Friday, May 15, 2009

काय करावं?

परवा ना खूप दिवसांनी online radio वर दिल चाहता हॆ मधलं तनहाई गाणं लागलं होतं. अर्थात गाणी चालूही असली तरी प्रत्यक्षात त्यात मन अडकलंय असं आजकाल फार कमीच होतं. त्यातही गायकाचा आवाज ऎकून त्याचं कौतुक करावंसं वाटावं किंवा शब्दांनी उदास/आनंदी व्हावं हे अजूनच दुर्मिळ. असो. पण DCH मधला एकटा फिरणारा आमीर आठवला आणि पुन्हा एकदा त्याची लवस्टोरी बघावी असं वाटलं. मग म्हटलं राहूच दे. आजपर्यंत एकदाही असं झालं नाहीये की DCH पाहिलाय आणि उदास झाले नाहीये. खरंतर त्याचा शेवट किती सुखदायी आहे अगदी positive ...त्यातली अवखळ प्रीति झिंटा,उनाड आमीर, विचारी अक्षय आणि मजेशीर सैफ आणि त्यांची ती निखळ मैत्री...सगळंच कसं हवंहवसं...पण पण तरीही मनाला कसली खंत लागून राहते तो पाहिल्यावर माहीत नाही. विशेषत: रविवारी संध्याकाळी तर तो अजिबात पाहू नये. बरं झालं आज लिहिलंच याबद्दल ते. परत राहून गेलं असतं.
घाई करायचं कारण म्हणजे परवा संदीप २९ वर्षाचा झाला, लवकरच मीही होईन. मग वाटलं कशाला वेळच मिळत नाहीये किंवा मीच कुठल्यातरी तंद्रीत असते आणि खूप काही राहूनच जातय. बघताबघता सानू दोन महिन्यांची झाली. तिचे थोड्या दिवसांपूर्वीचे फोटो पाहून वाटलं अरे ही किती मोठी झाली, तिला सारखं बघत राहिलं पाहिजे, नाहीतर वर्षभराची होईल आणि तिला मनभरून पाहिलंच नाही असं वाटेल. बरं आपण मोठे होतोय म्हणजे आई-दादाही वयस्कर होताहेत. दम लागणारी आई आणि गोळ्या घेणारे दादा पाहिलं की पोटात कालवतं. वाटतं कुणीच मोठं नको व्हायला. मीही आणि तेही.
आमची ३री anniversary झाली मागच्या महिन्यात.बघता बघता इतकी वर्षे निघून गेली. ८ वर्षापूर्वीचा तो अजूनही डोळ्य़ांसमोरून जात नाही. त्याचं ते हसू संसारात हरवून जाण्याआधी त्याच्याबरोबर आपणही हसलं पाहिजे.
सानुसाठी आई-दादा घर सोडून इतके दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, फिरून सर्व दाखवलं पाहिजे. उद्या जातो म्हणतील तर काय करू? TV,laptop सर्व बंद करून नुसतं समोर बसून राहिलं पाहिजे त्यांच्या. आईच्या हातचं खाल्लं पाहिजे त्यात चुका न काढता...... सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री उशीरा झोपलं पाहिजे. अगदी आला आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला पाहिजे. काय करावं काही सुचत नाहिय़े.कुणीतरी थांबवता का रे हे संपणारे दिवस?
-विद्या.

Monday, February 16, 2009

प्रेमा तुझा रंग कसा?

नुकताच व्ह्यालेंटाईन्स डे झाला, झाला म्हणजे काय नेहमीसारखा एक शनिवार संपला. सकाळचे चहापाणी, Doctor ची भेट, मग थोडीफार खरेदी, घरी येऊन साफसफाई, जेवण-खाण आणि झोप. या सगळ्य़ामधे अगदी दुकानात जाऊनही साधे गुलाबाची फुलं कितीला होती हे बघणंही झालं नाही किंवा तो माझ्यासाठी घेईल का ही उत्सुकताही नाही की त्याने घेतलीच नाहीत म्हणून दु:खंही नाही. म्हणजे अगदी आई-दादांनी तो दिवस घालवावा तसा आम्ही पण घालवला म्हणायचा. अर्थात लग्नाच्या काही वर्षानंतर लोक असेच होत असतीलही, होय ना? :-) तर मी, आम्ही गेल्या थोड्या वर्षात साजरे केलेले १४ फेब्रुवारी आठवत होते, त्याबरोबरच बदलत जाणारं आमचं नातं आणि प्रेमही.
पहिल्या दोनेक वर्षी, किती बावळट होतो ना आम्ही, फुलांवर, ग्रीटिंग कार्डवर पैसे खर्च करायला.(म्हणजे मी तरी, मुलं काय नेहमीच व्यवहारी असतात म्हणा) :-)) पण त्या दिवशी त्याला न भेटता रहायला लागणं म्हणजे कुणीतरी काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं वाटलं असतं. ’मै उसके बिना जी नही सकती’ टाईप आमचं प्रेम. :-P मग पुढचे दोन वर्षं नोकरीसाठी दोन वेगळ्य़ा ठिकाणी, कधी वेगळ्याच देशात होतो. तिथेही मग त्याने साधं कार्डंही पाठवलं नाही म्हणून भांडणं, हिरमुसले होणं हेही झालं. पण तोपर्यंत आम्ही १४ फेब. ला न भॆटता राहू शकतो हे मनाने स्विकारलं होतं, अर्थातच आम्ही मोठे झालो होतो बहुतेक. :-) लग्नानंतरही तसं फारसं नाविन्य नव्हतंच राहिलं काही पण पहिला दिवाळी-दसरा कसा साजरा करतो तसा हाही दिवस साजरा करुन घेतला. आजकाल पहिल्या वर्षातल्या सणात, दोघांचे वाढदिवस, साखरपुड्याची anniversary, etc पण येतात बरं का. असो. तर नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर उरलं होतं ते आमचं सोबत रहाण्याने, एकमेकांबद्दल नवीन नवीन जाणून घेतल्यानंतरचं प्रेम. म्हणजे, मी दोन महिने सुट्टीला गेले तेव्हा, तो एकटा कसा राहील, काय खाईल, इ. काळजीवाहू प्रेम.
पण या सगळ्यापेक्षा, हा १४ फेब्रुवारी वेगळाच होता. अगदी अगदी वेगळा. विशेषत: गेला एक आठवडा जसा गेला त्यानंतर अजूनच. मागच्या शनिवारी Doctor ने बेड-रेस्ट सांगितली मला.शनिवारचा दिवस आम्ही दोघेही जरा घाबरलेलेच होतो, अचानक admit व्हायला सांगितल्यावर. मग तिथे राहिलेले ६/७ तासही कित्येक महिन्यांसारखे वाटले. शुभांगी-राम आले होते म्हणा धीर द्यायला, पण त्यादिवशी उगाचच आपण कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायला अजूनही किती लहान आहे असं वाटलं. आई-दादा असते तर किती बरं झालं असतं ना. असो.
घरी आल्यानंतर त्याने माझी जशी काळजी घेतली ते पाहून कसंसंच होतं होतं. मी आमच्या दादांना आजोबांची आणि आईला आमची अशी सेवा करताना पाहिलं आहे. पण त्यासर्वामधे आणि नवऱ्याने करण्यामधे कितीतरी फरक होता. त्याने अगदी उठवण्यापासून, परत गादिवर आणून झोपवणे, पाणी-जेवण अगदी हातात आणून देणे आणि नुसते पायमोजे घालणेही मला जमत नाही म्हणून पळत येऊन ते घालून देणे, हे सर्व (आई-वडील सोडून) कुणीतरी माझ्यासाठी करण्याची पहिलीच वेळ होती.मी कधी काही काम करायला उठले तर, तू जाऊन बैस पाहू म्हणणारा तो वेगळाच वाटत होता मला. :-) हे सर्व तो करत असताना मला जाणवलं की आमचं ते एकेकाळी फिल्मी वाटणारं प्रेम आता कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर आहे. तो माझ्यासाठी इतकं करू शकतॊ हे कधी माहितच नव्ह्तं मला, इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही त्याचा वेगळाच पैलू मला दिसला होता. माणूस अंथरूणाला खिळल्यावर त्याला बरेच साक्षात्कार होत असावेत, कोण आपलं, कोण परकं याचे. लग्नाच्या बंधनात जेव्हा माणूस अडकतो तेव्हा किती काय-काय वचनं तो देऊन बसतो ना? म्हणजे सप्तपदी चालताना किंवा 'Do you promise to be with her in Sickness and Health?' याला ’I Do' म्हणताना कुणाला कल्पनाही नसेल पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं.
काल रात्री तो झोपल्यावर त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून जे प्रेम वाटत होतं, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे फक्त थोडे दिवस, कारण आणखी थोड्या दिवसांत हे नातं अजूनच वेगळं होणार आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. :-)
-विद्या.

Wednesday, January 28, 2009

मी खूष आहे !!

आता हे जाहीर करण्याची काय गरज? तर ही जाहीरात नाही फक्त एक statement आहे. झालं असं की खूप दिवसांपासून मला इच्छा होत होती एक भाजी खाण्याची, शेंगसोला. आता कितीतरी लोकांना हे नाव माहितही नसेल. संक्रातीच्या आधी, भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतात. पण मग त्याला लागणाऱ्या भाज्याही विचित्रच आहेत. पावटा, ओला हरभरा, वांगं, गाजर, शेंगदाणे, बोरं इ. :-) एकतर हे combination किती odd आणि तेही अमेरिकेत यातला ओला हरभरा, ताजा पावटा मिळणं अजून दुर्लभ. पण यावेळी माझं नशीब जोरावर होतं. मला या सर्व भाज्या मिळल्या अगदी ताज्या. आणि भाजी केल्यावर त्याची चवही अगदी आई करते तशीच....... :-P मग त्याबरोबर तीळ लावलेली बाजरीचीच भाकरी हवी. :-) ते पीठ काय मिळतंच, पण चक्क जे मिळालं त्याची एक अखंड भाकरीही झाली. नाहीतर दोन-तीन तुकडे पडल्याशिवाय भाकरी काही होत नाही इथे. एकूण काय तर मला जसा हवा तसा शेंगसोला आणि भाकरीचा बेत पार पडला. अगदी संदीपला वाटीभरच मिळेल असं सांगून उरलेला सर्व संपवूनही टाकला आणि तृप्तीची एक ढेकर दिली................. :-) ........... म्हणून मी खूष आहे!!!
हे सगळं लिहिण्याचं कारण असं की ’मी खूष आहे’ जेव्हा असं म्हणत होते तेव्हा लक्षात आलं की आजकाल दिवसभरात किंवा अगदी महिन्याभरात आपण असं कितीवेळा म्हणतो की मी आज खूष आहे? त्यासाठी मग अगदी छोटं कारण असो नाहीतर खूप मोठं. मग स्वत:बरोबरच बाकी लोकांचं निरीक्षण करताना दिसलं की आजूबाजूलाही कितीतरी लोकं आहेत की ज्यांना ’I am happy today !' असं म्हणायला अगदी जीवावर येतं. दिवसभरात आपल्याला आनंदी असण्यासाठी एक कारण मिळू नये?
एखाद्या सोबत काम करणाऱ्या माणसाने म्हटलं, how are you? तर आपण पटकन 'Good' म्हणून सोडून देतो, तेच एखाद्या प्रेमळ मित्राने विचारले, ’काय रे कसा आहेस’, तर ’अरे एकदम मजेत’ असं म्हणायला काय पैसे पडतात का? मी समजू शकते की आपली दु:खं जवळच्याच माणसांना सांगता येतात, पण म्हणून रडतच रहायचं? आज काय खूप थंडीच आहे, उद्या काय कामच खूप होतं, परवा अजून काहीतरी.
एका व्यक्तीला जुन्या नोकरीत रहायचा अगदी कंटाळा आला होता. मग नोकरी शोधण्याची मारामार कशी चालू आहे याबद्दल दु:खं. नवीन नोकरी मिळाली तर पूर्वीचीच कशी बरी होती याचं रडगाणं. मग म्हटलं बाबा घरी जाऊन ये. आता भारतात आई-बाबांना भेटलास, सही वाटत असेल ना? असं विचारलं तर कसलं काय. इथे येऊन आजारीच पडलॊ म्हणून दु:खं. काय त्रास आहे राव लोकांना?
असंच जर चालू राहिलं तर मग यांना आनंद तरी मिळतो कधी आणि कशात? बरं, यांचं आयुष्य काही अगदी वाईट चाललेलं नसतं. रोजचं जेवण-खाणं, रुटीन अगदी सिनेमाला जाणं, फिरायला जाणं अशी करमणूकही चालू असते. मग जवळच्या माणसाने विचारलं की बाबा कसा आहेस तर लगेच तोंड वाकड करायला काय होतं?
मला अजून एक गोष्ट आता ध्यानात आलीय की हे रडणारे लोक नुसते स्वत: रडत नाहीत तर समोरच्याला असं भासवून देतात की तुला काय,तुझं सर्व ठीक चालू आहे ना. म्हणजे नुसतं स्वत: दु:खी नाही रहायचं, समोरच्याला तू सुखी असण्याचा गुन्हा केलायस असं वागवायचं. मग अशा लोकांशी बोलताना स्वत:चा आनंदही व्यक्त करता येत नाही का तर ते दु:खी आहेत. जणू काही यांच्या दु:खाला समोरचाच जबाबदार आहे. या सर्व लोकांनी कदाचित आयुष्यात खरी दु:खं भोगलीच नाहीत बहुतेक म्हणून कारणं उकरून काढून रडत राहतात. पण खरं सांगू मला एक कळलं आहे, Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it.
तर एकूण काय की ’मी खूष आहे’ हे म्हणणं प्रत्येकाच्या ’बस की बात नही’. होय ना? जमलं तर स्वत:ला कधी हा प्रश्न विचारून बघा काय उत्तर मिळतं. :-)
मधे एकदा एका जुन्या ’मित्राने’ विचारलं, ’कशी आहेस गं? घरचे सर्व मजेत ना? संसार कसा चाललाय?’ आणि सर्वात शेवटचा त्याचा प्रश्न होता,’ सुखी आहेस ना?’ त्या प्रश्नावर खरंच मला एका क्षणात माझ्याकडे असणार्या सर्व गोष्टींची जणू यादीच डोळयासमोर दिसली आणि एक मिनिट विचार करून समाधानाने उत्तर दिलं,’ होय, सुखी आहे मी. :-) ’ त्यावर त्याने फक्त ’:-)’ उत्तर दिलं आणि निघून गेला. पण पुढचे पाच मिनिटं मी सुन्न होऊन बसले होते.
-विद्या.
(खूप महिन्यांनी लिहित आहे आणि अगदी जसं डोक्यात येतंय तसं. गोड मानून वाचून घ्यावे ही विनंती. :-) )

Friday, April 04, 2008

हुरहूर

रविवारी संध्याकाळी रश्मीला बाय करून, जड मनाने दोघं गाडीत बसलो. कोलंबसमधे दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. पहिले पाच मिनिटं जरा शांततेतच गेले. रश्मी नसल्याने अजूनच शांत वाटत होतं. May be I was already missing her.
मग मीच म्हटलं ,'येताना शिकागोहून निघाल्या दिवशी खूपच ट्र्यफिक होती, तेव्हढी दिसत नाहिये, होय ना? बरं झालं उशीराच निघालो तिच्याकडून, तेव्हढाच वेळ सोबत घालवता आला.'
तोही मग, ' हो ना. काल पण म्युझियमला गेलो ते बरं झालं. एकतर बंदिस्त असल्याने थंडीचा त्रास नाही आणि एका दिवसात होण्यासारखंही होतं.'
माझाही होकारच त्याच्या बोलण्याला. मध्येच मला आठवण येते, 'आता परवा जाऊन भाज्या आणायला लागतील सर्व.' इ.इ.
आणि मग पुढचे ५-६ तासही असेच गेले दोन दिवस आठवण्यात घालवलेले नाहीतर मग घरात काय मागे सोडून आलोय त्याची चर्चा.
तसं हे नेहमीचंच. आमची मग कपिल-सोनालीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. आणि विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित गेला तो दिवस किती चांगला होता आणि परत तेच रुटीन असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर. की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
बरं हे ट्रिपचच असं नाही. दीडेक वर्षापूर्वी अर्णवचा पहिला वाढदिवस साजरा केला इथे. संध्याकाळी क्लब हाऊस मधून सर्व सामान आणायला आम्ही बरेच लोक मदतीला होतो योगिता आणि जी.टीं.च्या. एकेक करत सफाई करून क्लब हाऊसचा ताबा सोडला आणि घरी परतून सर्व जण योगिताकडे बसलो काही वेळ. पुन्हा तीच शांतता. :-) मी, आमचे अजून एक शेजारी, योगिता,जी.टी. सर्वच आपापल्या परीने काहीतरी विचार करत होते.
मग कोणीतरी बोललंच,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हाल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका योगिता कार्यक्रम.'
आणि अशा या गोंधळात आणि नवीन भेट म्हणून आलेल्या खेळण्यांना सोडून जुन्या चेंडूशी खेळणारा अर्णव अजूनही आठवतो आणि त्याचा क्यूट ड्रेस पण.कसला भारी दिसत होता. :-) असो. तर हे असं नेहमीचंच, आढावा घेणं आणि मनातल्या मनात एक हुरहूरही, की संपला तो दिवस अखेर ज्यासाठी गेले कित्येक दिवस पळापळ चालली होती.
या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. Imagine लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...
-विद्या.

Thursday, March 27, 2008

माझिया मना जरा सांग ना....

माझिया मना जरा सांग ना....मनात येईल ते लिहित जायचं, या ना त्याप्रकारे....अनेकदा अनेक पोस्टवर मी वाचलयं की 'काय लिहावं हे सुचत नाही' किंवा काही घडतच नाही तर काय लिहिणार. बरोबर ना? :-) अनेक अनुदिनींमधे कमीत कमी एक तरी पोस्ट असेल यावर. पण 'का' लिहितोय हा प्रश्न पहिल्यांदाच. तसं मी माझ्या ब्लोगला एक वर्ष पूर्ण झाल्यावर एक पोस्ट लिहिलं होतं त्यातले बरेचसे मुद्दे रिपीट होण्याची शक्यता आहे.तरीपण केतनच्या भाषेत 'खाज'. :-) मी शाळेत असताना किंवा नंतरही अनेकांनी कौतुक केलेलं, की छान पत्र लिहितेस हं. मग थोड्या कविताही आल्या/ अर्थात ते दिवसच कविता सुचण्याचे आणि लिहिण्याचे होते हे मला नंतर कळलं. असो. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा एकच कारण होतं, अनेक वर्षात मराठीत काही लिहिलंच नव्हतं, अगदी माझं नावंही मराठीत लिहिलं नव्हतं(कधी कागदावर मराठीमधे नावं लिहून बघा, खूप वेगळं वाटतं). ब्लोग लिहिण्याच्या निमित्ताने त्याला सुरुवात झाली.
याआधी अनेकदा एखादा विचार मनात येऊन फारतर थोडावेळ टिकायचा आणि निघून जायचा. एकदा ब्लोग लिहायला लागल्यावर मात्र असं झालं की एखादा विचार मनात आला की तो कधी एकदा कागदावर उतरवेन असं व्हायला लागलं. असं मला शाळेत सुरुवातीला काही कविता लिहिताना झालं होतं. ती अस्वस्थता परत माझ्यात आली होती. रात्री झोपताना काहीतरी मनात येतं आणि वाटतं की हे लिहिलं पाहिजे. मग एकदा का असा विचार मनात आला की संपलं, झोपेचं खोबरं. अनेकदा मी रात्री २-३ वाजता झोपलेय. ते विचार जणू भडाभडा बाहेर पडल्याशिवाय शांतपणे झोपूनच देत नाहीत.कधी असंही झालंय की एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल काय वाटतं हे दुसऱ्या कुणाला सांगण्यापेक्षा लिहिणं जास्त सोप्पं जातं. तिथं कुणी अडवणारं, प्रश्नं विचारणारं नसतं. त्यात कधी एखादी छोटी कथा होती, तर कधी कविता तर कधी नुसतेच भरकटणारे विचार.
हो, हे भरकटणारे विचार पण ना. कधी कधी इतका गोंधळ होतो डोक्यात सगळ्याच गोष्टींचा, योग्य-अयोग्य, मग त्या विचारांना एका ओळीत मांडण्यासाठी लिहित जाते. कधी कधी लिहितानाच कळून जातं की काय योग्य आहे आणि काय नाही. तर कधी अख्खा पोस्ट संपून जातो आणि मला काय करायचंय हे कळतच नाही.आता हेच पहा ना, मला मी 'का' लिहिते हे सांगायचंय पण सुसूत्रता येत नाहीये. मग काय करायचं? तर लिहित जायचं, मग घडी उलघडल्या सारखे एकेक विचार सुटत जातात.असेही अनेक पोस्ट लिहिलेत मी माझा कंटाळा व्यक्त केलाय तर कधी घरी जायचा आनंद. :-) केवळ 'व्यक्त' केल्यानाही बरं वाटतं. तर कधी, अगदी थोड्या दिवसांपूर्वी मी जेव्हा 'मी सध्या काय करतेय' किंवा 'मला काय करायचं आहे' यावर लिहिलं तेव्हा दोन-तीन उद्गारही आले, 'Just hang in there'. :-) कधी कधी ते मिळण्यासाठीही मी लिहिते.
अनेकदा आपण केवळ अशा एका मोठ्या विश्वाचे एक घटक आहोत याचाच आनंद मिळवण्यासाठी लिहिते. कितीतरी वेळा नवीन पोस्ट लिहिल्यावर marathiblogs.net वर यादीमध्ये आपलं नाव पहिलं आलं हे बघण्याचाही आनंद मी घेते. :) खरं तर आपण ब्लोगर्स थोड्याफार प्रमाणात सर्व सारखेच. कधी भरभरून लिहिणारे तर कधी आळशी.बरेच दिवसात काही लिहिलं नाही तर, 'काय कुठे गायब' असं कुणी विचारणारं असल्यावरही बरं वाटतं की नाही? एकमेकांना असे 'खो' देत आपण आपलं हे विश्व 'चालवत' राहतो. त्याचा एक घटक बनून राहण्यासाठी लिहिते. आणि कधी boring routine, आई-बाबा, शेजारी-पाजारी किंवा मित्र-मैत्रिणी सोडूनही आपलं थोडं फार का होईना एक 'secret life' आहे आणि जिथे सर्वांच्या नावं बदलून चुगल्याही करता येतात यासारखं मजेशीर कारण अजून काय असेल लिहायला? :-)
काही दिवसांपूर्वी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेट्ल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते जुने दिवस मी कधीही विसरणार नाही म्हटलं तरी अनेक संदर्भ पुसट होत जातात. फक्त मुख्य घटना लक्षात राहतात किंवा त्या लक्षात आहेत असं वाटत तरी राहतं. काय माहीत आयुष्यात अशा किती गोष्टी ५०-६० वर्षाचे होईपर्यंत लक्षात राहतील. पण विचार करा हेच पोस्ट आपण म्हातारे असताना वाचले तर किती मजा येईल. :-) माझे स्वत:चेच नाही, बाकीच्यांचेही जुने पोस्ट. तेव्हा 'अगं तुला ते हे आठवतंय का?' असं विचारणारं जवळ कुणी नसेल तरी हा ब्लोग नक्की असेलच. :-) होय ना? (आयुष्यात एव्हढी आधीपासून planning मी कशाचीच केली नसेल, हाहाहा... ) असो, कदाचित थोड्या काळाने हा पोस्ट वाचूनही मी हसत बसले असेन की मी काहीही लिहिते...... :-))
मी निवांत विचार करून लिहावं म्हटलं असतं तर माहीत नाही जमलं असतं की नाही लिहायला, म्हणून जे आठवेल तसं पटापट लिहून काढलंय. अजून नंतर वाटलं भर टाकेनच. पण तोपर्यंत माझा खो जास्वंदीला.
-विद्या.

Thursday, March 13, 2008

यावेळी भारतात होते तेव्हा दोन महिन्यांत बराच प्रवास झाला. मी अगदी बस, ट्रेन, रिक्षा सोबत सहा सीटर, Tempo trax आणि share auto मधूनहई प्रवास केला. त्यात अनेक लक्षात राहण्याजोगे प्रसंगही घडले. कदाचित ते सगळे वाचताना बोअरींग वाटतीलही पण लिहिल्याशिवाय राहवत नाहिये. :-)
मी मुंबईत उतरले आणि समीरसोबत, त्याने बुक केलेल्या KK Travels च्या पुण्याच्या गाडीत आम्ही बसलो. आता गाडी AC असली, नसली किंवा ती दोन तास उशीरा निघाली याने काही फरक पडत नव्हता. I was very much excited just to be there. मी गप्पा मारण्यात आणि आजूबाजूला (अंधार असला तरी) पाहण्यात मग्न होते. पहिले २-३ तास झाले असतील आणि गाडी मुंबई-पुणे हायवे वर बंद पडली.कुणीतरी म्हणालं की हे लोक आजकाल ऱोकेलवर गाड्या चालवतात. :-) त्यामुळे इंजिनाची पार वाट लागते. रात्री ३-४ वाजता हायवेवर आम्ही अशा ठिकाणी होतो जिथे कुणीही mechanic मिळणं अवघड होतं आणि दर एक मिनिटांत मोठे-मोठे ट्रक तिथून जात होते.एरवी मला अशावेळी फार चिडचिड झाली असती किंवा भीतीही वाटली असती. पण त्या क्षणाला मी इतकी आनंदात आणि तेव्ह्ढीच समाधानात होते की मी घरी जाणार आहे की मला या गोष्टींनी काहीच फरक पडत नव्हता. अर्ध्या तासाने कळलं की KK चीच एक गाडी थोड्यावेळात येणार आहे त्यात बसून जाता येईल. काय कुणास ठाऊक ते वातावरण फारच छान वाटत होतं. एका दगडी कट्ट्यावर पहाटे ४ वाजता बसून मी आणि समीर गप्पा मारत होतो. कसलंही tension नाही की भिती नाही. थोड्या वेळात दुसरी KK ची गाडी आली आणि सर्वात पहिली गोष्ट मी केली ती गाडीत घुसून जागा पकडली. :-) कितीही वर्षे,कुठेही रहा, Ur basic habits never die. :-) चार तासात होणारा प्रवास आम्ही ८ तासांत केला. आणि हो, हे KK चे लोक अगदी घरापर्यंत सोडतात बरं का, पण जर तुमचं घर सर्वात शेवटी येणार असेल तर अख्ख्या पुण्याची सैर झाली म्हणून समजा. :-)) पुण्यात बहिणींना भेटून चार-पाच तास विश्रांती घेतली आणि पुढच्या प्रवासाची तयारी केली. Btw, मी आई-दादांना surprise देणार होते. :-) त्यामुळे केव्हा एकदा घरी पोचते असं झालं होतं.
स्वारगेटवर पुणे सातारा लाल-डब्बा मिळाला. समीरने कंडक्टरला सांगूनही ठेवलं की बाबा हीने बराच प्रवास केला आहे, त्यामुळे सातारा आलं की तिला नक्की उठवा.नाहीतर जाईल कोल्हापूरला. मी नुकतीच आल्याने जवळ मोबाईलपण नव्हता. अर्धवट झोपेत मी तो अडीच तासांचा प्रवास केला आणि मी साताऱ्यात उतरले. आता फक्त शेवटचा टप्पा. सातारा-कोरेगांव. :-) तो फक्त अर्ध्या तासाचा रस्ता आहे. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मला कोरेगांव गाडी मिळाली. कोरेगांवला संध्याकाळी जाणाऱ्या गाड्य़ांतून प्रवास करणं जरा अवघडच. एक तर शहरात आपला माल विकायला, खरेदीकरायला आलेले गावतले लोक तेव्हा प्रवास करतात. त्यामुळे गर्दी असतेच, पण त्यात पिऊन तर्रर्र झालेलेही बरेच.:-)
तर मी माझी handbag घेऊन गाडीत चढले. आता ही handbag विमानात कितीही छोटी वाटत असली तरी बसमधे डोक्यावरच्या जागी, किंवा पायासमोर कुठेही बसत नाही. त्यामुळे मला ती दोन ओळींच्या मधे ठेवावी लागली. पहिला stop आला आणि एक ६५-७० वयाचा माणूस आत शिरला. त्याआधी ती ब्याग ओलांडून बरेच लोक गेले होते आणि मला कळतंही होतं की अडचण होतेय, पण पर्याय नव्हता. त्या म्हाताऱ्याने(हो, आजोबा म्हणायची इच्छा होत नाहीये) धडपडत bag ओलांडली आणि माझ्या तिरक्या पुढच्या सीटवर बसला. त्याला धड पाऊलही टाकता येत नव्हतं,( वयामुळे नाही प्यायल्यामुळे)आणि तो सुरु झाला. ’असे कसे ठेवतात रस्त्यात सामान. शिकलेले लोक नव्हं तुम्ही, कळत न्हाय काय?मी कोण हाय माहीत नाही तुम्हाला. कंडक्टर कुठाय? बोलवा त्याला, मग सांगतो मी....’ मी शांतपणे समजावयाचा प्रयत्न केला, पण तो सुरुच.मी गप्प बसले होते, पण शेवटी माझ्या मागच्या माणसाने बोलायला सुरुवात केली,’अहो गप्प बसा ना जरा. सांगितलं ना, बसत नाय वर ब्याग म्हणून.किती कटकट लावलीय.बसलाय ना जागेव एका, बसा ना मग.’ शेवटी असं झालं की bag माझी, मी गप्पच आणि हेच दोघे भांडत आहेत. कसाबसा तो अर्धा गेला आणि माझ्या नशिबाने मी त्या म्हाताऱ्याच्या आधीच उतरले नाहीतर अजून एकदा शिव्या बसल्या असत्त्या. :-))
गावांत उतरले आणि मंगळवार! एकही लाईट नव्हती गावात, ना कुठल्या घरात ना रस्त्यावर. कसबशी रिक्षात बसले आणि घरचा पत्ता सांगितला.त्याने रिक्षा इतकी जोरात घेतली की माझ्या हातातले पैसे कुठेतरी उडालेच. माझ्याकडे जास्त सुटे पैसेही नव्हते आणि होते त्यात काही इथले पैसेही मिक्स होते. घराजवळ रिक्षा आली, अंधारातच अंदाजाने पैसे दिले. घराबाहेरही इतका अंधार होता की आई-दादा घरात नसतील तर घाबरून जाईन म्हणून रिक्षावाल्यालाच एक मिनिटं थांबवून ठेवावं असं वाटलं. पण मी पैसे देताच तो निघून गेला आणि मी घरात घुसले.
२ वर्षांनी घरात येताना रडून येतंच होतं. बाहेरच्या खोलीत एक मेणबत्ती जळत होती. दाराचा आवाज झाला म्हणून आई बाहेर आली. तिला अंधारात कळेना की कोण आलंय. मी पट्कन आईला मिठी मारली आणि तेव्हां आईला कळलं की ती मी आहे. तेव्हढ्यात दादा बाहेर आले. त्यांना तर अजून काही कळेना. मेधा(माझी बहीण) सकाळी तर पुण्याला गेली होती, आता परत कशी आली आणि आईला मिठी मारून रडतेय का? :-)) मग त्यांनाही अशीच मिठी मारल्यावर कळलं की मीच आहे. जरा सर्व शांत झाल्यावर आईने सांगितलं,’ हे बघ, calender घेऊनच बसलोय,तू कधी येणार आणि तुला आणायला कसं, कधी जायचं ते. तू आधीच आलीस आणि सगळंच फिसकटलं. :-)’ फार तर २०-२५ मिनिटं बसले असेन मी बोलत. आईला म्हटलं काहीतर जेवायला दे आणि मी झोपते. आईने मस्तपैकी भाकरी आणि मेथीची भाजी केली होती. ती खाल्ली, आंघोळ केली आणि गादीवर पडल्याच्या दुसऱ्या क्षणाला मी झोपलेले होते. :-)) मी शिकागोमधून निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत ४४ तास सलग प्रवासात गेले. But it was worth it. I was home.
-विद्या.
P.S. ज्या हेतूने मी लिहायला सुरुवात केली होती त्यापासून जरा भरकटलेच. पण पुढचे वर्णन पुढच्या भागात....

Tuesday, March 11, 2008

One fine day...

आज सकाळी उठले आणि सगळ्यात पहिला प्रश्न डोक्यात आला, ’डासाला इंग्रजीमधे काय म्हणतात?’ :-) कदाचित एखाद्या अर्धवट स्वप्नाचा परिणाम असेल आणि माझं डोकं इतकं जड होतं नुकतेच उठल्याने. कितीतरी वेळ(२/३ मिनिटे?) मला डासांच्या सर्व जाहिराती आठवल्या, good knight, All out, कछुवा छाप अगरबत्ती,इ. सारखा ’मच्छरों का हमला’ आठवत होता. :-)पण इंग्रजीत काय म्हणतात ते काही आठवेना. चहा ठेवून ब्रश करेपर्यंत एकदम आठवलं, mosquitoes.... :-) I got it आणि माझं मलाच हसू आलं. :-)
अशा अनेक सकाळी एखादा विचित्र विचार येऊन सुरु झाल्या असतील. त्या सगळ्या काही मला आठवत नाहीत आणि ते शक्यही नाही. सकाळी उठल्या-उठल्या पहिली ५ मिनिटांत एकतर काही सुचत नसतं. पण डोळे उघडताच एखादा विचार डॊक्यात येण्याच्या ठराविक फेजेस येऊन गेल्यात. सर्वात पहिली आणि prominent phase शाळेतली. ते दिवसच उत्साहाचे असतात म्हणा. प्रत्येक वर्षी, शाळेच्या पहिल्या दिवशी, उठून पहिल्या पाच मिनिटांतच नवीन दप्तर, पुस्तके, वह्या सगळं चाळून झालेलं असतं. मे महिन्याचा पहिला दिवस, दिवाळीची सकाळ, नवीन सायकल मिळाल्यानंतरचा दुसरा दिवस. सर्वात त्रासदायक असायचे ते परिक्षेचे, निकालाचे. :-) एप्रिल महिन्यातील अनेक सकाळी यावर्षीचा निकाल काय असेल असा विचार करत सुरु केल्या असतील, विशेषत: १० वीच्या निकालाआधी. मे,जून महिन्यात आमच्या घराच्या अंगणात मोगऱ्याची फुले मोहरत असत. सकाळी मिटल्या डोळ्यांनी दरवाजा उघडून तो सुवास मनभरून अनुभवला आहे आणि किती फुले आहेत त्यावर आज किती मोठा गजरा करता येईल याचा विचार केला आहे. कधी रात्री मी मेहंदी लावल्यानंतर, सकाळी अवघडल्या हातांकडे पहायची उत्सुकता असायची,की कुणाचा हात जास्त रंगला असेल. हातांचा वास आणि गादीवर पडलेले मेहंदीचे कण त्या दिवसाची सुरुवात करायचे.
शाळेनंतरची फेज कोलेजची. तिथल्या अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. पण शेवटच्या वर्षी काही interview दिल्यानंतर, एखादी सकाळ येते जेव्हा सर्वात पहिला विचार येतो, I have a job. :-) I loved that day. त्यानंतर आठवते ती संघर्षाची फेज. स्वत:ला prove करण्यासाठी आई-दादांची भांडण्याची. एखाद्या सकाळी उठून, ’आपण का उगाच भांडतोय?देऊन टाकावं त्यांना हवं ते’ असं वाटण्याची. त्यात भर मुंबईच्या उन्हाळ्याची. अजिबात कसलाही विचार करायला लागू नये म्हणूने सकाळी ११-१२ पर्यंत झोपून रहावं आणि खिडकीतून आलेल्या उन्हानं अस्वस्थ होऊन उठल्यावर अजूनच depression यावं. त्या काळात पावसाळ्यातला एखादा दमट दिवसही अगदी नको करून सोडतो. किंवा कधीतरी घरी गेल्यावरही त्या तंग वातावरणात उठावसंच वाटू नये अशा त्या काळातल्या सकाळी माझ्या सर्वात नावडत्या. पण यावेळी दोन वर्षांनी घरी गेल्यावर रात्री गाढ झोपून गेले आणि सकाळी डोळे उघडायच्या आतच ते फीलिंग आलं,I am home. Nothing can beat that.
माझी सर्वात आवडती फेज म्हणजे प्रेमात पडतानाची. डोळे उघडताच त्याचा विचार डोक्यात येतो आणि त्याने आदल्या दिवशी बोललेलं एखादं वाक्य आठवत रहावसं वाटतं. मग आज तो दुपारी भेटेल की नाही, आज कोणता ड्रेस घालून जावा, अशा प्रकारचे काही प्रश्न त्या फेज मधे येत राहतात. एखाद्या सकाळी, ’आज तो भेटणार नाहीये’ हाच विचार डोक्यात येतो आणि उगाचच सकाळ झाली असं वाटतं किंवा याच्या उलट ’आज तो भेटणार’ याचा आनंद. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी ती सकाळ अनुभवायला हवी जेव्हा दोघांनाही माहीत असतं ’तिचं/त्याचं माझ्यावर प्रेम आहे’. :-) गादीवर नुसतं पडून रहावसं वाटतं, आदल्या दिवसाचा सर्व प्रसंग वारंवार आठवत. सर्वात भयानक, भीतिदायक सकाळ ती, जेव्हा आपण खरंच आयुष्यभर बरोबर राहू शकणार नाही की काय अशी आशंका आणणारी. जाऊ दे, तो दिवस कधी कुणाला पाहायला लागू नये. त्याला मागे सोडून नवीन जागी गेल्यावर उगवणारी सकाळ किती भकास असते सांगता येणार नाही. पण या सर्व प्रसंगातून गेल्यावर, असा एखादा दिवस येतो, जेव्हा डोळे उघडल्यावर तो शेजारी दिसतो आणि सर्वात पहिला विचार डोक्यात येतो ’आता आपण आयुष्यभर सोबत राहणार’.:-) You know all the fight you have gone through till now is worth to have this feeling one fine day.
-विद्या.