Wednesday, December 05, 2012

कस्टम-मेड

       परवा थॅंक्स गिविंग वीकेंडला शॉपिंग केली, खूप ! म्हणजे मागच्या वर्षीसारखी रात्री बारा वाजता नाही गेले दुकानात. पण दुसऱ्या दिवशी दिवसभर फिरत राहिलो. कपडे, शूज, घड्याळे, पर्स, स्वेटर, सगळं घेतलं. अगदी गिल्टी वाटेपर्यंत! मग दुसऱ्या दिवशी जाऊन जे नको होतं ते परत करूनही आले, तेव्हा जरा बरं वाटलं. आता जे हवंय ते सर्व घरात आल्यावर, माझी ट्रायल सुरु झाली, हा शर्ट, हा टॉप, ही जीन्स, कशी बसते, कसे दिसतेय. त्यात सानुचे ही ट्राय करून झाले. तिचा उत्साह बघून हसू येतं. म्हणजे 'शेवटी मुलगी कुणाची आहे?' असं  वाटून. एखादा कपडा किती चांगला बसला, कसा दिसला याने माणसाला किती फरक पडावा? :) मला तर खूपच. असो तर ट्रायल झाल्यावर सगळे कपडे, वस्तू घड्या करून ठेवून टाकल्या.
        आधी जो नवीन वस्तू आणल्यावर ती लगेच दुसऱ्या दिवशी जगाला दाखवलीच पाहिजे हा नियम जरा कमी केलाय. ( वय झालं बहुतेक, किंवा पोरांनी पेशन्स वाढवला आहे). आणि घातला तो ड्रेस तरी पहिल्यासारखी मजा नाही येत. (लग्न झाल्यावर कोण विचारतय म्हणूनही असेल म्हणा. :) ) पण  शर्ट, टॉप, जीन्स, पर्स, या सगळ्या गोष्टीना भारतात असताना घेतलेल्या ड्रेस ची सर नाहीच ना. म्हणजे उत्साह निम्मा होऊन इतकी खरेदी करतेय तर निम्माच राहिलेला बरा. तरीही तेव्हा जी मजा यायची ती येताच नाही इथे. मध्ये मैत्रिणीने मेल केली होती, आईकडे गेले होते, तिच्या दोन साड्यांचे ड्रेस शिवायला टाकले. त्यात मुलीचाही ड्रेस कसा बसला तेही. मला तिचा खूप हेवा वाटला. हजार दोन हजार डॉलर खर्च करूनही मला तिच्या त्या ड्रेसचा हेवा वाटत होता.
        तर हे ड्रेस शिवायला टाकणे हे प्रकरणच एकूण मजेशीर. एक सोहळाच तो. दिवाळी, लग्न, नवीन  नोकरी, वाढदिवस असा खास दिवसांसाठीची ही खरेदी. एकतर मित्र-मैत्रिणी सोबत केलेली किंवा घरच्यांसोबत. त्यामुळे कंपनीचा आनंद वेगळाच. तर एक हेतू मनात ठेवून असं नेहमीच्या ठरलेल्या 'रोडवर' जायचे. तिथे पहिली दोन-चार दुकाने नुसती बाहेरूनच बघायची. बरेच वेळा  दुकानात सारख्याच स्टाईलचे कपडे असतात. आपल्याला त्यातला नवीन स्टाईलचा तर हवा असतो पण तरीही वेगळा. थोड्या वेळाने एखाद्या दुकानाच्या बाहेर लावलेला ड्रेस आवडतो. हा ड्रेस म्हणजे पुतळ्याला गुंडाळलेले कापडच. तर ते आवडते म्हणून आत जाऊन विचारायचे, 'कितीला हो?' त्याची किंमत जर बजेटच्या बाहेर असेल तर मग प्रश्नच मिटला. लगेच पुढे जायची तयारी दाखवायची. आणि समजा तो असला आपल्याला हवा त्या रेंज मधला तरीही तो खाली घेतला आहे आणि लगेच पसंत करून पैसे देऊन घरी घेऊन आलोय असे कधी तरी झालेय का? ते ड्रेस मटेरियल आवडले तरी ते बाजूला ठेवून आणखी काही आहे का हे विचारणे आलेच. अजून थोडे पॅटर्न पाहिल्यावर मगआधीचाही चांगला वाटत नाही. आणि काहीच न घेता दुसऱ्या दुकानाकडे रवाना व्हायःचे.
          खरेतर मनात अजूनही तो पहिलाच ड्रेस असतो. बाकीचे कपडे पाहणे हे फक्त त्या आधीच्या ड्रेसला नक्की करण्यासाठी केलेले नाटकच. खूप कमी वेळा असे झाले असेल की मी पुढच्या दुकानात जाऊन ते इतके आवडले की मी परत मागे गेलेच नाही कधी. कधीतरी अगदीच नाही काही आवडले तर एखादा कपड्याचा तागाही पहिला आहे मी. मग त्यात कुर्त्यासाठी किती कापड लागेल तो हिशोब आलाच. त्याला मॅचिंग सलवार चे कापडही शोधायचे. त्यात पिवळा जास्त चांगला की नारंगी हा वाद. कधी दुकानाच्या बाहेर जाऊन उजेडात कापड बघावे म्हणून बाहेर घेऊनही गेले आहे मी. तर कधी एखादा ड्रेस आवडला पण त्याची ओढणी अगदीच काहीतरी होती म्हणून तो नाकारला असंही झालं आहे. अनेक चर्चा, विवाद, बजेट, रंग, दुकानदाराचा एटीट्यूड हे सगळे बरोबर जमले तर मग एक ड्रेस मटेरियल घेऊन त्या दुकानातून बाहेर पडायचे. तोवर जोरदार भूक लागलेली असते. मग रस्त्यात भेल, दाबेली सारखे भयंकर आवडणारे पदार्थ खायचे आणि पुढच्या लढाईला सज्ज व्हायचे.
           हो लढाईच ती, शिंप्याकडे जाण्याची. कुठल्यातरी कोपऱ्यातल्या दुकानात किंवा छोट्याशा घरात जायचे आपला हा 'भारी'चा ड्रेस घेऊन. मी तरी आजतागायत असं खूप मोठ्ठं दुकान आहे शिंप्याच किंवा मोठ्ठा बंगला आहे असं कधी पाहिलं नाहीये. तर त्या टेलर कडे आपले ड्रेस मटेरियल घेऊन जायचे. तिथे रांगेत असलेली बाई/मुलगी आपले मटेरियल कसे शिवायचे ते सांगत असते. तिने आणलेले मटेरियल दुकानात पाहिले होते आणि आपण नाही म्हटले होते यावरून मग खाणाखुणा. टेलर कडे एक बारका पोरगा असतोच नेहमी. तो कुठल्यातरी अजून एखाद्या मुलीचा ड्रेस घेऊन आणून देत असतो. तिचा तयार झालेला ड्रेस, त्याचा पॅटर्न हे चोरून बघून घ्यायचे. मग अगदीच कंटाळा आला तर समोर टांगलेले ड्रेस बघत राहायचे. तेव्हढ्यात मग टेलर दोन-चार पुस्तके आणून देतो. त्यात एक सर्व गळ्यांचे डिझाईन असलेले, एक अख्खा ड्रेस दाखवणारे, एक बाह्यांचे डिझाईन असलेले अशी सगळी पुस्तके चाळत बसायचे.
        शेवटी आपला नंबर येतो. मग त्याच्या समोर अभे राहायचे हात आडवे बाहेर काढून. तो मापे घेणार, मान, गळा (मागचा, पुढचा), दंड, हाताची लांबी, छाती, कंबर, हिप्स (मराठीत काय म्हणतात आठवत नाही), पोटऱ्या, पायाचा घेर, कमरेपासून पायापर्यंतची उंची, खांदा, अशी सगळी मापे घेतो तेही तुम्हाला अजिबात विचित्र न वाटू देता. त्यात मग त्याला सांगायचे, मागच्या वेळी हाताची उंची ६ घेतली होती खूप लांब झाले होते, यावेळी साडेपाच घ्या. मग ड्रेस चा कट कसा चुकीचा होता ते बोलायचे. सगळी मापे घेऊन आणि काढून झाल्यावर कुठल्या टाईप चा गळा (पंचकोनी, गोल, बोट, चौकोनी, की अजून काही), मग बाहीला घुंगरू की नुसती गाठ की गोट लावायचा, कट किती वरपर्यंत घ्यायचा, मागचा गळा किती आणि पुढचा किती ठेवायचा, सलवार कसली शिवायची, सर्वकाही ठरवायचं. शिंपीदादा त्याच्या कोड लिपीत हे सर्व टिपून घेतो. आणि अगदी आपल्याला हवी त्यानंतर १५-२० दिवस उशिराची तारीख सांगतो. मग सर्वांनी,'काय हे, दिवाळी झाल्यावर ड्रेस देणार का? वगैरे टोमणे मारायचे.मग तो आपल्याला हवा त्याच्या दोन दिवस आधीची तारीख देतो. ती ठरली की मग शिलाई किती जास्त म्हणून बोलायचे. तर एकूण सर्व काम होईपर्यंत थकून जायला होतं. आता तिथून बाहेर पडून फक्त एकच काम असतं. आपला ड्रेस कधी मिळणार याची वाट बघायचं.
        हे शिंपी लोक पण ना, चांगले मिळाले तर आपलं नशीब उजळलं म्हणायचं. घरी होते तोवर आईच कपडे शिवायची. तेंव्हा या बाहेर शिवलेल्या, तयार मिळणाऱ्या ड्रेसचं खूप आकर्षण वाटायचं. बारावी नंतर सांगलीला माझ्या मावस बहिणीचा एक टेलर होता. विश्रामबाग वरून सांगलीत येऊन त्याच्याकडे ड्रेस शिवायला टाकायचे. अर्थात तेव्हा फक्त वर्षातून एक दोनच ड्रेस मिळायचे. त्यामुळे ते म्हणजे मोठं काम असायचं. नंतर पुण्यात हाय फैशन च्या समोरच्या बिल्डींगमध्ये एकाकडे जायचे. आतेबहीणीने सांगितलेला. नंतर शर्मिलीच्या समोरच्या बिल्डींगमध्ये द्यायचे, बहिणींनी सांगितले म्हणून. पण माझा मी शोधलेला टेलर म्हणजे मुंबईचा. तो नुसता शिवायचा नाही तर त्यावर इम्ब्रोयडरी पण करून द्यायचा. आणि माझे त्याने शिवलेले जे ड्रेस होते तसे परत कुणाकडेच मिळाले नाहीत. बोरीवलीमध्ये छोट्याशा खोलीत घर आणि मशीन होतं त्याचं. माझं माप लिहूनच ठेवलेलं. एकदा तर मी अमेरिकेत असताना संदीपने ड्रेस मटेरियल आणून त्याच्याकडे शिवायला दिले होते. आणि त्याने तो इकडे आणल्यावर एकदम मस्त बसला होता ड्रेस तो. खूप आनंद झाला होता मला. तर असे हे टेलर-शिंपी जे म्हणाल ते.
        शेवटी ड्रेस घेऊन यायचा दिवस उजाडतो. तिथे जाऊन तर ट्राय करता येत नाही, रिमेम्बर छोटी खोली?  त्यामुळे जे जमेल ते तिथे चेक करायचे. पण हे सर्व तुमचे नशीब चांगले असेल तर. कधी कधी ड्रेस शिवून झालेलाच नसतो. किंवा झालाय पण हातशिलाई  राहिली आहे, बटन लावायचे राहिले आहे, इस्त्री राहिली आहे, थोड्या वेळात परत या देतो करून अशी सर्व नाटकं करून तो ड्रेस मिळतो एकदाचा. केंव्हा एकदा घरी येऊन घालून बघेन असं होतं मग. कधी तरी मी एव्हढं सांगूनही त्याने ऐकले नाही म्हणून चिडचिड होते. पण जेव्हा सर्व बरोबर असतं आणि तो ड्रेस मस्त बसतो तेंव्हाचा आनंद वेगळाच. मग तो ड्रेस कॉलेज, ऑफिसला, पार्टीला घालून मिरवणे याचा अजून वेगळा.
       आता या सर्व प्रकरणात माझे हे असे मॉल मध्ये स्वत:च जाऊन आणलेले जीन्स, टॉप कुठेतरी तुलना करू शकतील का? यावेळी गेले तेंव्हा शिवायला वेळ नाही म्हणून मी ही तयारच ड्रेस घेऊन आले. पण मॉल मध्ये मिळणारे ते 'मिक्स आणि मॅच' मला परकेच वाटले. परवा दिवाळी म्हणून ऑफिसमध्ये तो रेडीमेड ड्रेस घालून गेले. ज्युडी वेडीच झाली बघून.'म्हणे मला असे वर्क करून पाहिजे ड्रेस वर'. म्हटले अगं वेडे, हे तर काहीच नाही. इथे अख्खा ड्रेस डिझाईन करून घेतो आम्ही, पाहिजे तसा, एकदम कस्टम. त्याची या ड्रेसशी काय तुलना?' तर ती म्हणे,'मला का नाही मिळणार असे सर्व कस्टम. इथे आपले साच्यातलेच कपडे घ्यायचे'. म्हटले, 'बरोबर आहे गं, मलाही आता हे साच्यातलं आयुष्य कंटाळवाणं झालं आहे. काहीतरी कस्टम केलंच पाहिजे'.

-विद्या.   

बेमालूम मिश्रण

       झोपायला जाता जाता फेसबुक वर चिन्मयने टाकलेली कमेंट वाचली. माझ्यासाठीच होती ती. तो म्हणे,'विद्या, हम लोग खाना खाने जायेंगे, मुव्ही जायेंगे'. :) आता खरं तर त्या वाक्याचा रेफरन्स मला आठवतही नाहीये नीट. पण कधीतरी एकदा मुंबईत असताना उत्साहात बोललेलं वाक्य ते. ते हि माझ्या तेव्हाच्या नाकातून बोललेल्या मराठी हिंदीमध्ये. पण माझ्यापेक्षा लोकांनाच जास्त लक्षात ते. परवा एकदा असेच एकाने एका फोटोवर कमेंट टाकली,'अल्फरोजी रॉक्स'  म्हणून. मग तेव्हा आठवले अरे हो, मी तेव्हा पुणेरी स्टाईल मध्ये तोंडाला रुमाल बांधून फिरायचे त्रिवेंद्रम मध्ये म्हणून पडलेलं हे नाव. मी विसरलेच होते ते. पण बाकी लोकांना मात्र या गोष्टी कशा लक्षात राहिल्या? 
        फक्त हेच नाही जेव्हा केंव्हा रश्मी, आरती अगदी शुभांगीशी बोलते तेंव्हा माझा सांगलीत असणारा माझा तो टोन आपोआप तोंडात येतो. म्हणजे मला बोलताना विचारही करावा लागत नाही आणि माझा टोन आपोआप आलेला असतो. मग तीच बोलण्याची पद्धत, तसेच जोरजोरात हसणे, तेच जुने लोकांचे विषय आणि आपल्या लक्षात राहिलेल्या त्यांच्या आपल्या बद्दलच्या आठवणी. त्या आठवणी मधली मी आणि मुंबईच्या ग्रुपमधल्या लोकांच्या आठवणीतली मी किती वेगळ्या ना? मग वाटले एकदा ना पल्लवी आणि शगुफ्ता त्यांना भेटले पाहिजे पण बहुतेक त्यांच्याशी बोलताना माझा तो कोरेगाव मधला टोन येईल की नाही माहित नाही. आणि त्यांच्या आठवणीमधली मी कशी असेन काय माहित. 
        परवा पुण्यातल्या संदीपच्या एका मित्राने मेल मध्ये लिहिले होते की विद्या अजूनही 'च्या मारी' म्हणत असेल का? तर 'हो, मी अजूनही म्हणतेच' पण त्याच्या आठवणीतली विद्या म्हणजे 'च्या मारी'. कित्येक दिवसांनी ब्लॉग वर आले तेंव्हा मग जुन्या लोकांचे जे ब्लॉग वाचायचे तिथे गेले आणि मग माझ्या या ब्लॉग मध्ये येणारी 'विद्या' त्या लोकांच्या आठवणीतली असेल का? 
       बरं, जर माझ्या बद्दल असे वाटते, तर मी तरी काय असेन? म्हणजे मीही बाकीच्या लोकांच्या आठवणीनीनी बनलेली असेन का? म्हणजे कुणाच्या बोलण्याच्या पद्धती, त्याचं हसणं, वागणं या सगळ्यांचं एक वेगळच मिश्रण म्हणजे मी का? आणि वेगवेगळ्या वेळी मी ज्या ज्या लोकांना भेटले ती, त्या वेळेपर्यंत भेटलेल्या सर्व लोकांचं मिश्रण होय ना? इन्टरेस्टिग वाटला तो विचार मला. आणि मला ज्या वेळेला जे लोक भेटले तेही त्यांना तोवर भेटलेल्या लोकांचं मिश्रण, बरोबर? आणि मला भेटून ते पुढे बाकी लोकांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्यात मीही आहेच त्यांच्या नकळत. :) पण म्हणजे लोक जेंव्हा आपल्याला भेटल्यावर म्हणतात, 'अरे तू अजिबात बदलली नाहीयेस'. तर ते बरोबरही आणि चूकही. कारण आपण बदललेले तर असतो पण ती जुनी व्यक्ती समोर आल्यावर परत त्याच जुन्या मिश्रणात जातो बहुतेक. ह्म्म्म... :) तर असे आपण सगळेच एक बेमालूम मिश्रण आहोत आणि युनिकही, कारण दुसरं कुणीही आपल्यासारखं नसणारच. अगदी सख्खे बहिण भाऊही. :) असो, झोपावं आता. उगाचच मी सध्या कुठल्या लोकांचं मिश्रण असेन याचा विचार येतोय. म्हणजे नको असणाऱ्या शेजाऱ्यांचही का? :)

-विद्या.
 

Monday, December 03, 2012

कन्फेशन पुढे चालू..

        मागच्या पोस्ट नंतर म्हटलं बघावं तरी काय होतंय गाणी लावून. म्हणून आज सकाळी एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसला जाताना गाणी लावली जगजीत सिंग ची. थोडासा पाउसही पडत होता. एकदम पोषक वातावरण अशी गाणी ऐकण्यासाठी. पाहिलं गाणं सुरु झालं, 'होशवालो को खबर क्या?' आणि एकदम धस्स झालं. कित्त्ती वर्षांनी आवाज ऐकतेय असं वाटलं. पुढे मग 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो..'. ते ऐकताना वाटलं की असे शद्ब कानी पडूनच किती काळ लोटलाय.
        १५-२० मिनिटांचा रस्ता तो. रोजच्या रस्त्यावर ३०मैल ची स्पीड लिमिट असते आणि जवळच पोलीस स्टेशन आहे हे लक्षात ठेवूनच चालवत असते.पण पुढची एकेक गाणी ऐकण्यात इतकी गुंग झाले की जाग आली ती मागे येणाऱ्या पोलिसाच्या गाडीनेच आणि त्याच्या सायरन मुळे. सगळ्या कल्पना, इ मनातच ठेवून जागेवर आले, गाडी बाजूला घेतली. पोलीस येऊन लायसन घेऊन गेला. म्हटले 'अरे मला आयुष्यात कधी तिकीट नाही मिळालं. आता नाही चालवणार जोरात'. पण तो बाबा कुठला ऐकतोय. त्याने मला तिकीट दिलंच. १२० डॉलर चा बांबू. :( आणि ४ तासाचा क्लास घ्यावा लागणार तो निराळाच. मग सगळा मूड गेलाच. कशी बशी ऑफिसमध्ये पोचले तर हे भाराभर इश्यू.
          संध्याकाळ पर्यंत वेळच मिळाला नाही विचार करायला. घरी यायला निघाले तेंव्हा सकाळी राहिलेली गाणी पुन्हा सुरु केली. त्यात मग 'बात निकलेगी तो' आलं, 'हजारो ख्वाहिशे ऐसी' आलं, आणि 'कोई ये कैसे बताये' पण आलं. पण ना फक्त गाणं आणि आवाज याच गोष्टीकडे लक्ष होतं आज. आधी असायची तशी उदास संध्याकाळ नव्हती ती. त्या गाण्यांना मागचा पुढचा कसलाही संदर्भ नव्हता. फक्त गाणी आणि आवाज. स्वत:लाच आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. म्हणजे पूर्वी ना त्या गाण्यांमध्ये फक्त जगजीत नसायचा, मी पण असायचे, माझी गोष्ट पण त्यात असायची. पण त्या गाण्यातून, त्या गोष्टीतून, त्या काळातून, आणि त्या चक्रातून कधी बाहेर पडले कळलंच नाहीये. आणि मला त्यात काही वाईट वाटतही नाहीये बहुतेक. कारण त्याच्या त्या आवाजातला दर्द आणि शब्दातील खोच आता जाणवली पण टोचली नाही.
मग विचार आला मी जरा काळ बदलला की कशी त्या दुखा:तून बाहेर आले. म्हणजे चिंता, काळजी, त्रास वगैरे असतातच पण दु:खं नाही. पण जगजीतला कसा तो आवाज आयुष्यभर ठेवता आला? कुठलं दु:खं होतं जे त्याला आयुष्यभर पुरलं काय माहित. तेव्हा वाटलं,' बरं झाला बिचारा सुटला त्यातून !' Rest In Peace !

विद्या.

Saturday, December 01, 2012

कन्फेशन

बरेच दिवस झाले मनात एक गोष्ट आहे. ती निदान बाहेर तरी येऊ द्यावी म्हटलं. मी शिकागोला आले तेंव्हा वाटलं होतं इकडे जगजीत सिंगच्या कॉन्सर्त होतात म्हणे इकडे. कॉलेज मध्ये असताना गेले होते एकदा शेवटच्या वर्षी. ती रात्र अजूनही आठवते. शेजारी उगाचच प्रत्येक गाण्याला वाह-वाह करत स्वत:च्या तारस्वरात गाणारा एक ग्रुप बसला होता. इतकी चिडचिड झाली होती. पण हलकासा पाउस पडला होता त्यादिवशी. सांगलीत असं थंड वातावरण कमीच पण त्यादिवशी होतं. परत कसे आलो आठवत नाही. पण आकाशाकडे बघत जगजीतचा आवाज ऐकत बसले होते तेच आठवत होतं. तर त्यानंतर परत जायचं होतं. ते काही झालं नाही.
         पण गाणी तर असायचीच सोबत. त्यांनी कधीच साथ सोडली नव्हती. मध्येच एखाद्या संध्याकाळी चुकून ऐकून रडू यायचं. तर कधी 'मरासिम' मध्ये गुलजार जा आवाज ऐकत बसावंस वाटायचं. आमच्या गाडीत MP३ प्लेयर नाहीये त्यामुळे एका सीडी मध्ये १२च गाणी बसायची कशीबशी. त्यामुळे एकदा बसून २-३ सीडी पण बनवून घेतल्या होत्या. त्याच ऐकायचे. संदीप असायचाच शेजारी पण गाण्यात असेल याची शंकाच होती. सानू झाल्यानंतर हे असं सीडी बनवणं बंदच झालं. आणि त्यात् ऑफिस ५ मिनिटांवर. त्यामुळे गाडी सुरु करून गाण्याची सुरुवात होते न होते तोवर पोचून जायचो ऑफिसमध्ये. त्यामुळे गाडीत गाणी ऐकणं बंदच झालं गेले ३ वर्षं तरी. त्या जुन्या सीडी कुठे आहेत काय माहित. एकदा अशीच एक सीडी दिसली गाडीत म्हणून लावलीही होती. तर तेंव्हा माझा आणि संदीपचा विषय झाला की बघू सानू माझी मुलगी का त्याची.:) आणि अगदी त्याचं ऐकून एका गाण्यातच झोपूनही गेली ती. तर तेव्हढाच काय तो संदर्भ गेल्या ३ वर्षातला.
          मध्ये एकदा पिंकीने ती कॉनसर्ट जाऊन आल्याचे स्टेटस टाकले होते फेसबुक वर. तेव्हा हेवा वाटला होता. आणि ती बहुतेक त्याची शेवटची कॉनसर्ट होती. त्यानंतर फक्त बातमीच वाचली RIP म्हणून. आणि खरं सांगू का, ती बातमी कधी आली, काय झाले होते, काहीच वाचलं नाही. फक्त लोकांच्या स्टेटस वर 'लाईक' केले आणि मोकळी झाले. पण मधेच मनात विचार येतात मी इतकी कशी निरस झाले आहे? आय मीन, कुणी 'गेलं' आणि डोळ्यात एक अश्रूही नाही? बरं ते जाऊ दे, त्याच्या आठवणीत एखादं गाणं तरी ऐकावं? ते ही नाही. पाचेक वर्षापूर्वी, बातमी कळली की 'एव्हरी बडी लव्हज रेमंड' मधला त्याचा म्हातारा बाप जो होता तो गेला म्हणून. तर दिवसभर मला चैन पडली नव्हती. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा ती मालिका पहिली त्याची आठवण व्हायची. ज्या म्हाताऱ्याने इतकं हसवलं तो या जगात नाही म्हणून. आणि जगजीतसाठी एक गाणं नाही?
       कधी वाटतं अशी कोरडेपणाने जगत आहे म्हणून इतके दिवस घरापासून लांब राहू शकलेय. असेच राहात असतील का लोक आपल्या घरी परत न जाता, अनेक वर्षं आई-बाबांना न भेटता? कुठेही इमोशनल होऊच द्यायचं नाही स्वत:ला. जरा सेंटी पिक्चर आहे वाटलं की बदलून टाकायचा. पुस्तकं, गाणी असल्या कुठल्याही त्रास देणाऱ्या वस्तू मी गेले ३ वर्षं जवळ बाळगल्याच आठवत नाहीये. अर्थात पोरं हे सगळं करायला आणि विचार करायला क्षणभरही देत नाही हा भाग निराळा. आताही रात्री ३ वाजता बेबी मॉनीटर वर खुसपूस ऐकू येत आहे. असो. परवा बंडूला डेंग्यू झाल्याचं आई फोनवर बोलली आणि पोटात गोळा येतो म्हणजे काय हे जाणवलं. सगळं ढवळून आलं. म्हणजे काय करू काय नको इथे बसून हे कळेना. त्याचं सर्व ठीक होईपर्यंत काहीच सुचलं नाही. त्याचं सर्व नीट झाल्यावर असाच मनात विचार आला, मी निदान जिवंत असण्याचं चिन्हच आहे हे. फक्त परत असल्या परीक्षा नकोत.
         तर जगजीत बद्दल, आज संध्याकाळी परत विचार आला मनात ऐकावं का एखादं गाणं ? पटकन सीडी पण सापडली नाही. पण मनातून भीती वाटतेच. उगाच ऐकत बसायचे आणि अचानक आठवलं तो आता या जगात नाही म्हणून तर? आणि रडू आलं तर काय करायचं? नकोच ते. म्हणून राहून गेलंय. गिल्टी वाटत राहतं पण वाटतं पुन्हा कधीतरी. आज नको. बघू कधी येतंय ते रडू, अजून हिम्मत नाही झालीय. पण लिहून ते मान्य तरी करावं म्हटलं म्हणून हे कन्फेशन.

-विद्या.