Friday, April 20, 2007

भित्री भागुबाई

काल आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली. तेही गेल्या चार दिवसांतील दुसरी चोरी. दोन्हीमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोन्हीही घरे भारतीय माणसाची होती आणि त्यांचे सर्व सोने चोरीला गेले. काल तर जिथे चोरी झाली तिथली बाई लॉन्ड्रीरुमध्ये गेली होती, ती परत आली तेव्हा टॊयलेटमधील फ्लशचा आवाज आला. तिला वाटले तिचा नवराच दुपारी परत आलाय आणि तेव्हढ्यात एक काळा (अफ्रिकन अमेरिकन) माणूस बंदूक घेऊन समोर आला आणि त्याने तिला 'सोने कुठे आहे?' असे विचारले. तिने आतल्या खोलीत आहे असे सांगताच तो आत गेला आणि संधी साधून ती बाई बाहेर पळून आली. मग तिच्या शेजाऱ्यानेच पोलिसांना फोन केला. ....त्यांचे पुढे काय झाले माहीत नाही पण मला मात्र रात्री लवकर झोप आली नाही. चार वेळा दार बंद केले आहे ना याची खात्री करून घेतली. :-) तेव्हाच माझ्या मनात इतके विचार येत होते, म्हटलं आता लिहूनच काढावेत.
गेले एक वर्ष मी एकाच गावात, एकाच ऑफिसात जातेय. पण त्याआधी जवळ-जवळ ७-८ महिने मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकटी राहिलेय. माझं सुदैवच म्हणायचं की तेव्हा मी सुखरूप राहिले.त्यासाठी घरी आणि बाहेरही खूप कौतुक करून घेतलं त्याबद्दल. "एकटी कशी राहलीस गं? बोअर नाही का झालं? भीती नाही वाटत? एअक्ट्यासाठी जेवण बनवणं किती कंटाळवाणं आहे, इ.इ." पण बाहेरून मी कितीही शूरवीर दिसले तरी खरं काय ते माझं मलाच माहीत होतं. तेच आज लिहायचा प्रयत्न करतेय.
खरंतर मी तोपर्यंत ६ वर्षे तरी घराबाहेर राहिले होते पण नेहमी कुणीतरी रूममेट होतीच.पण २००४ साली काही महिने अमेरिकेत काम केले आणि त्यानंतर पुढचा प्रोजेक्ट टोरोंटो (क्यानडा) चा मिळाला. तिथे गेल्यावर कळलं की जवळ-जवळ सगळीच टीम कलकत्त्याची आहे. थोड्या फार ज्या स्त्रिया होत्या त्या एकट्या राहणार होत्या किंवा कुटुंबीयासोबत. आणि मुलांसोबत राहणे मला अवघड गेले असते.हॉटेलवर राहून बाहेरचं खाणं तरी किती दिवस खाणार? Paying Guest च्या ही काही जाहिराती मी पाहिल्या पण तिथे स्वयंपाक घर मिळणार नव्हतं. पुन्हा एकदा दुसऱ्याच्या हातचे/बाहेरचं खाणे मला अशक्य होतं. बरं चांगले अपार्टमेंट घ्यायचे तर १-२ वर्षाचा करार करावा लागणार होता. मला तर फक्त ६ महीनेच राहायचं होतं. त्यामुळे लगेचच घर शोधायचे तर, एकटी राहण्याशिवाय मला पर्याय नव्हता. बरीच घरे पाहिल्यानंतर एका मराठी कुटुंबाकडे तळघरात राहण्याचा निर्णय मी घेतला.
ते लोक बोलायला चांगले होते आणि खूप दिवसांनी मराठी बोलणारं कुणीतरी भेटल्यामुळे मला आनंदही झाला होता. ते घर तसे माझ्या ऑफिसापासून बरेच दूर होते. लवकरच मी बसचा मार्ग वगैरे शोधला, पण कळले की २ बस बदलूनही शेवटी १० मिनिटे चालत जावे लागते. थंडीचे दिवस होते, साधारण वजा १०-१५ तापमान असायचे तेव्हा. पहिल्या दिवशी मी परत येताना बसमधून उतरले आणि त्या अंधारातून जाताना इतकी भिती वाटत होती. नवीन आल्यामुळे अजून मोबाईलही नव्हता. मी पटापट चालत चालले होते. सगळ्यात भितीदायक गोष्ट म्हणजे बर्फातून त्यांच्या घराच्या मागून जिन्याने खाली जायचे. त्या तळघरात कोंडल्यासारखे वाटायचे. आणि तळघराची खिडकी वरच्या बाजूला असते ना, त्यामुळे असं वाटायचं कुणी वाकून घरात बघत असेल तर?दोन दिवस तर काढले पण रात्री परतत असताना खूप भिती वाटायची. आणि इथे तर रस्त्यावर माणसंही नसतात आणि काळी कुत्रीही.ना रिक्षावाले, ना किराणा मालाची दुकाने ना फोन बूथ. एकदा माझ्याशेजारी एक गाडी येऊन थांबली तरी मी सरळच जात होते, नंतर मला कळलं की आमचे घरमालकच होते आणि मला लिफ्ट देणार होते. :-)
इंटरनेट हाच काय तो आधार होता रात्री मला.एकदा मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याला कळले की मी एकटीच आहे आणि घाबरत आहे, तर तो मला म्ह्नाला, 'मागे बघ ना तुझ्या....काय आहे.....कुणीतरी उभं आहे....' असंच काहीतरी. मी इतकी घाबरले, त्या मित्राशी पुढचे काही महीने तर मी बोलले नव्हते. तळघरातही मी ज्या रूममध्ये राहायचे ती एका टोकाला होती आणि आजू बाजूला कुठेही आवाज झाला तरी माझे कान टवकारलेले असत. १० दिवसातच मी त्या अंधारकोठडीला कंटाळले आणि दुसरीकडे एक घर शोधले. तेही असेच एका भारतीय माणसाचे होते आणि तळघरातच होते. पण एक चांगले होते की जरी घराचा प्रवेश तळघरासारखा होता तरी मागून ते जमिनीलगतच होते. त्यामुळे दिवसभर पूर्वेकडून छान उजेड यायचा. एकदा नक्की केल्यावर मी एका तळघरातून माझ्या प्रचंड मोठ्या ब्यागा आणि १० दिवसात जमविलेले सामान (गादी, सफाईचे सामान, खाद्यपदार्थ,भांडी) सगळं कसंबसं बाहेर काढलं. दुसरं मोठं काम म्हणजे ते पुन्हा एकदा तळघरात न्यायचं. शेवटी तर मी ब्याग जिन्यावरून घसरत नेल्या. :-( वाटलं चला आता सुटले.पण...
त्या नवीन घरात दोन खोल्या होत्या ,किचन आणि बाथरुम. मी एक मोठी खोली व्यापली, पण त्या घराचे Heating (Central heating) घरमालकाकडे होते, त्यामुळे साहेबांनी त्यांना हवं तसं सेट केलं होतं. तळघर मुळातच थंड असतं त्यामुळे रात्रभर मी काकडत काढली. दुसरं म्हणजे आता माझी खोली जमिनीलगत होती त्यामुळे डोकं खिडकीकडे केलं तर कुणी चोर आला तर कसं कळणार? आणि खिडकीकडे पाय केले तर ती खिडकी सारखी डोळ्यासमोर राहणार. :-( अजून एक रात्र मी रडत,कुडकुडत काढली होती. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन मोठ्या चादरी घेऊन आले, तरी थंडी जाईना. मग घरमालकांना सांगितले, तर त्यांनीही लाइट बिलाचं कारण सांगितलं. जेवण बनवायला उभं राहणंही अशक्य होतं. शेवटी वैतागून मी किचनमधल्या सगळ्या शेगड्या चालू ठेवल्या आणि पांघरूण घेऊन बसून राहिले.
माझे जुने घरमालक मराठी तरी होते, हे लोक बिहारी होते आणि आमचा संवाद काही फारसा प्रेमळ नव्हता. मग मी त्यांच्याशी बोलून तात्पुरते त्यांचे इंटरनेट वापरण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण तेही होत नव्हते. त्यामुळे घरी आले की जेवण बनविणे आणि काहीतरी गाणी लावून झोपणे हेच करत होते.रात्रभर तो laptopचालू ठेवायचे की त्याच्या आवाजात झोप तरी लागेल. ७-८ दिवसांत नवीन इंटरनेट कनेक्शनचा अर्ज दिला, मोबाई फोनही शोधला. आणि साधारण १० दिवसांत माझा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. मला तोपर्यंत वाटायचे, मला खाली काही झाले तर काय करणार, कुणाला फोनही नाही करता येणार ना मेल. टीव्ही तर मी कित्येक वर्षात पाहिला नव्हता.
नवीन घर ऑफिसापासून खूप जवळ होते. बसने साधारण ७-१० मिनिटे लागत. पण आता कामही जोरात सुरू झाले होते. रात्री ७-८ नंतर बसस्टॊपपासून घरापर्यंत यायला ५-७ मिनिटे लागत. आणि तिथे एकदा त्या कॊलनी मध्ये आलं की कुठेही माणूस दिसत नसे. मी जवळ-जवळ पळतच घरी यायचे. कुणी मागून चालत येतंय असं वाटलं तरी मागे न बघता चालत राहायचे. बरेचदा चालताना मी मित्र-मैत्रिणींना कुणाला तरी फोन करायचे.आणि शेवटी दरवाज्यातून आत जाऊन पटापट सर्व लाइट्स सुरू करायचे. एकदा पळापळीत जिन्यावरून घसरून पाठही मोडून घेतली. :-(रोज रात्री मी २-३ वाजेपर्यंत जागी राहायचे आणि भारतात असणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी बोलायचे. बरेचदा कुणीतरी रात्री मला याहू वर मेसेजही पाठवायचं आणि मी मध्यरात्री उठून त्यांना उत्तरही द्यायचे.कधीकधी आरशात पाहताना वाटायचं मागून कुणाचा चेहरा दिसला तर? (हे सगळे भयानक चित्रपट आणि कादंबऱ्या वाचण्याचे परिणाम. :-) )
पण एक-दोन महिन्यांत उन्हाळा सुरू झाला आणि सूर्यास्त उशिरा होऊ लागला. मग जरा ओळखीही वाढल्या तोपर्यंत आणि मी जरा भटकून घेतलं. टोरोंटो मला खूपच आवडलं,डाऊनटाऊन(?), ओंटारिओ तळं(की समुद्र? ),तळ्याच्या मध्ये असलेलं छोटंसं बेट, बस-ट्रेनची व्यवस्था, विविधता, सगळंच. एका ट्यूलिप फेस्टिव्हललाही जाऊन आले. नायगारा तर तिथून फारच जवळ असल्याने दोन वेळा बघितला.तीन दिवसांची, मॊन्ट्रियाल,ओटावा, क्युबेकची ट्रीपही केली. छान वाटलं.पाच महिने कसे पटकन संपून गेले. माझी माझ्या घरमालकांशीही चांगली ओळख झाली. आम्ही मग खाद्यपदार्थांची , पाककृतींची देवाण-घेवाणही केली. मी त्यांना मग वेबक्यामेरा कसा वापरायचा, कुठल्या साईटवर हिंदी गाणी मिळतात, अशी शैक्षणिक माहितीही दिली. :-)
शेवटच्या महिन्यात माझे घरमालक भारतात आले होते काही दिवसांसाठी. त्यांनी मला जाताना सांगितलं, "हे emergency contact numbers आहेत. मी माझ्या एका नातेवाईकाला सांगितलं आहे दर थोड्या दिवसांत फेरी मारायला."
एकतर ह्या मालकाची पाच अपत्ये होती. त्यांचा दिवसभर चालणारा गोंधळ एकदम बंद झाला होता आणि त्यात त्यांचा हा नातेवाईक कधी येणार-जाणार माहीत नाही. त्याच्याऎवजी दुसराच कुणीतरी आला तर? तोच माणूस खाली आला तर? त्यांनी घराची विद्युत सुरक्षाही केली होती पण ती मध्येच बंद पडली तर? इथे मालक नसलेलं घर लगेच कळतं, त्यामुळे त्यांची सर्व पत्रे मी माझ्याकडे जमा करून ठेवली. मला घर सोडून एक वर्ष होऊन गेलं होतं. आता लवकरच परत जायला मिळेल याची उत्सुकता होती, त्यात उगाचच हे टेन्शन. कसेबसे दिवस काढत मी महिना घालवला. रोज घरी नेण्यासाठी सामान आणायचं, ब्यागेत ठेवायचं, आधी आणलेलं सामान पुन्हा काढून नीट लावायचं. मी १५ दिवस आधीच कपडे घड्या घालून ठेवले होते. :-)
अखेर तो दिवस आला होता, घरी जायचा. ६ तास आधीच मी विमानतळावर जाऊन बसले होते. कंटाळवाण्या,लांब प्रवासानंतर आई-बाबांना भेटल्यावर अश्रू आले नसते तरच नवल होतं. त्यानंतर चार महिने भारतात राहून मी परत अमेरिकेत आले होते. दोन महिने एका हॉटेलवर राहिले आणि भीती, एकटेपणा हे पुन्हा एकदा अनुभवलं होतं. खूप वेळा भारतात, नातेवाईकांना,मित्र-मैत्रिणींना,भाऊ-बहिणींना भांडताना पाहिल्यावर मला ते एकटे दिवस आठवतात, जेव्हा कुणाशी तरी बोलण्यासाठी-भेटण्यासाठी मला २-२ दिवस वाट पाहायला लागायची. एकटं खाताना, घरची आठवण यायची. आणि त्यात भरीला माझ्या मनाचे भित्रे कोपरे तर कधीच मला सोडायचे नाहीत. ते आठवलं की माणसांची, आपल्या माणसांची किंमत कळते. आजारी असताना, स्वतः:च सगळं करताना रडायलाही यायचं आणि कशाला हे सगळं हवंय, कुणी सांगितलंय इथं राहायला,असंही वाटायचं. पण आज वाटतं त्याच दिवसांनी मला स्वत:चा वेळ स्वत:साठी आनंदात कसा घालवायचा हे शिकवलं. ते अनुभव आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहेत याचाच आनंद आहे. . :-)
-विद्या.

2 comments:

Monsieur K said...

you are indeed a brave girl. i havent experienced anything of the sort of what you have mentioned - maybe its coz i havent lived alone in the US in my entire stay of a year and a half.

"ekTepaNaa" vegaLaa aani "ekaakipaNaa" vegaLaa.
its the difference between solitude and loneliness.
you can experience them when you are alone, or even when you are in the midst of people.

having stayed away from my near and dear ones, for almost the entire last 5 years, i can relate to the experiences that you mention in the last para. its been a topsy-turvy ride indeed. but to be honest, i have enjoyed it and i am sure, you have enjoyed your ride too. :)

Vidya Bhutkar said...

Thanks K. :-) Later when I stayed in a hotel I sometimes felt lonely cos of the intact structure of hotels here. But now when I am alone its not loneliness,its solitude. And when I get some time alone I enjoy it.
One thing is sure, these incidents give us lots of experience and confidence without we knowing it.
Thanks again for the comment.
-Vidya.