Friday, May 15, 2009

काय करावं?

परवा ना खूप दिवसांनी online radio वर दिल चाहता हॆ मधलं तनहाई गाणं लागलं होतं. अर्थात गाणी चालूही असली तरी प्रत्यक्षात त्यात मन अडकलंय असं आजकाल फार कमीच होतं. त्यातही गायकाचा आवाज ऎकून त्याचं कौतुक करावंसं वाटावं किंवा शब्दांनी उदास/आनंदी व्हावं हे अजूनच दुर्मिळ. असो. पण DCH मधला एकटा फिरणारा आमीर आठवला आणि पुन्हा एकदा त्याची लवस्टोरी बघावी असं वाटलं. मग म्हटलं राहूच दे. आजपर्यंत एकदाही असं झालं नाहीये की DCH पाहिलाय आणि उदास झाले नाहीये. खरंतर त्याचा शेवट किती सुखदायी आहे अगदी positive ...त्यातली अवखळ प्रीति झिंटा,उनाड आमीर, विचारी अक्षय आणि मजेशीर सैफ आणि त्यांची ती निखळ मैत्री...सगळंच कसं हवंहवसं...पण पण तरीही मनाला कसली खंत लागून राहते तो पाहिल्यावर माहीत नाही. विशेषत: रविवारी संध्याकाळी तर तो अजिबात पाहू नये. बरं झालं आज लिहिलंच याबद्दल ते. परत राहून गेलं असतं.
घाई करायचं कारण म्हणजे परवा संदीप २९ वर्षाचा झाला, लवकरच मीही होईन. मग वाटलं कशाला वेळच मिळत नाहीये किंवा मीच कुठल्यातरी तंद्रीत असते आणि खूप काही राहूनच जातय. बघताबघता सानू दोन महिन्यांची झाली. तिचे थोड्या दिवसांपूर्वीचे फोटो पाहून वाटलं अरे ही किती मोठी झाली, तिला सारखं बघत राहिलं पाहिजे, नाहीतर वर्षभराची होईल आणि तिला मनभरून पाहिलंच नाही असं वाटेल. बरं आपण मोठे होतोय म्हणजे आई-दादाही वयस्कर होताहेत. दम लागणारी आई आणि गोळ्या घेणारे दादा पाहिलं की पोटात कालवतं. वाटतं कुणीच मोठं नको व्हायला. मीही आणि तेही.
आमची ३री anniversary झाली मागच्या महिन्यात.बघता बघता इतकी वर्षे निघून गेली. ८ वर्षापूर्वीचा तो अजूनही डोळ्य़ांसमोरून जात नाही. त्याचं ते हसू संसारात हरवून जाण्याआधी त्याच्याबरोबर आपणही हसलं पाहिजे.
सानुसाठी आई-दादा घर सोडून इतके दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, फिरून सर्व दाखवलं पाहिजे. उद्या जातो म्हणतील तर काय करू? TV,laptop सर्व बंद करून नुसतं समोर बसून राहिलं पाहिजे त्यांच्या. आईच्या हातचं खाल्लं पाहिजे त्यात चुका न काढता...... सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री उशीरा झोपलं पाहिजे. अगदी आला आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला पाहिजे. काय करावं काही सुचत नाहिय़े.कुणीतरी थांबवता का रे हे संपणारे दिवस?
-विद्या.

Monday, February 16, 2009

प्रेमा तुझा रंग कसा?

नुकताच व्ह्यालेंटाईन्स डे झाला, झाला म्हणजे काय नेहमीसारखा एक शनिवार संपला. सकाळचे चहापाणी, Doctor ची भेट, मग थोडीफार खरेदी, घरी येऊन साफसफाई, जेवण-खाण आणि झोप. या सगळ्य़ामधे अगदी दुकानात जाऊनही साधे गुलाबाची फुलं कितीला होती हे बघणंही झालं नाही किंवा तो माझ्यासाठी घेईल का ही उत्सुकताही नाही की त्याने घेतलीच नाहीत म्हणून दु:खंही नाही. म्हणजे अगदी आई-दादांनी तो दिवस घालवावा तसा आम्ही पण घालवला म्हणायचा. अर्थात लग्नाच्या काही वर्षानंतर लोक असेच होत असतीलही, होय ना? :-) तर मी, आम्ही गेल्या थोड्या वर्षात साजरे केलेले १४ फेब्रुवारी आठवत होते, त्याबरोबरच बदलत जाणारं आमचं नातं आणि प्रेमही.
पहिल्या दोनेक वर्षी, किती बावळट होतो ना आम्ही, फुलांवर, ग्रीटिंग कार्डवर पैसे खर्च करायला.(म्हणजे मी तरी, मुलं काय नेहमीच व्यवहारी असतात म्हणा) :-)) पण त्या दिवशी त्याला न भेटता रहायला लागणं म्हणजे कुणीतरी काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं वाटलं असतं. ’मै उसके बिना जी नही सकती’ टाईप आमचं प्रेम. :-P मग पुढचे दोन वर्षं नोकरीसाठी दोन वेगळ्य़ा ठिकाणी, कधी वेगळ्याच देशात होतो. तिथेही मग त्याने साधं कार्डंही पाठवलं नाही म्हणून भांडणं, हिरमुसले होणं हेही झालं. पण तोपर्यंत आम्ही १४ फेब. ला न भॆटता राहू शकतो हे मनाने स्विकारलं होतं, अर्थातच आम्ही मोठे झालो होतो बहुतेक. :-) लग्नानंतरही तसं फारसं नाविन्य नव्हतंच राहिलं काही पण पहिला दिवाळी-दसरा कसा साजरा करतो तसा हाही दिवस साजरा करुन घेतला. आजकाल पहिल्या वर्षातल्या सणात, दोघांचे वाढदिवस, साखरपुड्याची anniversary, etc पण येतात बरं का. असो. तर नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर उरलं होतं ते आमचं सोबत रहाण्याने, एकमेकांबद्दल नवीन नवीन जाणून घेतल्यानंतरचं प्रेम. म्हणजे, मी दोन महिने सुट्टीला गेले तेव्हा, तो एकटा कसा राहील, काय खाईल, इ. काळजीवाहू प्रेम.
पण या सगळ्यापेक्षा, हा १४ फेब्रुवारी वेगळाच होता. अगदी अगदी वेगळा. विशेषत: गेला एक आठवडा जसा गेला त्यानंतर अजूनच. मागच्या शनिवारी Doctor ने बेड-रेस्ट सांगितली मला.शनिवारचा दिवस आम्ही दोघेही जरा घाबरलेलेच होतो, अचानक admit व्हायला सांगितल्यावर. मग तिथे राहिलेले ६/७ तासही कित्येक महिन्यांसारखे वाटले. शुभांगी-राम आले होते म्हणा धीर द्यायला, पण त्यादिवशी उगाचच आपण कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायला अजूनही किती लहान आहे असं वाटलं. आई-दादा असते तर किती बरं झालं असतं ना. असो.
घरी आल्यानंतर त्याने माझी जशी काळजी घेतली ते पाहून कसंसंच होतं होतं. मी आमच्या दादांना आजोबांची आणि आईला आमची अशी सेवा करताना पाहिलं आहे. पण त्यासर्वामधे आणि नवऱ्याने करण्यामधे कितीतरी फरक होता. त्याने अगदी उठवण्यापासून, परत गादिवर आणून झोपवणे, पाणी-जेवण अगदी हातात आणून देणे आणि नुसते पायमोजे घालणेही मला जमत नाही म्हणून पळत येऊन ते घालून देणे, हे सर्व (आई-वडील सोडून) कुणीतरी माझ्यासाठी करण्याची पहिलीच वेळ होती.मी कधी काही काम करायला उठले तर, तू जाऊन बैस पाहू म्हणणारा तो वेगळाच वाटत होता मला. :-) हे सर्व तो करत असताना मला जाणवलं की आमचं ते एकेकाळी फिल्मी वाटणारं प्रेम आता कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर आहे. तो माझ्यासाठी इतकं करू शकतॊ हे कधी माहितच नव्ह्तं मला, इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही त्याचा वेगळाच पैलू मला दिसला होता. माणूस अंथरूणाला खिळल्यावर त्याला बरेच साक्षात्कार होत असावेत, कोण आपलं, कोण परकं याचे. लग्नाच्या बंधनात जेव्हा माणूस अडकतो तेव्हा किती काय-काय वचनं तो देऊन बसतो ना? म्हणजे सप्तपदी चालताना किंवा 'Do you promise to be with her in Sickness and Health?' याला ’I Do' म्हणताना कुणाला कल्पनाही नसेल पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं.
काल रात्री तो झोपल्यावर त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून जे प्रेम वाटत होतं, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे फक्त थोडे दिवस, कारण आणखी थोड्या दिवसांत हे नातं अजूनच वेगळं होणार आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. :-)
-विद्या.

Wednesday, January 28, 2009

मी खूष आहे !!

आता हे जाहीर करण्याची काय गरज? तर ही जाहीरात नाही फक्त एक statement आहे. झालं असं की खूप दिवसांपासून मला इच्छा होत होती एक भाजी खाण्याची, शेंगसोला. आता कितीतरी लोकांना हे नाव माहितही नसेल. संक्रातीच्या आधी, भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतात. पण मग त्याला लागणाऱ्या भाज्याही विचित्रच आहेत. पावटा, ओला हरभरा, वांगं, गाजर, शेंगदाणे, बोरं इ. :-) एकतर हे combination किती odd आणि तेही अमेरिकेत यातला ओला हरभरा, ताजा पावटा मिळणं अजून दुर्लभ. पण यावेळी माझं नशीब जोरावर होतं. मला या सर्व भाज्या मिळल्या अगदी ताज्या. आणि भाजी केल्यावर त्याची चवही अगदी आई करते तशीच....... :-P मग त्याबरोबर तीळ लावलेली बाजरीचीच भाकरी हवी. :-) ते पीठ काय मिळतंच, पण चक्क जे मिळालं त्याची एक अखंड भाकरीही झाली. नाहीतर दोन-तीन तुकडे पडल्याशिवाय भाकरी काही होत नाही इथे. एकूण काय तर मला जसा हवा तसा शेंगसोला आणि भाकरीचा बेत पार पडला. अगदी संदीपला वाटीभरच मिळेल असं सांगून उरलेला सर्व संपवूनही टाकला आणि तृप्तीची एक ढेकर दिली................. :-) ........... म्हणून मी खूष आहे!!!
हे सगळं लिहिण्याचं कारण असं की ’मी खूष आहे’ जेव्हा असं म्हणत होते तेव्हा लक्षात आलं की आजकाल दिवसभरात किंवा अगदी महिन्याभरात आपण असं कितीवेळा म्हणतो की मी आज खूष आहे? त्यासाठी मग अगदी छोटं कारण असो नाहीतर खूप मोठं. मग स्वत:बरोबरच बाकी लोकांचं निरीक्षण करताना दिसलं की आजूबाजूलाही कितीतरी लोकं आहेत की ज्यांना ’I am happy today !' असं म्हणायला अगदी जीवावर येतं. दिवसभरात आपल्याला आनंदी असण्यासाठी एक कारण मिळू नये?
एखाद्या सोबत काम करणाऱ्या माणसाने म्हटलं, how are you? तर आपण पटकन 'Good' म्हणून सोडून देतो, तेच एखाद्या प्रेमळ मित्राने विचारले, ’काय रे कसा आहेस’, तर ’अरे एकदम मजेत’ असं म्हणायला काय पैसे पडतात का? मी समजू शकते की आपली दु:खं जवळच्याच माणसांना सांगता येतात, पण म्हणून रडतच रहायचं? आज काय खूप थंडीच आहे, उद्या काय कामच खूप होतं, परवा अजून काहीतरी.
एका व्यक्तीला जुन्या नोकरीत रहायचा अगदी कंटाळा आला होता. मग नोकरी शोधण्याची मारामार कशी चालू आहे याबद्दल दु:खं. नवीन नोकरी मिळाली तर पूर्वीचीच कशी बरी होती याचं रडगाणं. मग म्हटलं बाबा घरी जाऊन ये. आता भारतात आई-बाबांना भेटलास, सही वाटत असेल ना? असं विचारलं तर कसलं काय. इथे येऊन आजारीच पडलॊ म्हणून दु:खं. काय त्रास आहे राव लोकांना?
असंच जर चालू राहिलं तर मग यांना आनंद तरी मिळतो कधी आणि कशात? बरं, यांचं आयुष्य काही अगदी वाईट चाललेलं नसतं. रोजचं जेवण-खाणं, रुटीन अगदी सिनेमाला जाणं, फिरायला जाणं अशी करमणूकही चालू असते. मग जवळच्या माणसाने विचारलं की बाबा कसा आहेस तर लगेच तोंड वाकड करायला काय होतं?
मला अजून एक गोष्ट आता ध्यानात आलीय की हे रडणारे लोक नुसते स्वत: रडत नाहीत तर समोरच्याला असं भासवून देतात की तुला काय,तुझं सर्व ठीक चालू आहे ना. म्हणजे नुसतं स्वत: दु:खी नाही रहायचं, समोरच्याला तू सुखी असण्याचा गुन्हा केलायस असं वागवायचं. मग अशा लोकांशी बोलताना स्वत:चा आनंदही व्यक्त करता येत नाही का तर ते दु:खी आहेत. जणू काही यांच्या दु:खाला समोरचाच जबाबदार आहे. या सर्व लोकांनी कदाचित आयुष्यात खरी दु:खं भोगलीच नाहीत बहुतेक म्हणून कारणं उकरून काढून रडत राहतात. पण खरं सांगू मला एक कळलं आहे, Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it.
तर एकूण काय की ’मी खूष आहे’ हे म्हणणं प्रत्येकाच्या ’बस की बात नही’. होय ना? जमलं तर स्वत:ला कधी हा प्रश्न विचारून बघा काय उत्तर मिळतं. :-)
मधे एकदा एका जुन्या ’मित्राने’ विचारलं, ’कशी आहेस गं? घरचे सर्व मजेत ना? संसार कसा चाललाय?’ आणि सर्वात शेवटचा त्याचा प्रश्न होता,’ सुखी आहेस ना?’ त्या प्रश्नावर खरंच मला एका क्षणात माझ्याकडे असणार्या सर्व गोष्टींची जणू यादीच डोळयासमोर दिसली आणि एक मिनिट विचार करून समाधानाने उत्तर दिलं,’ होय, सुखी आहे मी. :-) ’ त्यावर त्याने फक्त ’:-)’ उत्तर दिलं आणि निघून गेला. पण पुढचे पाच मिनिटं मी सुन्न होऊन बसले होते.
-विद्या.
(खूप महिन्यांनी लिहित आहे आणि अगदी जसं डोक्यात येतंय तसं. गोड मानून वाचून घ्यावे ही विनंती. :-) )