Monday, November 20, 2017

छोटेसे बहीण भाऊ

        गेले काही दिवस झाले घरात जोरदार वाद चालू आहेत. आमचे धाकटे चिरंजीव त्यांच्या दीदीच्या शाळेत जायला लागल्यापासून. शाळा सुटली की आम्ही जाईपर्यंत शाळेतच असतात. जिथे मग ते दोघे दोन वेगवेगळ्या रुममधे असतात पण एकमेकांना भेटू शकतात किंवा खेळूही शकतात. आता पहिला आठवडाभर दीदीने समजून घेतलं की भाऊ लहान आहे आणि त्याला आपण सोबत खेळू देऊ. पुढे दोन महिने झाले तरीही तेच चालू राहिल्याने दीदीने आता असहकार पुकारला आहे. मग अर्थातच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळायला येऊन न देणे, रागावणे, आमच्याकडे तक्रार करणे असे प्रकार चालू आहेत. तर चिरंजिवांचे दीदीबद्दल गाऱ्हाणे चालू आहेत. दीदी खेळायला घेत नाही, नीट बोलत नाही, मित्रमैत्रिणींनाहि खेळू देत नाही वगैरे. आता आई-बाबा म्हणून कुणाची बाजू घ्यायची हा मोठा प्रश्न पडला आहे. 
        खरं सांगायचं तर आमच्या घरात मी सर्वात मोठी असल्याने या सर्व प्रसंगातून मी गेले आहे. बहीण-भाऊ मधल्या सुट्टीत सोबत असणे, किंवा त्यांना शाळेत जाताना-येताना सोबत घेऊन येणे हे केलं आहे. आणि त्याबद्दल राग येऊन अनेकदा आईकडे तक्रार केली आहे. भाऊ लहान असताना आजोबा म्हणायचे की त्याला सायकल बसव पण तू सायकल चालवू नकोस, हातात धरून चालत जा. म्हणजे डबलसीट बसून चुकून तो पडायला वगैरे नको. हे असले प्रकार करताना खूप चिडचिड व्हायची. त्यात भर पावसात, छत्री धरायची, सायकल धरायची की स्वतःला सांभाळायचे की भावाला. अशी तारांबळ व्हायची. हे सर्व आजही सांगताना डोळ्यासमोर येतं. इतकं डोक्यात पक्कं बसलंय. 
         आता एक आई म्हणून याचा विचार करताना वाटतं, मुलगा लहान आहे, त्याला तेव्हढीच दीदीची सोबत होईल तर किती बरं आहे. अजून नवीन मित्र-मैत्रिणीही नाहीत. बिचारा एकटा बोअर होतो. मग मुलीला सांगायला जावं तर ती म्हणते पण वेगवेगळ्या तुकड्यातील मुलामुलींना एकत्र खेळणं अलाऊड नाहीये. आणि तिचंही बरोबर आहे, त्याने मोठ्या मुलांसोबत न खेळता स्वतः नवीन मित्र बनवले पाहिजेत, नवीन लोकांत कसं वावरायचं शिकलं पाहिजे. शेवटी आम्ही तोडगा काढला, तीन पैकी एकच दिवस त्याने तिच्याकडे जायचं आणि बाकी दिवस नवीन फ्रेंड्स बनवायचे. दोघांनीही 'डील' म्हणून अटी मान्य केल्या. म्हटलं, सुटलो. 
       मागच्या आठवड्यात एकदा स्वनिक बोलला, "आई आज दीदी माझ्याशी खूप छान वागली.". म्हटलं,"काय केलं?". तर म्हणाला,"मी एकटा बसलो होतो बसमध्ये तर ती येऊन माझ्याशेजारी बसली.". ते ऐकलं आणि एकदम पाणीच आलं डोळ्यांत. कितीही चिडली तरी दीदीने भावाची काळजी केलीच होती. आणि त्यालाही ते जाणवलं होतं. किती छोट्या गोष्टींनी फरक पडतो या वयात. वाटलं, याच पुढे जाऊन आठवणी बनणार आहेत.

      कसं असतं ना? मी लहान असताना कितीही चिडले, तरी आता त्याच आठवणी सोबत आहेत. आणि आता कितीही इच्छा असली तरी तीन वेगवेगळ्या देशातून आम्ही वर्षातून एकदा एकत्र भेटूही शकत नाही. 

विद्या भुतकर. 

No comments: