालथे करावे. थोडा झटका दिल्यावर ते सहजपणे तव्यात उतरते.
एकदा ते तव्यात पडले की मग दोनीही बाजूला तेल लावून खरपूस भाजून घ्यावे.
थोडे शिजण्यासाठी वरून झाकण ठेवले मिनिटभर, तरी चालते.  तेलावर परतून गेल्याने जास्त तेल वापरले जात नाही(आई तळूनही करते, ती चांगली लागतात पण तेल खूप खातात . )
दही, शेंगदाण्याची चटणी, थालीपिठावर भरपूर तूप घेऊन खायला मजा येते. सोबत लोणचं असेल आंब्याचं तर उत्तमच. :)

कधी कधी मसाल्याची भाजी दोन वेळा खायचा कंटाळा येतो. अशावेळी त्या भाजीची थोडी चव, भाजणीच्या पिठाचा खमंग वास, कांदा-कोथिंबिरीची चव, दाताखाली येणारे तीळ हे सर्व एकदम जमून येतं आणि जेवण एकदम झकास होतं मग. आधीच भरलं वांगं त्यात त्याचं थालीपीठ, मग काय? आजचा बेतही तसाच झाला. तुम्हीही करून बघा नक्की.
























विद्या भुतकर.

Tuesday, March 07, 2017

छोट्यांसाठी छोटे निर्णय

       मागच्या आठवड्यात डिस्नेच्या आईस स्केटिंग इव्हेंटला मुलांना घेऊन गेलो होतो. छान होता शो, विशेष करून दोघेही स्केटिंग शिकत असल्याने अजून पुढे काय शिकता येईल हे दाखवायला चांगले होते. तिकीट तसे महाग होते पण मागच्या सीट घेतल्या. तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे खाण्याचे पदार्थ, पाणी हे सर्व ४ पट किमतीचे होतेच. अनेकदा अशा ठिकाणी उगाच चिडचिड झाल्याने आता अशा गोष्टींचा त्रास कमी करायचा हे ठरवून गेलेले. बेसिक खाण्याचे आणि पाणी घेऊन शो ला गेलो. मुलांना सर्व आवडले. नेहमीप्रमाणेच तिथे असलेल्या खेळण्यांच्या स्टॉलवरून काहीतरी घेण्याचा हट्ट त्यांनी केलाही. ज्याची किंमत योग्य वाटली ते घेतलेही. स्वनिकला तिथे एक खेळणे आवडले जे आम्हाला जरा जास्तच महाग वाटत होते. तरी मी त्याचा हट्ट म्हणून लाईन मध्ये उभी राहून तिथे गेली. पण शेवटी इतके पैसे घालून ते घेण्याची इच्छा झाली नाही आणि हिम्मतही. सर्व शो चांगला होऊनही स्वनिक नाराज होऊन घरी आला.  आता एक आई म्हणून त्यांनी त्या शोबद्दल खुश व्हावे अशी आमची इच्छा असणारच. पण ती काही पूर्ण झाली नाही.
       खूप चिडचिड होते अशा अनेक ठिकाणी जिथे तुमच्या मुलांच्या हट्टाचा वापर त्या वस्तू घेण्यासाठी केला जातो आणि तेही अव्वाच्या सव्वा दर लावून. डिस्ने तर या बाबतीत नंबर एक वर असेल. असो. आपल्याला जे अनुभवता आलं नाही ते मुलांना मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. पण शेवटी आई-बाप म्हणून किती पिळवणूक व्हावी याला काही मर्यादा? यातील काही वस्तू घेऊन देऊही शकतो. कुणाला वाटेल,'This is a good problem to have'. पण ते तितकं सोप्प नाहीये. मी किंवा नवरा लहान असताना घरची परिस्थिती वेगळी होती शिवाय पैशाची किंमत जरा जास्तच समजावलेली होती आणि वेळप्रसंगी समजलीही होती. त्यामुळे तेच संस्कार मुलांनाही देता यावेत अशी धडपड नेहमी चालू असते.  मी आणि संदीपने बरेच प्रयत्न केले त्यादिवशी स्वनिकला समजवण्याचे पण त्याने ऐकले नाही. त्यादिवशी आम्ही नाराज झालो तरीही खरा आनंद पुढच्या वेळी त्यांना आईस स्केटिंग घेऊन गेल्यावर झाला. स्वनिक स्वतःहून म्हणाला की 'तो शो पहिला त्यामुळे मला आज स्केटिंगला जायची जास्त इच्छा होत आहे'. त्याचं हे वाक्य ऐकून मला आपल्या त्यादिवशीच्या निर्णयाचाही आनंद झाला. 
      
        तर आज काल असे अनेक प्रसंग येतात जिथे आम्हाला सारखे त्या त्या वेळी योग्य-अयोग्य ठरवावे लागते. उदा: बाहेर गेलेले असताना दुकानांमध्ये अनेक ठिकाणी चॉकलेट, गोळ्या, चिप्स, बिस्किटे इत्यादी समोर ठेवलेले असते. तिथे त्यांना काही मागण्यापासून, हट्ट करण्यापासून परावृत्त करणे हे तर कठीणच, शिवाय त्यांनी हट्ट केल्यावर तिथेच स्पष्टपणे 'नाही' म्हणून सांगून टाकणे, मग रडारड हे अजून अवघड. अगदी 'त्याच्या हातात अख्खा बिस्किटाचा पुडा आहे तर मला का नाही?' असे प्रश्नही येतात. असे प्रसंग येतातच. स्वनिकच्या बाबतीत तर असेही झाले आहे की तो म्हणतो,'माझ्या मित्राला फक्त चिकन नगेट्स असतात डब्यात रोज, मग मी का रोज वेगळं जेवण न्यायचं आणि संपवायचं? '. बरीच मुले डबा अर्धवट खाऊन उरलेला टाकून मोकळी होतात. अशावेळी त्याला तू स्वतःचा डबा पूर्ण संपव असा आग्रह किती दिवस टिकणार?
        बरं खेळण्यांच्या बाबतीतही तेच. मुलांकडे, मित्र-मैत्रिणींकडे अनेक महागडी खेळणी त्यांना दिसतात आणि तसेच एखादे घ्यावे म्हणून आग्रह करतात. अशा वेळी वाटते की प्रत्येक दिवस म्हणजे एक लढाई आहे. आणि ती लढाई किती दिवस लढाईची? बरं, समजा मुलांच्या चांगल्यासाठी ते केलंही, पण मग लाड पुरवणे आणि वळण लावणे यातली 'डॉटेड लाईन' कशी ओळखायची?
        आज अनेक वर्षात पहिल्यांदा मी दोघांसाठी व्हेंडिंग मशिनमधून चिप्स घेतले तर त्यांना कोण आनंद झाला. स्वनिकने दोनदा मिठी मारली. तसं पाहिलं तर १$ च्या आतली ती वस्तू पण 'घ्यायची नाही' हे त्यांना अनेकदा सांगितलं आहे. अशावेळी कधीतरी ती मिळाल्यावर होणार आनंद जो असतो तो खूप जास्त महत्वाचा वाटला. रोजच किंवा नियमित जर तेच त्यांना मिळाले तर त्याची किंमतही राहणार नाही असे वाटते. किंवा कधी कधी जेव्हा सान्वी माझी वांग्याची भाजी, तूप मीठ भात चवीने खाते तेंव्हा असं वाटतं आपण केलेला आग्रह योग्य होता. 
        मध्ये सानूच्या शाळेत एका कार्यक्रमात तिने सहभाग घेऊन घरी बनवलेल्या काही वस्तू तिने विकल्या. लोकांना वस्तू नको असतील तर ते कसे आपल्यासमोरून न बोलता निघून जातात असा वाईट अनुभव तिला त्या दिवशी आला. ते पाहताना वाईट वाटलं. पण तिला तो एक महत्वाचा धडा मिळाला त्यादिवशी. प्रोत्साहन म्हणून तिला १० डॉलर दिले. तिनेही मग नीट विचार करून, २-४ दुकाने फिरून आधी खेळणी पाहिली आणि एक ६ डॉलरचे सॉफ्ट टॉय आणि ४ डॉलरचे एक छोटे खेळणे घेतले. ती ते घेत असताना तिला दिसत होतं की 'अजून थोडे पैसे असते तर मी हे मोठं खेळणं घेऊ शकले असते'. तिचा चेहरा बघून वाटत होते की घेऊ द्यावे का पण तिनेही जास्त आग्रह न करता त्याच पैशात मिळेल ते घेतले. शिवाय 'स्वनिक रडत आहे तर मी त्याच्यासाठीही काहीतरी घेते म्हणाली'. तिचे ते बोलणे ऐकून एकदम भरून आल्यासारखं झालं. आपण इतके दिवस जे शिकवत आहोत ते योग्य आहे असं वाटलं. हे असे प्रसंग दुर्मिळच पण अनमोल.
         मी आणि नवरा दोघेही अनेकवेळा वेगवेगळ्या कार्यक्रमात गेलो की मदत करण्याचा, निदान फोटो काढण्याचा, कधी कुणाच्या मुलांना सांभाळण्याचा किंवा जेवायला वाढण्यात जमेल तशी मदत करत असतो. आपल्या मुलाला घेऊन त्याचेच बघत बसणे आम्हांला दोघांनाही जमले नाहीये. मुलं लहान असताना अनेकवेळा वाटायचं की आपण पण तसं करावं का? पण ते जमलं नाही. आणि खरं सांगायचं तर त्यामुळे मुले बरीच सोशल झाली. कार्यक्रमात आम्हालाच चिकटून राहिली नाहीत. आजकाल आम्ही कुठे गेल्यावर सान्वी लहान मुलांना आनंदाने खेळवते. मागच्या पार्टीत डेकोरेशन करताना स्वनिकने येऊन विचारले की 'मी काही मदत करू का?' आणि मग एकेक करून तो आम्हाला वस्तू देत राहिला. हे सगळं त्यांना करताना पाहून आता खूप आनंद होतो. 
         आता ही पोस्ट केवळ मुलांचे कौतुक करण्यासाठी लिहीत नाहीये, आणि समजा केलं कौतुक आपल्या मुलाचं कधीतरी तर काय हरकत आहे नाही का? :) असो. तर मुद्दा असा, ही पोस्ट म्हणजे माझे विचार एकसलग मांडण्याचा प्रयत्न आहे. अनेकवेळा अजूनही आम्हाला छोटे मोठे निर्णय घेताना आपण चूक करत आहोत की नाही अशा शंका येतात. कधी वाटतं शॉर्टकट मारावा, घेऊ द्यावा मुलांना फोन कार्यक्रम चालू असताना आणि आपणही निवांत गप्पा मैत्रिणीशी माराव्यात. पण ही पोस्ट लिहिताना जाणवत गेलं की अशा अनेकवेळी घेतलेले ते छोटे निर्णय तेव्हा त्रासदायक वाटले तरी नंतर कधीतरी त्यातून आनंद मिळाला आहे. 
        तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर नक्की सांगा. या पोस्टमध्ये काही गोष्टीबाबत सूचना असतील तर त्याही सांगा. आई-वडील म्हणून त्या आम्हाला उपयुक्तच असतील. :) 

विद्या भुतकर.
       

Thursday, March 02, 2017

आनेवाला पल जानेवाला है.....

        गेल्या वर्षभरापासून रात्री उशिरा घरी परतताना हमखास जुनी गाणी ऑनलाईन रेडिओवर लावून ड्राइव्ह करत घरी येतो. त्यात दोन गोष्टी होतात, मुलं हमखास झोपून जातात आणि आमचे मनोरंजनही होते. रेडिओवरची ही जुनी गाणी म्हणजे वर्तमान कमी आणि भूतकाळात जास्त घेऊन जाणारी. अभ्यास करत, सांगली, पुणे स्टेशन आणि मग विविधभारती ऐकत रात्रीचे ११.२० व्हायचे. लगेचच मग यावरून झोपायचो. असेच लहानपणी एक महत्वाचा शोध मला लहानपणी विविधभारतीवर गाणी ऐकताना झालेला. मी आईला म्हटले,'किती बोअर आहे, सारखे बाईचा नाहीतर माणसाचा आवाज असतो त्या गाण्यांत?'. आई म्हणाली,"मग कुणाचा असणार?".. मग मी मनातल्या मनात सर्व लोकांचे 'बाई' आणि 'माणूस' असे वर्गीकरण करून पहिले आणि ते बरोबर झाले. तेंव्हापासून डोक्यातुन तो शोध गेला नाही. 
      मग पुढे त्याच 'बाई' आणि 'माणूस' आवाजात फरक समजायला लागला. हळूहळू 'मुकेश','हेमंत कुमार','मन्ना डे','रफी' हे आवाज जाणवू लागले. आईचं आवडतं गाणं कुठलं, दादांचं कुठलं हे कळायला लागलं. 'सुहानी शाम ढल चुकी...' आवडायला लागलं. बाईंमध्ये मात्र 'लता' किंवा 'आशा' असे दोनच ऑप्शन असायचे. मग एखाद्याचा आवाज ओळखायची सवय लागली. पुढे शब्द आले. त्यांनी मात्र जे मनाला घेरलं ते अजूनही सुटत नाहीये. विचार केला तर मी एका छोट्या मराठी गावात वाढले. तिथे हिंदी शिकले ते ३ वर्ष फक्त, ८ वी नंतर संस्कृत. चित्रपट दूरदर्शनवर पाहिले आठवड्यातून एक फारतर दीड(लाईट असेल, अभ्यास झाला असेल, शिकवणी नसेल आणि आई-दादा हो म्हणाले तर). अशावेळी त्या हिंदी गाण्यांचे शब्द, अर्थ समजणे हे मोठं आश्चर्यच वाटतं मला. 
       त्याचं श्रेय त्या काळच्या हिंदी गाण्यांतील समजणाऱ्या शब्दांना आहे असं वाटतं. किती साधे शब्द पण अर्थपूर्ण. 'जिंदगी की यही रीत है.... हार के बाद ही जीत है'. परवाच मी संदीपला असेच गाणी ऐकताना म्हटलं, या गाण्यातील जे त्रिकालाबाधित सत्य वाक्य आहेत ना ती एकदा लिहून ठेवली पाहिजेत. म्हणजे कितीही काळ बदलला तरी ते सत्य बदलणार नाही. उदा:'आनेवाला पल जानेवाला है....','कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है केहना', 'इक दिन बिक जायेगा माटी के मोल', अशी अनेक वाक्यं. ती गाणी ऐकली की वाटतं हे तर आपल्या मुलांनाही कळलं पाहिजे. 
        मग काही गाणी ज्यांनी प्रेमाच्या प्रेमात पाडलं.. जेव्हा आयुष्यात अभ्यास, शाळा, घर इतकेच होते, तेव्हाही प्रेम म्हणजे काय असेल असा विचार करायला लावणारी गाणी. 'जब दीप जले आना...', 'जानेमन, जानेमन तेरे दो नयन..','है अगर दुष्मन..दुष्मन जमाना गम नहीं.. ','कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है..','अखियों के झरोको से मैने देखा जो सावरे..'. अशी अनेक गाणी. रेडिओवर या गाण्यांना ऐकण्याचा जणू छंदच जडला. त्यातले शब्द, प्रेम, गंमत हे अगदी सहजपणे कळत गेलं. त्यात कुठेही धावपळ नाही, घाई नाही आणि बाकी सर्वांसोबत गोड आवाजही. अजून काय हवं होतं? मला वाटतं माझ्या कवितांमध्येही त्यांचाच प्रभाव असणार आहे. कारण काव्य अवघडच असलं पाहिजे असा अट्टाहास या गाण्यांत कुठेही नव्हता. अगदी सहजपणे बोलता यावं, सांगता यावं असं काव्य ऐकलं आणि तसंच लिहिलं गेलं.मग पुढे गुलजार ऐकला, जगजीत अनुभवला आणि त्या गाण्यांवरचं प्रेम अजून गहिरं होत गेलं. तेही कधी कवितेत उतरलं. 
        बरेच दिवस झाले याबद्दल लिहायची इच्छा होती पण राहून जात होते. आजही जी हिंदी गाणी लागतात ती मला आवडतात, काही कानठळ्या बसवणारी असतात काही अगदीच निरर्थक, जसे आजकाल 'तम्मा तम्मा लोगे' चालू आहे. ती ऐकून सोडून दिली जातात . पण एके काळी मला ही जुनी गाणी ऐकायची संधी मिळाली, अनुभवली, आणि आयुष्यभर ती सोबत राहतील हा एक मोठा खजिना आहे माझ्यासाठी. आणि हे मी कधीही विसरणार नाही. 

विद्या भुतकर. 

Wednesday, March 01, 2017

बटाट्याच्या काचऱ्या

       गेले काही दिवस झाले मुलगी म्हणत होती की मला बटाट्याची सुकी भाजी खायचीय, आजी करते तशी. दोनेक वर्षांपूर्वी कधीतरी खाल्ली असेल तिने आईच्या हातची भाजी तिला त्याची आठवण येत होती. आता मी ती का करत नसेन नियमित याला काही कारण असं नाहीये पण होत नाही. मग आज शेवटी सकाळी डब्याला देण्यासाठी बनवली आणि एकदम बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. सकाळी आवरायची, शाळेची गडबड, त्यात भाजीचा फोडणीचा वास, पोळ्या हे सगळं एकदम ओळखीचं वाटू लागलं. कुणी याला नुसती बटाट्याची भाजी म्हणत असेल, कुणी बटाट्याचे काप, आम्ही याला बटाटयाच्या काचऱ्या म्हणतो. :) 
       तर कोरेगांवमध्ये आठवड्यातून एकदाच बाजार भरायचा पूर्वी, दर सोमवारी. आई, आम्ही शाळेत गेलेले असताना, बाजारात जाऊन वायरच्या बास्केटमधून भाज्या, फळे, पालेभाज्या इ त्या त्या ऋतूप्रमाणे घेऊन यायची. आम्ही शाळेतून येईपर्यंत तिचे बरेचसे निवडून झालेलं असायचं. मग त्यात आम्हाला निवडलेली चवळी, सोललेल्या मटारमध्ये बारीक, गोड लागणारे वेगळे काढलेले मटार, पेरू, देशी केळी, तोतापुरी आंबा अशा अनेक गोष्टी मिळायच्या. मला त्या देशी केळांचं शिकरण मला खूप आवडायचं. आठवड्यातून ३-४ वेळा माझं मी एका पेल्यात बनवून घ्यायचे. असो. 
       तर तेंव्हा आमच्याकडे फ्रिज नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा पालेभाज्या, ओल्या भाज्या इ. पहिल्या ३-४ दिवसांत संपून जायचं. त्यातलं चाकवताचं गरगट बरेचदा सोमवारीच व्हायचं. मेथी, पालक, पोकळा वगैरे कधी डब्याला असायचे. अख्खा आठवडा ७ लोकांचं दोन वेळचं जेवण, डबे करेपर्यंत सर्व भाज्या संपून जायच्या. आणि त्या भाजीच्या टोपल्यात कांदा, थोडा लसूण आणि थोडे बटाटे उरलेले असायचे. बरेचदा रविवारी रात्री ऑम्लेट नसेल तर बटाट्याचा रस्सा नक्कीच असायचा. आणि ते नाही झालं तर सोमवारी सकाळी या बटाट्याच्या काचऱ्या हमखास असणारच. तर अशा अनेक सोमवारी सकाळी डब्यांत या काचऱ्या घेऊन गेल्याच्या आठवणी आज एकदम ताज्या झाल्या. 
       बरेचदा घाई असल्याने कांदा थोडा जास्तच भाजला जायचा. पण डब्यांत त्या एकदम मस्त लागायच्या, त्यातला तो खरपूस कांदा, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या चपातीचा खमंग वास. सोबत गरम गरम चपाती हवी मात्र. तीच गरम चपाती डब्यात नरम झालेली असायची. फुलके इत्यादी पेक्षा भारदस्त चपाती हव्यात. माझ्या आईच्या जरा मोठया असतात, फोटोत मी केलेल्या छोट्याच आहेत.  शाळेतच असे नाही कधी एखाद्या प्रवासाला जायचे असेल, सहलीला वगैरे तर खराब न होणारी भाजी म्हणजे हीच.  अनेकदा दादांनाही प्रवासाला जाताना बनवून ठेवलेली असली की आमच्या डब्यातही तीच भाजी असायची. 
      आज सान्वी दोन पैकी दीड पोळी संपवून आली त्यामुळे यापुढे त्या नियमित द्यायला हरकत नाही असे वाटू लागले आहे. कदाचित माझ्यासारख्याच तिलाही त्या नंतर कधी आठवण करून देतील,तिच्या शाळेची, या दिवसांची. :)
आता यात विशेष काही रेसिपी अशी नाहीये पण तरीही इथे देत आहे. मुलांना डब्यात देताना चपातीला थोडे लोणच्याचा खार आणि दुसऱ्याला केचप लावून त्यात भाजी घालून रोल बनवून दिले.
मी वरण, चपाती आणि भाजी घेऊन गेले. :) मस्त जेवण झाले. :)

साहित्य: तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड. २-३ बटाटे, एक छोटा कांडा. मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा साखर. 

कृती: कांदा आणि बटाटा चिरून घ्यावेत. यात बटाटा कापण्याचा पद्धतीने मात्र नक्कीच फरक पडतो. शेवटच्या फोटोत दिसत आहेत तसे पातळ, बारीक काप करून घ्यावेत. 
तेल थोडे नेहमीपेक्षा जास्त. नॉनस्टिक पॅनमध्ये जास्त नीट होतात. 
तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. लगेच कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी. 
एकदा परतून त्यात बटाटा घालावा.
मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे. 
साधारण १५ मिनिटांत भाजी होते. 

या १५ मिनिटांत मी मात्र आमचं आख्खा गाव, घर, बाजार, शाळा सर्व फिरून आले. :) 

विद्या भुतकर.



अपेक्षा