Sunday, September 30, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - ३

       सपना घरी पोहोचेपर्यंत अंधार झालेला असायचा. पोरगी एकदाची घरी पोचली की तिच्या आईचा जिवात जीव यायचा. सपना घरी येऊन फ्रेश होतच होती की सरांनी विचारलं,"कसा गेला पेपर?".
"चांगला गेला. टेस्ट पेपरच होता पण चांगला गेला.", सपना.
"ह्म्म्म गुड. यावेळी युनिव्हर्सिटी टॉपर पाहिजे बरं का?", सरांनी हजार वेळा बोललेलं वाक्य आज पुन्हा ऐकवलं. सपनाने मान डोलावली.
        सर म्हणजे अख्ख्या गावाचे ते 'सर' होते. गेली २० वर्षं त्यांनी एकंब्यात शिक्षक म्हणून काढली होती, आजही त्यांना शिक्षक म्हणून गावात मान होता. अगदी चार भिंतींच्या शाळेपासून पूर्ण अनुदानित शाळेपर्यंतचा शाळेचा प्रवास त्यांनी स्वतः पाहिलेला, अनुभवलेला होता. त्यातील प्रत्येक कार्यात त्यांनी जीव ओतून काम केलं होतं. शाळेत मुलांनी नीट शिकावं म्हणून जितके प्रयत्न ते करत तितकीच आपल्याही मुलीने मेडिकलला ऍडमिशन घ्यावी अशी सरांची खूप इच्छा होती. पण बारावीच्या मार्कांवर सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नसती आणि त्यांच्या शिक्षकाच्या पगारात तिची खाजगी कॉलेजची फी भागली नसती.
      खूप जड मनाने दुःखाने सरांनी तिला बीएस्सी, इम्मसी करायला सांगितलं. तिलाही परिस्थितीची कल्पना होतीच त्यामुळे 'आपल्याला जे मिळालंय ते एकदम बेस्ट करायचं' इतकंच तिने ठरवलं होतं. आणि 'पुढे पीएचडी केली तर 'डॉक्टरेट' मिळेलंच की?' असाही विचार तिने अनेकदा केला होता. सातारला एम्मेस्सी झाली की पुण्यात किंवा मुंबईला पुढचं शिक्षण करायचं तिने ठरवलं होतं. शिवाय एम्मेस्सी झाल्यावर प्रोफेसर म्हणून नोकरीही करता येणार होती तिला. आयुष्यात काय करु शकतो, काय केलं पाहिजे याचे सर्व आखाडे तिने मनात अनेकदा बांधले होते. पुढे जाण्याची ती योग्य वेळ येईपर्यंत या गावातून मात्र तिला जाता येणार नव्हतं.
      सरांची शाळा होती म्हणून केवळ ती तिथे राहत होती. नाहीतर सपनाला या गावाचा अतिशय वीट आला होता. आजूबाजूच्या लोकांचं वागणं, कोते विचार, आहे त्यातच समाधान मानण्याची वृत्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संत्याच्या रुपाने रोज दिसणारी तिथली तरुण पिढी. सर्व नकोसं झालं होतं. रोज उठून एकेका क्लाससाठी बस, ट्रॅक्स मधून जायचं, दिवसभरात दमून परत येऊन अंग टेकेपर्यंत पुढचा दिवस यायचाच. त्यातून आजूबाजूला सतत जाणवणारं संत्याचं अस्तित्व. तो पुढे येऊन कधीच तिच्याशी एकादाही बोलला नव्हता. पण शाळेत, कॉलेजमध्ये तिने अनेकदा त्यांच्या नावाचं कोरलेलं 'SS' पाहिलं होतं. मुलांना ती बाजूने जाताना संत्याकडे बघून हसताना पाहिलं होतं. सगळ्याचा वैताग आला होता तिला. या सगळ्यातून कधी सुटका होईल याची ती वाटच बघत होती.
सरांचं आणि बाईंचं आयुष्य मात्र चाकोरीबद्ध. आता बाई म्हणजे केवळ 'सरांची बायको म्हणून सगळे त्यांनाही 'बाई' म्हणायचे. तशा १२वी पर्यंत शिकलेल्या त्याही पण पुढं नोकरी-बिकरी काय जमली नाही त्यांना. पोरीचं सगळं लक्ष देऊन करायच्या. तिला जमेल तशी मदत करायच्या. आई म्हणून रोजच्या तिच्या येण्याजाण्याची चिंता असायचीच तरीही तिला कॉलेजला जायला एकदम सपोर्ट द्यायच्या. तरीही एक गोष्ट मात्र त्यांना मनात खायची. गावातल्या अनेक पोरींची लग्नं लागली, त्यांना मुलं-बाळ झाली तरी आपली मुलगी अजून शिकतीच आहे. किती वर्षं असं चालणार? आता एम्मेस्सी झाली की तिचं उरकायचंच असा त्यांनी हट्टच धरला होता.
आजही सपनाचा पेपर होता म्हणून त्यांनी आधीच गरम गरम भाकऱ्या थापल्या, पिठलं केलं होतं. सपनीनं ताटं, तांबे घेतले. जेवायला बसल्यावर त्यांनी विचारलंच,"अजून किती पेपर राहिलं आता?".
सपनी," या आठवड्यात टेस्ट पेपर संपतील अन मग फायनल पुढच्या महिन्यात."
"चला, बरं झालं म्हणजे दोन महिन्यात सुटका होईल एकदाची. ", बाई म्हणाल्या.
"होय ना, कंटाळा आलाय नुसता उन्हाचा. जरा सुट्टी मिळाली म्हंजे आराम होईल.", सपना म्हणाली.
विचार करुन बाईंनीं हळूच सरांकडं विषय काढलाच,"ते शिंदे बाईंचा फोन आला होता आज."
"अच्छा काय म्हणत होत्या?", सरांनी विचारलं.
"काय म्हणणार चांगलं चाललंय त्यांचं. त्यांचा मुलगा मनोज बीएस्सी बी एड झालाय ना? तर म्हणत होत्या आता रहिमतपुरात नोकरीला हाय. शाळेला अनुदान मिळालंय नुकतंच.", बाईंनीं माहिती दिली.
"अस्स, बरं झालं म्हणजे बिचाऱ्याचा पगार पक्का.", सर म्हणाले.
"होय ना, त्यांना सारखी काळजी होती पोराची कधी शाळेला अनुदान मिळतंय याची. आता एकदम पगार येईल आणि सुरळीत पण लागलंच म्हणायचं.", बाई बोलल्या.
"हां करतो सरांना एकदा फोन. बरेच दिवस झालं बोलून", सर म्हणाले.
"हां तेच म्हणत होत्या बाई पण, त्यांच्या मनोजसाठी आपल्या सपनाला विचारात होत्या.", बाईंनी फायनल बोलूनच टाकलं.
सपना चिडणार, जेवण सोडून जाणार, भांडणार, अजून शिकायचं म्हणणार हे सर्व त्यांना माहित होतं. तरीही त्या बोलल्याच.
पण सर शांतपणे म्हणाले,"ह्म्म्म तसा चांगलंय पोरगा पण घाई काये? तिला शिकू देकी अजून. आपल्या घरात कुणी पीएचडी केली तर ती हीच करणार बघ.".
त्यांनीच आपली बाजू घेतल्यानं सपना शांत बसली.
"अवो पण ते पण शिकेलेलंच लोक आहेत, करू देतील की तिला पीएचडी. कोण नको म्हणणार हाय का?", बाई बोलल्या.
"हे बघ आई, मला उद्याचा अभ्यास हाय उगाच तू टेन्शन दिऊ नकोस.", असं म्हणत सपनानं ताट उचलून मोरीत टाकलं आणि निघून गेली.
"आता हे बघा, पोरीला अभ्यासात बाकी काही काम नको, नुसतं स्वतःचं ताट पण धूत नाय.", बाई वैतागल्या होत्या.
"असू दे की मग, तुला जमल का रोज असं बसमधून ये जा करायला? अभ्यास करायला? इतकी मेहनत करतेय पोर तर शिकू देकी.", सर म्हणाले.
"पण आता एवढं चांगलं स्थळ येतंय तर नको का म्हणायचं? परीक्षा संपत्तीय, लग्न करुन पुढच्या ऍडमिशनचं बोलताच यील की. त्यात त्यांच्या घरात सगळं शिकलेले लोक. कोण नायी कशाला म्हणल? ",बाई समजावत होत्या.
"बरं बघू तिची परीक्षा होऊ दे. मधेच ताप नको तिला.", सर म्हणाले.
"तिला काय करायचंय? आपण बोलून घेऊ की एकदा. तुम्ही सरांना फोन तर करा", बाई बोलल्या.
"बरं, करतो लवकरच", म्हणत सरांनी बोलणं थांबवलं.
सपना मात्र त्यांचं बोलणं ऐकून अजूनच नाराज झाली होती. तिला गावातून अजून दुसऱ्या तसल्याच गावात जायचं नव्हतं. तिला या छोट्या जगातून बाहेर पडायचं होतं. एकदा ती लग्नात अडकली की सगळं संपलंच ना?  तिचं अभ्यासातून मन उडूनच गेलं.
----------------------------
          तिकडे संत्याची संध्याकाळ निराळीच असायची. पुन्हा एकदा मित्रांचा अड्डा, गप्पा, खेचाखेची, चहापाणी सर्व करुन ९ पर्यंत तो घरी पोचायचा. घरी गेल्यावरचे पुढचे दोन तास मात्र त्याला नको व्हायचे. घरी जाऊन पप्पांचं लेक्चर ऐकायला लागणार यात शंकाच नव्हती. अनेकदा त्यांना टाळण्यासाठी तो अजूनच उशिरा यायचा. पण मग पप्पा पण अजून जागून अजून शिव्या द्यायचे. त्यामुळे उशीर करुन काही फायदा नाही हे त्याला कळलं होतं. संत्यानं दारात गाडी लावली. घराच्या शेडमधलं कव्हर आणून गाडीवर टाकलं, गाडीचं लॉक पुन्हा एकदा चेक केलं आणि घरात घुसला.
"सुटलं वाटतं कॉलेज?", घरात येताच प्रश्न कानावर पडला होता.
"होय", संत्या हळूच बोलला.
"उशीर झाला ते?"
"होय आज प्रॅक्टिकल हुतं", संत्या बोलला.

पाटीलच ते, इतक्या वर्षात पोरगं किती खरं किती खोटं बोलतं ते त्यांना चांगलं कळलं होतं. त्यांच्या घरात हे असलं बेशिस्त पोरगं आलंच कसं असा त्यांना प्रश्न पडायचा? आजोबांपासून गावाची पाटीलकी त्यांच्याकडं होती. जितका रुबाब तितकीच शिस्तही त्यांना होती. तीच शिस्त पाटलांनाही आली होती. अगदी घरात घालायच्या पायजम्यालाही नीळ-खोळ घालून, कडक इस्त्री केलेली असायची. सकाळी तासभर लवकर उठायला लागलं तरी चालेल पण दाढी केल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नसत. सगळे कपडे कसे कपाटात नीट लावून ठेवलेले असत. कधी कार्यक्रम असला तर घालायचा सफारी, जॅकेट खास बॅगेत भरुन ठेवलेलं असायचं. कुठल्या वेळी काय घालायचं हे त्यांना अगदी बरोबर जमलं होतं.
       काकी मात्र एकदम उलट. माहेरची श्रीमंती म्हणून या घरात स्थळ मिळालं. घरी कधी काम करायची सवय नव्हती त्यामुळं इथं येऊन सगळं अंगावर पडल्यावर जडच गेलं त्यांना. कितीही गडी-माणूस घरात असला तरी लक्ष ठेवायला पण जमायला पायजे ना? त्यांच्याकडून थोडं इकडं-तिकडं झालं की पाटलांची चिडचिड नक्की. त्यात पोरगं हे असलं. किती शिकवण्या लावल्या, अभ्यास करुन घेतला पण त्याची लक्षण काही गुणाची नव्हतीच. मार खाऊन कोडगाच होत गेलेला अजून. अनेकदा त्यांनी नवऱ्याला विचारलंही होतं 'याचं बघा कायतर' म्हणून.
पाटील त्याच्यावर नजर ठेवून होते आणि बहुतेक योग्य संधीची वाटच बघत होते.
संत्यानं हात धुतले आणि जेवायला बसला. 
त्यानं भाकरी कालवण ताटात वाढून घेतलं आणि मुकाट्यानं खायला सुरुवात केली. 
पाच मिनिटांच्या शांततेनंतर पहिला प्रश्न आला,"कसं चाल्लंय कॉलेज?". 
"हां बराय", संत्यानं नेहमीचं उत्तर दिलं. 
"या वर्षी होनार का पास?", पाटील. 
"चालूय अभ्यास पण कठीण सिल्बस हाय", संत्या बोलला. 
"मग अजून किती वर्षांत हुईल?", पाटील. 
"तसं काय नाय, या वर्षी हुईलच की पास", संत्या हलकेच बोलला. 
"ते राऊ दे, जेवन झालं की तिकडं आतल्या खोलीत पोस्टरं पडलीत पार्टीची तेव्हडी बन्याकडे दिवून ये", पाटीलांनी फर्मान सोडलं. 
इतक्या लवकर सुटलो म्हणून संत्यापण खूष झाला.  
ताटावरुन उटणारच इतक्यात पुढचं वाक्य आलं,"उद्या सकाळच्याला काम हाय, लौकर तयार ऱ्हावा."
"सकाळी? कसलं काम?", संत्यानं विचारलं. 
"सांगितलं ना जायचंय, नवाच्या आत तयार पायजे, आन हे असलं कापडं नकोत.", त्याच्या अवतार निरखत पाटील बोललं. 
"न्हाई त्ये जिमला जातोय ना सकाळी, चांगलं दोन तास जातो रोज", संत्यानं अजून एक ठोकली. 
"दिसतीय किती कसरत चाल्लीय, मुकाट तयार ऱ्हावा, कळलं?", पाटलांनी मान हालवून विचारलं. 
संत्या फक्त मानेनं उत्तर दिऊन उठला. यापुढं नाही म्हणायची त्यांची हिम्मत नव्हती. 
जेवण उरकून त्याच्या खोलीतली पोस्टरची गुंडाळी उचलली आणि बंद करुन ठेवलेली गाडी पुन्हा फटफटली. 
निदान बाहेर तरी पडायला मिळालं म्हणून संत्याला बरं वाटलं. 
बन्याचं घर काय जास्त दूर नव्हतंच. दहा मिनिटांत पोस्टर त्याच्या हातावर टिकवून संत्या घरी परत आला. गाडीवरुन येताना वारं लागलं आणि संत्याला जरा बरं वाटलं. पप्पांबरोबर जेवायचं म्हणजे उपाशी राहिलेलं बरं असं त्याला वाटायचं. पण सुटका नव्हतीच. 
घरी येऊन संत्या डायटेकट त्याच्या खाटेवर जाऊन लेटला. पळत पळत येऊन त्याच्या हातात पैसे कोंबणारी सपना त्याला आठवली. 
तिचं ते जोरात येणं, गाडीत अभ्यास करणं, कँटिनमधला डबा, सगळ्यांची उजळणी करुन झाली. ती कशी दिसत होती, बोलत होती आठवून झालं. उगाच तिची आठवण काढत असं छताकडं बघत राहणं हा त्याचा अजून एक छंद होता. इतक्यात फोन वाजला. विक्याचा होता. 
"काय रे? ", संत्यानं विचारलं. 
"उद्या जिमला येनार ना?", विक्यानं विचारलं. 
"आरं आताच पप्पानी काम सांगितलंय सकाळी. परवा जावूया", संत्या. 
"सुटलो. तो अम्या नौलाच झोपला. झेपलं न्हाय त्याला. माझं आंग पण दुखतंय. उद्या सुट्टी तर मग.", विक्या बोलला. 
"हां, चल ठेवतो", म्हणून संत्यानं फोन बंद केला. 
उद्या सपनीचं एक्स्ट्रा लेक्चर असायचं. तिला यायला उशीर व्हायचा त्यामुळे पप्पांचं हे काय काम असेल ते लौकर उरकून पुन्हा सातारला जायचं होतं संत्याला. 
त्यानं अंगातला शर्ट उतरवला, कोपऱ्यात टाकला, पॅन्ट काढून शॉर्ट घातली आणि कोनाड्यातून पुस्तक काढलं, 'अमृतवेल'. पुस्तकं वाचणं हा संत्याचा एक आवडता छंद होता. मराठीतली जमतील ती सगळी पुस्तकं त्यानं वाचून काढली होती. एखादं पुस्तक संपवण्यासाठी रात्र-रात्र जागून काढली होती. कॉलेजच्या विषयांचा अभ्यास कमी असला तरी त्याची ही आवड त्याला मराठी साहित्यात खूप खोलवर घेऊन गेली होती. 
पुस्तकात गुंग होणं हा एकच उपाय त्याला सपनीला क्षणभर का होईना विसरायला लावायचा. पुस्तक वाचता वाचता कधीतरी संत्याला झोप लागून गेली. 

- क्रमशः

विद्या भुतकर.

Thursday, September 27, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - २

      संत्याचं सपनीवर कधी प्रेम बसलं सांगणं तसं अवघडच आहे. कारण शाळेत त्याला 'S' काढायला यायला लागला तेंव्हापासून त्यानं प्रत्येक इयत्तेत वर्गातल्या त्याच्या बेंचवर तिचं आणि त्याच्या नावाचं 'SS' मोठ्या हार्टच्या मध्ये कोरलं होतं, मधून जाणाऱ्या तिरक्या बाणासहित. वर्गात कित्येक वेळा तिच्याकडे चोरुन बघण्याच्या नादात सरांनी -बाईंनी त्याला उठवलं होतं, वर्गात उभंही केलं होतं. जो काय अभ्यास त्याने आजवर केला होता तो केवळ सपनीच्या वर्गात जाण्यासाठीच. दहावी पर्यंत त्याला त्यात यश मिळालंही. पण अकरावीला तिने सायन्स घेतलं आणि त्याला आर्ट सोडून काही जमणार नाही असं त्याने ठरवून आर्टस् ला ऍडमिशन घेतली. तरीही एकाच कॉलेजात होते त्यामुळे निदान तिचं दर्शन तरी व्हायचं. तिला बघण्यासाठी तो न चुकता कॉलेजला जाऊन यायचा.

       बारावी नंतर सपना सातारला कॉलेजला जाणार असं त्याला कळलं तेव्हा संत्याला जाम टेन्शन आलं होतं. ती अशी गावातून बाहेर पडली तर आपल्याला कशी दिसणार या विचारांनी? दिवसभरात तिचं दर्शन झालं नाही तर त्याला चैन पडायची नाही. त्यानंही हट्ट करुन सातारला बीएला ऍडमिशन घेतली. तिथून मग दर्शन विरळ झालं पण निदान आठवड्यातून ४-५ वेळा तरी व्हायचं. तिच्या कॉलेजच्या कँटीनपासून प्रॅक्टिकलच्या लॅबपर्यंत  सर्व त्याला माहित होतं. तिचं वेळापत्रक त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच पाठ करुन ठेवलेलं असायचं. त्यात कुठेही खंड पडला नव्हता. जितका वेळ आणि शक्ती त्याने सपनीवर खर्च केले होते आजवर तितकंच स्वतःवर केलं असतं तर किती पुढे गेला असता तो. पण ते त्याला सांगणार कोण? शाळेपासून आजवर त्याचे मित्र असलेले विक्या आणि अम्याही त्याला समजवायचं सोडून त्याची मदतच करायचे.एकंब्याच्या त्या छोट्याशा गावात घर, मित्र आणि सपना इतकंच संत्याचं छोटंसं जग होतं.

       आज सपनीचा प्रॅक्टिकलचा दिवस होता. त्या जिमच्या नादात आपण हे विसरलोच कसं यावरुन संत्या स्वतःवरच चिडला होता. कट्ट्यावरुन तिला बघून संत्यानं पटकन कल्टी मारली, 'अम्या चल' म्हणाला आणि गाडी घेऊन स्टॅंडकडे जायला निघाला. अम्यानेही गाडीवर टांग मारली होती. अम्या, विक्याला कधी सांगायची गरज पडली नव्हती, संत्या 'चल' म्हणाला की चालायचं.

सपनी वैशू सोबत पाठीला सॅक घेऊन चालली होती. लवकरच त्यांना क्रॉस करुन संत्या पुढे निघून गेला. अर्थात गाडीच्या आरशात तिच्याकडे बघायचं मात्र तो विसरला नव्हता. सपनीचा चुडीदार, त्याच्या ओढण्या, त्यांच्यावर घातलेलं हूड असलेलं खिसेवालं मळखाऊ रंगाचं आणि तरीही मळलेलं जॅकेट आणि मागे लावलेली सॅक सगळं त्याला पाठच झालेलं. चेहऱ्यावर स्कार्फ बांधून, जॅकेटच्या खिशात हात घालून सपना पटापट पावलं टाकत स्टॅंडकडे जात होती. तिच्या आधी स्टॅण्डवर पोचल्याने संत्याला जरा बरं वाटलं.

       गावातून सकाळी दर अर्ध्या तासानं अशा चारच गाड्या सातारला जायच्या. त्या चुकल्या की एकच पर्याय तो म्हणजे 'संतोष ट्रान्स्पोर्ट'. संत्याचं फक्त नावच होतं त्यावर. बाकी कामंकामाला ठेवलेली पोरंच करायची. सपना पळत पळत स्टँडवर पोचली पण तिच्यासमोरुन बस निघून गेली होती. तिलाही माहित होतं आता ट्रॅक्स शिवाय पर्याय नाही. स्टँडच्या जवळच ट्रान्स्पोर्टच्या ४-५ ट्रॅक्स उभ्या होत्या. पोरं, 'सातारा...सातारा ... ' म्हणत वरडत होती. सपना, वैशू एकाजवळ आल्या, "कधी निघणार?".

पोरगा म्हणाला,"लगीचच, तुमी बसा की.".
सपना,"नुसतं म्हणता लगीच आणि तासभर लावता, मला क्लास आहे. ".
वैशू,"जरा चला ना लवकर, घाई आहे".
दोघी ट्रॅक्समध्ये बसल्या, अजून १५ लोक झाले तरी निघायचं नाव घेईना गाडी. सपनीचं लक्ष घड्याळाकडे लागून राहिलं होतं. त्यात उन्हानं जीव नकोसा झालेला. संत्या गाडी लावून बाजूलाच उभा होता. बाईकच्या आरशात ती दिसत होतीच.
त्याने पोराला झापला,"चल की रं, उगाच नाक्याव गाड्या आडवतात, एकादा पडला गाडीतनं खाली तर आपल्यावं यायचं. चल सुरु कर गाडी." असं म्हणत संत्या आणि अम्या पण गाडीत पुढच्या सीटवर बसूनच गेला.
आता मालकाचीच आज्ञा ती. पोरानं चटक्यात गाडी सुरु केली आणि वळवली तशी गाडीतली मंडळी पार आडवी-तिडवी झाली. स्वतःचा तोल आणि सॅक सांभाळत सपना बसून राहिली. गाडी रस्त्याला लागल्यावर जरा वारं अंगाला लागलं आणि सपनीला बरं वाटलं. तिनं सॅकमधून धडपडत पुस्तक बाहेर काढलं आणि वाचू लागली.
तशी वैशू बोलली,"अगं किती वाचणार, बास की आता.".

"काही आठवत नाहीये मला. एकतर उशिर झाला की टेन्शन येतंय. तू पण बघ", म्हणत सपनीनं पुस्तक थोडं वैशुकडं सरकवलं. मधेच काहीतरी आठवत सपनी तोंडातल्या तोंडात उत्तरं पुटपुटू लागली. ट्रक्सचा आरसा संत्याने पुन्हा ऍडजस्ट केला होता तिला बघण्यासाठी. "जरा शीडी लाव की" म्हणत संत्याने स्वतःच नव्या गाण्यांची सीडी सुरु केली. संत्याला गाण्यांची लै आवड. सगळी रोमँटिक आणि शाड सॉंग त्याच्यासाठीच लिहिलीत असं त्याला राहून राहून वाटायचं. गाण्यांसोबत गाडीनेही वेग धरला होता. गाडीचा स्पीड जास्त असला तरी दर ५-१० मिनिटांत लोक उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी तरी थांबतच होती. प्रत्येक वेळी गाडी थांबली की सपनीची चिडचिड वाढत होती. अर्ध्या तासाच्या रस्त्याला तासाभर लागला. गाडी सातारला पोहोचली. सपना, वैशू गाडीतून उतरुन पळतच सुटल्या, इतक्यात तिच्या लक्षात आलं गाडीचे पैसे द्यायचेच राहिलेत. ती पळत आली तर ते पोरगं दुसऱ्या बाजूने परतीची गर्दी भरत होतं. तिने संत्याच्या हातात पैसे कोंबले आणि परत पळत सुटली. संत्या पळत जाणाऱ्या सपनीकडे कितीतरी वेळ बघत राहिला. आता परत कधी दिसणार या विचारांत गुंगला होता.

        तिचं अभ्यासात असलेली एकाग्रता, अभ्यासासाठी, कॉलेजला जाण्यासाठी असलेली धडपड त्याने नेहमीच पाहिली होती. गावात असलेल्या अनेक मुलींच्यापेक्षा कितीतरी वेगळी वाटायची ती त्याला. तिला तसं पळत जाताना पाहून त्याला वाटलं, आपणही काहीतरी इतक्या पोटतिडकीने केलं पाहिजे. पण काय केलं पाहिजे हे आजतागायत त्याला उमजलं नव्हतं. गाडी भरली होती आणि परतीच्या रस्त्याला लागलीही.  संत्या मात्र अम्याला घेऊन तिथेच थांबला होता.
--------------

         सपनीचं  प्रॅक्टिकल होणार, मग ती कॅंटीनमध्ये डबा खाणार, क्लासला जाणार आणि मग घरी. सर्व कसं ठरलेलं. अम्या आणि संत्या निवांत चालत कॉलेज कँटीनला पोचले. तिथं मुलांचा आणि मुलींचा सेक्शन वेगळा होता. ठराविक टेबलावरुनच पलीकडच्या भागातलं दिसायचं. संत्यानं 'दोन वडापाव, लिंबू सरबत' अशी ऑर्डर दिली आणि ठरलेल्या टेबलावर येऊन बसला.

वडापावचा पहिला घास खाल्ला की त्याचा डायलॉग ठरलेला,"भारी असतो रं इथला वडापाव."
"अन वहिनीसोबत बसून एकदा खायचाय, बरोबर ना? कितीदा सांगशील? ", अम्या बोलला.
संत्या हसला.
तासाभरात सपना डबा घेऊन कँटीनला आली. तिने 'दोन सरबत' मागवले आणि वैशूशी बोलत जेवण करत राहिली.
वैशू,"मी काय पुढे जात नाही याच्या बहुतेक. पुढच्या वर्षी उरकूनच टाकतील अप्पा लग्न.".
सपना,"का गं?".
वैशू,"असला टेस्ट पेपर आल्यावर काय होणार?"
सपना,"गप, असंच म्हनतीस आणि पास होतीस."
वैशू,"या पोरांना काम नसतं का गं? कधीपण पडीक असत्यात कँटीनला".
सपना,"जाऊ दे, तुला काय करायचंय? जेव क्लास सुरु होईल.".
वैशू,"त्यांचं बरंय, पैसा पाणी सगळं आयतं आहे, मग हे असले उद्योग करायचे".
सपना काहीच न बोलता जेवत राहिली. नको असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला ती शिकली होती. वेळ झाल्यावर उठून डबा बंद केला, सॅक घेऊन क्लासला गेली.
"आता अजून दोन तास काय करायचं?", अम्या कंटाळला होता.
तो आणि संत्या उठून मग ट्रॅक्सच्या कोपऱ्यावर गेला. शेवटी सपनाला घरी इथूनच जायचं होतं. संध्याकाळी कधीतरी सपना, वैशू स्टँडवर आल्या. त्या दिसल्या की संत्या सावध झाला. त्यांना बस मिळणार असे दिसल्यावर तो आणि अम्याही गाडीत चढून गेले. अम्याला एकतर जिममुळं अंग ठणकत होतं त्यात इतकी धावपळ. कधी घरी जाऊन पडतो असं त्याला झालं होतं.

           संध्याकाळी झालेली बस परतीच्या रस्त्याला लागलेली. पुन्हा तीच एसटी बस, तीच धावपळ, थकलेलं शरीर, मन. सपना खिडकीतून बाहेर बघत बसून राहिली. आजच्या पेपरचे विचार डोक्यात होतेच. घरी जाऊन उद्याचा अभ्यासही होताच. वैशूची झोप लागली होती. मागे कुठल्यातरी सीटवर संत्या आणि अम्याही होतेच. मधेच जोरात ब्रेक लागला तसं संत्याचं डोकं जोरात समोरच्या दांड्यावर आदळलं. डोकं चोळत संत्या परत पेंगू लागला.
त्याच्याकडे बघत अम्या बोलला,"दिवसभर नुसता हिंडत राहतोस तिला बघायला, इतकं दमून घरी जायची काय गरज हाय तुला? बघ की जरा स्वतःकड. "
संत्या हसला, "आता आईगत तू पण लेक्चर दिऊ नकोस. रात्री बसमधून कसली लोकं असत्यात तुला माहित नाही का? एकदा ती सुखरुप घरी पोचली की मी सुटलो बघ."
"असं किती दिवस रक्षण करणारंयस तिचं?". अम्या.
"आयुष्यभर !", म्हणत संत्याने डोळे पुन्हा मिटले.

गाडीतून उतरुन सपना, वैशू घरी पोचल्या. संत्या कट्ट्यावर सगळ्यांना तोंड दाखवून घरी पोचला होता. त्याचा दिवस संपला होता.

- क्रमशः

विद्या भुतकर. 

Tuesday, September 25, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - १

रस्त्यावरुन जोरजोरात ट्रकच्या हॉर्नचा आवाज येत राहिला.......कितीतरी वेळ झाला तरी बंद होईना. ट्रकवालाही कुठल्या तरी गाण्याच्या ट्यूनचा सराव करत असल्यासारखा हॉर्नवरचा हात क्षणभरही न काढता वाजवत चालला होता.  संत्याचं डोकं उठलं आवाजानं. एकतर उन्हं वर आल्यानं जीव कासावीस होत होता. त्यात सगळे आवाज त्याला उठवायचा पूर्ण प्रयत्न करत होते. हॉर्नचा आवाज दूरवर जाऊ लागला तसा कमी झाला. संत्यानं कूस बदलून अंगावरचं पांघरुण झटकून जरा अंग पसरुन झोपायचा प्रयत्न केला. फेब्रुवारी लागला तसा उन्हाची झळ वाढली होती. पुन्हा झोप लागणार इतक्यात पांघरुणात कुठेतरी फोन थरथरला. तो मोबाईल शोधून कुणाचा मेसेज आहे हे बघेपर्यंत संत्याची झोपमोड झाली.
      संत्या वैतागून उठून बसला आणि फोनवर पाहिलं तर १२-१४ मेसेज येऊन गेले होते. स्वतःवरच चिडत त्याने मेसेज वाचले. मेसेज कुणाचे होते ते सांगायला नकोच होतं. तो भिंतीवरच्या घड्याळात बघून पुन्हा गप्प बसून राहिला. अंग घामानं भिजलेलं होतं, अंगातला बनियन अर्धं ओला झालेला होता. त्याने चिडून तो काढून टाकला. पुन्हा एकदा मेसेज वाचले आणि पुन्हा खाटेवर पडून, डोळे उघडे ठेवून छताकडे बघत राहिला. नजर फिरली तशी कोपऱ्यात कोळ्याची जाळी दिसत होती. त्याच्या खोलीतल्या खुंटीवर पॅन्ट आणि शर्ट एकावर एक असे अडकवून ठेवलेले, कुठल्याही क्षणी पडणार होते. एका खोबणीत वह्या पुस्तकं एकावर एक पडून होती. कित्येक वर्षं हात न लावल्यासारखी. शेजारीच जुनं टेबल होतं. त्याच्यावर पप्पांच्या कामाची कागदं ढिग लावून ठेवलेली होती. शेजारीच मोठमोठे बॅनरचे रोल पडले होते.  माजघरात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गाणी ऐकू येत होती.
'पप्पा गेलं असतील बाहेर आता' विचार करत संत्या नाईलाजाने खाटेवरुन उठला. तो ओला बनियन पुन्हा अंगात घालायची त्याला इच्छा झाली नाही. खुंटीवरचा एक टी-शर्ट त्याने अंगावर घातला. खाली पडलेले दोन शर्ट त्याने मिळेल त्या खुंटीवर टांगले आणि चिडूनच खोलीतनं बाहेर पडला.
"किती वर्षं अशा खुंट्या वापरायच्या? घरात नवीन कपाटं करुन घेऊया की?", असं त्यानं पप्पाना हजार वेळा सांगितलं असेल.
"तुझं एकदाचं लग्न झालं की तुझी बायको म्हनल तसं करु, चालंल?", पप्पांनी हेच उत्तर त्याला हजारवेळा दिलं होतं.
संत्या उठून तडक घराच्या मागच्या संडासात गेला.
आत बसून त्यानं मेसेज वाचायला सुरुवात केली.
"संत्या कुटं हायस?"
"कॉल कर"
"फोन उचल"
"कुठं उलथलास?"
"जिमला ये"
"लवकर ये"
"मर तिकडं"
"आमी घरी चाललो"
हे आणि बाकी शिव्यांचे अनेक मेसेज येऊन गेले होते.
विक्या आणि अम्या संत्याच्या नादात 'अर्नोल्ड जिम' ला पहाटे पहाटे जाऊन आले होते.
--------
गेल्या दोन महिन्यांपासून 'अक्षय कुमार' सारखी बॉडी बिल्डिंग करायची असं ठरलं होतं.
"हे बघा मी सांगतोय, अक्षयच बेश्ट आहे. ", संत्या.
"का बरं? सलमान काय वाईट हाय?", अम्यानं सलमानची बाजू घेतली.
"आर तो अक्षय बघ एकदम निर्व्यसनी हाय आन एकदम सकाळ सकाळ उठून व्यायाम करतोय, नुसतं तेच नाय रात्री पन लवकर झोपाय जातोय.", संत्यानं सगळी माहिती काढून घेतली होती.
"हे बघ नुसतं व्यायामानं काय होत नाय, रोज अंडी, मटन खाल्लं पायजे. ते मोडाची धान्यं खाल्ली पायजेल.", विक्यानं महत्वाची माहिती दिली होती.
"होय बास उद्यापासनं त्या अर्नोल्ड वाल्याकडं जाऊया बघ. तू रात्रीच मोड यायला मूग-मटकी भिजवाय सांग आईला. ", अम्यानं निर्णय घेतला.
"आरं पर ते मोड यायला दोन दिवस लागत्यात.",विक्या.
"बरं मग पर्वा जाऊया.", संत्यानं फिक्स केलं.
"चला उद्याच पैसं भरुन घेऊ आन काय काय पायजे जिमला ते इचारून घेऊ.", अम्या बोलला.
सगळ्यांनी मान हलवली.
--------
हो नाही करत दोन महिन्यांनी आज मुहूर्त लागला होता सगळं जुळून यायला तर संत्यानं घोळ घातला. पहिल्याच दिवशी विक्या आन अम्याला चांगला कुथवून घेतला होता आणि संत्या मात्र दहापर्यंत झोपा काढून निवांत होता. भेटल्यावर 'लई शिव्या बसणार' हे त्याला पक्कं माहित होतं.
संत्या कुठल्याच मेसेजला उत्तर न देता, संडासातनं बाहेर आला. ब्रश करत, मागच्या अंगणात फिरला. गुलाब, कढीपत्ता, चिंच, मोगरा सगळी झाडं त्यानं स्वतः तपासून घेतली. एखादं सुकलेलं पान डाव्या हातानं तोडत ब्रश करत राहिला. मागच्याच दारातल्या बंबातून उरलेलं पाणी काढून घेतलं. खाली जमलेली राख काढूनकोपऱ्यातल्या खड्ड्यात टाकली. पाणी कोमटच होतं. पण असंही उन्हानं गरम पाणी अंगावर टाकवत नव्हतं. नळाचं पाणी गेलेलं होतं. त्यानं मोटार सुरु करुन विहिरीचं पाणी टाकीत सोडलं. गार पाणी बादलीत पडायला लागल्यावर त्याला जरा बरं वाटलं. अंघोळीला सुरुवात करणार इतक्यात आतून काकीचा आवाज आला,"मोटार बंद कर रं".
त्याने घाईने जाऊन मोटार बंद केली. पाणी अंगावरून घेतलं आणि टॉवेल गुंडाळून घरात आला.
"संत्या जा आवर पटकन, त्या मालीच्या घरी बघून ये. सकाळी लवकर ये म्हटलेलं तिला तर अजून आली नाही. भांड्याचा ढीग पडलाय.", काकींनं त्याला हलवला.
संत्याचं तोंड वाकडं झालं. आठवड्यातनं एकदा तरी त्याला हे काम करायला लागायचं. माली आली नाही तर काकीचं काम अडूनच असायचं. ती पण काय ऐकणारी नव्हती. जमलं तसं यायची. कधी यांचं पहिलं काम कर कधी दुसऱ्याचं. काही वेळ काळ नव्हतंच. तिला कधीतरी गाडीवरुन आणायला पण सांगायची काकी, अगदीच अडलं तर. संत्यानं समोर ठेवलेला चहा-खारी खाल्लं.
ते खाताना काकी म्हणालीच,"आरं तुझं ते मोड आल्यात".
'सकाळी मोड खायचे सोडून चहा खरी खाल्ली हे विक्याला समजलं तर ?', संत्या त्याचं तोंड आठवून हसला. तिकडं काकी परत ओरडायला लागली. संत्या उठला, गाडीला किक मारली इतक्यात काकीने हाक मारली, "येताना २०० ग्रॅम जिरे घेऊन ये रे".
संत्या अजून चिडला. ही असली बारीक सारीक सामान आणायची कामं म्हणजे डोक्याला ताप होता. एकतर त्याला सगळी माहिती नसायची, मग चुकीची वस्तू, खराब झालेली किंवा कधी कमी तर कधी जास्त आणली जायची. मग काकीच्या शिव्या, परत बदलून आणा, नसते उद्योग. संत्या चिडूनच निघाला.
बाहेर पडल्यावर त्याला जाणवलं दिवस किती उजाडलाय. सगळी माणसं कामाला लागली तरी
संत्याचा दिवस आता सुरु झाला होता. त्यानं मालीच्या घराजवळ गाडी थांबवली, बाहेरुनच 'मालीआत्या' म्हणून हाक मारली. माली बाहेर आली म्हणाली, "येतच हुते, थांब मला घरी सोडूनच जा" म्हणून पटकन गाडीवरच बसली.
संत्या अजूनच चिडला. त्याने गाडी जोरात दामटली. रस्त्यात गाडी थांबवून दुकानांत गेला.
"२०० ग्रॅम जिरे द्या", त्याने शेटला सांगितलं.
त्याने वजन करुन बांधून दिले. पुडी मालीआत्याच्या हातात देऊन तो घरी पोचला. दारातूनच तिला उतरवलं आणि गाडी परतवली.
संत्याचा दिवस सुरु झाला होता.
------------
जन्मापासून आज २४ वर्षाचा झाला तरी संत्या सुधारला नव्हता. आणि सुधारेल अशी अपेक्षाही काकीनं सोडली होती. शाळा उनाडक्या करण्यात गेली, कसाबसा पास होत कॉलेजला जायला लागला. सातारला बीएला ऍडमिशन घेतली होती त्याने, कधीतरी ६-७ वर्षांपूर्वी. किती वर्षात पास व्हायचं असं काही त्याने ठरवलेलं नसल्याने त्याचं आरामात चाललेलं होतं. घरचं सगळं पप्पा बघतच होते. पैशाला कमी नव्हतीच. घरची शेती, जुनं का होईना मोठालं घर, पप्पांनी मिळवलेली सत्ता आणि टेम्पो ट्रॅक्सचा बिझनेस सर्व काही त्याच्या पथ्या वरच पडलं होतं. आयुष्यात कष्ट आणि दुःखं म्हणजे काय हे त्याला माहीतच नव्हतं.
       रोज उठून नवे शौक आणणे आणि त्यावर पैसे आणि वेळ खर्च करणे हा त्याचा साईड बिझनेस होता. संत्या बारीक उंच सडसडीत होता. त्याच्या वयाच्या सगळ्या पोरांसारखंच आपणही आता बॉडी बिल्डिंग करायचं हे त्याच्या डोक्यातलं नवं खूळ होतं. घरात सामान आणि माली पोहचल्यावर तो तडक अड्ड्यावर गेला होता. स्टॅन्डवरच्या त्याच्या एका मित्राच्या दुकानाच्या बाहेर विक्या आणि अम्या भेटणार हे त्याला माहित होतं. त्याने गाडी तिकडे घेतली. तो दिसला तसे कट्ट्यावरुन उठून अम्या जणू मारायलाच आला त्याला.
"अरे हो गाडी तरी लावू दे की", संत्या हसत म्हणाला.
"हे बघ पाय दुखतायत नाहीतर मी पण आलो असतो", विक्याने जमेल तितक्या रागाने सांगितलं. तसा संत्या अजूनच हसला. विक्याच्या आवाजात जितका दम होता तितका अंगात असता तर असा पाय धरुन बसला नसता. संत्या शेजारी बसला की लगेचच विक्यानं आपल्या बारकुट्या हातानं त्याच्या पाठीत जोरात बुक्का घातला.
"ओ पैलवान लागतंय आमाला" म्हणत संत्या खोटं विव्हळत हसला. अम्यानं मग खरंच त्याची मुंडी धरुन पाठीत जोरात धपाटा दिला.
"तुज्या मारी, इथं सकाळी सहा आमी दिवाळीला पन बघत नाय, त्यात ते आलेलं उसळी खाल्ल्या सकाळ सकाळी. केळी खाल्ली. तुला मायतेय काय किती वाट लागलीय त्ये? " अम्या चिडून बोलला.
"आरं हो की आता नाय जाग आली तर काय करु? उद्या येतो बस?", संत्यानं माफीच्या स्वरात सांगितलं.
"उद्या आम्ही कशाला जातोय? हा विक्या तर उद्या जगला तरी बास म्हनायचा." अम्या बोलला आणि गप्प बसला.
"आर असं सोडायचं नाय, जाऊयात उद्या, मी येतो नक्की.", म्हणत संत्या कट्ट्यावर स्थिरावला.
काही बोलणार इतक्यात त्याला समोरुन सपनी तिच्या मैत्रिणीसोबत जाताना दिसली आणि संत्या एकदम गप्प झाला. अम्या आणि विक्याही तोंड फिरवून गप्प बसले.
 सपनी संत्याचा 'मेन बिझनेस' होती. त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय आणि त्याचं प्रेम.

----------

क्रमशः

विद्या भुतकर.

Sunday, September 16, 2018

नातिचरामि

        मागच्या आठवड्यात मेघना पेठे यांचं 'नातिचरामि' पुस्तक वाचून पूर्ण झालं. आपण ते इतक्या उशिरा वाचतोय याची मला थोडी लाज वाटलीच पण कधीच न वाचण्यापेक्षा बरंच ना? खरंतर मला पुस्तकांची समीक्षा लिहिता येत नाही. होतं काय की वाचताना  वाहवत जातो आणि पुस्तक संपल्यावर त्यातल्या ठराविकच  लिहायच्या तर पुन्हा त्यावर विचार करायला लागतो. जे शक्य होत नाही. पण मागच्या वेळी अनेकांनी एका वाचलेल्या पुस्तकाबद्दल विचारलं की ते मला कसं वाटलं होतं. म्हणून चार ओळी का होईना आवर्जून लिहायला घेतल्या. 
         तर 'नातिचरामि' हे पुस्तक नसून एक अनुभव आहे. त्यातल्या पहिल्या पानापासून जे जग निरनिराळ्या भागांतून उभं राहतं ते अनुभवणं वर्णनातीत आहे. पुस्तक छोटं असूनही मी अनेक दिवस वाचत राहिले, बसमधून, ट्रेनमधून जाताना. कधी कधी तर असं झालं की जे वाचलंय ते इतकं पटलंय मनाला, इतकं लागलंय किंवा 'अरे मलाही हे असंच वाटतं' असं झालं. आणि मग मी पुस्तक मिटून तशीच बसून राहिलेय. जे समोर येतंय ते समजून घ्यायला. 
लेखिकेची शैलीही अशी आहे की मला अनेकदा वाटलं की मी तिचाच एक भाग आहे. आजवर कुठलंही पुस्तक इतकं जवळचं वाटलं नाहीये जितकं हे वाटलं. कुणी इतकं हळुवार, इतकं क्रूर, इतकं खरं लिहू शकतं असं वाटलं अनेकदा. 
           अजून जास्त काही लिहावंसं वाटत नाहीये. त्यातल्या पहिल्या भागात ही वाक्यं होती ती वाचली आणि पटकन डोळ्यांत पाणी आलं. कदाचित संदर्भाशिवाय त्याची तीव्रता जाणवणार नाही, तरीही देत आहे: 
"विजांना घाबरणारा एक माणूस विजा संपेपर्यंत दुसरया माणसाचा हात धरतो. विजा संपल्यावर निघून जातो. यांत दोघांनीही कुठल्या संस्थेचं सभासद असण्याची काय गरज आहे? आहे? आणि कुठल्या संस्थेचं सभासदत्व रद्द करण्याची? आहे?"  

विद्या भुतकर.

Monday, September 10, 2018

चिकू

        सकाळची कामाची लगबग सुरु झाली तशी चिकूला जाग आली. तो उठणार इतक्यात आजीने, माईने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि थोपटू लागली. तोही मग माईजवळ पडून राहिला. एरवी तिच्या थापटण्याने त्याची पुन्हा झोप लागून गेली असतीही. पण आज मात्र त्याला झोप येत नव्हती. पाहुणे येणार म्हणून घर गेल्या दोन दिवसांपासून तयारीत होतं. त्यात चिकूचा लाडका आदी येणार म्हणून त्याच्यात अजून उत्साह संचारला होता. चिकूला चैन पडेना. तो उठून बाहेर आला. आई दारात सडा रांगोळी करत होती. त्याच्याकडे पाहून तिला कळलं होतं की हा झोपणार नाही परत.
"ब्रश करुन, तोंड धुवून घे पटकन, मी आलेच दूध द्यायला.", आई बोलली.
तोही पडत्या फळाची आज्ञा मानून आवरायला लागला. दूध पिऊन झालं. माईकडून अंघोळ करुन घेतली गेली.  पेपरमधलं सुट्टीतलं  कोडंही सोडवून झालं. तरीही आत्याचा पत्ता नव्हता.
         शेवटी दुपारी एकदाची दारात रिक्षा उभी राहिली आणि आख्ख घर दाराशी लोटलं. जणू पाहुण्यांना पहिलं कोण बघणार याची स्पर्धाच लागली होती.माई -आबा, आई पप्पा सगळ्यांचे चेहरे खुलले. सर्वात पुढे होता तो चिकू. त्याला केव्हा एकदा आत्या घरात येतेय असं झालं होतं. शेवटी माहेरवाशीण सहा महिन्यांनी घरी आली होती. तिची पोरं, जावईबापू सर्वांचं स्वागत करायला धावत येणारच ना? बाजूच्या घरातल्या दोघी तिघी पण कौतुकाने बाहेर आल्या होत्या. सुजाता, पोरं रिक्षातून बाहेर पडून बॅग बाहेर काढत होते इतक्यात आबा पुढे आले.  त्यांनी सामान घेतलं. जावईबापूना पैसे काही देऊ दिले नाहीत त्यांनी. रिक्षावाल्याला पैसे देऊन सर्व उरकलं. भाचे 'मामा' म्हणून चिकूच्या पप्पांना बिलगले. सुजाताने माईला मिठी मारली आणि दोघींचा रडण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. इतक्यात चिकूच्या आईनं पळत जाऊन आतून भाकरीचा तुकडा, तांब्यात पाणी आणलं होतं. पोरांच्या, लेकीच्या जावयाच्या अंगावरून उतरवून भाकरीचं तुकडे माईंनी दोन्ही बाजूना टाकले. तांब्यातलं पाणी त्यांच्या पायांवर घातलं. हातांची  बोटं कपाळाच्या दोन्ही बाजूला कडाकडा मोडली. पोरं हालचाल करत होती तर त्यांना सुजातानं दामटून गप्प उभं केलं. त्यांच्या डोळ्यांना पाणी लावून मगच माईनं सगळ्यांना घरात घेतलं.
         
        आदित्य सुजाताचा मोठा मुलगा, चिकूइतकाच ९-१० वर्षांचा, छोटा ओजस ४ वर्षांचा. पोरं प्रवासानं दमली होती पण सगळे भेटल्यावर एकदम उड्या मारायला लागली. घरात आल्या आल्या आदित्यनं बॅग उघडायला सुरुवात केली. 
तशी माई ओरडलीच,"अरे बॅगा कशाला उचकताय? ठिवा बाजूला. चला जेवाय आधी."
पण पोरांना दम नव्हता. आदित्यनं त्याच्या लाडक्या चिकूसाठी बॅट आणली होती. ती बॅट पाहून चिकू खुश झाला. 
"आता जेवाय बस नायतर त्या बॅटीनच मारीन", असं माई बोलली आणि पोरं ताटावर बसली. 
माई, चिकूची आई पाहुण्यांना हवं, नको ते बघत होत्या. तोवर सुजातानं घराची पाहणी करून घेतली. माहेरी आल्यावर जणू आपल्या घराची पुन्हा एकदा ओळख पटवून घ्यावीशी वाटते. 
        जेवायला बसलं तरी चिकूचं बोलण्यांतच लक्ष जास्त. तो काही नीट जेवेना म्हणून माई त्याच्या शेजारी बसली आणि त्याचं ताट समोर घेऊन त्याला एकेक घास भरवू लागली. तो सवयीने तिच्या हातून घास घेत आदित्यशी बोलू लागला. 
त्याला असं घास भरवताना पाहून सुजाता म्हणालीच, "अगं माई किती मोठा झालाय तो, जेवू दे की त्याच्या हातानं?". 
तशी माई हसली. 
चिकूची आईही बोलली,"मी सांगते त्यांना सारकं, सवय लागू द्या त्याला हातानं जेवायची. पण लाडका नातू तो."
"असू दे गं, लहान हाय लेकरू. है की नाय चिकू? ये रे आदी, मी तुला पन भरवतो. ", माई त्याच्याकडे बघून हसत बोलली. 
"राहू दे, त्याला पण बिघडू नकोस. आणि ते चिकू चिकू काय करताय? त्याला नावानं हाक मारायची ना?", सुजाता बोलली. 
"हां, अर्जुन!", आबा मधेच बोलले. त्यांना असं आपलं नाव घेताना ऐकून चिकू लाजला. 
जेवण पटकन उरकून पोरं लगेच बॅट बॉल घेऊन पळाली. बाहेर ओसरीवर चटया टाकून पाहुणे पहुडले आणि आत मायलेकी आणि सून. माई आडव्या पडलेल्या लेकीकडं पाहून बोलली, "तब्येत सुधरली नाय पावण्यांची?". 
"होय की नाय? तरी त्यांना सांगतोय जरा चालायला जावा, पण ऐकत नाही.", सुजाता रागानं बोलली. 
"अगं, चिडतीस कशाला? चांगलं हाय की?", माई. 
"चांगलं कसलं, उगा ते दुखनं कशाला मानसाला?", सुजाता. 
"बरं ते जावू दे, हे बग हिच्या गळ्यातल्यात भर घालून आनली पर्वा", म्हणत माईनं सुनेच्या गळ्याकडे हात केला. तिनंही मग पुढे होऊन तिचं मंगळसूत्र दाखवलं. 
"चांगलं झालंय  गं? कितीची भर घातली तरी? बरंय आता जरा घसघशीत वाटतंय.", सुजाता म्हणाली. 
"होय की, किती दिवस राह्यलेलं. मीच म्हटलं जाऊन करून ये.", माई बोलली. 
"हे बग हे कानातलं नवीन केलं.", सुजातानंही दाखवलं कान पुढे करून. 
"हां मला वाटलं तरी नवीन.", माई म्हणाली.
"ते मोठ्या सोनाराकडनं घेतलं पुण्यातल्या. भारी डिजाईन होती एकेक. टीव्ही वर दाखवतात तसली. ", सुजाता विचारात गुंगली. 
"संध्या आली का गं सुट्टीला?", तिने मधेच आठवून विचारलं. 
"न्हाई, तिचं तिसरं पोटात हाय, आता बाळंतपणालाच यील. अलका भेटलेली बाजारात ती सांगत हुती. तुजी नणंद कधी येनार हाय? ", माईने विचारलं. 
"हां त्यांचं रद्द झालं म्हणून तर आम्ही आलो. म्हटलं दोन चार दिवस काय मिळालं ते राहून घेतो.", सुजाता. 
"तिचं पायाचं दुखणं बरं झालं का ग?", माई. 
"नाय ना अजून, काय बाई एकेक ताप डोक्याला. नुसतं गाडीवरून पडल्याचं निमित्त झालंय. सासुबाई गेल्याच लगेच मदतीला.", सुजाता. 
शेजारी झोपलेल्या धाकट्या नातवाच्या डोक्यावर हात फिरवत माई बोलली,"दमलं पोर.". 
"होय की, सकाळी लवकर निघालेलो. त्यात गाडीत उलटी झाली त्याला.", सुजाता बोलली. 

त्या दोघी बोलत असतानाच पोरं पाणी प्यायला आत आली. दोघांची तोंडं उन्हानं लाल झालेली. आत येऊन दोघांनी घटाघटा पाणी पिलं आणि परत पळणार इतक्यात सुजाता ओरडली, "आदित्य, इकडं ये. अर्जुन तू पन!". 
तिचा आवाज ऐकून दोघेही थांबले. तिने दोघांना शेजारी बसवलं. दोघांचे हात पाय काळवंडलेले, चेहरे लालबुंद, धाप लागलेली. बसले तरी त्यांची चुळबुळ कमी होईना. 
"आदी, गप मुकाट्याने झोप जरा वेळ. ", ती त्याला रागावली.
"इतक्या उन्हाचं बाहेर भटकत नाहीत ना नेहमी? त्यामुळं उगाच त्रास नको दोन दिवसांसाठी.", ती तिच्या वहिनीकडे बघत बोलली. 
पोराला शेजारी आडवं पाडून ती पुन्हा बोलू लागली. चिकूला गप्प बसवेना. तो उठून बाहेर पळून गेला,"मी पप्पांकडं जातो", म्हणून. 
त्याला जाताना बघून सुजाता बोलली,"केव्हढा उंच झाला. पन रापलाय किती."
"सारखं दिवसभर मातीत, उन्हांत खेळ कमी हाय का त्याचा? किती अंग घासलं तरी तसंच. ", माई बोलली. 
"किती सांगायचं त्याला, पण ऐकत न्हाई अजिबात.", चिकूच्या आईला आपल्या पोराला असं बोलल्यावर थोडं वाईट वाटलं होतं. शेजारी पहुडलेल्या आदीचे कपडेही तिला एकदम नीटनेटके वाटले. 
      बराच वेळ कुणी काही बोललं नाही मग. सगळ्यांची झोप लागून गेली. संध्याकाळी चहा पाणी, पुन्हा स्वयंपाकाची तयारी सुरु झाली. सुजाता आणि पाहुण्यांना घेऊन चिकू, त्याचे पप्पा, आबा, दोन्ही पोरं अशी सगळी वरात गावच्या देवाला निघाली. पोरांनी येताना गाडीवर आईस्क्रीमचा हट्ट केला. मग काय, सगळ्यांना कोन मिळाले. घरी आल्या आल्या जेवायची ताटं घेतली गेली परत. तोवर टीव्ही वर डान्सचा कार्यक्रम सुरु झालेला. पोरं जेवत जेवत तो बघत असताना सुजाता बोलली,"आदीला लावलाय डान्सचा क्लास. आदी करून दाखव नंतर जेवण झाल्यावर, बरं का?". 
त्यानेही मान हलवली. जेवणानंतर अंगणात बसून पोरांचा डान्स सुरु झाला मग. आबांनी आणलेल्या कुल्फ्याही खाल्ल्या गेल्या. पोरांना असं नाचताना बघून माई खुश झाली एकदम. घर किती दिवसांनी पोरांनी भरलं होतं. मधेच तिला काय सुचलं काय माहित,"चिकू ते तुझी प्रतिज्ञा म्हणून दाखव की?". 
"अगं आजे ती प्रतिज्ञा हाय. गाणं न्हाई.",चिकू बोलला. 
"माई तू आधी त्याला अर्जुन म्हण बरं. सारखं काय चिकू चिकू?", सुजाता परत बोलली. 
"बरं अर्जुना, तुझी ती प्रतिज्ञा म्हणून दाखव की. अगं लै भारी इंग्रजीत बोलतोय.", माई बोलली. 
चिकूने प्रतिज्ञा म्हणून दाखवली आणि सर्वांपेक्षा जास्त आनंद माईलाच झाला होता. आपल्या पोराच्या इंग्रजी बोलण्यावर भारी खुश होती माई. रात्र पुन्हा गप्पांमध्ये सरली.
        दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून झालं तसं चिकू आईला म्हणाला, "आई मी विऱ्याकड जाऊ का?"
"आता कशाला? पाव्हणं हायेत ना घरात?", त्याची आई बोलली. 
"त्यालाच न्यायचाय विऱ्याकड. त्यानं सांगितलं हुतं आन याला म्हनून.",चिकू बोलला. 
"तुज्या पप्पाना विचार", म्हणून त्याची आई परत कामाला लागली.
 "आता पप्पाना कुटं इचारायचं?", असा विचार करून चिकू आदीला घेऊन बाहेर पडला.
विऱ्याचं  घर जवळच होतं. पायात स्लीपर अडकवल्या, आदीने त्याचे सॅन्डल घातले आणि दोघे निघाले. विऱ्याकडे दोघे गेले तेंव्हा त्याची अजून सकाळ व्हायची होती. त्याला त्याच्या आईनं उठवलं 'चिकू आलाय' म्हणून. त्यांना आलेलं पाहून विऱ्या थेट बाथरूमला पळाला. कसंतरी तोंड धुवून तो त्यांच्यासोबत चिकूची नवीन बॅट पाहू लागला. 
"जबरा बॅटाय रं. एकदम कोली सारखीच वाटतीय. ", विऱ्या बोलला. 
त्यांची तिथेच बॅटिंग सुरु झाली. त्यांना बघून शेजारीची अजून दोन पोरं आली होती. खेळात भांडणं वाढली तशी चिकूने आपली बॅट उचलली आणि तो निघायला लागला. 
विऱ्याने चिकूला विचारलं, "पतंग उडवायचा का?". 
         चिकूचे डोळे लकाकले. तिघांनी मिळून मग कागदाचे तुकडे करून घेतले. मांज्यासाठी दोरा आणला. आईकडनं भात  मागून घेतला वेताच्या काड्या चिकटवायला. पण काड्या तीन पतंगांना पुरेशा नव्हत्या. मग ते तिघे बोहरी आळीकडं निघाले. आळीकडं जायला चिकूला थोडी भीती वाटायची. नेहमीपेक्षा जरा जास्त लांबचा रस्ता होता तो. ओढ्याकडनं जायला लागायचं. आताशी कुठं तो भैरोबाच्या देवळापर्यंत जायला लागला होता. पण आदी सोबत होता, त्यामुळं जाणं भाग होतं. ओढ्याकडून जातांना पाण्यांत त्यांना बारीक मासळी दिसली. त्यानं मग आदीला ती बारीक मासळी दाखवली. एक दोन पकडूनही दाखवली. घोटाभर पाण्यात स्थिर उभं राहून, वाकून पाण्याकडे बघत बसायचं आणि मग पटकन झडप घालायची. हजार वेळा दाखवूनही आदीला काय ते जमेना. बराच वेळ त्यांचा पाण्यात खेळ चालला मग. पाण्यातून उड्या मारत तिघेही बोहरी आळीच्या बाजूला आले. तिथे विऱ्याचा मित्र राहायचा. त्याच्याकडनं दोन चार वेताच्या काड्या घेतल्या. त्यालाही चिक्याची नवीन बॅट खूप आवडली. त्याच्याबरोबर जरा वेळ खेळून पोरं परतीला लागली. तोवर दुपार होऊन गेलेली. 
         माघारी येताना परत ओढ्यात उतरायचा हट्ट आदीनं केला. त्याला ती मासळी पकडायचीच होती. कितीतरी वेळानं शेवटी त्याला एक मासळी मिळाली. पण तिच्या गिळगिळीत स्पर्शानं त्याला कसंतरी झालं आणि ती सटकून परत पाण्यात पडली. तो नाद सोडून वडाच्या सावलीत ओढ्यात तिघंही चालत राहिले एकसलग. वड संपून शेताचा बांध कधी सुरु झाला त्यांना कळलंच नाही. जसा बांध लागला तशी बाभळ आली. सुकलेल्या त्या बाभळीचा डिंक काढून दाखवायचा होता चिकूला. ते प्रत्येक झाडाला डिंक शोधू लागले. जसा डिंक मिळाला, चिकूला एकदम खजिना मिळाल्याचा आनंद झाला. त्यानं आदीला हाक मारून खायला दिला. दोन दातात तो डिंक अडकवून चिकट झाल्यावर चिकटलेले दात उघडायचा प्रयत्न करत तिघेही हसू लागले. हसत हसत माघारी फिरताना एक काटा आदीच्या सँडलमधून आत घुसला ते एकदम इंचभर. काटा इतका घुसल्यावर आदीने तिथेच रडायला सुरुवात केली. काटा चांगलाच आतवर गेलेला होता. 
         विऱ्याने त्याला खाली बसवला. चिकूने सँडलमधून काटा बाहेर ओढायचा प्रयत्न केला पण काटा एकदम जोरात घुसलेला होता. त्याच्या बारीक बोटांनी तो निघेना. त्याने हात लावला तसा आदी अजूनच रडायला लागला. बरं सॅन्डल काढायची तरी कशी? तिच्या आरपार जाऊन काटा पायात रुतलेला. सॅन्डल काढतानाही दुखल्याशिवाय नीट निघेना. त्याला रडताना पाहून बाकी दोघांना घाम फुटायला लागला. की ते दुपारचं कडक ऊन होतं काय माहित? शेवटी सॅन्डल ओढून काढायचं ठरलं. मागून त्याचा बेल्ट काढून दोन्ही पोरांनी मिळून ती सॅन्डल खेचली आणि आदी जे बोंबलला ! सॅन्डल निघताना काटा अर्धवट तुटला होता. त्यामुळं उभं राहिल्यावर आदीला चालता येईना. शेवटी दोघांनी त्याच्या खांद्याखाली हात घालून त्याला लंगडी घालत घरी न्यायचं ठरवलं. तीन पायांची शर्यत असते तशी त्यांची वरात घराकडे निघाली. त्यांच्या वेगाने घरी पोहोचायला चार वाजून गेले होते. पायातून काटा हलवल्यामुळं रक्त यायला लागलं होतं. 
        तिघे घरी पोहोचले तर वातावरण एक तंग होतं. पोरांना समोर बघून माईने रडायलाच सुरुवात केली. चिकूची सुजाता एकदम धावत आली, तिने तिच्या पोराला आधार देत घरात नेलं. आणि चिकूच्या पहिली कानाखाली बसली. तीही रडणाऱ्या आईच्या हातून. 
"कुटं फिरत होतास दिवसभर? सकाळपासनं काय खाल्लं पन नाही. ", आई रडतेय का हे चिकूला कळत नव्हतं. 
"तुला म्हनलेलो की विऱ्या कड जातो म्हनून.", चिकू हळू आवाजात बोलला. 
"तुला नको म्हनलेलं ना? एकदा सांगून कळत न्हाई का तुला?", असं म्हणत तिने अजून दोन चार धपाटे पोराला घातले. 
"तुजं पप्पा, पाव्हणं सगळी तुम्हाला शोदायला गेलीत, अजून आला न्हाई म्हनून.", माई सावरत बोलली. तिथलं वातावरण बघून विऱ्या हळूच पळून गेला होता. 
           तिकडे सुजातानं पोराच्या पायाकडे बघून रडायला सुरुवात केली होती. त्याचं रक्त पुसून काट्याच्या आजूबाजूची मातीही साफ केली होती. साडीपिन, बारीक चिमटा सगळं करूनही तो बारीक आत राहिलेला काटा निघत नव्हता. त्यात जरा हात लागला की आदीचं रडणं. दोन तास सगळ्यांनी प्रयत्न करून करूनही शेवटी तो बारीक आत राहिलेला काळा काट्याचा तुकडा निघत नव्हता. मग त्याला डॉक्टरकडे न्यायचं ठरलं. तोवर चिकूच्या पप्पाना, पाव्हण्यांना फोन करून घरी परत बोलावलं होतं. ते घरी आले आणि चिकूला अजून एक कानाखाली बसली. 
"तुला काय पण कळत न्हाई का? दिवसभर कुटं फिरवत बसलाय पोराला?", त्यांनी विचारलं. 
"जाऊ दे आता, तुमी आधी याचं बगा", असं माई बोलली. 
      चिकूला घरी ठेवून त्याचे पप्पा, पाव्हणे आणि आत्या डॉक्टरकडे गेले. चिकूची आई, माई कामाला लागल्या. सकाळपासून निघून गेलेली पोरं परत आल्यावर सगळ्यांच्या जिवात जीव आला होता. स्वयंपाक होईपर्यंत 
रडून आणि सगळ्यांना उत्तर देऊन चिकूचा जीव दमला होता. आदी परत येईपर्यंत एका कोपऱ्यात पडून चिकूची झोप लागून गेली होती. बाकीचे लोकही मग सगळं लवकर आटपून झोपून गेले. अख्खा दिवसच दमवणारा होता. 
         सकाळी चिकूला जाग आली तेव्हा सगळं बरंच ठीकठाक झालेलं होतं. चिकूला जोरदार भूक लागली होती. त्याने मुकाट्याने आवरून घेतलं. पण आई मात्र अजूनही रागवलेलीच दिसत होती. सकाळी लवकर जेवण करून पाहुणे परतीच्या प्रवासाला लागणार होते. आदी मुकाट्याने पाय धरून बसला होता. सगळे इतक्या लगेच परतणार म्हणून चिकू नाराज होताच पण आज त्याचं कुणी ऐकणार नव्हतं. गाडीची वेळ झाल्यावर, माईनं लेकीची ओटी भरून दिली, पोरांच्या हातात १००-१०० रुपये ठेवले. तिच्यासाठी आणलेलं सामान तिच्याबरोबर दिलं आणि रिक्षा त्यांना घेऊन निघालीही.
          पाहुणे निघून गेल्यावर सगळं जरा शांतच झालेलं. कितीतरी वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही. शेवटी वाट बघून माई जेवायला बसली. तिने चिकूला हाक मारली आणि शेजारी बसवलं. मग ती त्याला 'काल कुठं कुठं गेलेला' हे विचारत एकेक घास भरवू लागली. 

समाप्त.

विद्या भुतकर. 

Sunday, September 09, 2018

साय-साखर

       गेल्या कित्येक दिवसांपासून हे लिहायचं होतं पण वेळ मिळत नव्हता. यावेळी माझी दोनच आठवड्यांची सुट्टी झाली. पोरं, नवरा मस्त दीड महिना राहिले भारतात, हो मला सोडून. त्यामुळे भारतात पोहोचले आणि वाटलं, 'बास आता तुमचे लाड पुरे आता फक्त माझेच'. मग पहिल्याच दिवशी नवरा आणि बहिणीशी भांडले, रोज सकाळी दुधावरची साय आणि साखर मीच खाणार म्हणून. :) पुढचे कितीतरी दिवस बिचारे घाबरूनच  खात नव्हते. तर हे माझं नेहमीचंच. मग ती रात्री तापवलेल्या दुधावरची सकाळी आलेली घट्ट साय असो किंवा रात्रीची शिळी भाकरी असो. नशीब पोरांना अजून कळत नाही, नाहीतर म्हणणार आई काय इतक्याशा गोष्टींवरून भांडते. सायीवरून आठवलं, आमच्या मावशीचा हातचा चहा मला खूप आवडायचा. कॉलेजमध्ये असताना मावशीकडे गेलं की ती साय काढल्यानंतर खाली तुपकट दूध असायचं ते चहात घालून द्यायची. तर तसा तो चहा अजूनही आठवतो. 
      सायीवरून अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे इथे दुधावर काही अशी साय येत नाही. त्यामुळे दही, ताक, लोणी या सर्वांची सवय राहिली नव्हती. भारतात दोन वर्ष राहिले तेंव्हा सासूबाईच ती साय घेऊन जायच्या आणि ताक लोणी वगैरे काढायच्या. आता 'मला हे सर्व जमणारच नाही' असं कुणी गृहीत धरलं की मग झालंच. हट्टानं त्यांना सांगितलं की 'तुम्ही नका करू मीच करेन यापुढे'. पण ते सोपं नव्हतं. रोज आठवणीनं साय एकाच भांड्यात काढून ठेवायची. चार दिवसांनी त्याचं विरजण लावायचं. मग ते आंबट व्हायच्या आधी त्याचं लोणी काढायचं. काढलेलं ताक कढीला वापरायचं आणि लोणी वेळेत तापवून तूप कढवायचं. अगदी कढलेलं तूपही डब्यात भरून भांड्यातली बेरी खाऊन ते भांडं वेळेत धुवायला टाकायचं. ही सगळी शिस्त लागायला मला एक वर्ष गेलं असेल. :) पण हट्टानं ते केलं. असो. 
        यावेळी भारतात १५ दिवसांत जे काही करायचं होतं, ज्यांना भेटायचं होतं, जे काही खायचं होतं ते जवळ जवळ सर्व पूर्ण झालं. म्हणजे मावशी, मावसभाऊ-त्याचं कुटुंब, बहीण, तिचं कुटुंब सगळे आवर्जून भेटायला घरी येऊन गेले, तेही मला surprise. अगदी भाऊ, बहीण, आई-दादाही माझ्याकडेच राहिले. भर पावसांत पोरांना गाडीवरून घेऊन येणाऱ्या तर परगावाहून येणारी अशा मैत्रिणीही होत्या. घर पाहुण्यांनी, माणसांनी सतत भरलेलं होतं. मग त्यांच्याशी मी बोलत असताना कुणीतरी चहा पाण्याचं बघत होतं, कुणी पोरांना जेवायला भरवत होतं. मी आपली आपल्याच धुंदीत, या सर्वांना भेटल्याचा आनंदात. नुसते मित्र-मैत्रिणी, पाहुणे नाही तर दूरदुरून आलेल्या वाचकांशीही भेट झाली. ऑडिओ बुकच्या रेकॉर्डिंगची सुरुवातही करून झाली. त्या सर्वांच्या भेटीचा आनंद अजूनही आठवत राहते मी. 
        भेटीगाठी झाल्या ते ठीकच. पण खायचेही लाडच. बिल्डिंगमध्ये पोहोचले त्याच दिवशी श्रावणसरी म्हणून कार्यक्रम होता. तिथे भेटलेल्या प्रत्येकाने आवर्जून ,चौकशी केली. तिथेच मिसळ-पाव, वडा-पाव खाऊन झालं. भावाच्या मित्राने मिरजेहून खास माझा आवडता 'खाजा' दोन किलो पाठवून दिला. बहिणीनं केलेले गुलाबजाम, आईचे लाडू, मैत्रिणीने आणलेली भेळ, तिच्याकडे केलेलं पुरणपोळीचं जेवण, आग्रहाने खायला लावलेलं 'फायर-पान', मैत्रिणीकडे खाल्लेली पाणीपुरी, अगदी शेवटच्या दिवशी मिळालेली डॉलर जिलेबी आणि सासूबाई जावेने केलेली दाल-बट्टी. मी तिकडे पोहोचले त्याच दिवशी श्रावण  झाला. तरीही शेजारच्या दोघी काकूंनी मिळून माझ्यासाठी चिकन आणि कोंबडीवडे बनवले, स्वतः खात नसूनही. अगदी, 'अगं तुला कधी वेळ आहे?' असं आवर्जून विचारून माझी आवडती दाबेलीही खाऊ घातली. तर हे असं सगळं. लाड लाड म्हणतात ते हेच. नाही का?
       ज्या दिवशी आमचे दादा मला भेटायला कोरेगाववरुन आले तेंव्हा मी त्यांना मिठी मारली आणि पटकन बहिणीचा तीन वर्षांचा छोटा मुलगा त्यांच्या पायाशी लगडला. आणि 'माझे आबा' म्हणून मला मारू लागला. त्यांना आणि मलाही हसू आवरेना. मग दिवसभर तो 'आबा-आबा' करत त्यांच्या पुढे-मागे करत राहिला. दुपारी आम्ही बहिणी-आई खरेदीला  बाहेर पडत होतो तर दादा आणि भाचा एकमेकांच्या शेजारी गाढ झोपले होते. दादा नेहमीप्रमाणे लगेचच परत घरी जायचा हट्ट करू लागले तर भाच्याचं नाव सांगून त्यांना आम्ही थांबवून घेतलं. तेही राहिले. ते परत जायचं म्हणाले त्यादिवशीही भाच्याला कसं सांभाळायचं असा विचार करत होतो कारण त्यांनी पँट घातली तरी हा त्यांना जाऊन चिकटणार. त्या दोघांना एकत्र असं पाहून मला वाटलं 'साय-साखर' म्हणतात ती हीच, त्यांच्या प्रेमाची. नाही का? 
       हे सर्व करण्यात दोन आठवडे कधी संपले कळलंही नाही. तिथून निघताना मन जड असलं तरी, परत आल्यावरही इथे आवर्जून फोन करून चौकशी करणारे, घ्यायला येऊ का विचारणारे, 'कित्येक दिवस भेटलो नाहीये, जेयावलाच या' म्हणणारेही मित्र-मैत्रिणी होतेच की. हे सर्व पाहून मला वाटतं, आता आजोबा आणि नातवाचं प्रेम तर समजू शकते. पण या सगळ्या इतक्या लोकांचं प्रेम मिळण्यासाठी मी असं काय केलंय? त्या दोन आठवड्यात मिळालेलं सर्व घेऊन इकडे परत आलीय आणि अजूनही एक प्रश्न आहे मनात, माझ्या फॅट-फ्री, पाणचट दुधावर इतक्या लोकांच्या प्रेमाची साय कशी काय?

विद्या भुतकर.

Tuesday, September 04, 2018

Daemon process (डिमन प्रोसेस)

प्रिय तुला, 
     आमच्या कंप्युटर इंजिनीयरिंगमध्ये दोन प्रकारची देवाण घेवाण चालते बघ. म्हणजे दोन प्रकारच्या processes असतात communication साठी, संवादासाठी. एक synchronous आणि दुसरी asynchronous. पहिल्या पद्धतीत दोन लोकांमध्ये संवाद हवा असेल तर, एक जण सांगतो, ते दुसऱ्याला लगेच ऐकू येतं. आणि तो दुसराही उत्तर देऊन लगेच confirmation देऊन टाकतो, पहिल्याचा मेसेज मिळाल्याचं. तर ही synchronous process म्हटलं की दोन लोकांचा सततचा सहभाग आलाच. 
     आता ही दुसरी asynchronous process म्हणजे काय? तर यात दोघे एकमेकांसमोर नाहीत एकावेळी. मग पहिला एका पत्त्यावर मेसेज करून ठेवणार. दुसरा जेव्हा केव्हा त्या पत्त्यावर येईल तेंव्हा त्याला तो मेसेज मिळेल. आता मेसेज मिळाल्यावर दुसराही त्याचं उत्तर पहिल्याच्या पत्त्यावर पाठवू शकतो. एकूण काय तर टपालासारखं एकमेकांच्या अनुपस्थितीत केलेला संवाद. पण दुसऱ्यानं मेसेज मिळाल्याचं कळवलंच  नाही तर? तुटला ना संवाद? 
      आता हे वरचे दोन्ही प्रकार झाले दोन व्यक्तींनी सहभाग घेण्याचे. तर networking मध्ये ना अजून एक process असते, तिचं नाव daemon process, डिमन प्रोसेस. या प्रोसेसचं काम काय? तर एका दिलेल्या पत्त्यावर दर ठराविक वेळानं तपासत राहायचं काही निरोप आहे का? तो पत्ता म्हणजे 'port'. ती process आपली दर थोड्या वेळाने चेक करत राहते त्या port वर. मग जे काही येईल त्या port वर ते पुढं पाठवायचं किंवा समजून घ्यायचं. 
      कंटाळलास? मी तुला का सांगतेय हे सर्व? बरोबर ना? कोण कुठली daemon process? का सांगतेय माहितेय? मी ती daemon process आहे. दर क्षणाला तुझा काही निरोप येतो का पाहणारी, तुला माझी आठवण येते का तपासणारी. आधी आपला संवाद synchronous होता, समोरासमोर बोलणारा, उत्तर देणारा. मग तो asynchronous झाला, ज्यात आपण एकाच वेळेला एका भावनिक पातळीवर कधीच नव्हतो. फक्त निरोप ठेवून जायचो एकमेकांसाठी, कधीतरी वाचण्यासाठी. 
      आता फक्त एकेरी संवाद (?) उरलाय. तू कधीतरी बोलशील आणि मी त्या daemon process सारखं लगेच ऐकून घेईन, process करेन, समजून घेईन याची वाट पाहतेय. भीती कशाची आहे माहितेय का? ती daemon process बंद पडली, तो listening port बिघडला आणि तुझ्याकडून निरोप आला तर? 

तुझीच, 
Daemon process
०४/०९/२०१८