Wednesday, February 10, 2016

फिनिश लाईन

            आज खूप दिवसांनी पळाले, म्हणजे रनिंग केलं. जवळ जवळ ३-४ महिन्यांनी. मस्त वाटलं.गेल्या वर्षी दोन हाफ मेरेथोन पळाले, एका पाठोपाठ एक. भारी वाटलं होतं. पुढचे १५ दिवस धड चालता येत नव्हतं ही गोष्ट वेगळी पण केलं याचं समाधान होतं. आज सांगायचं कारण म्हणजे, खूप दिवसांनी पळताना मी कसेतरी ४ कि.मी. पार पाडले, चाललेच जवळ जवळ. वाटलं १३ मैल /२१ कि.मी.  कसे पार केले असतील मी? 
         तर हे अंतर पार कसं पाडलं असेल? सर्वात मुख्य म्हणजे सराव होताच. तरीही पळण्याच्या दिवशी, पहिला मैल वेगाने धावल्यावर धाप लागली. मग पुढे ३ मैलपर्यंत  जाताना वाट लागली होती. 
वाटलं,' झक मारली आणि असले उद्योग केले. '. 
'कशाला काय कारण होतं? सुखासुखी घरात बसले असते ना?'
'अजून १० मैल? शक्यच नाही.'
'निदान थोडं कमी अंतर घ्यायचं होतं.'
'अजून एक हाफ मेरेथोन कशाला हवी होती?'
              असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारात होते मी. शेवटी मग गाणी ऐकायला सुरु केली. फास्ट गाण्यामुळे थोडा जोर चढला आणि मी पुढचे दोन मैल धावले. तोवर माझ्या डोक्यात गणित चालूच होतं. ५ मैल झालेत. अजून ८ जायचेत. तेव्हढ्यात माझा स्पीड स्थिरावलेला होता. आजू बाजूचे लोक काय करत आहेत ते पाहून मी एकाद्या जोडीच्या मागे रहायला लागले. त्या दोघी गप्पा मारत जात होत्या. 
               मी मनातल्या मनात,' इथे श्वास घेता येत नाहीये आणि या काल रात्रीच्या गप्पा काय मारत आहेत?'. त्यांच्या मागे मागे मी २ मैल गेले. तोवर माझ्या लक्षात आलं ७ मैल झालेत. मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केलंय. मग मला जोर चढला. ९ मैल पर्यंत पोचल्यावर मात्र दम लागला होता. १०-११ वा मैल मी सर्वात कमी स्पीडने गेले. डोक्यात अनेक विचार होते. आजूबाजूला लोकांच्या नावाचे बोर्ड पकडलेले लोक उभे होते. त्यांचे प्रोत्साहन होतेच. पण डोक्यात आपण या रेस नंतर काय करू याचाही विचार येऊ लागला. 
                सर्वात लांबचा पल्ला १२ आणि १३ मैलाचा होता. पाय थकले होते पण थांबत नव्हते. आणि जायचे म्हणले तरी जोरात जात नव्हते.  गेल्या काही दिवसांची मेहनत, मेडल मिळाल्यावर होणार आनंद ,  मुलांचे चेहरे हे सर्व आठवून केवळ मनोबळावर ते शेवटचे अंतर पार पाडले. आजूबाजूच्या लोकांचे आवाज, 'Almost there', 'Almost there'  कानात घुमत होते. जवळ जवळ ३ तासात मी १३. १ मैल पार केले होते. ते मेडल हातात घेतलं आणि डोळ्यात पाणी आलंच, कितीही नाही म्हटलं तरी. 
                 आता हे रामायण यासाठी कारण रेसच काय आपलं आयुष्यही असंच असतं ना? एक अंतर असलं पाहिजे पार पाडण्यासाठी. जे पाहून, 'छे जमणारच नाही' असं म्हणून बसायला नको किंवा हे इतके कमी करण्यात काय मजा असंही नको. पण ते इतकं दूर हवं की जे पार पाडल्यावर नंतरसुद्धा स्वत:चं आश्चर्य वाटलं पाहिजे, 'अरे हे आपण कसं केलं असेल?' एक उद्देश पाहिजे, त्यासाठी रोज सकाळी उठून सराव केला पाहिजे. एखाद्या पहाटे त्यासाठी झोप सोडून बाहेर पडलं पाहिजे. आणि रेस सुरु झाल्यावर कितीही अशक्य वाटलं तरी पुढे जात राहिलं पाहिजे. 
             सुरुवातीला वाटतंच अशक्य आहे. त्यासाठी थोडी गाणी लावायची. बाहेरचा आवाज बंद करून आतला ऐकायचा. लागला दम तर आजू बाजूच्या, पुढे जाणाऱ्या लोकांच्या सोबत जायचं. निम्मं अंतर पार केल्यावर इतके आलोय तर पुढेही जाऊच म्हणून जात रहायचं. सर्वात अवघड म्हणजे शेवटचे अंतर असते. आज पर्यंत केलेले सर्व कष्ट, आपले लोक, बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन, हे सगळं घेऊन जोव गोळा करून सर्व शक्तीनिशी पळत जायचं ती फिनिश लाईन येईपर्यंत. मेडल तर मिळतंच पण मागे वळून पाहताना आपण हे केलं याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

1 comment:

Unknown said...

Another wonderful one, so apt the thoughts!