Monday, April 20, 2020

मिसळ

आज मिसळ केली होती, निवांतपणे एकेक काम उरकत. अशीही काही घाई नव्हती. जेवण मस्त झालं. पण चौघेच फक्त ना जेवायला. मागच्या वेळी केलेली तेव्हा दोन जवळच्या फॅमिली घरी होत्या जेवायला. दिवसभर पाणीपुरी, भेळ, मिसळ असं चालूच होतं. ते आठवलं. खरंतर असं काही करायचं असेल तर अगदी बनवतानाच कुणालाही फोन करुन, 'कुठे आहे? येताय का जेवायला?' असं फोन करुन विचारलं जातं. पाणीपुरी असेल तर नक्कीच. वांगी बनवली की शेजारी दिली नाहीत असं होतंच नाही. 
     दर एक-दोन आठवडयांनी वगैरे जवळची एक फॅमिली आणि आम्ही वीकेंडला भेटतो. काही खास नाही बनवलं तरी पिठलं-भात, साधं वरण वगैरे केलं तरी चालतं. आता पिठलं बनवत असतांना ते सोबत जेवायला नाहीत याची खूप आठवण होते. अनेकदा ऑफिसच्या दिवशी भेटणं जमत नाही, तेव्हा 'मी हे बनवलंय, देऊन जाते पटकन' असं म्हणून एका डब्यांत पाठवून दिलं. यालाही कित्येक दिवस लोटले. हे म्हणजे, साग्रसंगीत काही बनवलं नसतांनाही केवळ नुसत्या गप्पांसाठी केवळ जेवणाचं निमित्तमात्र. दिवस सरताहेत तसं हे सगळं जाणवत आहे. असो.
        ही आजची मिसळ, तुमच्यासोबत शेअर करते. :) 

विद्या भुतकर. 

No comments: