Monday, April 30, 2007

अशी पाखरे येती

    आज सकाळी स्कूलबसला अगदी धावत पळत पोचलो. गाडीतून उतरून स्वनिक धावत पळत बसमध्ये जाऊन बसला. त्याची धावपळ बघून जरा वाईट वाटलं. या लहानग्या वयात दप्तर घेऊन असं पळापळ करायला लागते पाहून कसंतरी झालं. सकाळपासून डोक्यात तेच चित्र होतं. काहीतरी लिहिण्याचा विचार होता पण १० वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली ही पोस्ट आठवली. इथल्या वाचकांना  वाचण्यासाठी पोस्ट करत आहे. बरेचसे संदर्भ १० वर्षे जुने आहेत. सध्या आपल्याकडे बस आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनच दुर्दैवी घटना घडत आहेत आणि संकटे वाढत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. आता पुरती हि जुनी पोस्ट. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  ऑफिसला जाताना समोर एखादी स्कूलबस लागली की आम्ही वैतागतो. अरे एक तर ती दिलेल्या स्पीडलिमिट्च्या एक मैल वर जात नाही, शिवाय रेल्वे क्रॉसिंगला थांबते, सिग्नल पिवळा होण्याच्या खूप आधीच थांबते आणि हो जर त्यात मुले चढणार किंवा उतरणार असतील तर 'Stop' लिहिलेला आपला मोठा दांडा आडवा टाकून मागच्या सर्व गाड्या थांबविते. त्यातही मुलेच ती,कुठेही जातील, पळतील म्हणून पलीकडच्या बाजूने जाणाऱ्या गाड्यांनीही थांबायचे म्हणे. मग कुणाची चिडचिड होणार नाही? या बसेसना बाकीच्या सुरक्षा व्यवस्थाही खूप असतात म्हणे. त्याच्या खिडक्या आपल्या नेहमीच्या बससारख्या खालून वर जाणाऱ्या नसतात, तर वरच्या बाजूने उघड्या असतात का तर मुलांनी हात बाहेर काढायला नको, खिडकी जोरात आदळून हातावर पडायला नको.(लहानपणी माझ्या हातावर एकदा पडली होती. ) दरवाजा उघडून मुले आत येऊन बसल्यावर दरवाजा बंद होतो आणि मगच बस हालते....... किती हा खटाटोप. नसते लाड...नाहीतर काय?

       कांदिवलीच्या लोखंडवाला अपार्टमेंटसच्या मागील रस्ता,हायवेकडे जाणारा, सकाळी ७ वाजल्यापासून तुम्ही तिथे उभे राहिलात तर कुठे एखादी रिक्षा मिळण्याची शक्यता, तीही अनोळखी माणसांसोबत वाटून घेतलेली. मख्ख चेहऱ्याने बसून फक्त २ कि.मी. रिक्षाने जाण्यासाठी ४०-५० मिनिटे घालवायची.अगदीच उशीर झाला तर हायवे वर येणारी कंपनीची बस चुकेल या भीतीने तंगड्या तोडत गर्दीतून वाट काढत पूर्ण रस्ता चालत जायचे नाहीतर मग बस मिळाली तर अर्ध्या अंतरावर उतरून चालत जायचे. गेले कित्येक महीने तिथे रस्ता बांधकाम( खोदकाम?) चालू आहे आणि माझ्यासारख्या आळशी माणसांना रिक्षा मिळत नसल्याने अतिशय गैरसोय झाली आहे. बसमध्ये चढल्यावर सुटे पैसे शोधण्यात निम्मा वेळ जायचा आणि तोपर्यंत माझा स्टॊप यायचाही. उरलेल्या वेळात मी माझ्या ड्रेसची ओढणी खराब होते की कंपनीची बस चुकते या काळजीत.

     त्या भागात कुठेतरी झोपडपट्टी होती म्हणे. भडक निळ्या रंगाचे युनिफॉर्म घातलेली पोरे-सोरें तिकडून कुठून तरी यायची. काही माझ्याबरोबरच चढायची(की पळत-पळत पकडायची?) . हातातला पास दाखवून आपल्या मित्र-मैत्रिणीशी त्यांचा गप्पा सुरूही व्हायच्या. काही जण जागा असेल तर बसच्या पायऱ्यांवर आरामात बसायची नाहीतर बसच्या पायऱ्या चढून गेल्यावर जो खांब असतो त्याला पकडून उभी राहायची.वरच्या दांड्याला मलाही अजून नीट पकडता येत नाही. एकदा मी माझ्या जागेवरून उठून एका मुलीला बसायलाही सांगितले पण तिला तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत खांबाला धरूनच उभे राहायचे होते. मी सकाळ-सकाळी किती वैतागून प्रवास करायचे आणि ही पोरे मात्र आरामात धक्के सहन करत, मजेत गप्पा मारत जायची. आणि हो,आपले कंडक्टरसाहेबही फार प्रेमळ. लोकांना उतरण्यासाठी ते गाडी थांबवतच नाहीत, मुलांसाठी मात्र १०-१५ सेकंद थांबवतातच.

    एकदा मी आईबरोबर सातारला गेले होते. साताऱ्याच्या मुख्य चौकात दोन्ही बाजूंनी रिक्षा, भाजीवाले, गाड्यावाले यांच्या आणि बसच्या मध्ये असलेल्या जागेतून स्वतः:ला बसमध्ये घुसवताना एका चिंगीला मी पाहिले आणि अक्षरशः: शहारले. तिचा एकच हात बसच्या दाराला पकडू शकला होता आणि बस निघाली. आजूबाजूला लोकांनी मग दुसऱ्या हाताला पकडून तिला आत घेण्याचे महान कार्य केले होते. आजचा दिवस तरी ती घरी (सुखरूप?) पोहोचणार होती. बसच काय रिक्षाने जाणाऱ्या मुलांचेही हाल असेच असतात. बसमध्ये चालक हा सरकारी कर्मचारी तरी असतो आणि त्याला पुरेसे शिक्षण दिले असण्याची थोडीफार शक्यता असते.रिक्षांत मात्र, चालकाने जर पैसे भरून चालन-परवाना काढला असेल किंवा त्याला ही गिऱ्हाईके पोचवून बाकीही कामे करायची असतील तर?

      मी दुसरी-तिसरीत असताना, घर शाळेपासून दूर असल्याने मी व माझ्या बहिणीसाठी रिक्षा लावली होती. आता लहानपणापसूनच उशीरा उठण्याची सवय असल्याने आम्ही सगळ्यात शेवटी रिक्षात चढायचो. त्यामुळे कडेची जागाच काय पूर्ण सीटच भरलेली असायची. मग सीटच्या पुढे उभे राहणे आणि अजून उशिरा गेले की रिक्षावाल्या काकांच्या बाजूला अर्ध्या जागेत बसणे अशी कसरत करायला लागायची.त्यातही सीटवर बसलेल्या मुलांना पुढच्या मुलाचे दप्तर किंवा त्यातली एखादी टोकदार वस्तू लागून झालेले छोटे-मोठे अपघात, भांडणे यांची भर. अर्थात अगदी ४-५ वर्षापूर्वीपर्यंत माझे वजन(की उंची?) त्यातल्या त्यात कमी असल्याने, ३ पेक्षा जास्त लोक असल्यावर, मी आईच्या मांडीवर बसून रिक्षातून प्रवास केला आहे ही गोष्ट वेगळी.

       आमच्या शाळेत एका मोठ्या फळ्यावर 'अशी पाखरे येती' असं टायटल देऊन आजूबाजूच्या किती गावांतून मुले शिकायला येतात त्या गावांची नावे दिली होती. त्यातले कितीतरी जण अगदी पाचवीपासूनच २-६मैल सायकलवर येतात किंवा मग बस लौकर येते म्हणून सकाळीच १०वाजण्याच्या आतच शाळेत येतात आणि संध्याकाळी ६ नंतर घरी पोचतात. ८वीत असताना माझी एक मैत्रीण जवळच्या एका गावाहून बसने यायची आणि ती लौकर येत असल्याने माझीही जागा पकडून ठेवायची त्याचा मला तेव्हा फार आनंद व्हायचा. पण आज मी एव्हढ्या लहान वयात मुले किती थकून जात असतील याची कल्पनाच करू शकत नाही. सायकलवरून येणारी मुले पावसाळ्यात कशी येत असतील बरे? चिखलाने भरलेले पाय शाळेजवळ आल्यावर पावसाच्या पाण्यातच धुताना उड्या मारणारी मुले आनंदी म्हणायची की निरागस असल्याने त्यांच्याच कष्टाशी अनोळखी?

     माझ्या सुदैवाने शाळेतच काय पण ११-१२वीलाही गावातल्या कॉलेजातच गेल्याने कधी बसचा प्रवास आला नव्हता किंवा पुढच्या शिक्षणातही. आणि त्यानंतरही मुंबईत थोडा-फार प्रवास केला तो कंपनीच्या बसमधूनच त्यामुळे धक्काबुक्की कमीच. पण तिथल्या लोकलमध्येही चतुराईने चढून जाण्याऱ्या, परीक्षेच्या वेळी उभ्या उभ्याच अभ्यास करणाऱ्या इवल्याश्या जिवांना पाहिल्यावर मलाच भीती वाटायची. त्यांच्या आईबाबांना माहीत असेल काय की आपला मुलगा/मुलगी इतके धक्के खात, पळापळ करत, जीव धोल्यात घालत प्रवास करतात? की तेही असेच अजून कुठल्यातरी बसमध्ये लटकून रोज प्रवास करतात? की अजूनही अशी अनेक गावे आहेत जिथे चौथीनंतर गावात शिकताच येत नाही?की त्यांना, शाळा कितीही दूर असली तरी, आपल्या मुलाला चांगल्याच शाळेत घालायचे असते? की शाळेत जाण्याआधीच त्यांना आयुष्याच्या शाळेत जगण्याचं खरंखुरं शिक्षण मिळतं?की मलाच हे सगळं Complicated वाटतंय आणि त्यांच्यादृष्टीने हे सगळं रुटीन असतं? असो.....इथल्या स्कूलबसमधल्या पाखरांना पाहताना मला आपल्या गावच्या पाखरांची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

-विद्या भुतकर .

2 comments:

Monsieur K said...

well written!

kids in US school enjoy a privileged life when it comes to getting on a school bus.

i remember when our school moved to a new building in kothrud, i started going by a schoolbus - it was a bus rented from the PMT, and run by a few parents. the bus conductor was a maid at one of the parents', and she used to treat us with 'vada-pav' on her son's b'day.
fortunately, kadhi rickshaw/PMT/ST madhun gelo naahi shaalet kinva college la.
but then, i guess i was lucky as compared to most others in india.

punhaa ekdaa, chaan lihila aahes.
~ketan

स्वाती आंबोळे said...

अगदी मनातलं लिहीलं आहेस. :)