Tuesday, February 16, 2016

Are you connected?

        आज ट्रेन मध्ये बसून लिहिलं . बराच वेळ मिळतो विचार करायला आणि  लोकांकडे पाहायला पण. इथे आल्यापासून रोजचा  ट्रेनचा प्रवास असतोच. आम्ही इथे आलो तेंव्हा पहिले साधारण एक दोन आठवडे आमच्याकडे फोन नव्हते.आजकालच्या दिवसात दोन आठवडे फोन नाही? संदिपचा ऑफिसचा नंबर मिळाला आणि मी घरी असे तेव्हा ठीक होतं . पण एकदा मलाही एका इंटरव्ह्यू ला जायचं होतं त्याच्या ऑफिसजवळ. माझे काम झाले आणि त्याला फोन करून मी सांगितले की स्टेशनवर भेटू. आता आम्ही दोघेही निघालेलो होतो आणि स्टेशन नवीन असल्याने कुठे भेटायचे हेही नक्की नव्हते. मी पोचले आणि मला अस्वस्थ वाटू लागलं कारण भेटायचं कसं हे कळत नव्हतं. मी स्टेशनच्या आत-बाहेर दोन फेऱ्या मारल्या आणि बाहेर थांबायचं ठरवलं. मी बाहेर आले आणि समोरच तो दिसला. खरंतर आम्ही काही या देशात नविन नाही त्यामुळे घरी वेगवेगळे गेलो तरी नीट पोचलो असतो पण त्यादिवशी आनंद झाला.  काहीही संवाद नसताना बरोबर भेटण्याचा आनंद बऱ्याच वर्षांनी  मिळाला. आमची चुकामूक होण्याच्या कितीतरी शक्यता होत्या पण तरीही भेटलो, मस्त वाटलं. 
            तर आजचा प्रश्न असा की 'Are you connected when you are not connected?'. आजकाल फोन असल्याने माणूस अगदी समोर  उभा राहीपर्यंत आपण विचारतो 'कुठे आहेस?'. मग हात उंचावतो, खूण सांगतो. पण त्यात मजा नाही जी  एका जागी उभं राहून अस्वस्थपणे वाट पाहून, शोधून भेटण्यात आहे. आम्ही कॉलेजमध्ये म्हणजे ११-१२ मध्ये असताना, गावाच्या दोन टोकाकडून ७ जणी यायचो. सकाळी कितीही घाईत निघाले तरी आठवड्यातून बरेच वेळा आम्ही  भेटलेले असायचो आणि मग गप्पा मारत पुढचा रस्ता संपायचा. आता Whats app वर दर सेकंदाला अपडेट असतो तरी वेळेत भेटत नाही. ;)
            होतं काय की यात आपल्या माणसाच्या सवयी, वेळा सगळं लक्षात ठेवतो आपण. त्यावेळेस वाट पाहतो, अस्वस्थ होतो. विमानातून बाहेर पडल्यावर, फोन नसताना, केवळ तो पलीकडे आला असेल अशी अपेक्षा करत ती आणि या बाजूला तो, 'ती कुठल्या दारातून बाहेर पडेल आणि केंव्हा' या काळजीत. किती प्रेम असतं त्या भेटण्यात? केवळ चुकामुक होऊ नये म्हणून जागा न सोडता उभं राहणं आणि सावलीत उभे राहून, 'पोचलास की फोन  कर' म्हणणं यात किती फरक आहे? अर्थात माझं म्हणणं नाही की कुणी उन्हात उभं रहावंच. पण समजा तिचा स्वभाव ओळखून, 'ती नक्कीच उन्हात उभी राहणार नाही' असा विचार करण्यातही मजा आहे की नाही? 
           नियमित फोन असल्याने कितीतरी गोष्टींचा आनंदाला आपण मुकतो असे वाटते. परवा मी नसताना संदीपने भाज्या आणल्या आणि त्यात मी न सांगितलेल्या भाज्याही होत्या ज्या त्याने आठवणीने आणल्या आणि बरोबर मी विचारलं,'लाल भोपळा आणलास का रे?'. त्याने आणला होता. छोटीशी गोष्टं पण छान वाटतं  ना असं झाल्यावर? गाडीत बसून बाहेर पडताना काहीतरी राहिलं म्हणून त्यानं आत जाऊन येताना, मी विचार करावा की दुध आत ठेवलं असेल का मी? आणि त्यानं ते ठेवून यावं.  म्हणजे काय तर मी तुला आणि तू मला ओळखावं. :) होतं का असं आजकाल तुमचं?
              आज फोन न घेता बायकोला शोघायला लागलं तर असेल का माहित कसं आणि कुठे पाहायचं ते? समजा वेळ आली तर सांगता येईल का मुलगा कुठे आहे न फोन करता? घरी जाताना वाटतं का दोघानाही आज तिच्यासाठी/त्याच्यासाठी काहीतरी न्यावं त्यांनी बरेच दिवसांपासून मागितलेलं? भेटेल का तो आज पार्किंगमध्ये न ठरवताही त्याच जागी न चुकता? किंवा कॅन्टीन मध्ये एकाच वेळेला? 'Are you connected when you are not connected?'

विद्या भुतकर.
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

2 comments:

Unknown said...

Me marathit type karat nahie, pan mala khoop avadla tumcha blog.
Khoopach chaan.
Thanks for sharing.
Nupur.

Vidya Bhutkar said...

Thank you Nupur. Keep visiting.