Monday, April 10, 2017

स्वर्गसुख

       सुट्टीच्या दिवशी सकाळ सकाळी ऊन घरात आलं. अजूनही थंडी होतीच तशी. उठून उत्साहाने मस्त झाडून घर साफसूफ केलं. सगळ्यांची तब्येत जरा नाजूकच होती. मग गरम गरम मुगाच्या डाळीची साधी खिचडी बनवली. तूप आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत परत परत घेऊन, पोटभरून खाल्ली. आणि सकाळी आवरलेल्या गादीवर,अंगावर पांघरूण घेऊन, बाहेरून येणाऱ्या उन्हाला पडद्यांनी अडवत, आडवी झाले . भरलेल्या पोटाने, डोळे जड झाले. उघडायचं म्हंटलं तरी पापण्यांवर मणामणाचे दगड बसले होते.
        कधीतरी कुठल्यातरी क्षणी झोप लागून गेली. जाग आली तेंव्हा ३ तास उलटून गेले होते. पोरांनी एकदाही उठवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी काय केलं हेही माहीत नाही. उन्हं उतरतीला आली होती. आळस द्यावा तितका कमीच. उठल्यावर एकदम अनेक वर्षांनी अशी मस्त झोप झाल्यासारखं वाटलं. गरम गरम चहा घेतला आणि जागी झाले.
        खरंच, स्वर्गसुख यापेक्षा अजून काय असतं?

विद्या भुतकर.

No comments: