Tuesday, March 20, 2007

व्यवहार

त्याचं म्हणणं मला
कधी पटलंच नाही,
अंतर वाढलं म्हणून
प्रेम कमी होतं का काही?

म्हणे या जगात
कुणाचं कुणावाचून अडत नाही,
पण तू सोबत नसशील
तर आयुष्यात राहतं का काही?

म्हणे, देऊ तेव्हढं सर्वांना
परत मिळतंच असं नाही,
पण माझं प्रेम तुझ्यापेक्षा
कमी होतं का जराही?

म्हणे, आजचा क्षण आपला
बाकी कशाचीच शाश्वती नाही.
माहीत नव्हतं,त्या क्षणासारखाच
तू ही परत येणार नाही.

तू सांगितलेली प्रत्येक गोष्टं
जरी पटली नाही,
ठेच लागून धडपडताना
जगाने शिकवले बरेच काही.

म्हणे, भावनेपेक्षा
व्यवहारातच आहे सारं काही.
मग आज माझ्या सुकलेल्या डोळ्यांत
पाण्याची तुला अपेक्षा का राही?

काळाबरोबर विसरून जाशील सारं
तूच म्हणालास ना हेही?
कसं सांगू, जवळ नसलास तू तरी
येतोस माझ्या स्वप्नात आजही.

-विद्या.

1 comment:

Dk said...

I just loved it! :)))))))))))))