Thursday, July 04, 2013

अस्वस्थ

          गेले कित्येक दिवस हात शिवशिवत आहेत काहीतरी लिहायला पण विचारांची इतकी सरमिसळ होती की एक असं ठाम पोस्ट लिहिता येत नव्हतं. अर्थात लिहायची इच्छा होण्याचं कारण म्हणजे पाऊस !अगदी जूनच्या तिसऱ्या दिवशीच टपकला आणि एकदम रडू दाटून आलं. शिकागोमध्ये पडणाऱ्या पावसात ती ओढ नव्हती. (कदाचित तिथल्या हिमवर्षावात असेल ? ) पण पाऊस पडला आणि लोकांची फेसबुक वर गर्दी झाली स्टेटस अपडेट करण्यासाठी. कुणीतरी लिहिलंही की 'इतकाही पाऊस नाही पडला जितके स्टेटस अपडेट झालेत.'
हळूहळू मग लिहिण्याचे विचारही मागे पडत गेले. पण रोज घरातून निघताना, घरी जाताना, कपडे वाळत घालताना, मुलांना खेळायला नेताना दिसतच होता पाऊस आणि प्रत्येकवेळी अस्वस्थ व्हायचं. कशामुळे माहित नाही. ते टाळायला काय करायला हवं हे ही  माहित नाही. 
         शाळेत, १० -१२ वी पर्यंत असंच व्हायचं मला मावळत्या सूर्याकडे पाहताना. त्यातले रंग इतके अदभूत, सुंदर असायचे की वाटायचं मला का नाही हे असं चित्र रंगवता येत? इतके सारे रंग इतक्या सहजतेने एकत्र कसे आणता येत असतील? म्हणजे गडद गुलाबी आणि निळा, हळूहळू एकमेकांत असे मिसळून जातात की  त्यांना जोडणारी रेघ कुठेच दिसत नाही. खूप वाईट वाटायचं मला की देवाने मला ही कला दिली नाही म्हणून.  चित्रकार असते तर किती छान झाले असते. भरभर उतरवले असते ते सर्व रंग कागदवर.१२ वी नंतर कोरेगांव सुटलं आणि ते रंगही. पण ते तसेच राहिले माझ्या मनात आणि अजूनही असे कधीतरी ते आठवतात, कोरेगावच्या रस्त्यावरून जातानाचे ते मावळतीचे रंग. 
         कॉलेजमध्ये गेल्यावर एक वेगळाच अस्वस्थपणा यायचा. तो म्हणजे शब्दांचा. ते वयच तसं होतं. प्रेमात पडण्याचं. आता वाटत ते कुणातरी व्यक्तीपेक्षा प्रेमात पडण्याच्या कल्पनेवरचं प्रेम असावं. उगाचच एका व्यक्तीचा ध्यास घ्यायचा आणि मग दिवसभर तिचाच विचार करत बसायचं. दिवास्वप्नं बघत, कॉलेजच्या व्हरांड्यात त्याला/तिला शोधत, तासाला लक्ष न देत मनाला विरंगुळा म्हणून त्याला आठवत बसायचं . तेव्हा पहिल्यांदा जगजीत आणि चित्राची एक कसेट हातात पडली होती. ती ऐकताना अस्वस्थ व्हायला होई. कुठून आणतात हे असे शब्द, त्यांचे अर्थ, आणि बरोबर कसे लागतात काळजात आपल्या? त्या शब्दांसमोर माझे साधे मराठी शब्द फार तोकडे वाटायचे, अजूनही वाटतात. का नाही माझ्याकडे ती प्रतिभा ते कविमन, ते शब्द, त्या कल्पना?
        अर्थात लिहिण्याबद्दल अजूनही एक गोष्ट जाणवते. प्रेम करण्याच्या काळात/ वयात सुचलेले थोडेफार जे शब्द होते तेही रोजच्या संसारात विसरून/विरून गेले. पण या कवी लोकांचं नाही होत असं? किती वर्षं गुलजार प्रेमावर कविता लिहू शकतात? 'आ निंद का सौदा करे, एक ख्वाब दे, एक ख्वाब दे'. त्यांच्या मनात कसं हे प्रेम अजून तग धरून बसलंय? त्यांना नाहीये का संसार, मुलं-बाळ? आणि समजा व्यवसाय म्हणूनच करायचा तरीही त्यात विविधता येण्यासाठी तरी कुठून आणतात ते सर्व शब्द, कल्पना ?   गाण्यांच्या बाबतीतही तसंच. अगदी लता-आशा ताईंचा आवाज असो रफी किंवा किशोर कुमार असो आणि अगदी परवाच ऐकलेल्या आशिकी-२ मधल्या अरजित सिंग चा असो. कधी कधी मनात ना मी खूप सही गाणं म्हणत असते. पण तोंड उघडलं की बिघडलं. मला नक्की माहित असतं की या गाण्यात या शब्दाला असं नाजूक वळण आहे, इथे आवाज असा चढतो, वगैरे. पण ओठ उघडले आणि आवाज ऐकला स्वत:चा की थिटेपणा जाणवतो. मग तसंच मनातल्या मनात गाणं म्हणायचं आणि गप्प बसायचं.
         तर हे असं अस्वस्थ होणं नेहमीचंच पण पाऊस असला की अजून त्रास. लोकांच्या अनेक ब्लॉग, पुस्तकं वाचतानाही जाणवतं की कितीतरी प्रकारे कितीतरी विषयांवर कितीतरी उत्तम लिहिलं जाऊ शकतं. त्यात माझे पावसावरचे पोस्ट साधेच असणार आणि असे वेगळे तरी काय असणार? म्हणजे वारजे पुलापर्यंत २ किमी चालत येताना मला लिहावंसं वाटत होतं माझ्या होणाऱ्या धावपळीबद्दल. एक तर छत्री नाही. त्यात भली मोठी पर्स घेऊन नवी कोरी काळी प्यांट घालून मी पाण्यातून चालले होते. मागून स्कुल बस जोरदार येत होत्या.  आवाज आला की पळा डावीकडे. शेवटी उजवीकडूनच चालत राहिले. समोरून कुणी जोरात येताना दिसला की आधीच हात करून हळू म्हणून सांगायचे. एकजण तरी गेलाच उडवत शिंतोडे. मग १ मिनिट त्याला शिव्या देण्यासाठी तोंड फिरवून, मान वळवून बोलण्यात गेला. माझा जोश पाहून मागचा आधीच स्लो झाला. :)  मध्येच उडी मारून एखादा खळगा चुकवून २०  मिनिटात कशी बशी बस स्टोप वर पोचले. रिक्षा मिळत नव्हतीच. शेवटी बसनेच जावं म्हटलं.
        तिथे बायका साड्या पकडून उडणाऱ्या शिंतोड्याची पर्वा न करता वाकून आपली बस येतेय का बघत होत्या. शाळेला जाणारी मुलं उभी होती. त्यात छोट्या बहिणीला सांभाळत चढवून बसवणारी एक मुलगीही. कसं ना लहानपणीच आई-पण येतं? तेव्हढ्यात एकजण बाइक वरून आला. त्याचा झोपाळलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि दिसेल ते घातलेले कपडे. त्याच्यामागून बायको उतरली त्याची. बायकोच असावी. तिच्यासाठी थांबला तो बारीक पडणाऱ्या पावसात भिजत. त्याच्या त्या असं सकाळी धडपडत झोपेतून उठून येण्यात, बस जाईपर्यंत वात पाहण्यात सॉलिड प्रेम वाटत होतं मला. ती एका बसमध्ये बसली आणि तो निघाला टांग मारून. मला शिवाजीनगर बस मिळाली. बसमध्येही झिम्मा वाचत बसले. डेक्कन कॉर्नर लाच उतरून रिक्षा केली. म्हटलं कुठे चालायचं परत. रिक्षामध्ये उग्र वास उदबत्तीचा. अर्थात असे रिक्षावाले मला सिगारेटच्या वासापेक्षा कधीही चांगले वाटतात. निदान धंद्याची पूजा तरी करतात असं वाटतं. 
         पावसात असा विविध साधनांनी प्रवास करायची गेल्या १० वर्षातली पहिलीच वेळ असेल. अमेरिकेत गाडी हे केवळ नाईलाज म्हणून घेतलेलं वाहन. पण त्यातून जाताना निसर्गापासून, रोजच्या या पळापळीपासून दूर गेलेय हे जाणवलंच नाही. म्हणजे पाऊस आहे तर ज्यादा कपडे, चप्पल घेऊन जा, पावसातून भिजून आलाय म्हणून गरम गरम चहा करून द्या, कधी वडापाव तर कधी भाजलेलं कणीस. वापरायला जुने कपडे, सुकत घातलेल्या कपड्यांवर सतत लक्ष की कधी पाऊस येईल. 'जरा थोड्या वेळाने निघ, पाऊस कमी झाल्यावर',' आता कुठे पावसा पाण्याची येतेस' अशी वाक्यं. सगळं विसरले होते मी गेल्या कित्येक वर्षांत ते गेल्या एका महिन्यात अनुभवलं. पण कुठं आणि कसं मांडावं हे कळत नव्हतं म्हणून हा अस्वस्थपणा. 
आता इतक्या वर्षात इतकं तरी कळलं की या त्रासातून सुटका नाही. पण त्या-त्या क्षणाला आपल्यातला कमीपणा जाणवून लोकांची प्रतिभा दिसण्याची बुद्धी तरी मिळाली हेही नसे थोडके. :)
 
-विद्या. 

11 comments:

श्रद्धा said...

Ha ha Vidya, sahiye manogat... pavasachi maja band kachechya adun nahich ga samajat..

Anonymous said...

You read my mind...Exact feelings!

Anonymous said...

Mast lihil ahe....

KattaOnline said...

पाऊस, चिकचिक, रपरप, वाफाळलेला चहा, खमंग भजी, उबदार गोधडी सगळं आठवलं हा लेख वाचून… धन्यवाद :)

Chaitanya Joshi said...

मस्त पोस्ट!!
विशेष छान एवढ्यासाठी वाटलं कारण मी सुद्धा अगदी अशीच पोस्ट लिहायला घेतली होती आणि अर्धवट सोडूनसुद्धा दिली. पावसाने सुरुवात होऊन नंतर विचारांचा आणि विषयांचा गुंता इतका झाला होता की पोस्टला 'पसारा' असं नाव द्यायचं ठरवलं होतं :P
पण तुम्हाला अस्वस्थपणा जितका छान मांडता आलाय…तितका 'पसारा' नाही मांडता आला मला…शेवटी राहूनच गेलं!:(

Manasi said...

पावसाळा म्हणजे गार हवा, हिरवीगार सृष्टी, गरमागरम भजी/सामोसे/वडे वगैरे, आलं घातलेला चहा- क्या बात है!

Vidya Bhutkar said...

Thank you all for your nice comments. Just on the same day I posted this, I read few more posts on rain and felt 'ohh I forgot this'...I am so thankful to have this season... :) It brings so much joy in an ordinary everyday life.
Vidya.

इंद्रधनु said...

+++++++++++++++++++ 1 :)

Anonymous said...

Too good, mainly tuze fav singer jagdish and chitra che ganya baddal hyat pan uleg kelas ;), best was college time che prem :), prem keva pan zala tari feeling tich aste anni te tu khub chan explain kelas
:)

Unknown said...



Nice vidya ...u penned to the feelings very well

Vidya Bhutkar said...

Thank you all. Looks like this season brings out the emotions in all hearts. :)
Vidya.