Tuesday, September 11, 2007

मग? अजून काय विशेष?

काही महिन्यांपूर्वी,मी जेव्हा बऱ्यापैकी नियमितपणे लिहित होते, एका ओळखीच्या माणसाने मला मेल केली होती,"छान लिहीतेस गं तू. मला माहीत नव्हतं. बाकी काय? आजकाल ऑफिसमध्ये बराच रिकामा वेळ दिसतोय, एव्हढं लिहायचं म्हणजे.." सॉलिड चिडचिड झाली होती माझी. त्याला कौतुक करायचं होतं की टोमणा मारायचा होता हे अजूनही माहीत नाही. :-) पण गेल्या काही दिवसांत कामाचा ताण खरंच वाढल्यामुळे लिहिणं जमलंच नाही, त्यामुळे 'त्या' मेलची आठवण झाली. :-) तसं नुसतं काम हेच काही कारण नाहीये, द्यायची म्हटलं तर बरीच आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'कंटाळा'. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा. घरात शेजारी पडलेली वस्तू उचलायचा कंटाळा, जेवण बनवायचा कंटाळा, उत्साहाने फिरायला जायचा कंटाळा, अगदी कुठली मोठी गोष्ट घडली तरी त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचाही कंटाळा.... आणि बराच काही. असो.
आजकाल कुणाशी बोलताना एका प्रश्नाची भीती वाटत राहते,"मग? अजून काय विशेष?" काय विशेष असणार कप्पाळ? दर दोन दिवसात काय विशेष होणार?
तसं आजकाल काही विशेष घडतंही नाही म्हणा.आमचे दादा त्यांची डायरी लिहितात तसं,
"आज सकाळी ८ ला उठले. आवरून ९.३० ला ऑफिसला पोचले. संध्याकाळी ६.३० ते ८ ला जिमला जाऊन आले. रात्री स्वयंपाक,जेवण, टिव्ही इ. उरकून लवकर झोपी गेले. "
बरं अगदीच ताणायचा म्हणला तर हे असं.....मी आज उशीरा उठले की लवकर, एखादा नवीन ड्रेस घातला. तो चांगला दिसला आणि कुणी compliments दिल्या तर (आजकाल तेही कमीच असतं म्हणा, :-) ) ऑफिसमध्ये एखादी मिटींग होती तिला (नेहमीप्रमाणे) उशीरच झाला, किंवा मॅनेजरने (नेहमीप्रमाणे) कशी कटकट केली, त्यानंतर घरी आल्यावरही जिमला जायचा कसा कंटाळा आला होता किंवा हिंमत करून गेलेच असेन तर अंग कसं दुखत आहे. मग आज कालची भाजी शिल्लक आहे की भाजी आणण्यापासून तयारी. बरं त्यातही रोज नवीन काय बनवणार. काही बनवलंच तर अजून २ मिनीटं ते कसं बनवलं यावर गप्पा.
बस्स....झाला एक दिवस, एकच दिवस काय,महिना, वर्षं काय, अशीच म्हणायची. म्हणजे या सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं घडणं आवश्यक आहे लिहिण्यासाठी असं वाटलं.दोन आठवड्यांपूर्वी मग ओरलॅंडोला गेलो होतो. म्हटलं चला जरा ब्रेक मिळेल नेहमीच्या कामातून.तिथं गेल्यावर जाणवलं की हा ब्रेक वगैरे जो म्हणतात तो फक्त निमित्त आहे कामाची टाळाटाळ करायचं, मला कुणी महिन्याभराचा ब्रेक दिला तरी परत आल्यावर माझी तीच ती जुनी रोजीनिशी सुरु होईल. :-) असो. तर तिथे गेल्यावरही जी काही उत्सुकता जाणवायला हवी ती मला वाटली नाही. त्यात एक दिवस Sea World ला गेले होते, आता मला माशांबद्दल किती उत्सुकता असेल सांगायलाच नको. एखाद दुसरा माशांचा खेळ पाहिल्यावर होता तो उत्साह ही सरला. मग त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर भटकणे, नासा,केनेडी स्पेस सेंटरला जाऊनही ठिकठाक वाटलं. माझ्या या असल्या निरस वर्णनात कुणाला रस असेल, अगदी मलाही नाहीये.पण त्या ट्रीपनंतर मला जे काही डोक्यात आलं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करून बघते जमतंय का.
१. कुणाच्या डायरीबद्दल असं बोलणं बरं नव्हे पण दादांच्या २५ वर्षांच्या डायऱ्या केवळ चार ओळींच्या दिनक्रमात संपून गेल्या. मग मलाच काही तरी वेगळं हवं असण्याची इच्छा का, आणि ते मिळत असतानाही त्याला असमाधानाची झालर का? अगदी प्रत्येक emotion (भावना हा शब्द योग्य वाटला नाही म्हणून emotion) शब्दात टाकायची जबरदस्ती का? म्हणजे दादांनाही काही तीव्र विचार मनात आले असतील, पण त्याबद्दल लिहिलं नाही म्हणून त्यांची डायरी थांबली नाही, मग माझीच का? त्यांनाही अनेक संकटं आली पण तरीही त्यांची डायरी थांबली नाही, मग मलाच का प्रत्येक छोट्या गोष्टींचाही बाऊ करायची हौस? जरा कुठे खुट झालं की मला homesickness,sadness,nervousness, depression येतं. आणि मलाच त्यातून ब्रेक घ्यायची इच्छा का? एकदा मी घरी फोनवर बोलताना म्हटलं, मला खूप बोअर होतंय. आई तेव्हा जे म्हणाली ते मला अजूनही विसरता येत नाही. बरं ती ते अगदी सहजपणे म्हणाली होती, टोमणा म्हणून नव्हे. आई म्हणाली, "मघाशी पिंकीचा फोन आला होता, तीही म्हणे बोअर होतंय, आता तुला बोअर होतंय. आम्हालाच बोअर व्हायलाही वेळ नाहीये. उद्या कडधान्य साफ करून औषध लावून ठेवायचंय, परवा ते पिंकीला भेटायला जायचं म्हणताहेत, ....इ.इ." आणि विचार करताना मला खरंच असं जाणवलं की या दोघांनी कधीच मला कंटाळा आलाय,किंवा बोअर होतंय म्हणून सांगितलं नाहिये. मग सगळं व्यवस्थित चालू असतानाही मलाच का 'बोअर' होतं?
२. एकदा मी मावशीला फोन केला होता. म्हटलं काय चाललंय? मावशी म्हणे आईसक्रिम खातेय, येतेस का खायला? :-) तिच्या आवाजातही आईसक्रिम खाण्यातला आनंद जाणवत होता.माझी मावशीही पन्नाशीची असेल, म्हणजे हा निरागस आनंद काही वयासोबत कमी होत नाही हेही खरंच ना. एकीकडे मी छोट्या गोष्टींवर जास्तच विचार करतेय आणि त्याच्याविरुद्ध पूर्वी जसा एखाद्या लहानशा गोष्टीतून आनंद मिळायचा तो गमावतेय.
३. बरं छोट्या जाऊ दे, काही मोठं झालं तरी मला कितीसा फरक पडतॊ? देशाची परिस्थिती कशी आणि राजकारण कसं आहे यावर बोलण्याचा माझा हक्कही नाहीये, पण व्यक्तिगत आयुष्यात तरी मला कशाने फारसा फरक पडतो? प्रमोशन मिळाल्याचा आनंदही एखादा दिवस टिकला असेल. तसंच या ट्रीपमध्येही. मला आधी वाटायचं लोक किती सही असतात, सगळीकडे फिरून घेतात, डिस्नेला जातात, नासाला भेट देतात, इकडे-तिकडे जातात. शिकागो डाउनटाऊनमध्ये पहिल्यांदा मी जेव्हा आले तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले होते, आणि रात्री झोपल्यावरही डोळ्यासमोर प्रत्येक इमारत येत होती. पण त्याच्या तुलनेत आता मी बरीच स्थिरावलेय म्हणायचे. जसा आनंद तसंच दु:खं, थोड्यावेळासाठीचं. फारतर एखादा दिवस-अगदीच एखादा आठवडा, मग मी परत माझ्या साच्यात.
४. या सगळ्यात एक चांगली गोष्टही कळाली, माझ्या जिवंतपणाचं एक लक्षणच म्हणा ना. ट्रीपला जायचं म्हणल्यावर कृष्णाला भेटणं तर नक्की होतंच. गेल्या अनेक वर्षात भल्याबुऱ्या प्रसंगात त्याने सोबत केली, पण आजकाल त्याच्याशीही बोलणं कमी झालं आहे. तरीही त्याला भेटायचंच होतं. त्याला सांगितलं की बाबा आम्ही तुझ्या राज्यात येतोय, भेटशील का आम्हाला? पण एक-दोन आठवड्यात त्याने सांगितलं की मला वीकेंडला काम असेल, त्यामुळे आपण भेटू शकतो, पण मी गाडी चालवून तिकडे येऊ शकत नाही. अजून एक चिडचिड. आता एव्हढ्या जवळ आलोय, तर दोन तास गाडी चालवायला काय जातं याचं? असा विचार करून तर वाटलं ,मी पण का जाऊ तिकडे मग? इतक्या आधी सांगूनही त्याने असं केलं, इ.इ. त्याच्याकडे जायला निघालो त्यावेळी पण मी चिडलेले नव्हते पण काही खूप आनंद पण नव्हता. पण....
त्याच्या बिल्डींगच्या फाटकातून आत जाताना त्याचा तो दात काढलेला चेहरा दिसला आणि मला जाणवलं की ...काही नाती कधीच बदलत नाहीत....कितीही वर्षे,कितीही दूर रहा तुम्ही.....त्याला बारीक झालेला पाहून तर डोळ्यांतलं पाणी आवरणं अवघड झालं होतं. त्याच्याबरोबरचा अख्खा दिवस भुर्रकन उडून गेला.दुसऱ्या दिवशी भेटायचं असं ठरवूनही भेट झाली नाही आणि परतल्यावर ती रुखरुख लागून राहीली की नीट भेटच झाली नाही.....
असो. अजूनही असेच काही मुद्दे असतील पण अजून तरी ते गुंत्यातून बाहेर पडले नाहीयेत.आता हे सगळं मुद्दे टाकून लिहायची काय गरज? पण ही विचारांची गुंतवळ एकदा सोडवायचीच होती. लिहायच्या आधी वाटत होतं की हे लिहायचंय, ते लिहायचंय,पण प्रत्यक्षात सुरुवात केल्यावर जाणवतं की मलाच माहीत नाहिये काय लिहायचंय ते आणि मग गाडी Reverse मध्ये जाऊन मला नक्की काय वाटतंय यावर येते. असं करत अनेकदा लिखाण अर्धवट टाकून दिलं. पण आज कदाचित थोडं फार तरी समजलंय असं वाटतंय. हम्म्म....आज तरी पोस्ट करून टाकते म्हणजे एक उत्तर राहील आज कुणी परत विचारलं की ....'मग? अजून काय विशेष?'...
-विद्या.

5 comments:

Abhijit Bathe said...

अल्टिमेट झालंय - ते याच्यासाठी कि आयदर विचारांच्या गतीने (शुद्धलेखनाच्या चुका टाळुन) लिहिता आलंय किंवा लिखाणाच्या गतीने डोक्यात आलंय. शिवाय तो लिहिण्याचा रिदम सुरुवातीपासुन शेवटपर्यंत समान ठेवलायस ते ही छान! बरेच लोक - विषय इंटरेस्टिंग असुनही - ’हॅन्ड आय कोऑर्डिनेशन’ नसल्याने गंडतात - तसं तुझं झालं नाहिए!
हे असं वाचलं कि वाटतं - च्यायला इतर लोक पण डिट्टो माझ्यासारखेच बोअर होतात तर! पण मग (तुला वाटलेलं) बोअरिंग लिखाण वाचुन बोअर न होता सह-अनुभुतीचा दिलासा मिळाला.
आनंद वाटला.

लिहुन हायसं वाटलं याचा तुला झालेला आनंद अलाहिदा!

कोहम said...

प्रिया तेंडुलकरच्या एका पुस्तकात वाचलं होतं की विजय तेंडुलकर म्हणायचे की लिहिणं ही एक सवय आहे. सतत काही ना काही तरी लिहीत राहावं. मग त्यात सुसूत्रता येत जाते. मला वाटतं आपण सगळे ब्लॉगर्स मुळातच आळशी आहोत. आणि प्रत्येक वेळी लिहिताना आपल्याला जगातली सर्वोत्कृष्ठ कलाकृती निर्माण करायची असते. त्यामुळे बरेचदा अर्धवट लिखाण राहून जातं असं वाटतं.

छान लिहिलयस. असूत्रतेतील सुसूत्रता ह्या प्रकारात मोडणारं वाटलं. आवडलं.

स्वाती आंबोळे said...

विद्या!! This is spookey!!!
माझ्या डोक्यात exactly हेच सुरू आहे सकाळपासून!!!
(चला, या योगायोगाची तरी माफक का होईना, गंमत वाटली. आहे आहे.. अजून जिवंत आहे.) :)

Meghana Bhuskute said...

I can understand. Agadi asach kantala sachun yeto ani mag ugach aparadhi watayla lagat, utsah nasalyabaddal... kaytari aapali natak asatat.. asa watat.
mast jamlay..
lawkar lihi yar, kam aso kinwa naso..;)

wishwanath said...

very nice vidyaji. i have read two posts on your blog. Mag ajun kay vishesh & me kuthe aahe? i think you are good writer & blog is the perfect space for you.
keep it up & inform me when you upload new post.