Monday, August 06, 2007

आवडतं काम?

सोमवारी सकाळी ९ च्या आत ऑफीसमध्ये येऊन बसलेय. म्हटलं चला अजून एक प्रयत्न करून पहावा, तुझ्यासारखं बनण्याचा. का? त्याचं एक कारण थोडीच आहे, पण मी तुझं कौतुक कशाला करू. :-) असो. तर बरेच दिवस तुला सांगावं म्हणत होते, अरे, तुला तो 'रॉड फार्मर' आठवतोय ना? आठवेलच म्हणा, रोज १०० मेल करून तू त्याला नको करून सोडलं होतंस. तर तो किती खडूस आहे हे तुला माहीत आहेच. मी केलेली एखादी मेल किंवा मेसेज तो ढूंकूनही बघत नाही. अशा या रॉडने परवा चक्क तुझ्याबद्दल विचारलं आणि तुझं कौतुकही केलं. म्हणे, 'I liked that guy'. अरे? म्हणजे आम्ही कामे करणारे लोक काहीच नाही? बरं तू इथे असताना तरी तो कुठे नीट बोलायचा तुझ्याशी? आणि आता तू नसताना म्हणे,'I liked that guy'. असो. तर मुद्द्याचा भाग असा की तू असं काय बरं केलं होतंस या माणसाला पटवायला? :-(
तुला वाटेल मी कामंच नाही करत तर मग असंच होणार ना? पण अरे मला वाटतं की हे कामंच किती बोअर आहे.मला ज्या technology वर काम करायचं ते तर आजतागायत मिळालं नाही. आणि इथल्या मॅनेजर बरोबर तर अजूनच त्रासदायक. त्यामुळे अगदी नको वाटतं बघ वेळेवर ऑफिसमध्ये यायला, काही काम मन लावून करायला. मी दिवसभर नुसताच टाईमपास करत बसते. मित्र-मैत्रिणींशी गप्पा, मेल, फोन, मोठा लंच ब्रेक इ. कामाबद्दल म्हणशील तर, तेही करते तसं बऱ्यापैकी, पण अगदीच शेवटच्या क्षणाला. जोपर्यंत गळ्याशी येत नाही तोपर्यंत आराम करते, मग थोडीफार धावपळ आणि I am done. तशा काही खूप तक्रारी नसतात माझ्याबद्दल(किंवा मला तरी असं वाटतं) तरीही दिवसाच्या शेवटी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपण पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत असं वाटतं. तुला खरं सांगते, माझं आवडतं काम असतं तर मी नक्की मन लावून केलं असतं. (पण आजकाल तर असं वाटतं की आवडतं काम मिळालं तरी मला ते करायला जमेल की नाही माहीत नाही. बरं, या 'आवडत्या कामाची' व्याख्या तरी काय नक्की? माहीत नाही. Oracle, Java, की अजून काही? )
मला सांग, तुला आवडायचं का इथलं काम, नाही ना? तरीही मग कसं केलंस तू ते? बघ ना, अगदी त्या कंटाळवाण्या मिटींग्स, MS Word आणि Excel मधले documents? किती नीरस काम आहे ते, पण तू ते केलंसच आणि ते ही इतकं व्यवस्थित.तुझे ते सर्व नीट ठेवलेले documents नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही. तू एव्ह्ढा मन लावून का काम करायचास ते मला आजपर्यंत कळलं नव्हतं. अरे, या अशा कंपन्यांमध्ये नुसते दिखाऊ कामे चालतात, कुणी खऱ्या कामाला किंमत देत नाही. तरीही तू करत राहिलास. म्हणजे 'कर्मण्येवाधिकारस्ये, मा फलेषु कदाचन' हे वचन अगदी रोज पाळत होतास की. मला वाटलं होतं की शेवटी काय झालं, तुला इथून गेल्यावरच तुला तुझं आवडतं काम मिळालं ना? तुझ्या कष्टांची योग्य ती किंमत मिळाली ना? पण...
पण...त्यादिवशी रॉडने तुझं नाव घेतल्यावर कळलं की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंच होतं, फक्त ते तुला माहीत नव्हतं आणि मलाही.... आवडतं काम असेल तर काय रे, ते तर सगळेच करतात, पण जे असेल ते काम मनापासून करणारे तुझ्यासारखे कमीच...होय ना?
-विद्या.