Sunday, February 12, 2017

चौकट

      फेब्रुवारी हा इथल्या थंडीतला सर्वात त्रासदायक महिना.  या वर्षी तशी थंडी कमी असली तरी या महिन्यात बऱ्यापैकी बर्फ पडत आहेच. मागच्या वेळी बर्फ पडला तेंव्हा मुलांनी मस्त घरासमोर घसरगुंडी करून मजा केली. ते खेळत असताना, रविवार दुपार असल्याने मी जेवण बनवत होते. दुपारीही मी मस्त झोप काढली आणि मुलं बाहेर खेळून आली. यावेळी शेजारच्या काकांनी त्यांना त्यांची स्लेड उधार दिली होती आणि त्यामुळे स्वनिकच्या तोंडावर मस्त स्नो उडून चेहरा लाल झाला होता. घरी आल्या आल्या त्याने तक्रार केली,"आई तू का आली नाहीस?". खरंतर माझ्या लक्षातच नाही आले की आपणही जायला हवे होते. त्याने आग्रहाने सांगितलं,"पुढच्या वेळी मात्र तू यायचंस आणि त्या स्लेड वर पुढे बसायचं." मीही तेव्हा 'हो' म्हणून सोडून दिलं.
         त्यानंतर महिनाभर काही स्नो झाला नाही. मागच्या आठवड्यात स्नो झाल्यावर पुन्हा मुलं बाहेर पडत होती आणि मी त्यांना आतूनच बाय करत होते. पण अचानक मागच्या गेली केलेलं प्रॉमिस लक्षात आलं आणि पटकन कपडे बदलून बाहेर गेले. त्यांच्यासोबत दोन वेळा स्लेडवरून गेलेही. स्वनिक म्हणाला तसं, पुढे बसून. मला जाम भीती वाटत होती. आणि मजाही. त्यामुळं जोरात ओरडून खाली जात होते. खूप वर्षांनी बर्फात खेळले असेन. तेंव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली, त्याबद्दलच लिहायचं होतं.
         याआधीही मी मोठ्या राईड्स मध्ये गेले आहे. आणि मी इतकी काही भित्री नाही. पण कधीतरी काहीतरी बदललं. कसं ते मलाही कळलं नाही, पण 'मला हे जमत नाही' ,  'मला थंडी आवडत नाही', 'मला बर्फात काही जमत नाही' अशी काही वाक्य समोर म्हणली नसतील तरी डोक्यांत नक्कीच येऊन गेलीत. आणि मी स्वतःला कधी स्वतःच ठरवलेल्या चौकटीत बांधून घेतलं हे कळलंही नाही. परवा ती स्लाईड करताना ते जाणवलं. आता मी काही इतकी शूरवीर होऊन उगाच बर्फात जाणार नाही, पण आधीपेक्षा नककीच जास्त जाईन, असं ठरवलंय.
         हेच नाही अशा अनेक गोष्टी असतात त्याच्या चौकटीत आपण स्वतःला कधी अडकवतो हे कळतच नाही. उदा: 'मला हा रंग आवडत नाही', 'मला भात खाल्ल्याशिवाय जमतच नाही', 'व्यायाम करणं मला कधी जमलंच नाही' किंवा 'हे असले कपडे मी घालतच नाही' अशी वाक्य आपण कधी बोलायला लागतो कळतंच नाही. मी अनेक आईबाबांना पाहिलं आहे, अगदी माझ्याही, जे 'आम्हाला हे असंच लागतं' किंवा 'हे मला जमणार नाहीच' अशी वाक्यं बोलताना. आणि परवा ते मीही करत होते. खरंतर मला वाटतं, या गोष्टींचीं सुरुवात अशीच होते जिथे कधीतरी कामामध्ये असताना एखाद्या गोष्टीला प्राधान्य देत नाही किंवा 'खरंच मी काहीतरी वेगळं करावं का?' असा विचार करायला वेळ घेत नाही. तिथून मग पुन्हा पुन्हा तीच गोष्ट घडताना आपण त्याचा विचार करायचं टाळतो आणि ती कधी सवय होऊन जाते आणि पुढे अलिखित नियम हे आपल्यालाही कळत नाही.
        आपण स्वतःला कुठल्या चौकटीत अडकवत आहोत हे एकदा जाणून घ्यायला हवं आणि त्याच्यावर काही प्रयत्नही केले पाहिजेत, तरच मजा आहे. नाहीतर १५ वर्षांपूर्वी आपण जी गोष्ट आवडीने करायचो ती कधी हरवून गेली हे कळणारही नाही. नाही का?

विद्या भुतकर.

1 comment:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.