Thursday, March 31, 2016

ठेचा

          मागच्या आठवड्यात ठेचा केला. आता कुणाला वाटेल त्यात विशेष काय? खरंतर हा असा पदार्थ आहे की त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू घरात नेहमीच असतात पण कधी तो करायचं लक्षात येत नाही. आमच्या घरी ठेचा असं म्हणतच नाहीत, 'खरडा' म्हणतात याला. शिळी भाकरी आणि ठेचा खाण्याची मजा औरच. असे काही पदार्थ केले ना म्हणजे ठेचा, कोथिंबीर वडी, चकुल्या, भरलं वांगं, पुरणपोळी, इ. की मला मराठी असल्याचा फार अभिमान वाटतो. म्हणजे अगदी शिवजयंतीला काही लोकांना वाटतो न तसाच. इथे मी काही ठेच्याची हिस्टरी वगैरे देणार नाहीये, कारण मला माहीतही नाहीये. पण गेल्या वर्षभरात इकडे आल्यापासून एकदाही केला नव्हता. परवा ताज्या मिरच्या घेतल्यावर मात्र मोह आवरला नाही. करताना चार स्टेप मध्ये त्याची रेसिपीही फोटो मध्ये काढून घेतली. 
               इथे रेसिपी शेअर करायचे म्हणून पोस्ट सुरु तर केली पण लक्षात आले की मला त्याचा जो लिहिण्याचा ठराविक साचा असतो ना, तो नीटसा लिहिता येणार नाही. आता कृती लिहायची जाऊ दे, अगदी प्रमाणही ठराविकच असंही काही सांगता येणार नाही. आणि हे आजच नाही नेहमीचं आहे. कितीतरी वेळा एखादी रेसिपी नक्की आहे तशीच फॉलो करायची असं ठरवते पण एक कप पीठ, अर्धा कप पाणी असं मोजून माप घ्यायचं माझ्याकडून होत नाही. मग नेहमीच घोळ होतात. अगदी मध्ये मी पाव भाजी चे पाव बनवायची रेसिपी बघितली कमीत कमी ५-६ वेळा चुकले, पाव टाकूनही द्यावे लागले. शेवटी स्वत:ला ताकीद दिली की त्यांनी जसं लिहिलंय तसंच सर्व करायचं.  मग काय, झाले मस्त पाव. तेव्हापासून ठरवलं पाव करताना माप घेऊनच करायचे.
            पण मुळात मला वाटतं लहानपणापासूनच आई म्हणायची अंदाजे पाणी घेतले,  अंदाजे मीठ घातले, इ. त्यामुळे एखाद्या पदार्थासाठी माप घ्यायची सवयच लागली नाही. अर्थात ते कारण सोडलं तर एखाद्याच्या स्वभावाचा पण त्यात हिस्सा असतो असं मला वाटतं. काही लोक असतातच मुळात अगदी व्यवस्थित, नीटनेटके की ज्यांना प्रत्यके गोष्ट नियमानुसार करायची सवय असते. शिवाय बनवताना किती लोकांसाठी बनवायचे तेव्हढेच मोजून घ्यायचे हेही ठरलेले. आणि सर्व साहित्य हाताशी असल्याशिवाय ते पदार्थ बनवायला घेतही नाहीत. तर काही आयांसारखे अनुभवी.  आणि काही माझ्यासारखे अतिआत्मविश्वास असलेले, ज्यांना किती लोकांसाठी किती सामान घेतले पाहिजे याचा विचार मनात येतच नाही. एखादे साहित्य नसेल तर एकदम शेवटी लक्षात येते आणि मग त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरेच काहीतरी घालतात.
            मला खरंतर वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतं. मनासारखे काहीतरी बनवले आणि उत्साहाने सर्वांनी खाल्ले की मोठ्ठं समाधान मिळतं. प्रयत्न सार्थकी लागले असं वाटतं. पण माझा हा स्वभाव मध्ये आडवा येतो. जर मी मन लावून सर्व रेसिपी आहे तशीच बनवून घेतली तर माझे जेवण अजून सुधारेल. (इथेही माझा ओवर कॉनफ़िडन्स आड येतोच.). असो. ठेच्याची जमेल तशी रेसिपी देत आहे. माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी, जे अंदाजे मिरच्या, कोथिंबीर, मीठ सर्व घालून चांगला ठेचा बनवतील असा विश्वास आहे. :)
           तेलात, जिरे हिंग आणि लसूण छान खरपूस भाजून घेतला. त्यात देठ काढलेल्या, धुवून पुसून घेतलेल्या मिरच्या टाकल्या आणि त्यातले पाणी सुकेपर्यंत भाजून घेतल्या. मध्ये मध्ये झाकण ठेवून बाजूलाही उभी राहिले, डोळ्यांना मिरचीपासून वाचवण्यासाठी. मिरच्या भाजल्यावर त्यात खूप सारी कोथिंबीर घातली. तीही धुवून आणि पुसून घेतली होती, पाणी उडू नये म्हणून. त्यात पुढे भाजलेले मुठभर दाणे टाकले. मीठ आणि एका लिंबाचा रस. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. झाला ठेचा तयार. दुसऱ्या दिवशी दही भातात ठेचा घालून डब्यात घेऊन गेले. काय भारी लागत होता. :)



विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: