अनिकेतच्या ब्लॉगवरची गेली दोन पोस्ट वाचली आणि मला पण उगाचच जुने दिवस आठवायला लागले. तसं पाहिलं तर फार काही जुनी गोष्ट नाही म्हणा ही पण झालीच की तरी तीन वर्षं. तेव्हाची मी आणि आताची यात जमीन-आसमानचा फरक आहे असं वाटलं. आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी किती छगडावं याला काहीच मर्यादा नव्हती तेव्हा आणि आता, रस्ता पाहून आधीच पळून जावंसं वाटतं. असो. उगाच रडून जुन्या आठवणीतील गंमत घालवायची नाहीये मला. मी विचार करत होते २००६ पासूनच सुरु करावं पण मग मध्येच २००४/५ पण घुसला त्यामुळे त्यांना आधी थारा द्यावा म्हणते. की त्याआधीपासून?....
तर ही गोष्ट २००१ ची सालची, जेव्हा मि अगदी नवीन नवीन BE पूर्ण करून मी एका कंपनीमधे चिकटले. ती सॉफ्टवेअर कंपनी नव्हती पण असो पगार मिळाल्याचे कारण असं म्हणून मी पण खूष होते. कंपनीतला पहिलाच दिवस,१७ ऑगस्ट, मी मस्त आवरून स्टाईलमधे आतेबहिणीच्या गाडीवरून गेटवर आले. तिथे नवीन जॉईन होण्याऱ्या लोकांचा घोळका मी पाहिला आणि तिथेच थांबले. आम्ही दोघीनी मग इकडे तिकडे कुणी चांगला मुलगा दिसतो का पहावं म्हटलं. त्यातल्या त्यात ’तो’च बरा असं आमचं ठरलं. :-) त्याने लाईट लेमन कलरचा शर्ट आणि काळी पॅंट घातली होती. सही दिसत होता एकदम. थोड्यावेळाने सर्वांना एका हॉलमधे एकत्र करून induction program सुरु झाला. मी तर काय १० मिनिटातच पेंगायला लागले होते. पण माझ्यासमोरच बसलेला तो होताच टाईमपासला. :-) वाटलं होतं ओळख होईल म्हणून पण त्याने जास्त काही भाव दिला नाही. :-(
दिवस असा तसा सरला. घरी जाताना त्या हॉलपासून कंपनी गेटपर्यंत एकटं जायचा कंटाळा आला होता. नवीन ओळखी तर काही झाल्या नव्हत्या. :-( मग पुढे जाणारा तो दिसला. ’Excuse me' मी मागून म्हणाले. त्याने वळून पाहिलं. ’सदाशिव पेठेला जाण्याची बस कुठे मिळेल?’ मला सर्व माहीत असूनही मी त्याला विचारलं. मग बोलत बोलत आम्ही सोबत चालायला लागलो. :-) जरा ओळख झाली. तो मला म्हणे,’ सॉफ्टवेअर इंजिनियर असून या कंपनीत काय करतेयस? बाकी कुठे मिळाली नाही वाटतं?’ मनात म्हटलं जरा आगाऊच दिसतोय. गेट्वर पोचलो, चला आपलं काम झालं. त्याला बाय करून मी गेले. तो दिवस आणि नंतरही कित्येक दिवस मग आम्ही त्या बसस्टॉपवर एकत्रच गेलो होतो. (त्याला म्हणे ’excuse me' म्हणणारी मी आणि माझा तो ड्रेस आजही आठवतो.जपून ठेवायला हवा होता ना?पण बसणार नाही आता. जाऊ दे.)
(मी विचार करतेय की मी इतकं डीटेल लिहिलं तर मला किती टाईप करावं लागेल. आणि वाचणाऱ्याला किती बोअर होईल? पण असू दे आता लिहितेच सर्व एकदाचं. वेळ लागला तर लागला,हळू हळू लिहिन आणि वाचणाऱ्याला बोअर होतं असेल तर मी काय करणार? )
पुढच्या दोन आठवड्यात आम्ही दोघेही एकाच ग्रुपमधे आलो होतो. अगदी स्वत: हात वर करून co-ordinators पण झालो होतो. त्यामुळे सगळीकडे सोबत फिरणं आलंच. :-) त्यात सर्वात आवडतं काम म्हणजे library time. तिथे जाऊन आम्ही दबक्या आवाजात गप्पा मारत बसायचो. संध्याकाळी कोपऱ्यावर रसमलाई खायचो आणि मगच घरी जायचो. १५-२० दिवस झाले असतील आणि मला कळलं की तो कसलीतरी परीक्षा देत आहे. पाहिलं तर म्हणे मला फायटर पायलट व्हायचय.खरं तर त्याची पर्सनॅलिटी पायलटला शोभणारीच. उंच,मध्यम बांधा, ताठ सरळ खांदे, उभं राहतानाही दोन्ही पायांवर भर देऊन उभा आणि ओठावर कायम हसू. त्याचा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सुरु होता. एकदा मी म्हटलं बघ त्यातली तू ही एक लेवल पास झालास तर तू मला पार्टी देणार. :-) तो ’हो’ म्हणाला होता. त्याला ८ दिवस banglore ला जायचं होतं टेस्टला. तो निघताना बाय म्हणून मी शनिवारी निघून गेले पण सोमवारी मात्र फार चुकल्यासारखं वाटलं. एकच आठवडा ना? असू दे. म्हणून मी कामाला लागले.
पुढ्च्या सोमवारी मी उत्साहाने कामावर गेले, पण हा काही दिसला नाही. मी हिरमुसले. :-( त्याच्यासाठी त्याच्या आवडत्या गोळ्याही (Alpenliebe) मी घेऊन आले होते. :( बुधवारी मात्र माझी सहनशक्ती संपली. पण माझ्याकडे साधा त्याचा घरचा नंबरही नव्हता. आणि अचानक आठवलं की आम्ही दोघांनी एकाच बूथवरून फोन केले होते घरी आणि कचरा खाली टाकायचा नाही म्हणून त्याची ती रिसिट मी पर्समधे टाकली होती. त्यावर मला त्याचा घरचा नंबर मिळाला. पण एका मुलाच्या घरी फोन करायचा? तोही १५ दिवसाची ओळख असताना? मग गुरुवार,शुक्रवारही फोन टाळला. दोन आठवडे झाले तरी हा का नाही आला याचा विचार काही जाईना. शेवटी त्याच्या घरी फोन केलाच. तर तिकडे अजबच कहाणी. हा म्हणे घरीही आला नव्हता. उलट त्याची आजी गेली होती आणि तो तरीही घरी नाही म्हणून घरचेच चिंतेत. आता काय बोलणार?मी नाराज होऊन फोन ठेवून दिला. :( शनिवार-रविवार असेच गेले.
सोमवारी मी Learning Center ला पाय ठेवला आणि याच्या स्मितहास्याने माझं स्वागत केलं. :-ड माझे होते नव्हते ते सर्व दात बाहेर. मग विचारले,’ काय रे काय झाले? पास झालास की नाही? ’ तो थोडं हसतच,’नाही?’. ’का??????’. त्याने त्याची थोडी तुटलेली करंगळी दाखवली म्हणे,’याच्यामुळे रिजेक्ट झालो’. म्हटलं हे काही कारण आहे का रे? उगाचच मी थोडं समजावण्याचा प्रयत्न करून कामाला निघून गेले. संध्याकाळी मात्र, निघताना त्याचा तो उदास पण ह्सण्याचा प्रयत्न करणारा चेहरा पाहून कसंतरी झालं. म्हटलं चल जरा बसू कुठेतरी. मग गप्पा मारत त्या दिवशी बराच वेळ बसलो. तेव्हा कुठे खरं कारण कळलं.तो म्हणे dextro cardiac आहे. म्हणजे काय तर त्याचे ह्र्दय उजव्या बाजूला आहे. आणि लाखांत अशी एखादीच केस असते ज्याचे बाकीचे अवयव पण उलट्या बाजूला असतात. तर आमचे हे साहेब लाखांत एक होते. :-) क्षणभर वाटलं खरच जगावेगळा आहे हा, असं असतं का काही? त्यालाही हे माहीत नव्हतं. अगदी शेवटच्या पायरीपर्यंत जाऊन त्याला केवळ मेडिकल मुळे नकार देण्यात आला होता. :( त्या दिवशीच्या गप्पांनी आम्हाला खूप जवळ आणलं होतं.
काही दिवसांनी मी गाडी घ्यायचं ठरवलं. त्यादिवशी मी सुट्टी घेतली होती. आता एखादा दिवस सुट्टी घेतली तरी एकमेकांना फरक पडू लागला होता. दुसऱ्या दिवशी नवीन गाडी घेऊन मस्तपैकी ऑफिसला आले आणि आत्याला फोन करायचीच विसरले पोचल्याचा. झालं!!!!! मी पोचले की नाही म्हणून आत्याने होते नव्हते ते सर्व फोन लावले होते आणि मी सांगायच्या आधी सर्वांना समजले की मी नवीन गाडी घेतलीय. त्याच दिवशी एका पार्टीसाठी सर्वांना बाहेर जायचे होते. मी आधीच सांगितले की माझ्यासोबत गाडीवर तोच येईल म्हणून. सकाळी गर्दी कमी असताना ठीक आहे, पण संध्याकाळी मी थोडीच एकटी जाणार होते? तर मग मी पुढे आणि तो मागे अशी डळमळणारी आमची गाडी सुरु झाली. मागून सूचना देत, मध्येच स्वत: हाताने वळण घेत तो मला शिकवत होता. पार्टीला सुखरुप पोचलो.नंतर त्याला बससाठी सोडून मी घरी निघून गेले आणि त्याचा फोन..पोचलीस का? अरे??? २ मिनिटांच्या रस्त्यासाठीही त्याने मला फोन केला होता की पोचलीस की नाही म्हणून. :-) प्रेमात सर्वजण असेच करतात का? :-)
थोड्या दिवसांत असं झालं होतं की नोकरी लागली, तिथे सेटलही झालो, पण पुढे काय हा प्रश्न आम्हाला छलत होता. त्याचं एक स्वप्न तर अपूरच राहिलं होतं. मग आम्ही ठरवलं की GRE साठी सोबत अभ्यास करायचा. अभ्यास कमी आणि गप्पाच जास्त व्हायच्या हे सांगायलाच नको. :-) बघता बघता दिवाळी आली. Traditional day साठी सामान हवं म्हणून त्याला नको असतानाही सोबत घेऊन फिरले. :-) नाही म्हणत त्याने मोठ्या कौतुकाने खरेदीत भाग घेतला. पण नेमके त्याच दिवशी आम्हाला एका Diesel Engine AssemblyTraining साठी बोलावलं होतं. आता मी साडी नेसून कसं करणार हे? पणतरी गेलेच नेसून.गेल्या गेल्या माझ्यावरची त्याची नजर काही हटत नव्हती आणि तो असं बघताना बाकीचे पहात आहेत हे बघून मला अवघडल्या सारखं होत होतं. नंतर पदर खोचून त्याच्यासोबत Assembly करताना त्याचं मला पाहणं फार सुखावत होतं. दिवाळीत सुट्टीचे चार दिवस भेटणार नाही याचं दु:खही होतंच. पण घरच्यांसाठी खरेदीचं कारण काढून परत दोघे फिरत बसलो. उरलेली उणीव फोनने भरून काढली. त्याच्या घरी, आईशी पहिल्यांदाच बोलले आणि खूष झाले. :-)
हे सर्व झाले मोठे,महत्वाचे क्षण.त्याहूनही जास्त जवळचे ते छोटे,छोटे रोज घडणारे किस्से होते. तो Production Engineer, त्यामुळे त्याचं काम नेहमी shop floor ला आणि मी IT Department ला. त्यामुळे आमची शिफ्ट वेगळी आणि जागाही. तरीही कधी एकाच वेळेला जेवायला मिळालं किंवा त्यात एकत्र न बसता नुसतं पहायला मिळालं तरी किती मस्त वाटायचं. चुकून कधी कॉफी प्यायला किंवा नाष्टाही सोबत करायला मिळाला तर स्वर्गसुखं वाटे. कधी मी कारण काढून त्याच्या Dept ला भटकले किंवा तो माझ्याकडे आला तर, तिथल्या workers,managers च्या नजरा चुकवत बोलणं किती अवघड तरी हवंहवसं वाटायचं. तॊ रात्रीच्या शिफ्टला असताना त्याला फोन केला तर हमखास कोणीतरी दुसरा उचलत असे. मग मी इंग्रजीत विचारायचे ’May I speak to Sandeep please?' तो वर्कर मग ओरडणार.....’साहेब....तुमचा फोन आहे.’ :-) एकदा त्याने मला सांगितलं की लोक विचारतात की ती इंग्रजीत का बोलते. मग लगेचच दुसऱ्या दिवशी मी मराठीत. ;-) ’निरोप पोचलेला दिसतोय...’ त्याला टोमणा बसला. किती छोटी गोष्टं,पण फोनवर बोलायला मिळणं ही पर्वणी वाटायची तेव्हा.कधी कधी त्याच्या हातात लोखंडाचे बारीक कण जात असत काम करताना. मग मी उगाचच त्याचा हात हातात घेऊन टोकरत बसायचे. :-) अगदी तो कित्त्त्त्ती कष्टं करत आहे ना असं वाटत. तर कधी तो माझ्या डेस्कवर यायचा आणि मी कौतुकाने लिहिलेला कोड, काही स्क्रीन्स दाखवायचे. किती बावळट होतो ना?
एकदा कंपनीत जाताना माझी गाडी खराब म्हणून मी शेजाऱ्यासोबत गेले होते. अवघडून बसल्याने, त्याच्या गाडीच्या मागच्या चाकात माझा पाय गेला आणि मग काय मला कारणच मिळालं.कंपनीतून सुट्टी घेऊन मी त्याच्याकडे गेले.त्याची रात्रीची शिफ्ट होती ना. :-) तो मग त्याचा दुपारचा डबा घेऊन आला,हाताने मला भरवला आणि मी त्याला. ( अर्थात माझ्या पायाला लागले होते, हाताला नाही तरीही. :-) ) मग उचलून घेऊन हात पण घुवायला नेला. मला अगदी असाच समर्थ तरीही प्रेमळ साथीदार हवा होता,ज्याच्या हातात अगदी सुरक्षीत वाटावं असं त्यादिवशी वाटलं.
अरे हो, आमचा अभ्यास अजून चालुच होता बरं का. शेवटी आम्ही परिक्षेची तारीख नक्की केली. त्यासाठी मुंबईला जावे लागणार होते. त्यामुळे माझ्यासोबत माझे दादा येणार हे नक्की होते. आता काय करायचे? त्यादिवशी सकाळी परिक्षा दिली, उजेड पाडलाच. संध्याकाळी परत पुण्याला येताना कितीही टाळले तरी आमचे गुण बाबांना दिसलेच होते. तेव्हा ते काही बोलले नव्हते.
एक सांगायचं राहिलंच. आमचं हे प्रेम चालू असताना, माझ्यासाठी मुले पाहण्याचा कार्यक्रम चालू झाला होताच. किती लोकांना टाळणार आणि काय कारण सांगणार? खरं सांगू का? मला तेव्हा त्याच्याशी लगेचच लग्न करायचच होतं असं नाही पण दुसऱ्या कुणाशीही करायचं नव्हतं. २१ हे काय लग्नाचं वय आहे का? तर हे असे पाहण्याचे कार्यक्रम करत, टाळत मी अभ्यासाची, नोकरीत कामाची आणि जमेल तशी प्रेमाची कसरत करत होते. आणि एक दिवस तो दिवस उजाडलाच.
कोल्हापूरचे पाहुणे येऊन गेले होते. मुलगा काळा,टकला आणि खेडवळ आहे ही कारणे नकाराला पुरेशी होती. त्याच्यासोबत आलेला १२ लोकांचा गोतावळाही भरीला होताच नकारात. पण मलाच कंटाळा आला होता या सर्वाचा आणि मी म्हणाले की मला फकत त्याच्याशीच लग्न करायचे आहे. मला तो आवडतो. (आई-बाबांसमोर ’माझे त्याच्यावर प्रेम आहे’ हे म्हणणे किती awkward वाटते माहीत आहे का?) मग आईचि रडारड, दादांची चिडाचिड, बहीणींची घुसमट आणि भावाचा बाळबोध प्रश्न, हे सर्व झाल्यावर मी हरले. हो लगेचच आणि म्हणाले की तुम्ही त्याला सांगा हे सर्व. हो, कारण मला भीती होती की माझी नोकरीही बंद झाली तर? त्यापेक्षा प्रेम सोडलेले बरे ना? दुसऱ्या दिवशी मी,दादा आणि तो, स्वारगेटच्या कुठल्यातरी हॉटेलात बसून बोलत होतो. दादांचं एक वाक्य तो अजूनही आठवून मला चिडवतो,’ज्या गावाला जायचच नाही ती बस कशाला पकडायची?’ काय दम होता आमच्या अंगात भांडायला? जेमतेम वर्षभराची नोकरी आणि बाकी काही नाही. दादा आम्हाला समजावुन परत गेले होते. मी आणि तो उद्वस्त....
ठरवलं की आता नाही भेटायचं, नाही बोलायचं. अगदी ठरवून वेगवेगळ्या लोकांबरोबर फिरायचं म्हणून बाहेर पडलेले आम्ही एकाच ठिकाणी आलो होतो. :-) काय आनंद झाला होता आम्हाला. किती फालतू प्रयत्न होता आमचा. नुसतं भेटू नका असं सांगून सोडून दिल्यावर कोणीतरी ऎकणार आहे का? १०-१५ दिवस अगदी प्रेमभंगाच्या दु:खात बुडालेले आम्ही पुन्हा भेटू लागलो आणि ये रे मागल्या.
आमचं हे प्रकरण चालुच असलं तरी आम्हाला आता एक वर्षापेक्षा जास्त दिवस उलटले होते.मी आत्याकडून बाहेर पडून रुमवर राहू लागले होते. GRE चा विचार तर मागेच पडला होता.मग मी एकाद्या चांगल्या software कंपनीत जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. १/२ interview आले आणि गेले पण. शेवटी त्यानेच माझी तयारी करून घेतली आणि मी चक्क सर्व टेस्ट,interview पास झाले. ज्यादिवशी मला निकाल कळला, मला काहीच सुचत नव्हते. कारण मला त्यासाठी त्रिवेंद्रमला जावे लागणार होते.
आयुष्यात कधी विचारही केला नव्हता की असे काही होईल. ज्याला रोज बघतो त्याला सोडून राह्यचे, हजारो मैल दूर? त्यानेच मग समजावले की ट्रेनिंग संपल्यावर आहेच की सोबत.तोवर जरा कळ काढ.तेव्हा माहीत नव्हते आयुष्यात कितीतरी वाढून ठेवले होते. माझे कंपनीतले दिवस भराभर संपत होते.दिवसा काम, संध्याकाळई खरेदी आणि रात्री लिखाण. हो त्याच्यासाठी पत्र लिहित होते मी पुढचे सात दिवस वाचण्यासाठी सात पत्रंही लिहिली होती . :-) (कित्येक वर्षं झाली आता पत्र लिहून.) बघता बघता तो दिवस उजाडला. दूर जाण्याचा.आमचे घरट्यातले दिवस संपले होते.
-विद्या.