Sunday, September 24, 2017

मान्यता ....

हे पोस्ट करावं की नाही विचार कर होते. मग म्हटलं का करायचा विचार? कशाला हवी कुणाची मान्यता किंवा कुणाच्या मान्यतेचा विचारही,प्रत्येकवेळी.



का लागते मला मान्यता ?
तुझी, प्रत्येक पावलागणिक
अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत
उठताना, बसताना
चालताना, झोपतानाही
घरातून बाहेर जाताना,
स्वतःच्याच घरात परत येताना,
अगदी भाजी आणताना
'कशी झालीय?' विचारताना
तर कधी 'कशी दिसतेय?' विचारताना
साडी नेसल्यावर पोट उघडं ठेवताना
पदर घेताना, पदर पडताना
मन मोडताना, मन जोडताना
तोंड सोडताना आणि आवरताना
श्वास घेताना अन सोडतानाही
बरं तो 'तू' कायम असतोसच
त्याचं रुप फक्त बदलत राहतं
कधी समाज म्हणून
कधी सहकारी म्हणून
कधी मित्र-मैत्रीण म्हणून
कधी नवरा, कधी आई
कधी सासू कधी बाप
कधी मुलगा किंवा मुलगी म्हणूनही.
या सर्वांच्या मान्यतेसाठी झगडत
आयुष्य कुठंवर काढायचं?

विद्या भुतकर. 

No comments: