Monday, January 21, 2013

शब्द

           काही दिवसांपूर्वी एक ओळखीची व्यक्ती भारतात जाणार होती लग्नाला. त्याने सानूला विचारले होते की 'काय आणू तुझ्यासाठी येताना?'. तिने तिची नेहमीची लिस्ट सांगितली. 'चोकलेट, गुलाबजाम, म&म(M & M ),इ.'. तो परत आल्यावर तिचा पहिला प्रश्न होता,' माझे M & M आणलेस?' आता तो बिचारा लग्नाच्या घाईत असणार. अजून ब्यागही उघडल्या नसाव्यात त्याने. असो, एकूण काय त्यादिवशी त्याने काही आणले नव्हते. मग पुढच्या वेळी भेटल्यावरही तोच प्रश्न. तेव्हाही तो असाच घाईत आला होता. आता अशावेळी तिला कसे समजवायचे म्हणून मग मी माझ्याकडे असलेल्या काही गोळ्या तिला दिल्या आणि सांगितले कि त्यांनी दिल्या आहेत. आता मुले म्हटली की असे छोटे मोठे किस्से होतच राहतात. म्हणजे सानू तर एकदम वसुली खाते आहे. एकदा तिने पहाटे विचारले की काल रात्री डाळिंब देणार होता ते दिले का नाही म्हणून. पण मला तिचा निरागसपणा पाहून वाईट वाटले आणि भीतीही. की अशा निरागस पोरांना बाहेरच्या जगात कसे सोडून देणार म्हणून. तिच्यासाठी एखाद्याने सहजपणे बोललेले वाक्यही 'काळ्या दगडावरची रेष' आहे. समोरचा जे  काही बोलत आहे तो तसाच वागणार याची खात्री, विश्वास.
           मग मी आठवायला लागले माझ्यासाठीही अशीच प्रत्येक वाक्य एक 'काळ्या दगडावरची रेष' असेल कधीतरी, मी लहान असताना. पण ती कधी पुसली गेली ते काही आठवेना. अगदी सहावी, सातवीपर्यंत आठवतंय की मी दादांना सातारला गेले की 'नवनीत व्यवसायमाला' आणायला सांगायचे.(अभ्यासासाठी कुणी असे मागे लागेल का? असो.) तर दोन-वेळा त्यांनी नाहीच आणली. ते त्यांच्या कामात असतील, त्यात माझे पुस्तक महत्वाचे नसेलही. पण ते 'आणतो' म्हणाल्यावर ते आणणार हे माझ्या मनात पक्कं असायचं. त्यांनी ते न आणल्यावर मी रडून घातलेला गोंधळही आठवतो. म्हणजे निदान तोवर तरी समोरच्या माणसाने दिलेला शब्द तो पळणार याची मला निरागस खात्री होती. मग ती कधी पुसली गेली?
         माझा तो विश्वास बहुदा शाळेतल्या अनुभवानंतर 'अपेक्षा' या गटात गेला असावा. कारण तोवर एखाद्याने शब्द दिला तरी तो/ती तो शब्द ठेवणार की नाही ते त्या व्यक्तीच्या स्वभावावरून, आधीच्या वागण्यावरून मला कळू लागलं होतं. पण मग तरीही त्या एका खास व्यक्तीने दिलेला शब्द तेव्हढाच महत्वाचा वाटायचा. 'त्याने का केला नसेल फोन? का नसेल पोचला वेळेवर इतक्या वेळा सांगूनही?' असे मोठे मोठे प्रश्न मला पडायचे. म्हणजे लोकांची पारख करणं,अनुकूल परिस्थिती नसेल हे सगळं समजण्याचं वय असूनही 'तो' एक शब्द माझ्यासाठी 'काळ्या दगडावरची रेष' असायचा. मग पुढे या नात्यातही अपेक्षा, अपेक्षाभंग,भांडणे, दु:ख हे सगळं आलंच. पण त्या सगळ्यांमधून जाताना प्रत्येकवेळी मी माझ्यातल्या त्या छोट्या निरागस मुलीला मागे टाकत होते का? हो बहुतेक.
          बर हे सगळं झालं माझ्यावर होणारा लोकांच्या वागण्याचा परिणाम. माझ्या वागण्याचं काय? दिवसातून आपण कितीवेळा असे शब्द बोलतो जे आपण पूर्ण करू शकणार नाही हे आपल्याला मनातून माहित असतं? साधी गोष्ट, सकाळी एक मेल येते क्लायंटची एखादं काम करण्यासाठी. जेव्हा ती येते तेव्हाच माहित असतं की इतकं काम आहे की आज शक्यच होणार नाही. पण तरी लिहितोच 'आज संध्याकाळ पर्यंत करून टाकेन काम'. म्यानेजरला एखादी गोष्ट करून घेण्यासाठी मागे लागतो, तो म्हणतोही करेन, पण तो प्रयत्नही करत नाही आणि आपण फक्त त्याने ते करावं म्हणून अपेक्षा करत राहतो. एखाद्या वाढदिवसाला जायचं असतं, जायचा कंटाळा आलेला असतो, पण ते सरळ न सांगता 'कळवते मी. सांगेन तुला तसं . इ. ' निरोप ठेवतो. एखाद्याकडून निघाल्यावर म्हणतोही, 'घरी पोचल्यावर फोन करते.' पण घरी आले की समोर जे दिसतंय ते काम करत राहतो आणि मग नंतर फोन केल्यावर कारणं सांगत बसतो. आणि मी या सगळ्या लिहिलेल्या गुन्ह्यामध्ये दोषी आहे. माझ्या शब्दाला माझ्या मते काहीच किंमत नाहीये का म्हणजे? केवळ बोलायचं म्हणून बोलते का मी? आणि जर माहित आहे की एखादी गोष्ट शक्य नाही होणार तर मग आधीच खरं का नाही सांगत? स्पष्ट बोलायला लोक जरा जास्तच टाळायला लागले आहेत असं वाटतं मला आजकाल. का नाही बोलायचं खरं? आणि बोललेलं का नाही करायचं खरं?
          कधी संदीप सानुला प्रोमिस करायला लागतो तेव्हा मी त्याला थांबवते कारण मला माहित असतं की ते शक्य नाही होणार तर मग उगाच तिला खोट्या आशा का दाखवायची म्हणून. तर हे पोस्ट लिहिता-लिहिता मला वाटलं की का नाही मी पण तसंच वागायचं रोजच्या आयुष्यात? तर आजपासून मीच माझ्या शब्दाला किंमंत द्यायचं ठरवलं आहे.

-विद्या.


Tuesday, January 15, 2013

खुसपूस, कुई-कुई आणि भोकाड

         जुन्या पोस्ट वाचताना लक्षात आले की माझ्या पोस्ट माझं त्या-त्या वेळचं आयुष्य रिफ्लेक्ट करतात. आणि ते योग्यच असाव कारण तोच तर या ब्लॉगचा हेतू आहे. आणि माझी सध्याची फेज ही मुलं सांभाळून नोकरी अशी आहे असं वाटतंय. कारण ही पोस्ट त्याबद्दलच आहे. रोज रात्री दहा वाजेपर्यत मुलांना झोपवून एक तासभर तरी टी व्ही पहायला मिळवणे हे एकच ध्येय असतं संध्याकाळी घरी आलं की. रात्री १० वाजेपर्यंत ते झोपले की अगदी जग जिंकल्याचा आनंद होतो. मग जरा फेसबुक, मेल, डील्स, टी व्ही या सगळ्या गोष्टींना निवांत पणा मिळतो. पण हा सर्व आनंद सकाळीही चेहऱ्यावर असेलच असं नाही.
         घड्याळ्यात बारा वाजल्याशिवाय डोळे मिटायचे नाहीत हा आमचा दोघांचा अलिखित नियम. डोळ्याच्या खाचा झाल्या तरी चालतील मग. तर आम्ही असे बारा वाजता जाऊन टेकतो आणि झोप काय लगेच लागतेच. निजेला  खरंच मला धोंडासुद्धा चालेल इतकी दमलेली असते मी. आणि लोक जे म्हणतात ना की आई झाल्यावर मुलाच्या आवाजाने जाग येतेच, कान हलके होतात, इ, इ हे सर्व एकतर खोटं आहे किंवा संदीप आमच्या मुलांची 'आई' आहे. तर साधारण साडेबारा-पाऊण च्या दरम्यान  स्वनिकची हालचाल सुरु होते. मी झोपलेलीच. संदिपच उठून दूध आणतो त्याला देतो आणि दोघेही झोपून जातात. ही झाली बेस्ट केस. त्याला स्टेप वन म्हणू.
          तर बेस्ट केस नसली तर मात्र, स्टेप वन मुळे थोडा वेळ हालचाल थांबते. पाच दहा मिनिटांनी खुस-खूस सुरु. अशा फालतू खुस-खुशीला कुणी लक्ष देत नाही. जो पर्यंत ही खुस-खूस बारीक रडण्यात आणि बारीक रडण्यावरून 'भोकाड' या टीपेला जात नाही तोवर कुणीही लक्ष देणार नसतं. हे ओळखून स्वनिकही लगेच वरची टीप धरतोच. अर्थात हे सर्व संदीपलाच ऐकू येत असतं. त्याचे रडगाणे जोरात सुरु झाल्यावर काहीतरी करणं मग भाग पडतंच. संदीप मग त्याच्या उशीजवळ पडलेला पॅसिफायर शोधायला लागतो. गादीवर गोल गोल फिरून तो स्वनिकाने कुठे टाकलेला असेल हे सांगता येत नाही. आणि अगदी स्वत:च्या डोक्याजवळ असलाच तरी तो लगेच मिळेल असं नाही. तर एकूण नशीब चांगले असेल तर पॅसिफायर लगेच मिळतो आणि स्वनिकला तोंडात तो देऊन सर्व परत बेक टू झोप. आता ही झाली सेकंड बेस्ट केस.
            दुध झाले, पॅसिफायर झाला. तरीही खुस-खूस संपत नाही. पाच दहा मिनिट शांतता आणि परत भोकाड चालूच. बराच वेळ झाला आवाज बंद का होत नाही म्हटल्यावर 'आई' म्हणणाऱ्या मला काहीतरी त्रास व्हायला लागतो कानाला. मी,'काय रे, काय झालं. अजून का झोपत नाहीये? ' . 'पोटात दुखत असेल का?' संदीपचा प्रश्न. मग त्याला ग्राईप वॉटर द्यायचे की इथे एक Infant Gas Relief औषध मिळते ते द्यायचे त्यावर निर्णय घ्यायला लागतो. दोन्ही पैकी काहीतरी एक देऊन त्याला झोपवायाचा प्रयत्न करतो आणि आम्हीही तसेच आडवे पडून जातो. यात माझा सहभाग फक्त स्वनिकला पकडणे इतकाच असतो. बाकी औषध आणणे, ते स्वनिकला देणे, तो रडत असताना तोंड पकडून तोंडात घालणे, इ. संदिपकडेच. नशिब चांगले असेल तर जे काही त्याला दिले आहे ते काम करते आणि आम्ही सर्व सकाळपर्यंत डाराडूर.
          पण कधी त्यानेही फरक पडत नाही. मग अजून तासाभराने खुसपूस, कुई-कुई आणि मग भोकाड या स्टेजेस येतात. आता मात्र मी वैतागते. आणि खरंच काहीतरी गडबड आहे असं म्हणून सूत्र माझ्या हातात घेते. एकतर रात्री थंडी असेल तर आम्ही मस्त गरम पांघरूण घेऊन झोपलेलो असतो आणि स्वनिक तसाच. त्यामुळे त्याला थंडी वाजत असेल का? किंवा उन्हाळ्यात गरम होता असेल का असे प्रश्न आम्ही एकमेकांना विचारतो. एक मात्र नक्की असतं. जे काही त्याला होत आहे याच्या एकदम उलट माझं तंत्र असतं. तर आम्ही त्याला काय होत असेल हे बोलत असताना रडण्याचा आवाज आता अशक्य मोठा झालेला असतो. त्यात मग शेजारच्या रुममध्ये झोपलेली सानू उठते की काय म्हणून अजून भीती.
आणि जसा आवाज वाढेल तसा संदीपला अस्वस्थ होऊन गरम व्हायला लागते. मग तो हळूहळू ती-शर्ट काढ, ए-सी लाव असे प्रकार सुरु करतो.
          कधी डायपर बदलून बघतो. तर कधी अजून एखादा कपडा घालतो थंडी वाजत असेल म्हणून. तर कधी खांद्यावर घेऊन झोपवतो, कधी मांडीवर घेऊन बसतो. जसा झोपेल तसा, ज्या कुशीवर असेल तसे. कधी मग ताप तर नाहीये ना रे? म्हणून थर्मामीटर आणून चेक करतो. तर कधी कान दुखत असेल का म्हणून त्याला दुध देऊन बघतो. (कान दुखत असेल तर मुलं काही प्यायला नको म्हणतात. कारण गिळताना कान दुखतो.) कधी त्याला अगदीच बरं वाटत नाहीये असं वाटलं तर मध्यरात्रीच उद्या सुट्टी कुणी घ्यायची ऑफिसमध्ये यावर बोलून घेतो. या सगळ्यात नक्की कशाने त्याला फरक पडला असेल हा विचार करायला सवड कुणाला असते? तो जर झोपलाच परत तर पटकन आम्हीही गुडूप होऊन जातो.
        सकाळी उठल्यावर हे महाशय एकदम ताजेतवाने आणि आमचे तारवटलेले डोळे. काल रात्री काय झालं होतं विचार करायालाही वेळ मिळत नाही की सकाळची धावपळ सुरु होते. मग पुन्हा तेच चक्र.  हे सर्व एकाच रात्रीत होते असे नाही किंवा रोजच असेही नाही. पण दोघंच असं मुलांना सांभाळणं म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या निर्णयापर्यत सर्वच करायचं म्हटलं की ही अशी रोजची कसरत सुरु असते. त्यात असे रात्री झोपलेल्या अवस्थेत योग्य निर्णय घेतोच असेही नाही. घरात कुणी मोठं माणूस असलं की किती फरक पडत असेल असं वाटतं कधी. घरी नंतर फोन करून किंवा इन्टरनेटवर असताना हे सर्व सांगितलं की घराचे सूचना द्यायला लागतात. आणि मग आमच्यासारखे 'शिकलेले' म्हणवणारे लोकही मग नेटवरून आईकडून पोरांची दृष्ट काढून घेतात. :)
-विद्या.

Saturday, January 12, 2013

फक्त पाच मिनिट

शनिवारची दुपार आहे मस्त. बाहेर जरा ढगाळ वातावरण आहे. संदीप, सानू आणि स्वनिक तिघेही झोपलेत. म्हटलं निवांत टिव्ही बघत बसावे, म्हणून रिसिव्हर सुरु केला तर रेडिओ सुरु झाला होता मघाशी लावलेला आणि त्यावर 'बिल्लू बार्बर' मधलं, 'चांद या सितारा कोई' लागलं होतं. सही वाटलं. म्हटलं कुठे लावायचा टीव्ही ऐकत बसावं गाणीच अशी शांततेत. मग हे असं वातावरण, गाणी आणि शांतता मिळाले की हात शिवशिवायला लागतात लिहायला. हे लिहितेय तोवर,'मेरे ब्रदर की दुल्हन' मधलं, 'इस्क रिस्क' लागलंय. म्हणजे नुसती एकावर एक आवडती गाणी लागताहेत आणि मी त्यांच्या मागे धावतेय असं वाटतंय. :) असो. तर हे असं गाणी ऐकण्यावरून आठवलं. शाळेत असताना ना सकाळी आकाशवाणी वर १० ते १०.३० पर्यंत जुनी हिंदी गाणी लागायची. तर कधी मराठी भावगीते. आणि मी अभ्यास करत बसलेली असायचे. पण मग असं एखादं गाणं लागायचं की वाटायचं 'या अभ्यासाच्या विचारातून फक्त फक्त पाच मिनिटे बाहेरपडू देत. मग परत पुस्तकात जाईन.' अर्थात कुणाचं बंधन नसायचं पण तरी त्या गाण्याला पूर्ण वाव देण्यासाठी स्वत;च असं स्वत:ला मोकळं सोडायचं. :)
तसंच परीक्षेच्या वेळी व्हायचं. आईने लायब्ररीमधून एखादं पुस्तक आणलेलं असायचं. पण त्याला वेळ द्यायला कुठे परमिशन असायची? समोर पुस्तक दिसतंय पण हातात भूगोलाचं पुस्तक. :( वाटायचं 'फक्त पाच मिनिट वाचते. मग परत येते तुझ्याकडे.' :) आता ४०० पानाच्या पुस्तकाला पाच मिनिट काय पुरणार? पण तरी मी आई येत नाहीये ना बघून पटकन हावरट सारखी ते पुस्तक हातात घ्यायचे. बर अजून एक पान अजून एक पान असं करत अधाशा सारखे वाचत सुटायचे. तेच परीक्षा संपल्यावर हक्काने ते पुस्तक परत वाचायला घ्यायचा काय तो आनंद असायचा. एकदा तर मी आईशी भांडले पण आहे. परीक्षा संपली म्हणून आनंदात आहे तर आईने आपलं पापड, कुरडया करायला काढलेलं आणि माझी पुस्तके परत बाजूला. मग काय? भांडले खूप. :)
पुढे कॉलेज आणि नोकरीत असताना 'त्याचे' विचार यायचे मनात. आता हातातलं काम तर सोडून बसता येत नाही ना? एक तर कॉलेज मध्ये अभ्यास शेवटच्या दिवशी, तसंच कामही अगदी घाईच. पण त्यात वाटायचं एक पाच मिनिट 'त्याचा' विचार करते. बस पाचच मिनिट. मग परत कामाला लागेन. मग हातातलं काम सोडून उगाच काल काय बोलणं झालं, मग नंतर कधी भेटायचं, पुढच्या ५-१० वर्षाची स्वप्नंही त्या पाच मिनिटात बघून घ्यायची. :) आणि मग पुढ्यातल काम उरकायचं.
आत्ताही बाहेर जायचं आहे, पण ही गाणी, जुन्या आठवणी, आणि त्यबद्दल लिहायचं सोडून जायची इच्छा होत नाहीये. ते पण काम पाच मिनिटात उरकून येता आलं असतं तर बरं झालं असतं. असो निघतेच आता. :(

-विद्या.

Thursday, January 10, 2013

विरोधाभास

गेले दोन दिवस, डोक्याचा पार भुगा झाला आहे. ऑफिसमध्ये दिवसभराची सलग मिटिंग म्हणजे किती त्रास असतो हे कळलं आहे. आता कामाबद्दल असं ब्लॉगवर माझं लिहिणं कधी झालं नाही किंवा तितकं ते महत्वाचंही वाटलं नाही. पण मागच्या माझ्या 'कस्टम-मेड' पोस्ट नंतर या मिटींगमध्ये गेल्यावर स्वत:वरच हसू आलं. म्हणजे माणसाची आवड आणि काम या दोन गोष्टी किती वेगळ्या असू शकतात याचं उदाहरण होतं ते. मागच्या पोस्ट मध्ये मला कसे इथे कपडे खरेदी करायला आवडत नाही आणि भारतात ड्रेस शिवून घेणं किती मस्त कार्यक्रम आहे यावर मी भरभरून लिहिलं होतं. त्यानंतर गेला महिना काही लिहिणं झालं नाही.
पण आज एकदम एक विचार मनात आला आणि लिहायची इच्छा झाली.
गेले काही दिवस एका प्रोजेक्टवर काम चालू आहे ज्यात प्रत्येक काम जास्त वेगाने आणि कमी लोक वापरून कसं करता येईल यावर बोलणं चालू आहे. अर्थात ते काही नवीन नाही. पण विषय आहे, 'इम्ब्रोयडरी'  सारखी कलाकुसर तुम्हाला ड्रेस वर करून हवी असेल तर ती मशीनने कशी करून घ्यायची. :) मग त्यात परत तेच विषय आले. कापड कुठल्या प्रकारच आहे? जर जाड असेल तर त्याला कुठल्या प्रकारची शिवण लागेल? जर कुणी बारीक मुलीने ड्रेस मागवला असेल तर तिचा साईझ आला, 'small'. मग त्यावर समजा तिचं नाव निघालं ३५ अक्षरी तर मग ते तिच्या बाही खालून जाऊन पाठीवर नाही का जाणार? त्यासाठी काय करायचं? एखादा हुशार म्हणाला मला माझं नाव माझ्या शर्टाच्या खिशावर लिहून हवंय, तर मग खिसा आधी शिवलेला असेल तर त्यावर शिवण कशी घालणार ना? त्यासाठी काय केलं पाहिजे? समजा एखाद्याने सांगितले की मला काळ्या शर्टावर काळ्याच रंगाने नाव लिहून हवंय तर? तर त्यावर उत्तर मिळालं,  'कॉमन सेन्स' वापरायचा ना माणसाने? :) मग शेवटी ठरलं फक्त नोट लिहायची 'फॉर्म' वर की बाबा तू जर गडद रंगाचा कपडा आणि गडद रंगाची इम्ब्रोयडरी सांगत असशील तर विचार करूनच 'कन्फर्म' कर. आता मग तो काय ठरवेल ती त्याची चूक.
एखाद्याने जर शर्ट आणि पॅंट दोन्ही मागवलं असेल तर ते घेऊन तर यायचे वेअर हाउस मधून एकत्र. पण मग ते इम्ब्रोयडरी साठी वेगळे होतील ना? मग ते एकत्र राहतील याची 'खात्री' कशी करायची? आणि समजा ते एकत्रच ठेवले इम्ब्रोयडरी करतानाही तर मग त्याच्यावर धागे, दोरे, धूळ नाही का बसणार? मग काय करायचं?
तर आता हे काम फास्ट व्हायला पाहिजे, कमी लोकही पाहिजेत आणि चांगले काम पण झाले पाहिजे. मग त्यासाठी खूप भारी मशिनरी मागवली. म्हणजे एकावेळी १२ वेगळे मशिन्स एकत्र चालतील असे. त्यामुळे माझ्यासोबत अजून अकरा लोकांचं कामही त्याच मशिनवर करता येईल. पण मग मला हवा तो रंग, फोन्ट वेगळा असेल बाकी ११ लोकांपेक्षा तर? तर मग त्यासाठी वेगळे सोफ्टवेअर ज्यात बाराही लोकांचे काम एकदम फीड करून ते एकाच मशीन वर केले  जाईल एकाच वेळेला. :)
आता डिसाईनर म्हणून ते सर्व मला करायला खूप मजा येतेय कारण माणसाचं काम मशीनमध्ये बसवायचं म्हटलं की नेहमीच गोंधळ असतो. :) त्या मेंदूत जी गणितं माणूस करतो ती सगळी मशीनमध्ये बसवायला. पण गेल्या पोस्ट मध्ये मी जे लिहिलं होतं माझ्या अनुभवाबद्दल त्याच्या एकदम विरुद्ध काम मी करतेय हे जाणवलं आणि हसू आलं. असो.

विद्या.

Friday, January 04, 2013

My 2 cents -English

         So now I am one of those people too, you know, the ones who have been writing about the recent rape incident. So there have been demos, discussions,Facebook posts and lot of imaginative options to punish the rapists. Even i shared all the information I got on facebook 'blindliy' just in case if it saved anyone's life. But its not something different than what all of us have done so far. Rather I have even skipped reading some of the news and people's views on their blogs about this news. But I always wondered who are these people? I mean what 'type' of people are they? I couldnt get an answer because we havent defined profiles of these criminals at all. Being a girl I never felt any difference in behaviour towards me in my life except for certain times. As a kid, I always thought my parents liked my brother more than me and just to have a boy we 3 daughters were born. But apart from that, in school never I felt any less while competing with my classmates for the highest ranks. Rather my grand-pa was upset about me getting less marks in Sanskrit. But never thought, what I am going to do anyways with good grades.

         Even later I went on studying and getting a job and had a good friend circle with many of them boys/men. Why didnt I ever meet one these animals there? Rather there have been friends who took care of me, gave me a lift home whenever it was late and made sure I was safe. There have been times when I competed with the same people for good ranks and good ratings in office and also had fights over right and wrong. But never did I an animal like this. Rather after the Delhi incident I saw many of the blogs written by men, none by a girl. I dont know why. But then the question is 'who are these people? These rapists?'For a minute I wanted to say to all my family and friends that I want to thank them for treating me equally so far. But then I realised, I dont have to thank them, its my right. But maybe I should respect them for their treatment towards to me. So again, 'who are these people?'. are they the poor,illiterate ones? Cause I am sure there must many rich ones in the list too. Rather even heard of the news where the father was killed while saving the girl from eve-teasing. So definitely not just 'poor' and 'illiterate'.Forget about rape, will these poor, illiterate people save money to terminate the girl fetus?
         So who are these people? I thought maybe I should start with asking my close ones about this. If they could have some insight and see if they have ever done a discrimination? Though a collegue/friend may have respected me as a team-mate and treated me equally, has he been the same way in personal life as well? During the marriage, have you asked or expected something from your in-laws directly/indirectly? You may not have asked but have your let your parents do that? Have there been different rule in household for a girl and boy? Have you stayed late out of the house while your sister had to be home by 7? Have you been a parent where you saved for your's son's education instead of your daughter's? Have you been protective of your friend to avoid her from eve-teasing but participated in it for others? Have you called a girl 'maal','chikni','cheez' or 'item' ever? Lets say you let your daughter get all the education she wanted, but still saved something for dowry for her marriage? Have you ever fought with your wife for she gave money to her parents? When you got all that education and got good job, you became part of the upper-middle class. Have you ever ignored the incidents that happened at your village just because you didnt want to get into it? Well, I have done that and believe me it feels terrible. I dont know if I had done something had I knows earlier. But not anymore. I wouldnt let something like this go by me and stay away from it.
So my question to all my friends and family is, if we have been part of any of the above things, havent we been one 'those' people as well? At least 5%,10% or 50%. But we have been. What do you say?

-Vidya.

My 2 cents

        चला आता बाकीच्या लोकांमध्ये माझी पण भर पडलीच. हेच, बलात्कार, स्त्री-मुक्ती, वगैरे लिहीनारया मध्ये. बाकी आपण करायचे तरी काय? तर निषेध झाले, आंदोलने झाली, नेत्यांवर टीका झाल्या, फेसबुक वर काल्पनिक शिक्षा पण झाल्या. मग जमेल ती माहिती 'शेयर' करून झाली. कुणाचे प्राण वाचलेच त्याने तर बरंच की. तर एकूण या सगळ्यात बाकी लोकांपेक्षा मीही काही वेगळं केलं नाहीये. म्हणजे अगदी एखादा मराठी ब्लॉग स्किप पण केला की  काय तेच तेच वाचायचे म्हणून. पण मनातला विचार थांबत नव्हता. की  हे असले रानटी लोक असतात तरी कोण? म्हणजे मुला-मुलींमध्ये भेदभाव, वेगळी वागणूक वगैरे कधी खूप जाणवलं नाही मला घरी तरी. कधी लहान भावाचे लाड फक्त को मुलगा आहे म्हणून होतात असं वाटायचं आणि मुलगाच हवा म्हणून आम्ही तीन मुली झालो त्याच्या आधी तेव्हढंच. पण शाळेत मुलांशी अभ्यासात स्पर्धा विशेष करून दहावी मध्ये. अगदी जीव तोडून अभ्यास केला. आणि करू नकोस असं कुणी म्हटलंच नाही. उलट संस्कृत मध्ये मार्क कमी पडले म्हणून आजोबा नाराजच झाले. पण मुलगी म्हणून काय करायचे आहे जास्त मार्कांचे असे कधी वाटले नाही.
          पुढे हट्टाने दुसऱ्या गावात शिकायला राहिले, नोकरीला राहिले, पण हे असले लोक मला दिसले कसे नाहीत? रानटी, हैवान? जे मित्र होते ते तर सर्व काळजीने साथ देणारे, उशीर झाला तर घरी सोडणारे, माझ्याशी स्पर्धा करून पुढे जाणारे आणि वेळ आल्यावर हिम्मत देणारे. मग मला कसे नाही दिसले त्यांच्यामध्ये हे हैवान? अगदी बरचसे ब्लॉगही मुलांनीच लिहिलेले. एकही मुलीचा नाहीच दिसला. मग जर या मुलांना, पुरुषाना आपल्या मुलींची, बहिणींची, बायको, आईची इतकी काळजी आहे तर मग हे असले लोक आले कुठून? गरीब, आडाणी असलेले? पण त्यांच्याकडे तर गरिबीतून वर यायलाच वेळ नसेल तर ते ही असली कामे कुठून करत असतील. बर समजा असतील फक्त गरीबच, अडाणी लोक असे वागणारे. मग ते मुलीची छेड काढल्यावर बाप उलटला म्हणून एका पोलिसाला मारले तोही असाच होता का कुणी गरीब, अडाणी? ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीत ते लोक भ्रूणहत्येसाठी करत हसतील का पैसे जमा कसेतरी?
         तर प्रश्न असा की हे लोक आहेत तरी कोण? आधी वाटले माझ्या घरच्यांना आणि माझ्या सर्व मित्रांना आभार मानावेत की मला तुम्ही आजपर्यंत माणूस म्हणून वागणूक दिलीत. पण त्यात आभार कसले? तो तर माझा हक्क होता. मग वाटले निदान अभिमान तरी वाटलाच की इतके चांगले लोक भेटले आयुष्यात म्हणून. मग म्हटले त्या सर्वांनाच एक पडताळा करून घ्यायला सांगावा अगदी मीही. म्हणजे असं की प्रत्येक पावलावर त्यांनी मला एक परकी स्त्री म्हणून आदराने वागणूक दिली असेल. पण त्यांनी स्वत:च्या आयुष्यातही तेच केले आहे का? त्या लोकांमध्ये हो पोस्त वाचणारे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकही येतात. तर प्रश्न हा विचारायचा की व्यक्तिगत आयुष्यात मी दुटप्पी पणाने वागलो आहे का?
         ऑफिसमध्ये टीम-मेट सोबत समानतेने वागले तरी लग्नाची वेळ आल्यावर मला सासऱ्याकडून अमुकच भेट हवी असा वाद आपण घातलाय का? बर नसेल घातला तरी आई-वडिलांना घालू दिलाय का? मुलगी कितीही हुशार असली तरी तिची फी न भरता मुलासाठी बचत केलीय का? अगदी साधं म्हणजे मुलीला सातच्या आत घरात आणि मुलाला १० असे वेगळे नियम ठेवले आहेत का आणि अशा नियमाचा फायदा घेत खरंच दहाला घरी आलाय का?  मैत्रिणीला चिडवू नये कुणी म्हणून गाडीवरून सोडलं असेल, पण स्वत: कुणा मुलीला 'आयटम','माल', 'चिकणी','चीज' म्हणून चिडवलं आहे का? अगदी शिकवलं मुलीला खूप पण लग्नाची वेळ आल्यावर हुंडा द्यायची तयारी ठेवलीच आहे का? बायको माहेरी पैसे देतेय म्हणून चिडलाय का? हे सगळे झाले छोटे प्रसंग. आपण शिकलो, मोठे झालो, बरेचसे लोक गरिबीतून वर आले चांगली नोकरी लागली, इ. पण तरीही गावाकडे कुणी नातेवाईक आहेच जो अजूनही जुन्याच रिती पाळत आहे. त्याने केला असा भेदभाव. तर त्याला कधी थांबवले आहे का? आपण कशाला पडायचे मध्ये म्हणून गप्प राहिलाय का? मी राहिलेय. आणि त्याची टोचणी जात नाहीये केव्हापासून. काय करायचं सुचत नाहीये. कदाचित आधी कळल असतं तर काही केलं असतं का मी? माहित नाही? आणि आता बोलूनही उपयोग नाही. कारण आता परत असं कधी गप्प राहणारच नाही.
          क्षणाक्षणाला जर आपण असे दुटप्पी निर्णय घेत असू तर आपणच नाहीये का ते पशु? म्हणजे १००% नसलो तरी ५%,१०%, ५०%? काहीतरी असूच ना? त्यामुळे सध्या मला हे असले लोक कोण असतील याच्यापेक्षा आपल्यातच आहे का? असा प्रश्न पडलाय. तुम्ही पण करा पडताळा जमेल तर.

-विद्या.