Monday, March 20, 2017

स्वप्ना आणि सत्या- भाग ७

दोघेही एका हॉटेलमध्ये समोरासमोर बसलेले.
ती: मघाशी त्या दोघांना पाहिलंस?
तो(घास खाता खाता): कोण?
ती: तेच रे टेबलच्या एका बाजूला बसले होते?
तो: ओह.. मला नाही आवडत हे असलं.
ती: आता त्यात काय?
तो: समोरासमोर बसायचं, हे काय एका बाजूला बसायचं?
ती: मग प्रेमात असतं.
तो: आपण नव्हतो का कधी प्रेमात?
ती: असं काय अरे? किती क्यूट दिसत होते दोघं.
तो: क्यूट?
ती: मग काय? आपण पण होतो की असेच.
तो: हां पण हा असला फालतूपणा कधी केला आपण पब्लिकमध्ये?
ती: विसरलास? असा टेबलाखालून धरलेला हात?
तो(हसून): ते होय? आता ते लग्नाआधी होतं.
ती: मग आता लग्न झाल्यावर?
तो: आता काय? कधीही धरता येईल.
ती: मग का नाही धरत?
तो: हे काय नवीन?
ती: लग्न झालं म्हणजे या साध्या गोष्टी संपल्या?
तो: मी कुठे असं म्हणतोय? पण तू माझी बायको आहेस ते दाखवायची काय गरज आहे?
ती: पण मी म्हणते दाखवलं तर काय बिघडलं?
तो: माझं प्रेम आहे हे तुला दाखवायला ते चार चौघात कशाला सांगितलं पाहिजे? घरीही सांगता येतं !
ती:  पण समजा बाहेर हात धरला तर असं काय पाप लागतं? बायकोच आहे ना?
तो: तुझं ना? काहीही असतं? चार लोकांत हे असं वागणं शोभतं का?
ती: बरोबर. तुला माहितेय लग्नाआधी मीच नको म्हणायचे, कारण तेव्हा तू हक्काचा नव्हतास.पण हक्काच्या माणसाकडून हक्काचा हात मिळणं वेगळंच असतं. जाऊ दे तुला नाही कळणार.
तो: आणि या उलट 'आपलं माणूस आहे' हा स्टॅम्प लावायची गरज मला वाटत नाही. ते ज्याला कळायचं त्याला माहित असलं म्हणजे झालं. जाऊ दे तुला नाही कळणार.

दोघेही मुकाट्याने ताटात बघून जेवत राहिले. आज पुन्हा एकदा स्वप्नं आणि सत्याचं भांडण झालं होतं.


विद्या भुतकर.

No comments: