Tuesday, September 05, 2017

ब्रेक के बाद

गेले काही दिवस झाले पेजवर एक शब्दही लिहिला नाही. काहींनी आवर्जून मेसेज करून विचारलंही कुठे आहे म्हणून. वाटलं, चला इथे लोक आपली वाट बघतात, चांगलंच आहे. :) महिनाभर भारतात होते, त्यात गणपती-१५ ऑगस्ट, ऑफिसचं काम, खरेदी, परत यायची तयारी, अशी अनेक कामं होती. पहिले काही दिवस वेळ काढून लिहिलं पण जसे सणाचे दिवस आले, अगदीच वेळ मिळेनासा झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, बॉस्टनमध्ये रात्री मुलं झोपल्यावर निवांत लिहायला वेळ मिळत होता. भारतातून रात्री ऑफिसचं काम असल्याने लिहिण्यासाठीचा ठरलेला वेळ मिळेना. त्यामुळे एकूणच लिहिणं झालं नाही. 
      अनेकवेळा अशा वेळी मी अट्टाहासाने कुठून तरी वेळ काढून लिहिते, पण यावेळी वाटलं की लिहिणं कितीही आवडीचं असलं तरी त्या क्षणी भारतातील कार्यक्रमांची मजा घेणं महत्वाचं होतं. त्यामुळे उगाच ओढाताण न करता लिहिण्याला थोडा आराम दिला. वीकेंडला बॉस्टनमध्ये पोचले आणि कळत होतं की सोमवारपासून लिहायचं आहे. पण पुन्हा एकदा उगाच घाई न करता आराम करून घेतला आणि आज पहिला दिवस मिळाला लिहायला की लगेच लॅपटॉप घेऊन बसले. 
     कधी कधी वाटतं की इतकं काय महत्वाचं आहे रोजच लिहिणं? असंही काही ग्रेट लिहीत नाही आणि मी न लिहिण्याने कुणाचं काही अडतही नाही. एखादा दिवस राहिलं तर चालतंय की. पण लिहिण्याचा अट्टाहास करण्याचं एक कारण आहे. ४ चे १० होतात आणि १० दिवसांचे १० महिने कधी होतात कळतही नाही. मी माझा ब्लॉग लिहायला सुरु केला त्याला १० वर्षं होऊन गेली. आणि त्यात अनेक वेळा असं झालंय की एखादा छोटा ब्रेक वाढून दोन वर्षं झालाय आणि पुन्हा लिखाण सुरु करायलाही तितकाच वेळ निघून गेला. यावेळी तसं होऊ द्यायचं नाही असं ठरवल्याने ही घाई. 
      तर हे असं ठरवून पुन्हा सुरु करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण लिखाणासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ थोडे दिवस ब्रेक घेऊ म्हणून बाजूला राहतात आणि अनेक वर्षं लोटून जातात. सर्वात कॉमन उदाहरण म्हणजे 'व्यायाम आणि आहार' (खूपच शुद्ध मराठी होतंय ना?), 'डाएट आणि एक्सरसाइज'. अनेक वेळा नियमित व्यायाम आणि आहार चालू असतो, एखादा सण येतो आणि त्यात खंड पडतो. गणपती नंतर दसरा जातो, दिवाळी आणि न्यू ईयर पार्टीही होऊन जाते आणि तो खंड पडला होता हे विसरूनही जातो. पुन्हा एकदा त्या जुन्या रुटीनमध्ये जाण्यासाठी अशीच दोन वर्ष निघून जातात. 
      तीच गोष्ट एखाद्या आवडीची, हौसेची. एखादं पुस्तक वाचायची, चित्र काढायची, गाणं ऐकायची. अशा गोष्टी मागे पडून गेल्यावर त्या आपल्या आयुष्याचा भाग होत्या हे विसरून जातो. त्या क्षणाचा तो ब्रेक आठवणीने मोडून पुन्हा एकदा ती हौस टिकवणं, एखादी गोष्ट सुरु करणं हे त्या वेळीच करणं खूप गरजेचं आहे. कारण सवय का कशाचीही होतेच. पण ती होऊ देणं किंवा न होऊ देणं आपल्याच हातात आहे. :) तेही 

विद्या भुतकर. 

No comments: