Sunday, October 09, 2016

एक परीक्षा संपली

            ऑस्कर वगैरे मिळेल अशी शंका आल्यावर जसे लोक भाषण देण्याची तयारी करतात ना तशी मला खूप इच्छा होत होती आधीच विचार करायची, माझी रेस झाल्यावर काय बोलायचं यावर. पण जोवर खरंच रेसला पोहोचत नाही तोवर हजार विघ्न मध्ये त्यामुळे पोचले तिथे तरी नशीब असे म्हणायची वेळ आली होती. अगदी पोरांना पण कुठे धडपडू नका म्हणून सांगत होतो. तर यावेळची रेस जरा खास होती. यावेळी तीन रेसच्या मेडले मध्ये भाग घेतला होता. म्हणजे काय तर एप्रिल मध्ये ५किमी, जून मध्ये १० किमी आणि आज ची हाफ मॅरेथॉन असे तिन्ही पळाले तर अजून एक मेडल मिळणार होतं. विचार करायला गेलं तर त्यात खूप अवघड काही नव्हतं. ५किमी आणि १० किमी अंतर पार पडायलाही अवघड नाही आणि हाफ तर मागच्या वेळी पण केली होती. पण प्रत्येक रेसच्या वेळी काहीना काही अडचण येतंच होती. अगदी १० किमी मध्ये संदीपला भागही घेता आला नाही त्याच्या पायाला दुखापत झाल्याने. तर एकूण काय की जानेवारी मध्ये अख्या वर्षाच्या पळण्याचे प्लॅनिंग करणे हा वेडेपणा आहे हे तरी आम्हाला कळले. असो. 
         आज सकाळीही अगदी शेवटच्या घटकेला रेसच्या जागी पोहोचलो. रेसचा भोंगा वाजला आणि आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो होतो. त्यात सर्वात वाईट गोष्ट काय असेल तर सतत पाऊस चालू होता. आजपर्यंत अनेकवेळा उन्हात पळालो आहे पण पावसात पळायची पहिलीच वेळ होती. मी तर दोन जॅकेट घालून बसले होते. संदीपचा पाय एकदा दुखावल्याने सोबतच पळायचे असे ठरवले होते. दोन मैल झाले आणि पावसाने माझे जॅकेट अतिशय जड झाले होते. नेहमेप्रमाणे माझे ओझे संदिपवर गेलेच. बिचाऱ्याने माझे जॅकेट त्याच्या खांद्यावर टाकले आणि पळत राहिलो. अनेकवेळा आपण गाडीपासून घरापर्यंत पोचताना धावत येतो ओलं होऊ नये म्हणून. पण एकदा एक जण मला म्हणाला होता,'इट्स जस्ट वॉटर.' तर त्यानुसार भिजत भिजत पळत राहिलो. इट वॉज जस्ट वॉटर !
        नेहमीप्रमाणे रेस सुरु झाली की माझी विचारयात्रा सुरु होते. अनेकवेळा रेस चालू असताना मला कौतुक वाटतं ते त्या लोकांचं जे सकाळ-सकाळी स्वतः बोर्ड घेऊन लोकांना प्रोत्साहन देतात किंवा काही आपल्या लहान मुलांना घेऊन आलेले असतात. कितीही थकून पळत असलो तरी मी त्या लोकांना थँक यु म्हणतेच. इतक्या सकाळी तेही रविवारी लवकर उठून कुणी येईल का? पण त्यांच्या बोलण्यानेही बरेचदा स्पीड वाढतो. उत्साह येतो. असाच विचार करत होते, आम्ही मुलांना स्केटिंग क्लासला घेऊन जातो तिथे यावेळी स्वनिक बराच वेळ दीदीच्या क्लासकडे बघत होता. कितीतरी वेळा त्याच्या ट्रेनरने त्याला हाक मारून पुढे चालायला सांगितले. तो बाहेर आल्या आल्या आम्ही दोघांनी त्याला एकच प्रश्न विचारला,"तू तुझा क्लास सोडून बाकी मुलांकडे काय बघत बसतोस?". त्याने नाराज होऊन विचारले,'पण मी गुड जॉब केला ना?". आज विचार करत होते, परक्या लोकांनी  केवळ बोलण्याने मला पळायला जोर येत असेल, तर आमच्याकडून त्याच्याही काही अपेक्षा असतीलच. कितीतरी वेळ तोच विचार डोक्यात घोळत राहिला. 
        बाकी, पावसात भिजत पळाल्याने अनेक फायदे झाले. एकतर अजिबात गरम झालं नाही आणि शरीरातील पाणीही नेहमीइतकं कमी झालं नाही. नेहमीप्रमाणे माझी गणितं चालूच होती, चार मैल झाले म्हणजे ९ च राहिले. पुढे ७ झाल्यावर आता निम्म्याहून कमीच अंतर राहिले इ. मागच्या अनुभवामुळे रेसचा रस्ता माहित झाला होता. तरी पावसात ओले झालेले शूज, जॅकेट यांचं ओझं वाटायला लागलं होतं. अनेकवेळा ट्रेकिंगला जाताना भिजत गेले आहे पण तीन तास पावसात पळण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे एक वेगळाच अनुभव घेतला दोघांनीही. दरवेळी फिनिश लाईन पार पडली की काहीतरी वेगळं वाटतंच. यावेळीही वाटलंच. नंतर काकडत गाडीजवळ येऊन कपडे बदलून पुढचा अर्धा तास तरी थंडी जात नव्हती. नेहमीप्रमाणे मित्राकडे घरी जाऊन खाऊन एक झोप काढली. :) मेडल बघून मुलांना होणार आनंदही दरवेळी नवीनच. आता घरी उबेत बसून ही पोस्ट लिहितानाही छान वाटत आहे.
        एकेकाळी पहिली हाफ मॅरेथॉन झाल्यावर परत मी असं काही करेन का असा मला प्रश्न पडला होता. पण आज ४ हाफ मॅरेथॉननंतर खरंच काहीतरी सातत्याने केल्याचा आनंद वाटत आहे. :) जानेवारी मध्ये रजिस्टर केलेली ही रेस होती. तेव्हापासून वर्षातले ९ महिने बाकी सर्व गोष्टींसोबत या एका गोष्टीचे वेधही लागले होते. ते एकदाचं पार पडलं आहे. त्यामुळे आज एकदम ओझं हलकं झाल्यासारखं वाटत आहे. पाय जड झालेत ही गोष्ट वेगळी. ते किती दुखतात ते उद्या कळेलच. :) तोवर सर्व मेडलचे आणि आज ओला होऊन चुरगळाल्येला बिब चे हे फोटो. :) आणि ओलेचिंब झालेले आम्ही. 




विद्या भुतकर.

No comments: