Monday, April 30, 2007

अशी पाखरे येती

    आज सकाळी स्कूलबसला अगदी धावत पळत पोचलो. गाडीतून उतरून स्वनिक धावत पळत बसमध्ये जाऊन बसला. त्याची धावपळ बघून जरा वाईट वाटलं. या लहानग्या वयात दप्तर घेऊन असं पळापळ करायला लागते पाहून कसंतरी झालं. सकाळपासून डोक्यात तेच चित्र होतं. काहीतरी लिहिण्याचा विचार होता पण १० वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली ही पोस्ट आठवली. इथल्या वाचकांना  वाचण्यासाठी पोस्ट करत आहे. बरेचसे संदर्भ १० वर्षे जुने आहेत. सध्या आपल्याकडे बस आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनच दुर्दैवी घटना घडत आहेत आणि संकटे वाढत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. आता पुरती हि जुनी पोस्ट. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  ऑफिसला जाताना समोर एखादी स्कूलबस लागली की आम्ही वैतागतो. अरे एक तर ती दिलेल्या स्पीडलिमिट्च्या एक मैल वर जात नाही, शिवाय रेल्वे क्रॉसिंगला थांबते, सिग्नल पिवळा होण्याच्या खूप आधीच थांबते आणि हो जर त्यात मुले चढणार किंवा उतरणार असतील तर 'Stop' लिहिलेला आपला मोठा दांडा आडवा टाकून मागच्या सर्व गाड्या थांबविते. त्यातही मुलेच ती,कुठेही जातील, पळतील म्हणून पलीकडच्या बाजूने जाणाऱ्या गाड्यांनीही थांबायचे म्हणे. मग कुणाची चिडचिड होणार नाही? या बसेसना बाकीच्या सुरक्षा व्यवस्थाही खूप असतात म्हणे. त्याच्या खिडक्या आपल्या नेहमीच्या बससारख्या खालून वर जाणाऱ्या नसतात, तर वरच्या बाजूने उघड्या असतात का तर मुलांनी हात बाहेर काढायला नको, खिडकी जोरात आदळून हातावर पडायला नको.(लहानपणी माझ्या हातावर एकदा पडली होती. ) दरवाजा उघडून मुले आत येऊन बसल्यावर दरवाजा बंद होतो आणि मगच बस हालते....... किती हा खटाटोप. नसते लाड...नाहीतर काय?

       कांदिवलीच्या लोखंडवाला अपार्टमेंटसच्या मागील रस्ता,हायवेकडे जाणारा, सकाळी ७ वाजल्यापासून तुम्ही तिथे उभे राहिलात तर कुठे एखादी रिक्षा मिळण्याची शक्यता, तीही अनोळखी माणसांसोबत वाटून घेतलेली. मख्ख चेहऱ्याने बसून फक्त २ कि.मी. रिक्षाने जाण्यासाठी ४०-५० मिनिटे घालवायची.अगदीच उशीर झाला तर हायवे वर येणारी कंपनीची बस चुकेल या भीतीने तंगड्या तोडत गर्दीतून वाट काढत पूर्ण रस्ता चालत जायचे नाहीतर मग बस मिळाली तर अर्ध्या अंतरावर उतरून चालत जायचे. गेले कित्येक महीने तिथे रस्ता बांधकाम( खोदकाम?) चालू आहे आणि माझ्यासारख्या आळशी माणसांना रिक्षा मिळत नसल्याने अतिशय गैरसोय झाली आहे. बसमध्ये चढल्यावर सुटे पैसे शोधण्यात निम्मा वेळ जायचा आणि तोपर्यंत माझा स्टॊप यायचाही. उरलेल्या वेळात मी माझ्या ड्रेसची ओढणी खराब होते की कंपनीची बस चुकते या काळजीत.

     त्या भागात कुठेतरी झोपडपट्टी होती म्हणे. भडक निळ्या रंगाचे युनिफॉर्म घातलेली पोरे-सोरें तिकडून कुठून तरी यायची. काही माझ्याबरोबरच चढायची(की पळत-पळत पकडायची?) . हातातला पास दाखवून आपल्या मित्र-मैत्रिणीशी त्यांचा गप्पा सुरूही व्हायच्या. काही जण जागा असेल तर बसच्या पायऱ्यांवर आरामात बसायची नाहीतर बसच्या पायऱ्या चढून गेल्यावर जो खांब असतो त्याला पकडून उभी राहायची.वरच्या दांड्याला मलाही अजून नीट पकडता येत नाही. एकदा मी माझ्या जागेवरून उठून एका मुलीला बसायलाही सांगितले पण तिला तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत खांबाला धरूनच उभे राहायचे होते. मी सकाळ-सकाळी किती वैतागून प्रवास करायचे आणि ही पोरे मात्र आरामात धक्के सहन करत, मजेत गप्पा मारत जायची. आणि हो,आपले कंडक्टरसाहेबही फार प्रेमळ. लोकांना उतरण्यासाठी ते गाडी थांबवतच नाहीत, मुलांसाठी मात्र १०-१५ सेकंद थांबवतातच.

    एकदा मी आईबरोबर सातारला गेले होते. साताऱ्याच्या मुख्य चौकात दोन्ही बाजूंनी रिक्षा, भाजीवाले, गाड्यावाले यांच्या आणि बसच्या मध्ये असलेल्या जागेतून स्वतः:ला बसमध्ये घुसवताना एका चिंगीला मी पाहिले आणि अक्षरशः: शहारले. तिचा एकच हात बसच्या दाराला पकडू शकला होता आणि बस निघाली. आजूबाजूला लोकांनी मग दुसऱ्या हाताला पकडून तिला आत घेण्याचे महान कार्य केले होते. आजचा दिवस तरी ती घरी (सुखरूप?) पोहोचणार होती. बसच काय रिक्षाने जाणाऱ्या मुलांचेही हाल असेच असतात. बसमध्ये चालक हा सरकारी कर्मचारी तरी असतो आणि त्याला पुरेसे शिक्षण दिले असण्याची थोडीफार शक्यता असते.रिक्षांत मात्र, चालकाने जर पैसे भरून चालन-परवाना काढला असेल किंवा त्याला ही गिऱ्हाईके पोचवून बाकीही कामे करायची असतील तर?

      मी दुसरी-तिसरीत असताना, घर शाळेपासून दूर असल्याने मी व माझ्या बहिणीसाठी रिक्षा लावली होती. आता लहानपणापसूनच उशीरा उठण्याची सवय असल्याने आम्ही सगळ्यात शेवटी रिक्षात चढायचो. त्यामुळे कडेची जागाच काय पूर्ण सीटच भरलेली असायची. मग सीटच्या पुढे उभे राहणे आणि अजून उशिरा गेले की रिक्षावाल्या काकांच्या बाजूला अर्ध्या जागेत बसणे अशी कसरत करायला लागायची.त्यातही सीटवर बसलेल्या मुलांना पुढच्या मुलाचे दप्तर किंवा त्यातली एखादी टोकदार वस्तू लागून झालेले छोटे-मोठे अपघात, भांडणे यांची भर. अर्थात अगदी ४-५ वर्षापूर्वीपर्यंत माझे वजन(की उंची?) त्यातल्या त्यात कमी असल्याने, ३ पेक्षा जास्त लोक असल्यावर, मी आईच्या मांडीवर बसून रिक्षातून प्रवास केला आहे ही गोष्ट वेगळी.

       आमच्या शाळेत एका मोठ्या फळ्यावर 'अशी पाखरे येती' असं टायटल देऊन आजूबाजूच्या किती गावांतून मुले शिकायला येतात त्या गावांची नावे दिली होती. त्यातले कितीतरी जण अगदी पाचवीपासूनच २-६मैल सायकलवर येतात किंवा मग बस लौकर येते म्हणून सकाळीच १०वाजण्याच्या आतच शाळेत येतात आणि संध्याकाळी ६ नंतर घरी पोचतात. ८वीत असताना माझी एक मैत्रीण जवळच्या एका गावाहून बसने यायची आणि ती लौकर येत असल्याने माझीही जागा पकडून ठेवायची त्याचा मला तेव्हा फार आनंद व्हायचा. पण आज मी एव्हढ्या लहान वयात मुले किती थकून जात असतील याची कल्पनाच करू शकत नाही. सायकलवरून येणारी मुले पावसाळ्यात कशी येत असतील बरे? चिखलाने भरलेले पाय शाळेजवळ आल्यावर पावसाच्या पाण्यातच धुताना उड्या मारणारी मुले आनंदी म्हणायची की निरागस असल्याने त्यांच्याच कष्टाशी अनोळखी?

     माझ्या सुदैवाने शाळेतच काय पण ११-१२वीलाही गावातल्या कॉलेजातच गेल्याने कधी बसचा प्रवास आला नव्हता किंवा पुढच्या शिक्षणातही. आणि त्यानंतरही मुंबईत थोडा-फार प्रवास केला तो कंपनीच्या बसमधूनच त्यामुळे धक्काबुक्की कमीच. पण तिथल्या लोकलमध्येही चतुराईने चढून जाण्याऱ्या, परीक्षेच्या वेळी उभ्या उभ्याच अभ्यास करणाऱ्या इवल्याश्या जिवांना पाहिल्यावर मलाच भीती वाटायची. त्यांच्या आईबाबांना माहीत असेल काय की आपला मुलगा/मुलगी इतके धक्के खात, पळापळ करत, जीव धोल्यात घालत प्रवास करतात? की तेही असेच अजून कुठल्यातरी बसमध्ये लटकून रोज प्रवास करतात? की अजूनही अशी अनेक गावे आहेत जिथे चौथीनंतर गावात शिकताच येत नाही?की त्यांना, शाळा कितीही दूर असली तरी, आपल्या मुलाला चांगल्याच शाळेत घालायचे असते? की शाळेत जाण्याआधीच त्यांना आयुष्याच्या शाळेत जगण्याचं खरंखुरं शिक्षण मिळतं?की मलाच हे सगळं Complicated वाटतंय आणि त्यांच्यादृष्टीने हे सगळं रुटीन असतं? असो.....इथल्या स्कूलबसमधल्या पाखरांना पाहताना मला आपल्या गावच्या पाखरांची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

-विद्या भुतकर .

Tuesday, April 24, 2007

त्राण निघून गेले....

पुन्हा एकदा वसंत आला आणि पालवी दिसू लागली. पण अजूनही काही सुकलेली झाडे-वेली पाहून काहीतरी लिहावंसं वाटलं ते असं...


दर सहा महिन्यांनी माझ्या सुकलेल्या फांद्यांवर,
तू तुझे किरण घेऊन आलास आणि मी मोहरून गेले.

कुठे लपला होतास जेव्हा मी
वाऱ्यात झडून गेले, थंडीत गारठून गेले.

तुझं हे असं खूप दिवस चाललंय
किती सहन करणार, मी आता थकून गेले.

यावेळी जरा उशीर केलास, पुन्हा मी फुलणार नाही...
तुझी वाट पाहण्यात सारे त्राण निघून गेले....

-विद्या.

Friday, April 20, 2007

एक किराणामालाची यादी

'आज-उद्या करत शेवटी जिम लावली एकदाची. आळस नाही हो, थंडी हा माणसाचा मोठा शत्रू आहे मग मी तरी काय करणार.तर आता इतक्या दिवसांनी व्यायामशाळेत आल्यावर मी धड राहिले तर नवलच.मेले हातपाय पण माझ्यासारखेच आहेत जरा काही बदल झाला की किरकिर करायला लागतात. पाठ आणि पोट तर पहिले चार दिवस ना हसू देत होते ना रडू. उठता-बसता त्या ट्रेनरला शिव्या घातल्या आणि स्वतः:लाही(नको ते उद्योग करायची सवयच आहे मला). असो. संध्याकाली ऑफिसातून परत आल्यावर कसाबसा चहा घ्यायचा आणि व्यायामाला पळायचे. मग परत येताना जी भूक लागते, कुठलाही खाद्यपदार्थ आठवून त्रास होतो. घरी पोचल्यावर इतका कंटाळा आलेला असतो की जेवण बनवणे ही अशक्य गोष्ट असते. मग सर्वात लौकर आणि कमी कष्टात जे काही बनविता येईल ते बनविण्याकडे माझा कल असतो. :-) मागच्या आठवड्यात भाजी आणायलाही वेळ मिळाला नाही, ना बाकी काही मसाले. शेवटी आज वेळ काढून भारतीय किराणामालाच्या दुकानात आम्ही गेलो. आणि......
गेल्यागेल्या तिथल्या समोशाच्या वासाने माझी भूक चाळवली गेली. :-( समोसा?....तेल, बटाटे.... क्यालरीज सगळं आठवून मी स्वतः:ला आवरलं.लगेचच माझी सामानाची खरेदी सुरू झाली. ती अशी:
१. सकाळी नाश्त्याला चहाबरोबर बिस्किटे,टोस्ट, खारी, केक रस्क. चहा, साखर तर काय लागतंच.
२. डाळी, पिठं, इ. जास्त घेऊन तसेच पडून राहतात, त्यामुळे जरा लहानच पाकिटे घ्यावी.
३. पुढचा माझा आवडता विभाग होता. तयार भाजण्या,पिठे.
इडली मिक्स, डोसा मिक्स,रवा इडली मिक्स, रवा डोसा मिक्स,खमण ढोकळा मिक्स, बरेच दिवसांत दही वडा खाल्ला नव्हता, त्यामुळे वडा मिक्स. आजकाल भजी साठी पण एक मिक्स मिळतं, ते मागच्या वेळी ट्राय केलं पण विशेष आवडलं नाही, ते cancel.
केप्रची थालीपीठ भाजणी.केप्रचीच उपवासाची भाजणी.अरे हो पाहुणे येणार असले की MTR चं पायसम मिक्स,गिट्सचं बासुंदी मिक्स.फारच कष्ट करायची इच्छा असेल तर गुलाबजाम मिक्स. :-)
४. पुढचा अतिशीत (फ्रोझन) विभाग:
दीप कंपनीचे आलू पराठे,साधे पराठे,मेथी पराठे,यावेळी 'बाजरा रोटी' ही घेतली आहे, बघू कशी लागते ती.भरलेले(स्टफड) पराठे आणि हो विसरलेच....पुरणपोळी. मागे एकदा मला वाटलं होतं की पुरणपोळी करावी पण जर २ मिनिटांत मला गरम-गरम पोळी मिळणार असेल तर मी एव्हढे कष्ट करावे का? आणि का करावे? :-)अतिशीत समोसे.काही कच्चे तर काही नुसते ओव्ह्नमधे गरम करणारे पण मिळतात. त्यांना तळायचीही गरज लागत नाही.अतिशीत ढोकळा,त्याची चटणीही सोबत असते.मांसाहारी लोकांसाठी कबाबही मिळतात. एकदा मी मोती कबाब आणले होते. काय असेल बरं ते? साबुदाण्याचे वडे. तेही बरे होते म्हणायचे.
आमचे दक्षिण भारतीय बंधू यातही मागे नाहीत बरं. या विभागातही डोसा,इडली,उत्तपम,त्यांची चटणी,सांबारही मिळते.
प्रत्येक पराठ्याची दोन-दोन पाकिटे घेतली की १-२ महीने सहज जातात. बाकी चटपटीत खाण्यातील ३-४ पाकिटे तर घेतलीच जातात.
५. अतिशीत विभागाच्या जवळच चिरलेल्या अतिशीत भाज्या मिळतात. त्यात पावटा, कारली(क्वचितच), ओलं खोबरं, शेवग्याच्या शेंगा, घेवडा या काही आपल्याकडील नेहमीच्या गोष्टी ज्या इथल्या दुकानांत मिळत नाहीत.चिरलेल्या मिक्स भाज्य़ाही भातात, सांबारमध्ये चांगल्या लागतात आणि कष्टही फार वाचतात.
६.एव्हढे सर्व होऊनही सटर-फटर खाण्याचे पदार्थे लागतातच.हल्दिरामचे आलू भुजिया,मूंगदाल,मटरी, मसालेवाले शेंगदाणे.स्वादची पाणीपुरी,भेलपुरी(यामध्ये चटणीही तयार असते),चितळ्यांचा मक्याचा चिवडा, यापैकी २-३ पाकिटे.
७. जेवतानाही नौरचे सूप आणि आठवड्यात कधीतरी लागतेच म्हणून मॅगी (देव त्यांचं भलं करो).तसे खूप साऱ्या 'रेडी टू ईट' भाज्याही मिळतात पण मला त्या आवडल्या नाहीत त्यामुळे Cancel.
८. सर्वात शेवटी मी मसाल्यांच्या विभागात जाते. सांबार मसाला, पावभाजी मसाला, किचनकिंग मसाला, बिर्याणी मसाला, परंपराचा पनीर माखनवाला मसाला, कोल्हापुरी मटन मसाला( परंपराच्या मसाल्यात तर तेल वगैरेही असते.फक्त दह्यात घालून चांगले एकजीव करायचे आणि भांड्यात टाकले की रस्सा तयार.
हे सर्व कमी आहे म्हणून की काय, मी काल मोड आलेली कडधान्ये, घरगुती इडली पीठ, पेढे, जिलबी सारखी मिठाई माझी वाट बघत असतात. :-( हुश्श.....हे सर्व घेईपर्यंत माझं बिल साधारण १०० डॉलर होतंच आणि घरी जाऊन पटकन काहीतरी खावं म्हणून मी तिथले रोज ताजे(?) बनवलेले समोसे/ढोकळे/कचोरी घेऊन घरी पळते. ही होती भारतीय किराणामालाची यादी,त्यातही काही पदार्थ राहून गेले असतील. इथल्या दुकानांत मिळणाऱ्या केक मिक्स,कुकी मिक्स,पास्ता सॉस, अतिशीत पिझ्झा याबद्दल पुन्हा कधीतरी......
मी विचार करतेय बऱ्याचवेळा अमेरिकेतले लोक काय खात असतील यावर आमची चर्चा होते. किती तयार अन्न खातात हे. काहीही घरी बनवत नाहीत असं म्हणणाऱ्या मला कोण काय म्हणेल? माझी आई मी काही सांगितले तर आता फक्त हसते. तिलाही कळलंय हिच्यासमोर डोकं फोडण्यात काही अर्थ नाही. इंटरनेटवर विविध पाककृती प्रसिद्ध करणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो मला माफ करा. या सर्व तयार वस्तू मी रोजच वापरेन असं नाही पण दिवसांत कधी ना कधी एखादा का होईना पदार्थ वापरला/खाल्ला जातोच. यासर्वांतून मी किती प्रिझर्वड अन्न पोटात घालते हे मलाही माहीत नाही पण जिमला जायला वेळ मिळण्यासाठी माझा आटापिटा चालूच राहतो.
-विद्या.

भित्री भागुबाई

काल आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली. तेही गेल्या चार दिवसांतील दुसरी चोरी. दोन्हीमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोन्हीही घरे भारतीय माणसाची होती आणि त्यांचे सर्व सोने चोरीला गेले. काल तर जिथे चोरी झाली तिथली बाई लॉन्ड्रीरुमध्ये गेली होती, ती परत आली तेव्हा टॊयलेटमधील फ्लशचा आवाज आला. तिला वाटले तिचा नवराच दुपारी परत आलाय आणि तेव्हढ्यात एक काळा (अफ्रिकन अमेरिकन) माणूस बंदूक घेऊन समोर आला आणि त्याने तिला 'सोने कुठे आहे?' असे विचारले. तिने आतल्या खोलीत आहे असे सांगताच तो आत गेला आणि संधी साधून ती बाई बाहेर पळून आली. मग तिच्या शेजाऱ्यानेच पोलिसांना फोन केला. ....त्यांचे पुढे काय झाले माहीत नाही पण मला मात्र रात्री लवकर झोप आली नाही. चार वेळा दार बंद केले आहे ना याची खात्री करून घेतली. :-) तेव्हाच माझ्या मनात इतके विचार येत होते, म्हटलं आता लिहूनच काढावेत.
गेले एक वर्ष मी एकाच गावात, एकाच ऑफिसात जातेय. पण त्याआधी जवळ-जवळ ७-८ महिने मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकटी राहिलेय. माझं सुदैवच म्हणायचं की तेव्हा मी सुखरूप राहिले.त्यासाठी घरी आणि बाहेरही खूप कौतुक करून घेतलं त्याबद्दल. "एकटी कशी राहलीस गं? बोअर नाही का झालं? भीती नाही वाटत? एअक्ट्यासाठी जेवण बनवणं किती कंटाळवाणं आहे, इ.इ." पण बाहेरून मी कितीही शूरवीर दिसले तरी खरं काय ते माझं मलाच माहीत होतं. तेच आज लिहायचा प्रयत्न करतेय.
खरंतर मी तोपर्यंत ६ वर्षे तरी घराबाहेर राहिले होते पण नेहमी कुणीतरी रूममेट होतीच.पण २००४ साली काही महिने अमेरिकेत काम केले आणि त्यानंतर पुढचा प्रोजेक्ट टोरोंटो (क्यानडा) चा मिळाला. तिथे गेल्यावर कळलं की जवळ-जवळ सगळीच टीम कलकत्त्याची आहे. थोड्या फार ज्या स्त्रिया होत्या त्या एकट्या राहणार होत्या किंवा कुटुंबीयासोबत. आणि मुलांसोबत राहणे मला अवघड गेले असते.हॉटेलवर राहून बाहेरचं खाणं तरी किती दिवस खाणार? Paying Guest च्या ही काही जाहिराती मी पाहिल्या पण तिथे स्वयंपाक घर मिळणार नव्हतं. पुन्हा एकदा दुसऱ्याच्या हातचे/बाहेरचं खाणे मला अशक्य होतं. बरं चांगले अपार्टमेंट घ्यायचे तर १-२ वर्षाचा करार करावा लागणार होता. मला तर फक्त ६ महीनेच राहायचं होतं. त्यामुळे लगेचच घर शोधायचे तर, एकटी राहण्याशिवाय मला पर्याय नव्हता. बरीच घरे पाहिल्यानंतर एका मराठी कुटुंबाकडे तळघरात राहण्याचा निर्णय मी घेतला.
ते लोक बोलायला चांगले होते आणि खूप दिवसांनी मराठी बोलणारं कुणीतरी भेटल्यामुळे मला आनंदही झाला होता. ते घर तसे माझ्या ऑफिसापासून बरेच दूर होते. लवकरच मी बसचा मार्ग वगैरे शोधला, पण कळले की २ बस बदलूनही शेवटी १० मिनिटे चालत जावे लागते. थंडीचे दिवस होते, साधारण वजा १०-१५ तापमान असायचे तेव्हा. पहिल्या दिवशी मी परत येताना बसमधून उतरले आणि त्या अंधारातून जाताना इतकी भिती वाटत होती. नवीन आल्यामुळे अजून मोबाईलही नव्हता. मी पटापट चालत चालले होते. सगळ्यात भितीदायक गोष्ट म्हणजे बर्फातून त्यांच्या घराच्या मागून जिन्याने खाली जायचे. त्या तळघरात कोंडल्यासारखे वाटायचे. आणि तळघराची खिडकी वरच्या बाजूला असते ना, त्यामुळे असं वाटायचं कुणी वाकून घरात बघत असेल तर?दोन दिवस तर काढले पण रात्री परतत असताना खूप भिती वाटायची. आणि इथे तर रस्त्यावर माणसंही नसतात आणि काळी कुत्रीही.ना रिक्षावाले, ना किराणा मालाची दुकाने ना फोन बूथ. एकदा माझ्याशेजारी एक गाडी येऊन थांबली तरी मी सरळच जात होते, नंतर मला कळलं की आमचे घरमालकच होते आणि मला लिफ्ट देणार होते. :-)
इंटरनेट हाच काय तो आधार होता रात्री मला.एकदा मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याला कळले की मी एकटीच आहे आणि घाबरत आहे, तर तो मला म्ह्नाला, 'मागे बघ ना तुझ्या....काय आहे.....कुणीतरी उभं आहे....' असंच काहीतरी. मी इतकी घाबरले, त्या मित्राशी पुढचे काही महीने तर मी बोलले नव्हते. तळघरातही मी ज्या रूममध्ये राहायचे ती एका टोकाला होती आणि आजू बाजूला कुठेही आवाज झाला तरी माझे कान टवकारलेले असत. १० दिवसातच मी त्या अंधारकोठडीला कंटाळले आणि दुसरीकडे एक घर शोधले. तेही असेच एका भारतीय माणसाचे होते आणि तळघरातच होते. पण एक चांगले होते की जरी घराचा प्रवेश तळघरासारखा होता तरी मागून ते जमिनीलगतच होते. त्यामुळे दिवसभर पूर्वेकडून छान उजेड यायचा. एकदा नक्की केल्यावर मी एका तळघरातून माझ्या प्रचंड मोठ्या ब्यागा आणि १० दिवसात जमविलेले सामान (गादी, सफाईचे सामान, खाद्यपदार्थ,भांडी) सगळं कसंबसं बाहेर काढलं. दुसरं मोठं काम म्हणजे ते पुन्हा एकदा तळघरात न्यायचं. शेवटी तर मी ब्याग जिन्यावरून घसरत नेल्या. :-( वाटलं चला आता सुटले.पण...
त्या नवीन घरात दोन खोल्या होत्या ,किचन आणि बाथरुम. मी एक मोठी खोली व्यापली, पण त्या घराचे Heating (Central heating) घरमालकाकडे होते, त्यामुळे साहेबांनी त्यांना हवं तसं सेट केलं होतं. तळघर मुळातच थंड असतं त्यामुळे रात्रभर मी काकडत काढली. दुसरं म्हणजे आता माझी खोली जमिनीलगत होती त्यामुळे डोकं खिडकीकडे केलं तर कुणी चोर आला तर कसं कळणार? आणि खिडकीकडे पाय केले तर ती खिडकी सारखी डोळ्यासमोर राहणार. :-( अजून एक रात्र मी रडत,कुडकुडत काढली होती. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन मोठ्या चादरी घेऊन आले, तरी थंडी जाईना. मग घरमालकांना सांगितले, तर त्यांनीही लाइट बिलाचं कारण सांगितलं. जेवण बनवायला उभं राहणंही अशक्य होतं. शेवटी वैतागून मी किचनमधल्या सगळ्या शेगड्या चालू ठेवल्या आणि पांघरूण घेऊन बसून राहिले.
माझे जुने घरमालक मराठी तरी होते, हे लोक बिहारी होते आणि आमचा संवाद काही फारसा प्रेमळ नव्हता. मग मी त्यांच्याशी बोलून तात्पुरते त्यांचे इंटरनेट वापरण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण तेही होत नव्हते. त्यामुळे घरी आले की जेवण बनविणे आणि काहीतरी गाणी लावून झोपणे हेच करत होते.रात्रभर तो laptopचालू ठेवायचे की त्याच्या आवाजात झोप तरी लागेल. ७-८ दिवसांत नवीन इंटरनेट कनेक्शनचा अर्ज दिला, मोबाई फोनही शोधला. आणि साधारण १० दिवसांत माझा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. मला तोपर्यंत वाटायचे, मला खाली काही झाले तर काय करणार, कुणाला फोनही नाही करता येणार ना मेल. टीव्ही तर मी कित्येक वर्षात पाहिला नव्हता.
नवीन घर ऑफिसापासून खूप जवळ होते. बसने साधारण ७-१० मिनिटे लागत. पण आता कामही जोरात सुरू झाले होते. रात्री ७-८ नंतर बसस्टॊपपासून घरापर्यंत यायला ५-७ मिनिटे लागत. आणि तिथे एकदा त्या कॊलनी मध्ये आलं की कुठेही माणूस दिसत नसे. मी जवळ-जवळ पळतच घरी यायचे. कुणी मागून चालत येतंय असं वाटलं तरी मागे न बघता चालत राहायचे. बरेचदा चालताना मी मित्र-मैत्रिणींना कुणाला तरी फोन करायचे.आणि शेवटी दरवाज्यातून आत जाऊन पटापट सर्व लाइट्स सुरू करायचे. एकदा पळापळीत जिन्यावरून घसरून पाठही मोडून घेतली. :-(रोज रात्री मी २-३ वाजेपर्यंत जागी राहायचे आणि भारतात असणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी बोलायचे. बरेचदा कुणीतरी रात्री मला याहू वर मेसेजही पाठवायचं आणि मी मध्यरात्री उठून त्यांना उत्तरही द्यायचे.कधीकधी आरशात पाहताना वाटायचं मागून कुणाचा चेहरा दिसला तर? (हे सगळे भयानक चित्रपट आणि कादंबऱ्या वाचण्याचे परिणाम. :-) )
पण एक-दोन महिन्यांत उन्हाळा सुरू झाला आणि सूर्यास्त उशिरा होऊ लागला. मग जरा ओळखीही वाढल्या तोपर्यंत आणि मी जरा भटकून घेतलं. टोरोंटो मला खूपच आवडलं,डाऊनटाऊन(?), ओंटारिओ तळं(की समुद्र? ),तळ्याच्या मध्ये असलेलं छोटंसं बेट, बस-ट्रेनची व्यवस्था, विविधता, सगळंच. एका ट्यूलिप फेस्टिव्हललाही जाऊन आले. नायगारा तर तिथून फारच जवळ असल्याने दोन वेळा बघितला.तीन दिवसांची, मॊन्ट्रियाल,ओटावा, क्युबेकची ट्रीपही केली. छान वाटलं.पाच महिने कसे पटकन संपून गेले. माझी माझ्या घरमालकांशीही चांगली ओळख झाली. आम्ही मग खाद्यपदार्थांची , पाककृतींची देवाण-घेवाणही केली. मी त्यांना मग वेबक्यामेरा कसा वापरायचा, कुठल्या साईटवर हिंदी गाणी मिळतात, अशी शैक्षणिक माहितीही दिली. :-)
शेवटच्या महिन्यात माझे घरमालक भारतात आले होते काही दिवसांसाठी. त्यांनी मला जाताना सांगितलं, "हे emergency contact numbers आहेत. मी माझ्या एका नातेवाईकाला सांगितलं आहे दर थोड्या दिवसांत फेरी मारायला."
एकतर ह्या मालकाची पाच अपत्ये होती. त्यांचा दिवसभर चालणारा गोंधळ एकदम बंद झाला होता आणि त्यात त्यांचा हा नातेवाईक कधी येणार-जाणार माहीत नाही. त्याच्याऎवजी दुसराच कुणीतरी आला तर? तोच माणूस खाली आला तर? त्यांनी घराची विद्युत सुरक्षाही केली होती पण ती मध्येच बंद पडली तर? इथे मालक नसलेलं घर लगेच कळतं, त्यामुळे त्यांची सर्व पत्रे मी माझ्याकडे जमा करून ठेवली. मला घर सोडून एक वर्ष होऊन गेलं होतं. आता लवकरच परत जायला मिळेल याची उत्सुकता होती, त्यात उगाचच हे टेन्शन. कसेबसे दिवस काढत मी महिना घालवला. रोज घरी नेण्यासाठी सामान आणायचं, ब्यागेत ठेवायचं, आधी आणलेलं सामान पुन्हा काढून नीट लावायचं. मी १५ दिवस आधीच कपडे घड्या घालून ठेवले होते. :-)
अखेर तो दिवस आला होता, घरी जायचा. ६ तास आधीच मी विमानतळावर जाऊन बसले होते. कंटाळवाण्या,लांब प्रवासानंतर आई-बाबांना भेटल्यावर अश्रू आले नसते तरच नवल होतं. त्यानंतर चार महिने भारतात राहून मी परत अमेरिकेत आले होते. दोन महिने एका हॉटेलवर राहिले आणि भीती, एकटेपणा हे पुन्हा एकदा अनुभवलं होतं. खूप वेळा भारतात, नातेवाईकांना,मित्र-मैत्रिणींना,भाऊ-बहिणींना भांडताना पाहिल्यावर मला ते एकटे दिवस आठवतात, जेव्हा कुणाशी तरी बोलण्यासाठी-भेटण्यासाठी मला २-२ दिवस वाट पाहायला लागायची. एकटं खाताना, घरची आठवण यायची. आणि त्यात भरीला माझ्या मनाचे भित्रे कोपरे तर कधीच मला सोडायचे नाहीत. ते आठवलं की माणसांची, आपल्या माणसांची किंमत कळते. आजारी असताना, स्वतः:च सगळं करताना रडायलाही यायचं आणि कशाला हे सगळं हवंय, कुणी सांगितलंय इथं राहायला,असंही वाटायचं. पण आज वाटतं त्याच दिवसांनी मला स्वत:चा वेळ स्वत:साठी आनंदात कसा घालवायचा हे शिकवलं. ते अनुभव आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहेत याचाच आनंद आहे. . :-)
-विद्या.

Friday, April 13, 2007

कुणीतरी हवं असतं.....

मी Engg साठी बाहेर पडल्यानंतर घरी २-३ दिवसांत तरी फोन व्हायचाच. एरवी मी आईशी कितीही बोलले तरी परिक्षेच्या वेळी मात्र दादांशी आधी बोलायचे. का? कारण मी अभ्यास करत नाही, नुसती भटकंती करते, आणि पूर्वीसारखे मार्कही मिळत नाही याबद्दल आईकडे कितीही तक्रार केली तरी माझ्याशी फोनवर बोलताना ते प्रेमाने नेहमीच्या सूचना देतच असत. "कशाचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. ज्या प्रश्नांच उत्तर येतं ते आधी लिही, मग बाकीच्यांचा विचार कर, आधीच्या पेपरचाही विचार करु नकोस. इ.इ....." आजही कधीतरी घरी फोन करून सांगितलं ना की काम खूप आहे, कामाचा कंटाळा आला आहे, इथं रहावंस वाटत नाही, की ते म्हणतात, त्रास होत असेल तर नको राहूस तिकडे. निघून ये परत. आपल्याला काही नोकरीवाचून अडलं नाहीये. कधीतरी ते असंही म्हणाले होते की, "तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल, कशाला तो नोकरीचा त्रास? " :-) आता माझं एका ज्वारीच्या पोत्याने भागणार असतं तर किती बरं झालं असतं. पण केवळ बोलल्यामुळेही किती बरं वाटतं. असंच कुणीतरी हवं असतं.....
कितीतरी वेळा सगळी गणित चुकत जातात आणि मागे फिरून ती दुरुस्त करणंही अशक्य होऊन जातं.बरेच वेळा सर्व प्रयत्न करुनही आपल्या हातात काहीच नसतं. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं,समजावणारं, "सर्व काही ठीक होईल". दोघांनाही माहीत असतं की सगळं ठीक होणं अवघड आहे, तरी त्या शब्दांनी जो धीर मिळतो तो वेगळाच. कधी वाटतं, झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून धीर देण्याइतकं प्रेम कुणी आपल्यावर कसं करु शकतं? ते फक्त आई-बाबाच करु शकतात किंवा आपले खरे मित्र-मैत्रिणी.नाहीतर माझ्यासारखे लोक आधी, 'बघ, मी सांगितलं होतं.....' या वाक्यानेच सुरुवात करतात. :-) कुठल्याही अडचणीत असताना, उपाय शोधायचं सोडून ती चूक तुझ्यामुळे झाली की माझ्यामुळे यावरच वाद घालत बसतात आणि मग नंतर साथ न दिल्याचा पश्चाताप करतात. जित्याची खोड....! मी कशीही असले तरीही मी निराश असताना सांभाळणारं, समजावणारं कुणीतरी हवंच असतं......
-विद्या.