Friday, April 04, 2008

हुरहूर

रविवारी संध्याकाळी रश्मीला बाय करून, जड मनाने दोघं गाडीत बसलो. कोलंबसमधे दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. पहिले पाच मिनिटं जरा शांततेतच गेले. रश्मी नसल्याने अजूनच शांत वाटत होतं. May be I was already missing her.
मग मीच म्हटलं ,'येताना शिकागोहून निघाल्या दिवशी खूपच ट्र्यफिक होती, तेव्हढी दिसत नाहिये, होय ना? बरं झालं उशीराच निघालो तिच्याकडून, तेव्हढाच वेळ सोबत घालवता आला.'
तोही मग, ' हो ना. काल पण म्युझियमला गेलो ते बरं झालं. एकतर बंदिस्त असल्याने थंडीचा त्रास नाही आणि एका दिवसात होण्यासारखंही होतं.'
माझाही होकारच त्याच्या बोलण्याला. मध्येच मला आठवण येते, 'आता परवा जाऊन भाज्या आणायला लागतील सर्व.' इ.इ.
आणि मग पुढचे ५-६ तासही असेच गेले दोन दिवस आठवण्यात घालवलेले नाहीतर मग घरात काय मागे सोडून आलोय त्याची चर्चा.
तसं हे नेहमीचंच. आमची मग कपिल-सोनालीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. आणि विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित गेला तो दिवस किती चांगला होता आणि परत तेच रुटीन असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर. की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
बरं हे ट्रिपचच असं नाही. दीडेक वर्षापूर्वी अर्णवचा पहिला वाढदिवस साजरा केला इथे. संध्याकाळी क्लब हाऊस मधून सर्व सामान आणायला आम्ही बरेच लोक मदतीला होतो योगिता आणि जी.टीं.च्या. एकेक करत सफाई करून क्लब हाऊसचा ताबा सोडला आणि घरी परतून सर्व जण योगिताकडे बसलो काही वेळ. पुन्हा तीच शांतता. :-) मी, आमचे अजून एक शेजारी, योगिता,जी.टी. सर्वच आपापल्या परीने काहीतरी विचार करत होते.
मग कोणीतरी बोललंच,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हाल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका योगिता कार्यक्रम.'
आणि अशा या गोंधळात आणि नवीन भेट म्हणून आलेल्या खेळण्यांना सोडून जुन्या चेंडूशी खेळणारा अर्णव अजूनही आठवतो आणि त्याचा क्यूट ड्रेस पण.कसला भारी दिसत होता. :-) असो. तर हे असं नेहमीचंच, आढावा घेणं आणि मनातल्या मनात एक हुरहूरही, की संपला तो दिवस अखेर ज्यासाठी गेले कित्येक दिवस पळापळ चालली होती.
या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. Imagine लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...
-विद्या.

13 comments:

Anand Sarolkar said...

Completely agree with you! Ashi ekhadi trip jhali ki nakkich thoda vel apan gela diwas athavnyat jato. Ekdum Trans madhe :-)

Nandan said...

विद्या, एखादी मैफिल किंवा ट्रिप संपली की वाटणाऱ्या हुरहुरीचा मूड पोस्टमध्ये परफेक्ट पकडला आहेस. गणपती विसर्जनानंतर ओकाबोका दिसणारा मंडप पाहताना किंवा मे महिन्याच्या सुट्टीत धमाल केल्यानंतर भावंडांचा निरोप घेताना असंच वाटायचं. मग आईस-ब्रेकर म्हणून किंवा रोजच्या रुटीनमध्ये परतायची सोय म्हणून असंच काहीतरी जुजबी बोललं जायचं

हे पोस्ट वाचून गदिमांच्या ’जोगिया’ कवितेचं पहिलं कडवं आठवलं. सरलेल्या मैफिलीचं वर्णन करणारं -

कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल सोडुनि अंग
दुमडला गालिचा तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ लवंगा साली

Anand Sarolkar said...

Wah! Nandan...ekdum samarpak oli... sahee.

Parag said...

:) Kharay. Ekhadya karyakramchi tayari karnyapeksha nantarchi awraawri faar jivavar yete mag to karyakram successful zalela aso kinwa nahi..
Chan lihilay post.. !

Bhitri Bhagu said...

Tuzya post chi vat pahat aahe

Meghana Bhuskute said...

where are you??????

Monsieur K said...

there's a certain feeling of emptiness. the mind is still trying to come to terms with the fact that the event is over. sagli dhadpad karun jhaaleli aste. pudhe kaay, hyaacha vichaar nasto.

shabdaat mast capture kela aahes.

had this feeling of emptiness, the day of the BE project viva - after the viva was over, sat in the mech porch at MIT (my engg college in Pune) for a few minutes and realised that 4 years are over! :)

tujhi post vaachtaanaa, ekdam tya divasaachi aathvan jhaali :)

april nantar punha kahi lihila naahis?

Alexander Supertramp said...

last writeup was in april..
its july now. U busy with smthng ?

Shardul said...

chan lihila aahes....

aaj ase anek karyakram athawale ki te sapalyawar ase watayache " ha karyakram ka sampala ?"

aase anek kshan athawatat ki jevha manat yeta..."hi wel ethec thambun jawi ...pudhe jauch naye.. "

Abhi J said...

नमस्कार,
आपल्या ब्लॉग वरील लेख वाचून खुप छान वाटते. आपल्या ब्लॉगचे RSS फीड पर्सनल पेज वर add केले होते आणि इतराना देझिल recommend केले होते. परंतु गेल्या सहा- सात महिन्यात एकही लिखाण नाही हे पाहून राहवले नाही आणि म्हणुन ही comment पाठवन्याचा सगला प्रपंच करावा लागला. आपल्या ब्लॉग चे खुप लोक वाचक लोक Fan आहेत आणि ते आपल्या नव्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Abhijit Bathe said...

Vidya - what happened? Why did you stop writing?

Ketaki Abhyankar said...

लेख खुप छान लिहिला आहे. आवडला.
तू सांगली ची आहेस का? किंवा सांगली च्या वालचंद कॉलेज मधे computer branch ला होतीस का?

Anonymous said...

अप्रतिम ब्लॉग..
शब्द तर सुंदरच .. पण खूप खूप दुर्मिळ असं शुद्ध लिखाण..
माझा ब्लॉग कधी पाहिलात तर बरं वाटेल..
gnachiket.wordpress.com