Wednesday, September 27, 2017

Tuesday, September 26, 2017

चिंता

     काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं. एकतर बाकीचे व्याप कमी असतात म्हणून या सर्व गोष्टींचेही लक्षात ठेवायचे? 
        त्यात कालच आम्ही गावातल्या लायब्ररीची पुस्तके परत करून आलो होतो, तीही २४ होती. अचानक नवऱ्याला आठवलं की परत देताना २५ दिली आहेत. आता तो तरी किती लक्षात ठेवणार? एकूण काय की आम्ही हे अशी पुस्तके सांभाळणे आणि वेळेत परत देणे यात बरेच घोळ करतो त्यामुळे शाळेतून अजून घेऊन न येणे हेच उत्तम असं मुलीला सांगितलं आहे. पण स्वनिकचा शाळेतील पहिलाच महिना आहे त्यामुळे त्याला हे सर्व नवीनच. आता त्याला अजूनच चिंता पडली की ते पुस्तक गावातल्या लायब्ररीत गेलंय. आता तेही नाही मिळालं तर पुढे काय? बिचारा चांगलाच काळजीत होता. शेवटी मी त्याला समजावलं, आपण उद्या जाऊन घेऊन येऊ आणि मग तू शाळेत दे. त्याला हे लगेच पटलं नाहीच. दोन चार वेळा समजावून सांगितल्यावर झोपून गेला. 
      आज पुस्तक आणून दिलं आणि ते त्यानं लगेच बॅगमध्येही टाकलं. झोपताना त्याला म्हटलंही,"आता नाही वाटत ना काळजी? झोप निवांत.". "हो झोपतो, आता मी काळजी नाही करतेय", असंही म्हणाला. 
       किस्सा छोटाच आणि त्यात झालेला घोळही लहान. उलट आज गावातल्या लायब्ररीतून ते पुस्तक आणायला गेल्यावर नवऱ्याला कळलं की हे असं नेहमी होतं आणि ते लोक दार महिन्याला अशी जमा झालेली पुस्तकं शाळेला परत नेऊन देतातही. आता हे सर्व पाहिलं तर किती सोप्प वाटतं. पण काळ रात्री स्वनिकच्या जीवाला किती घोर लागला होता. मला अजूनही आठवतं शाळेचं किंवा लायब्ररीचं पुस्तक मिळत नाहीये म्हणून चिंतेत कितीतरी रात्री मी अशा घालवल्या आहेत. एका बाईंचं,'शामची आई' सापडत नव्हतं मला. कितीतरी महिने मला त्याची चिंता पडली होती. आता हे सर्व खूप वेडं वाटतं, पण त्या वयात ती किती मोठी काळजी होती. 
      चप्पल हरवली, शाळेला उशीर झाला, गृहपाठ झाला नाहीये, डबा शाळेतच राहिला, डबा घरी राहिला, पेपरला अभ्यास झाला नाहीये, केसांना काळ्या रिबिन्स हव्या होत्या-लालच लावल्या आहेत, अशा कितीतरी चिंता घेऊन जगले. निदान त्यांनी तरी तसं राहू नये असं वाटतं. पोरांना या वयात खरंच अशा छोट्या गोष्टींची चिंता करावी लागली की वाईट वाटतं. ते जुने दिवस आठवतात. अशावेळी आपण केवळ त्यांना शांतपणे समजावून तो प्रश्न सोडवून दिला तरी किती दिलासा मिळतो बिचाऱ्यांना, नाही का? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, September 25, 2017

कसं काय जमतं?

    सकाळी शेवटी डॉकटरकडे जाऊन आले. तीन दिवस बिघडलेल्या पोटावर सर्व प्रयोग करून झाल्यावर, नाईलाजाने. अर्थात सर्व शहाण्या भारतीय नागरिकांप्रमाणे मीही दुकानातून औषध आणलं होतं आणि ज्या लोकांना मला बरं वाटत नाहीये माहित होतं त्या सर्वांनी सांगितलेले सर्व घरगुती उपचारही करून झाले होते. डॉक्टरकडे जाणे म्हणजे जणू तुमच्या या सर्व उपचारांची हारच! त्याच हरलेल्या, पडलेल्या मानेने आम्ही गेलो. सुरुवातीचे पैसे वगैरे घेण्यासारखी महत्वाची कामे झाल्यावर तपासण्यासारखी मामुली कामे करायची वाट बघत बसलो. समोर टीव्हीवर ढिगाने चौकोनी बॉक्स दिसत होते. त्यात इतके सगळे ऑप्शन होते की आजारी पडावं तर इथेच असा विचारही मनात येऊनगेला.

      थोड्या वेळाने छान आवरलेली नर्स आली आणि गोड हसून चेकिंग रूममध्ये घेऊन गेली. निदान आज तिच्यासमोर माझ्या गबाळेपणाचं स्पष्टीकरण द्यायला 'मी आजारी आहे' हे कारण तरी  होतं. ते मी स्वतःला पुन्हा एकदा समजावलं आणि चेकिंग रूममध्ये गेले. तिथे तिने मला प्रेमाने प्रश्न विचारले. कधीपासून पोट बिघडले आहे, किती वेळा जाऊन आला, कळ येऊन होतेय का, पातळ-चिकट, लाल काळी वगैरे टेक्शर वाले प्रश्नही तिने विचारले. ताप आहे का पाहिलं आणि बीपीही तपासलं. हे सर्व वर्णन मी सविस्तरपणे सांगताना नवऱ्याचा चेहरा कडू होऊन वाकडा झाला होता. 
तर त्या नर्सने त्याला विचारलंही,"तुम्ही ठीक आहे ना?". मग कुठे जरासा तो हसला आणि म्हणाला,"हो हो". 

     सर्व चौकशा झाल्यावर डॉकटर येतीलच लवकर असे सांगून ती निघून गेली आणि आम्हाला जाणवलं,"बिघडलेलं पोट" या विषयावर बोलतानाही कुणी इतकं हसून आणि प्रेमानं कसं बोलू शकतं?

       खरं सांगते, अशा गोष्टींची सवय नाहीये हो? हॉस्पिटल मध्ये जाऊन आजारी माणसापेक्षा बाकी लोकांची तोंड पाहून आजारी पडू असं वातावरण पाहिजे. त्याची सवय आहे. नर्सने केवळ रक्त काढताना नीट शीर तपासून जास्त त्रास न देता रक्त घेतलं तरी आनंद वाटावा याचीही आहे. पण एकतर आजारी माणूस त्यात त्याला हसायला सांगायचं आणि स्वतःही हसतमुख राहायचं? शक्यच नाही.  पुढे डॉक्टरही असाच हसमुख ! मग त्याने मी जे काही करत आहे तेच सर्व करत राहा असा 'विकतचा' सल्ला दिला. शिवाय जाताना दोन-चार पाने प्रिंटआऊटही वाचायला. (मी ते वाचणार नव्हते हे सांगायला नकोच !) 

      तर हे असे अनेक अनुभव आजवर आले. पोरांच्या डिलिव्हरी पासून हातपाय मोडून घेईपर्यंत. प्रत्येकवेळी, समोरचा माणूस रडत असो, टेन्शन मध्ये असो किंवा झोपेत, आपण हसत राहायचं, मुलं असतील तर त्यांच्याशी अजून.... गोड बोलायचं आणि आपलं काम करायचं. कसं करत असतील हे या नर्सेस? दोन्ही पोरांच्या डिलिव्हरी मध्ये सर्वात मोठा त्रास यांचा होता. का? तर इथे समोर आलेल्या पोराचं काय करायचं, झोपायचं कधी, जेवायचं काय असे महत्वाचे प्रश्न समोर असताना मध्यरात्री तीन वाजता आलेली नर्सही छान बोलत राहते. असं वाटायचं की जरा ब्रेक द्याना माझ्या तोंडालाही. किती वेळ हसणार मी हे असं तोंड वासून? त्यातल्या काहीजणी इतक्या पेशन्स वाल्या होत्या. बाळाला फीड कसं करायचं पासून डायपर पर्यंत छान समजावून सांगणाऱ्या. 

     हे असे अनुभव आले की भारतातल्या सर्व डॉकटर व्हिजिट्स आठवतात आणि त्यात आठवते ती म्हणजे 'लक्षात राहणारी नर्स' नसणं !! शक्य होईल तितका निर्विकार, रुक्ष चेहरा, हातात दिलेलं काम चुकूनही तोंडातून ब्र न काढता करून रुममधून निघून जाणं. चुकून काही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर न देणं किंवा एका शब्दात देणं, वगैरे पाहिलं आहे. समोर माणूस २० तास उभा असला तरी त्याच्याबद्दल कणभर दया न येणाऱ्या अनेक नर्स पाहिल्या. वाटतं, त्यांना कसं जमत असेल असं निर्विकार राहणं, किंवा कणभर रागीटपणाकडेच झुकणारं वागणं? अर्थात त्यात त्यांचे शैक्षिणक, आर्थिक स्तर त्याला कारणीभूत असेल का? त्यात त्यांच्याशी अजूनच तुसडेपणाने बोलणारे डॉक्टरही पाहिलेत. त्यांच्या वागण्याने या अशा शांत राहात असतील का? माहित नाही. 
     अजून या कामासाठी अयोग्य असूनही नोकरी करणाऱ्या आणि चक्क रुग्णाकडे दुर्लक्ष करणारे महाभाग निराळेच. त्यांना नोकरीवर ठेवणारे बेजबाबदार डॉक्टर तर अजून डेंजर. तो जरा जास्तच गंभीर विषय आहे. असो. 
     मुलाच्या जन्माच्यावेळी हॅलोविन होता. तेंव्हा रात्री १२ वाजता घाबरवणारा मेकअप करुनही तितक्याच उत्साहाने मदत करणाऱ्या नर्स मी पाहिल्या आहेत. अशा वेळी कितीही नाही म्हटलं तरी तुलना होणं साहजिकच आहे. रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. नाही का? 

विद्या भुतकर. 

Sunday, September 24, 2017

मान्यता ....

हे पोस्ट करावं की नाही विचार कर होते. मग म्हटलं का करायचा विचार? कशाला हवी कुणाची मान्यता किंवा कुणाच्या मान्यतेचा विचारही,प्रत्येकवेळी.



का लागते मला मान्यता ?
तुझी, प्रत्येक पावलागणिक
अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत
उठताना, बसताना
चालताना, झोपतानाही
घरातून बाहेर जाताना,
स्वतःच्याच घरात परत येताना,
अगदी भाजी आणताना
'कशी झालीय?' विचारताना
तर कधी 'कशी दिसतेय?' विचारताना
साडी नेसल्यावर पोट उघडं ठेवताना
पदर घेताना, पदर पडताना
मन मोडताना, मन जोडताना
तोंड सोडताना आणि आवरताना
श्वास घेताना अन सोडतानाही
बरं तो 'तू' कायम असतोसच
त्याचं रुप फक्त बदलत राहतं
कधी समाज म्हणून
कधी सहकारी म्हणून
कधी मित्र-मैत्रीण म्हणून
कधी नवरा, कधी आई
कधी सासू कधी बाप
कधी मुलगा किंवा मुलगी म्हणूनही.
या सर्वांच्या मान्यतेसाठी झगडत
आयुष्य कुठंवर काढायचं?

विद्या भुतकर. 

Monday, September 18, 2017

धपाटा

ती घरी आली. दमलेली, वैतागलेली.

तो: काय गं? काय झालं?

ती: तेच नाटक रे पुन्हा. कितीही काम केलं तरी पुरे होत नाहीच.

तो: जाऊ दे तू नको विचार करुस. जे काही आहे ते सरळ सांगून टाकायचं.

ती: ह्म्म्म... पण मग उगाच बाऊ होतो त्याचा. त्यापेक्षा सोडून देते.

तो: मी काय म्हणतो, तू मेलच कर मॅनेजरला सरळ. सगळं ऑफिशियल असलेलं बरं असतं. म्हणजे उद्या कुणी
विचारलं तरी तुझ्याकडे पुरावा राहील.

ती: बघते. काहीतरी करायलाच लागेल पण. नाहीतर हे असं घरावरही परिणाम होतो त्याचा. उगाच चिडचिड होते मग.

तो: हो. तुला ना ब्लॉक करायला जमत नाही. बाहेरचं काम बाहेरच सोडून यायचं. डोक्यात, मनात ठेवून यायचं नाही बघ.

ती: करते अरे प्रयत्न पण नाही जमत. जाऊ दे चल जरा स्वयंपाकाचं बघू.

तो: काय करायचं?

ती: करू रे काहीतरी....

तो: मी कांदा चिरायला घेतो.

ती: हम्म घे.

तो: किती घेऊ?

तो: काय?

ती: अगं कुठे लक्ष आहे? कांदे किती चिरायचे आहेत?

ती: अरे बघ ना तू. चार लोकांच्या भाजीला किती लागतात?

तो: बरं, दोन घेतोय. कसा चिरू?

ती:....

तो: टोमॅटो हवेत का? दोन चालतील?

ती: घे रे किती पाहिजे तितके. मला नको विचारूस. इथे एकतर वैताग आलाय त्यात तुझे प्रश्न. काही नको विचारूस.

तो: हे बघ हे असं असतं. तुला जरा ऑफिसात त्रास झाला की हे असे वाद सुरु होतात.

ती: अरे नाहीये माझं लक्ष तर तू बघ ना जरा. सगळं मीच पाहिलं का? एक दिवस तू स्वतः ठरव ना काय करायचं ?

तो: तुला ना काही बोलण्यात अर्थच नाहीये.

मना: बाबा, हे गणित सांगा ना कसं करायचं?
बाबा SSSSS बाबा SSSSS सांगा ना?

तो: (ओरडून) काय आहे? कालच सांगितलंय तुला? किती वेळा तेच तेच गणित सांगायचं? तुझं तू कर ना जरा? आणि हे काय? पेन्सिल नीट धर. किती वेळा तेच तेच सांगू?

ती: काय गं? डबा तसाच आणलास परत? काही अर्थ नाहीये या पोरांसाठी खपण्यात. सकाळ-सकाळी मी उठून डबा करून देते आणि ही पोरं असं सगळं न खाता आणतात.
(त्याला उद्देशून) अरे बघ ना जरा ती काय विचारतेय. आता त्यालाही मीच उत्तर देऊ का?

तो: दिलंय उत्तर मी तिला. तू कशाला आता माझ्यावर चिडतेयस?

मना: आई, मी टीव्ही लावू का?

ती आणि तो: ना SSSSSS ही !!

तरीही मनीने टीव्ही लावला आणि तिला धपाटा बसला ........

हिरमुसून ती निघून गेली....रडत रडत..

तिला अजूनही कळत नव्हतं, ऑफिस असो की घर, कशावरूनही आई-बाबा भांडतात तेंव्हा आपल्याला धपाटा कसा बसतो?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, September 13, 2017

एकदा काय झालं? (लघुतम् कथा)

     तो सकाळी उठला, डोळ्यांवर अजूनही ग्लानी होती. वर पंखा जोरजोरात फिरत होता. त्याचं वारं अंगाला झोंबत होतं. अंग जड झालं होतं. थोडा वेळ तो तसाच पडून राहिला पण तगमग होत होती. नाईलाजाने घड्याळाकडे पाहून त्याने अंगावरचं पांघरूण काढलं. अंग तापानं फणफणत होतं. तसंच बाथरूममध्ये जाऊन त्याने कसंबसं आवरलं. आंघोळ करावीच लागणार होती. इतक्या  उकाड्याचं असंच राहणं शक्यच नव्हतं. अंगावर पाण्याचे थेम्ब पडले तसा तो शहारला. दोन चार मिनिटांतच उरकून तो कडमडत बाहेर आला. कपडे इस्त्री करणं शक्य नव्हतंच. त्यातला त्यात बरा ती-शर्ट, पॅन्ट घालून तो तयार झाला.

       आता सगळ्यांत कठीण काम होतं. इतक्या उन्हाचं गाडीवरून इतक्या दूर जायचं. स्वतःला सांभाळत त्याने गाडी काढली. गाडीवर बसेपर्यंतच त्याला दम लागला होता. जीव सांभाळत, गाडीचा तोल सांभाळत गर्दीतून रस्ता काढत तो पुढे जात राहिला. डोळ्यांसमोर अंधारी आल्यावर त्याला काही सुचत नव्हतं. पार्किंग मध्ये पोचल्यावर त्याला हुश्श झालं. आता तिथून लिफ्टमधून जागेवर पोहोचेपर्यंत चक्कर येऊ नये इतकीच प्रार्थना करत चालत राहिला.

      हातातलं सामान जागेवर ठेवून दोन चार मिनिट खुर्चीत बसून राहिला. थोडं बरं वाटल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं, घड्याळ्याकडे बघत त्याने कॉफीचा कप घेऊन गाळून गेलेले त्राण गोळा केले आणि ब्रेकरूमकडे चालत राहिला. पोहोचत असतानाच त्याला तीआत पाठमोरी उभी दिसली. तिला पाठमोरं पाहूनही त्याला क्षणभर बरं वाटलं. शेजारच्या भिंतीला डोकं टेकवून थोडा वेळ उभा राहिला. ती दिसणार या कल्पनेनं त्याचं मन सुखावलं. आत जाऊन तो तिच्यासमोर उभा राहिला.

"हाय", ती हसून म्हणाली.

त्यानेही 'हाय' केलं.

"काय रे बरं वाटत नाहीये का तुला?", तिने काळजीनं विचारलं.

"हां जरा कणकण आहे.", तो हळू आवाजात बोलला.

"मग आलास कशाला? सुट्टी घ्यायची ना?", ती.

तो नुसताच हसला.

"ते काही नाही, घरी जा बरं. मी मॅनेजरला सांगते." ती हक्कानं बोलली.

तो तिच्यासोबत जागेवर परतताना त्याला चालवत नव्हतं.

"हे बघ कसा जाशील घरी? चल मीच येते सोडायला.", म्हणून ती डेस्कवरून गाडीची किल्ली घ्य्यायला गेली.

तो तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं आणि भीतीही होती आपण काय करतोय याची.
तिची ओढ त्याला आज इतक्या दूर घेऊन आली होती.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, September 11, 2017

थँक्यू बायको !

    या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात जायचं होतं. नुकतीच नवी नोकरी लागल्याने मला जास्त रजा मिळणार नव्हतीच. पण मुलं कंटाळली होती आणि त्यांना केव्हा एकदा भारतात जाऊ असं झालं होतं. असेच एक दिवस नवऱ्याला म्हटले तुम्ही तिघे पुढे गेला आणि मी १५ दिवसांनी आले तर? गंमत म्हणून बोललेला हा विचार पुढे प्रत्यक्षात आला. मुलं आणि संदीप पुढे जाणार आणि मी नंतर जाणार असं ठरलं. अर्थात हे सोप्पं नव्हतंच. 

      मुळात दोन मुलांना घेऊन ३०-३२ तास एकट्याने प्रवास करणे अतिशय कंटाळवाणं आणि त्रासदायक काम आहे. त्यात एअरपोर्टच्या सिक्युरिटी, सामान, विचित्र वेळा, बेचव जेवण वगैरे सर्व आलंच. मी एका चांगल्या बायकोचं कर्तव्य करत नवऱ्याच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला, त्याला ढिगाने सूचना  दिल्या आणि पोरांना बाय करताना ढसाढसा रडलेही. सर्वजण नीट घरी पोचले, आठवडाभर राहिलेही पुण्यात. मीही न राहवून १५ ऐवजी ७च दिवसात पळून गेले. 

     आता या सात दिवसांत मी इकडे दुःखात सतत टीव्ही बघत, अजिबात स्वयंपाक वगैरे न करता दिवस काढत होते तर तिकडे नवऱ्याला ढिगाने मदत होती. सासू-सासरे, दीर-जाऊ, घरी कामाला येणाऱ्या मावशी, एकदा तर माझ्या मैत्रिणीही त्यांच्यासाठी डबा घेऊन गेल्या होत्या. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मला असा अनुभव येण्याची. याआधीही मी एक दोनदा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले असताना नवऱ्याची काळजी करणारे लोक पाहिले आहेत. शिवाय सासूबाईंना वाटणारे मुलाचे कौतुक आहेच. त्याच ठिकाणी मी असते तर? आणि इथेच आजच्या पोस्टचा मुद्दा आहे. 

      लाखो-करोडो नवरे नोकऱ्यांसाठी परगावी असताना अनेकींना घर, नोकरी आणि मुलं सर्व सांभाळावं लागतं. खरंतर कुणासाठीही हे अतिशय अवघड काम आहे. पण नवऱ्याने एकट्याने मुलांना सांभाळणे, घर पाहणे या सर्वांचा इतका बाऊ अजूनही का केला जातो? उलट त्याला जी सहानभूती आणि मदत मिळते ती बाईला मिळाली तर बिचारी अजून काम करेल. खरं सांगायचं तर मी तर म्हणते,"Its not rocket science". ऑफिसमध्ये अनेक मोठं मोठी कामे करणाऱ्या नवऱ्याला पोरांच्या जेवायच्या वेळा पाळणं, झोपवणे वगैरे काही अवघड नाहीये. तरीही अशी परिस्थिती इतक्या कमी वेळा का पाहायला मिळते. असो. 

      बरं, नुसते बाकीचे लोक मदत करतात असे नाही, बायकांनाही आपल्या नवऱ्याचे कोण कौतुक वाटते. (अर्थात मलाही वाटले कारण मला एकटीला पोरांना सांभाळणे झेपणार नाही. लै ताप देतात. असो.) अनेकदा मी फेसबुक वगैरे वर मुलींचे पोस्ट पाहते, 'मी नसताना मुलांचे सर्व नीट करणाऱ्या' नवऱ्याचे कौतुक करणारे, Thank you for holding fort वगैरे. थँक्यू काय? तुमचाच नवरा आहे ना? आणि मुलं त्याचीही आहेत ना? मग थँक्यू कशाला? आणि तेही पब्लिकसमोर? हे कौतुक का? अर्थात अगदी 'नवऱ्याने आज मॅगी बनवून दिली' म्हणूनही कौतुक करणारे कमी नाहीत. माझं काय म्हणणं की असे किती पोस्ट्स आपण नवऱ्याचे पाहतो? बायकोने मॅगी बनवली म्हणून? उलट 'बघा नवऱ्याला मॅगी करून घालते' म्हणून बोलणारे कमी मिळणार नाहीत. असो. 

      अगदी परगावी जायचे राहू दे, मुलं आजारी असतानाही बायकोनेच कशाला सुट्टी घेतली पाहिजे? पोराला किती औषध द्यायचंय, काय खायला द्यायचं वगैरे बेसिक गोष्टी माहित असल्या म्हणजे झालं. महिन्या-दोन महिन्यात पोरं आजारी पडतात, सर्दी-खोकला ताप वगैरे. त्यासाठी 'त्याला आईच लागते' म्हणून आपणच का काम सोडून घरी बसायचे? करियर बद्दल मी बोलत नाहीयेच. माझं म्हणणं इतकंच की वडीलही मुलाची तितकीच काळजी घेऊ शकतात आणि प्रेम देऊ शकतात. 

     अर्थात आपण इतकाही विश्वास का दाखवू शकत नाही? समजा त्याने नाही दिलं पोटभर जेवायला किंवा मागे लागून नाही भरवलं तरी काय बिघडणारेय? भूक लागल्यावर येतीलच ना मागे,'खायला द्या' म्हणून? का मग आया मुलांना वडिलांकडे सोडत नाहीत? प्रत्येकवेळी आपलं आईपण सिद्ध करायची काय गरज आहे? मी जेव्हा एक आठवडा आधी निघून गेले तेंव्हा अनेकांनीआश्चर्य व्यक्त केलं. जणू मुलांना असं पुढे पाठवणारी आई म्हणजे इतकी इमोशनल कशी काय म्हणून. अशा लोकांना किंवा विचारांना घाबरून कुणी राहात असेल तर चूकच ते. कारण आई म्हणून तुम्ही मुलांसाठी काय करता ते चूक का बरोबर हे बाकी लोक कोण ठरवणारे? 

     मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. आजपर्यंत मी कुणा नवऱ्याचे पोस्ट पाहिले नाहीयेत,'थँक्यू बायको' वाले. यायचेच तर तेही दिसावेत अशी अपेक्षा. असो. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, September 06, 2017

बायकांचा घोळका आणि घोळक्यातल्या बायका......

     आज एक मिटिंग होती ऑफिसमध्ये आणि मध्यभागी एक डिरेक्टर बसलेला होता. मी पोचले तोवर बाकी बऱ्याच खुर्च्यांवर लोक बसले होते पण त्याच्या शेजारची एक खुर्ची रिकामी होती आणि दुसऱ्या बाजूला एक पुरुष बसलेला होता. मी जाऊन त्याच्याशेजारच्या खुर्चीत बसले. हे सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मी असं काहीतरी पाहण्याची. अर्थात शाळेत असताना, कॉलेजमध्ये दंगा करण्यासाठी पुढच्या खुर्च्या सोडून मागे बसून मजा केली आहे. पण त्याला वेगळं कारण असायचं. पुढे पुढे ऑफिसमध्येही हे पाहिलंय आणि वाटलं, का? का आपल्याला अशा मीटिंगमध्ये मोठ्या कुणा शेजारी तरी बसायची भीती असते किंवा तिथे बसताना क्षणभर विचार केला जातो. 

       नुसतं मीटिंगमध्येच नाही तर एखादी मोठी कॉन्फरन्स म्हणा. थोड्या दिवसांपूर्वी मी अशाच एका कॉन्फरंसला गेले होते. तिथं फारसं कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. आजूबाजूला पाहिलं आणि एक मधली रिकामी खुर्ची पाहून बसून घेतलं. ओळखीचं कुणी असेल, मित्र-मैत्रीण असेल तरी समजू शकतो. पण मी अनेकवेळा असं पाहिलंय की अनेक जणी बाजूला कुणी स्त्री असेल तर तिच्याजवळ जाऊन बसतात, ती ओळखीची असायलाच पाहिजे असं नाही. किंवा असंही असतं की दोन चार जणी एक कोपरा धरून बसतात. यात मी फक्त ऑफिसमधला संदर्भ देत आहे. मला प्रश्न पडतो की का प्रत्येक स्रीला असं घोळका करून बसायची गरज वाटत असेल? कितीही मोठ्या पदावर ती असू देत, मॅनेजर असो की अजून कुणी, अशा जमावामध्ये स्त्रियांची ठराविक वागणूक मी पाहिली आहे. बरं ती केवळ भारतीयच स्त्री नाही, अगदी इथे अमेरिकनही. 

       हे झालं फक्त बसण्याबद्दल. अशा एखाद्या ठिकाणी मीटिंगमध्ये, कॉन्फरन्स तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे किंवा एखादा वादाचा मुद्दा पुढे आणायचा आहे, अशा वेळी तर हा सहभाग अजून कमी दिसतो. अशा किती मिटिंग किंवा जमाव असतील जिथे पहिला प्रश्न एका स्त्रीने विचारला आहे. कदाचित पत्रकार वगैरे असेल एखादी पण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा अगदी पालक सभेमध्येही एखादी स्त्री उभी राहून पहिला प्रश्न विचारताना पाहिली नाहीये. ऑफिसमध्ये अनेक मुली, मैत्रिणी मोठ्या पदांवर पाहते. त्या आपलं काम उत्तमरीतीने करतात पण अशा कार्यक्रम, मिटिंग मध्ये त्यांचा सहभाग खूपच कमी जाणवतो. 

      ऑफिसच्या कामात वगैरे तरी ठीक आहे, पुढे जाऊन एखाद्या ऑफिसच्या पार्टीला जायचं असेल तर अनेक जणी नकार देतात किंवा जाण्याचं टाळतात. त्यातली कारणं, 'अरे कुणी ओळखीचं नाहीये तिथे', 'संध्याकाळी आहे, घरी स्वयंपाक करायचा आहे', 'रात्री घरी सोडायला कुणी नाहीये', 'मी ड्रिंक्स घेत नाही',.... अशी एक ना अनेक कारणं. त्या पार्टीमध्ये माझ्या कुणी ओळखीचं नाहीये म्हणून काय झालं? नवरा गेलाच असता ना? मग स्त्री म्हणून अशा ठिकाणी माघार का घेतात? मध्ये अशाच एका पार्टीमध्ये गेले होते, कुणीच ओळखीचं नव्हतं. आधी वाटलं उगाच आले. पण मग स्वतःच ओळख करून घेतली लोकांशी. अगदी २-४ मिनिट बोलले असेलएकेकाशी, पण ऑफिसमध्ये सर्व कामांत पुढे असताना अशा पार्टीमध्ये मागे का राहायचे? काय होतंय स्वतः ओळख करून घेतली तर? एखादा विषय काढून विश्वासाने लोकांशी बोललं तर? 

       या सर्व गोष्टी झाल्या ऑफिसमधल्या. भारतात किंवा अमेरिकेतही अनेक भारतीय ग्रुपमधील पार्ट्याना अनेक अनुभव आले ते अगदी एकसारखे होते. उदा: एखाद्या घरी कार्यक्रम आहे. एक जोडपं घरात येतं. पुढच्या पाच मिनिटांत त्यातून बाई वेगळी होऊन बायकांच्या घोळक्यात गेलेली असते. अगदी बाकीचे तिचे मित्र तिथे असले तरीही. मी अशाही ग्रुपमध्ये गेलेले आहे जिथे फक्त मी आणि नवराच सोबत आहे, बाकी सर्व अनोळखी तरीही नवऱ्याचा हात सोडून बायकांच्या घोळक्यात जायला होतं कारण सर्व जणी एकत्र बसलेल्या आहेत. कितीतरी वेळा विचार करते सर्वच जण एकत्र का बसत नाहीयेत. स्वयंपाकघरात सगळ्याजणी आणि बाहेर पुरुष. भारतात तर हे अगदीच सर्वत्र बघायला मिळेल. पण अमेरिकेत समवयस्क मित्र-मैत्रिणी असूनही हे असे घोळके बघते. 

       मग हळूहळू मी त्या घोळक्यात थोडा वेळ काढून पुन्हा दुसऱ्या घोळक्यात सहभाग घेऊ लागले. कारण अनेक वेळा सोफ्यावर बसून सर्व पुरुष एखाद्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यात स्त्रिया काहीच भाग घेत नाहीयेत असं पाहिलंय. सर्व विषयांमध्ये ज्ञान असूनही अशा ठिकाणी वाद घालणं किंवा चर्चेत सहभाग घेणं बायका टाळतात. का? आपलं मत सर्वांसमोर ठामपणे मांडता आलं पाहिजे. अर्थात हे सोप्प नाहीये. अनेक वेळा मी 'mansplaning' पाहिलं आहे. म्हणजे काय? तर मला माहित असलेली गोष्टी एखाद्या पुरुषाने विस्ताराने समजवणे अगदी सोप्या भाषेत. का? तर हिला तेही माहित नसेल म्हणून. किंवा 'आम्ही काय बोलतोय आणि ही काय बोलतेय' अशा नजराही पाहिल्या आहेत मी. माझं म्हणणं काय आहे? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहित नसतेच. म्हणून आपण त्या चर्चेत सहभाग का नाही घ्यायचा? विचारायचा एखादा प्रश्न, काय बिघडलं? हसणारे हसतील, त्यांचे दात दिसतील. 

      एखादा कार्यक्रम किंवा लग्न घेऊ, रात्री सर्वजण गप्पा मारत बसलेत. बायका एक एक करून निघून गेल्यात झोपायला. अशा किती स्त्रिया असतील ज्या 'मला नाही झोप येत' म्हणून बाहेर येऊन गप्पा मारतात? 'पाहुणे काय म्हणतील' हा विचार केला जातोच. बिचारी ती मागे राहिलेलीही जाऊन झोपून जाते. का नाही बसत बाहेर येऊन? आपलेच नातेवाईक आणि पाहुणे असूनही? या अशा गोष्टींची सुरुवात शाळेतच झालेली असते खरंतर. मैत्रीण नाही म्हणून मी हा क्लास घेत नाही, पिक्चर पाहायचा आहे पण मैत्रीण नाहीये एकही. बाकी सर्व मुलेच आहेत, इ. अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मी माझ्या पहिल्या नोकरीत असताना सर्वांसोबत सिंहगडला गेले होते. त्यात एकही मुलगी आली नव्हती. त्यावर नंतर चर्चा झाल्याचं मला कळलंच होतं. पण मला कळत नाही की बाकीच्या येत नाहीयेत म्हणून मी का मन मारायचं? 

        सहभाग घेण्याबद्दल अजून एक निरीक्षण. सर्वजण एकत्र बसलेत, कुठेही पार्टी असेल किंवा ऑफिसचा ग्रुप असेल किंवा अजून काही. कुणी म्हणालं,'तू गाणं म्हण ना?'. हा आग्रह एका मुलाला केला आणि मुलीला केला तर कुणी ते म्हणण्याची शक्यता जास्त वाटते? एखादीचा आवाज सुंदर असूनही का ती नकार देते? परवा गणपती विसर्जनाला बिल्डींगभोवतीच मिरवणूक काढली होती. लहान मुले मुली, मोठी माणसे नाचत होती. मला तर गणपती डान्सच येतो फक्त. पण अशा अनेक ठिकाणी मी पाहिलं आहे की नाचायची इच्छा असूनही कुठली स्त्री स्वतः पुढाकार घेत नाही. कुणीतरी तिला ओढून आणायचं, किंवा एखादी सुरुवात करणार, मग हळूहळू सगळ्याजणी येणार, तेही वेगवेगळं नाही, एका घोळक्यात नाचायचं? का? कसली भीती असते, लाज असते? इच्छा आहे ना नाचायची, मग घ्यायचं नाचून? अगदी अमेरिकेत अनेक भारतीय लहान मुलांच्या वाढदिवसाला  शेवटी असणाऱ्या डीजेच्या गाण्यांवरही कुणी नाचायला तयार होत नाही. 

         एखाद्या कार्यक्रमात पंगत बसणार म्हटलं तरी सर्वात पहिलं ताट घ्यायला बाई धजावत नाही. काय होतंय? म्हणेल कुणी काहीही, भूक लागलीय ना? ताट घ्यायचं आणि जेवायला बसायचं! कुणी ना कुणी घेणार असतंच ना? आपण व्हायचं पहिलं. या अशा अनेक गोष्टी मी अनेक वेळा वर्षानुवर्षं पाहात आले आहे. अनेक ठिकाणी मी आता पुढाकार घेते, कधी नाचायला,  कधी ताट वाढून घ्यायला, बाहेर बसलेल्या पुरुषांच्या घोळक्यात वाद घालायला. किंवा ऑफिसमध्ये एखादा अगदी बावळट प्रश्न का होईना विचारायला. 

        वाटतं, का मागं राहायचं? कशाची भीती बाळगायची? का लोकांचा विचार करायचा? आपल्याला बरोबरी हवी आहे ना? मग हे असं बारीक सारीक गोष्टींमध्ये मागे राहणं सोडून दिलं पाहिजे. मग ती एखादी गृहिणी असो किंवा मोठी मॅनेजर. आणि हो, समजा नसेल आपल्याला पडायचं घोळक्यातून बाहेर, निदान जी पडतेय तिला नावं ठेवणं तरी बंद केलं पाहिजे. पुरुषांनाही या अशा ठिकाणी कसं वागावं, त्या पुढे येणाऱ्या स्त्रीला सामावून कसं घ्यावं याची समज आली पाहिजे. तिला नावं ठेवण्यामध्ये आपण पुढाकार घेत नाहीये ना हे पाहिलं पाहिजे. 

       अनेक वेळा या विषयावर लिहायचं मनात यायचं पण राहून जात होतं. यातून कुणाच्या भावना दुखवायच्या नसून, स्वतःचं निरीक्षण करण्याचा विचार मांडायचा आहे. उलट कुणी असा विचार करून मागे राहत असेल तर तिला पुढे जाण्याचा सल्ला देण्याचा आहे. आपलं शिक्षण, आपली प्रतिभा आणि शक्ती सर्व असतानाही केवळ आत्मविश्वास कमी असल्याने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार केल्याने अनेकजणी  घोळक्यात अडकून राहतात. मग तो घरातला एखाद्या कार्यक्रमाचा असो किंवा ऑफिसमध्ये एखाद्या कॉन्फरन्सचा. मी काही खूप बंड वगैरे करायचं म्हणत नाहीये, पण या छोट्या गोष्टीतून बदल जरूर घडवू शकतो स्वतःमधे. तुमचं मत जरूर सांगा या विषयावर.

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, September 05, 2017

ब्रेक के बाद

गेले काही दिवस झाले पेजवर एक शब्दही लिहिला नाही. काहींनी आवर्जून मेसेज करून विचारलंही कुठे आहे म्हणून. वाटलं, चला इथे लोक आपली वाट बघतात, चांगलंच आहे. :) महिनाभर भारतात होते, त्यात गणपती-१५ ऑगस्ट, ऑफिसचं काम, खरेदी, परत यायची तयारी, अशी अनेक कामं होती. पहिले काही दिवस वेळ काढून लिहिलं पण जसे सणाचे दिवस आले, अगदीच वेळ मिळेनासा झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, बॉस्टनमध्ये रात्री मुलं झोपल्यावर निवांत लिहायला वेळ मिळत होता. भारतातून रात्री ऑफिसचं काम असल्याने लिहिण्यासाठीचा ठरलेला वेळ मिळेना. त्यामुळे एकूणच लिहिणं झालं नाही. 
      अनेकवेळा अशा वेळी मी अट्टाहासाने कुठून तरी वेळ काढून लिहिते, पण यावेळी वाटलं की लिहिणं कितीही आवडीचं असलं तरी त्या क्षणी भारतातील कार्यक्रमांची मजा घेणं महत्वाचं होतं. त्यामुळे उगाच ओढाताण न करता लिहिण्याला थोडा आराम दिला. वीकेंडला बॉस्टनमध्ये पोचले आणि कळत होतं की सोमवारपासून लिहायचं आहे. पण पुन्हा एकदा उगाच घाई न करता आराम करून घेतला आणि आज पहिला दिवस मिळाला लिहायला की लगेच लॅपटॉप घेऊन बसले. 
     कधी कधी वाटतं की इतकं काय महत्वाचं आहे रोजच लिहिणं? असंही काही ग्रेट लिहीत नाही आणि मी न लिहिण्याने कुणाचं काही अडतही नाही. एखादा दिवस राहिलं तर चालतंय की. पण लिहिण्याचा अट्टाहास करण्याचं एक कारण आहे. ४ चे १० होतात आणि १० दिवसांचे १० महिने कधी होतात कळतही नाही. मी माझा ब्लॉग लिहायला सुरु केला त्याला १० वर्षं होऊन गेली. आणि त्यात अनेक वेळा असं झालंय की एखादा छोटा ब्रेक वाढून दोन वर्षं झालाय आणि पुन्हा लिखाण सुरु करायलाही तितकाच वेळ निघून गेला. यावेळी तसं होऊ द्यायचं नाही असं ठरवल्याने ही घाई. 
      तर हे असं ठरवून पुन्हा सुरु करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण लिखाणासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ थोडे दिवस ब्रेक घेऊ म्हणून बाजूला राहतात आणि अनेक वर्षं लोटून जातात. सर्वात कॉमन उदाहरण म्हणजे 'व्यायाम आणि आहार' (खूपच शुद्ध मराठी होतंय ना?), 'डाएट आणि एक्सरसाइज'. अनेक वेळा नियमित व्यायाम आणि आहार चालू असतो, एखादा सण येतो आणि त्यात खंड पडतो. गणपती नंतर दसरा जातो, दिवाळी आणि न्यू ईयर पार्टीही होऊन जाते आणि तो खंड पडला होता हे विसरूनही जातो. पुन्हा एकदा त्या जुन्या रुटीनमध्ये जाण्यासाठी अशीच दोन वर्ष निघून जातात. 
      तीच गोष्ट एखाद्या आवडीची, हौसेची. एखादं पुस्तक वाचायची, चित्र काढायची, गाणं ऐकायची. अशा गोष्टी मागे पडून गेल्यावर त्या आपल्या आयुष्याचा भाग होत्या हे विसरून जातो. त्या क्षणाचा तो ब्रेक आठवणीने मोडून पुन्हा एकदा ती हौस टिकवणं, एखादी गोष्ट सुरु करणं हे त्या वेळीच करणं खूप गरजेचं आहे. कारण सवय का कशाचीही होतेच. पण ती होऊ देणं किंवा न होऊ देणं आपल्याच हातात आहे. :) तेही 

विद्या भुतकर.