Friday, January 04, 2013

My 2 cents

        चला आता बाकीच्या लोकांमध्ये माझी पण भर पडलीच. हेच, बलात्कार, स्त्री-मुक्ती, वगैरे लिहीनारया मध्ये. बाकी आपण करायचे तरी काय? तर निषेध झाले, आंदोलने झाली, नेत्यांवर टीका झाल्या, फेसबुक वर काल्पनिक शिक्षा पण झाल्या. मग जमेल ती माहिती 'शेयर' करून झाली. कुणाचे प्राण वाचलेच त्याने तर बरंच की. तर एकूण या सगळ्यात बाकी लोकांपेक्षा मीही काही वेगळं केलं नाहीये. म्हणजे अगदी एखादा मराठी ब्लॉग स्किप पण केला की  काय तेच तेच वाचायचे म्हणून. पण मनातला विचार थांबत नव्हता. की  हे असले रानटी लोक असतात तरी कोण? म्हणजे मुला-मुलींमध्ये भेदभाव, वेगळी वागणूक वगैरे कधी खूप जाणवलं नाही मला घरी तरी. कधी लहान भावाचे लाड फक्त को मुलगा आहे म्हणून होतात असं वाटायचं आणि मुलगाच हवा म्हणून आम्ही तीन मुली झालो त्याच्या आधी तेव्हढंच. पण शाळेत मुलांशी अभ्यासात स्पर्धा विशेष करून दहावी मध्ये. अगदी जीव तोडून अभ्यास केला. आणि करू नकोस असं कुणी म्हटलंच नाही. उलट संस्कृत मध्ये मार्क कमी पडले म्हणून आजोबा नाराजच झाले. पण मुलगी म्हणून काय करायचे आहे जास्त मार्कांचे असे कधी वाटले नाही.
          पुढे हट्टाने दुसऱ्या गावात शिकायला राहिले, नोकरीला राहिले, पण हे असले लोक मला दिसले कसे नाहीत? रानटी, हैवान? जे मित्र होते ते तर सर्व काळजीने साथ देणारे, उशीर झाला तर घरी सोडणारे, माझ्याशी स्पर्धा करून पुढे जाणारे आणि वेळ आल्यावर हिम्मत देणारे. मग मला कसे नाही दिसले त्यांच्यामध्ये हे हैवान? अगदी बरचसे ब्लॉगही मुलांनीच लिहिलेले. एकही मुलीचा नाहीच दिसला. मग जर या मुलांना, पुरुषाना आपल्या मुलींची, बहिणींची, बायको, आईची इतकी काळजी आहे तर मग हे असले लोक आले कुठून? गरीब, आडाणी असलेले? पण त्यांच्याकडे तर गरिबीतून वर यायलाच वेळ नसेल तर ते ही असली कामे कुठून करत असतील. बर समजा असतील फक्त गरीबच, अडाणी लोक असे वागणारे. मग ते मुलीची छेड काढल्यावर बाप उलटला म्हणून एका पोलिसाला मारले तोही असाच होता का कुणी गरीब, अडाणी? ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीत ते लोक भ्रूणहत्येसाठी करत हसतील का पैसे जमा कसेतरी?
         तर प्रश्न असा की हे लोक आहेत तरी कोण? आधी वाटले माझ्या घरच्यांना आणि माझ्या सर्व मित्रांना आभार मानावेत की मला तुम्ही आजपर्यंत माणूस म्हणून वागणूक दिलीत. पण त्यात आभार कसले? तो तर माझा हक्क होता. मग वाटले निदान अभिमान तरी वाटलाच की इतके चांगले लोक भेटले आयुष्यात म्हणून. मग म्हटले त्या सर्वांनाच एक पडताळा करून घ्यायला सांगावा अगदी मीही. म्हणजे असं की प्रत्येक पावलावर त्यांनी मला एक परकी स्त्री म्हणून आदराने वागणूक दिली असेल. पण त्यांनी स्वत:च्या आयुष्यातही तेच केले आहे का? त्या लोकांमध्ये हो पोस्त वाचणारे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकही येतात. तर प्रश्न हा विचारायचा की व्यक्तिगत आयुष्यात मी दुटप्पी पणाने वागलो आहे का?
         ऑफिसमध्ये टीम-मेट सोबत समानतेने वागले तरी लग्नाची वेळ आल्यावर मला सासऱ्याकडून अमुकच भेट हवी असा वाद आपण घातलाय का? बर नसेल घातला तरी आई-वडिलांना घालू दिलाय का? मुलगी कितीही हुशार असली तरी तिची फी न भरता मुलासाठी बचत केलीय का? अगदी साधं म्हणजे मुलीला सातच्या आत घरात आणि मुलाला १० असे वेगळे नियम ठेवले आहेत का आणि अशा नियमाचा फायदा घेत खरंच दहाला घरी आलाय का?  मैत्रिणीला चिडवू नये कुणी म्हणून गाडीवरून सोडलं असेल, पण स्वत: कुणा मुलीला 'आयटम','माल', 'चिकणी','चीज' म्हणून चिडवलं आहे का? अगदी शिकवलं मुलीला खूप पण लग्नाची वेळ आल्यावर हुंडा द्यायची तयारी ठेवलीच आहे का? बायको माहेरी पैसे देतेय म्हणून चिडलाय का? हे सगळे झाले छोटे प्रसंग. आपण शिकलो, मोठे झालो, बरेचसे लोक गरिबीतून वर आले चांगली नोकरी लागली, इ. पण तरीही गावाकडे कुणी नातेवाईक आहेच जो अजूनही जुन्याच रिती पाळत आहे. त्याने केला असा भेदभाव. तर त्याला कधी थांबवले आहे का? आपण कशाला पडायचे मध्ये म्हणून गप्प राहिलाय का? मी राहिलेय. आणि त्याची टोचणी जात नाहीये केव्हापासून. काय करायचं सुचत नाहीये. कदाचित आधी कळल असतं तर काही केलं असतं का मी? माहित नाही? आणि आता बोलूनही उपयोग नाही. कारण आता परत असं कधी गप्प राहणारच नाही.
          क्षणाक्षणाला जर आपण असे दुटप्पी निर्णय घेत असू तर आपणच नाहीये का ते पशु? म्हणजे १००% नसलो तरी ५%,१०%, ५०%? काहीतरी असूच ना? त्यामुळे सध्या मला हे असले लोक कोण असतील याच्यापेक्षा आपल्यातच आहे का? असा प्रश्न पडलाय. तुम्ही पण करा पडताळा जमेल तर.

-विद्या.

2 comments:

महेंद्र said...

विद्या,

माणसातला पशू जागा होण्यासाठी त्याला फक्त चान्स लागतो, तो मिळाला की तो जागा होता.
इतरही वेळेस तो असतोच, फक्त सुप्तावस्थेत , ज्वालामुखी प्रमाणे आतल्या आत धगधगत !

Manasi said...

खरं आहे....या एका घटनेने अनेक प्रश्न समोर आणून Pandora's Box उघडला आहे.