Thursday, August 17, 2017

Wednesday, August 16, 2017

पारंब्या

     वीकेंडला घरी गेले होते, कोरेगावला. तशी तर मागच्या वर्षी पण गेले होते, यावेळी जरा निवांत. जाताना रस्त्यात नवीन होत असलेल्या फ्लायओव्हर आणि वाढलेले टोल यावर बोलणं झालंच. घरी श्रावणातली सत्यनारायणची पूजा होती. घरी आयतं पोळ्याचं जेवण करून  डाराडूर झोपले. म्हणजे अगदी नेहमी घरी गेल्यावर झोपते तसंच.
      संध्याकाळी पूजेला काही मोजकी का होईना लोकं येऊन गेली. त्या सर्वांना भेटताना  जाणवलं कोरेगांव मध्ये काही गोष्टी अजूनही बदलल्या नाहीयेत आणि तरीही बरेच काही बदलून गेलंय. आम्ही शाळेत असताना सर्व शिक्षकांना आवर्जून आमंत्रण द्यायचो. घराजवळ सर्वांना घरी जाऊन आमंत्रण द्यायचो आणि तीर्थ-प्रसाद घ्यायला सर्वजण यायच्या आधी  छान आवरून तयार राहायचो. सर्वजण येऊन जाईपर्यंत नऊ वाजून जायचे, आम्ही सर्वजण कंटाळलेले असायचो. 
      यावेळी गेले तर आईनेच फोनवर काही लोकांना आमंत्रण दिले होते. त्यातील काही जण येऊन गेले. ठराविक लोक बसून, गप्पा मारून आमची चौकशी करून गेले. लहानपणी असायचा तो उत्साह दिसला नाही तरी काही ठरलेली वाक्य मात्र यावेळीही ऐकली,'अरे तुमचा फोन आला म्हणजे येणारच', 'हो मिळाला ना निरोप, तुमचा फोन डायरेकट आला नाही तरी चालतंय', 'प्रसाद घेऊन जा घरच्यांना', 'थांबा पुडीत बांधून देते', 'काय म्हणताय? बराय ना सगळं?',इ. इ. हे सर्व जितकं परिचयाचं होतं तितकेच वय झालेले सर, मोठी झालेली मुलं, त्यांची लग्नं, छोटी मुलं हे सगळं तितकंच नवीन होतं.
     हे झालं सत्यनारायणाचं. घराभोवती सकाळी पारिजाताखाली पडलेला सडा अजूनही तसाच होता आणि चिंचेच्या झाडावर उड्या मारणारी माकडंही, सीताफळांनी भरलेलं झाडही. इतकं असलं तरी मोगऱ्याचे जुने दोन वेल कधीतरी काढून टाकलेले. त्या वेलीवरच्या फुलांचे एकेकाळी मोठमोठे गजरे डोक्यात माळलेले होते. दारातील बंब काढून पाणी तापवायला गीझर लावलेला. जुन्या अनेक इमारती पडून नवीन बांधलेल्याही पाहिल्या.  शाळेबद्दल विचारलं तर अनेक बदल झालेत. गाडीत हवा भरायला थांबलो तर त्या दुकानाच्या मालकाला ओळखलंही नाही. अगदी नंतर आठवलं 'अरे हा तर आजोबांकडे शिकवणीला यायचा'. अशा अनेक गोष्टी मनात घेऊन पुण्यात परत आले.
      आता कुणी म्हणेल हे आताच का जाणवलं. आता जाणवलं नाही पण त्याबद्दल लिहिलं मात्र नव्हतं अजून. हे सर्व लिहिण्याचं कारण असं की अनेक देशांत -गावांत फिरताना मनात खात्री असायचीच की आपलं मूळ
अजूनही त्या गावातच आहे जिथे आपण वाढलो. पण त्या गावातले बदल पाहताना, जुन्या लोकांची ओळख पटायला वेळ लागतो तेव्हा वाटतं, 'अरे खरंच आपण हे सर्व विसरत चाललोय का?'.  त्याच वेळी ओळखीच्या जागा, लोक आणि प्रथा पाहून अजूनही आपण त्या गावचेच आहोत हा आधारही वाटतो.
       गावातून निघताना रस्त्यात वडाची अनेक झाडं दिसतात, माझी आवडती एकदम. यावेळी आवर्जून त्यांचा फोटो काढला. त्या वडाच्या पारंब्यांसारखेच आम्हीही पसरत, विस्तारत राहतो. पण कितीही दूर गेलं तरी मूळे मात्र अजून तिथेच असतात.

विद्या भुतकर. 

Sunday, August 13, 2017

सोडून दे :)

       थोड्या दिवसांपूर्वी फेसबुकवर एका बाईने एका ग्रुपवर प्रश्न टाकला होता,"थोड्या दिवसांसाठी माझे सासू सासरे अमेरिकेत आमच्या सोबत राहायला आले आहेत. सासुबाई छोट्या छोट्या गोष्टींतून भेदभाव करतात. त्याबद्दल  त्यांच्याशी बोलावं की नाही?". बिचारी खूपच त्रासलेली वाटली. तसं पाहिलं तर मीही फटकळच. कधी कधी पटकन बोललं जातं. त्यात आवाजही खूप काही गोड नाही. उलट जरा जास्तच मोठाही आहे. तिला उत्तर देताना खरं तर मी लिहिलंही असतं की "सांगून टाकायचं ना मग?  त्रास करून घेतेस" वगैरे. तिथे असेही काही लोक होते जे सासू किंवा तत्सम नातेवाईक सुनांना कसे त्रास देतात इ. इ. यावर वाद घालत होते. पण माझं उत्तर जरा वेगळं होतं आणि त्याला कारण माझ्या सासूबाईच आहेत.
       गेल्या १२-१४ वर्षांपासून मी त्यांना ओळखते. त्यांच्याकडून मी इतक्या वर्षात हे शिकले की नाती जपायची असतील तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. त्या वागायला, बोलायला एकदम साध्या आणि कष्टाळू आहेतच. पण सुना, जावा, सासू-सासरे आणि अनेक नातेवाईकांचे अनुभव त्यांच्यापाशी आहेत. त्यातल्या त्यात सुना म्हणून आम्हाला जे अनुभव येतात ते अजून जवळचे. माझ्यासारख्या फटकळ मुलीलाही त्यांनी सामाऊन घेतलं किंवा आपलंस केलं ते त्यांच्या स्वभावानेच. उदा: मला किंवा नवऱ्याला त्यांनी स्वतःचं बंधन घातलं नाही. स्वतः उपवास करतात पण आम्ही करत नाही तर त्याबद्दल जबरदस्ती केली नाही. हे फक्त उदाहरण झालं.  छोट्या गोष्टींमधून मला जाणवत राहतं की आपल्याला एखादं नातं जपायचं असेल तर काही गोष्टी दुय्यम आहेत.
         एखाद्याची काही गोष्ट पटली नाही म्हणून तो माणूस वाईट होत नाही ना?  कधी कुणी उगाचच एखादा टोमणा मारून जातं. म्हणून त्याच्याशी बोलणं बंद करायचं का? You have to choose your battles. कधी कधी वाटतं की स्वत्व जपण्याच्या नावाखाली आपण बरेच संबंध सहज तोडून टाकत आहे. अनेक लोक असतात ज्यांच्या काही गोष्टी पटत नाहीत. पण म्हणून उगाच वाद घालून ते नातं गमवण्यात अर्थ नसतो.  नातेवाईकच नाहीत तर आपले मित्र-मैत्रिणीही असतात. असतो एखादा वल्ली, पण त्याच्या बारीक सारीक गोष्टींसाठी नाराज होणं योग्य नाही. मग तो असाच बोलतो, असंच वागतो. तो त्याचा स्वभावच आहे म्हणायचं आणि त्या माणसाच्या चांगल्या गोष्टींकडे बघायचं. एकच करायचं,"सोडून द्यायचं". कदाचित आपण न बोलण्याने समोरच्या व्यक्तीमध्येही फरक पडेल जसा माझ्यात  झाला(थोडा का होईना) सासूबाईंच्या समजूतदार स्वभावामुळे.
         अर्थात सगळीच नाती जपलीच पाहिजेत असं नाही आणि त्यात आपला अपमान करून घेऊन सहन करणंही योग्य नाही. पण आपल्याला नक्की काय हवंय याचा विचार जरूर केला पाहिजे. मी काही अलका कुबल टाईप्स नाहीये आणि कुणी व्हावं असं म्हणणारही नाही. पण बोलताना/वागताना एकदा विचार जरूर करावा. आणि हो हा लेख सर्वानाच उद्देशून आहे. स्त्री-पुरुष सर्वांसाठी. नाहीतर आजकाल उगाचच बायकांनीच कसे नाती जपण्यासाठी चांगलं वागलं पाहिजे यावर अनेक लेख येत असतात. असो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. :)
         तर मी वर सांगितलेल्या किश्श्यामध्ये मी उत्तर दिलं की,"असंही सासू सासरे महिनाभरच आहेत सोबत, पुन्हा भारतात जाणारच आहेत.  कशाला वाद घालून त्रास  घेतेस आणि त्यांनाही त्रास देतेस? सोडून दे." अर्थात तिने पुढे काय केलं माहित नाही पण त्यातून मला एक कळलं होतं की माझ्या मनात या 'सोडून दे ' वृत्तीने घर केलं आहे.

विद्या भुतकर. 

Tuesday, August 01, 2017

माझ्या नकळत

पाऊस सुरु झाल्यावर कवितांचा भरही येऊन जातोच. मी मात्र पुण्यात उशिरा आल्याने यावेळी पावसाची कविताही उशिराच. :)