Monday, January 21, 2013

शब्द

           काही दिवसांपूर्वी एक ओळखीची व्यक्ती भारतात जाणार होती लग्नाला. त्याने सानूला विचारले होते की 'काय आणू तुझ्यासाठी येताना?'. तिने तिची नेहमीची लिस्ट सांगितली. 'चोकलेट, गुलाबजाम, म&म(M & M ),इ.'. तो परत आल्यावर तिचा पहिला प्रश्न होता,' माझे M & M आणलेस?' आता तो बिचारा लग्नाच्या घाईत असणार. अजून ब्यागही उघडल्या नसाव्यात त्याने. असो, एकूण काय त्यादिवशी त्याने काही आणले नव्हते. मग पुढच्या वेळी भेटल्यावरही तोच प्रश्न. तेव्हाही तो असाच घाईत आला होता. आता अशावेळी तिला कसे समजवायचे म्हणून मग मी माझ्याकडे असलेल्या काही गोळ्या तिला दिल्या आणि सांगितले कि त्यांनी दिल्या आहेत. आता मुले म्हटली की असे छोटे मोठे किस्से होतच राहतात. म्हणजे सानू तर एकदम वसुली खाते आहे. एकदा तिने पहाटे विचारले की काल रात्री डाळिंब देणार होता ते दिले का नाही म्हणून. पण मला तिचा निरागसपणा पाहून वाईट वाटले आणि भीतीही. की अशा निरागस पोरांना बाहेरच्या जगात कसे सोडून देणार म्हणून. तिच्यासाठी एखाद्याने सहजपणे बोललेले वाक्यही 'काळ्या दगडावरची रेष' आहे. समोरचा जे  काही बोलत आहे तो तसाच वागणार याची खात्री, विश्वास.
           मग मी आठवायला लागले माझ्यासाठीही अशीच प्रत्येक वाक्य एक 'काळ्या दगडावरची रेष' असेल कधीतरी, मी लहान असताना. पण ती कधी पुसली गेली ते काही आठवेना. अगदी सहावी, सातवीपर्यंत आठवतंय की मी दादांना सातारला गेले की 'नवनीत व्यवसायमाला' आणायला सांगायचे.(अभ्यासासाठी कुणी असे मागे लागेल का? असो.) तर दोन-वेळा त्यांनी नाहीच आणली. ते त्यांच्या कामात असतील, त्यात माझे पुस्तक महत्वाचे नसेलही. पण ते 'आणतो' म्हणाल्यावर ते आणणार हे माझ्या मनात पक्कं असायचं. त्यांनी ते न आणल्यावर मी रडून घातलेला गोंधळही आठवतो. म्हणजे निदान तोवर तरी समोरच्या माणसाने दिलेला शब्द तो पळणार याची मला निरागस खात्री होती. मग ती कधी पुसली गेली?
         माझा तो विश्वास बहुदा शाळेतल्या अनुभवानंतर 'अपेक्षा' या गटात गेला असावा. कारण तोवर एखाद्याने शब्द दिला तरी तो/ती तो शब्द ठेवणार की नाही ते त्या व्यक्तीच्या स्वभावावरून, आधीच्या वागण्यावरून मला कळू लागलं होतं. पण मग तरीही त्या एका खास व्यक्तीने दिलेला शब्द तेव्हढाच महत्वाचा वाटायचा. 'त्याने का केला नसेल फोन? का नसेल पोचला वेळेवर इतक्या वेळा सांगूनही?' असे मोठे मोठे प्रश्न मला पडायचे. म्हणजे लोकांची पारख करणं,अनुकूल परिस्थिती नसेल हे सगळं समजण्याचं वय असूनही 'तो' एक शब्द माझ्यासाठी 'काळ्या दगडावरची रेष' असायचा. मग पुढे या नात्यातही अपेक्षा, अपेक्षाभंग,भांडणे, दु:ख हे सगळं आलंच. पण त्या सगळ्यांमधून जाताना प्रत्येकवेळी मी माझ्यातल्या त्या छोट्या निरागस मुलीला मागे टाकत होते का? हो बहुतेक.
          बर हे सगळं झालं माझ्यावर होणारा लोकांच्या वागण्याचा परिणाम. माझ्या वागण्याचं काय? दिवसातून आपण कितीवेळा असे शब्द बोलतो जे आपण पूर्ण करू शकणार नाही हे आपल्याला मनातून माहित असतं? साधी गोष्ट, सकाळी एक मेल येते क्लायंटची एखादं काम करण्यासाठी. जेव्हा ती येते तेव्हाच माहित असतं की इतकं काम आहे की आज शक्यच होणार नाही. पण तरी लिहितोच 'आज संध्याकाळ पर्यंत करून टाकेन काम'. म्यानेजरला एखादी गोष्ट करून घेण्यासाठी मागे लागतो, तो म्हणतोही करेन, पण तो प्रयत्नही करत नाही आणि आपण फक्त त्याने ते करावं म्हणून अपेक्षा करत राहतो. एखाद्या वाढदिवसाला जायचं असतं, जायचा कंटाळा आलेला असतो, पण ते सरळ न सांगता 'कळवते मी. सांगेन तुला तसं . इ. ' निरोप ठेवतो. एखाद्याकडून निघाल्यावर म्हणतोही, 'घरी पोचल्यावर फोन करते.' पण घरी आले की समोर जे दिसतंय ते काम करत राहतो आणि मग नंतर फोन केल्यावर कारणं सांगत बसतो. आणि मी या सगळ्या लिहिलेल्या गुन्ह्यामध्ये दोषी आहे. माझ्या शब्दाला माझ्या मते काहीच किंमत नाहीये का म्हणजे? केवळ बोलायचं म्हणून बोलते का मी? आणि जर माहित आहे की एखादी गोष्ट शक्य नाही होणार तर मग आधीच खरं का नाही सांगत? स्पष्ट बोलायला लोक जरा जास्तच टाळायला लागले आहेत असं वाटतं मला आजकाल. का नाही बोलायचं खरं? आणि बोललेलं का नाही करायचं खरं?
          कधी संदीप सानुला प्रोमिस करायला लागतो तेव्हा मी त्याला थांबवते कारण मला माहित असतं की ते शक्य नाही होणार तर मग उगाच तिला खोट्या आशा का दाखवायची म्हणून. तर हे पोस्ट लिहिता-लिहिता मला वाटलं की का नाही मी पण तसंच वागायचं रोजच्या आयुष्यात? तर आजपासून मीच माझ्या शब्दाला किंमंत द्यायचं ठरवलं आहे.

-विद्या.


4 comments:

इंद्रधनु said...

एकदम वास्तव लिहिलं आहे.. खरं तर हल्ली कोणी नंतर कळवेन जमेल की नाही असं म्हटल्यावरच समजतं की याचा अर्थ नाही आहे... पण खरच नाही कोणी स्पष्ट बोलत.... सगळेच जण येतात या यादीत...

भानस said...

”भीड ’ही बरेचदा या सगळ्याची जननी असते. शिवाय समोरच्याला वाईट वाटेल किंवा गैरसमज होईल ही भावनाही असते.

”अपेक्षा आणि पूर्ती " बरेचदा हातातहात घालून जातच नाहीत. :(

भापो गं!

Manasi said...

खरं आहे, आपला शब्द आपण जितका पाळू तितकी त्याची value जास्त.

Parag said...

:)

Chaan lihila ahes..