Tuesday, March 06, 2007

एक अर्धी पोस्ट...

रात्री ११ वाजता सिनेमा संपला आणि आम्ही दोघं घरी येण्यासाठी गाडीत बसलॊ. आम्ही प्रत्येकवेळी घरी जाताना आमचा वाद व्हायचा एका कारणावरून. परत यायला त्या थिएटरकडून दोन रस्ते होते, एक आम्ही डोळे झाकूनही घेऊ शकतो असा आणि दुसरा फक्त अस्तित्वात आहे हे माहीत होतं. त्यामुळे रात्री ११ नंतर माहीत नसलेल्या रस्त्यावरून जायची माझी इच्छा नसायची आणि त्याला तो रस्ता कसा आहे तो पहायचाच होता. आज तर पाऊसही पडत होता. शेवटी माझं न ऎकता त्याने दुसऱ्या रस्ता पकडला. मग थोडे अंतर गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटून त्याने मला गाडीतला नकाशा काढायला सांगितला. मग मी आपण सध्या कुठे आहे,कुठे जायचे आहे हे पहात चुकत, धडपडत जवळ जवळ दीड तासाने घरी पोहोचलो.मी त्या दिवशी बराच वाद घातला(नेहमीप्रमाणे :-) ) की नेहेमीचा रस्ता असताना नवीन शोधायची काय गरज आहे हे कळत नव्हतं.
मला वाटतं माझ्यासारखेच कितीतरी लोक मी आजू बाजूला पाहते आहे.बहुतेक, आयुष्य खूपच सरळ, सोपं झालंय.(Touch wood :-) ) अर्थात ते सरळ होणं ही इतकं सोप्पं नव्हतं पण गेलं एक वर्ष आरामात गेलंय आणि हात खरंच सोन्याचे झालेत की काय असं वाटतंय. कधी काहीतरी करायची, वेगळं करायची इच्छा असते तर कधी-कधी तो नुसता सिनेमाचा 'After effect' असतो. पण होतं काहीच नाहीये. चार लोक चालतात त्याच सरधोपट मार्गाने चालायचं, पैसे मिळवायचे आणि आपले सोन्याचे हात अजूनच जपायचे.पुढे जाताना जरा कुठली वेगळी वाट समोर दिसली की पुन्हा एकदा मागे जायचे आणि अजून एक जुनीच वाट शोधायची. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत झटत राह्यचं आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे असं आज-काल का होत नाही याचा विचार करतेय.
"तुटण्याचा फुटण्याचा,
देहाला छंद हवा.
सोन्याच्या हातांना
घामाचा गंध हवा !"
-माधव मुतालिक


माझ्या जुन्या डायरीमध्ये ही नोंद सापडली मला.मी कॊलेज मध्ये असताना एक कविसंमेलन नियोजित केलं होतं आणि माधव मुतालिक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.त्या समारंभानंतर मी माझी ती डायरी त्यांच्या स्वाक्षरीसाठी घेऊन गेले होते. तेव्हांची ही नोंद. मला आठवत नाहिये मला त्यांच्या या ओळींचा अर्थ किती समजला होता आणि हे ही माहित नाही की कुठल्या अर्थाने त्यांनी त्या ओळी लिहील्यात.पण आज त्याच वाचताना बरेच विचार डोक्यात येत आहेत आणि आता तरी ते लिहणं जमत नाहीये.
जाऊ दे. आज एव्हढंच.
-विद्या.

1 comment:

अनु said...

Vidya,tuzya blog madhe 'Trishanku' gosht nahi???
Changale lihle ahe. Mala vatate jashi stability yet jate tasa apan chhotya chhotya change la pan virodh karato manatun.