Monday, December 09, 2019

.....तो जिन्दा हो तुम

     दोन आठवड्यांपूर्वी एका ट्रिपला जाऊन आलो. ५-६ दिवसांची ट्रिप होती. खरंतर मी आणि नवऱ्याने ठरवूनच कधी नव्हे ते आधी बुकिंग करुन वगैरे सर्व नीट केलं होतं, तेही दोनेक महिने आधी. ट्रीपला जायचे दिवस जवळ आले तसे उत्साहाने खरेदीही केली. ती जागाच तशी होती, कॅंकून, मेक्सिको. इथल्या थंडीतून मस्त गरम वातावरणात ५-६ दिवस मिळणार होते. स्विमिंग पूल, तिथलं जेवण, ऊन आणि बाकीही पोरांच्या साठी ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या. आणि इतकं सगळं असूनही मला मनात एकच भीती होती. दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात अशाच उत्साहाने डिस्नीला ट्रिपला गेलो होतो. आणि परत येताना पाठदुखीचा जो त्रास सुरु झाला तो सर्जरीवरच थांबला. आजवर कधी कुठे जाताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायची सवय नव्हती. मनात आलं की निघालं. कितीही लांबचा प्रवास, ड्राइव्ह असू दे. पण दोन वर्षांनी बाहेर पडताना मला भीती वाटत होती. 
       जातानाही सर्व गोळ्या, औषधं सोबत घेऊनच निघाले. तिथे पोचण्याचा प्रवास तरी नीट पार पडला होता.पहिला दिवसही वॉटर पार्क मध्ये छान गेला. पण दुसऱ्या दिवसाची मात्र मला जास्तच  काळजी होती. त्यादिवशी आम्ही झिप-लायनिंग, ऍडव्हेंचर कोर्स, स्पीड बोटिंग आणि स्नॉर्कलिंग हे सर्व करणार होतो. तिथे वेळेत पोहोचून झिपलायनिंगसाठी अंगावर साहित्य चढवलं आणि मला जबरदस्त भीती वाटू लागली. पोरं उत्साही असल्याने त्यांनाच पुढं केलं. मग हिंमत करुन दोर पकडला आणि तिथल्या लोकांनी ढकलल्यावर जे सुटले दोरावरून....... फक्त एक क्षणभर काय ती भीती वाटली पण पाण्यावर उंचावरुन जाताना एकदम भारी वाटत होतं. पहिल्या झिपलाईन वरुन नीट पोचल्यावर जरा बरं वाटलं. 
       पुढे ऍडव्हेंचर कोर्स होता. दोऱ्यांच्या जाळीला पकडून खालच्या लाकडी किंवा दोरीच्या गाठींवरुन पाय ठेवत पुढे जायचं होतं. ५ अडथळे पार करायचे होते. पोरं पटापट सरकुन पुढे जात होती आणि मी मात्र जपून पाय टाकत चालत होते. हो कुठे काय पाय मुरगळला वगैरे तर? गंमत म्हणजे माझ्या मागे दोन इथल्याच बायका ग्रुपमध्ये होत्या. त्यांचं वय निदान ५५ च्या पुढचं तरी होतं. आणि त्या निवांतपणे हे सर्व  सर्व अडथळे पार करुन जात होत्या. त्यांना पाहून मलाच थोडीशी लाज वाटली. आम्ही शेवटचा अडथळा पार करुन स्पीड बोटच्या टप्प्यावर आलो. तिथे चार ग्रुप होते. आम्ही चौघे एका बोटमध्ये. तिथल्या माणसाने त्याच्या मेक्सिकन इंग्लिशमध्ये आम्हाला सर्व सूचना सांगितल्या. तो पुढे जाणार, आम्ही चार ग्रुप त्याच्या मागेआपापल्या बोटीत. बोटीचा वेग कमी जास्त करणे, ती चालवणे या सूचना मी जमेल तशा ऐकल्या. कारण चालवणार संदीप होता. त्या गाईडच्या मागे बोट घेऊन आम्हाला समुद्रात जायचं होतं. 
        संदीप आणि सानू बोटीत पुढे बसले आणि मी, स्वनिक मागे. आणि ज्या वेगाने बोट सुसाट निघाली, मला वाटलं संपलं !  पाठीला प्रचंड दणके बसत बोट वेगाने गाईडच्या मागे जात होती. मला त्रास होतोय म्हणून संदीपने थोडा वेग कमी करायचा प्रयत्न केला. पण आम्ही ग्रुपच्या मागे पडत होतो. म्हणून नाईलाजाने परत वेगानं जावं लागलं. लाटांवरुन, लाटांचा बोटीला बसणारा धक्का चुकवत आम्ही २५ मिनिटं बोट चालवून पाण्यात पोहोचलो जिथे स्नॉर्कलिंग करायचं होतं. मी तर पोहचेपर्यंत इतकी घाबरुन गेलेले की घरी तरी नीट पोहोचू दे असं वाटून गेलं. 
         पाण्यात एका जागी बोटी लावून गाईडने आम्हांला तोंडाला लावायचे मास्क दिले. त्याने तोंडाने श्वास कसा घ्यायचा हेही सांगितलं. पायांत बदकासारखे चप्पल घातले. सानूला नेहमीप्रमाणे घाई. ती पाण्यात उतरली, पण श्वास घ्यायचं नीट जमेना म्हणून परत वर आली. म्हटलं आपण बघावं जमतंय का म्हणून मी पाण्यात उतरले आणि एकदम समुद्रांत उतरलोय हे जाणवलं. आजवर फक्त पूलमध्ये उतरलेली मी. दोन सेकंदांतच परत बोटीवर आले. पण त्या बोटीला धरुन वर चढताही येईना. त्या दुसऱ्या ग्रुपमधल्या वयस्कर बाईंनीच मला हातांना धरुन वर ओढलं. समोर दिसणारा किनारा, डोक्यावरचं ऊन आणि इतक्या जवळ येऊनही कोरल्स बघायला पाण्यांत उतरता येत नाही याची खंत जाणवत होती. 
        पुढच्या पाच मिनिटांत आमचा गाईड तिथे आला आणि म्हणाला, Do you need help?. म्हटलं हो हो. त्याने पाण्यात खाली घेतलं मला तरीही काही नीट जमेना. शेवटी उजव्या हाताला त्याने धरलं आणि कुठल्यातरी एका क्षणी मला ते तोंडाने श्वास घेणं जमायला लागलं. पण हात काही सोडायला जमेना. शेवटी त्या गाईडनेच मला हात धरुन पुढे नेलं, पाण्यांत. श्वास घेता येऊ लागला तशी मी पाण्याखाली डोळे घातले. दोनेक मिनिटांतच आम्ही कोरल्स बघू लागलो. आजूबाजूचे सर्व आवाज बंद झाले. फक्त माझा श्वास आणि पाण्याखाली दिसणारे कोरल्स आणि त्या गाईडचा हातातला हात. इतकंच जाणवत होतं. पुढे जाऊ तसे त्यानं मला बोट दाखवून माशांचा एक जत्था दाखवला. अगदी हात लागेल इतक्या जवळून कोरल्स पाहिले. ती शांतता, ते दृश्य अनुभवतांना मला एकदम जिंदगी ना मिलेगी दोबारा मधले ह्रितिक आणि कतरीना आठवले. घाबरलेल्या त्याला हात धरुन नेणारी ती आणि पुढे गेल्यावर अवाक नजरेने ते सुंदर दृश्य बघणारा तो. आपण हे अनुभवतोय यावर माझा विश्वास बसत नव्हता. लवकरच मी बोटीवर परत आले. संदीप आणि पोरांचं बघून होईपर्यंत थांबलो आणि परत धक्के खात बोटीने मूळच्या जागेवर आलो. 
      पण खरं सांगू का? परत येणं ही केवळ फॉर्मॅलिटी होती. त्या अख्ख्या दिवसांत अनेक वेळा मला वाटलं होतं की 'आपण हे केलं नाहीतरी चालेल ना. काय बिघडतंय?'.  पण भीती वाटत का होईना मी त्यादिवशी तिथल्या सर्व ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्या शेवटच्या टप्प्याला हवं ते अनुभवता आलं याचं समाधान आयुष्यभर राहील. अर्थात हॉटेलवर येऊन खाऊन, पिऊन मस्त झोप काढली ही गोष्ट निराळी. पण एका दिवसाकरता का होईना मी माझा 'जिंदगी ना मिलेगी ना दोबारा' चा  क्षण जागून घेतला होता. दोन वर्षं मनात असलेली भीती थोडी का होईना कमी झाली होती. 

"दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम

हवा के झोकों के जैसे आजाद रहना सीखो 
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो 
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें 
हर एक पल एक नया समां देखे ये निगाहें 

जो अपनी आँखोमें हैरानियाँ लेके चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम 
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम. "

विद्या भुतकर. 

Tuesday, December 03, 2019

दों प्रकार के लोग

       इस दुनियामें दों प्रकार के लोग होते हैं ! असं म्हणून लोकांचे कितीतरी प्रकार आजवर ऐकलेत. तसे मला विचाराल तर माझ्याकडेच हजारेक प्रकार सांगता येतील. म्हणजे, परीक्षेच्या वेळी रात्री जागून अभ्यास करणारे, तर काही पहाटे उठणारे. खरेदीला गेल्यावर पटकन दोन चार वस्तू घेऊन टाकणारे तर तासंतास घेऊन एकही कपडा न निवडणारे. कसंही जेवायला दिलं तरी आनंदाने खाणारे(नवऱ्यासारखे), तर माझ्यासारखे चार वेळा गरम करावं लागलं तरी मनाला हवं तसंच खाणारे. असो तर एकूण काय की असे अनेक प्रकार. या दिवाळीत फराळ करताना लक्षांत आलं या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक शब्दश: रेसिपी आहे तशीच अंमलात आणून पदार्थ बनवणारे आणि दुसरे माझ्यासारखे नको तिथं स्वतःचं डोकं लावणारे. 
           दर दिवाळीत फराळ बनवायला सुरुवात केली की मी सर्व रेसिपीज बघून घेते. नव्याने ठरवते की यावेळी जसं लिहिलंय तसंच डिट्टो करायचं. पण होतं काय रव्याच्या लाडूंचं अगदी एक दोन वाट्यांचंच माप दिलेलं असतं. मला वाटतं अरे इतके कमी कसे करणार. मग तेच माप मी चारपट वाढवते. प्रमाण वाढवलं की त्यात साखरही एकदम ८ कप वगैरे होते. आता एकदम आठ कप साखर टाकायला नको वाटतं. त्यामुळे जे काही प्रमाण दिलंय त्याच्यात मी थोडी काटछाट करते. त्यामुळे मग पाक पातळ होणार किंवा कमी तरी होणार. असं करुन त्या लाडवांचं बिनसतंच. मग वैतागून मी आईला फोन करते. आईच्या हातचे रव्याचे लाडू म्हणजे एक नंबर. आई मात्र तिच्या ठरलेल्या वाट्यांचं प्रमाण मला सांगते. आणि माझी अजूनच चिडचिड होते. ते मापाने केलं असतं तर कशाला ना? रव्याचे लाडूच कशाला? बाकीच्या फराळाची पण तीच गत असते. चकली, चिवडा, शंकरपाळ्या. माझ्या दोनेक वर्षांपूर्वीच्या माझ्या चुकलेल्या शंकरपाळ्यांवर मला अनेक सूचना आल्या होत्या कमेंटमध्ये. पण मी ऐकेल तर ना? अनेक मैत्रिणी इतका छान फराळ बनवतात. कसं बनवतेस म्हटलं की डायरेक्त प्रमाणच सांगायला लागतात. आता त्यांना काय बोलणार? 
          फराळाचं जाऊ दे, माझ्या आईची ३० वर्षांपूर्वीची केकची रेसिपीही अजून तीच आहे. त्याच मापाने, त्याच भांड्यात, त्याच चवीचा भारी केक बनतो, अगदी जसा आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी बनायचा तसाच. हे माप प्रकरण बेकिंगच्या बाबतीत अजून जास्त त्रासाचं. मला अनेकदा ते पावभाजीचे पाव बनवून बघायचे होते. दरवेळी मी उत्साहाने सुरु करणार, मग त्यात बटर/यीस्ट काहीतरी कमी जास्त होणार. किंवा ते किती वेळ ठेवायचं वगैरे चुकणार. असं करुन मी तीन चार वेळा ते कणकेचे गोळे फेकून दिले. पण हे असं इतक्या वेळा चुकल्यावर एकदम रागाने मी अगदी दिलीय तशीच रेसिपी बघून केले आणि चक्क झाले ना राव, पाव ! लई भारी वाटलं. पण त्याचवेळी दोन डॉलरच्या पावसाठी मी इतका वेळ आणि कष्ट घालवू शकत नाही असंही वाटलं. चांगले पाव बनवल्याची ती पहिली आणि शेवटची वेळ. तर मुद्दा काय की हे बेकिंग वगैरे मधे खासकरुन दिलेलं प्रमाण आणि कृती जास्तच मन लावून पाळावी लागते. 
         लहानपणी आईला विचारलं मिठाचं प्रमाण सांग वगैरे तर म्हणायची मला नाही सांगता येत, अंदाजाने घालायचं. हे अंदाजपंचे धागोदर्शे कसं करायचं हे अनेक वर्षं कळलं नाही. पण आता सान्वी तेच प्रश्न विचारते आणि कळतं की एखादी रेसिपी बरोबर लिहिणं, सांगणं किती अवघड असतं. समोरच्या माणसाला काहीही येत नाही असं समजून प्रत्येक घटक, प्रत्येक कृती लिहून द्यायची. आणि ते सर्व जसंच्या तसं करुन समोरचाही एकदम बरोबर तसाच पदार्थ बनवणं. हे किती अवघड आहे आणि त्यांत margin of error किती आहे याची कल्पना आहे का? हे म्हणजे मी एखाद्या प्रोजेक्टसाठी स्पेसिफिकेशन लिहिणे आणि डेव्हलपरने ते तसंच्या तसं कोड करुन तो एकदम हवा होता "तसाच" सॉफ्टवेअर प्रॉडक्ट बनवणे याच्याइतकं अवघड आहे. बरोबर ना? मला असा एकदम शोध लागला की खूप आनंद होतो. तर एकूण काय की रेसिपी लिहिणे आणि त्या पाळणे हे कठीणच काम. पण हे पाळणाऱ्या माणसांचं किती बरं असतं. चुका कमी आणि चव एकसारखी प्रत्येकवेळी. 
         तर लेकीला अनेकदा पाहताना वाटतं ही का नियम पाळत नसेल? मी एखादी गोष्ट सांगतेय म्हणजे अनुभवातूनच सांगतेय ना? बाकी सगळे एखादी गोष्ट जशी सांगितलीय तशीच करत असताना, का तिला स्वतःलाच हवंय तसं करायचं असतं? सर्व माहिती दिलेली असतांना फक्त झापडं लावून, लिहून दिलेली गणितं करणं का हीला अवघड वाटतं? अशावेळी कधीकधी मला अशी नियम न पाळता स्वतःच्या मनाला योग्य वाटेल तशीच रेसिपी वापरुन पदार्थ बनवणारी मी आठवते. मग त्यात चुका होणारंच हे ठरलेलंच. नाही का? कधीतरी त्या चुकांतून धडे घेऊन तीही मान्य करेल की नियम पाळलेच पाहिजेत. किंवा तिला एखादी नवीन स्वतःची रेसिपी मिळेल. नाही का? असो. 
बाय द वे, तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता? 

विद्या भुतकर.