Tuesday, January 30, 2007

आंघोळ

चार दिवसांचा कंटाळवाळा अभ्यास, परिक्षेचं टेन्शन या सर्वानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम पाण्य़ाने आंघोळ केली आणि बरं वाटलं. तीन-चार दिवसांचा थकवा, मनातले विचार , होणारा त्रास सगळे पाण्याबरोबर जणू वाहून जात होते. आजच नाही, बरेचदा मला असा अनुभव आला आहे.रडून एखादी रात्र घालवावी आणि सकाळी आंघोळ झाल्यावर वाटावं जणू गेली रात्र गेली, नवा दिवस उगवलाय. एखाद्या मस्त ट्रेकवरून आल्यावर, निसर्गसौदर्याची, प्रवासाची, पावसाची आठवण काढत आलेला शीण एकदम पळून जातो. आता हे सगळं खरं असलं तरी घरी असलं की आईचे नियम, जेवायच्या आधी आंघोळ करा, आज पूजा आहे घरी आंघोळ करा, पाहूणे येणार आहेत आवरून घ्या हे ऎकलं की चिडचिड होते. सुट्टी,विषेशता: रविवार हा या असल्या कामांसाठी नसतोच मुळी. अरे?? आंघोळीची स्वछता हा भाग सोडून बाकीची सगळी कारणं फक्त Logical च आहेत ना?: -)
अगदी दिवाळीचं 'अभ्यंगस्नान' ही. पहाटे-पहाटे,कडक थंडीत, कुडकुडत, उटणं लावून घेवून गरम्म्म्म पाण्याने आंघोळ करणं म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात. मी असं ऎकलंय की पूर्वी साधारण वर्षाच्या या काळात शेतकरी आपले धान्य घरी आणत त्यामुळे कष्टाने थकलेलं शरीर साफ करून मग आलेल्या धान्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी हा सण साजरा करत.हे झालं एक कारण, अशी बरीच आहेत. मला पडलेला प्रश्न म्हणजे, वर्षभराच्या कष्टानंतर हे अभ्यंगस्नान खरंच त्यांना शुद्ध करत असेल काय?
तसेच अजून एक म्हणजे, गंगास्नान. मी आजपर्यंत गंगा नदी पाहीलेली नाहिये, पण अनेक चित्रपटात त्याचा उल्लेख मात्र जरूर पाहिलाय. तिथे जाऊन म्हणे आजपर्यंत केलेली सगळी पापं धुवून निघतात.आतापर्यंत इतक्या लोकांनी तिचं पाणी दुषित केलं असेल, मग उतारवयाला लागल्यानंतर आपण केलेल्या पापांची जाणीव होऊन तिथेपर्यंत गेलेल्या एखाद्या वॄदधाची पापं धुवून निघत असतील काय?असो.
आपल्याकडे एखादया मॄत व्यक्तीला अग्नी देऊन आल्यानंतर कशालाही न शिवता लोक आंघोळ करतात. मला कुणीतरी याचं शास्त्रीय कारण सांगितलं होतं. मॄतव्यक्ती एखाद्या आजारपणाने गेली असेल तर त्या व्यक्तीभोवती असलेल्या विषाणूची बाधा बाकी लोकांना होऊ नये म्हणून ही खबरदारी. आपली प्रिय व्यक्ती कायमची दुरावल्यावर तिचे अंतिमसंस्कार करून झाल्यावर, त्या आंघोळीने तिच्या आठवणीही, ती गेल्याचं दु:ख, सगळं धुवून जात असेल काय?
परवा मी अर्णवला(आमच्या शेजारांचा सव्वा वर्षाचा मुलगा) बाथटब मध्ये आंघोळ करताना पाहिलं. इतका गोड दिसत होता तो. :-) दोन्ही हातानी पाणी उडवण्य़ाचा त्याचा खेळ चालू होता. त्याचा तो निरागस चेहरा पाहून वाटलं, रोज आंघोळ करताना आपलं निरागसपण, तो आनंद आणि ते सुखद बालपण या पाण्याबरोबर हळूहळू धुवून जात असेल काय?
-विद्या.