Tuesday, January 30, 2007

आंघोळ

चार दिवसांचा कंटाळवाळा अभ्यास, परिक्षेचं टेन्शन या सर्वानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम पाण्य़ाने आंघोळ केली आणि बरं वाटलं. तीन-चार दिवसांचा थकवा, मनातले विचार , होणारा त्रास सगळे पाण्याबरोबर जणू वाहून जात होते. आजच नाही, बरेचदा मला असा अनुभव आला आहे.रडून एखादी रात्र घालवावी आणि सकाळी आंघोळ झाल्यावर वाटावं जणू गेली रात्र गेली, नवा दिवस उगवलाय. एखाद्या मस्त ट्रेकवरून आल्यावर, निसर्गसौदर्याची, प्रवासाची, पावसाची आठवण काढत आलेला शीण एकदम पळून जातो. आता हे सगळं खरं असलं तरी घरी असलं की आईचे नियम, जेवायच्या आधी आंघोळ करा, आज पूजा आहे घरी आंघोळ करा, पाहूणे येणार आहेत आवरून घ्या हे ऎकलं की चिडचिड होते. सुट्टी,विषेशता: रविवार हा या असल्या कामांसाठी नसतोच मुळी. अरे?? आंघोळीची स्वछता हा भाग सोडून बाकीची सगळी कारणं फक्त Logical च आहेत ना?: -)
अगदी दिवाळीचं 'अभ्यंगस्नान' ही. पहाटे-पहाटे,कडक थंडीत, कुडकुडत, उटणं लावून घेवून गरम्म्म्म पाण्याने आंघोळ करणं म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात. मी असं ऎकलंय की पूर्वी साधारण वर्षाच्या या काळात शेतकरी आपले धान्य घरी आणत त्यामुळे कष्टाने थकलेलं शरीर साफ करून मग आलेल्या धान्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी हा सण साजरा करत.हे झालं एक कारण, अशी बरीच आहेत. मला पडलेला प्रश्न म्हणजे, वर्षभराच्या कष्टानंतर हे अभ्यंगस्नान खरंच त्यांना शुद्ध करत असेल काय?
तसेच अजून एक म्हणजे, गंगास्नान. मी आजपर्यंत गंगा नदी पाहीलेली नाहिये, पण अनेक चित्रपटात त्याचा उल्लेख मात्र जरूर पाहिलाय. तिथे जाऊन म्हणे आजपर्यंत केलेली सगळी पापं धुवून निघतात.आतापर्यंत इतक्या लोकांनी तिचं पाणी दुषित केलं असेल, मग उतारवयाला लागल्यानंतर आपण केलेल्या पापांची जाणीव होऊन तिथेपर्यंत गेलेल्या एखाद्या वॄदधाची पापं धुवून निघत असतील काय?असो.
आपल्याकडे एखादया मॄत व्यक्तीला अग्नी देऊन आल्यानंतर कशालाही न शिवता लोक आंघोळ करतात. मला कुणीतरी याचं शास्त्रीय कारण सांगितलं होतं. मॄतव्यक्ती एखाद्या आजारपणाने गेली असेल तर त्या व्यक्तीभोवती असलेल्या विषाणूची बाधा बाकी लोकांना होऊ नये म्हणून ही खबरदारी. आपली प्रिय व्यक्ती कायमची दुरावल्यावर तिचे अंतिमसंस्कार करून झाल्यावर, त्या आंघोळीने तिच्या आठवणीही, ती गेल्याचं दु:ख, सगळं धुवून जात असेल काय?
परवा मी अर्णवला(आमच्या शेजारांचा सव्वा वर्षाचा मुलगा) बाथटब मध्ये आंघोळ करताना पाहिलं. इतका गोड दिसत होता तो. :-) दोन्ही हातानी पाणी उडवण्य़ाचा त्याचा खेळ चालू होता. त्याचा तो निरागस चेहरा पाहून वाटलं, रोज आंघोळ करताना आपलं निरागसपण, तो आनंद आणि ते सुखद बालपण या पाण्याबरोबर हळूहळू धुवून जात असेल काय?
-विद्या.

Sunday, January 21, 2007

....मला प्रेम दिसतं !


तो मला नेहेमी म्हणतो,
प्रेम-बीम झूट असतं
एकटं जगणं सुखी असतं
तरीही त्याचं माझ्यावर प्रेम आहे
असं मला का वाटतं?

कुणी सांगितलीय बायकोची चाकरी
असं त्यानं म्हटलं तरी,
मी आजारी असताना काळजी करायचं
त्याला काय कारण असतं?
त्याच्या हक्कानं रागावण्यात.....मला प्रेम दिसतं.

मुली म्हणजे निव्वळ मूर्ख
त्यांना समजणं नेहेमीच व्यर्थ
मग तरीही माझ्या बालिश वागण्याचं
त्याला कौतुक का असतं?
त्याच्या अवखळ हसण्यात.....मला प्रेम दिसतं.

सगळ्या अशाच बेशिस्त
आवरण्यात जातो वेळ जास्त
उशीर झाल्यावर चिडला तरी
मला आवरलेलं पाहून, ओठांवर हसू का असतं?
त्याच्या 'चला' म्हणण्यात……मला प्रेम दिसतं.

मुलं-बाळं म्हणजे नुसता ताप,
संसाराचा असतो किती उपदव्याप
असं म्हणलं तरी, मी किचनमध्ये असताना
माझ्याकडे पाहणं त्याला का आवडतं?
त्याच्या भावुक डोळ्यांमध्य़े.....मला प्रेम दिसतं.

ओठांत एक आणि मनात एक,
शब्दात एक आणि स्पर्शात एक,
तो कसाही वागला, काहीही बोलला,
तरी असं का होतं?
त्याच्या प्रत्येक गोष्टीत.....मला प्रेम दिसतं !

-विद्या.

Friday, January 12, 2007

माझी झोप

आजपर्यंतचं आयुष्य सगळं फुकट गेलं, म्हणजे झोपेत गेलं. आता हे मला निम्मं आयुष्य संपल्यावर का आठवलं? तर त्याचं असं झालं, गेले काही दिवस मी एक Computer based training session ऐकतेय. हो, ऐकतेय, त्या Session मध्ये स्क्रिन वर एका कोपयात एक माणूस येऊन बोलत राहतो आणि बाजूला प्रेझेंटेशन चालू राहतं. तर हे ट्रेनिंग सुरु झालं की १५ मिनिटांत मी गार, गाढ झोपेत. ४-५ वेळा तरी असं झालंय आणि मी वैतागलेय याला. हो ना, वाटलं होतं की कधीतरी हे दुष्टचक्र थांबेल. पण नाही, शाळा, कॊलेज झाले, नोकरी लागली तरी झोपेच हे दुष्टचक्र चालूच आहे.

शाळेत प्रत्येक तासाला झोप यायची, अगदी असह्य व्हायची, मग कधी पेंगुळलेल्या डोळ्यांना फळ्यावरची अक्शरं दिसली नाहीत तर कधी बाई काय सांगतात याची शुद्ध रहायची नाही. आश्चर्य म्हणजे घंटा वाजली रे वाजली की झोप गायब. वाटायचं घरी जाऊन तरी वाचू काय शिकवलं होतं ते, पण तिथेही तसंच, पुस्तक हातात घेतलं की झोप येणारच. कशी-बशी शाळा उरकली, कोलेजात तर काय, रुमवर पडून राहण्यातच दिवस गेला, झोप यायची नाही ती रात्री, भटकताना, गप्पा मारताना, पिक्चर पाहताना. :-) तेंव्हा तर अभ्यास फक्त शेवटचे २५-३० दिवस करायचा असायचा,त्यात पण माझी आणि झोपेची लढाई! उपहासाची गोष्ट म्हणजे परिक्शा संपल्यावर मात्र कधी पेपरला उशीरा गेलो, कधी नापास झालो तर कधी वेगळ्याच विषयाचा अभ्यास करून गेलो असली भयानक स्वप्नं पडतात. असो.

वाटलं नोकरी लागल्यावर आपल्याला थोडेच लेक्चर ऎकावे लागतात. तिथे तरी आपण काहितरी मोठे करू, अगदी दिवस रात्र कष्ट करू. आणि आता मला कळलंय की तेही शक्य नाहीये. मला मिटींगमध्ये झोप येते, दुपारी काम करताना झोपअ येते, सकाळी उठायचा कंटाळा कारण झोप येते. कुणाला वाटेल किती आळशी बाई आहे ही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र मला काहीही काम सांगा मी लगेच तयार.

कधी-कधी वाटतं नकॊ हा झोपेचा त्रास, धुडकावून ध्यावी ती झोप आणि पटापटा सगळी कामं संपवून टाकावी.सकाळी सहा वाजता उठावं, नाहीच जमलं तर ७ वाजता का होईना उठावं, मस्त Gym मध्ये जावून यावं, ८.३०-९ ला ओफिसात पोहोचावं.आता मी तसे प्रयत्नही केले लवकर उठण्याचे,बरेचसे सफलही झाले, पण मग दुपारी अशी असह्य झोप येते की काही केल्या आवरत नाही. :-(( कधी वाटलं झोपून घ्यावं जितकं हवं तितकं, अगदी मनसोक्त की परत झोपेच नाव नको डोळ्यात. होतं काय की मी मला कितीही झोप दिली तरी कमीच. फार कमी वेळा असं झालंय की मला झोपच येत नाहीये. अगदीच अडचणीची वेळ असणार ती नक्की.

पण आज-काल अमेरीकन च्य़नेल्स वर झोप न येणार्या लोकांसाठी खास ऒषधे, वेगळे डिसाईन केलेले 'बेड्स' यांच्या जाहीराती पाहिल्यावर वाटतं की निद्रादेवीची कृपा माझ्यावर अशीच राहो.जाऊ दे, जास्त बोलून तरी काय होणार? आजपर्यंत मी केलेले एवढे निश्चय मातीस मिळाले, अजून एक करून तरी काय होणार आहे? माझे 'झोपपुराण' आता मी थांबविते आणि पडी टाकते.

-विद्या.

Saturday, January 06, 2007

कातरवेळ

शनिवार अगदी नेहमीप्रमाणे उशीरा सुरू झाला. मग आवराआवरी, आठवड्याची सफाईची कामे पण झाली. नुकताच संध्याकाळचा चहा झालाय, म्हटलं चला जरा वाचत बसू. वाचण्यात काही लक्ष लागत नाहीये. ही वेळच तशी असते ना, कातरवेळ. मग 'कातरवेळ'च्या खूप आठवणी, एक प्रकारच्या उदास भावना मनात येत राहिल्या. आजपर्यंत अशा कित्येक संध्याकाळी मला अस्वस्थ करून गेल्यात,वाटलं काहीतरी लिहावं त्याबद्दल. शाळेत एक धडा होता आम्हाला 'कातरवेळ' नावाचा. त्याच्याबद्दल मला काही विशेष आठवत नव्हतं म्हणून मी Google वर गेले. मला भली मोठी यादी मिळाली 'कातरवेळ' या शब्दावर. ती यादी वाचून मला हसू आलं कारण यावर मी लिहिण्यासारखं काही नव्हतच. :-)) प्रत्येकाने ही अस्वस्थतेची भावना अनुभवलेली दिसतेय. असो.माझी संध्याकाळ या शब्दावर मिळालेल्य़ा blog वर जाण्यात आणि ते वाचण्यात संपून गेलीय. :-) तेव्हा यावरचं लिखाण पुन्हा कधीतरी !

-विद्या.

Tuesday, January 02, 2007

Some fortune cookies...

First day of new year, 2007. Well it wasnt different than any other holidays as I got up at noon. I was tired of cooking and didnt feel like getting ready too. But there was one thing I wanted to do. I wanted to go to one of my favourite restaurant 'Bamboo Garden' , it serves Indian-Chinese food. As I had my first tea at 2.30 pm :-), I kept on thinking if I should go to that place or not. I was saying 'no' only because, I eat a lot there and the food is very oily sometimes. Finally I confirmed on 'NO' and started making dinner at home. Just before starting the dinner, my friends came over and they were planning to go to the same hotel. They asked us and I couldnt say 'NO' this time. :-))
So was it a really strong desire and my friends were just catalyst? I was glad that my wish, my desire was fulfiiled finally. So is it going to be a year of fulfilling desires and having dreams come true? May be....or may be not because....At the end of dinner came the funny part, fortune cookie. I love these cookies. They are different, sweet but not very sweet. So when I opened this fortune cookie it said....
"Some fortune cookies do not contain any fortune". ( :-) this one is sarcastic)
Anyway, its just the beginning. Lets wait and watch another battle of our dreams and destiny!!!
Wish you all a very happy new year !
-Vidya.