Thursday, July 27, 2017

गिलहरियां....

       मला निसर्ग कविता फार कमी आवडतात. कदाचित सर्व प्रकारच्या उपमा प्रत्येक गोष्टीला आणि व्यक्तीला देऊन झाल्याने नवीन काही शिल्लक आहे असं आता वाटत नाही. सिलसिलाच्या 'ये पत्तियों की है सरसराहट....' वाल्या डायलॉग ला लै भारी वाटते हो अजूनही. आणि तितकीच लहान असताना 'हिरवे हिरवे गार गालिचे' आवडली होती. ती आता इतकी आवडते की नाही माहित नाही. मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधलं एक गाणं ऐकलं होतं,'सूरज की बाहो में'. अगदीच बोर वाटलं होतं. त्यामुळे दंगल मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळाला.
       आता याला कवितेचं रसग्रहण म्हटलं तरी चालेल. पण त्यातलं काय काय आवडलं हे इथे लिहितेय. एकतर त्या गाण्यात 'जॉनीता गांधी' चा आवाज इतका सुंदर आहे आणि तितकंच संगीतही सुरेल. त्यामुळे त्यात दिसत राहतात ते शब्द. प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात येत राहतो. आणि एकदा ठेका धरला की गाणं तोंडात घोळत राहतं. ऐकताना हे गाणं कुणा मुलीनं मुलाच्या प्रेमात पडल्यावर म्हटलेलं वाटतं. पण प्रत्यक्षात ते पाहून अजून आनंद झाला. कारण घराच्या बाहेर पडून नवं विश्व अनुभवणारी ती मुलगी इतकी छान वाटते. वाटतं आपणही कॉलेजला जाऊन येतोय तिच्या सोबत. जीवनाच्या, तिच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वतःच्या प्रेमात आहे ती मुलगी. त्याचं सादरकरणही सुंदर केलंच आहे. एकूणच ते गाणं बघायला आणि ऐकायला एक सुखद अनुभव आहे.
         आता राहिले शब्द. इथे तो निसर्ग कवितेचा संदर्भ येतो. उन्हाचं, गुलमोहराचं, जमीन आणि आकाश यांचे संदर्भ इतके छान दिले आहेत. माझं मत या शब्दांबद्दल काय आहे हे मांडत आहे. कदाचित तुम्हाला हे वाचायला कंटाळवाणं वाटेल. पण या गाण्यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थच इतका सुंदर आहे की तो शब्दात मांडायचाच होता मला. असो. हे गाणं तुम्हीही पुढच्या वेळी ऐकाल तेव्हा जरूर लक्ष द्या.  अर्थात ते चुकीचं असूही शकतं. पण त्यातुन येणारा अनुभव नक्कीच खोटा नाहीये. असो. मी मुद्दाम त्याचे शब्द इथे देत आहे.
"रंग बदल बदल के क्यों चहक रही है
दिन दुपहरियां"
या शब्दांनी दुपारचं उन्हंही अगदी सुखद वाटायला लागतं. दुपार जणू 'सकाळ' झाली आहे. आणि पहाटेच्या पक्षांसारखं चिवचिवाट करत आहे. किती सुंदर.
"क्यूँ फुदक फुदक के धड़कनो की
चल रही गिलहरियां
मैं जानू ना जानू ना जानू ना"
सध्या इतक्या खारुताई बघत असते घरापाशी. हे वाचून तर खरंच माझंही मन त्या खारीसारखं उड्या मारू लागतं. 'धड़कनो की गिलहरियां' किती सुंदर उपमा आहे. खूप आवडली मला.
"क्यूँ ज़रा सा मौसम सरफिरा है
या मेरा मूड मसखरा है
मसखरा है
जो ज़ायका मन -मानियो का है
बोल कैसा रस भरा है"
मनाप्रमाणे वागायला मिळत आहे या विचारानेच ती किती खूष झाली आहे. तिचा मूड एकदम बदलला आहे या सगळ्या नव्या अनुभवाने.
"एक नयी सी दोस्ती आसमां से हो गयी
ज़मीन मुझसे जलके
मुँह बना के बोली
तू बिगड़ रही है"
या नव्या विश्वात ती जणू आकाशात तरंगत आहे आणि त्यामुळे जमीन तिच्यावर चिडलीय.  गंमत वाटते ना या विचाराची? आणि नुसती चिडली नाहीये तर तिला सांगतेय तू बिघडली आहेस म्हणून. 
"ज़िन्दगी भी आज कल
गिनतियों से ऊब के
गणित के आंकड़ों
के साथ एक आधा
शेर पढ़ रही है"
त्या जुन्या आयुष्याला, गणिताला त्यातल्या रुक्षपणाला ती कंटाळली आहेच. पण म्हणून 'एक आधा शेर"?  कमी शब्दांत किती जास्त व्यक्त होतं.  रुक्षपणाकडून काव्यात्मक आयुश्याकडे तिचं होणारं स्थित्यन्तर.
याच्या पुढच्या ओळी माझ्या सर्वात आवडत्या आहेत.
"मैं सही ग़लत के पीछे
छोड़ के चली कचहरियांं"
खरंच, वाटतं कॉलेजमध्ये असताना मनाप्रमाणे वागताना कोण काय बोलतंय याचा विचार केलाच नाही. तो 'योग्य-अयोग्य' विचार मागे टाकता येणं किती आनंददायी असतं? तिलाही तसंच वाटत आहे. 
"क्यूँ हज़ारो गुलमोहर सी
भर गयी है ख्वाहिशों की टहनियाँ
मैं जानू ना जानू ना जानू ना"
आणि नुसतं ती योग्य अयोग्य विचार मागे टाकत नाहीये तर तिच्या मनात अजून नव्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत. आणि त्याला त्या 'गुलमोहराच्या बहरलेल्या फाद्यांची' दिलेली उपमा तर मला खूप आवडली.
हे गाण्याचं शेवटचं कडवं. ते संपेपर्यंत आपणही तिच्यासोबत तिच्या स्वप्नाच्या गावात हरवून जातो.
नक्की ऐकून बघा. 
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: