Tuesday, January 24, 2017

स्वप्ना आणि सत्या : भाग ६ - सुट्टी

        अनेकवेळा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपला किंवा आपल्या जोडीदाराचा स्वप्नाळू स्वभाव दिसून येतो. बरं जिथे स्वप्नं आहेत तिथे सत्याची जाणीव करून देणारा पार्टनर असतोच. दोघेही स्वप्नाळू असणारी जोडी विरळाच. अगदी सहज म्हणून सुरु केलेल्या या पोस्टचे ५ भाग झाले आजपर्यंत. त्या सर्वांची लिंक देत आहे इथे आणि आजचा भागही.  प्रत्येकवेळी तो किस्सा लिहिताना किंवा वाचताना किती सहज रोज कुठेतरी तो घडत असेल असं वाटतं. त्यामुळे तुम्हालाही तसंच वाटलं तर शेअर नक्की करा. भाग १:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1022515327828002
भाग २:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1055392274540307:0
भाग ३:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1062843353795199
भाग ४:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1075633792516155:0
भाग ५:  https://www.facebook.com/VidyaBhutkar1/posts/1142875719125295:0
 
आजचा भाग: 
       दोघेही टिव्ही समोर बसून मध्ये मध्ये बोलत आहेत. 
 
ती: ए आपण सुट्टीला कुठं जायचं? 
तो: कुठली सुट्टी? 
ती: असं काय करतोस आता २६ जानेवारी येतोय ना? 
तो: अगं मग एकच दिवस तर आहे. 
ती: अरे, मधला एक दिवस रजा टाकली तर ४ दिवस मिळतात ना? 
तो: हां खरंच की. 
ती: मग कुठे जायचं? 
तो: जायला कशाला पाहिजे? घरीच राहू की. 
ती: शी किती बोअर होईल अरे? घरी काय राह्यचं? 
तो: उलट चार दिवस म्हणून सगळी जनता बाहेर पडते. उगाच गर्दीत कशाला जायला पाहिजे? 
ती: मग काय करायचं?
तो: काही नाही. निवांत घरी बसू, खाऊ-पिऊ, टिव्ही बघू. 
ती: बस इतकंच? 
तो: उलट घरासारखी व्हेकेशन नाही. 
ती: बाहेर जाऊ ना, एखाद्या गावाला. छान तीनेक दिवस रूम बुक करू. खायचं प्यायचं, फिरायचं. 
तो: बाहेर जाऊन रूमवरच पडून राहायचं तर घर काय वाईट आहे? 
ती: जरा बदल होतो ना तेव्हढाच. फ्रेश होतो एकदम. 
तो: उलट मी तर म्हणतो त्या गर्दीत, प्रवास करून त्रास करून घेण्यापेक्षा घरी राहून फ्रेश होऊ मस्त. 
ती: .... 
गप्पच... 
तो: शिवाय त्यासाठी पैसे घालवायची काय गरज?
ती: प्रत्येक गोष्ट गरजेसाठी करतो का माणूस. मजा म्हणून पण करू शकतो ना?
तो: अगं पण त्यासाठी बाहेर पडलंच पाहिजे असं थोडीच आहे? 
ती(चिडून) : जाऊ दे मग. घरीच राहायचं आहे तर मी रजा तरी का घेऊ? 
तो: ठीक आहे, नको घेऊस. 
ती: तुला ना काही बोलण्यात अर्थच नाही. 
तो: नको बोलूस !
 
दोघेही तोंड फिरवून बसले होते. आज पुन्हा एकदा स्वप्नं आणि सत्याचं वाजलं होतं. आज पुन्हा दोघांना एकमेकांचं मन समजलं नव्हतं.
 
विद्या भुतकर.


No comments: