Friday, March 09, 2007

गटबदल

काही काळापूर्वी मी एक लघुकथा लिहीली होती, 'त्रिशंकू'. त्याचा नायक आमच्य़ा ऑफिसमधला 'खलनायक'च (आमचा बॉस) होता. दोन आठवड्यापूर्वी आम्हाला कळलं की त्याचा 'मायबाप' बॉस आता बदलणार आहे आणि काय आश्चर्य, साहेबांची गाडी कधी नव्हे ते आमच्या छोट्याशा खुराड्याकडे (cubicle) कडे वळली. आम्हाला दुपारी जेवायला बरोबर येणार का विचारल्यावर तर नशिबच उजाडले. आता त्याने थोडा फार प्रयत्न केला आमच्या गटात यायचा पण पहिल्या २-४ दिवसातच त्याला आम्ही आमच्या गटातून कटाप केले होते. आणि त्याच्या कारवाया जाणल्यानंतर तर त्याला पुन्हा सामावून घेणे 'मुश्किल ही नही नामुमकीन' होते. पण आता त्याचे छायाछत्र हरविल्याने तो अगदीच बिचारा, फारच गरीब वाटत होता. त्याच्याकडे पाहील्यावर मला 'गटबदला' चा एक उत्तम नमुना मिळाला होता.
तसे भारताच्या इतिहासाच्या पुस्तकातच हे गटबदलाचे धोरण शिकविले जाते. मग ते मुघलांना शरण जाणारे असो वा इंग्रजांना. आज काल तर राजकारणी लोक घर बदलावे तसे पक्ष बदलतात.मग आमचा हा छोटा बॉस काय चीज आहे?कामापेक्षा बाकीच्या लोकांबद्दलच्या चहाड्या वरच्या साहेबाकडे करणे हेच त्याचं मुख्य काम असे. आणि आता तोच बदलल्यामुळे त्याला पुन्हा एकदा कुणाला तरी हाताला धरण्याची गरज भासत असावी.असो. आता नवीन माणूस नवं धोरण याप्रमाणे आमच्या यादीतील कामांची priority बदलली आणि नवीन साहेबाला खूश करण्यासाठी त्याची धावपळ सुरु झाली. आम्ही काय? आहे ते काम करणे आणि ५ वाजता घरी जाणे हे धोरण कायम ठेवलं आहे. :-) पण मला त्याचं आश्चर्य वाटलं जेव्हा एका जुन्या कामाचं श्रेय घेण्यासाठी सध्या तो आमच्या जुन्या साहेबाशीच स्पर्धा करु लागला. तसं पाहीलं तर काम करणारे आम्ही डेव्हलपर्स, आणि भांडण यांचं. :-) असो.
मला असं वाटतं की जर त्यानी खरचं काम केलं असतं तर त्यांना त्यांच श्रेय आपोआपच मिळालं असतं, त्यासाठी भांडायची गरज लागली नसती. (पण मला काय वाटतं याने कुणाला काय फरक पडतो म्हणा. ) अजून एक गोष्ट, जर त्याचे आपल्या जुन्या साहेबाशी चांगले नाते असते तर दोघांनाही एकमेकांबद्दल आदर वाटला असता आणि त्यांची मैत्री कायम राहिली असती. पण केवळ कामापुरता संबंध ठेवून स्वत:च्या कामापुरते गोड बोलणा़ऱ्या या लोकांना किती खरे मित्र लाभत असतील?मला मान्य आहे की मलाही आता शाळेत,कॊलेजसारखे जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी येथे मिळणार नाहीत. पण मग हे नुसतं नाटकी आयुष्य किती दिवस चालणार? त्यापेक्षा स्पष्टपणे,प्रामाणिकपणे वागणं सोपं नाही का? साहेबाची हांजी-हांजी केल्याने तुमचा फायदा होतंही असेल. पण तो किती दिवस? कधी ना कधी तर स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर एखादी गोष्ट मिळवावी असं या लोकांना वाटत नसेल काय?
बरं हे लोक जसे स्वत: वागतात तसेच बाकीचेही असतील असंच त्यांना वाटत राहतं आणि त्यांची असुरक्षिततेची भावना जास्तच वाढते. उदा: आमच्या या म्यानेजरला नेहमी वाटत असतं की आम्ही त्याला सर्व माहिती देत नाहीये, किंवा तो कामावर आला नसेल तर आम्हीही घरुनच काम करत आहे. याचं कारण? तो स्वत: तसेच करतो, वागतो. मग पुन्हा एकदा टीममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, एकाची माहिती दुसऱ्याला विचारणे, यासारख्या गोष्टी आल्याच. हा सर्व त्रास घेण्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांवरही त्याने विश्वास ठेवला तर त्याची कामे सोपी होतील असं नाही वाटत?
अशा लोकांची अजून एक मानसिकता म्हणजे 'Scarcity Mentality'. ही संकल्पना 'Seven habits of the Highly Effective People' मध्ये मी वाचली होती. (पुन्हा एकदा हे पुस्तक वाचायला हवं. चांगला होतं. :-) ) मी माझ्या त्या म्यानेजर मध्ये हीच मानसिकता पाहतेय.तर अशी मानसिकता असलेले लोक आपल्या सहकाऱ्यापेक्षा वरचढ दिसण्यासाठीही असं वागत असतील. त्याच्या अशा विचारांमुळे कुणाचेही मनमोकळे कौतुक करणे, एखाद्याला त्याच्या कामात सपोर्ट(मदत?) करणे हेही जमतच नाही.(अशा लोकांचा बाकीच्यांना किती त्रास होतो हे कळतंय. त्यामुळे मी तरी अशी मानसिकता नसण्याचा प्रयत्न करतेय.)
This is how the author defines Scarcity Mentality people.
"They see life as having only so much, as though there were only one pie out there. And if someone were to get a big piece of the pie, it would mean less for everybody else. .........
.....People with a Scarcity Mentality have a very difficult time sharing recognition and credit, power or profit -- even with those who help in the production. They also have a very hard time being genuinely happy for the successes of other people -- even, and sometimes especially, members of their own family or close friends and associates. It's almost as if something is being taken from them when someone else receives special recognition or windfall gain or has remarkable success or achievement. "
आता मला काय कुणालाही आपल्या साहेबाला शिव्या घालायचं काम दिलं तर याहूनही मोठा निबंध होईल.:-) शिवाय कामाशी संबंधित कुठल्याही बाबीचा विचार जास्तवेळ करु नये, नाही तर मग आयुष्यच कचेरीमय होऊन जातं. पण गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या काही घटनांमुळे मनात हे सगळे विचार आले आणि ते लिहिले. असो.
या गटबदलाने मलाही काही गोष्टी शिकवल्या Corporate Culture बद्दल. पण सध्यातरी एव्हढंच. I am a good learner. :-) त्यामुळे पुढेही नवीन शिकवण मिळेलच, तेव्हा लिहीन. मी कुठेतरी वाचलं होतं की नोकरी करणारे बरेच लोक केवळ आपल्या उच्चाधिका़ऱ्याला ( बॉसला ) कंटाळून नोकरी सोडतात. आज-काल मी ही किती टिकेन याचाच विचार चालू आहे. :-) कृष्णाला काय जात होतं हो म्हणायला,'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' .आता मध्येच कृष्ण कुठून आला?(:-?) आपलं नाही बाबा खडूस लोकांशी जमत, खोटं-खोटं हसून काम करवून घेणं जमत आणि चुगल्या करून साहेबाला खूश करणंही नाही. बघू किती दिवस या वातावरणात टिकतो ते. जमलं तर राह्यचं नाही तर जायचं. :-) असो,मी माझं Corporate प्रवचन थांबवते आता आणि कामाचं बघते. :-ड हो ना, blog लिहायचे अजून तरी काही पैसे मिळत नाहीत,त्यामुळे काम करणं आवश्यक आहे.
-विद्या.

2 comments:

Anonymous said...

नाही तर मग आयुष्यच कचेरीमय होऊन जातं. -loved it

Dk said...

Hmm very well said!! I like the way u write :D


Here the role of HR comes in the picture but no one really want to do anything for the empowerment of the manopower in an organization! :)