Wednesday, June 03, 2009

एका लग्नाची गोष्ट ४

आयुष्यात पहिल्यांदाच मी इतके दिवस घरापासून दूर राहिले होते. जास्तीत जास्त तीन महिने होते त्रिवेंद्रमला. पण दीड वर्षं म्हणजे जास्तच होतं ना? मुंबईच्या एअरपोर्टवर आई-दादांना मिठी मारून जोरदार रडले होते मी. कसली excitement होती. बाहेर पाहताना जग जुनंच तरीही वेगळं वाटत होतं. हरखले होते मी. घरी गेले आणि लक्षात आलं की किती बदललंय सगळं. याआधी कधी जाणवलं नव्हतं की आता आपले आई दादांचं वय होत चाललंय. आता लहान भाऊही शिकण्यासाठी घराबाहेर पडलाय. त्याला घरात पाहण्याची इतकी सवय होती की सारखं वाटत होतं की तो थोड्यावेळाने घरी परत येईल. इतके दिवस बाहेर राहिल्यावर आपणही पाहुणेच होऊन जातो घरचे. पण यावेळी रहायला खूप बरं वाटत होतं. पूर्वीचे वाद,मतभेद सर्व मिटले होते. किंवा त्यांनीच कंटाळून मला बोलायचं सोडून दिलं होतं म्हणा ना. असो. तर यावेळी मी घरी राहिले छानपैकी. महिन्याभराने मुंबईला एका प्रोजेक्टमधे जॉईनही केले. दर आठवड्याला ८/१० तास प्रवास करून घरी यायचे, खूप दिवसांनी घरी राह्यची हौस फिटत होती.
दोनेक महिने झाले आणि मग मात्र माझा संयम सुटला. वाटलं बाप रे, दिवस असेच जात आहेत, कधी भेटणार मी त्याला. माझं परत अमेरीकेत जायचं काही नक्की होत नव्हतं आणि त्यालाही परत येणं शक्य नव्हतं. बरं, मी अशी देशोदेशी फिरत असताना तोही काही एका जागी नव्हता. त्याचा पहिला प्रोजेक्ट संपला म्हणून दुसरा आणि मग तिसराही, अशी त्याचीही भटकंती चालूच होती. इकडे मी रोज माझ्या मॅनेजरकडे जाऊन विचारायचे झालं का माझं काम? चार महिने वाट पाहिल्यानंतर मला एक प्रोजेक्ट मिळाला आणि जानेवारी २००६ मधे मी न्यू जर्सीला पोचले. तो अर्थात आलाच होता मला न्यायला. आम्ही जवळ जवळ आठ महिन्यानी भेटत होतो. आठवतंच नव्हता मला तो कसा दिसतो ते. :-)
मी तिथे आले तरी आम्ही एका गावात नव्हतोच, साधारण ६०० मैल दूर होतो. मी इकडे येऊन टेकले आणि ठरवलं की बास आता हा पाठशिवणीचा खेळ. कुणीतरी थांबायलाच हवं तरच आम्ही एकत्र आलो असतो. त्याच्या घरी त्याने विषय काढला होता पण तिकडे काही प्रगती नव्हती. एक-दोनदा भावाकडेही बोलला पण नो लक. शेवटी कधीतरी वैतागलेल्या क्षणी आमचं ठरलं की जाऊ दे, आता इथेच लग्न करायचं. तीनच वर्षं झालीत पण मला ते निर्णायक दिवस आठवतंच नाहीत. माझा आणि त्याचा सध्याचा प्रोजेकट साधारण एकाच वेळेला संपणार होता. म्हणजे तीच वेळ योग्य होती लग्नासाठी. म्हणजे लग्न करूनच दोघांना सोबत प्रोजेक्ट शोधता येईल किंवा एकत्र परत तरी जाता येईल. अगदीच वेळ आली तर मी घरी राहीन थोडे दिवस असंही म्हटलं.
आता आमच्या मनातल्या कल्पनेने जोर धरला होता. माझ्या तेव्हाच्या मॅनेजरनेही इथेच लग्न केले होते त्यामुळे त्याचा सल्लाही घेतला होताच. :-) आम्हाला लग्नासाठी marriage license घ्यावे लागणार होते. मग ते license घेऊन सरकारने मान्य केलेल्या पाद्री,पुजारी यांच्याकडून लग्न करवून घ्यायचे.मग तो पुजारी आणि दोन साक्षीदार एका फॉर्मवर सही करून तो त्या गावातल्या सरकारी कार्यालयात देणार. सर्व पेपरची अधिकृतता तपासून मग आम्हाला पोस्टाने marriage certificate मिळणार. आता Certified पुजारी कुठे शोधणार? मला तर चर्चमधे लग्न करावे लागते की काय अशी भीति वाटू लागली.त्याचसोबत मस्त सफेद ड्रेसही घालता येईल याचा आनंद होत होता. (कुणाचं काय तर कुणाचं काय.) इकडे आई-बाबांना, भावाला कुणालाही न सांगता आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घ्यायचा की नाही याबद्दल त्याची ओढाताण होत होती. बिचारा तो. पण मी या सर्व गोष्टींचा विचार करण्य़ाच्या मनस्थितीच नव्हते.
आम्ही इंटरनेटवरून बरीच मंदिरे पाहिली पण काही ना काही कारणाने ती रिजेक्ट होत होती.त्यांचे नियम, त्या शहरातले लग्नाचे नियम,इ.बऱ्याच ठिकाणी marriage license घेतल्यानंतर तीन दिवसांपर्यत थांबावे लागत होते लग्नासाठी. आता दुसऱ्या शहरात जाऊन तीन दिवस कसे राहायचे? म्हणून आम्हाला अशा ठिकाणी मंदिर शोधायचे होते ज्या गावात marriage license आणि लग्न एकाच दिवसात होईल. माझा प्रोजेक्ट त्याच्याआधी एक आठवडा संपणार होता. म्हणून प्रोजेक्ट संपल्यावरचाच एखादा मुहूर्त पहायचे ठरले. मी न्यू जर्सीहून येणार आणि मग त्याचा प्रोजेक्ट संपायच्या आधी सिनसिनाटी ( तो जिथे होता) च्या जवळच्याच एखाद्या गावात लग्न करायचे. सिनसिनाटी जवळ काही मंदीर आहे का हे आम्ही तपासले. साधारण दोनेक तासांवर कोलंबस मधे एक साईबाबा हिंदू मंदिर आहे असे आम्हाला नेटवर कळले. आम्ही मंदिराला संपर्क साधला. तिथल्या पुजाऱ्याचा दाक्षिणात्य हेल ऎकूनच मी समजले की पुजारीसाहेब तमिळ वगैरे दिसताहेत.एव्हढं नक्की कळलं होतं की एकतर गुजराती/जैन किंवा दाक्षिणात्य ्मंदिर आणि पुजारीच इथे मिळणार होता. मराठी माणूस असतोच कुठे कधी? असो. त्यांनी मग आमची सर्व माहिती विचारून घेतली, दोघांच्याही जन्मवेळा वगैरे बघून मुहूर्त शोधला. त्यांनी सांगितलेली तारीख होती २४ मार्च २००६.
मग आम्ही जोमाने कामाला लागलो होतो. मुहूर्त शोधून झाल्यावर मंदिरात सोय कशी आहे, लग्नाचे कोणते विधी होणार,जेवायची काय सोय आहे(जणू काही मोठे वर्हाड होते जेवायला :-) ) , फुलांची,माळांची काही सोय आहे का हे सर्व आठवेल तसं विचारून झालं. आतापर्यंत आम्ही दोघेच हे सर्व बोलत होतो.कुणालाच या गोष्टीचा पत्ता नव्हता. आईला थॊडी कल्पना दिली होती. पण त्याच्याकडून कोणीच नव्हते. एक दिवस त्याने हिंमत करून त्याच्याजवळच्या मित्राला सांगितले की आम्ही असा विचार करत आहोत.त्याचेही नुकतेच लग्न झाले होते आणि तो शिकागोला रहात होता. त्यादिवशी एका फोनने आम्ही खूप जवळ आलो होतो. आता आमच्या या कार्यक्रमात त्यांनीही जोशात भाग घेतला होता. त्याचा मित्र आणि त्याची बायको कन्यादान करणार होते. असे निर्णय घेऊन, पार पाडण्यासाठीही हिंमत लागते. ती त्या दोघांनी दाखविली होती. मुख्य म्हणजे आपण जे करतोय त्यात कोणीतरी आनंदाने सहभाग घेतय याचंच समाधान वाटत होतं.
जेमतेम २५ दिवसांच्या कालाबधीत घडत होतं हे सर्व. तो एका वीकेन्डला न्यू जर्सीला आला होता. आम्ही दोघे मग भारतीय बाजारात हिंडलो. लग्नासाठी एक तरी साडी हवी होती ना? मग दोन दिवसात एक साडी(२००$ ची ), दोघांच्या अंगठ्या, एक छोटसं मंगळसूत्र असं बेसिक सामान आम्ही घेतलं. त्याच्यासाठी लागणारा ड्रेस तो शिकागोला घेणार होता. बाकी खरेदी झाली पण फुलांच्या माळा मंदिरात मिळणार नाहीत असं कळलं. तो म्हणाला, नसल्या तर चालनार नाही का? पण हारांशिवाय लग्न कसले ते. पुन्हा ऑनलाईन शोधाशोध करून २०० डॉलरच्या माळा ऑर्डर दिल्या. त्या परस्पर कोलंबसला येणार होत्या. मधेच आमच्या पुजारीसाहेबांनी धक्का दिला. म्हणे आमच्या मंदिराच्या भटजीना priest license मधे थोडा प्रॉब्लेम येतोय. आता??? त्यानीच मग दुसऱ्या एका मंदिराला संपर्क करून तिथले भटजी बोलावले होते.आता त्या भटजीची दक्षिणा वेगळी, मंदिराची वेगळी आणि तिथल्या भटजीची वेगळी असे सर्व आमच्याकडून आधीच कबूल करवून घेतले. नाही म्हणून आम्ही कुठे जातोय. सर्व झाल्यावर पूजेच्या सामानाची तयारीही करायची होती.
बघता बघता १८ मार्च उजाडला. माझा प्रोजेक्ट संपला होता. मी निघायच्या आधी त्याने मला फक्त विचारले, तुझ्या विश्वासावर करतोय हे सर्व, माझी साथ देशील ना आयुष्यभर? त्याचे ते शब्द आजही कानात घुमतात. असो. मी शिकागोला येऊन राहणार होते ४ दिवस, त्याच्या मित्राकडे. ज्या लोकांना मी आयुष्यात कधीही भेटले नव्हते ते लोक केवळ त्याच्या मैत्रीखातर माझी खातिरदारी करणार होते. पुढच्या चार दिवसांचा आमचा प्लान ठरलेला होता. त्याचा मित्र ऑफिसला गेला की आम्ही दोघी मस्त झोपा काढायचो, मग दुपारी सौदर्यबर्धक लेप लावत बसायचो. :-) निघायच्या दोन दिवस आधी तिने मला हाताना, पायाना मेहंदीही लावून दिली. किती छोट्या गोष्टी या पण त्या त्या वेळेला केल्या याचंच किती कौतुक. २३ मार्चला दुपारी आम्ही तिघे आमची वरात घेऊन गाडीने कोलंबसला निघालो होतो.
तिकडे तोही विधींची शेवटची तयारी करत होता. पान, सुपाऱ्या, खारका, २१ नाणी, अक्षता, इ.इ.आम्ही रात्री १२ वाजता कोलंबसला पोचलो.तोही सिनसिनाटीहून कोलंबसला आला. आमचा एक मित्र अजून तिसऱ्याच गावातून येणार होता. त्याला घ्यायला एअरपोर्टला जाऊन आला. असं करत करत रात्रीचे ३ वाजले होते. आणि सकाळी ७.३० चा मुहूर्त होता. दोन तासात कशीबशी झोप काढून आम्ही उठलो होतो. आम्ही सगळे एकाच हॉटेलात राहिलो होतो. सकाळी याच्या मित्राच्या बायकोने(आता माझी मैत्रीण) साडी नेसवून, तिचंही आवरून घेतलं. आता इथेही आपण उशीरा पोचतो कि काय असं वाटत होतं. पण झालं सर्व वेळेत. साडेसहाला आम्ही मंदिरासमोर आलो.
पाहतो तर काय, एखाद्या दुकानासारखे सरकते दार होते त्याचे. कुणीतरी एक माणूस दार उघडून गेला. आत एक मोठ्ठा हॉल होता, काही गाद्याही तिथे पसरल्या होत्या. समोर एक मोठ्ठा साईबाबांचा फोटो आणि दाराला खोट्या फुलांची कमान. मंदिरच्या व्याख्येत नव्हतं बसत ते पण लग्नाचा हॉल म्हणून खूपच मोठा होता. आम्ही सर्व तयारी केली, भटजी आले. मस्त होते ते. एखादे विनोद करनारे असतात ना असे. एकेक करत त्यांनी सर्व विधी यथासांग पार पाडले. दोघाम्चे मिळून मोजून ८ लोक होते. त्याने त्याच्या रुममेटना आदल्या दिवशी सांगितले होते की लग्न आहे आणि उद्या या म्हणून.(ग्रेटच आहे तो पण.)चार तासांत लग्न झालंही होतं. आम्ही सगळे जेवायला बाहेरच गेलो.
जेवण झालं,आता मुख्य काम बाकी होतं.आम्ही अजून marriage license घेतलंच नव्हतं. विधी पार पडल्यावर ते घ्यायचं, भटजीना द्यायचं आणि सही घ्यायची असा आमचा विचार होता. पण आता marriage license काढण्यासाठीही काही शहरात नियम होते की दोघांपैकी एकतरी तिथे राहणारा असावा. काही शहरात मात्र हा नियम नव्हता. कोलंबसच्या सरकारी कार्यालयात तासभर रांगेत उभे राहिल्यानंतर कळले की आम्हाला न्यू जर्सी किंवा सिनसिनाटीमधेच marriage license घेता येतं. झालं!!!! आता काय?? आम्हाला काहीच कळत नव्हतं. इक्डे मंदिरात जाऊन काय सांगणार? शेवटी असं ठरलं की सिनसिनाटीला गेल्यावर आम्ही license घ्यायचं, ते मंदिराला पोस्टाने पाठवायचं आणि मग पुजारीसाहेब सही करून पाठवणार.बरं आता एक तर नक्की होतं की आमच्या लग्नाची अधिकृत तारीख ही license घेतल्यानंतरचीच येणार होती. पुढचे सोपस्कार मग असेच उरकले आम्ही. घरी फोन करून सर्व नीट झाल्याचे कळवले. किती विचित्र वाटते ना आता की आईला सांगायचे लग्न नीट पार पडले म्हणून. त्यांना तेव्हा कसे वाटले असेल काय माहीत. त्याचे मित्रही आपापल्या घरी परतले. आम्ही आठ दिवस एका हॉटेलवर राहिलो. आम्हाला license साठी appointment ३० मार्चची मिळाली होती. तोपर्यंत दादांचा जीव टांगणीला. लग्न तर करून बसलीय आणि certificate नाही?३० ताराखेला दुपारी आम्ही सिनसिनाटीच्या सरकारी कार्यालयात आम्हाला १ एप्रिलला लग्न करायचे असे सांगून certificate मिळवले आणि पाठवून दिले. अशा रितीने १ एप्रिल २००६ ला आम्ही पती-पत्नी झालो होतो. :-)
आता त्याचाही प्रोजेक्ट संपला होता. पुढे काय हा आम्च्यासमोर प्रश्नच होता. नशीबाने पुढे मात्र चांगली साथ दिली. आम्हा दोघानाही ८ दिवसांत शिकागोमधे एकाच ठिकाणी प्रोजेक्ट मिळाला होता. पुढची दोन वर्ष आम्ही शेजारच्या खुर्चीत बसून घालवली. :-) भगवान जब देता है.........लग्नानंतर काही महिन्यात त्याच्या घरीही सर्व सांगितले. त्यांचाही राग आता निवळला होता. लवकरच मी त्यांची लाडकी सून झाले होते. :-)
हे सर्व होऊन तीनच वर्षं उलटलीत तरीही सर्व आठवायला होत नव्हते. लिहिण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळणी झाली आणि आज जे आहे ते मिळवायला किती कष्ट घेतलेत हे आठवून त्याची किंमत दुप्पट झालीय.... and we are living happily ever after.... :-P
-विद्या.

Tuesday, June 02, 2009

एका लग्नाची गोष्ट ३

कधी कधी ना नुसतं सुन्न व्हायला होतं. म्हणजे आनंद नाही ना दु:खं. म्हणजे तळहाताला टाचणी टोचली आणि काही लागलंच नाही तर कसं वाटेल? तसंच सुन्न होऊन....सगळं मागं सोडून मी अमेरिकेत पोचले होते. सगळे प्रॉब्लेम्स सुटले होते असं नाही पण निदान मागे तरी राहिले होते. वेगळा देश, वेगळा वेश, वेगळं घर सर्वात थोडा वेळ गेलाच. आम्ही मग विचित्र वेळेला बोलायचो. कधी तीव्र इच्छा झालीच तर मी त्याच्या रात्री २/३ वाजताच फोन करायचे.बाकी माझं काम तसं बऱ्यापैकी चाललं होतं आणि थोडंफार फिरणंही.

खरं सांगू का? त्या सहा महिन्यात काय काय झालं हे मलाही नीटसं आठवत नाहीये आता. किंवा मीच टाळलं होतं तेव्हा डोक्यात काही घ्यायचं. आता विचार केला की वाटतं, त्याने कसे दिवस काढले असतील तिकडे. एकतर ऑफिसची धावपळ होतीच, त्यात मीही नाही. घरंचं वादळ अजून तसंच होतं. त्यात त्याच्या नातेवाईकांचीही भर पडली होती टोमणे मारण्य़ासाठी. काय करायचा, कसा राहायचा, काय खायचा काही माहीत नाही. आतापर्यंत मीच नवीन जागी जात होते त्याला मागे सोडून. आपलं माणूस नसताना, ओळखीच्या जागा, खुणा आणि लोकंही कसे नकोसे होतात. कसा राहिला असेल तो प्रत्येकवेळी मी पुढे गेल्यावर काय माहीत? मी तर तशी राहूही शकत नाही आणि आयुष्यात कधी इच्छाही नाही तशी राह्यची.असो.

काही दिवसांत त्याचाही अमेरिकेचा विसा झाला होता. मग तो रोज एखादा प्रोजेक्ट आला की माझ्यापासून किती लांब आहे हे पहायचा. :-) जवळ जवळ पाच महिने झाले होते मला इकडे येऊन आणि एक दिवस बातमी आली की माझ्या प्रोजेक्ट मधून बऱ्याच लोकांना परत पाठवत आहेत. झालं!!! इकडे आम्ही भेटायची स्वप्नं पहात होतो आणि तिकडे मला परत जावे लागते की काय अशी भीति वाटू लागली. आयुष्यात त्रास काय कमी आहे का? मी अमेरीकेतच परत कुठे प्रोजेक्ट मिळतो का ते पाहू लागले. मला १५ दिवसांची मुदत दिली होती आणि तिकडे त्याचा प्रोजेक्ट फायनल झाला. मी खूप मारामारी करूनही माझं काम काही होत नव्हतं. त्याची इकडे येण्याची आणि माझी प्रोजेक्टमधली शेवटची तारीख एकच होती......

शुक्रवारी दुपारी एका मित्राने सांगितले अगं शिकागोमधे एका प्रोजेक्टसाठी खूप लोकांची गरज आहे.तू फोन करून बघ तिकडे. पण काम काही जास्त चांगलं नाहीये. तुला आवडणार नाही कदाचित. But who cared? मी फोन केलाच आणि काय!!! माझं काम झालं होतं. सोमवारपासून मला शिकागोमधे जॉईन करायचं होतं. पण मी ही बातमी त्याला सांगितली नव्हती. कारण तो तिकडून निघाला होता, शिकागोलाच येण्यासाठी !!! हो, त्याच्याच प्रोजेक्टमधे मलाही जॉईन करायचं होतं तेही एकाच दिवशी. :-D त्यादिवशी पहिल्यांदाच वाटलं की देवालाच आपल्याला सोबत आणायचंही तर बाकीचे लोक ’किस झाड की पत्ती?’. :-) एका दिवसात गाठोडं गुंडाळून मी शिकागो आले. मग दोघांची राहण्याचीही सोय एकाच सोसाय़टीत झाली हे पाहून मी निश्चिंत झाले आणि एअरपोर्टवर त्याला आणायला गेले, सरप्राईज द्यायला.
इतकं सही वाटत होतं आम्हाला पुन्हा एकदा एकाच दिवशी जॉईन करायला. अगदी पहिल्या कंपनीतले दिवस आठवले. पहिले दोन दिवसच झाले होते आणि आम्हाला तर इतक्या गप्पा मारायच्या होत्या. त्यामुळे बाकीच्या लोकांकडे पहायला वेळ कुठे होता. आमच्यासोबत त्याच दिवशी काही लोकही जॉईन झाले होते. आमच्या गप्पा पाहून त्यातल्या एकाने शेवटी विचारलंच,’ आप तो हम सबको दो दिनसे ही जानते हो. फिर उसमे ऎसी क्या बात है जो आप उसीसे बात कर रही है?’ :-) त्याला काय सांगणार होते मी? त्या जळक्या कोळशाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता?

इथे तर मस्त बर्फाच्छादित शिकागो होतं हुंदडायला. फक्त एक प्रॉब्लेम होता की आमच्या दोघांकडेही गाडी नव्हती त्यामुळे कुठेही जायचं म्हटलं तरी दुसऱ्यांवर अवलंबून रहायला लागे. शेवटी घाईघाईतच मी एक जुनीच गाडी विकत घेतली आणि Learning License वरच गाडी चालवायला लागले. :-) मी त्याच्या आधी आले होते ना, त्यामुळे जरा शायनिंग मारायला नकॊ का? तरी बाईकवर बिनधास्त फिरणारे आम्ही सावधपणे, थोडं धास्तीने गाडी चालवत फिरत होतो. एकदा फिरायला गेल्यावर उंच-उंच इमारती, मिशिगन तळं(की समुद्र?) आणि स्वप्नवत वाटणारं शिकागो शहर पाहून वाटलं की कुठून कुठे आलोत आपण. पुण्यातल्या एखाद्या छोट्या हॉटेलात बसून गप्पा मारण्यात खूष होणारे, नुसतं पाहिलं तरी सुखावणारे आम्ही आता किती मोठी स्वप्नं बघायला (जगायला?) लागलो होतो.आणि तरीही मनात ती पुण्यात राहण्याची,जुन्या जागी फिरण्याची, एक घर बांधण्याची स्वप्नं अजून तशीच होती.

आम्हाला एकत्र येऊन महिना उलटला होता. आणि सुरुवातीची थोडी धावपळ सोडता बाकी सेटलही झालो होतो. पण बहुदा सुखं मिळायला लागलं की माणसाला बाकीची दु:खं टोचायला लागतात. मला आधीच माहीत होतं की माझं काम फारसं इंटरेस्टींग नाहीये. तरीही मी हो म्हणाले होते तेव्हा. आता मला ऑफिस नको वाटायला लागलं, तिथले लोक, तिथल्या पद्धती सगळं नको वाटायला लागलं. एकदा त्याला म्हणालेच की माझं काही मन लागत नाही या कामात. अगदीच फालतू आहे. तर तोही म्हणाला की नको राहूस मग इथे. तुला दुसरीकडे प्रोजेक्ट मिळतो का बघू. मीही लगेच मॅनेजरकडे जाऊन भांडले की मला इथे राहायचं नाहीये. म्हणजे लहान मुलासारखं हे नको तर लगेचच नको आणि हवं तर लगेचच हवं. :-) किती भावनिक होते मी. (कदाचित आजही आहे.) मी HR ला सांगून दुसरा प्रोजेक्ट शोधला खरा पण जिथे मिळाला तिथे जायची इच्छा काही होईना कारण माझा हा नवीन प्रोजेक्ट कॅनडामधला होता. :-( म्हणजे करायला गेले एक आणि झाले भलतेच.एका सोसायटीत राहत होतो चांगले आता दोन वेगवेगळ्य़ा देशात राहणार होतो. महिन्याभराच्या आमच्या भेटीनंतर मी कॅनडामधे जायला निघाले होते. दैव देते आणि कर्म नेते, दुसरं काय?

यावेळी निघताना मात्र मला त्याची खूप काळजी वाटत होती. एक तर हा देश त्याच्यासाठी नवा होता, तिथले लोकही फारसे मित्र म्हणता येईल असे नव्हते. मी जाण्याआधी त्याला गाडी तरी चालवता यावी यासाठी प्रयत्नही केला, पण तो फोल ठरला. त्याने कधी हाताने जेवणही बनवले नव्हते आणि त्यात त्यचे रुममेटही महाभाग. त्याच्या काळजीत मी निघाले खरी पण त्यापेक्षाही मोठे प्रश्न समोर उभे राहिले होते, ते म्हणजे मी एकटीने कॅनडामधे राहण्याचा. तिथल्या भयानक थंडीत माझी नुसती पुरेवाट झाली होती. आता मात्र मी कंटाळले होते एकट्याने सर्व करायला. मला कुणीतरी हवं होतं आधार द्यायला, ’It'll be ok' असं सांगायला आणि ज्याच्यावर सर्व सोपवून निश्चिंत राह्यला. म्हणजे मुंबईतून निघताना जे प्रश्न अर्धवट होते ते तसेच राहीले होते, इथे नुसती भेटायचीही मारामार झाली होती. त्याला मला भेटायलाही कॅनडाचा विसा काढून यावे लागणार होते आणि ते ही एखाद-दोन वेळेला आला असता तो. दर आठवड्याला थॊडीच येणार होता.

हे असलं ना Long distance relation फार तापाचं. एकतर समोरचा काय बोलतो, कोणत्या हेतूने बोलतो हे समजण्यापेक्षा गैरसमजच जास्त. मग कधी मी बाहेर भटकत राहिले, कुणासोबत गेले, कधी गेले-आले यावरून वाद, तर कधी त्याने फोनच केला नाही , बाहेर जाताना मला सांगितले नाही किंवा अजूनही फालतू कारणावरून वाद घालता येतात. एकदा माझ्या एका मित्राने त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी १००० डॉलरचा हार घेतला, तर माझ्यासाठी तो तसा हार घेईल की नाही यावरही वाद घातला आम्ही. :-) त्याचं म्हणणं की तो हार १००० डॉलरचा नाहीयेच आणि माझं म्हणणं की तुझी माझ्यासाठी खर्च करायची तयारी तरी आहे की नाही, घ्यायचा की नाही ते नंतर बघू. :-))) काही कामं नव्हती आम्हाला, दुसरं काय?

तीनेक महीने झाले असतील मला कॅनडाला येऊन आणि त्याचे शेवटी ठरले मला भेटायला यायचे. त्याच्या मित्रांसोबत तो न्यूयॉर्क, नायगारा पाहण्यासाठी जाणार होता. आणि नायगारा पाहण्यासाठी तो इकडे कॅनडाला येणार होता. त्यादिवशी सकाळी मी आवरून एका बसने नायगाऱ्याला पोचले. साहेब नेहमीप्रमाणे उशीराच येणार होते, त्यात मित्रांची भर. ११ वाजता तो नायगाऱ्याला पोचला, पण ते अमेरिकेच्या बाजूला. तिथून तो गाडी घेऊन पुलावरून येणार होता. पण एकतर माझी घाई आणि पुलावरची गाड्यांची गर्दी त्याने पाहिली आणि तो पायीच निघाला. पुलाच्या इकडच्या बाजूला मी छत्री धरून वाट पहात होते त्याची. :-) खांद्याला बॅग लावून पळतपळत येणाऱ्या त्याला बघून अगदी भरून आलं. (हम दिल दे चुके सनम किंवा रोजा स्टाईल म्हणा ना...) दिवस कसा भराभरा संपून गेला. मला जाणं भागच होतं. बस चुकवता येत नव्हती ना. त्याला बाय करून निघताना नको वाटत होतं. त्यादिवशी खूप महिन्यांनी माझ्या जाणिवा जिवंत झाल्यात असं वाटलं आणि पुन्हा त्याला कधी भेटणार याचा विचार करत मी निघून गेले. (तो म्हणे उद्वस्त होऊन नायगाऱ्याला फिरत होता कितीतरी वेळ नंतर.) असो.

सहा महिन्यांनी माझा प्रोजेक्ट संपला. आणि निर्णयाची वेळ आली होती. इकडे तो होता आणि तिकडे दीड वर्षं दूर राहिलेले आई दादा होते. घरी जायची खूप ओढ लागली होती. थोडे दिवस घरी राहून पुन्हा एकदा अमेरीकेत प्रोजेक्ट शोधण्याचा वायदा करून मी घरी निघाले होते. आता पुन्हा तेच प्रश्न. एकत्र कधी येणार, लग्न कधी करणार, एका ठिकाणी प्रोजेक्ट कसा मिळणार.....

आता आठवतंय तरी का ते पुणं, तिथलं आमचं नवं नवं प्रेम. फक्त ट्रेनिंग घेऊन परत यायचं ठरवून निघालेली मी कधी कुठे हरवून गेले कळलंच नव्हतं........

-विद्या.

Friday, May 29, 2009

एका लग्नाची गोष्ट २

नवीन कंपनीची, नव्या जोमाची स्वप्नं आणि त्याच्याकडे लवकर परत जायचं ही जिद्द मनात घेऊन मी उडाले होते. हो, माझा पहिलाच विमान प्रवास तो. दोन तासात मुंबईतून त्रिवेंद्रमला पोचलेसुद्धा. आकाशातून दिसणारं ते नारळाचं जंगल आणि सोबतीला समुद्रही, कसलं भारी वाटत होतं एकदम. पण उतरताना मल्यालम मधे कसलीतरी सूचना ऎकली आणि वास्तवात आले. माझ्यादृष्टीने तिकडचे सगळे लोक म्हणजे साऊथ इंडीयन होते. त्यातही कोण मल्याळी, तमिळ, तेलगू हे कसे ओळखायचे हे मला कालांतराने समजले.तोपर्यंत साऊथ-इंडीय़नच.मोठा धक्का होता तो मला की आपण एका अनोळखी राज्यात आहोत जिथे काही हवं असलं तरी मागण्याची पंचाईत आहे. असो. विमानात माझ्याशेजारी बसलेल्या माणसाने मला कंपनीच्या ट्रेनिंग सेंटरला सोडले.तिथे गेल्यावर कळलं की माझी राहण्याची व्यवस्था एका हॉटेलात आहे परत आले त्याच मार्गाने रिक्षा करून हॉटेलात पोचले.

अशी सामान ठेवून पोचले की लगेच खाली आले. रिसेप्शन्ला विचारले की internet cafe कुठे मिळेल? तिने मला एक रस्ता दाखवला.मी चालत राहिले पण काही मिळाले नाही. एका रिक्षावाल्याला इंग्रजीत विचारले तर त्याने मला सरळ बसा म्हणून सांगितले आणि मी बसलेही. त्याने रिक्षा चालवायला लागल्यावर मी घाबरले, बाप रे मी अगदी निवांत बसलेही. काय,कुठे जायचे,किती पैसे होणार, तो नीट नेणार का? मी आजूबाजूच्या खुणा पाहून ठेवायला लागले. थोड्या वेळाने त्याने गाडी थांबवली ती एका प्रिंटींगच्या दुकानासमोर. :-) देवा!! जरा जवळपास फिरल्यावर मला एक STD Booth दिसला. त्याला फोन करून जरा रडून घेतलं.त्यालाही फोन झाल्यामुळे जरा बरं वाटलं. मग उरलेली हिंमत गोळा करून मी पाहिलेल्या खुणावरून हॉटेलचा रस्ता धरला. रस्त्यात मी एकेक करत चार नेट कॅफे शोधले तेही वेबकॅम कुठे आहे,कुठे नाही ते पाहून. :-) आता मी निर्धास्त होते. रुमवर येऊन मस्त जेवण मागवलं आणि खाऊनपिऊन,टीव्ही पहात ताणून दिलं. संध्याकाळी एक मुलगी रुममेट म्हणून रहायला आली. दिवस कसा सरून गेला. रात्री मात्र माझ्यातलं त्राण संपून गेलं आणि मी त्याला फोन करून भोकाड पसरलं.

ट्रेनिंग सुरु झाल्यावर रुटीन ठरून गेलं होतं. सकाळ्पासून दिवसभर काम, टाईमपास आणि रुमवर आले की पाच मिनिटांत मी कॅफेमधे असे. मग फोन वगैरे तर होतच. थोड्याच दिवसांत मी नवीन ठिकाणी रुळले, नवीन मित्र-मैत्रिणी झाले, आमच्या क्लासच्या दोन ट्रिप पण झाल्या. एक दिवस मस्त कोवलम बीच वर गेलो. पुढच्याच आठवड्यात ख्रिसमसला एक मोठी ट्रिप आणि ३१ डिसें. ला दुसरी. मी सगळं एंजॉय करत होते. तरीही ट्रीपला गेल्यावर आमचे पुण्यातले ट्रेकचे दिवस आठवायचे. आमच्या पहिल्या ट्रेकला त्याने माझी बॅग जड होती म्हणून स्वत:हून घेतली होती आणि मी त्याची. :-) तर एकदा माझ्या वाढदिवसालाच त्याने ट्रेक काढला होता. किती मजा केली होती दिवसभर आणि संध्याकाळी गिफ्टही.सह्याद्रीच्या दरी-डोंगरातून आम्ही फिरलो होतो. त्यात कधी चढताना उतरताना त्याचा हात असायचा. तर कधी त्याने लक्ष दिलं नाही म्हणुन रागाने पुढे गेले तर पुन्हा शोधत येणारा तो. केरळच्या त्या सुंदर सुंदर ठिकाणांना भेट देताना तो सोबत,त्याचा हात इथे असता तर स्वर्गच इथेच झाला असता तो आमच्यासाठी. असो, सगळं थोडीच मिळतं माणसाला?

मला इकडे येऊन १५च दिवस झाले होते आणि एक दिवस तो मला म्हणाला तू मला विचारत होतीस ना की मी तुला भेटायला येईन का म्हणून. तर मी येतोय तिकडे. :-) त्याने मला सांगितले की त्यानेही माझ्याच कंपनीत apply केले होते. आणि तो आता टेस्ट,interview ची तयारी करत होता. बापरे !!! माझा तर विश्वासच बसत नव्हता. आम्ही मग जोरात तयारीला लागलो. त्याच्या टेस्ट,interview झाल्यावर निकालाची वाट पहाणे फार जड जात होते. मला इकडे येईन महीना झाला होता. त्याचदिवशी आम्ही नेटवर असताना त्याने वेबकॅमवर एक कागद दाखवला. :-DDDDDDD त्याचे joining letter होते ते. तोही त्रिवेंद्रमला येत होता......लवकरच.........

पुढचे १० दिवस कसेबसे काढले आणि त्याला सांगितले की तू विमानानेच ये,मी काही वाट पाहू शकत नाही जास्त. तो येणार होता ३१ जानेवारीला आणि ३ फेब ला जॉइन करायचे होते. :-) तीन दिवस होते आम्हाला हुंदडायला. मी अगदी सगळे बेत आखून ठेवले होते. त्याला घ्यायला मी, माझी रुममेट आणि एक मित्र रात्री ११ वाजताच जाऊन बसलॊ होतो. तिकडे सर्व लवकरच बंद होतं त्यामुळे १० नंतर रिक्षाही मिळणार नव्हती. एकेक क्षण सरत नव्हता.रात्रीचे ३ वाजले,सर्व लोक निघून गेले तरी हा काही दिसेना. शेवटी वाट पाहून त्याच्या भावाला फोन लावला,त्याने मुंबईला नातेवाईकांना केला,तेव्हा कळाले की साहेबांनी चक्क फ्लाईट मिस केली होती. मला संताप,राग, सर्व अनावर होत-होता.रोज भेटायला उशीरा येणं वेगळं,इथेही उशीर? किती निष्काळजी असावं माणसानं?कडमडत रुमवर गेलो पहाटे ५ वाजता. फोनवर कळलं की जुन्या कंपनीत राजीनामा देणे, रुमवरचं सर्व आवरणे आणि मुंबईचा प्रवास सर्व एकाच दिवशी उरकलं होतं याने. म्हटलं ये कधी यायचं ते. त्याने एअरपोर्टवर विनवण्या करून दुसऱ्या दिवशीचे तिकट जुळवले होते. आता परत आमच्या वाऱ्या. त्यादिवशी संध्याकाळी ६ वाजता येणार म्हणालेला तो ९ वाजता पोचला. का तर आज तो लवकर येऊन बसला आणि विमानच उशिरा निघाले. :-) त्याला दीडेक महिन्याने पाहिल्यावर माझा सगळा राग विरघळून मी त्याच्या मिठीत विसावले होते.

त्याची रहाण्याची सोय माझ्यापासून जरा दूरच होती. रिक्षांचा चांगलाच धंदा झाला असेल तेव्हा. :-) लगेचच पुढच्या दिवशी आम्ही बीचवर भटकून आलो. माझ्या सर्व इच्छा अशा पूर्ण होत होत्या. पुढचे दिवस कसे फुलपाखरासारखे जात होते. आम्ही रोज संध्याकाळी तर भेटायचोच पण सुट्टीच्या दिवशी ट्रीपला जायचो, बीचवर भटकायचो, अगदी कन्याकुमारीलाही जाऊन आलो. सुख सुख म्हणतात ते हेच.इथे कुणी पाळत ठेवायलाही नव्हतं. ना आई-दादा ना आत्या...ना आणि कुणी.थोड्याच दिवसात माझं ट्रेनिंन संपलं. मी मुद्दामच मुंबईचं पोस्टींग घेतलं होतं. एकतर घरापासून लांब आणि त्याला कदाचित पुणं मिळालं असतं,नसतं. त्याला भरपूर अभ्यास करून लवकरच मुंबईला ये असं बजावून मी मुंबईला आले होते. तीन महिन्यांनी घरी गेले होते,किती बरं वाटलं.

आता मी परत त्याची वाट पहात होते तर आई-दादा आता झालं ना सगळं सेट, म्हणून परत लग्नाच्या घाईला लागले होते. त्याचं ट्रेनिंग संपल्यावर कळलं की त्याला चेन्नईला जावं लागेल. संपलं !!! माझी सर्व शक्ती एकवटून मी कशी बशी रहात होते. आता तो तिकडे म्हटल्यावर माझं घरी कोण ऎकणार? पहिल्यांदाच देवाला साकडं घातलं होतं. तिकडे त्यानेही शेवटचा एक आठवडा HR च्या विनवण्य़ा चालूच ठेवल्य़ा होत्या. अगदी शेवटच्या क्षणाला एका मुलीला चेन्नई हवं म्हणून त्याची मुंबईला रवानगी झाली होती. :-) आमचं नशीब खरंच जोरावर होतं. तो लगेचच मुंबईला आला. पण इथे सर्व वेगळे होते. त्याचे ऑफिस बांद्र्याला होते अन माझे बोरीवलीला. पुण्यातले ते बाईक वर फिरण्याचे दिवस केव्हाच संपले होते. तो रोज लोकलच्या चक्रात अडकला होता अन मी दुपारच्या शिफ्टमधे. भेट व्हायची ती रात्री किंवा तो सकाळी जाताना. शेवटी आम्ही सोबत वेळ घालवता यावा म्हणून Oracle classes लावले. रोज सात वाजता आम्ही बोरिवली ते अंधेरी लोकलने जायचो, १० पर्यंत क्लासमधे.नंतर मी परत बोरीवलीला येऊन ऑफिसला जायचे आणि तो पुढे बांद्र्याला.

इकडे आई-दादांनी चांगलाच जोर धरला होता लग्नासाठी. शेवटी वैतागून मी त्याला म्हटलं की अरे जरा विषय तरी काढून बघ घरी. त्याच्या प्रॉब्लेम असा होता की तो घरात सर्वात लहान, मोठ्या दोन भावांची अजून लग्नं बाकी होती. आणि इकडे मी घरात सर्वात मोठी ,पाठच्या दोन बहिणी त्यामुळे आमच्या घरी घाई. सगळं अवघड होऊन बसलं होतं. तो एके दिवशी पुण्याला गेलाच भावाशी बोलायला. त्याने ऎकून तर घेतलंच नाही ,उलट तोच आला आम्हाला समजावय्ला की हे शक्य होणार नाही म्हणून. आणि त्याने घरीही सांगून टाकलं की हा असं म्हणतोय म्हणून. झालं, त्याच्या घरी आता आईची रडारड, बाबांची चिडाचिड आणि त्याला इकडे माझी घाई. नको नको झालं होतं अगदी. बाय-द वे नकाराचं मोठ्ठं कारण होतं की आमची दोघांची जात वेगळी होती. असो. आता तिकडूनही नकार आला होता.

आम्ही एकदा तर बोरिवलीला कोर्टात लग्नासाठी काय करावं लागतं हे ही विचारून आलो होतो. एकदा तारीख घेतली की फक्त तीन साक्षीदार हवेत,झालं. :-) तर कधी आत्महत्या करावी का हेही माझ्या मनात येऊन गेलं होतं. खूप सारी भांडणं आणि एक महाभारत घडल्यावर आई-दादांना कळलं की ही काही ऎकणार नाही. शेवटी दादा आईला म्हणाले एकदा की जा त्याला भेटून ये एकदा. काय म्हणतो ते बघ. आईला,मी आणि तो एका हॉतेलात बसून बोललो होतो. त्याने सांगितलं की माझी तयारी आहेच लग्नाची पण भावांची लग्नं व्हायचीत. घरच्यांना समजावणे चालूच आहे.आई काय बोलणार होती यावर. त्यांच्या हातातही काही नव्हतं आता.

आमचं इकडे रोजचं रुटीन चालूच होतं. फक्त या सगळ्या भांडणात आम्ही प्रेमच विसरून गेलो होतो. ज्या ओढीनं आता पर्यंत एकत्र राहण्याची मारामारी करत होतो ती ओढच कमी होत होत.कंटाळले होते मी सर्वाला. अशात एकच आशा होती, ऑनसाईट जाण्याची. एकदा तिकडे गेले की मग कुणीच मागे लागणार नाही. एक संधी आली होती चीनला जाण्याची पण वेळ आल्यावर कळलं की माझा पासपोर्टच हरवला आहे. कधी,कुठे,कसा काही आठवत नव्हतं. नवीन काढून येईपर्यंत वेळ निघून गेली होती. आता परत बोरीवली-अंधेरी चकरा, दुपारचं ऊन, रात्रीची तगमग आणि दमट सकाळ. सगळं कसं कंटाळवाणं.

काही दिवसांत पुन्हा एक संधी आली अमेरिकेला यायची. मी अगदी जोमाने खरेदीला, तयारीला लागले. पण नशीबाने परीक्षा घ्यायचेच ठरवले होते. त्याच वेळी त्याच्या भावाच्या लग्नासाठी तो मुली पहायला त्याच्यासोबत गेला होता. आणि इकडे मी एकटी interview जाऊन गोंधळ घातला. आधी चुकीच्याच ट्रेनमधे बसून १ तास बोरीवली ते विरार प्रवास केला, मग परत सरळ ट्रेन घेऊन २ तास. तिथे पोचल्यावर कळले की सामान आत नेता येणार नाही. एका बाईकडे ३० रु देऊन सगळे सामान तिथे ठेऊन आत गेले. आधीच नाट लागला होता आणि त्यात माझा विसा ही रिजेक्ट झाला. आता परत ते उदास आयुष्य समोर दिसत होतं. रडत-खडत बाहेर आले आणि ऑफिसला फोन केला,त्यांनी नरीमन पॉईंट ऑफिसला बोलावले होते. सामानासाठी घेतलेलं टोकन हरवलं म्हणून त्या बाईने नाटक केले. कसेबसे तिला पटवून सामान घेतले आणि नरीमन पॉईंटला गेले, तिथे गेल्यावर कळलं की मी माझं आय-कार्ड कुठेतरी विसरले आहे.
परत ज्या फोन बूथ वरून फोन केला होता तिथे रिक्षाने आले.त्या बिच्याऱ्या माणसाने कार्डवरच्या नंबरला फोनही केला होता की हे असे कार्ड इथे राहिले आहे. ते घेऊन मी ऑफिसला गेले. तिथे सगळी चौकशी झाल्यावर कळले की आता पुन्हा विसा apply करायला दुसऱ्या टाईपचा विसा घेतला पाहिजे. त्यासाठी कमीत कमी २ महिने तरी जाणार होते. माझ्या या सर्व प्रोसेस मधे तो तिकडे भावासोबत होता आणि मी एकटीच सर्व करताना तो सोबतही नाही म्हणून त्याच्यावर चिडूनही झालं होतं.

दिवस काय सरतच जातात, पुढचे दोन महिनेही असेच सरले. माझा विसा प्रोसेस झाला, यावेळी मिळालाही. मला सोडायला आई-दादा, तो सर्व आले होते. माझ्या या सगळ्य़ा गोंधळात त्याच्यापासून दूर जातेय हा विचार करायलाच मिळाला नव्हता.अगदी शेवटच्या दिवशीही माझ्या तयारीतच होता तोही आणि मीही. एअरपोर्टवर त्यालाच काय आई-दादांना बाय करतानाही कसंसच झालं. परत कधी येणार हे कुणालाच माहीत नव्हते.आता तो आणि मी कधी भेटणार हे तर अजूनच दूर.पण एक मात्र नक्की होतं, देश सोडतानाच मी ठरवलं की आता जे होईल ते,पण मी रडणार नाही. आयुष्य कधीतरी जगायलाच हवं होतं, आणि हीच ती वेळ होती........१७ जुलै २००४ ही ती तारीख होती.
-विद्या.

Wednesday, May 27, 2009

एका लग्नाची गोष्ट १

अनिकेतच्या ब्लॉगवरची गेली दोन पोस्ट वाचली आणि मला पण उगाचच जुने दिवस आठवायला लागले. तसं पाहिलं तर फार काही जुनी गोष्ट नाही म्हणा ही पण झालीच की तरी तीन वर्षं. तेव्हाची मी आणि आताची यात जमीन-आसमानचा फरक आहे असं वाटलं. आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी किती छगडावं याला काहीच मर्यादा नव्हती तेव्हा आणि आता, रस्ता पाहून आधीच पळून जावंसं वाटतं. असो. उगाच रडून जुन्या आठवणीतील गंमत घालवायची नाहीये मला. मी विचार करत होते २००६ पासूनच सुरु करावं पण मग मध्येच २००४/५ पण घुसला त्यामुळे त्यांना आधी थारा द्यावा म्हणते. की त्याआधीपासून?....

तर ही गोष्ट २००१ ची सालची, जेव्हा मि अगदी नवीन नवीन BE पूर्ण करून मी एका कंपनीमधे चिकटले. ती सॉफ्टवेअर कंपनी नव्हती पण असो पगार मिळाल्याचे कारण असं म्हणून मी पण खूष होते. कंपनीतला पहिलाच दिवस,१७ ऑगस्ट, मी मस्त आवरून स्टाईलमधे आतेबहिणीच्या गाडीवरून गेटवर आले. तिथे नवीन जॉईन होण्याऱ्या लोकांचा घोळका मी पाहिला आणि तिथेच थांबले. आम्ही दोघीनी मग इकडे तिकडे कुणी चांगला मुलगा दिसतो का पहावं म्हटलं. त्यातल्या त्यात ’तो’च बरा असं आमचं ठरलं. :-) त्याने लाईट लेमन कलरचा शर्ट आणि काळी पॅंट घातली होती. सही दिसत होता एकदम. थोड्यावेळाने सर्वांना एका हॉलमधे एकत्र करून induction program सुरु झाला. मी तर काय १० मिनिटातच पेंगायला लागले होते. पण माझ्यासमोरच बसलेला तो होताच टाईमपासला. :-) वाटलं होतं ओळख होईल म्हणून पण त्याने जास्त काही भाव दिला नाही. :-(

दिवस असा तसा सरला. घरी जाताना त्या हॉलपासून कंपनी गेटपर्यंत एकटं जायचा कंटाळा आला होता. नवीन ओळखी तर काही झाल्या नव्हत्या. :-( मग पुढे जाणारा तो दिसला. ’Excuse me' मी मागून म्हणाले. त्याने वळून पाहिलं. ’सदाशिव पेठेला जाण्याची बस कुठे मिळेल?’ मला सर्व माहीत असूनही मी त्याला विचारलं. मग बोलत बोलत आम्ही सोबत चालायला लागलो. :-) जरा ओळख झाली. तो मला म्हणे,’ सॉफ्टवेअर इंजिनियर असून या कंपनीत काय करतेयस? बाकी कुठे मिळाली नाही वाटतं?’ मनात म्हटलं जरा आगाऊच दिसतोय. गेट्वर पोचलो, चला आपलं काम झालं. त्याला बाय करून मी गेले. तो दिवस आणि नंतरही कित्येक दिवस मग आम्ही त्या बसस्टॉपवर एकत्रच गेलो होतो. (त्याला म्हणे ’excuse me' म्हणणारी मी आणि माझा तो ड्रेस आजही आठवतो.जपून ठेवायला हवा होता ना?पण बसणार नाही आता. जाऊ दे.)

(मी विचार करतेय की मी इतकं डीटेल लिहिलं तर मला किती टाईप करावं लागेल. आणि वाचणाऱ्याला किती बोअर होईल? पण असू दे आता लिहितेच सर्व एकदाचं. वेळ लागला तर लागला,हळू हळू लिहिन आणि वाचणाऱ्याला बोअर होतं असेल तर मी काय करणार? )

पुढच्या दोन आठवड्यात आम्ही दोघेही एकाच ग्रुपमधे आलो होतो. अगदी स्वत: हात वर करून co-ordinators पण झालो होतो. त्यामुळे सगळीकडे सोबत फिरणं आलंच. :-) त्यात सर्वात आवडतं काम म्हणजे library time. तिथे जाऊन आम्ही दबक्या आवाजात गप्पा मारत बसायचो. संध्याकाळी कोपऱ्यावर रसमलाई खायचो आणि मगच घरी जायचो. १५-२० दिवस झाले असतील आणि मला कळलं की तो कसलीतरी परीक्षा देत आहे. पाहिलं तर म्हणे मला फायटर पायलट व्हायचय.खरं तर त्याची पर्सनॅलिटी पायलटला शोभणारीच. उंच,मध्यम बांधा, ताठ सरळ खांदे, उभं राहतानाही दोन्ही पायांवर भर देऊन उभा आणि ओठावर कायम हसू. त्याचा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सुरु होता. एकदा मी म्हटलं बघ त्यातली तू ही एक लेवल पास झालास तर तू मला पार्टी देणार. :-) तो ’हो’ म्हणाला होता. त्याला ८ दिवस banglore ला जायचं होतं टेस्टला. तो निघताना बाय म्हणून मी शनिवारी निघून गेले पण सोमवारी मात्र फार चुकल्यासारखं वाटलं. एकच आठवडा ना? असू दे. म्हणून मी कामाला लागले.

पुढ्च्या सोमवारी मी उत्साहाने कामावर गेले, पण हा काही दिसला नाही. मी हिरमुसले. :-( त्याच्यासाठी त्याच्या आवडत्या गोळ्याही (Alpenliebe) मी घेऊन आले होते. :( बुधवारी मात्र माझी सहनशक्ती संपली. पण माझ्याकडे साधा त्याचा घरचा नंबरही नव्हता. आणि अचानक आठवलं की आम्ही दोघांनी एकाच बूथवरून फोन केले होते घरी आणि कचरा खाली टाकायचा नाही म्हणून त्याची ती रिसिट मी पर्समधे टाकली होती. त्यावर मला त्याचा घरचा नंबर मिळाला. पण एका मुलाच्या घरी फोन करायचा? तोही १५ दिवसाची ओळख असताना? मग गुरुवार,शुक्रवारही फोन टाळला. दोन आठवडे झाले तरी हा का नाही आला याचा विचार काही जाईना. शेवटी त्याच्या घरी फोन केलाच. तर तिकडे अजबच कहाणी. हा म्हणे घरीही आला नव्हता. उलट त्याची आजी गेली होती आणि तो तरीही घरी नाही म्हणून घरचेच चिंतेत. आता काय बोलणार?मी नाराज होऊन फोन ठेवून दिला. :( शनिवार-रविवार असेच गेले.

सोमवारी मी Learning Center ला पाय ठेवला आणि याच्या स्मितहास्याने माझं स्वागत केलं. :-ड माझे होते नव्हते ते सर्व दात बाहेर. मग विचारले,’ काय रे काय झाले? पास झालास की नाही? ’ तो थोडं हसतच,’नाही?’. ’का??????’. त्याने त्याची थोडी तुटलेली करंगळी दाखवली म्हणे,’याच्यामुळे रिजेक्ट झालो’. म्हटलं हे काही कारण आहे का रे? उगाचच मी थोडं समजावण्याचा प्रयत्न करून कामाला निघून गेले. संध्याकाळी मात्र, निघताना त्याचा तो उदास पण ह्सण्याचा प्रयत्न करणारा चेहरा पाहून कसंतरी झालं. म्हटलं चल जरा बसू कुठेतरी. मग गप्पा मारत त्या दिवशी बराच वेळ बसलो. तेव्हा कुठे खरं कारण कळलं.तो म्हणे dextro cardiac आहे. म्हणजे काय तर त्याचे ह्र्दय उजव्या बाजूला आहे. आणि लाखांत अशी एखादीच केस असते ज्याचे बाकीचे अवयव पण उलट्या बाजूला असतात. तर आमचे हे साहेब लाखांत एक होते. :-) क्षणभर वाटलं खरच जगावेगळा आहे हा, असं असतं का काही? त्यालाही हे माहीत नव्हतं. अगदी शेवटच्या पायरीपर्यंत जाऊन त्याला केवळ मेडिकल मुळे नकार देण्यात आला होता. :( त्या दिवशीच्या गप्पांनी आम्हाला खूप जवळ आणलं होतं.

काही दिवसांनी मी गाडी घ्यायचं ठरवलं. त्यादिवशी मी सुट्टी घेतली होती. आता एखादा दिवस सुट्टी घेतली तरी एकमेकांना फरक पडू लागला होता. दुसऱ्या दिवशी नवीन गाडी घेऊन मस्तपैकी ऑफिसला आले आणि आत्याला फोन करायचीच विसरले पोचल्याचा. झालं!!!!! मी पोचले की नाही म्हणून आत्याने होते नव्हते ते सर्व फोन लावले होते आणि मी सांगायच्या आधी सर्वांना समजले की मी नवीन गाडी घेतलीय. त्याच दिवशी एका पार्टीसाठी सर्वांना बाहेर जायचे होते. मी आधीच सांगितले की माझ्यासोबत गाडीवर तोच येईल म्हणून. सकाळी गर्दी कमी असताना ठीक आहे, पण संध्याकाळी मी थोडीच एकटी जाणार होते? तर मग मी पुढे आणि तो मागे अशी डळमळणारी आमची गाडी सुरु झाली. मागून सूचना देत, मध्येच स्वत: हाताने वळण घेत तो मला शिकवत होता. पार्टीला सुखरुप पोचलो.नंतर त्याला बससाठी सोडून मी घरी निघून गेले आणि त्याचा फोन..पोचलीस का? अरे??? २ मिनिटांच्या रस्त्यासाठीही त्याने मला फोन केला होता की पोचलीस की नाही म्हणून. :-) प्रेमात सर्वजण असेच करतात का? :-)

थोड्या दिवसांत असं झालं होतं की नोकरी लागली, तिथे सेटलही झालो, पण पुढे काय हा प्रश्न आम्हाला छलत होता. त्याचं एक स्वप्न तर अपूरच राहिलं होतं. मग आम्ही ठरवलं की GRE साठी सोबत अभ्यास करायचा. अभ्यास कमी आणि गप्पाच जास्त व्हायच्या हे सांगायलाच नको. :-) बघता बघता दिवाळी आली. Traditional day साठी सामान हवं म्हणून त्याला नको असतानाही सोबत घेऊन फिरले. :-) नाही म्हणत त्याने मोठ्या कौतुकाने खरेदीत भाग घेतला. पण नेमके त्याच दिवशी आम्हाला एका Diesel Engine AssemblyTraining साठी बोलावलं होतं. आता मी साडी नेसून कसं करणार हे? पणतरी गेलेच नेसून.गेल्या गेल्या माझ्यावरची त्याची नजर काही हटत नव्हती आणि तो असं बघताना बाकीचे पहात आहेत हे बघून मला अवघडल्या सारखं होत होतं. नंतर पदर खोचून त्याच्यासोबत Assembly करताना त्याचं मला पाहणं फार सुखावत होतं. दिवाळीत सुट्टीचे चार दिवस भेटणार नाही याचं दु:खही होतंच. पण घरच्यांसाठी खरेदीचं कारण काढून परत दोघे फिरत बसलो. उरलेली उणीव फोनने भरून काढली. त्याच्या घरी, आईशी पहिल्यांदाच बोलले आणि खूष झाले. :-)

हे सर्व झाले मोठे,महत्वाचे क्षण.त्याहूनही जास्त जवळचे ते छोटे,छोटे रोज घडणारे किस्से होते. तो Production Engineer, त्यामुळे त्याचं काम नेहमी shop floor ला आणि मी IT Department ला. त्यामुळे आमची शिफ्ट वेगळी आणि जागाही. तरीही कधी एकाच वेळेला जेवायला मिळालं किंवा त्यात एकत्र न बसता नुसतं पहायला मिळालं तरी किती मस्त वाटायचं. चुकून कधी कॉफी प्यायला किंवा नाष्टाही सोबत करायला मिळाला तर स्वर्गसुखं वाटे. कधी मी कारण काढून त्याच्या Dept ला भटकले किंवा तो माझ्याकडे आला तर, तिथल्या workers,managers च्या नजरा चुकवत बोलणं किती अवघड तरी हवंहवसं वाटायचं. तॊ रात्रीच्या शिफ्टला असताना त्याला फोन केला तर हमखास कोणीतरी दुसरा उचलत असे. मग मी इंग्रजीत विचारायचे ’May I speak to Sandeep please?' तो वर्कर मग ओरडणार.....’साहेब....तुमचा फोन आहे.’ :-) एकदा त्याने मला सांगितलं की लोक विचारतात की ती इंग्रजीत का बोलते. मग लगेचच दुसऱ्या दिवशी मी मराठीत. ;-) ’निरोप पोचलेला दिसतोय...’ त्याला टोमणा बसला. किती छोटी गोष्टं,पण फोनवर बोलायला मिळणं ही पर्वणी वाटायची तेव्हा.कधी कधी त्याच्या हातात लोखंडाचे बारीक कण जात असत काम करताना. मग मी उगाचच त्याचा हात हातात घेऊन टोकरत बसायचे. :-) अगदी तो कित्त्त्त्ती कष्टं करत आहे ना असं वाटत. तर कधी तो माझ्या डेस्कवर यायचा आणि मी कौतुकाने लिहिलेला कोड, काही स्क्रीन्स दाखवायचे. किती बावळट होतो ना?

एकदा कंपनीत जाताना माझी गाडी खराब म्हणून मी शेजाऱ्यासोबत गेले होते. अवघडून बसल्याने, त्याच्या गाडीच्या मागच्या चाकात माझा पाय गेला आणि मग काय मला कारणच मिळालं.कंपनीतून सुट्टी घेऊन मी त्याच्याकडे गेले.त्याची रात्रीची शिफ्ट होती ना. :-) तो मग त्याचा दुपारचा डबा घेऊन आला,हाताने मला भरवला आणि मी त्याला. ( अर्थात माझ्या पायाला लागले होते, हाताला नाही तरीही. :-) ) मग उचलून घेऊन हात पण घुवायला नेला. मला अगदी असाच समर्थ तरीही प्रेमळ साथीदार हवा होता,ज्याच्या हातात अगदी सुरक्षीत वाटावं असं त्यादिवशी वाटलं.

अरे हो, आमचा अभ्यास अजून चालुच होता बरं का. शेवटी आम्ही परिक्षेची तारीख नक्की केली. त्यासाठी मुंबईला जावे लागणार होते. त्यामुळे माझ्यासोबत माझे दादा येणार हे नक्की होते. आता काय करायचे? त्यादिवशी सकाळी परिक्षा दिली, उजेड पाडलाच. संध्याकाळी परत पुण्याला येताना कितीही टाळले तरी आमचे गुण बाबांना दिसलेच होते. तेव्हा ते काही बोलले नव्हते.

एक सांगायचं राहिलंच. आमचं हे प्रेम चालू असताना, माझ्यासाठी मुले पाहण्याचा कार्यक्रम चालू झाला होताच. किती लोकांना टाळणार आणि काय कारण सांगणार? खरं सांगू का? मला तेव्हा त्याच्याशी लगेचच लग्न करायचच होतं असं नाही पण दुसऱ्या कुणाशीही करायचं नव्हतं. २१ हे काय लग्नाचं वय आहे का? तर हे असे पाहण्याचे कार्यक्रम करत, टाळत मी अभ्यासाची, नोकरीत कामाची आणि जमेल तशी प्रेमाची कसरत करत होते. आणि एक दिवस तो दिवस उजाडलाच.

कोल्हापूरचे पाहुणे येऊन गेले होते. मुलगा काळा,टकला आणि खेडवळ आहे ही कारणे नकाराला पुरेशी होती. त्याच्यासोबत आलेला १२ लोकांचा गोतावळाही भरीला होताच नकारात. पण मलाच कंटाळा आला होता या सर्वाचा आणि मी म्हणाले की मला फकत त्याच्याशीच लग्न करायचे आहे. मला तो आवडतो. (आई-बाबांसमोर ’माझे त्याच्यावर प्रेम आहे’ हे म्हणणे किती awkward वाटते माहीत आहे का?) मग आईचि रडारड, दादांची चिडाचिड, बहीणींची घुसमट आणि भावाचा बाळबोध प्रश्न, हे सर्व झाल्यावर मी हरले. हो लगेचच आणि म्हणाले की तुम्ही त्याला सांगा हे सर्व. हो, कारण मला भीती होती की माझी नोकरीही बंद झाली तर? त्यापेक्षा प्रेम सोडलेले बरे ना? दुसऱ्या दिवशी मी,दादा आणि तो, स्वारगेटच्या कुठल्यातरी हॉटेलात बसून बोलत होतो. दादांचं एक वाक्य तो अजूनही आठवून मला चिडवतो,’ज्या गावाला जायचच नाही ती बस कशाला पकडायची?’ काय दम होता आमच्या अंगात भांडायला? जेमतेम वर्षभराची नोकरी आणि बाकी काही नाही. दादा आम्हाला समजावुन परत गेले होते. मी आणि तो उद्वस्त....

ठरवलं की आता नाही भेटायचं, नाही बोलायचं. अगदी ठरवून वेगवेगळ्या लोकांबरोबर फिरायचं म्हणून बाहेर पडलेले आम्ही एकाच ठिकाणी आलो होतो. :-) काय आनंद झाला होता आम्हाला. किती फालतू प्रयत्न होता आमचा. नुसतं भेटू नका असं सांगून सोडून दिल्यावर कोणीतरी ऎकणार आहे का? १०-१५ दिवस अगदी प्रेमभंगाच्या दु:खात बुडालेले आम्ही पुन्हा भेटू लागलो आणि ये रे मागल्या.

आमचं हे प्रकरण चालुच असलं तरी आम्हाला आता एक वर्षापेक्षा जास्त दिवस उलटले होते.मी आत्याकडून बाहेर पडून रुमवर राहू लागले होते. GRE चा विचार तर मागेच पडला होता.मग मी एकाद्या चांगल्या software कंपनीत जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. १/२ interview आले आणि गेले पण. शेवटी त्यानेच माझी तयारी करून घेतली आणि मी चक्क सर्व टेस्ट,interview पास झाले. ज्यादिवशी मला निकाल कळला, मला काहीच सुचत नव्हते. कारण मला त्यासाठी त्रिवेंद्रमला जावे लागणार होते.
आयुष्यात कधी विचारही केला नव्हता की असे काही होईल. ज्याला रोज बघतो त्याला सोडून राह्यचे, हजारो मैल दूर? त्यानेच मग समजावले की ट्रेनिंग संपल्यावर आहेच की सोबत.तोवर जरा कळ काढ.तेव्हा माहीत नव्हते आयुष्यात कितीतरी वाढून ठेवले होते. माझे कंपनीतले दिवस भराभर संपत होते.दिवसा काम, संध्याकाळई खरेदी आणि रात्री लिखाण. हो त्याच्यासाठी पत्र लिहित होते मी पुढचे सात दिवस वाचण्यासाठी सात पत्रंही लिहिली होती . :-) (कित्येक वर्षं झाली आता पत्र लिहून.) बघता बघता तो दिवस उजाडला. दूर जाण्याचा.आमचे घरट्यातले दिवस संपले होते.
-विद्या.

Friday, May 15, 2009

काय करावं?

परवा ना खूप दिवसांनी online radio वर दिल चाहता हॆ मधलं तनहाई गाणं लागलं होतं. अर्थात गाणी चालूही असली तरी प्रत्यक्षात त्यात मन अडकलंय असं आजकाल फार कमीच होतं. त्यातही गायकाचा आवाज ऎकून त्याचं कौतुक करावंसं वाटावं किंवा शब्दांनी उदास/आनंदी व्हावं हे अजूनच दुर्मिळ. असो. पण DCH मधला एकटा फिरणारा आमीर आठवला आणि पुन्हा एकदा त्याची लवस्टोरी बघावी असं वाटलं. मग म्हटलं राहूच दे. आजपर्यंत एकदाही असं झालं नाहीये की DCH पाहिलाय आणि उदास झाले नाहीये. खरंतर त्याचा शेवट किती सुखदायी आहे अगदी positive ...त्यातली अवखळ प्रीति झिंटा,उनाड आमीर, विचारी अक्षय आणि मजेशीर सैफ आणि त्यांची ती निखळ मैत्री...सगळंच कसं हवंहवसं...पण पण तरीही मनाला कसली खंत लागून राहते तो पाहिल्यावर माहीत नाही. विशेषत: रविवारी संध्याकाळी तर तो अजिबात पाहू नये. बरं झालं आज लिहिलंच याबद्दल ते. परत राहून गेलं असतं.
घाई करायचं कारण म्हणजे परवा संदीप २९ वर्षाचा झाला, लवकरच मीही होईन. मग वाटलं कशाला वेळच मिळत नाहीये किंवा मीच कुठल्यातरी तंद्रीत असते आणि खूप काही राहूनच जातय. बघताबघता सानू दोन महिन्यांची झाली. तिचे थोड्या दिवसांपूर्वीचे फोटो पाहून वाटलं अरे ही किती मोठी झाली, तिला सारखं बघत राहिलं पाहिजे, नाहीतर वर्षभराची होईल आणि तिला मनभरून पाहिलंच नाही असं वाटेल. बरं आपण मोठे होतोय म्हणजे आई-दादाही वयस्कर होताहेत. दम लागणारी आई आणि गोळ्या घेणारे दादा पाहिलं की पोटात कालवतं. वाटतं कुणीच मोठं नको व्हायला. मीही आणि तेही.
आमची ३री anniversary झाली मागच्या महिन्यात.बघता बघता इतकी वर्षे निघून गेली. ८ वर्षापूर्वीचा तो अजूनही डोळ्य़ांसमोरून जात नाही. त्याचं ते हसू संसारात हरवून जाण्याआधी त्याच्याबरोबर आपणही हसलं पाहिजे.
सानुसाठी आई-दादा घर सोडून इतके दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, फिरून सर्व दाखवलं पाहिजे. उद्या जातो म्हणतील तर काय करू? TV,laptop सर्व बंद करून नुसतं समोर बसून राहिलं पाहिजे त्यांच्या. आईच्या हातचं खाल्लं पाहिजे त्यात चुका न काढता...... सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री उशीरा झोपलं पाहिजे. अगदी आला आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला पाहिजे. काय करावं काही सुचत नाहिय़े.कुणीतरी थांबवता का रे हे संपणारे दिवस?
-विद्या.

Monday, February 16, 2009

प्रेमा तुझा रंग कसा?

नुकताच व्ह्यालेंटाईन्स डे झाला, झाला म्हणजे काय नेहमीसारखा एक शनिवार संपला. सकाळचे चहापाणी, Doctor ची भेट, मग थोडीफार खरेदी, घरी येऊन साफसफाई, जेवण-खाण आणि झोप. या सगळ्य़ामधे अगदी दुकानात जाऊनही साधे गुलाबाची फुलं कितीला होती हे बघणंही झालं नाही किंवा तो माझ्यासाठी घेईल का ही उत्सुकताही नाही की त्याने घेतलीच नाहीत म्हणून दु:खंही नाही. म्हणजे अगदी आई-दादांनी तो दिवस घालवावा तसा आम्ही पण घालवला म्हणायचा. अर्थात लग्नाच्या काही वर्षानंतर लोक असेच होत असतीलही, होय ना? :-) तर मी, आम्ही गेल्या थोड्या वर्षात साजरे केलेले १४ फेब्रुवारी आठवत होते, त्याबरोबरच बदलत जाणारं आमचं नातं आणि प्रेमही.
पहिल्या दोनेक वर्षी, किती बावळट होतो ना आम्ही, फुलांवर, ग्रीटिंग कार्डवर पैसे खर्च करायला.(म्हणजे मी तरी, मुलं काय नेहमीच व्यवहारी असतात म्हणा) :-)) पण त्या दिवशी त्याला न भेटता रहायला लागणं म्हणजे कुणीतरी काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं वाटलं असतं. ’मै उसके बिना जी नही सकती’ टाईप आमचं प्रेम. :-P मग पुढचे दोन वर्षं नोकरीसाठी दोन वेगळ्य़ा ठिकाणी, कधी वेगळ्याच देशात होतो. तिथेही मग त्याने साधं कार्डंही पाठवलं नाही म्हणून भांडणं, हिरमुसले होणं हेही झालं. पण तोपर्यंत आम्ही १४ फेब. ला न भॆटता राहू शकतो हे मनाने स्विकारलं होतं, अर्थातच आम्ही मोठे झालो होतो बहुतेक. :-) लग्नानंतरही तसं फारसं नाविन्य नव्हतंच राहिलं काही पण पहिला दिवाळी-दसरा कसा साजरा करतो तसा हाही दिवस साजरा करुन घेतला. आजकाल पहिल्या वर्षातल्या सणात, दोघांचे वाढदिवस, साखरपुड्याची anniversary, etc पण येतात बरं का. असो. तर नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर उरलं होतं ते आमचं सोबत रहाण्याने, एकमेकांबद्दल नवीन नवीन जाणून घेतल्यानंतरचं प्रेम. म्हणजे, मी दोन महिने सुट्टीला गेले तेव्हा, तो एकटा कसा राहील, काय खाईल, इ. काळजीवाहू प्रेम.
पण या सगळ्यापेक्षा, हा १४ फेब्रुवारी वेगळाच होता. अगदी अगदी वेगळा. विशेषत: गेला एक आठवडा जसा गेला त्यानंतर अजूनच. मागच्या शनिवारी Doctor ने बेड-रेस्ट सांगितली मला.शनिवारचा दिवस आम्ही दोघेही जरा घाबरलेलेच होतो, अचानक admit व्हायला सांगितल्यावर. मग तिथे राहिलेले ६/७ तासही कित्येक महिन्यांसारखे वाटले. शुभांगी-राम आले होते म्हणा धीर द्यायला, पण त्यादिवशी उगाचच आपण कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायला अजूनही किती लहान आहे असं वाटलं. आई-दादा असते तर किती बरं झालं असतं ना. असो.
घरी आल्यानंतर त्याने माझी जशी काळजी घेतली ते पाहून कसंसंच होतं होतं. मी आमच्या दादांना आजोबांची आणि आईला आमची अशी सेवा करताना पाहिलं आहे. पण त्यासर्वामधे आणि नवऱ्याने करण्यामधे कितीतरी फरक होता. त्याने अगदी उठवण्यापासून, परत गादिवर आणून झोपवणे, पाणी-जेवण अगदी हातात आणून देणे आणि नुसते पायमोजे घालणेही मला जमत नाही म्हणून पळत येऊन ते घालून देणे, हे सर्व (आई-वडील सोडून) कुणीतरी माझ्यासाठी करण्याची पहिलीच वेळ होती.मी कधी काही काम करायला उठले तर, तू जाऊन बैस पाहू म्हणणारा तो वेगळाच वाटत होता मला. :-) हे सर्व तो करत असताना मला जाणवलं की आमचं ते एकेकाळी फिल्मी वाटणारं प्रेम आता कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर आहे. तो माझ्यासाठी इतकं करू शकतॊ हे कधी माहितच नव्ह्तं मला, इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही त्याचा वेगळाच पैलू मला दिसला होता. माणूस अंथरूणाला खिळल्यावर त्याला बरेच साक्षात्कार होत असावेत, कोण आपलं, कोण परकं याचे. लग्नाच्या बंधनात जेव्हा माणूस अडकतो तेव्हा किती काय-काय वचनं तो देऊन बसतो ना? म्हणजे सप्तपदी चालताना किंवा 'Do you promise to be with her in Sickness and Health?' याला ’I Do' म्हणताना कुणाला कल्पनाही नसेल पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं.
काल रात्री तो झोपल्यावर त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून जे प्रेम वाटत होतं, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे फक्त थोडे दिवस, कारण आणखी थोड्या दिवसांत हे नातं अजूनच वेगळं होणार आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. :-)
-विद्या.

Wednesday, January 28, 2009

मी खूष आहे !!

आता हे जाहीर करण्याची काय गरज? तर ही जाहीरात नाही फक्त एक statement आहे. झालं असं की खूप दिवसांपासून मला इच्छा होत होती एक भाजी खाण्याची, शेंगसोला. आता कितीतरी लोकांना हे नाव माहितही नसेल. संक्रातीच्या आधी, भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतात. पण मग त्याला लागणाऱ्या भाज्याही विचित्रच आहेत. पावटा, ओला हरभरा, वांगं, गाजर, शेंगदाणे, बोरं इ. :-) एकतर हे combination किती odd आणि तेही अमेरिकेत यातला ओला हरभरा, ताजा पावटा मिळणं अजून दुर्लभ. पण यावेळी माझं नशीब जोरावर होतं. मला या सर्व भाज्या मिळल्या अगदी ताज्या. आणि भाजी केल्यावर त्याची चवही अगदी आई करते तशीच....... :-P मग त्याबरोबर तीळ लावलेली बाजरीचीच भाकरी हवी. :-) ते पीठ काय मिळतंच, पण चक्क जे मिळालं त्याची एक अखंड भाकरीही झाली. नाहीतर दोन-तीन तुकडे पडल्याशिवाय भाकरी काही होत नाही इथे. एकूण काय तर मला जसा हवा तसा शेंगसोला आणि भाकरीचा बेत पार पडला. अगदी संदीपला वाटीभरच मिळेल असं सांगून उरलेला सर्व संपवूनही टाकला आणि तृप्तीची एक ढेकर दिली................. :-) ........... म्हणून मी खूष आहे!!!
हे सगळं लिहिण्याचं कारण असं की ’मी खूष आहे’ जेव्हा असं म्हणत होते तेव्हा लक्षात आलं की आजकाल दिवसभरात किंवा अगदी महिन्याभरात आपण असं कितीवेळा म्हणतो की मी आज खूष आहे? त्यासाठी मग अगदी छोटं कारण असो नाहीतर खूप मोठं. मग स्वत:बरोबरच बाकी लोकांचं निरीक्षण करताना दिसलं की आजूबाजूलाही कितीतरी लोकं आहेत की ज्यांना ’I am happy today !' असं म्हणायला अगदी जीवावर येतं. दिवसभरात आपल्याला आनंदी असण्यासाठी एक कारण मिळू नये?
एखाद्या सोबत काम करणाऱ्या माणसाने म्हटलं, how are you? तर आपण पटकन 'Good' म्हणून सोडून देतो, तेच एखाद्या प्रेमळ मित्राने विचारले, ’काय रे कसा आहेस’, तर ’अरे एकदम मजेत’ असं म्हणायला काय पैसे पडतात का? मी समजू शकते की आपली दु:खं जवळच्याच माणसांना सांगता येतात, पण म्हणून रडतच रहायचं? आज काय खूप थंडीच आहे, उद्या काय कामच खूप होतं, परवा अजून काहीतरी.
एका व्यक्तीला जुन्या नोकरीत रहायचा अगदी कंटाळा आला होता. मग नोकरी शोधण्याची मारामार कशी चालू आहे याबद्दल दु:खं. नवीन नोकरी मिळाली तर पूर्वीचीच कशी बरी होती याचं रडगाणं. मग म्हटलं बाबा घरी जाऊन ये. आता भारतात आई-बाबांना भेटलास, सही वाटत असेल ना? असं विचारलं तर कसलं काय. इथे येऊन आजारीच पडलॊ म्हणून दु:खं. काय त्रास आहे राव लोकांना?
असंच जर चालू राहिलं तर मग यांना आनंद तरी मिळतो कधी आणि कशात? बरं, यांचं आयुष्य काही अगदी वाईट चाललेलं नसतं. रोजचं जेवण-खाणं, रुटीन अगदी सिनेमाला जाणं, फिरायला जाणं अशी करमणूकही चालू असते. मग जवळच्या माणसाने विचारलं की बाबा कसा आहेस तर लगेच तोंड वाकड करायला काय होतं?
मला अजून एक गोष्ट आता ध्यानात आलीय की हे रडणारे लोक नुसते स्वत: रडत नाहीत तर समोरच्याला असं भासवून देतात की तुला काय,तुझं सर्व ठीक चालू आहे ना. म्हणजे नुसतं स्वत: दु:खी नाही रहायचं, समोरच्याला तू सुखी असण्याचा गुन्हा केलायस असं वागवायचं. मग अशा लोकांशी बोलताना स्वत:चा आनंदही व्यक्त करता येत नाही का तर ते दु:खी आहेत. जणू काही यांच्या दु:खाला समोरचाच जबाबदार आहे. या सर्व लोकांनी कदाचित आयुष्यात खरी दु:खं भोगलीच नाहीत बहुतेक म्हणून कारणं उकरून काढून रडत राहतात. पण खरं सांगू मला एक कळलं आहे, Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it.
तर एकूण काय की ’मी खूष आहे’ हे म्हणणं प्रत्येकाच्या ’बस की बात नही’. होय ना? जमलं तर स्वत:ला कधी हा प्रश्न विचारून बघा काय उत्तर मिळतं. :-)
मधे एकदा एका जुन्या ’मित्राने’ विचारलं, ’कशी आहेस गं? घरचे सर्व मजेत ना? संसार कसा चाललाय?’ आणि सर्वात शेवटचा त्याचा प्रश्न होता,’ सुखी आहेस ना?’ त्या प्रश्नावर खरंच मला एका क्षणात माझ्याकडे असणार्या सर्व गोष्टींची जणू यादीच डोळयासमोर दिसली आणि एक मिनिट विचार करून समाधानाने उत्तर दिलं,’ होय, सुखी आहे मी. :-) ’ त्यावर त्याने फक्त ’:-)’ उत्तर दिलं आणि निघून गेला. पण पुढचे पाच मिनिटं मी सुन्न होऊन बसले होते.
-विद्या.
(खूप महिन्यांनी लिहित आहे आणि अगदी जसं डोक्यात येतंय तसं. गोड मानून वाचून घ्यावे ही विनंती. :-) )