Sunday, February 28, 2016

शिळीपंचमी

            आज सकाळी चहासोबत कालचं उरलेलं थालीपीठ खाल्लं. ते उरलं नव्हतं, तर नवऱ्याला सांगून ठेवलं होतं की 'माझ्या वाटणीचं थालीपीठ संपवू नकोस'. त्याला माझी धमकी माहित असल्याने त्यानेही ते शिल्लक ठेवलं. :) काय भारी लागतं शिळ थालिपीठ आणि चहा? अहाहा ! आणि हो ते थालीपीठ तरी कसं बनवलं होतं? परवाची भरल्या वांग्याची थोडी भाजी शिल्लक होती. ती भाजी नुसती खाऊन पुरणार नव्हती. मग थोडा मसाला, कांदा, तीळ, कोथिंबीर हे सर्व भाजणीच्या पिठात घातलं. त्यात थोडी कणिक, डाळीचं पीठ आणि हळद आणि मीठ. तर असं हे सर्व मिश्रण घालून थालीपीठ बनवलं होतं आणि दह्यासोबत खाल्लं होतं. 
             कुणी म्हणेल ही बाई ताजं काही खाते कि नाही? खाते ना आणि खूप काही बनवतेही. पण काही काही गोष्टी शिळ्याच चांगल्या लागतात. आणि कितीतरी वेळा मी आईकडे, भावा-बहिणीशी भांडले आहे. कारण कुठलीही एखाद्या सुगरण बाईने बनवलेली डिश या शिळ्या पदार्थांशी तुलना करू शकत नाही. म्हटलं चला एक यादीच बनवावी. :) ही यादी बनवताना पण तोंडाला पाणी सुटत आहे. 

१. शिळी भाकरी. शिळ्या भाकरी सारखं सुख नाही. ती मग तुम्ही ठेचासोबत खाऊ शकता. माझी आवडती म्हणजे भाकरीसोबत दही आणि काळा मसाला, किंवा तेल-तिखट. कुठलीही ताजी भाजी या जोडीला मात करू शकत नाही. 
२. शिळा भात. शिळ्या भाताला फक्त कांदा, मिरची घालून फोडणी द्यायची. हळद, मीठ आणि कोथिंबीर, बास्स.. :) सकाळी कितीतरी वेळा आईच्या हातचा शिळा फोडणीचा भात खाल्ला आहे. 
३. शिळी मसाल्याची भाजी. वांगी, दोडका अश्या भाज्या आई मसाला आणि कूट घालून करते. तर या भाज्या थोड्या राहिल्या की त्या थोड्या गरम करून भाकरी किंवा भाजणीच्या पिठात घालायच्या आणि त्यात थोडी तिखट, कांदा, कोथिंबीर ची भर घातली की पुरे. गरम गरम भाकरी किंवा थालीपीठ थापायचे आणि दही किंवा लोण्यासोबत खायचे. :)
४.  शिळी पुरणाची पोळी आणि कटाची आमटी. त्या पोळीचं कौतुक सणासोबत संपून जातं. मग संध्याकाळी ती पोळी खायला नको वाटतं. पण तीच पुरणाची शिळी पोळी तव्यात गरम करून गरम गरम कटाच्या आमटी सोबत खायचो आम्ही. तोंडाला पाणी सुटत आहे कटाची आमटी आठवून. 
५. शिळी थालीपीठ. नवरात्री मध्ये आई तळलेली थालिपीठ करते. दुसऱ्या दिवशी ते तळलेले थालिपीठ आणि दही-ठेचा मिक्स करून खायचे. 
६. शिळी बाजरीची भाकरी आणि शेंगसोला. संक्रांतीच्या आधी भोगीच्या दिवशी आई बाजरीची भाकरी आणि शेंगसोला बनवते. संक्रांतीच्या दिवशी मग ते खाता येत नाही म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ती तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि शिळा शेंगसोला खायचा. तुकडे पडणारी कडक भाकरी मस्त लागते. 
 ७. शिळी चपाती. शिळ्या चपातीला भाकरीची तोड नाही. पण तरी फोडणी टाकलेली चपाती आणि दही हे सुद्धा मस्त लागते. पण वरच्या पदार्थांइतकी यात मजा नाही. वाया जाऊ नये म्हणून केलेली  तडजोड आहे ती. 
८. शिळी चपाती आणि शिल्लक राहिलेले चिकन. चिकन दुसऱ्या दिवशीच चांगले लागते बहुतेक. शिळी चपाती आणि मुरलेले तिखट चिकन खाऊन रविवारी दुपारी एक डुलकी काढायची. :) 

कधी विचार करते मुलांनाही या सर्वांची मजा येईल का? त्यांनाही यासर्व गोष्ठींशी ओळख करून दिली पाहिजे. नाहीतर ते मोठ्या आनंदाला मुकणार आहेत. माझ्याकडून बरेच वेळा जेवण शिल्लक राहते आणि मग संदीपच्या आईना माझ्या शिल्लक राहिलेले पदार्थ संपवेपर्यंत पुरे होते. एकदा त्यांनी वापरलेला एक शब्द मला खूप आवडला होता. 'संपली बाई एकदाची शिळीपंचमी'. छान आहे न शब्द 'शिळीपंचमी'? मला तर वाटते असे शिळे पदार्थ असतील तर 'शिळीपंचमी' हाही एक सणच म्हणायला हवा. नाही का? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, February 25, 2016

नसतं रडायचं मला


मला ना रडायचं नव्हतं, 
तू जन्मलास तेव्हा,
तुला पहिल्यांदा पाहिल्यावर. 
पण ऊर भरून आला आणि डोळेही. 

नसतं रडायचं मला,
तू सोडून जातानाही,
मागे वळून न बघता. 
पण आठवणी भरून आल्या आणि डोळेही. 

नसतं रडायचं मला,
प्रेमाच्या त्या पाशात असताना,
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून. 
पण प्रेम उचंबळून येतं आणि डोळेही.

नसतं रडायचं मला,
जेव्हा मी भांडत असते,
तुझ्याशी, माझ्या हक्कासाठी. 
पण राग अनावर होतो आणि डोळेही.

कधीच नसतं मला दाखवायचं,
दर्पण माझ्या भावनांचं,
लक्षण वाटतं ते असहायतेचं. 
फक्त सिद्ध करायला स्वत:ला मग,
मन कणखर करावं लागतं आणि डोळेही.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Wednesday, February 24, 2016

जाहीर नोटीस

        "जाहीर नोटीस" असं वाचलं की वळतेच मान, नाही का? पण सगळेच वाचतात असं नाही. मला वाटतं जगात तीन प्रकारचे लोक असतात. एक, अशा बोर्डावर लावलेल्या नोटीसा नियमितपणे वाचणारे. दोन, अजिबात न वाचता, 'हे आपल्यासाठी नाहीच' म्हणून निघून जाणारे. आणि तिसरे, जे फक्त बाकी लोकांनी 'मेजर काहीतरी बोर्डवर आहे' असं सांगितल्यामुळे पाहणारे. मला वाटतं मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारात मोडते. 
       आज ऑफिसच्या नोटीस बोर्डावर एका कोपऱ्यात ४ वेगवेगळे कानातले लटकलेले दिसले. हो, म्हणजे 'आपण यांना पाहिलंत का नंतर हेच पाहिलं असेल मी? नोटीस बोर्डावर एकएकटे ते कानातले एकेका टाचणीला टोचून ठेवलेले होते. खरं सांगू का ते कानातले सोडले तर त्या बोर्डकडे मी कधीही पाहिलं नसेल. तोच काय गेल्या कित्येक महिन्यात मी कुठलाच बोर्ड पाहिल्याचं आठवत नाहीये. आम्ही कॉलेजमध्ये असताना डिपार्टमेन्टच्या बाहेर दर थोड्या दिवसांनी नोटीस लागायची काही ना काही. आणि मी कधीच लक्ष द्यायचे नाही त्याकडे का काय माहीत. केवळ चांगल्या मैत्रिणीमुळे मी वाचले आहे, ज्या नियमितपणे सर्व चेक करून मला पण सांगत असायच्या. नाहीतर एखाद्या तोंडी परीक्षेला मी नक्की कुठेतरी बाहेर फिरताना दिसले असते आणि सबमिशन नक्की बुडाले असते. 
        तर मला काय वाटतं हे असे नोटीस बोर्ड वाचण्यासाठी एक नैसर्गिक चौकस बुद्धी लागते. म्हणजे तिथे "आपल्यासाठी काही आहे का आणि समजा माझ्यासाठी नसेल, बाकी कुणासाठी काही लिहिले आहे का? हे पहायची मनातून इच्छा झाली पाहिजे ना? " या अशा नसलेल्या चौकस बुद्धीमुळे मी बऱ्याच गॉसिपला मी नक्कीच मुकले आहे. आणि हो बाकी पण तोटे झाले आहेत. पुण्यात असताना, 'आज पाणी १२ वाजता बंद होणार आहे' किंवा 'दिवसभर लाईट नसतील' अशा महत्वाच्या नोटीसाना पण मुकले आहे. आणि जेवण बनवताना मिक्सर वापरता आला नाहीये. गणपतीच्या वेळी वेळेत मुलांचे नाव दिल्यामुळे करमकर काकूंचे ऐकूनही घेतले आहे. तर या आणि अशा बऱ्याच गोष्टी. 
         काही असतात पण अगदी वेळेत, नियमितपणे वाचणारे. खरंच वाचायला लागलं पाहिजे नोटीस बोर्ड आता प्रत्येकवेळी. निदान आजूबाजूला काय चालू आहे किंवा होणार आहे याची माहिती तरी राहील. 
असो, तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता या नोटीस बोर्डाच्या?

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, February 23, 2016

अपेक्षा

अपेक्षांचं काय रे?
त्या असतातंच प्रत्येकाच्या प्रत्येकाकडून.
बरं झालं वय वाढलं
आता जरा कळायला लागलंय.
बाजूचं वलय कमी होतंय,
अपेक्षांचं ओझं हलकं होतंय.
पण तुझ्याकडून असलेल्या अपेक्षांचं काय?
त्या असतातंच अजूनही.
अगदी तू पुन्हा भेटण्याचीही.
पहिल्यांदा भेटला होतास न?
अनपेक्षित?  तशीही !!
त्या बहुतेक आता माझ्यासोबतच जातील.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Sunday, February 21, 2016

No Regrets !!

             या वर्षी मी एक संकल्प केला.  म्हणजे तसे सर्वच करतात आणि मोडतातही. असो. तर संकल्प असा की प्रत्येक वेळी मुलं जेव्हा मला म्हणतील ना,'आई हे बघ.' तेंव्हा मी बघेनच. आणि पुढे मी म्हणाले,' I dont want any regrets'. माझा म्हणण्याचा हेतू असा की मुलं लहान आहेत तोवरच आई-बाबा म्हणून मागे लागतील, हौसेन दाखवतील तर आपण पहिले पाहिजे. उद्या ते दाखवायचे बंद झाले तर तेव्हा मला पश्चाताप नकोय. आज काल फेसबुक, Whats app वर पण असे बरेच पोस्ट येतात, कसं आपण आलेला क्षण पूर्णपणे जगला पाहिजे, हवं ते केलं पाहिजे, तसंच मुलानाही वेळ दिला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, इ इ.त्यांच्याबद्दल पुढे बोलूच.
            परवा काय झालं आम्ही स्नो-स्कीईंग ला जायचं ठरवलं. ठरवलं कसलं मित्र म्हणाला जाऊ म्हणून हो म्हणालो. अमेरिकेत इतके वर्ष राहून हेच एक होतं जे करण्याचं धाडस मी अजून केलं नव्हतं. दोन पोरांना घेऊन कुठे जायचं म्हणालं की टेन्शनच असतं मला. कुठे पडलं, लागलं, सर्दीच झाली, खोकलाच झाला. पण म्हणलं जाऊन बघू. अगदी वेळेत आवरून, सर्वांना ३-४ कपड्यांच्या आत कोंबून निघालो. अगदी वेळेत पोचलोही. पण तिथे ते वेगळे शूज, स्कीज, मास्क, हे सर्व ४ लोकांचं लावेपर्यंत १२ वाजले होते. म्हणजे परत पोरांना खायला द्यायची वेळ आली होती. बरं आता इतके कपडे अंगावर होते की स्वत:चं पोरं सापडलं तरी नशीब. त्यांना हाताला येईल ते फळ खायला दिलं आणि स्नोवर आलो. एकदम थंडीने वाट लागली होती. (संजय लीला भन्साळीने बाजीराव पेशव्याच्या तोंडात 'वाट लावली' हा शब्दप्रयोग दिल्यापासून मीही बिनधास्त वापरत आहे तो. असो. )
              मित्राने सांगितलं या छोट्या शिकाऊ टेकडीवर जाऊ आधी. मग सरकत्या जिन्यावरून आम्ही त्या टेकडीच्या वरच्या टोकाला गेलो. तिथून आमच्या मित्राने मुलांना एकेकाला नेतो असे सांगून त्यांची जबाबदारी घेतली. मला आणि संदीपला बेसिक माहिती देऊन सुरु करायला सांगितले. संदीप पुढे निघाला पण माझी काही जागेवरून हलायची हिम्मत होत नव्हती. जवळ जवळ अर्धा तास मी त्या टेकडीवर दोन्ही हातात त्या काड्या(काय म्हणतात त्यांना विसरले) घेऊन उभी होते. मनात अनेक विचार येत होते. ते स्की घेऊन सरकले आणि थांबता आले नाही तर? आणि थांबायला स्की वाकडे करायला लागतात म्हणजे स्पीड कमी होऊन थांबता येते. सर्व बोलायला ठीक आहे हो ! तिथे आल्यावर कळलं असतं. बरं मला मोठी भीती कशाची तर पाय वाकडे करून थांबताना गुडघे वाकले तर? नडगीला, घोट्याला कुठे लागले, हाडच मोडले तर? आणि हो, मी इतकी पण भित्री नाहीये तरी मला हे सर्व विचार येऊन पुढे जात नव्हते. सर्वात मोठी भीती मला, 'पायाला काही झाले आणि पळता आले नाही तर?" याची होती. या वर्षीच्या १०किमी, हाफ मेरेथोन मध्ये मला पळायचं आहे. ते मी सोडू शकत नव्हते. असो.
              शेवटी नाईलाजाने मी पुढे सरकले आणि सर्ररर्र्र…… सरकायला लागल्यावर काय सुचेना. थांबायला म्हणून गुडघे वाकवले तर घसरून पडून गेले. पाय वाकडे ठेवता येईना म्हणून कसेतरी दोन्ही गुडघे एका बाजूला केले. पण तरी दुखतच होते. शेवटी कुणीतरी मला ते स्की काढायला मदत केली. ते निघाल्यावर मी ५ मिनिट तशीच बसून राहिले. बाकी आजूबाजूला जाणारे लोक अंगावर पडतील याची भीती होतीच. मग शेवटी घसरगुंडीवर कसे सरकतात न, तसे घसरत घसरत कशीतरी खाली पोचले. मधेच वाटत होते की हिम्मत करावी का? पण मधेच वाटलं का पण? काय गरज आहे. गप घरी बसायचं न टीव्ही बघत. काय पाप लागणार आहे का? त्यामुळे मला स्वत:ला उचलून हिरोगिरी करण्यात काहीही जोर नव्हता.
             वाटलं पोरांना तरी शिकवावं म्हणून मी आणि संदीपने त्यांना थोड्या अंतरावर घेऊन जायचं आणि त्याने वरून सोडलं की मी खाली पकडायचं असं थोडावेळ केलं. मस्त केलं हो पोरानी. म्हणजे माझ्यापेक्षा चांगलंच. अगदी पडले तरी निवांत पडत होते स्नो वर. त्यांना बघून मी थोडी सावरले. म्हणलं बरं झालं त्यांना तरी मजा तेव्हढीच. २.३०-३ वाजता खाण्यासाठी ब्रेक घेतला आम्ही. खाल्ल्यावर मी म्हणाले मी पण प्रयत्न करते रे. स्वनिक कंटाळला होता. म्हटलं चल यांचा शेवटचा राउंड घेऊ आधी. त्याला संदीपने सोडला आणि तो घसरत खाली येउन जोरात पडला आणि रडू लागला. तो काही उठेना. म्हटलं झालं आता कुठे हाड-बीड मोडलं असेल तर काय? आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार आला, 'कशाला आलो?' (आधी दोन्ही पोरांना इमर्जन्सी मध्ये नेऊन, त्यांना प्लास्टर लाऊन आणलेले अनुभव गाठीशी असल्याने अजून एकदा जायची इच्छा नव्हती. ) नशिबाने तसं काही नव्हतं. थोडा रडून स्वनिक ठीक झाला. मला जरा हुश्श झालं.
            सर्वांना धडधाकट घरी घेऊन येताना, गाडीच्या उबेत बसून मी विचार करत होते,'खरंच मला काय झालंय? एकदम एव्हढी भित्री का झाली आहे ? आधी असे बाकी प्रयोग मी केले आहेत आणि घाबरले आहे पण इतकी नाही. अजून एकदा जाऊ आपण नीट शिकू, पोरानाही शिकवू.' पण हे स्वत:ला सांगताना दुसरीकडे माझ्या मनात विचार येत होता, 'का? कशासाठी?'
हे सगळे पोस्ट असतात ना, ' आयुष्य आजच जगलं पाहिजे, I dont want any regrets, जे हवंय ते मनसोक्त करा' वगेरे, ते सर्व खोटे आहेत.  पुढचा विचार न करता प्रत्येक गोष्ट करता येत नाही, आणि समजा नाही केली एखादी गोष्ट आणि करावा लागला पश्चाताप, तरी असू दे. सगळंच जमतं असं नाही. शेवटी, 'अरे हे करायला हवं होतं' असं वाटण्यासाठीही काहीतरी हवं ना?
त्यामुळे ज्यांनी कोणी ते सेंटी पोस्ट लिहिले आहे ना, गेले मेले सगळे ते खड्ड्यात. लई त्रास दिला आहे त्यांनी. त्यांना एकतर स्कीईंग येत असेल, किंवा पुढच्या रंनिन्ग्चे विचार ते करत नसतील किंवा ते लोक अजून आई झाले नसतील. नक्कीच हे लोकं आई झाले नसतील.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Friday, February 19, 2016

एक मैत्रीण

परवा आमचा फोन झाला खूप दिवसांनी
आणि बराच वेळ बोललोही.
बोललो म्हणजे तरी काय?
नुसतं गॉसिप, अगदी बॉलिवूडबद्दलही.

इतके की हसलो की
डोळे भरले थोडे हसतानाही.
तक्रारी होत्याच जरा
घरच्या, थोड्या बाहेरच्याही.

तिनं बिस्कीट दिलं मुलीला
चार क्षण सुखाने बोलण्यासाठी
आणि मीही बाथरूम शोधलं
निवांतपणे ऐकण्यासाठी.

आम्ही मग आमच्याच झालो फक्त
दोघी आणि दुसऱ्या बाजूला जग.
बोलता बोलता कळत नव्हतं
कोण कुणाला समजावत होतं.

वाटलं, असायला हवं होतं तिथे
हात हातात धरायला.
'असू दे गं, होतं सर्व ठीक.'
असं एकमेकींना समजावायला.

बोलून सर्व प्रश्न सुटत नाहीत
तरी फोन ठेवल्यावर हलकं वाटतं,
मनावरचं मणभर ओझं कमी होतं
सगळं कसं सोपं वाटतं.

एखादी असते हसवणारी,
एखादी फक्त शॉपिंगला येणारी,
पण एखादीच असते 
प्रत्येक महत्वाच्या क्षणी आठवणारी.

कितीही दूर असलं  तरी
अंतर कमीच पडतं अशी मैत्री थांबवायला
प्रत्येकाला असावी अशी एक मैत्रीण
'फोन झाला' की हलकं हलकं वाटायला.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, February 18, 2016

हाडाचा विद्यार्थी

           आमचे आबा म्हणजे आजोबा शिक्षक होते, अगदी हाडाचे शिक्षक. कोरेगावमध्ये ते इंग्रजी आणि संस्कृत शिकवायचे. त्यांचे कितीतरी विद्यार्थी कदाचित अजूनही त्यांची आठवण काढत असतील. मी तरी काढते. मला समजायला लागले तसे मी त्यांना शिकवण्या घेताना पाहिले. कधी मुलांना रागवायचे, कधी छडी द्यायचे तर कधी शाबासाकीपण. मी कधी शंका विचारली की म्हणणार, 'वर चढ, ती डिक्शनरी काढ'. मला कंटाळा यायचा. कशाला ना डिक्शनरी? सरळ त्या शब्दाचा अर्थ सांगा म्हणजे झाले. तसे कसे. मग ते मला तो शब्द शोधायला लावत. तिथे पोचले की त्या शब्दाचा मूळ शब्द कोणता होता, त्याचा अर्थ काय आणि त्याचे बाकीचे अर्थ आणि उपयोगही सांगत. खरंतर मला कधी कधी कंटाळा यायचा या गोष्टीचा पण या जगात बाहेर पडल्यावर कळलं कि मला त्यांनी काय दिलं होतं. मला त्यांनी शिकायला शिकवलं होतं.
           त्यांची आठवण काढायचं कारण म्हणजे त्यांना स्वत:ला शिकायची खूप ओढ होती. रोजच्या पेपरमध्ये एखादा शब्द अडला तर स्वत: शोधून काढत की त्याचा अर्थ काय आहे. मला गम्मत म्हणून संस्कृत सुभाषितांचे अर्थ सांगत. एकदा नववीच्या इंग्रजीचा अभ्यासक्रम बदलला होता. तर बाजारातून ते पुस्तक आणून रात्रभर वाचत बसले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांना शिकण्याची किती ती ओढ. गेल्या कित्येक दिवसात मी नवीन काही वाचले नाहीये. शिकले नाहीये. मध्ये पळणं सुरु झालं तेव्हा तो नाद होता, कधी वेगवेगळे जेवण शिकण्याची हौस असते. पण एखादी भाषा शिकावी, माझ्या क्षेत्रातले काही नवीन वाचावे शिकावे हे करून खूप दिवस झालेत. अर्थात नोकरी बदलल्यावर जे काही शिकणे अपरिहार्य होते ते केले पण स्वत:हून काही करणे आणि गरज म्हणून यात फरक आहेच.
              पण  एखाद्या गणितासाठी डोकं खाल्याला, एखादी गोष्ट मला का येत नाही म्हणून रात्रभर जागल्याला खूप वर्षं झालीत. मला वाटतं मी अल्पसंतुष्ट झालेय. सध्या चालू आहे ना, मग कशाला शिकायचे? चालू आहे न काम, मग काय गरज आहे उगाच कष्ट घ्यायची? काहीतरी शिकायला हवं. एखादी नवीन गोष्ट दिसली की उत्सुकता चाळवली पाहिजे, 'अरे हे कसे केले असेल?' असा प्रश्न पडला पाहिजे. मी विचार करतेय मी किती वर्षांची होईपर्यंत माझ्यामध्ये थोडी तरी नवीन काही शिकायची इच्छा, कुतूहल राहील? मी ७५ वर्षांची असतानाही नवीन काहीतरी शिकण्यासाठी झटेन का? ज्या दिवशी नवीन काही शिकायची इच्छा संपली त्यादिवशी पुढे काय असा प्रश्न पडेल तेव्हा काय? ७५ चे माहित नाही पण लवकरच काहीतरी शिकायलाच हवं. हाडाचा विद्यार्थी व्हायला हवं. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, February 16, 2016

Are you connected?

        आज ट्रेन मध्ये बसून लिहिलं . बराच वेळ मिळतो विचार करायला आणि  लोकांकडे पाहायला पण. इथे आल्यापासून रोजचा  ट्रेनचा प्रवास असतोच. आम्ही इथे आलो तेंव्हा पहिले साधारण एक दोन आठवडे आमच्याकडे फोन नव्हते.आजकालच्या दिवसात दोन आठवडे फोन नाही? संदिपचा ऑफिसचा नंबर मिळाला आणि मी घरी असे तेव्हा ठीक होतं . पण एकदा मलाही एका इंटरव्ह्यू ला जायचं होतं त्याच्या ऑफिसजवळ. माझे काम झाले आणि त्याला फोन करून मी सांगितले की स्टेशनवर भेटू. आता आम्ही दोघेही निघालेलो होतो आणि स्टेशन नवीन असल्याने कुठे भेटायचे हेही नक्की नव्हते. मी पोचले आणि मला अस्वस्थ वाटू लागलं कारण भेटायचं कसं हे कळत नव्हतं. मी स्टेशनच्या आत-बाहेर दोन फेऱ्या मारल्या आणि बाहेर थांबायचं ठरवलं. मी बाहेर आले आणि समोरच तो दिसला. खरंतर आम्ही काही या देशात नविन नाही त्यामुळे घरी वेगवेगळे गेलो तरी नीट पोचलो असतो पण त्यादिवशी आनंद झाला.  काहीही संवाद नसताना बरोबर भेटण्याचा आनंद बऱ्याच वर्षांनी  मिळाला. आमची चुकामूक होण्याच्या कितीतरी शक्यता होत्या पण तरीही भेटलो, मस्त वाटलं. 
            तर आजचा प्रश्न असा की 'Are you connected when you are not connected?'. आजकाल फोन असल्याने माणूस अगदी समोर  उभा राहीपर्यंत आपण विचारतो 'कुठे आहेस?'. मग हात उंचावतो, खूण सांगतो. पण त्यात मजा नाही जी  एका जागी उभं राहून अस्वस्थपणे वाट पाहून, शोधून भेटण्यात आहे. आम्ही कॉलेजमध्ये म्हणजे ११-१२ मध्ये असताना, गावाच्या दोन टोकाकडून ७ जणी यायचो. सकाळी कितीही घाईत निघाले तरी आठवड्यातून बरेच वेळा आम्ही  भेटलेले असायचो आणि मग गप्पा मारत पुढचा रस्ता संपायचा. आता Whats app वर दर सेकंदाला अपडेट असतो तरी वेळेत भेटत नाही. ;)
            होतं काय की यात आपल्या माणसाच्या सवयी, वेळा सगळं लक्षात ठेवतो आपण. त्यावेळेस वाट पाहतो, अस्वस्थ होतो. विमानातून बाहेर पडल्यावर, फोन नसताना, केवळ तो पलीकडे आला असेल अशी अपेक्षा करत ती आणि या बाजूला तो, 'ती कुठल्या दारातून बाहेर पडेल आणि केंव्हा' या काळजीत. किती प्रेम असतं त्या भेटण्यात? केवळ चुकामुक होऊ नये म्हणून जागा न सोडता उभं राहणं आणि सावलीत उभे राहून, 'पोचलास की फोन  कर' म्हणणं यात किती फरक आहे? अर्थात माझं म्हणणं नाही की कुणी उन्हात उभं रहावंच. पण समजा तिचा स्वभाव ओळखून, 'ती नक्कीच उन्हात उभी राहणार नाही' असा विचार करण्यातही मजा आहे की नाही? 
           नियमित फोन असल्याने कितीतरी गोष्टींचा आनंदाला आपण मुकतो असे वाटते. परवा मी नसताना संदीपने भाज्या आणल्या आणि त्यात मी न सांगितलेल्या भाज्याही होत्या ज्या त्याने आठवणीने आणल्या आणि बरोबर मी विचारलं,'लाल भोपळा आणलास का रे?'. त्याने आणला होता. छोटीशी गोष्टं पण छान वाटतं  ना असं झाल्यावर? गाडीत बसून बाहेर पडताना काहीतरी राहिलं म्हणून त्यानं आत जाऊन येताना, मी विचार करावा की दुध आत ठेवलं असेल का मी? आणि त्यानं ते ठेवून यावं.  म्हणजे काय तर मी तुला आणि तू मला ओळखावं. :) होतं का असं आजकाल तुमचं?
              आज फोन न घेता बायकोला शोघायला लागलं तर असेल का माहित कसं आणि कुठे पाहायचं ते? समजा वेळ आली तर सांगता येईल का मुलगा कुठे आहे न फोन करता? घरी जाताना वाटतं का दोघानाही आज तिच्यासाठी/त्याच्यासाठी काहीतरी न्यावं त्यांनी बरेच दिवसांपासून मागितलेलं? भेटेल का तो आज पार्किंगमध्ये न ठरवताही त्याच जागी न चुकता? किंवा कॅन्टीन मध्ये एकाच वेळेला? 'Are you connected when you are not connected?'

विद्या भुतकर.
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, February 15, 2016

मला तो सगळीकडे दिसतो

अजूनही मला तो सगळीकडे दिसतो
बोलतो एक आणि वेगळेच करतो.
घर दोघांचं असलं तरी दाराच्या पाटीवर
पहिला त्याचाच मान असतो. 

बायकोच्या मैत्रीणी आल्यावर
आत जाऊन बसतो
त्याचे आल्यावर मात्र
चहाची अपेक्षा करतो.

शाळेच्या रांगेत उभे राहून
अडमिशनला धडपडतो
पोर आजारी पडल्यावर
बायकोलाच  रजा घ्यायला सांगतो.

भाज्या, सामान  आणून देतो
घर लावतो आणि केरही काढतो. 
घराचे हफ्ते आठवणीने भरतो. 
भांडी घासायला मात्र अजूनही कचरतो.

सासू-सासऱ्याशी बोलायचे टाळतो
'अहो जावो' केल्यास ऐकून घेतो
 आईबाबांच्या आदराचा हट्ट करतो
गोतावळाही तिलाच सांभाळावा लागतो.

स्त्रीने कितीही बरोबरीने शिकले
आणि सारखेच झटले तरी
त्याच्या मनात एक पुरुष असतो
अजूनही मला तो सगळीकडे दिसतो. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, February 14, 2016

तुझ्या आठवणी

 तुझ्या आठवणींना मी रोज टाळते
अनोळखी रस्त्यावरून घराचा मार्ग काढते.

तुझ्या आठवणींना मी रोज उजाळते
एखादी विसरू नये म्हणून मोजते.

तुझ्या आठवणींचा मी रोज निरोप घेते
उद्या परत न यायची वाट बघते.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

हौसेला वय थोडीच असतं?

लेकी बोले सुने लागे तसं, बाकी सर्वांसाठी लिहिताना तुझ्यासाठी पण :)
            हौसेला वय थोडीच असतं?

नुसतं प्रेम असून चालत नाही,
थोडं दाखवायलाही लागतं. 
किती मनाला सांगितलं तरी,
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

माहितेय असतो सगळा फार्स,
खऱ्या प्रेमापेक्षा रोमिओंचा त्रास,
चारपट दर असला तरी हवं असतं. 
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

एक असो की वर्षं साठ,
 कितीही वय झालं तरी,
वाढदिवसाला एक 'गिफ्ट' हवं असतं. 
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

लोकांच्या लग्नाच्या अजूनही नटून,
 नवऱ्याला दाखवायचं असतं.  
'नाव घेताना' अजूनही लाजायचं असतं. 
 १४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

मुलं मोठी झाल्यावरही, 
बायकोला मिठीत घेताना,
आजूबाजूला बघायचं असतं.
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं.

सरलं सारं कौतुक आणि
आलं नातवंड तरीही,
हौसेला वय थोडीच असतं?
१४ फेब्रुवारीला एक फूल हवं असतं. 

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Friday, February 12, 2016

बरं' का? छान चाललंय म्हणा ना..

                          बरं' का? छान चाललंय म्हणा ना..

विचारलंच कुणी 'कसा आहेस?'
तर म्हणे,"माझं तसं बरं चाललंय.
बायका-पोरं ठीक,
परवाच प्रमोशन पण झालंय.
पण तरीही एक पोकळी असते
कातरवेळ हळवी असते…"

अहो पण कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना.
ओढून आणलेलं दु:खं कशाला?
तुम्ही नसताना करते न काळजी बायको,
घरी आल्यावर बिलगते न मुलगी?
सुखी संसाराला काजळी कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना.

पोट तर  भरावंच  लागतं
त्यासाठी काम पडल्यावर रडा कशाला?
'मी खूप खूष आहे' असं म्हणा ना?
पहा बरं म्हणून, 'मी खूष आहे.'
कसं वाटलं ? छान?
मग थोडं हसा ना?
हसायचं तर जपून कशाला?

मनाला कसं मोकळं करावं
उडेल तिथे उडू द्यावं
वाटलं कुणाला 'खूष दिसतोयंस'
तर त्यालाही थोडं जळू द्यावं
दिसलाच कुणी दु:खी तर त्यालाही म्हणावं,
"अहो पण कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना. "

जो दिसेल तो उदास असतो,
रडक्या गाण्यांनाच जास्त भाव असतो
काळजी असावी आणि अपेक्षाही,
भरारी असावी आणि स्वप्नही,
पण त्याला दु:खाची झालर कशाला?
'बरं' का? छान चाललंय म्हणा ना. "

रडण्यापेक्षा हसण्याचं कारण शोधावं
फुलणाऱ्या फुलाला मनभरुन पाहावं.
उद्या कोणी पाहिलाय
आज मिळाला ना?
मग आजचं आज जगून घ्यायचं.
रोज एकदा 'मस्त गेला दिवस' म्हणायचं.
 'बरं' का? छानच चाललंय म्हणायचं.

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, February 10, 2016

फिनिश लाईन

            आज खूप दिवसांनी पळाले, म्हणजे रनिंग केलं. जवळ जवळ ३-४ महिन्यांनी. मस्त वाटलं.गेल्या वर्षी दोन हाफ मेरेथोन पळाले, एका पाठोपाठ एक. भारी वाटलं होतं. पुढचे १५ दिवस धड चालता येत नव्हतं ही गोष्ट वेगळी पण केलं याचं समाधान होतं. आज सांगायचं कारण म्हणजे, खूप दिवसांनी पळताना मी कसेतरी ४ कि.मी. पार पाडले, चाललेच जवळ जवळ. वाटलं १३ मैल /२१ कि.मी.  कसे पार केले असतील मी? 
         तर हे अंतर पार कसं पाडलं असेल? सर्वात मुख्य म्हणजे सराव होताच. तरीही पळण्याच्या दिवशी, पहिला मैल वेगाने धावल्यावर धाप लागली. मग पुढे ३ मैलपर्यंत  जाताना वाट लागली होती. 
वाटलं,' झक मारली आणि असले उद्योग केले. '. 
'कशाला काय कारण होतं? सुखासुखी घरात बसले असते ना?'
'अजून १० मैल? शक्यच नाही.'
'निदान थोडं कमी अंतर घ्यायचं होतं.'
'अजून एक हाफ मेरेथोन कशाला हवी होती?'
              असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारात होते मी. शेवटी मग गाणी ऐकायला सुरु केली. फास्ट गाण्यामुळे थोडा जोर चढला आणि मी पुढचे दोन मैल धावले. तोवर माझ्या डोक्यात गणित चालूच होतं. ५ मैल झालेत. अजून ८ जायचेत. तेव्हढ्यात माझा स्पीड स्थिरावलेला होता. आजू बाजूचे लोक काय करत आहेत ते पाहून मी एकाद्या जोडीच्या मागे रहायला लागले. त्या दोघी गप्पा मारत जात होत्या. 
               मी मनातल्या मनात,' इथे श्वास घेता येत नाहीये आणि या काल रात्रीच्या गप्पा काय मारत आहेत?'. त्यांच्या मागे मागे मी २ मैल गेले. तोवर माझ्या लक्षात आलं ७ मैल झालेत. मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केलंय. मग मला जोर चढला. ९ मैल पर्यंत पोचल्यावर मात्र दम लागला होता. १०-११ वा मैल मी सर्वात कमी स्पीडने गेले. डोक्यात अनेक विचार होते. आजूबाजूला लोकांच्या नावाचे बोर्ड पकडलेले लोक उभे होते. त्यांचे प्रोत्साहन होतेच. पण डोक्यात आपण या रेस नंतर काय करू याचाही विचार येऊ लागला. 
                सर्वात लांबचा पल्ला १२ आणि १३ मैलाचा होता. पाय थकले होते पण थांबत नव्हते. आणि जायचे म्हणले तरी जोरात जात नव्हते.  गेल्या काही दिवसांची मेहनत, मेडल मिळाल्यावर होणार आनंद ,  मुलांचे चेहरे हे सर्व आठवून केवळ मनोबळावर ते शेवटचे अंतर पार पाडले. आजूबाजूच्या लोकांचे आवाज, 'Almost there', 'Almost there'  कानात घुमत होते. जवळ जवळ ३ तासात मी १३. १ मैल पार केले होते. ते मेडल हातात घेतलं आणि डोळ्यात पाणी आलंच, कितीही नाही म्हटलं तरी. 
                 आता हे रामायण यासाठी कारण रेसच काय आपलं आयुष्यही असंच असतं ना? एक अंतर असलं पाहिजे पार पाडण्यासाठी. जे पाहून, 'छे जमणारच नाही' असं म्हणून बसायला नको किंवा हे इतके कमी करण्यात काय मजा असंही नको. पण ते इतकं दूर हवं की जे पार पाडल्यावर नंतरसुद्धा स्वत:चं आश्चर्य वाटलं पाहिजे, 'अरे हे आपण कसं केलं असेल?' एक उद्देश पाहिजे, त्यासाठी रोज सकाळी उठून सराव केला पाहिजे. एखाद्या पहाटे त्यासाठी झोप सोडून बाहेर पडलं पाहिजे. आणि रेस सुरु झाल्यावर कितीही अशक्य वाटलं तरी पुढे जात राहिलं पाहिजे. 
             सुरुवातीला वाटतंच अशक्य आहे. त्यासाठी थोडी गाणी लावायची. बाहेरचा आवाज बंद करून आतला ऐकायचा. लागला दम तर आजू बाजूच्या, पुढे जाणाऱ्या लोकांच्या सोबत जायचं. निम्मं अंतर पार केल्यावर इतके आलोय तर पुढेही जाऊच म्हणून जात रहायचं. सर्वात अवघड म्हणजे शेवटचे अंतर असते. आज पर्यंत केलेले सर्व कष्ट, आपले लोक, बाहेरच्या लोकांचं प्रोत्साहन, हे सगळं घेऊन जोव गोळा करून सर्व शक्तीनिशी पळत जायचं ती फिनिश लाईन येईपर्यंत. मेडल तर मिळतंच पण मागे वळून पाहताना आपण हे केलं याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, February 09, 2016

माझाच 'तो'

काचेच्या पलीकडे तो केविलवाण्या 'शूर' चेहऱ्याने
आणि अलीकडे मी 'उशीर झाल्याच्या' काळजीत
उसनं अवसान आणून हात हलवित.

दारातून तो खिडकीच्या काचेत येतो
दोन बोटं ओठावर ठेवून
अलगद हवेत सोडतो.

मीही मग दोनदा तसंच करते.
हळूहळू  तो खिडकीच्या कोपऱ्यात येतो
पुढे जाणाऱ्या मला पाहण्यासाठी.


मीही क्षणभर थांबते
त्याला मनभरुन पाहायला
आणि पटकन पाठ फिरवते.

मनातल्या मनात त्याला सांगत,
'बाबा येतील लवकर घ्यायला'.
आणि तशीच बाहेर पडते,
'स्त्रीस्वातंत्र्याच्या' तथाकथित अपेक्षा पार पाडायला.

-तुझीच आई.

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, February 08, 2016

अट्टाहास कशाला ना ?

                                            अट्टाहास कशाला ना ?

अट्टाहास कशाला ना
नेहमीच चांगलं दिसण्याचा?
दहा छान फोटो काढून
एकच फेसबुकवर टाकण्याचा?
दिसायचं कधीतरी आहोत तसेच
आणि लोकांनाही बघू द्यायचं.
                                          
अट्टाहास कशाला ना
सर्वांच्या बरोबरीने प्रमोशनचा?
बाकीचे थांबले म्हणून
आपणही उशिरापर्यंत थांबण्याचा?
जायचं निघून वेळ झाल्यावर
आणि बोलू द्यायचं बोलणाऱ्याना.

अट्टाहास कशाला ना
घर टापटीप ठेवण्याचा?
कोणी येईल म्हणून
दर थोड्या वेळाने केर काढण्याचा?
बसू द्यायचं येणाऱ्याना पसाऱ्यात
आणि रमून जायचं फक्त गप्पात.

अट्टाहास कशाला ना
नेहमीच हसत राहण्याचा?
कितीही आतून तुटले
तरी ताठ उभे राहायचा?
दिसू द्यायचं डोळ्याखालचं वलय,
घ्यायचा एखादा आधाराचा हातही.

अट्टाहास कशाला ना
सुगरण बनण्याचा?
पाहुणे येणार म्हणून
पहाटे उठून स्वयंपाक करण्याचा?
जळू द्यायची एखादी फोडणी,
करू द्यायची नवऱ्याला म्यागीही?

अट्टाहास कशाला ना
आदर्श मुलं वाढवायचा?
हे करू नये, ते होऊ नये
म्हणून सारखे जपण्याचा?
पडू  द्यायचं त्यानांही कधी, 
दयायचा उभं राहायला धीरही.

अट्टाहास कशाला ना
प्रत्येक नातं टिकवायचा?
स्वत:चं मी पण सोडून
सगळं देऊन टाकण्याचा?
सोडू लावायचं थोडं त्याला, 
मागून घ्यायचं त्याच्याकडूनही.

अट्टाहास कशाला ना
सतत सर्वांगीण बनायचा?
'कसं जमतं गं तुला?'
असं म्हणवून घ्यायचा?
असू द्यायचं एखादं व्यंगही,
जगायचं फक्त आपलं आपल्यासाठी
सोडून सर्व अट्टाहास !

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, February 07, 2016

मल्टीपर्पज स्कार्फ

          मी पहिल्यांदा पुण्याला आले आणि १२ वर्षानंतर या दोन्ही मध्ये एकच साम्य होते ते म्हणजे पोरींच्या तोंडावरचे स्कार्फ. २००१ मध्ये पुण्यात आले तेंव्हा 'मी त्यातली नाहीच' या आवेशात स्कार्फ बांधण्याचं नाकारलं होतं. पण लवकरच खराब होणाऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरच्या पुळ्यानी मला वास्तवता आणलं. त्यानंतर गेले २ वर्षे जेव्हा तिथे होते तेव्हा मला त्या स्कार्फचं सत्यदर्शन झालं. त्याचे जे जे उपयोग मी केले त्यानंतर पर्स सोबत नसेल तरी चालेल पण स्कार्फ हवा हे माझं ब्रीदवाक्य बनलं. 
           अर्थात १०-१२ वर्षात थोडे फार बदल झाले होते, ते म्हणजे स्कार्फ बांधण्याच्या पद्धतीमध्ये. कधी मुली पंजाबी बायकांसारखे पदर घेतात न तसे घ्यायच्या, कधी मुसक्या बांधतात तसे पूर्ण चेहरा घट्ट बांधून तर आज काल नवीन पद्धत म्हणजे, 'दाढीवाले बाबा' असतात न तसे पुढे मोठा तुकडा मोकळा सोडून बाकी सर्व बंद करायचे. ते कसे करायचे हे मला शिकता आले नाही. मी आपली जमेल तसं बांधायचे. पण हा स्कार्फ किती मल्टीपर्पज हे मला खूप दिवसांपासून लिहायचे होते. आज त्याचे सर्व उपयोग मी इथे लिहिल्याशिवाय सोडणार नाही. 

१. गाडीवरून जाताना चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी. उन्हात काळे पडू नये म्हणूनही. 
२. केस धुतले असल्यास तसेच अजून २ दिवस नीट राहण्यासाठी किंवा धुतले नसल्यास कुणाला न दिसण्यासाठी. 
३. चेहरा लोकांपासून लववून बॉयफ्रेंड सोबत फिरण्यासाठी. 
४. रिक्षातून जाताना ऑटोवाल्याला कोण मुलगी आहे आणि काय बोलत आहे हे कणभरही न कळता फोनवर बोलत जाण्यसाठी. 
५. पोरांना रिक्षा किंवा बसमधून नेताना थंडी वाजू नये म्हणून. 
६. रेल्वेमध्ये सीटवर झोपवण्यासाठी, खाली किंवा अंगावर, गरजेप्रमाणे. 
७. पाहुण्यांकडे गेल्यावर पांघरूण कमी पडत असेल तर आतून ओढण्यासाठी.
८. सर्दी झाल्यावर रुमाल नसेल किंवा पेपर न्यापकीन नसेल तर, किंवा माझ्या सारखे गळके नाक असेल तर जोरदार नाक शिंकरण्यासाठी. मुलांना सर्दी झाली असेल तरीही हा उपाय आहेच. 
९. घरी अचानक पाहुणे आल्यास ओढणी म्हणून अंगावर घेण्यासाठी. 
१०. मी स्विमिंग क्लास ला जायचे तेव्हा केस सुकविण्यासाठी. 
११. पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यास थोडं कमी भिजण्यासाठी. 
१२. पर्स, महत्वाचे पेपर किंवा तत्सम महत्वाच्या वस्तू सांभाळण्यासाठी, झाकण्यासाठी. 
१३. फळे, भाजी आणायला गेल्यावर पिशवी मिळणार नाही असे म्हटल्यावर भाजी ठेवून घरी आणण्यासाठी. 
१४. कुणाच्या घरी ओटी भरल्यास ती घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी. 

          माझे हे उपयोग वाचून कुणाला वाटेल बाईला नक्कीच रुमाल, एक पिशवी आणि पांघरुणाची गरज आहे. ते सर्व मलाही मान्य आहे. पण वेळ पडल्यावर तो स्कार्फच उपयोगी पडतो. त्यामुळे माझ्याकडे १ नाही तर ३-३ होते.
          पहाटे, सकाळ, संध्याकाळ, रात्र कधीही आपला स्कार्फ आणि टू-व्हीलर घेऊन मुलांना मागे बसवून फिरणाऱ्या मुली पहिल्या की एकदम भारी वाटते. कधी एखादी आई मुलाला त्याच स्कार्फने पोटाला बांधून चाललेली असते. तर कधी एखादी काकू आपली भली मोठी स्वयंपाकाची कढई घेऊन जेवण बनवायला चाललेली असते. एखादी तरुणी बिग बाजार मधून घराचं सर्व सामान सांभाळत गाडीवरून जात असते. कधी दोघी मैत्रिणी खीखी करत जगाची फिकीर न करता फिरत असतात, तर एखादी आठ महिन्याचं पोट घेऊन खड्डे सांभाळत जात असते. 
           खरंतर या स्कार्फ बद्दल अनेक जोकही येत असतात. गंमत वेगळी, पण मला वाटते तो स्कार्फ पुण्याचं प्रतिक आहे आणि पुण्याच्या मुलींचे, त्यांच्या स्वातंत्र्याच. मला खात्री आहे पुढे पुण्याला येईन तेव्हा परत एकदा पुण्याची होऊन राहीन स्कार्फ बांधून. 

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, February 05, 2016

लेट इट स्नो..


                आज बाहेर मस्त स्नो पडतोय मी आणि संदीप घरून काम करत आहे आणि सानूला शाळेला सुट्टी आहे. शिकागोला पहिल्यांदा मी स्नो पाहिला तेव्हा खूप हरकले होते आणि काकडलेही. कापसासारखा अलगद जमिनीवर येणारा स्नो बघण्याचा अनुभव वेगळाच. गेल्या १० वर्षात कित्येक वेळा तो असा पडणारा बर्फ पाहिलाय पण प्रत्येक वेळी नव्याने दिसतो. जसं प्रत्येक वर्षी पहिल्या पावसात होतं ना तसं. थोडा थोडा करत बर्फ जमा होतो आणि मग सर्व दृश्य पालटते. रस्ता शुभ्र होतो. वाळलेल्या झाडांच्या फांद्या बर्फ जमा करू लागतात आणि बर्फाची फुलंच जणू झाडाला आलीत असं वाटायला लागतं.
               आपल्या पावसासारखा तो बरसत नाही आणि आवाजही करत नाही. पडत राहतो शांतपणे आणि अगदी जोरात असला तरीही आवाज होत नाही जरासाही. दिवसभर घरात बसावं आणि त्याच्याकडे पाहावं खिडकीमधून. काहीतरी गरम गरम खावं आणि एखादं पुस्तकही वाचावं. असे बरेच साधर्म्य वाटतं पाऊस आणि बर्फात पण तेव्हढेच परकेपणही. कितीही छान वाटलं तरी बाहेर पडावसं वाटत नाही त्या सुंदर बर्फात. वाटत नाही की चिंब भिजावं आणि कुणालातरी आठवावं. मुलांना बर्फात खेळायला मजा येते, ते जातात दोघेही बर्फाच्या ढिगात खेळायला. मी मात्र घरातूनच पाहत राहते परक्यासारखं. 
आजचे हे थोडे फोटो.

शिकागो मध्ये असताना ही कविता केली होती गम्मत म्हणून. आज इथे पोस्ट करतेय.

सूर्य !!

चारीबाजूला बर्फच बर्फ
आणि मनावर त्याचा थंडपणा
एकटं असल्याची जाणीव करून देतात
या परदेशात..उगाचच...
पूर्ण बंद होऊन चाललेले लोक,
आपल्यातले असले तरी
ओळख देत नाहीत...

तू ही पहिल्यासारखा येत नाहीस
ऊब द्यायला,
माझ्या गालावर टिचकी देऊन उठवायला...
आणि आलास तरी थांबतोस कुठे
मी घरी येईपर्यंत?

वाटतं आज नाही आलास,
उद्या येशील,
थोडसं हसू,थोडी उब देऊन जाशील...
उद्याही नसलास की
सर्व थंड वाटतं... अजूनच...

मागच्या वर्षी सोबत घालवलेले क्षण
आठवत राहतात
त्यांचीच काय ती साथ आता
तू पुन्हा येईपर्यंत.....
कदाचित मार्च, कदाचित एप्रिलपर्य़ंत??

-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/ 



Thursday, February 04, 2016

एकला चलो रे …

      कधी एकट्याने प्रवास केल्याचा आनंद घेतलाय? मी स्वत:हून फिरायला म्हणून एकटी गेले नाही पण कामानिमित्त, कॉलेजसाठी प्रवास झाला आहे एकटीचा. आजकाल ऑफिसला जायला मला साधारण एक- दीड तास प्रवास करावा लागतो आणि मग माझी विचारधारा सुरु होते. बारावी पर्यंत एकदम छोटं जग होतं माझं. कधी कुठे जायचं तरी आई-दादांसोबत गेले होते. सांगलीला कॉलेजसाठी एकटं प्रवास करणं म्हणजे माझ्यासाठी मोठ्या हिमतीच काम होतं. कोरेगाव ते सांगली ट्रेन जायचे दर १५-२० दिवसांनी. त्यात मग कधी पहाटेच्या ट्रेन जायचं तर जरा भीती वाटायची कारण मला झोप अनावर व्हायची आणि चुकून माझे स्टेशन चुकले तर? कोरेगांव-सांगलीच्या दरम्यान पहाण्यासारख असं खास नव्हतं पण ती ४ वर्षं माझ्यासाठी खास होती. प्रत्येक स्टेशन पाठ झालं होतं अगदी पायवाट असल्या सारखं. 
            सर्वात सुंदर प्रवास म्हणजे पुणे ते सातारा तेही पावसाळ्यात बसने करायचा. हिरव्यागार धुक्याने भरलेल्या घाटातून जाणारी बस, डोंगरावरून पडणारे धबधबे, थंड हवा आणि मनात ओलावा. कविमनाला चालना देणारा प्रवास. मुंबई-कोरेगाव प्रवास मात्र शक्यतो रात्री केलेत. का तर ८ तासाचा तो वेळ जागे राहून घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. पुढे विमानप्रवासही केला. त्याबददल पुन्हा कधीतरी.
            काय असतं बरं एकट्याने प्रवास करण्यात? एकतर बाजूला बडबड करायला कोणी नसल्याने तो वेळ फक्त विचार करण्यात जातो. आपल्याला स्वत:साठी हा वेळ मिळतो. असेही घर येईपर्यंत कुठे जायची घाई नसते. धावपळीच्या दिवसात तेव्हढाच विश्रांतीचा क्षण. जसे मी पुण्यात ऑफिसला जाण्याचा वेळ पुस्तक वाचण्यात किंवा मैत्रिणीशी गप्पा मारण्यात घालवायचे. तेव्हा त्यांना बरोबर माहीत असायचं की ही आता घरी निघाली आहे. मग मी कधी जेवायला काय करायचं याचा विचार करायचे. भूक लागलेली असली ना की मग खूप काही बनवायला सुचतं. त्यात आजकाल फोन असतोच सोबतीला. लगेच रेसिपी बघायची, रस्त्यात रिक्षा थांबवून हव्या त्या भाज्या, वस्तू घ्यायच्या आणि घरी जायचं. अजूनही ट्रेनमधून घरी येताना माझ्या डोक्यात विचार चालू असतात की घरात काय काय भाज्या शिल्लक आहेत, जेवायला काय बनवता येईल इ. 
               कधी मनात खूप गोंधळ चाललेला असतो आणि एक कोपरा हवा असतो कुणीही नसलेला. आयुष्यात पुढे काय करायचं आहे?  जे करतोय ते योग्य आहे का? मला नक्की काय करायचं आहे? असे अनेक प्रश्न असतात एकेका प्रवासात. पण असा प्रवास एकट्यालाच करावा लागतो. आपलं आपल्यालाच सावरावं लागतं, निर्णय घ्यावे लागतात. तर कधी कुणाला भेटायची ओढही. तेव्हा तो प्रवास कितीतरी दूरचा वाटू लागतो. कितीही वेळा घड्याळ पाहिलं तरी एक मिनिट झालेला असतो. मग अनेक गोड आठवणी येत राहतात आणि मन त्यात बुडून जातं.
              एकटी प्रवास करताना कधी तोच वेळ लोकांना पहाण्यात घालवता येतो. शेजारच्या मुलीने काय कपडे घातले आहेत यावरून आपल्याकडे काय नाहीये आणि तसा ड्रेस घ्यायचं किती दिवस झाले राहिलंय, किंवा असे बूट घ्यायचेच असे विचार येतात. कधी एखादं प्रेमात बुडालेलं जोडपं असतं तरी कधी छोट्या बाळाला घेतलेली आई. त्याच्याकडे बघून घरी जायची अजून ओढ लागते. कधी शेजारच्या दोघांचं बोलणं ऐकायची मजा येते तर कधी शेजारच्याच्या पुस्तकात किंवा kindle मध्ये डोकावायचं. आजूबाजूला कशाच्या जाहिराती दिल्यात आणि त्यात दिसणारे लोक कसे आहेत किंवा मराठी व्याकरण कसं चुकलंय किंवा स्पेलिंग चुकलं याच्याकडे बघायचं. 
               फोनमुळे अनेक गोष्टी चांगल्या झाल्या त्यातली एक म्हणजे मनसोक्त गाणी ऐकता येतात. एका पाठोपाठ आवडती गाणी ऐकत बसायचं. कुणाचाही त्रास नाही, कुणी मध्ये थांबवायला नाही. पण त्याचसोबत अनेक तोटेही झाले आहेत. ट्रेन/बसमध्ये २० पैकी १८ लोक तरी मान खाली घालून फोन मध्ये बघत बसलेले दिसतात. बरेचवेळा मीही त्यातली एका असते. कधी वाटतं, या फोनमुळे एखादं पुस्तक वाचता वाचता राहिलं असेल, एखादं गोड बाळ आपल्याकडे पाहत असेल तर त्याच्याकडे बघायचं राहिलं असेल. शेजारी बसलेल्या सुंदर मुलीला मदत करून तिच्याशी गप्पा मारायचं राहिलं असेल. आणि उद्या बनणारी एखादी प्रेमकहाणी फोनमुळे सुरूच झाली नसेल.  त्यामुळे सध्या रोजचा प्रवास करताना काहीतरी वाचायचा विचार करतेय, काहीतरी लिहायचा विचार करतेय आणि फोन सोडून लोकांकडे पाहायचं म्हणतेय. असेही माझ्याकडे वर करून कुणी बघणार नाही. :)
विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, February 03, 2016

रेडिओ

             परवा संदीप ला म्हणाले, 'आपण ना मुलांना संगीताने उठवत नाही'. 'म्हणजे काय?' त्याचा प्रश्न. तर मला असं म्हणायचं होतं की आम्ही लहान असताना सकाळी ६.३० ला रेडिओ सुरु होत असे. पुढचे ३ तास मग सकाळचे आवरताना  शास्त्रीय संगीत, हिंदी/मराठी बातम्या, मराठी सुगम संगीत, भावगीते आणि नवीन हिंदी गाणी अशा कार्यक्रमात जायची. त्याच्या मध्ये आईची स्वयंपाकाची गडबड, आम्हाला,'आवर, आवर' म्हणणे आणि आजोबांच्या शिकवण्या या सर्व गोष्टी चालू असत. एका तेलगु मित्राकडे एम एस सुब्बुलक्ष्मी चे सुप्रभातम ऐकले आणि एकदम कोरेगावची सकाळ आठवली. तेव्हा येताना मी संदीप ला मी सांगत होते की घरी जसे आम्ही संगीताने उठायचो तसे आपण मुलांना उठवत नाही.
           आमची सकाळ त्यांना उठवून वेळेत शाळेत पोहोचवण्यात जाते. शनिवार-रविवारी सान्वी आमच्या आधीच उठून टी व्ही लावून बसलेली असते.  आणि असेही आज कालचे रेडीओ स्टेशन असे नाहीत की जे लावून दिवसाची सुरुवात करावी. एकदा दोनदा मी सकाळी गाणी लावण्याचा प्रयत्न केला होता. पण एकूणच मला सर्व गोंधळ वाटायला लागला आणि मी गाणी बंद केली. मला कळत नाही की आधी का असं व्हायचं नाही. आमच्या घरात कितीही गोंधळ असला तरी त्या गाण्यांचा, बातम्यांचा कधी त्रास झाला नाही. उलट अंथरुणातून न उठता किती वाजलेत हे कळण्याचा सर्वात सोपा उपाय होता तो. पुणे-सांगली रेडीओ स्टेशनवरचं, 'या बरोबरच पुणे केंद्रावरील बातम्या संपल्या.' हे वाक्य एकदम डोक्यात बसलेलं. त्यानंतर ऐकायला मिळणारी गाणी म्हणजे सकाळची 'ट्रिट' असायची. 
             नुसती सकाळच नाही तर रात्रही याच गाण्यांनी संपायची. विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, मोहमद रफी, हेमंत कुमार आणि मुकेश यांच्या सोबत होमवर्क पूर्ण व्हायचं. कित्येक वेळा अभ्यास सोडून फक्त गाणं ऐकत बसायचं. 'आजा सनम मधुर चांदनी में हम….' 
          शाळेनंतर परत असा रेडिओ रोजचा राहिला नाही. पुण्यात आल्यावर एफ एम रेडिओ सुरु झाला होता नुकताच, पण त्याच्यामध्ये ती मजा राहिली नव्हती. त्यात मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि फालतू जोकमुळे तर अजूनच वैताग येऊ लागला. तरीही मुंबईत माझ्या रुममेट सोबत रात्रीची गाणी ऐकत गप्पा मारण्याची एक छान आठवण अजूनही मनात आहे. मुंबईच्या उकाड्याच्या रात्रीमध्ये मध्ये जाहीराती नसलेला जुन्या गाण्यांचा तेव्हढाच काय तो शांत वेळ. असो.
             शिकागोमध्ये मी रेडिओला खूप मिस केलं. त्याचं कारण म्हणजे एखादं आवडतं गाणं अचानक लागावं आणि अख्खा दिवस छान जावा यासारखी मजा गाणी डाउनलोड करण्यात नाही. गेल्या दोन-तीन वर्षात ऑनलाईन रेडिओ ऐकत आहे आणि कधीकधी काम सोडून आवडतं गाणं ऐकायचा आनंद त्यात मिळतो. बोस्टनला आल्यापासून गाडीतही हा रेडिओ लावतो आणि आपल्यासोबत मुलानाही ऐकवतो. एक-दोनदा 'गाणं संपेपर्यंत गाडी बंद करू नका बाबा' असं स्वनिकने सांगितले याचाही खूप आनंद झाला होता मला. कदाचित आमच्या सोबत ही गाणी ऐकण्याची त्यांची स्वत:ची आठवण बनेल जी थोड्या वर्षांनी तेही माझ्यासारखीच आठवतील आणि लिहीतीलही….

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज- https://www.facebook.com/VidyaBhutkar1/



Tuesday, February 02, 2016

राहून गेलं ..

आज सकाळी अलार्म चुकला,
आणि घाईघाईत उठताना, 
झोपलेल्या तुझ्याकडे प्रेमाने पहात 
'गुड मोर्निग' म्हणायचं राहून गेलं.. 

पोरांचे डबे बनवताना, 
'बाय' म्हणत तू निघताना, 
दारात येऊन तुझ्याकडे पहात 
'बाय' म्हणायचं राहून गेलं.. 

दुपारी ऑफिसमध्ये जेवताना 
तू ठेवलेलं सफरचंद खाऊन 
फोनवर बोलताना 
'थ्यांकू' म्हणायचं राहून गेलं.. 

संध्याकाळी कंटाळून आल्यावर 
वैतागून सोफ्यावर बसताना 
तू आवरलेलं घर पाहून 
'छान' म्हणायचं राहून गेलं.. 

व्हॉटस एप वर मैत्रिणीशी बोलताना, 
बाकीचे जोक वाचताना, 
शेजारी बसलेल्या तुझा 
हातात हात घ्यायचं राहून गेलं.. 

कधीतरी पिक्चर बघताना 
प्रेमाची मोठी स्वप्नं बघताना 
छोट्या छोट्या गोष्टीतून 
प्रेम दाखवायचं राहून गेलं .. 

विद्या भुतकर .