Sunday, April 17, 2016

बाजार

        रविवारची सकाळ लवकर सुरु झाली त्यामुळे पटकन सकाळी जाऊन Indian Store मधून भाज्या, डाळी, बिस्किटे, लोणची इ सामान घेऊन आलो. भूक लागली म्हणून आधी जेऊन घेतले. पण त्यानंतर तो समोर सामानाच ढीग नको वाटू लागला. आणि हे आजचं नाही. एकूणच आणलेलं सामान जागेवर लावून ठेवणे हा अतिशय कंटाळवाणा प्रकार आहे. सर्व सामान जागेवर ठेवण्यासाठी कधी आहे तो पसारा काढून नीट लावावा लागतो. कधी आधी असलेली वस्तू परत आणली जाते किंवा हवी ती राहून जाते. त्यात फ्रीज कितीही मोठा असला तरी त्यात भाज्या, फळे ठेवायला पुरेशी जागा नसते. मग कधी मागे एखादी भाजी सडलेली असते. कधी एखाद्या शिळ्या भाजीचा किंवा भाताचा डबा तसाच राहिलेला असतो. ते सर्व साफ करणं आलंच. त्यामुळे हे असं सामान लावायचा अतिशय कंटाळा. 
        हा कंटाळा माझ्यात असला तरी आमची आई किंवा संदीपची आई मात्र एकदम विरुद्ध आहेत. कोरेगाव मध्ये दर सोमवारी आठवड्याचा बाजार असायचा. आम्ही शाळेत जायचो. आई एक दोन मोठ्या पिशव्यांमध्ये भाज्या, फलं सर्व घेऊन यायची. कधी आम्ही घरी आलो तरी आईची आवारावर चालूच असायची. पालेभाज्या लवकर निवडून पहिल्या दोन दिवसांत केल्या जायच्या. चवळी, वाटाणे किंवा वाल अशा शेंगा सोलून किंवा तुकडे करून पुन्हा पिशव्यात भरून ठेवयाची.तेंव्हा वाटाणे खूप गोड नसायचे त्यामुळे अगदी छोटेछोटे जे असतील ते मला आवडतात म्हणून बाजूला काढायची. आम्हीही कधी निवडायला बसलो चुकून तर त्यातले काही दाणे तोंडात घालणारच. मिरच्यांचे देठ काढून त्या पिशवीत भरायच्या. अशी छोटी छोटी कामे खूप पुरतात. माझ्याकडून यातलं काहीही होत नाही. ते करण्यासाठी किती डेडिकेशन लागतं ते आता कळतंय.
         पूर्वी घरी फ्रीज नव्हता तोवर पालेभाज्या अध संपून जायच्या. त्यामुळे शक्यतो सोमवारी चाकवताचं गरगट असायचं. मग शेंगा वगैरे आणि आठवड्याच्या शेवटी बटाटा किंवा उसळ नक्की. दर सोमवारी ताजी केळी खायला मिळायची. कधी ठराविक त्या ऋतू मध्ये मिळणारे फळ. किंवा तोतापुरी आंबा अशा अनेक  गोष्टी मिळायच्या. कधी स्वस्त आहे म्हणून घेतलेली कोथिंबीर वडीसाठी जायची. कधी ओल्या शेंगा मिळायच्या. अर्थात आताही हे सर्व मिळतच. पण हे सर्व ठराविक दिवशीच घरी येत असल्याने, बाजारचा दिवस एकदम स्पेशल होऊन जायचा. 
          संदीपच्या आईही कधी आमच्या सोबत आल्या सामान घ्यायला कि आठवणीने सांगतात मागची मेथी वय गेली बरंका. किंवा अगं अजून मिरच्या आहेत दोन आठवडे जातील तरी. किंवा वाटाणे सोलून ठेवतील. फ्रीज नीट लावून ठेवतील. कधी पुदिना आणला तर तो लवकर खराब होतो तेंव्हा एकेक पाने निवडून बाकी टाकून देतील. एखादी भाजी खराब होत असेल तर आजच करून टाकू अशी आठवण करून देतील. पुण्यात असताना बरेच वेळा आम्ही शनिवारी असे भाज्या आणायला एकत्र गेलोय आणि मग आईंनी सर्व सामान निवडून लावून दिलंय. :) 
          मलाही ही अशी मेंटेनन्स ची कामं करण्याची सवय लावली पाहिजे. पण जमत नाही. तरी मी मागच्या वेळी खूप भाज्या आणल्या होत्या. म्हणून एक यादी फ्रिजला लावून ठेवली काय काय आहे त्याची. त्यामुळे शक्यतो सर्व भाज्या वेळेत खाल्ल्या गेल्या. मग कढीपत्ता खराब होतो म्हणून आज मुद्दाम बाहेर काढून थोडा सुकवून एका डब्यात घातला. दुध उकळून दही लावले. (अजून लागले नाहीये. ) तरी मिरच्यांची देठ काढून ठेवली नाहीत, न कोथिंबीर निवडली. बघू कधी जमते ते सर्व करायला. कधी कधी संदीप यातले थोडे फार करून ठेवतो. But I have a long way to go. :) असो, आजचा तरी बाजार लागलेला आहे. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: