Thursday, October 18, 2012

पाच किलोमीटर आणि बरेच काही...2

       'मला वाटतय त्या शामचाच काहीतरी हात असणार बघ', म्हणत मी रात्री सोफ्यावर बसले. एक तीस मिनिटांची हिंदी मालिका बघायची आणि मेल, फेसबुक चेक करायचे आणि झोप हाच काय तो दिवसभरात स्वत:साठी मिळालेला वेळ.  तेही सानू आणि स्वनिक झोपल्यावर. नाहीतर मग रहाटगाडगं चालूच. बरं बसावं म्हटल टीव्ही लावून  पोरं जागी असताना तर ते झोपल्यावर बघून अपराध्यासारखं वाटत  की  तेव्हढाही वेळ दिला नाही म्हणून त्यांना.  तर हे असं होणारच होतं. त्यातही  मी जेव्हा स्वत: साठी दुपारी का होईना वेळ काढुन पळायला जायला लागले तेव्हा सही वाटलं. आणि ५किमी पळाल्यावर तर अजूनच भारी वाटत होतं. 
         पुढचा आठवडा उगवला आणि मग ते मोटिवेशन राहिलंच नाही. ५ किमी ची रेस  संपली होती.मग उगाचच मनात विचार यायला लागले, 'अजून जास्त पळाले तर?  अजून किती पळू शकते? इ. इ.' तीन मैल पळूनच मला दम लागायचा. माझ्या टीममध्ये एका मुलगी होती ती जायची रोज पळायला. म्हणे ७-८ मैल जाते रोज. कधी  कधीतर घरून पळतंच यायची ऑफिसला. तर वाटले ती जाते काही मेरेथोनला, आपण पण जावं का? पण पूर्ण मेरेथोन म्हणजे २६.२ मैल.  मी मरूनच गेले असते. सो ओउट ऑफ क्वेश्चेन.मग पाहिले अर्धी मेरेथोन ट्राय करावी. ती तरी थोडी आहे का? १३.१ मैल. २१ किलोमीटर. त्यात माझे ५ कसे पुरायचे? 
        राहवत नव्हतं बघितल्याशिवाय, म्हणून म्हटलं माहिती तरी काढू आधी. तसे पळायला  काही ग्रुप जातात एकत्र क्लास पण लावतात.  पण आयुष्यात शिकवणी  कधी लावली तर ना. स्वत:च माहिती काढायला सुरुवात केली.  एकदा डोक्यात घुसलं ना  की ते जात्तच नाही. मग पहिली हाफ मेरेथोन पळायला काय काय लागतं ते बघितलं. आधी पासून पळत असला पाहिजे, किमान ५ किमी तरी. म्हटले अरे वाह. हे तर झालं. बरेच प्लान मिळाले नेटवर. सर्वच मला योग्य नव्हते. पण सर्व मिळून एका प्लान बनवला. आणि एकदम सोपाही वाटला. तर करायचं काय? 
        आठवड्यातून फक्त ४ दिवसच जिमला जायचे एकूण. त्यातही  एक दिवस क्रॉस ट्रेनिंग ला जायचे. म्हणजे अएरोबिक्स वगैरे. नशिबाने आमच्या ऑफिसमध्ये १० आठवड्यांचा एका क्लास सुरु होत होता. एरोबिक्सचा. म्हटले तो करावा सोमवारी. मग एक दिवस ब्रेक. बुधवार, गुरुवार ३-४ किमी पळायचे, मग शुक्रवारी ब्रेक. आणि शनिवारी 'लोंग रन'. म्हणजे, ३,४,५,६,७,८...असे दर शनिवारी एक एक मैल अंतर वाढवायचे १२ मैलपर्यंत. म्हणले  बरे आहे, शनिवारी गेले म्हणजे जास्त वेळ मिळेल आणि रविवारी विश्रांतीही  आणि सोमवारी परत सुरु एरोबिक्स. तर असा  फंडू साधा प्लान होता. आणि शिकागो हाफ मेरेथोन ९ सप्टेंबर ला होती आणि आमचा अजून मे च चालू होता. म्हणजे वेळही होता पुरेसा.  त्यांचं रजीष्ट्रेशन  ही १५ ऑगस्ट पर्यंत होते बहुतेक. तर  आधी पळून बघू नाहीच झाले तर राहू दे असे ठरवले.
          सोमवारचा क्लास सुरु झाला. १ तास एरोबिक्स, बाप रे. माझे सर्व सांधे, हाडे आणि अवयव जागृत झाले होते. पहिला क्लास बरा वाटला पण दुसरा झाल्यावर चार दिवस सरळ चालताही येत नव्हते, पळते कुठली? तरी पैसे दिलेत तर क्लास चालू ठेवणे भाग होते. पण हळू हळू त्याचीही सवय व्हायला लागली. :)instructor  ने ५० abs सांगितले  की  मी ४० काढूनच गार. बाकी काउंट मध्येही  फेराफार चालायचीच. क्लासमुळे दुखणारे अवयव जरा ठिक  होतात तर बुधवार आणि गुरुवारचा रन. आता इतके दिवस पळते म्हणून पळायचा वेग तरी वाढला का? नाही !! कितीही जीव खाऊन पळाले तरी वेग काय ४-५ मैल तासाला. तुम्ही म्हणाल की वेगाचं  काय ते? त्यालाही कारण होतं. 
          शिकागो हाफ मेरेथोन ला वेगाचं बंधन होतं. १३ मिनिटात एक मैल वेगाचं.  आणि मी आपली पहिले ३ मैलच १३ मिनिटांनी पळत असेन तर १३ मैल कसे त्याच वेगाने पळणार? किती प्रयत्न केले पण काही वेग वाढला नाही. बर त्याचं  जाउ दे. पुढे आला शनिवार चा 'लॉंग रन'.  ५ किमी च्या अनुभवावरून कळले होते की  बाहेर पळणे आणि जिम मध्ये यात फरक पडतो. म्हणून जवळच्या पार्क मध्ये पळायला जायचे ठरवले. त्यासाठी अजून एक गोष्ट बघणं आलंच मग. शनिवारी हवामान कसं आहे? शिकागोच्या बिन-भरवश्याच्या हवामानाचा अंदाज मी गुरुवारीच घ्यायला लागले. थंड असेल तर जरा उशिरा गेले तर चालेल. गरम असेल तर सकाळ इ. किती वाजता किती आहे तापमान हे बघा, इ,इ. 
          शनिवारच्या पळण्यासाठी नुसती हवामानाचीच नव्हे तर आमचे रुटीन बदलायचीही गरज होती. शुक्रवारी रात्री लोकांना भेटा, उशीरपर्यंत टीव्ही बघा, मग उशिरा उठा हे सर्व बंद करायला लागणार होतं.  अगदी  बाहेर  खायला जाणंही. का तर, वेगळ काही खाऊन पोट बिघडायला नको. हे सर्व बंद करूनही  शुक्रवारी रात्री झोप यायला हवी ना? आणि आलीच तर शनिवारी सकाळी कुणी ६ वाजता उठलंय का? पण ते ही केलं. इरवी ७-७.३० उठले तरी शनिवारी निदान ६.३० ला तरी उठले. पार्कमध्ये २ मैलाचा एक राउंड होता. मग आधी २ पासून सुरु केले. ४,५,६ मैल अंतरावरही पोचले. पण पळताना प्रत्यके मिनिटाला हेच विचार की किती मैल राहीले, किती वेळ झालाय, मग वेग किती आहे, १३ मैल कसे पळणार आणि किती वाजलेत. कधी वाटलं  नाही की किती मस्त हवा आहे, लोक चालत आहेत, मासे पकडत आहे की  सायकल चालवत आहे. काही नाही. फक्त गणित मनातच.  बावळट मी !!
          वाटलं सर्व मस्त चाललं आहे बरं का ७ मैल झाले आहेत. कसंलं काय? नको तेच घडलं. एका शनिवारी बाहेर पाउस पडतोय म्हणून जिम मध्ये पळायला गेले. ७.५ मैल !!! (किती हे डेडिकेशन ???) आणि दोन दिवसात गुढगे दुखायला लागले. बुधवारी २ मैल गेले कशी तरी. मग बंदच. म्हटले जरा ब्रेक घेऊच म्हणून पुढचा आठवडा गेलेच नाही.  तरी परत तेच. जरा पळाले  की उजवा गुढगा दुखायचा. खूप काही वाचले, कसले व्यायाम केले पाहिजेत ते बघितले. नवीन शूज आणले. सर्व झाले तरी  काही फरक पडत नव्हता. आणि माझा धीर आणि उत्साह  दोन्ही जरा कमी व्हायला लागले होते...

क्रमश: 

-विद्या.

Tuesday, October 16, 2012

पाच किलोमीटर आणि बरेच काही...

            बाप रे. मी गेले २ वर्षे गायब झाले आणि परत येऊन बघते तर किती ती सुधारणा झाली आहे मराठी टायपिंग मध्ये. :) जर मला  असते कि मराठी लिहिणे इतके सोपे झाले आहे आतापर्यंत खूप काही लिहून पण झाले असते. असो. आता सुरु करतेय हे महत्वाचे.  माझ्या शेवटच्या पोस्त मध्ये मी लिहित होते कि कसे मला दुसरी नोकरी मिळाली. पण संदीप अमेरिकेत, मी पुण्यात असे काही चालणार नव्हते. आमच्या नशिबाने मला पुन्हा एकदा एकाच कंपनीत नोकरी मिळाली आणि मी शिकागो ला परतले. इथे येऊन सानुला सांभाळून नोकरी करेपर्यंतच इतकी पुरेवाट झाली कि लिहिणे डोक्यात पण येत नव्हते. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये स्वनिक झाला. आणि अजूनच धावपळ सुरु झाली. त्याला सोडून कामावर येणे खूपच अवघड होते. पण हळूहळू तेहि जमत आहे.
           स्वनिक चार महिन्याचा झाल्यावर जरा मनावर घेतले वजन कमी करायचे. आधी आमचे मस्त चालू होते, दुपारी घरी जायचे जेवायला. जमले तर कधी स्वनिक ला भेटायला. पण सर्व सुखासुखी होतय आणि मी निवांत बसलेय  असे कसे शक्य आहे ना? आमच्या ऑफिस मधेच जिम आहे ते एक सोयीचे होते. म्हटले दुपारी घरी न जाता जिमला जावे. पण तेही सहजपणे जमणारे नव्हते. एकतर दोन पोरांना घेऊन एरवी न मिळणारा, दुपारचा निवांत वेळ  जाणार  होता आणि कधी जेवायला काही नसेल तर थोडे बनवून घ्यायचे घरी तेही खायला काही मिळणार नव्हते. मग रात्रीच जास्त पोळ्या करून डबा भरून ठेवायला लागणार होता. कुणाला वाटेल त्यात काय एव्हढे मोठे काम? पण जिथे ५ मिनिटं पण वेळ काढणे अवघड होते तिथे ३० कुठून आणणार असे झाले. तरी म्हटले जायचेच. मी दिडेक वर्षानी काहीतरी करणार होते.
              डिलिव्हरी  नंतर हाडांचा खुळखुळा झाला आहे असे वाटले सुरुवातीला. पण हळूहळू पळायला सुरुवात केली. आधी तर वाटले १ मैल पळणेही किती अवघड आहे. तेंव्हाच Chase Corporate Challenge म्हणून एका रेसबद्दल नोटीस आली ऑफिसमध्ये. ती फक्त ५किलोमिटरची होती. आयुष्यात कुठलीही गोष्ट परिक्षेशिवाय केली नाहीये त्यामुले म्हटले यात भाग घेतला तर  जरा सराव तरी करेंन  रोज . म्हणून मी 24 मे ला होंणारया 5K(म्हणजे 5 KM ) मधे भाग घेतला . रोजचा सराव मी 2-2.5 मैलापर्यंत  नेला . मी भाग घेताना लिहीले होते की साधारण 35 मिनिटामधे पूर्ण करू शकते . कितीही मारामारी करून तेव्हढा वेग काही वाढत नव्हता . 35 मिनिटात 5km म्हणजे 7 मिनिटात 1 Km कसे शक्य होते? मी वेग वाढवायला गाण्यांचा आधार घेतला . कित्येक वर्षात मी अशी निवांत गाणी ऐकली नव्हती .  साध्या गोष्टी पण त्याही किती दुर्मिळ झाल्या होत्या असे वाटले . नेहमीप्रमाणे संगीताने साथ दिलीच . गाण्याचा वेग वाढला तसा माझाही . नंतर समजत नव्हते की पळण्यासाठी गाणे ऐकतेय का गाणे ऐकण्यासाठी  पळते आहे .
             कितीही सराव केला तरी मी बाहेर पळत नव्हते अजून . एक दिवस म्हटले बाहेर जाऊन तर  बघावे? पहिल्या फेरीतच वाटले  कि गुढगे गेले कायमचे . आणि धुळीत पळल्यामुले सर्दी होउन तीन दिवस घरी बसले ते निराळेच . शेवटी 24 तारीख उजाडली. मी उगाचच अगदी मोठी परीक्षा असल्यासारखी वागत होते . सकाळी ओफिसमधे कामात लक्षही लागत नव्हते . आमची 4 वाजता ओफिसमधुन बस निघाली . आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीजवळ जाऊन बसले . ती मस्तपैकी तयार होऊन आली होती . तिलाही एक वर्षाची  मुलगी आहे. आता शिकागो च्या वाहतुकीत आम्हाला २ तास तरी लागणार होते. म्हणून  मी आपली बोलत होते. म्हणले बरे आहे न जरा पळून वजनही कमी होतय. तर ती म्हणे,'हम्म, मला डिलिव्हरी नंतर लगेचच ९ मैलाची स्पर्धा होती त्यामुळे मी २ महिन्यात सुरु केले होते. म्हटले, मी एक महिन्यात बाहेर पडले तर आई म्हणे काय हे,  काही काळजी आहे की नाही? आणि २ महिन्यात पळायचे? Impossible !!! :) मग दुसऱ्या एकीशी बोलले, ती तर तिच्या हातातल्या घड्याळ्या बद्दल सांगत होती.  म्हणे मी मग पळताना त्यात किती अंतर झाले आणि किती वेळात झाले ही  सर्व माहिती यात ठेवली जाते आणि मग नंतर मला त्याचा उपयोग होतो माझा वेग बघायला इ. इ. तिसरा एक जण   त्याच्या भारी shoes बद्दल सांगत  होता. आणि परीक्षेत अभ्यास न केल्यावर एखादा प्रश्न कुणी विचारला कि कसा चेहरा होतो तसा करून मी सर्वांकडे बघत होते. एखाच्या हाताला बेल्ट होता त्यात त्याने त्याचा फोन अडकवला होता. सर्वाचे काळे चष्मे तर भारीच. म्हणे इ-फोन वर एक App आहे जिथे आपला रेस नंबर टाकला  की  किती वेळात अंतर कापले ते कळते शेवटी. मी पण माझा फोन उघडला पण आयुष्यात कुठले App download केले असेल तर ना. कसे  तरी करून ते केले आणि मग कानात बोळे घालून झोपून गेले.
             संध्याकाळी ७ वाजता रेस सुरु होणार होती आणि आम्ही ६.४५ ला पोचलो बसने. आमच्या कंपनीचा तंबू एका ठिकाणी ठोकला होता. तिथे जाऊन पाणी पिऊन जरा 'जाऊन' यावे म्हणून गेले तर भली मोठी रांग होती. :( शेवटी ती रांग सोडून पळायला जाऊन उभी राहिले. २६ हजार लोक त्यादिवशी पळणार होते, त्यात मी काय? माझा फोन पण तंबूत राहिला होता. म्हटले जाऊदे पळू तसेच. पण तो दिवसच एकूण कंटाळवाणा होता.दुपारी ४ पर्यंत काम, मग २.५ तास प्रवास आणि प्रचंड दमट वातावरण. धाकधुक करत पळायला सुरुवात केली. पहिला मैल झाला आणि मला एक मुलगी रस्त्यात चक्कर येऊन पडलेली दिसली. मला संदीपचे वाक्य आठवले, काही कर पण कुठे पडून येऊ नकोस. तो दोन पोरांना घेऊन घरी एकटाच होता. माझा वेग मग कमीच झाला. खूप वेळ पळून पाहिले तर फक्त ३ Km झाले होते. माझा टार्गेट वेग कधीच मागे पडला होता. पण लोकांना  पळताना बघून आणि रस्त्याकडच्या उत्साही लोकांना बघून मी कसेतरी माझे ५ किलोमीटर पूर्ण केले होते. ४१ मिनिटात ! :( दमून भागून  मी आमच्या तंबूत परतले. तिथे सर्व लोकांचे किती वेळात पूर्ण झाले हे ऐकून आपण नापासच झालो असे वाटत होते मला. पण भूक लागली होती. जेवण केले, एक फोटो काढला. आयुष्यात पहिल्यांदा खेळात काहीतरी केलं होतं मी. एकदा कब्बड्डी मध्ये भाग घेतला होता ५वीत , पण समोरच्या जाड्या मुलीने पाय असा पकडला  की मी तिथे गार झाले होते. :)
             थोड्या वेळात घरी यायला बस मध्ये बसून गेले. संदीपने सांगितले पोरांचे जेवण झाले, झोपत आहेत. गाडीत बसलो तोवर आभाळ स्वच्छ झाले होते. मस्त थंड हवा येत होती . मी कानात पुन्हा एकदा गाणी टाकली आणि रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांच्या खांबांकडे बघत पोरं काय करत असतील याचा विचार करत बसले. उगाचच एक मोठं पदक घेऊन घरी जात आहे असं वाटत होतें आणि मग डोळ्यांत पाणी येणं भागच !

क्रमश:
-विद्या .










Tuesday, May 11, 2010

कहानी पूरी फिल्मी है १

ख़रंतर मेघना आणि अभिजीतच्या Woman's Day च्या पोस्ट वाचल्या आणि बरेच दिवस जे चालू आहे त्याबद्दल लिहायची इच्छा पेपरवर उतरत आहे. तुमच्या लेखांशी याचा काही संबंध नसेलही आणि असल्यास तुम्ही तो जोडून घ्यावा. :-)
मला ना नेहमी असं वाटतं की मी आयुष्यात खूप मारामारया केलेल्या आहेत आणि उगाचच मी खूप ग्रेट आहे असं वाटतं. तर या अश्या वाटण्यामुळेच मी जेव्हा प्रेग्नंट होते (गरोदर हा शब्द कसातरीच वाटतो ना?मी बाई वगैरे झाल्यासारखा... ) तेव्हा म्हटलं की जाऊ दे ना आता इतके ( सहा-सात वर्षे ... ) नोकरी केली थोडा आराम करावा. आणि Being a woman मी घरी राहू शकले. मुलांना नसते अशी सवलत? असो, मला काय? तर मी मस्त नऊ महिने घरी आराम केला आणि तो दिवस उजाडला डॉक्टरकडे जाण्याचा.मुलगी झाली. आई नंतर हसून सांगत होती की बाहेर बातमी कळल्यावर एकदम मला रडू आले तर दादा विचारत होते 'मुलगी झाली' म्हणून रडते आहेस का? आई म्हणे मी कशाला रडू त्याबद्दल. आपली पोरगी 'सुअखरूप सुटली' याचं समाधान होतं ते बहुतेक.
हॉस्पिटल मधून घरी येऊन २ दिवसही झाली नाहीत आणि मला आपण घरी राहिल्याचा पश्चात्ताप होऊ लागला. सानूचं सगळं करण्यातच दिवस जायचा आणि वाटू लागलं की माझं आयुष्यं संपलं. आता मी कधीच परत नोकरी करू शकणार नाही. कसं शक्य आहे? बरं सानूचा तरी काय दोष त्यात? ती कधी ओठी होणार आणि मग मी नोकरी करणार? आणि समजा २/३ वर्ष ब्रेक घेतला तर परत कोण मला विचारणार. सोबत आई दादा होते तोवर ठीक होतं तेही गेल्यावर घर खायला उठलं. बरं नवराही काही असा नाही की जो बायको घरी आहे म्हणून तिनेच स्वयंपाक करावा, मी काही करणार नाही असं म्हणेल. त्याला माझ्या अवस्थेची पुरेपूर कल्पना होती आणि तशी त्याने मला साथही दिली.
कसेबस ४ महिने झाले आणि मला वाटलं की आपण resume तरी बनवावा. लिहायला बसले आणि मी वर्षापूर्वी काय करत होते हेच आठवत नव्हतं. आणि ते आठवून काहीतरी फायनल व्हायला दोन महिने गेले. आता अमेरिकेत नोकरी मिळवण्याचे दोन-तीन प्रयत्न केले. पण मंदीमुळे, माझ्या गॅपमुळे काही कुठे झाले नाही. त्यातही दो-चार वेळा फोन आले तेव्हा सानू नेमका झोपेतून उठली आणि फोनवर बोलायचं का तिला घ्यायचं काही कळत नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा अपराधी वाटलं की खरंच मी नोकरी करायची गरज आहे का? पण रात्र झाली की मनात विचार यायला लागायचे की मी किती दिवस अशी राहू. खरं सांगायचं तर २८ वर्षात अशी वेळच आली नवती की मी काहीच करत नाहीये. शाळा, कॉलेज मग लगेच एका महिन्यात नोकरी, की लगेच दुसरी नोकरी. माझं डोकं सैतानाचं घर झालं होतं. संदिपला ही कळलं होतं की काहीतरी करावं लागणार आहे.
मग आम्ही विचार केला की जाऊ दे इथे नाही मिळत नोकरी तर भारतात जाऊन प्रयत्न करू. असेही इकडे राहून बरेच वर्षे झाली होती. मला नोकरी मिळाली आणिमी सेटला झाले की तोही इकडेनोकरी शोधून मग कायमचे इथेच राहायचे असा प्लॅन ठरला. पण भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांची अवस्था तर माहीतच आहे. लोक कधीच ९ ते ६ काम करत नाहीत. उलट प्रत्येकाकडून जास्त कामाची अपेक्षा असते आणि त्यावरच तुमचे रेटींग ठरणार. म्हणजे मी ८-९ तासांत किती चांगले काम करते यापेक्षा मी किती तासा ऑफिसात थांबते यावर सर्व ठरतं. माझ्या प्रोफाइलसाठी तर ९-६ पेक्षाही जास्त काम करावं लागलं असतं. मग म्हणालो चला प्रोफाइल थोडा बदलून काहीतरी करू जिथे कमी ताण असेल. त्यासाठी अभ्यास सुरू केला. इकडे पुण्यात बहिणीने जिथे रेझुमे पाठवला होता तिथे काहीतरी हालचाल सुरू झाली होती> आणि चक्क मी जाण्याआधी माझा एक इण्टरव्हू फिक्स झाला होता. भारतात आले आणि सगळ्यांचे सानूला भेटून होईपर्यंत माझे २/३ ठिकाणी interviews झाले. पण खरंतर माझा आत्मविश्वास खूपच कमी झाला होता आणि तो कुणी एक शब्द झरी बोलला तर अजून ढासळत होता. त्यात आणि नको असलेल्या प्रोफाइलसाठी बोलायचे म्हणजे अजून कमी. संदीप माझ्यासोबत येऊन राहून परत गेला आणि माझी हिंमत कमी कमी होऊ लागली.
मी पुण्यात बहिणींसोबत राहत होते. त्या धोघीही माझ्याहून लहान आणि पुण्यातच नोकरी करतात. नोकरी शोधण्यासाठी तिथे राहून मग माझ्या interviewच्या वेळी कुणीतरी सानूला सांभाळायचे आणि मी जाऊन यायचे. एकूण ५/६ ठिकाणी जाऊन आले आणि मला परत सुखाची ओढ लागली. वाटलं जाऊ दे न कशाला हा सर्व व्याप. पुण्यात राहूनहई दोन महीने झाले होते. त्यात सानूला सांभाळायला संदीपची मदतही नसल्याने अजूनच हेक्टिक होत असे. बहिणी सर्व मदत तर करत होत्याच. पण मीच आई असूनही इतकी थकून जायचे की त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवणार. त्यात मग प्रत्येकाचा वाढलेला ताण, आम्ही सोबत राहूनही कित्येक वर्षे झाली होती त्यामुळे ती गॅप, यातून भांडणं तर व्हायचची. वाटायचं की आपण मनात मांडलेलं जग किती वेगळं होतं आणि परिस्थितीत किती अवघड.
बरं interview ला काही कॉल आले तरी त्यांना सांगितले की मी एक वर्षं काम करत नव्हते की बोलणं तिथेच संपायचं. काहीजण म्हणाले सहा महिने वगैरे ठीक आहे हो पण एक वर्षं खूप होतं. म्हणजे बाईने बाळंतही होऊ नये का? एकदा वाटलं आपण वेगळ्या प्रोफाइलसाठी कशाला नोकरी शोधायची? जे येतं, जे आवडतं ते करावं ना? मग पुन्हा उजळणी सुरू, पण मनाला एक उभारी मिळाली, जे आवडतं ते करण्यासाठी अभ्यअसाची.एकदा का मोठ्या कंपनीचा फोन आला की तुमचा कॉल आहे शनिवारी, या तिथे. मी रांगेत उभी राहून तिथे पोचले. त्या माणसाने मला एक टेक्निकल प्रश्न विचारला आणि मी संपून गेले. पुढचे १० मिनिट मी एकच उत्तर देते होते, I dont remember. तो जाताना मला म्हणाला 'Gap बराच झालेला दिसतोय. ' म्हटलं हम्म्म....
एकदा एक मजेशीर किस्साही झाला. एका कंपनीच्या walk-in interview ला गेले. ही २००० लोकांची रांग. म्हटलं आता कधी संपणार आपली ही पायपीट? जाऊ दे बाकीचे २००० होतेच ना? मी ही त्यातच. आता पहिला round बराच लवकर उरकला. त्यांनी मला थांबायला सांगितले. माझ्याशेजार एक गोड मुलगी बसली होती. म्हणाली मला पण थांबायला सांगितले आहे. बोलताना कळले की ती मुंबईला नोकरी करते आणि नवरा पुण्यात असतो. म्हणून इथे कडमडत आली होती दोन दिवसांसाठी. बिचारी शुक्रवारी ऑफिसकरून शनिवारी interview ला आली आता रविवारी परत जाऊन परत सोमवारी सुरू, तेही जोवर इकडे नोकरी मिळत नाही तोवर.आम्ही वाट पाहून तासेक झाला तिला म्हटलं बाई गं मी जरा जाऊनच येते माझे नाव पुकारले तर आल्यावर सांग मला. ती हो म्हणाली. मी धावत रेस्टरूमला जाऊन पळत परत आले. तिला विचारलं आला का माझा नंबर? नाही म्हणाली. परत तिने मला विचारलं, तुझं नाव ओळखीचं वाटतंय, तू blog लिहितेस का? म्हटलं हो, तर म्हणे अगं मी नेहमी वाचते मी तुझा blog. त्या क्षणी लई भारी वाटलं. अगदी कुणीतरी माझी स्वाक्षरी मागितल्यासारखं. And I didnt get the job but still I felt great. :-) असो.
त्यानंतर एका ठिकाणी बोलावणं आलं. हो, ते आल्याशिवाय आजकाल आतही येऊ देत नाही कुणी. कडमडत लवकर उठून ७ ची गाडी पकडून हिंजेवाडीला गेले. तिथे त्यांनी सांगितलं की interview घेणारे लोकच नाहीयेत तुझ्या प्रोफाइलसाठी आज तर नंतर या. आता शनिवारी सकाळी ९.३० ला हिंजेवाडीत काय करायचे. एका मैत्रिणीला फोन केला ती त्याच कंपनीत काम करते. तीम्हणे मी आज आलेलीच आहे कामाला, ये भेटायला. चला, ते तरी काम झालं. ३ महिन्यात एकदाही न भेटता आलेली मैत्रीण एकदाची भेटली मला. तिला पाहून गळाभेट घ्यायची इच्छा झाली पण आजूबाजूला पाहून आवरतं घेतलं. ती म्हणे तू तर काहीच बदलली नाहीयेस. मूल झाल्यानण्तर अशी compliment मिळाली की बायकांना अजून काय हवं? असो. तर तिला ना गालाला एक गाठ आली होती, म्हटलं काय झालं गं? तर म्हणाली अगं जायचं ही गाठ काढायला पण सुट्टीच मिळत नाहीये. तिचीही मुलगी एक वर्षाची असल्याने तिच्याही बऱ्याचं सुट्ट्या संपून गेल्या होत्या आणि कामही खूप आहे.एकतर ९.३० तास थांबायलाच लागतं, प्रवासाचे २ तास, मुलीसोबत राहायलाच मिळत नाही. म्हटलं असं करू नकोसजाऊन ये तब्येत महत्त्वाची. तिला भेटून मी घरी परत आले. परत रविवार एक कंपनी, मोठ्या रांगा आणि मी.... पण बहुदा तो दिवस वेगळाच होता. 'माझा' होता.
चक्कं तिथे मुलींची वेगळी रांग होती (इथेही segregation :) )आणि त्यामुळे माझा नंबर लवकर आला. interview सुरू झाला आणि मी सांगायला सुरुवात केली. इथे आल्यापासून पहिल्यांदा मला बरं वाटलं कारण मी जेव्हा सांगितलं की मी वर्षभर नोकरी करत नव्हते because I had a baby. तो माणूस म्हणाला its ok. 'ITS OK?' :-) मग पुढे सर्व सुरळित झालं. दुसरा round ही नीट झाला. They gave me an offer. I came home happy. पण अजून एका आठवड्यात ते कळवणार होते. माझं परतीचं तिकीट होतं आणि लवकर काही कळलं नाही तर मला जावं लागणार होतं. मी मग आईकडे जाऊन राहिले.त्या कंपनीकडून काही उत्तर येतं नव्हतं .मला येऊन ३-४ महीने झाले आणि अजूनही नोकरी मिळत नाही म्हटल्यावर काही भुवया उंचावल्याही की खरंच हिला नोकरी करायचीही आहे की नाही, इ. इ. आणि असाही मला एकटीला मारामारी करायचा कंटाळा आला होता. म्हटलं जाऊ दे, बाकी पोरी राहतातच ना घरी.आणि माझं जाणं जवळजवळ निश्चित झालं होतं.
पण आपण एक ठरवलं ना नियतीला दुसरंच करायचं असतं. I got the call........ :-) पहिल्यांदा नोकरी लागल्यावरही मला इतका आनंद झाला नव्हता जेव्हढा यावेळी झाला. मी परत जाण्याच्या फक्त ८ दिवस आधी हे सर्व घडलं. बऱ्याच लोकांना कळत नव्हतं की मला खरंच नोकरीची काय गरज होती. तेही नवरा परदेशात एकटा राहतोय आणि मी इकडे कशी राहतेय आणि मग कद्गी एकत्र राहणार, मुलीचं काय करणार, इ, इ. हेच सर्व प्रश्न मलाही पडले होते. पण स्वतःसाठी काहीतरी जिद्दीनं मिळवण्यात काय आनंद असतो ते ज्याचा त्यालाच माहीत.
या प्रोसेसमध्ये मला नवरा, सासरचे, घरचे सर्वांचा सपोर्ट मिळाला. ज्यांना तो मिळत नाही त्यांचं काय? काय माहीत. पण मला तरी नोकरी मिळाली होती. कुणाला वाटेल की चला मिळाली बाई हिला एकदाची नोकरी पण ही तर फक्त सुरुवात होती....
To be continued...

Friday, May 15, 2009

काय करावं?

परवा ना खूप दिवसांनी online radio वर दिल चाहता हॆ मधलं तनहाई गाणं लागलं होतं. अर्थात गाणी चालूही असली तरी प्रत्यक्षात त्यात मन अडकलंय असं आजकाल फार कमीच होतं. त्यातही गायकाचा आवाज ऎकून त्याचं कौतुक करावंसं वाटावं किंवा शब्दांनी उदास/आनंदी व्हावं हे अजूनच दुर्मिळ. असो. पण DCH मधला एकटा फिरणारा आमीर आठवला आणि पुन्हा एकदा त्याची लवस्टोरी बघावी असं वाटलं. मग म्हटलं राहूच दे. आजपर्यंत एकदाही असं झालं नाहीये की DCH पाहिलाय आणि उदास झाले नाहीये. खरंतर त्याचा शेवट किती सुखदायी आहे अगदी positive ...त्यातली अवखळ प्रीति झिंटा,उनाड आमीर, विचारी अक्षय आणि मजेशीर सैफ आणि त्यांची ती निखळ मैत्री...सगळंच कसं हवंहवसं...पण पण तरीही मनाला कसली खंत लागून राहते तो पाहिल्यावर माहीत नाही. विशेषत: रविवारी संध्याकाळी तर तो अजिबात पाहू नये. बरं झालं आज लिहिलंच याबद्दल ते. परत राहून गेलं असतं.
घाई करायचं कारण म्हणजे परवा संदीप २९ वर्षाचा झाला, लवकरच मीही होईन. मग वाटलं कशाला वेळच मिळत नाहीये किंवा मीच कुठल्यातरी तंद्रीत असते आणि खूप काही राहूनच जातय. बघताबघता सानू दोन महिन्यांची झाली. तिचे थोड्या दिवसांपूर्वीचे फोटो पाहून वाटलं अरे ही किती मोठी झाली, तिला सारखं बघत राहिलं पाहिजे, नाहीतर वर्षभराची होईल आणि तिला मनभरून पाहिलंच नाही असं वाटेल. बरं आपण मोठे होतोय म्हणजे आई-दादाही वयस्कर होताहेत. दम लागणारी आई आणि गोळ्या घेणारे दादा पाहिलं की पोटात कालवतं. वाटतं कुणीच मोठं नको व्हायला. मीही आणि तेही.
आमची ३री anniversary झाली मागच्या महिन्यात.बघता बघता इतकी वर्षे निघून गेली. ८ वर्षापूर्वीचा तो अजूनही डोळ्य़ांसमोरून जात नाही. त्याचं ते हसू संसारात हरवून जाण्याआधी त्याच्याबरोबर आपणही हसलं पाहिजे.
सानुसाठी आई-दादा घर सोडून इतके दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, फिरून सर्व दाखवलं पाहिजे. उद्या जातो म्हणतील तर काय करू? TV,laptop सर्व बंद करून नुसतं समोर बसून राहिलं पाहिजे त्यांच्या. आईच्या हातचं खाल्लं पाहिजे त्यात चुका न काढता...... सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री उशीरा झोपलं पाहिजे. अगदी आला आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला पाहिजे. काय करावं काही सुचत नाहिय़े.कुणीतरी थांबवता का रे हे संपणारे दिवस?
-विद्या.

Monday, February 16, 2009

प्रेमा तुझा रंग कसा?

नुकताच व्ह्यालेंटाईन्स डे झाला, झाला म्हणजे काय नेहमीसारखा एक शनिवार संपला. सकाळचे चहापाणी, Doctor ची भेट, मग थोडीफार खरेदी, घरी येऊन साफसफाई, जेवण-खाण आणि झोप. या सगळ्य़ामधे अगदी दुकानात जाऊनही साधे गुलाबाची फुलं कितीला होती हे बघणंही झालं नाही किंवा तो माझ्यासाठी घेईल का ही उत्सुकताही नाही की त्याने घेतलीच नाहीत म्हणून दु:खंही नाही. म्हणजे अगदी आई-दादांनी तो दिवस घालवावा तसा आम्ही पण घालवला म्हणायचा. अर्थात लग्नाच्या काही वर्षानंतर लोक असेच होत असतीलही, होय ना? :-) तर मी, आम्ही गेल्या थोड्या वर्षात साजरे केलेले १४ फेब्रुवारी आठवत होते, त्याबरोबरच बदलत जाणारं आमचं नातं आणि प्रेमही.
पहिल्या दोनेक वर्षी, किती बावळट होतो ना आम्ही, फुलांवर, ग्रीटिंग कार्डवर पैसे खर्च करायला.(म्हणजे मी तरी, मुलं काय नेहमीच व्यवहारी असतात म्हणा) :-)) पण त्या दिवशी त्याला न भेटता रहायला लागणं म्हणजे कुणीतरी काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं वाटलं असतं. ’मै उसके बिना जी नही सकती’ टाईप आमचं प्रेम. :-P मग पुढचे दोन वर्षं नोकरीसाठी दोन वेगळ्य़ा ठिकाणी, कधी वेगळ्याच देशात होतो. तिथेही मग त्याने साधं कार्डंही पाठवलं नाही म्हणून भांडणं, हिरमुसले होणं हेही झालं. पण तोपर्यंत आम्ही १४ फेब. ला न भॆटता राहू शकतो हे मनाने स्विकारलं होतं, अर्थातच आम्ही मोठे झालो होतो बहुतेक. :-) लग्नानंतरही तसं फारसं नाविन्य नव्हतंच राहिलं काही पण पहिला दिवाळी-दसरा कसा साजरा करतो तसा हाही दिवस साजरा करुन घेतला. आजकाल पहिल्या वर्षातल्या सणात, दोघांचे वाढदिवस, साखरपुड्याची anniversary, etc पण येतात बरं का. असो. तर नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर उरलं होतं ते आमचं सोबत रहाण्याने, एकमेकांबद्दल नवीन नवीन जाणून घेतल्यानंतरचं प्रेम. म्हणजे, मी दोन महिने सुट्टीला गेले तेव्हा, तो एकटा कसा राहील, काय खाईल, इ. काळजीवाहू प्रेम.
पण या सगळ्यापेक्षा, हा १४ फेब्रुवारी वेगळाच होता. अगदी अगदी वेगळा. विशेषत: गेला एक आठवडा जसा गेला त्यानंतर अजूनच. मागच्या शनिवारी Doctor ने बेड-रेस्ट सांगितली मला.शनिवारचा दिवस आम्ही दोघेही जरा घाबरलेलेच होतो, अचानक admit व्हायला सांगितल्यावर. मग तिथे राहिलेले ६/७ तासही कित्येक महिन्यांसारखे वाटले. शुभांगी-राम आले होते म्हणा धीर द्यायला, पण त्यादिवशी उगाचच आपण कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायला अजूनही किती लहान आहे असं वाटलं. आई-दादा असते तर किती बरं झालं असतं ना. असो.
घरी आल्यानंतर त्याने माझी जशी काळजी घेतली ते पाहून कसंसंच होतं होतं. मी आमच्या दादांना आजोबांची आणि आईला आमची अशी सेवा करताना पाहिलं आहे. पण त्यासर्वामधे आणि नवऱ्याने करण्यामधे कितीतरी फरक होता. त्याने अगदी उठवण्यापासून, परत गादिवर आणून झोपवणे, पाणी-जेवण अगदी हातात आणून देणे आणि नुसते पायमोजे घालणेही मला जमत नाही म्हणून पळत येऊन ते घालून देणे, हे सर्व (आई-वडील सोडून) कुणीतरी माझ्यासाठी करण्याची पहिलीच वेळ होती.मी कधी काही काम करायला उठले तर, तू जाऊन बैस पाहू म्हणणारा तो वेगळाच वाटत होता मला. :-) हे सर्व तो करत असताना मला जाणवलं की आमचं ते एकेकाळी फिल्मी वाटणारं प्रेम आता कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर आहे. तो माझ्यासाठी इतकं करू शकतॊ हे कधी माहितच नव्ह्तं मला, इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही त्याचा वेगळाच पैलू मला दिसला होता. माणूस अंथरूणाला खिळल्यावर त्याला बरेच साक्षात्कार होत असावेत, कोण आपलं, कोण परकं याचे. लग्नाच्या बंधनात जेव्हा माणूस अडकतो तेव्हा किती काय-काय वचनं तो देऊन बसतो ना? म्हणजे सप्तपदी चालताना किंवा 'Do you promise to be with her in Sickness and Health?' याला ’I Do' म्हणताना कुणाला कल्पनाही नसेल पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं.
काल रात्री तो झोपल्यावर त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून जे प्रेम वाटत होतं, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे फक्त थोडे दिवस, कारण आणखी थोड्या दिवसांत हे नातं अजूनच वेगळं होणार आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. :-)
-विद्या.

Wednesday, January 28, 2009

मी खूष आहे !!

आता हे जाहीर करण्याची काय गरज? तर ही जाहीरात नाही फक्त एक statement आहे. झालं असं की खूप दिवसांपासून मला इच्छा होत होती एक भाजी खाण्याची, शेंगसोला. आता कितीतरी लोकांना हे नाव माहितही नसेल. संक्रातीच्या आधी, भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतात. पण मग त्याला लागणाऱ्या भाज्याही विचित्रच आहेत. पावटा, ओला हरभरा, वांगं, गाजर, शेंगदाणे, बोरं इ. :-) एकतर हे combination किती odd आणि तेही अमेरिकेत यातला ओला हरभरा, ताजा पावटा मिळणं अजून दुर्लभ. पण यावेळी माझं नशीब जोरावर होतं. मला या सर्व भाज्या मिळल्या अगदी ताज्या. आणि भाजी केल्यावर त्याची चवही अगदी आई करते तशीच....... :-P मग त्याबरोबर तीळ लावलेली बाजरीचीच भाकरी हवी. :-) ते पीठ काय मिळतंच, पण चक्क जे मिळालं त्याची एक अखंड भाकरीही झाली. नाहीतर दोन-तीन तुकडे पडल्याशिवाय भाकरी काही होत नाही इथे. एकूण काय तर मला जसा हवा तसा शेंगसोला आणि भाकरीचा बेत पार पडला. अगदी संदीपला वाटीभरच मिळेल असं सांगून उरलेला सर्व संपवूनही टाकला आणि तृप्तीची एक ढेकर दिली................. :-) ........... म्हणून मी खूष आहे!!!
हे सगळं लिहिण्याचं कारण असं की ’मी खूष आहे’ जेव्हा असं म्हणत होते तेव्हा लक्षात आलं की आजकाल दिवसभरात किंवा अगदी महिन्याभरात आपण असं कितीवेळा म्हणतो की मी आज खूष आहे? त्यासाठी मग अगदी छोटं कारण असो नाहीतर खूप मोठं. मग स्वत:बरोबरच बाकी लोकांचं निरीक्षण करताना दिसलं की आजूबाजूलाही कितीतरी लोकं आहेत की ज्यांना ’I am happy today !' असं म्हणायला अगदी जीवावर येतं. दिवसभरात आपल्याला आनंदी असण्यासाठी एक कारण मिळू नये?
एखाद्या सोबत काम करणाऱ्या माणसाने म्हटलं, how are you? तर आपण पटकन 'Good' म्हणून सोडून देतो, तेच एखाद्या प्रेमळ मित्राने विचारले, ’काय रे कसा आहेस’, तर ’अरे एकदम मजेत’ असं म्हणायला काय पैसे पडतात का? मी समजू शकते की आपली दु:खं जवळच्याच माणसांना सांगता येतात, पण म्हणून रडतच रहायचं? आज काय खूप थंडीच आहे, उद्या काय कामच खूप होतं, परवा अजून काहीतरी.
एका व्यक्तीला जुन्या नोकरीत रहायचा अगदी कंटाळा आला होता. मग नोकरी शोधण्याची मारामार कशी चालू आहे याबद्दल दु:खं. नवीन नोकरी मिळाली तर पूर्वीचीच कशी बरी होती याचं रडगाणं. मग म्हटलं बाबा घरी जाऊन ये. आता भारतात आई-बाबांना भेटलास, सही वाटत असेल ना? असं विचारलं तर कसलं काय. इथे येऊन आजारीच पडलॊ म्हणून दु:खं. काय त्रास आहे राव लोकांना?
असंच जर चालू राहिलं तर मग यांना आनंद तरी मिळतो कधी आणि कशात? बरं, यांचं आयुष्य काही अगदी वाईट चाललेलं नसतं. रोजचं जेवण-खाणं, रुटीन अगदी सिनेमाला जाणं, फिरायला जाणं अशी करमणूकही चालू असते. मग जवळच्या माणसाने विचारलं की बाबा कसा आहेस तर लगेच तोंड वाकड करायला काय होतं?
मला अजून एक गोष्ट आता ध्यानात आलीय की हे रडणारे लोक नुसते स्वत: रडत नाहीत तर समोरच्याला असं भासवून देतात की तुला काय,तुझं सर्व ठीक चालू आहे ना. म्हणजे नुसतं स्वत: दु:खी नाही रहायचं, समोरच्याला तू सुखी असण्याचा गुन्हा केलायस असं वागवायचं. मग अशा लोकांशी बोलताना स्वत:चा आनंदही व्यक्त करता येत नाही का तर ते दु:खी आहेत. जणू काही यांच्या दु:खाला समोरचाच जबाबदार आहे. या सर्व लोकांनी कदाचित आयुष्यात खरी दु:खं भोगलीच नाहीत बहुतेक म्हणून कारणं उकरून काढून रडत राहतात. पण खरं सांगू मला एक कळलं आहे, Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it.
तर एकूण काय की ’मी खूष आहे’ हे म्हणणं प्रत्येकाच्या ’बस की बात नही’. होय ना? जमलं तर स्वत:ला कधी हा प्रश्न विचारून बघा काय उत्तर मिळतं. :-)
मधे एकदा एका जुन्या ’मित्राने’ विचारलं, ’कशी आहेस गं? घरचे सर्व मजेत ना? संसार कसा चाललाय?’ आणि सर्वात शेवटचा त्याचा प्रश्न होता,’ सुखी आहेस ना?’ त्या प्रश्नावर खरंच मला एका क्षणात माझ्याकडे असणार्या सर्व गोष्टींची जणू यादीच डोळयासमोर दिसली आणि एक मिनिट विचार करून समाधानाने उत्तर दिलं,’ होय, सुखी आहे मी. :-) ’ त्यावर त्याने फक्त ’:-)’ उत्तर दिलं आणि निघून गेला. पण पुढचे पाच मिनिटं मी सुन्न होऊन बसले होते.
-विद्या.
(खूप महिन्यांनी लिहित आहे आणि अगदी जसं डोक्यात येतंय तसं. गोड मानून वाचून घ्यावे ही विनंती. :-) )

Friday, April 04, 2008

हुरहूर

रविवारी संध्याकाळी रश्मीला बाय करून, जड मनाने दोघं गाडीत बसलो. कोलंबसमधे दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. पहिले पाच मिनिटं जरा शांततेतच गेले. रश्मी नसल्याने अजूनच शांत वाटत होतं. May be I was already missing her.
मग मीच म्हटलं ,'येताना शिकागोहून निघाल्या दिवशी खूपच ट्र्यफिक होती, तेव्हढी दिसत नाहिये, होय ना? बरं झालं उशीराच निघालो तिच्याकडून, तेव्हढाच वेळ सोबत घालवता आला.'
तोही मग, ' हो ना. काल पण म्युझियमला गेलो ते बरं झालं. एकतर बंदिस्त असल्याने थंडीचा त्रास नाही आणि एका दिवसात होण्यासारखंही होतं.'
माझाही होकारच त्याच्या बोलण्याला. मध्येच मला आठवण येते, 'आता परवा जाऊन भाज्या आणायला लागतील सर्व.' इ.इ.
आणि मग पुढचे ५-६ तासही असेच गेले दोन दिवस आठवण्यात घालवलेले नाहीतर मग घरात काय मागे सोडून आलोय त्याची चर्चा.
तसं हे नेहमीचंच. आमची मग कपिल-सोनालीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. आणि विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित गेला तो दिवस किती चांगला होता आणि परत तेच रुटीन असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर. की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
बरं हे ट्रिपचच असं नाही. दीडेक वर्षापूर्वी अर्णवचा पहिला वाढदिवस साजरा केला इथे. संध्याकाळी क्लब हाऊस मधून सर्व सामान आणायला आम्ही बरेच लोक मदतीला होतो योगिता आणि जी.टीं.च्या. एकेक करत सफाई करून क्लब हाऊसचा ताबा सोडला आणि घरी परतून सर्व जण योगिताकडे बसलो काही वेळ. पुन्हा तीच शांतता. :-) मी, आमचे अजून एक शेजारी, योगिता,जी.टी. सर्वच आपापल्या परीने काहीतरी विचार करत होते.
मग कोणीतरी बोललंच,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हाल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका योगिता कार्यक्रम.'
आणि अशा या गोंधळात आणि नवीन भेट म्हणून आलेल्या खेळण्यांना सोडून जुन्या चेंडूशी खेळणारा अर्णव अजूनही आठवतो आणि त्याचा क्यूट ड्रेस पण.कसला भारी दिसत होता. :-) असो. तर हे असं नेहमीचंच, आढावा घेणं आणि मनातल्या मनात एक हुरहूरही, की संपला तो दिवस अखेर ज्यासाठी गेले कित्येक दिवस पळापळ चालली होती.
या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. Imagine लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...
-विद्या.

Thursday, March 27, 2008

माझिया मना जरा सांग ना....

माझिया मना जरा सांग ना....मनात येईल ते लिहित जायचं, या ना त्याप्रकारे....अनेकदा अनेक पोस्टवर मी वाचलयं की 'काय लिहावं हे सुचत नाही' किंवा काही घडतच नाही तर काय लिहिणार. बरोबर ना? :-) अनेक अनुदिनींमधे कमीत कमी एक तरी पोस्ट असेल यावर. पण 'का' लिहितोय हा प्रश्न पहिल्यांदाच. तसं मी माझ्या ब्लोगला एक वर्ष पूर्ण झाल्यावर एक पोस्ट लिहिलं होतं त्यातले बरेचसे मुद्दे रिपीट होण्याची शक्यता आहे.तरीपण केतनच्या भाषेत 'खाज'. :-) मी शाळेत असताना किंवा नंतरही अनेकांनी कौतुक केलेलं, की छान पत्र लिहितेस हं. मग थोड्या कविताही आल्या/ अर्थात ते दिवसच कविता सुचण्याचे आणि लिहिण्याचे होते हे मला नंतर कळलं. असो. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा एकच कारण होतं, अनेक वर्षात मराठीत काही लिहिलंच नव्हतं, अगदी माझं नावंही मराठीत लिहिलं नव्हतं(कधी कागदावर मराठीमधे नावं लिहून बघा, खूप वेगळं वाटतं). ब्लोग लिहिण्याच्या निमित्ताने त्याला सुरुवात झाली.
याआधी अनेकदा एखादा विचार मनात येऊन फारतर थोडावेळ टिकायचा आणि निघून जायचा. एकदा ब्लोग लिहायला लागल्यावर मात्र असं झालं की एखादा विचार मनात आला की तो कधी एकदा कागदावर उतरवेन असं व्हायला लागलं. असं मला शाळेत सुरुवातीला काही कविता लिहिताना झालं होतं. ती अस्वस्थता परत माझ्यात आली होती. रात्री झोपताना काहीतरी मनात येतं आणि वाटतं की हे लिहिलं पाहिजे. मग एकदा का असा विचार मनात आला की संपलं, झोपेचं खोबरं. अनेकदा मी रात्री २-३ वाजता झोपलेय. ते विचार जणू भडाभडा बाहेर पडल्याशिवाय शांतपणे झोपूनच देत नाहीत.कधी असंही झालंय की एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल काय वाटतं हे दुसऱ्या कुणाला सांगण्यापेक्षा लिहिणं जास्त सोप्पं जातं. तिथं कुणी अडवणारं, प्रश्नं विचारणारं नसतं. त्यात कधी एखादी छोटी कथा होती, तर कधी कविता तर कधी नुसतेच भरकटणारे विचार.
हो, हे भरकटणारे विचार पण ना. कधी कधी इतका गोंधळ होतो डोक्यात सगळ्याच गोष्टींचा, योग्य-अयोग्य, मग त्या विचारांना एका ओळीत मांडण्यासाठी लिहित जाते. कधी कधी लिहितानाच कळून जातं की काय योग्य आहे आणि काय नाही. तर कधी अख्खा पोस्ट संपून जातो आणि मला काय करायचंय हे कळतच नाही.आता हेच पहा ना, मला मी 'का' लिहिते हे सांगायचंय पण सुसूत्रता येत नाहीये. मग काय करायचं? तर लिहित जायचं, मग घडी उलघडल्या सारखे एकेक विचार सुटत जातात.असेही अनेक पोस्ट लिहिलेत मी माझा कंटाळा व्यक्त केलाय तर कधी घरी जायचा आनंद. :-) केवळ 'व्यक्त' केल्यानाही बरं वाटतं. तर कधी, अगदी थोड्या दिवसांपूर्वी मी जेव्हा 'मी सध्या काय करतेय' किंवा 'मला काय करायचं आहे' यावर लिहिलं तेव्हा दोन-तीन उद्गारही आले, 'Just hang in there'. :-) कधी कधी ते मिळण्यासाठीही मी लिहिते.
अनेकदा आपण केवळ अशा एका मोठ्या विश्वाचे एक घटक आहोत याचाच आनंद मिळवण्यासाठी लिहिते. कितीतरी वेळा नवीन पोस्ट लिहिल्यावर marathiblogs.net वर यादीमध्ये आपलं नाव पहिलं आलं हे बघण्याचाही आनंद मी घेते. :) खरं तर आपण ब्लोगर्स थोड्याफार प्रमाणात सर्व सारखेच. कधी भरभरून लिहिणारे तर कधी आळशी.बरेच दिवसात काही लिहिलं नाही तर, 'काय कुठे गायब' असं कुणी विचारणारं असल्यावरही बरं वाटतं की नाही? एकमेकांना असे 'खो' देत आपण आपलं हे विश्व 'चालवत' राहतो. त्याचा एक घटक बनून राहण्यासाठी लिहिते. आणि कधी boring routine, आई-बाबा, शेजारी-पाजारी किंवा मित्र-मैत्रिणी सोडूनही आपलं थोडं फार का होईना एक 'secret life' आहे आणि जिथे सर्वांच्या नावं बदलून चुगल्याही करता येतात यासारखं मजेशीर कारण अजून काय असेल लिहायला? :-)
काही दिवसांपूर्वी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेट्ल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते जुने दिवस मी कधीही विसरणार नाही म्हटलं तरी अनेक संदर्भ पुसट होत जातात. फक्त मुख्य घटना लक्षात राहतात किंवा त्या लक्षात आहेत असं वाटत तरी राहतं. काय माहीत आयुष्यात अशा किती गोष्टी ५०-६० वर्षाचे होईपर्यंत लक्षात राहतील. पण विचार करा हेच पोस्ट आपण म्हातारे असताना वाचले तर किती मजा येईल. :-) माझे स्वत:चेच नाही, बाकीच्यांचेही जुने पोस्ट. तेव्हा 'अगं तुला ते हे आठवतंय का?' असं विचारणारं जवळ कुणी नसेल तरी हा ब्लोग नक्की असेलच. :-) होय ना? (आयुष्यात एव्हढी आधीपासून planning मी कशाचीच केली नसेल, हाहाहा... ) असो, कदाचित थोड्या काळाने हा पोस्ट वाचूनही मी हसत बसले असेन की मी काहीही लिहिते...... :-))
मी निवांत विचार करून लिहावं म्हटलं असतं तर माहीत नाही जमलं असतं की नाही लिहायला, म्हणून जे आठवेल तसं पटापट लिहून काढलंय. अजून नंतर वाटलं भर टाकेनच. पण तोपर्यंत माझा खो जास्वंदीला.
-विद्या.

Thursday, March 13, 2008

यावेळी भारतात होते तेव्हा दोन महिन्यांत बराच प्रवास झाला. मी अगदी बस, ट्रेन, रिक्षा सोबत सहा सीटर, Tempo trax आणि share auto मधूनहई प्रवास केला. त्यात अनेक लक्षात राहण्याजोगे प्रसंगही घडले. कदाचित ते सगळे वाचताना बोअरींग वाटतीलही पण लिहिल्याशिवाय राहवत नाहिये. :-)
मी मुंबईत उतरले आणि समीरसोबत, त्याने बुक केलेल्या KK Travels च्या पुण्याच्या गाडीत आम्ही बसलो. आता गाडी AC असली, नसली किंवा ती दोन तास उशीरा निघाली याने काही फरक पडत नव्हता. I was very much excited just to be there. मी गप्पा मारण्यात आणि आजूबाजूला (अंधार असला तरी) पाहण्यात मग्न होते. पहिले २-३ तास झाले असतील आणि गाडी मुंबई-पुणे हायवे वर बंद पडली.कुणीतरी म्हणालं की हे लोक आजकाल ऱोकेलवर गाड्या चालवतात. :-) त्यामुळे इंजिनाची पार वाट लागते. रात्री ३-४ वाजता हायवेवर आम्ही अशा ठिकाणी होतो जिथे कुणीही mechanic मिळणं अवघड होतं आणि दर एक मिनिटांत मोठे-मोठे ट्रक तिथून जात होते.एरवी मला अशावेळी फार चिडचिड झाली असती किंवा भीतीही वाटली असती. पण त्या क्षणाला मी इतकी आनंदात आणि तेव्ह्ढीच समाधानात होते की मी घरी जाणार आहे की मला या गोष्टींनी काहीच फरक पडत नव्हता. अर्ध्या तासाने कळलं की KK चीच एक गाडी थोड्यावेळात येणार आहे त्यात बसून जाता येईल. काय कुणास ठाऊक ते वातावरण फारच छान वाटत होतं. एका दगडी कट्ट्यावर पहाटे ४ वाजता बसून मी आणि समीर गप्पा मारत होतो. कसलंही tension नाही की भिती नाही. थोड्या वेळात दुसरी KK ची गाडी आली आणि सर्वात पहिली गोष्ट मी केली ती गाडीत घुसून जागा पकडली. :-) कितीही वर्षे,कुठेही रहा, Ur basic habits never die. :-) चार तासात होणारा प्रवास आम्ही ८ तासांत केला. आणि हो, हे KK चे लोक अगदी घरापर्यंत सोडतात बरं का, पण जर तुमचं घर सर्वात शेवटी येणार असेल तर अख्ख्या पुण्याची सैर झाली म्हणून समजा. :-)) पुण्यात बहिणींना भेटून चार-पाच तास विश्रांती घेतली आणि पुढच्या प्रवासाची तयारी केली. Btw, मी आई-दादांना surprise देणार होते. :-) त्यामुळे केव्हा एकदा घरी पोचते असं झालं होतं.
स्वारगेटवर पुणे सातारा लाल-डब्बा मिळाला. समीरने कंडक्टरला सांगूनही ठेवलं की बाबा हीने बराच प्रवास केला आहे, त्यामुळे सातारा आलं की तिला नक्की उठवा.नाहीतर जाईल कोल्हापूरला. मी नुकतीच आल्याने जवळ मोबाईलपण नव्हता. अर्धवट झोपेत मी तो अडीच तासांचा प्रवास केला आणि मी साताऱ्यात उतरले. आता फक्त शेवटचा टप्पा. सातारा-कोरेगांव. :-) तो फक्त अर्ध्या तासाचा रस्ता आहे. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मला कोरेगांव गाडी मिळाली. कोरेगांवला संध्याकाळी जाणाऱ्या गाड्य़ांतून प्रवास करणं जरा अवघडच. एक तर शहरात आपला माल विकायला, खरेदीकरायला आलेले गावतले लोक तेव्हा प्रवास करतात. त्यामुळे गर्दी असतेच, पण त्यात पिऊन तर्रर्र झालेलेही बरेच.:-)
तर मी माझी handbag घेऊन गाडीत चढले. आता ही handbag विमानात कितीही छोटी वाटत असली तरी बसमधे डोक्यावरच्या जागी, किंवा पायासमोर कुठेही बसत नाही. त्यामुळे मला ती दोन ओळींच्या मधे ठेवावी लागली. पहिला stop आला आणि एक ६५-७० वयाचा माणूस आत शिरला. त्याआधी ती ब्याग ओलांडून बरेच लोक गेले होते आणि मला कळतंही होतं की अडचण होतेय, पण पर्याय नव्हता. त्या म्हाताऱ्याने(हो, आजोबा म्हणायची इच्छा होत नाहीये) धडपडत bag ओलांडली आणि माझ्या तिरक्या पुढच्या सीटवर बसला. त्याला धड पाऊलही टाकता येत नव्हतं,( वयामुळे नाही प्यायल्यामुळे)आणि तो सुरु झाला. ’असे कसे ठेवतात रस्त्यात सामान. शिकलेले लोक नव्हं तुम्ही, कळत न्हाय काय?मी कोण हाय माहीत नाही तुम्हाला. कंडक्टर कुठाय? बोलवा त्याला, मग सांगतो मी....’ मी शांतपणे समजावयाचा प्रयत्न केला, पण तो सुरुच.मी गप्प बसले होते, पण शेवटी माझ्या मागच्या माणसाने बोलायला सुरुवात केली,’अहो गप्प बसा ना जरा. सांगितलं ना, बसत नाय वर ब्याग म्हणून.किती कटकट लावलीय.बसलाय ना जागेव एका, बसा ना मग.’ शेवटी असं झालं की bag माझी, मी गप्पच आणि हेच दोघे भांडत आहेत. कसाबसा तो अर्धा गेला आणि माझ्या नशिबाने मी त्या म्हाताऱ्याच्या आधीच उतरले नाहीतर अजून एकदा शिव्या बसल्या असत्त्या. :-))
गावांत उतरले आणि मंगळवार! एकही लाईट नव्हती गावात, ना कुठल्या घरात ना रस्त्यावर. कसबशी रिक्षात बसले आणि घरचा पत्ता सांगितला.त्याने रिक्षा इतकी जोरात घेतली की माझ्या हातातले पैसे कुठेतरी उडालेच. माझ्याकडे जास्त सुटे पैसेही नव्हते आणि होते त्यात काही इथले पैसेही मिक्स होते. घराजवळ रिक्षा आली, अंधारातच अंदाजाने पैसे दिले. घराबाहेरही इतका अंधार होता की आई-दादा घरात नसतील तर घाबरून जाईन म्हणून रिक्षावाल्यालाच एक मिनिटं थांबवून ठेवावं असं वाटलं. पण मी पैसे देताच तो निघून गेला आणि मी घरात घुसले.
२ वर्षांनी घरात येताना रडून येतंच होतं. बाहेरच्या खोलीत एक मेणबत्ती जळत होती. दाराचा आवाज झाला म्हणून आई बाहेर आली. तिला अंधारात कळेना की कोण आलंय. मी पट्कन आईला मिठी मारली आणि तेव्हां आईला कळलं की ती मी आहे. तेव्हढ्यात दादा बाहेर आले. त्यांना तर अजून काही कळेना. मेधा(माझी बहीण) सकाळी तर पुण्याला गेली होती, आता परत कशी आली आणि आईला मिठी मारून रडतेय का? :-)) मग त्यांनाही अशीच मिठी मारल्यावर कळलं की मीच आहे. जरा सर्व शांत झाल्यावर आईने सांगितलं,’ हे बघ, calender घेऊनच बसलोय,तू कधी येणार आणि तुला आणायला कसं, कधी जायचं ते. तू आधीच आलीस आणि सगळंच फिसकटलं. :-)’ फार तर २०-२५ मिनिटं बसले असेन मी बोलत. आईला म्हटलं काहीतर जेवायला दे आणि मी झोपते. आईने मस्तपैकी भाकरी आणि मेथीची भाजी केली होती. ती खाल्ली, आंघोळ केली आणि गादीवर पडल्याच्या दुसऱ्या क्षणाला मी झोपलेले होते. :-)) मी शिकागोमधून निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत ४४ तास सलग प्रवासात गेले. But it was worth it. I was home.
-विद्या.
P.S. ज्या हेतूने मी लिहायला सुरुवात केली होती त्यापासून जरा भरकटलेच. पण पुढचे वर्णन पुढच्या भागात....

Tuesday, March 11, 2008

One fine day...

आज सकाळी उठले आणि सगळ्यात पहिला प्रश्न डोक्यात आला, ’डासाला इंग्रजीमधे काय म्हणतात?’ :-) कदाचित एखाद्या अर्धवट स्वप्नाचा परिणाम असेल आणि माझं डोकं इतकं जड होतं नुकतेच उठल्याने. कितीतरी वेळ(२/३ मिनिटे?) मला डासांच्या सर्व जाहिराती आठवल्या, good knight, All out, कछुवा छाप अगरबत्ती,इ. सारखा ’मच्छरों का हमला’ आठवत होता. :-)पण इंग्रजीत काय म्हणतात ते काही आठवेना. चहा ठेवून ब्रश करेपर्यंत एकदम आठवलं, mosquitoes.... :-) I got it आणि माझं मलाच हसू आलं. :-)
अशा अनेक सकाळी एखादा विचित्र विचार येऊन सुरु झाल्या असतील. त्या सगळ्या काही मला आठवत नाहीत आणि ते शक्यही नाही. सकाळी उठल्या-उठल्या पहिली ५ मिनिटांत एकतर काही सुचत नसतं. पण डोळे उघडताच एखादा विचार डॊक्यात येण्याच्या ठराविक फेजेस येऊन गेल्यात. सर्वात पहिली आणि prominent phase शाळेतली. ते दिवसच उत्साहाचे असतात म्हणा. प्रत्येक वर्षी, शाळेच्या पहिल्या दिवशी, उठून पहिल्या पाच मिनिटांतच नवीन दप्तर, पुस्तके, वह्या सगळं चाळून झालेलं असतं. मे महिन्याचा पहिला दिवस, दिवाळीची सकाळ, नवीन सायकल मिळाल्यानंतरचा दुसरा दिवस. सर्वात त्रासदायक असायचे ते परिक्षेचे, निकालाचे. :-) एप्रिल महिन्यातील अनेक सकाळी यावर्षीचा निकाल काय असेल असा विचार करत सुरु केल्या असतील, विशेषत: १० वीच्या निकालाआधी. मे,जून महिन्यात आमच्या घराच्या अंगणात मोगऱ्याची फुले मोहरत असत. सकाळी मिटल्या डोळ्यांनी दरवाजा उघडून तो सुवास मनभरून अनुभवला आहे आणि किती फुले आहेत त्यावर आज किती मोठा गजरा करता येईल याचा विचार केला आहे. कधी रात्री मी मेहंदी लावल्यानंतर, सकाळी अवघडल्या हातांकडे पहायची उत्सुकता असायची,की कुणाचा हात जास्त रंगला असेल. हातांचा वास आणि गादीवर पडलेले मेहंदीचे कण त्या दिवसाची सुरुवात करायचे.
शाळेनंतरची फेज कोलेजची. तिथल्या अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. पण शेवटच्या वर्षी काही interview दिल्यानंतर, एखादी सकाळ येते जेव्हा सर्वात पहिला विचार येतो, I have a job. :-) I loved that day. त्यानंतर आठवते ती संघर्षाची फेज. स्वत:ला prove करण्यासाठी आई-दादांची भांडण्याची. एखाद्या सकाळी उठून, ’आपण का उगाच भांडतोय?देऊन टाकावं त्यांना हवं ते’ असं वाटण्याची. त्यात भर मुंबईच्या उन्हाळ्याची. अजिबात कसलाही विचार करायला लागू नये म्हणूने सकाळी ११-१२ पर्यंत झोपून रहावं आणि खिडकीतून आलेल्या उन्हानं अस्वस्थ होऊन उठल्यावर अजूनच depression यावं. त्या काळात पावसाळ्यातला एखादा दमट दिवसही अगदी नको करून सोडतो. किंवा कधीतरी घरी गेल्यावरही त्या तंग वातावरणात उठावसंच वाटू नये अशा त्या काळातल्या सकाळी माझ्या सर्वात नावडत्या. पण यावेळी दोन वर्षांनी घरी गेल्यावर रात्री गाढ झोपून गेले आणि सकाळी डोळे उघडायच्या आतच ते फीलिंग आलं,I am home. Nothing can beat that.
माझी सर्वात आवडती फेज म्हणजे प्रेमात पडतानाची. डोळे उघडताच त्याचा विचार डोक्यात येतो आणि त्याने आदल्या दिवशी बोललेलं एखादं वाक्य आठवत रहावसं वाटतं. मग आज तो दुपारी भेटेल की नाही, आज कोणता ड्रेस घालून जावा, अशा प्रकारचे काही प्रश्न त्या फेज मधे येत राहतात. एखाद्या सकाळी, ’आज तो भेटणार नाहीये’ हाच विचार डोक्यात येतो आणि उगाचच सकाळ झाली असं वाटतं किंवा याच्या उलट ’आज तो भेटणार’ याचा आनंद. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी ती सकाळ अनुभवायला हवी जेव्हा दोघांनाही माहीत असतं ’तिचं/त्याचं माझ्यावर प्रेम आहे’. :-) गादीवर नुसतं पडून रहावसं वाटतं, आदल्या दिवसाचा सर्व प्रसंग वारंवार आठवत. सर्वात भयानक, भीतिदायक सकाळ ती, जेव्हा आपण खरंच आयुष्यभर बरोबर राहू शकणार नाही की काय अशी आशंका आणणारी. जाऊ दे, तो दिवस कधी कुणाला पाहायला लागू नये. त्याला मागे सोडून नवीन जागी गेल्यावर उगवणारी सकाळ किती भकास असते सांगता येणार नाही. पण या सर्व प्रसंगातून गेल्यावर, असा एखादा दिवस येतो, जेव्हा डोळे उघडल्यावर तो शेजारी दिसतो आणि सर्वात पहिला विचार डोक्यात येतो ’आता आपण आयुष्यभर सोबत राहणार’.:-) You know all the fight you have gone through till now is worth to have this feeling one fine day.
-विद्या.

Monday, March 10, 2008

त्या दोघी आणि मी

ती सकाळी त्याच्यासोबतच उठते आणि कामाला लागते. सकाळची वेळ फार पळापळीची. रात्री निवडून ठेवलेली भाजी करायची असते. चहा, मग चपाती. त्याचा डबा भरून देऊन तो जाईपर्यंत अगदी जीव नकोसा होतो. देवाने दोन ऎवजी चार हात दिले असते तर बरं झालं असतं असं वाटत राहतं. तो गेला की मग जरा निवांत होतं. चहा घेता-घेता ई-सकाळ वाचून होतो. मेल, बातम्या दोन-चार लोकांशी गप्पा आणि घरी फोन करून आईशीही बोलणं होतं जरा. विशेष काही नाही, नेहमीचंच, जेवण झालं का, आवरलं का, इ,इ. मग पुन्हा आवरा-आवर सुरु होते. सकाळी अर्धवट पडलेला पसारा, भांडी आवरून होतो तोच तिची आवडत्या मालिकांची मालिका टी.व्ही. वर सुरु होते. दोनेक तास टीव्ही पाहून मग ती संध्याकाळच्या जेवणाची तयारी करु लागते. हो, संध्याकाळी तो आला की मी निवांत बोलत बसता येतं, तेव्हा कुठे किचनमध्ये वेळ घालवायचा. तसंच जरा बाहेर पडून काही सामान आणायचं असेल, कुणा मैत्रिणीला भेटायचं असेल तर तेही करता येतं, जिम ला जाता येतं. शुक्रवारीच घरातली आठवड्याची कामं केली की मग पुढचे दोन दिवस बाहेर जाता येतं कुठेतरी. एक बरं आहे, काही जणी तिच्या जवळच्या मैत्रिणी झाल्यात त्यामुळे त्यांच्यासोबत काही ना काही प्लान बनवता येतो, शनिवार-रविवार असो किंवा एखादा सण असो. दिवस कसे सरतात कळतच नाही. दिवस,महिने काय आणि वर्ष काय...
ती तशी तर दुसरी.... तीही तशी लवकरच उठते. आणि जडावलेल्या डोळयांनी आवरताना उगाचच रात्री उशीरा झोपल्याबद्दल चिडचिड करते. जमेल तसं तो किंवा ती चहा ठेवतात, नाहीतर मग हाताला जे लागेल ते पर्समधे टाकून त्याला बाय-बाय करून कामाला जाता-जाता कंटाळा आलेला असतो अगदी. कधी एखादी मिटींगला जायची पळापळ तर कधी काल राहिलेल्या कामाचं टेन्शन. वाटतं सगळं सोडून घरी राहावं. पहिले दोनेक तास घाईत गेल्यानंतर जरा मेल चेक करता येतात. मग जेवायच्या आधी घरी एकदा फोन करायचा. संध्याकाळी आलं की चहा होतो न होतो तोच gym ला जायचं. हो, दिवसभर काहीच हलचाल नाही, असं बैठं काम करून ५/६ वर्षात काय होईल? रात्री ८ नंतर जेवण बनवून जेवेपर्यंत किती त्रान राहणार? दोघं मिळून जेवण बनवताना कुठे जरा गप्पा मारता येतात. कधी कामाचं frustration तर कधी promotion चं. कधी साहेबाच्या कटकटी तर कधी त्याच-त्या लोकांना पाहून आलेला कंटाळा. अशात जेवणात काही साग्रसंगीत करणं जमत नाही. एका तासाच्या आत जे काहि होईल ते उत्तमच. चपाती-भाजी नाहीतर भात-आमटी. ज्या दिवशी हे सर्व बनवायाचं तो म्हणजे सुट्टीचा नाहीतर मग काही खास दिवस असेल तरच. जेवणानंतर मग टी.व्ही. आणि झोप. दोघांचाही शनिवार, रविवार घरातली सफाई, सामान आणणे आणि झोपा काढणे यातंच जातॊ. घर,नोकरी, नवरा,मित्र-मैत्रिणी, सण-वार कशाकशाला आणि किती वेळ द्यायचा हे तिला, खूप चांगलं म्हणता येणार नाही पण, जमतं बऱ्यापैकी आणि दिवस कधी सरत जातात समजतच नाही....
आणि मी? मी सकाळी उठते, कधी? कधीतरी. तो आधीच निघून गेलेला असतो. किंवा जात तरी असतो. मग बंद डोळ्यांनीच त्याला बाय करून पडून राहते. कधीतरी सकाळी लवकर उठून चहा-नाश्ता करण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही जमत नाही. त्याने केलेला चहा असेल तर प्यायचा नाहीतर जे मिळेल ते चघळत सकाळच्या मेल चेक करायच्या. कुणी ना कुणी online असतंच. गप्पा मारत १०-११ वाजतातच. नसेलच कुणी तर टीव्ही असतोच. मग तो दुपारी येणार असेल तर पटकन काहीतरी बनवायचं. तो येऊन गेल्यानंतर मग पुन्हा टीव्ही संध्याकाळी पाचपर्यंत.हो, मध्ये मधे काही लोकांचे फोन येत असतात, interview साठी, काही चौकशीसाठी की किती वर्षं नोकरी केलीत, काय काय येतं, काय काम केलं, कधी, कुठे. आता तेही प्रश्न पाठ झालेत. थोडं-फार वाचत होते अभ्यासाचं, पण आता त्यातही काही राम उरला नाही. :-)) संध्याकाळी तो आला की चहा, gym आणि परत आल्यावर जेवण आणि झोप. कुणाला फोन नाही, मेल नाही, डोक्याला कसलाही त्रास नाही.
अशा या perfectly आळशी आयुष्यात problem काय आहे? एक म्हणजे त्या दोघींनाही माहीत आहे की त्यांचं काम काय आहे, त्यांना काय करायचं आहे आणि प्रत्येकाचं रुटीन ठरलेलं आहे. मला मात्र माहीत नाहीये की मला काय करायचं असतं. कधी कधी मी प्रयत्न करते काहीतरी खास करण्याचा, काही रुटीन लावण्याचा किंवा निदान साधं का होईना त्याच्या मदतीशिवाय जेवण बनवण्याचा. पण किचनमध्ये दीडेक तास घालवल्यावर सर्व अवघड आहे असं वाटतं आणि आयुष्यात जेवण बनवणे आणि भांडी याशिवाय काहीच नाही की काय असं वाटून अगदी रडायलाच येतं. :-) मग अगदी इकडची काडी तिकडे करावीशी वाटत नाही. पण पूर्वीसारखं सतत पळत राहायची, नोकरी करायची किंवा नवीन काही शिकायची इच्छाही होत नाही. अर्थात त्याला माझा आळशीपणाही कारणीभूत आहे.असो. मी सध्या नक्की कुठल्या रोलमधे fit होते हे मलाच माहीत नाहीये. पण एका रोलमधून दुसऱ्यामधे जाणं खूप अवघड आहे हे नक्की. हे सर्व मी आता विचार करतेय, कदाचित अजून थोड्या दिवसांत हे सगळे विचार करायची गरजही पडणार नाही. मी जुन्या रोलमधे जाईन आणि सर्व सुरळित होईल. पण तरी सध्या माझा Identity Crisis रोज चालूच राहतो. कधी कधी मी अगदीच घाईला आल्यावर, पुन्हा एकदा तो मदतीला धावून येतो. :-) ’राहू दे ना सगळं. बाहेर जायचं का आपण? चल फिरून येऊ.’ त्याच्या प्रेमळ शब्दांनी रडता-रडताही हसू येतं आणि दिवस सरतच जातात.....

-विद्या.

Monday, March 03, 2008

तुझी भेट

तुझी भेट

परवा तू भेटलास आणि वाटलं
सुकलेली फुलं अलगद तळहातावर ठेवून,
दोन बोटांनी चुरगळली गेलीत आणि 
थोडा-फार उरलेला सुवासही उडून गेला.

बरं झालं भेटलास ते !
आता तो चुरा
फुंकर मारून उडवता येईल
असेही डायरीमधे, नवी फुले ठेवायला
जागाच उरली नव्हती.

-विद्या भुतकर.

https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, February 19, 2008

मी सध्या काय करतेय?

अर्थात मी सध्या काय करतेय यात कोणाला interest असणार म्हणा. पण माझ्या आयुष्यातील ही एक वेगळीच phase आहे. हो, कारण मीसध्या काहीच करत नाहीये. कित्येक वर्षात असं झालं नव्हतं. पण खरंच मी काही करत नाहीये. :-) फक्त त्रासदायक प्रोजेक्टमधून सुटका करून घेतली.घरी जाऊन दोन महिन्याहून जास्त सुट्टी टाकली. सुट्टीत काहीही केलं नाही, फक्त नोकरीचा राजीनामा दिला. मग पुढे काय होईल याचा विचार न करता दोन महीने घरी पडून राहीले. हो, वजनाचा विचार न करता :-),दर दोन दिवसांत २-४ वडापाव नक्कीच खाल्ले. आपण आता कमवत नाही याचा विचार न करता, मनमुराद खरेदी केली. इथल्या नवीन consultant ने नोकरीवर कधी रुजू होणार विचारल्यावर त्याला महिन्याभर उत्तरच दिले नाही. आणि घरून परत आल्यावरही दोन आठवड्यानंतर असे वाटले की आता काहीतरी केले पाहीजे. पण ते ही फक्त १ आठवडा, नंतर परत निवांत.
तर आता गेले महिनाभर मी शिकागोमधे घरात पडून आहे. नवीन नोकरीचे , नवीन client मिळायचे टेन्शन येते, जाते, मग मी थोडेफार काही वाचते, परत टीव्ही पाहायला लागते. आता या सगळ्यात कुणाला फोन करावा, कुठे फिरून यावं, काही लिहावं, काही वाचावं किंवा लोकांनी काही लिहिलं तरी त्यांना कमेंट टाकाव्या यातलं काही एक मला वाटत नाही. ना मला सकाळ संध्याकाळ काही छान करून खावं, खायला घालावं असं वाटतं. कदाचित मी एक मुलगी असल्याचा हा फायदा असेल म्हणा, पण आयुष्यात एव्हढं निवांत कधी वाटलं नव्हतं. माहीत नाही, ही phase चांगली की वाईट. वाईट,कारण, कुठल्याच गोष्टीबद्दल इतकं निष्क्रिय असणं मला नवीनच आहे. पण Imagine, सकाळी संदीपला bye करायला धडपडत उठून, सोफ्यावर पडून राहीले आणि तो मला पांघरूण घालून, (मला उठायला नको म्हणून) माझा मोबाईल शेजारी ठेवून निघून गेला. :-) यासारखं सुखं कुठलं आणि ते आता अनुभवायचं नाही तर कधी? :-ड
-विद्या.
(आज बरेच दिवसांनी मराठीत टाईप करायला पण जरा कष्टच पडले, पण तेव्हढं चालायचंच. हहाअहा :-) )

Wednesday, October 24, 2007

मन वढाय वढाय...

ब्लॉग आणि तोही भर दुपारी ऑफिसमधे :-) बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळालीय. :-)) अर्थात त्याआधी मेल लिहिणे, चेक करणे, हा पेपर ,तो पेपर सगळं उघडून झालं.म्हटलं चला जरासं लिहूनही बघावं. खरंतर मी विचार करत होते की आता लिहीन....तर ते घरी गेल्यावरंच....पण त्याआधीच संधी मिळाली. तर त्याचं असं झालं.....एकाच कंटाळवाण्य़ा प्रोजेक्टवर काम करून मी बरीच कंटाळले. मधे मेघनाने एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं तसं पळून जाण्यात काय मजा आहे, स्वत:ला प्रूव करूनच जायचं असा अट्टाहासही केला. आणि खरंच एकेका दिव्यातून पार पडत एक प्रोजेक्ट पूर्ण केलाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, वेळ आल्यास कुठलीही गोष्ट स्वत: अभ्यास करूनही पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तर मिळालाच पण न कंटाळता काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंदही.
त्यात १०० वेळा 'Are you there?' असं विचारल्यावर एकदाच उत्तर देणारा , बग आहे हे माहीत असूनही तॊ शेवटपर्यंत न कळवणारा, आणि शेवटी त्याला सांगण्य़ापेक्षा स्वत:च मेलेलं बरं असा वाटणारा भारतातील एक टीममेंबर. कितीही वेळा प्रोजेक्टचं स्टेट्स सांगितल्यानंतरही मग याचं काय आणि त्याचं काय असं विचारून पिडणारां मॅनेजर, आणि सगळ्य़ा कटकटीतून बाहेर पडलेतर मग Time Sheet Defaulter म्हणून आलेला एखादा फालतू मेल...अशा सगळ्या दिव्यातुन पार पडत शेवटी काल डेमो पण पूर्ण झाला आणि आता जरा कुठे हुश्श होतंय असं वाटलं.
हे सगळं होतं असतानाच एक गोष्ट जाणवली होती. एव्हढी मरमर करूनही मिळावी तितकी शाबासकी नाहीच...आणि ती कधी मिळणारही नाही हे कळलं तेव्हाच यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तसं बरंच अवघड वाटत होतं, दोन वर्ष अगदी घर ,रोजचा येण्याजाण्याचा रस्ता काय, काहीच बदलावं लागलं नाही. अशा स्थिरतेकडून अस्थिरतेकडे जायला मन धजावत नव्हतं. पण प्रत्येक वेळी एक असा क्षण येतो ना तेव्हा वाटतं की बस्स...खूप झालं आता. सुदैवाने म्हणा तसा क्षण लवकरच आला आणि मग पावलं हळूहळू त्या मार्गाने वळू लागली. आता हो-नाही करत माझी रीलीज पक्की झाली, लवकरच माझ्या जागी येणाऱ्या माणसाची पण आयात झाली. मग काय, त्याला फक्त काय काय केलंय ते सांगायचं आणि सुटायचं. त्यातही १०-१२ documents वाचायला दिले की आपली अजून थोडी सुटका. गेले दीडेक आठवडा तेच करत आहे. :-) एक-दोन तास बडबड करायची, काही documents लिहून ठेवायची,इ.इ.
खरं सांगायचं तर त्यातही मी जाणार म्हटल्यावर असं वाटलं की मी अचानक विरुद्ध गटात आलीय आणि माझ्यासोबत मॅनेजरबद्द्ल गॉसिपिंग करणारी मुलगी, मी काही issues अर्धवट तर टाकत नाही ना हे बघण्यासाठी एकदम दुसऱ्या गटात गेली. लोक कसे फिरतात ना? असो. इतके दिवस प्रोजेक्टवर काम केल्यावर सगळं दुसऱ्याच्या हातात देणंही अवघड जात होतं. वाटलं ही गोष्ट करताना आपल्याला किती कष्ट पडले होते, ती केली तेव्हा कसे प्रोब्लेम आले होते. :-) हे सगळं सोडून देणं जितकं सोप्पं वाटलं होतं तितकं नाहीये हे ही जाणवलं. असो, या सगळ्य़ांपेक्षा आता फक्त १५-२० दिवस राहिलेत घरी जाण्यासाठी हेच महत्वाचं वाटतंय आणि बाकी सगळं फालतू वाटत आहे. कुणाचं आपल्यावाचून अडणार आहे? आता घरी जाऊन हे करणार, ते करणार, अशी दिवास्वप्नं बघत आहे. :-) कधी कधी तर मी १५-२० दिवसांत घरी असेन या कल्पनेनंच काही काम सुचत नाही. असो... इतके दिवस सरले..हेही सरतील.... :-))

आता मात्र लिहीन ते.....घरी गेल्यावरच........

-विद्या.

Monday, October 08, 2007

दोन टोकं

तू आणि मी... किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? त्याशिवाय का आपण भेटत राहिलो दर थोड्या दिवसांनतर, ते ही परत तोंडही पहायचं नाही असं ठरवून. हां, नाही म्हणायला मला एक वाटायचं, आपण दोघेही जरा वेडे होतोच. सुरुवातीला एकमेकांसाठी आणि नंतर..... ते सुरुवातीचे स्वप्नातले दिवस सोडले तर बाकी काय होतं सांग ना? आपल्या आवडी-निवडी, स्वभाव सगळंच वेगवेगळं होतं. तरीही किती विचित्र असतं ना माणसाचं मन? दरवेळी त्या मंतरलेल्या दिवसांच्या मागे मागे धावून पुन्हा तुझ्याकडे यायचे आणि तूही माझ्याकडे. मग थोडे दिवस पुन्हा तो खेळ, एका हव्या असलेल्या, हरवलेल्या स्वप्नाला नवीन जोमाने एकमेकांत शोधायचं. साहजिकच तीच भांडणं, तोच अपेक्षाभंग आणि तेच अजूनच दुखावलेलं मन. पुन्हा एकदा वेगळं होणं, थोड्या दिवसांनी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेत परत येण्यासाठी. तुला नंतर कळलंच असेल म्हणा, मला तुझ्या आधीच कळला हा खेळ. तेव्हापासून तर तुझी चिडचिड अजूनच वाढली माझा तटस्थपणा बघून.तुला काय त्रास होत असेल चांगलंच कळत होतं मला, पण मी तरी काय करणार होते? तुला समजावणं अवघड होतं रे, हे असं धावणं किती व्यर्थ आहे. पण मागच्यावेळी भेटले तेव्हा, तुझ्या डोळ्यांत तो शोध थांबलेला दिसला आणि किती बरं वाटलं, माझ्यासाठी नव्हे, तुझा त्रास, छळ अखेर संपला म्हणून.
पण खरं सांगू? त्या रात्री झोप लागली नाही मला. शेवटी दोन टोकं जोडणारा धागा तुटला होता.
-विद्या.

Wednesday, October 03, 2007

जे जे उत्तम...

नंदनने टॅग केल्यावर जरा गडबडलेच होते. :-) हो, नुसत्या छान,सुंदर अशा प्रतिक्रिया देताना सोप्पं असतं पण जावे त्यांच्या वंशा..... असो. मी त्याच्या 'जे जे उत्तम' या उपक्रमाबद्दल बोलतेय.
त्याच्या म्हणण्यानुसार...."पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "
तर मी बराच बिचार केला की कुठला उतारा द्यावा बरं इथे.पण मला काही केल्या आठवेनाच एखादं पुस्तक आणि आठवलं तरी ते आता जवळ नसल्याने त्यातला उतारा देणं अवघडच होतं. विचार केला त्याला सांगाबं की 'मी जेव्हा भारतात परत जाईन ना, तेव्हा लिहिते,चालेल का?' :-) पण तेही योग्य वाटेना. तेव्हाच मला गेल्या काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाची अर्धवट का होईना PDF फ़ाईल वाचायला मिळाली होती ती आठवली. ज्यादिवशी ती मिळाली तेव्हाच वाचून पूर्ण केली होती आणि त्यातलाच एक उतारा जो मला कित्येक दिवस अस्वस्थ करत राहिला.
-----------------------------------------------------------------
".......आप्पांना मृत्यू मोठा छान आला. ....डॉक्टर मला म्हणाले,"त्यांना आलेला ऍटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळा राहतीलसे". आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पानी प्राण सोडला.
बिच्याऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती, वाचा, भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पैसा, मनुष्यबळ, काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले.तिथे सगळी मुले, नातवंडे, लेकी, सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होती. कामे वाटून घेऊन करत होती. तिऱ़्हाईताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान! कुणी कमी पडून देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुद्धीने, नाईलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करत होती, अद्याप करतेय. समजा, तिच्याऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार, सेवासुश्रुषा, नवसायास करत राहिली असती. तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षाच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वत:चे औषधपाणी स्वत;च करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करयेत आणि दुसरं कुणी तिची सेवासुश्रुषा करतंय असं दृष्य प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न मानवणारी. आणि दुर्दैवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्यासेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.
आई गेली. मुलेबाळे,नातवंडे,लेकीसुना, अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता त्याबद्दल लिहून मी दु:ख उकरून काढतेय,का? हे दु:खं नव्हे, हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलट्सुलट विचारांचा, भावनाम्चा गुंता आहे. तो सोडवता आला तर पहावा, त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रत्न करावायासाठी हा सारा खटाटोप. या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत, दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन.उरलेल्या वेळात माझ्या सव्त:च्या व्यापातच गुंतले होते, घर संसार,प्रुफे, नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोट्या व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगैरे-वगैरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आनंत्रिंसाठीचे वगैरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमात काही अडथळा तर येणार नाही? ऎनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण किती स्वार्थी, कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. ..."
".....मी म्हणे लहानपणी लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वत:ची, चुलत दिराची, बरीच मुलेमाणसे घरात होती. स्वैपाकपाणी, आले-गेले, सर्वांचा अभ्यास करून घेणे, सणवार, एअव्हढ्या मोठ्या घर संसारात त्याकाळच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार, जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील! माझ्यापुरते तरी कृतद्न्यतेच्या भावनेने मी तिच्यासाठी काही करायला नको का?आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार? ...."
पुस्तक - आहे मनोहर तरी
लेखिका - सुनिता देशपांडे
-------------------------------------------------------
मी बऱ्यापैकी ब्लॉगवर पाहिलंय की कुणी यांना टॅग केलं नाहीये ना तरी चुकून चुकल्यास चु.भू.दे.घे.
केतन(बरेच दिवसांत तुझं लिखाण वाचायला मिळालं नाहीये..यानिमित्ताने....)
अमित(तुझा 'पुस्तकांची मांदियाळि' मला खूप आवडला म्हणून हा खो.)
कोहम(तुझाही वाढदिवसानंतर हा पहिला पोस्ट होईला ना?:-) या पोस्टमधे काय असेल याची उत्सुकता आहे.)
स्वाती(तुझ्या अनेक सुंदर कवितांसारखी याचीही वाट पहात आहे.)
बडबडी स्नेहल(तुझ्या आवेशपूर्ण लेखांसारखाच एखादा आवेशपूर्ण उताराही वाचायला मिळावा ही सदिच्छा.)

-विद्या.


Tuesday, September 25, 2007

एक बरस बीत गया...

काहीतरी लिहायचं म्हणून......
आता सगळ्य़ा Annevarsaries साजरी करण्याची सवयच झालीय. दिल चाहता है मध्ये नाही का तो एक नमुना आहे सोनाली बेंद्रेबरोबर. "यहां हम इस तारीख को,इतने बजे मिले थे...". तसं, जरा काही झालं की Annevarsary करा साजरी. पण तीही करण्यात जरा उशीरच झाला. मग काय? Belated Celebrations? Belated Wishes? I hate to do that. मला एक कळत नाही एखाद्याला दोन दिवसांनंतर 'हॅप्पी बर्थडे' असं म्हणून काय उपयोग? साजरा करण्याचा दिवस तर निघून गेलाय आणि नंतर तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्यावर त्या माणसाने काय करावं?
असो, उशीरा का होईना याबद्दल मला काही तरी लिहायचंच होतं. कशाबद्दल? माझ्या ब्लॉग लिहिण्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. :-) २० सप्टेंबरला,एक वर्षापूर्वी मी पहिला पोस्ट लिहिला. तेव्हा मी इतकी उत्साहात होते तरीही मला कमीत कमी दोन तास लागले असतील काही ओळी पूर्ण करायला. पण मी तेव्हा इतकी खूष होते की मला मराठीमध्ये काहीतरी लिहायला मिळेल. त्याचबरोबर मला बाकी लोकांचे ब्लॉग बघूनही इतकं आश्चर्य वाटत होतं. कसं लिहीत असतील हे लोकं एव्ह्ढं सगळं, तेही इतक्या छान भाषेत आणि इतक्या नियमितपणे. तशी थोडी भीतीही वाटली होती की आपल्याला कुठे लिहायला जमेल असं. पण माझ्या उत्साहापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्या होत्या.
पहिले दोन-चार ब्लॉग लिहिले आणि मला एक गोष्ट जाणवली. मला जो काही मराठीचा अभिमान होता तो अगदी ढासळत होता. मला मराठीमध्ये विचारच करता येत नव्ह्ता. मला एक कळलं होतं, कित्येक वर्षात माझ्या मराठी बोलण्यात विशेष फरक पडला नसला तरी माझी विचार करण्याची प्रोसेस(परत इंग्लिश) इंग्लिश मधूनच होत होती. म्हणजे मला इंग्रजीमध्ये विचार करून त्याचं मराठीत भाषांतर करायला लागत होतं. मग त्यातही मराठी शब्द आठवण्याची मारामारी. मग बाकीचे ब्लॉग वाचताना हळूहळू 'याददाश्त वापस आ रही है' असं झालं. :-)
मी मराठीमध्ये विचार करायला लागले, काही लिहायची इच्छा होत असताना शब्द जरा वेगात डोक्यात येऊ लागले.पण अजून एक गोष्ट होती. विचार करताना मला असं वाटायचं की मला हे लिहायचंय, असं म्हणायचंय. प्रत्यक्षात लिहायला घेतल्यावर मात्र काय आणि कसं लिहायचंय हे कळायचं नाही किंवा लिहिल्यावर वाटायचं की अरे मला असं म्हणायचं नव्हतं, इ.इ. आता सवयीने हेही कळलंय की प्रत्यक्षात शब्दात मांडताना बरेचसे विचार स्पष्ट व्हायला लागतात आणि डोक्यातले गोंधळही जरा कमी होतात. बाकी माझ्या लिखाणातून हे संदर्भ निघतील ते वेगळेच.
दुसरी गोष्ट म्हणजे, नियमितपणा. सुरुवातीचे काही दिवस मी रोजच विचार करायचे काय लिहायचं त्याबद्दल. तेव्हा अर्थात इतक्या वर्षाचं साठलेलं देखील होतं जे लिहायचं होतं, नंतर त्यातला उत्साह कमी झाला. मला वाटलं आता माझ्या आळसामुळे ही गोष्टही अशीच अर्धवट राहील की काय. पण प्रत्येक महिन्यात २-४ का होईना पोस्ट लिहिले गेले आणि आज मला बरं वाटतंय की, गेल्या दोनेक महिन्यांना वगळता बऱ्यापैकी नियमितपणे लिहिलं गेलं. आणि आता जरासं लिखाणाच्या विषयांबद्दलही. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मला प्रत्येक गोष्टीवर,सभोवतालाच्या घडणाऱ्या घटनांवर माझं असं मत असेल जे मला मांडायचंय. आता मला कळलंय की मला खास अशी काही वेगळी मत नाहीयेत मांडण्यासाठी. :-)) तरीही असाच एकदा डोक्यात विचार आला आणि एक लघुकथा(?)लिहिली आणि मग लिहीतच गेले, त्यात तथ्यं असो वा नसो. जरा बरं वाटलं काहीतरी वेगळं करायला लागल्यावर. थोड्या दिवसांत तेही कमी झालं कारण मी दुसऱ्याच व्यक्तीच्या दॄष्टीकोणातून हे सर्व बघतेय असं वाटलं. माझं 'मी' पण हरवलंय असं वाटलं. (अजून ते सापडलं नाहीये हे खरं, शोध चालू आहे.) आधी खूप काही लिहिण्यासाठी धावणाऱ्या मला,'माझिया मना जरा थांब ना' असं म्हणावं लागत होतं, ते 'माझिया मना जरा धाव ना' असं म्हणायची वेळ आली. सर्वात वाईट मला कविता न करता येण्याचं वाटलं. जुन्या कविता वाचताना ती जुनी मी आता कुठेतरी हरवून गेलेय असं वाटलं. तो विचार करण्य़ातला हळवेपणा, नात्यांतला नाजूकपणा सर्व नाहीसे झालेत असं वाटलं. आणि दु:खं याचं की ते हरवत असताना मला कळलं देखील नाही. अचानक चार वर्षांनी ते जाणवून काही उपयोगही नाही. :-(( असो.
ब्लॉगमुळे अनेक लोक भेटले आणि आवडलेही. त्यांच्या लिखाणातून हरवलेले संदर्भही मिळाले. तसंच,लिहून झाल्यावर प्रतिकियांची उत्सुकताही. Something to look forward to....माझ्या नेहमीच्या चार चौकटीतल्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळाल्याचा आनंद आणि कित्येक वर्षात जे केलं नाही ते केल्याचं समाधान. हे सर्व माझ्यातले बदल मला लिहायचेच होते,म्हणून या पोस्टचा प्रपंच.....माहीत नाही की अजून किती दिवस हे सुरळीतपणे चालू शकेल पण 'एक बरस बीत गया'. असंच चालू रहावं म्हणून मी प्रयत्न नक्की करणार आहे. बघू कितपत जमतंय ते.
-विद्या.

Friday, September 14, 2007

आलीस का गौराई?

मी चौथीत होते तेव्हा पहिल्यांदा आईने मला एक दिवस दुपारीच घरी परत बोलावले. आपल्याला काय? सुट्टी मिळाल्याशी मतलब. :-) तर त्यादिवशी गौरी घरी आणायच्या होत्या. आईने मला आज उपवासच कर असं सांगितलं होतं, त्यामुळे जोरदार भूक लागली होती. पूजेची तयारी चालूच होती. आईने मग वेगवेगळ्या पाच प्रकारची फुले की पाने काहीतरी आणली होती, एका तांब्याला सजवून त्यात ती व्यवस्थित लावूनही ठेवली. मग सामानाच्या खोलीतून चार पत्र्याचे डबे काढले आणि त्यातल्या एकातून त्या दोघी बाहेर आल्या. अगदी अलगद आईने दोन मुखवटे एका ताटात ठेवले आणि त्यासोबत तो तांब्या पण.माझ्या हातात ते ताट देऊन आई म्हणाली,'हां आता आत ये, आधी उजवं पाऊल टाक. मग देवघर, स्वयंपाकघर, मग ओसरी असं करत मी जाईन तशी पाऊलं टाकत पुढे ये. ते ताट तसं बरंच जड होतं आणि त्यात ते नाजूक मुखवटे, त्यामुळे कसं बसं सांभाळत मी पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी पहिल्यांदा त्या गौरी माझ्यासोबत घरात आल्या. आईने मला सांगितलं होतं की पुढे काय करायचं आहे.
मी पहिलं पाऊल टाकल्यावर आईने प्रश्न विचारला,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"सुखसमृद्धीच्या पावलाने".

आई,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"मुलाबाळांच्या पावलाने"....."धनधान्यांच्या पावलाने"....."सौभाग्याच्या पावलाने".....असं करत कुंकवाच्या पावलांनी मी घर फिरून आले होते.
त्यानंतर आईने घाईघाइने शेपूची भाजी आणि भाकरी, लाह्या केल्या आणि नैवेद्य दाखवला. गौराया सासराहून माहेरी आल्या होत्या ना. त्यांना खाऊपिऊ घालायचे होते. नैवेद्य दाखविला आणि मी लगेचच जेवून घेतलं. :-) आणि हेच रुटीन पुढचे ८ वर्षें तरी चालू होतं.
कुणी एखाद्याला विचारलं की तुला ऎश्वर्या राय आवडते का? तर तो उत्तर देताना म्हणतो की मला तिच्यापेक्षा सुश्मिता सेन जास्त आवडते. तसं गणेशोत्सव आवडतो का? तर माझं उत्तर असतं, हो मला तो दिवाळीपेक्षा जास्त आवडतो.(न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सवयच आहे मला. :-)) ) एकूण काय, गणेशोत्सव हा माझा आवडता सण. आमच्या घरी गणपती पाच दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी गणपतीसाठी आरास करण्याची धावपळ, आधीच सिलेक्ट करून ठेवलेली मूर्ती घरी आल्यावर आरती वगैरे सर्वांकडे होतं तसंच. खरी मजा येते ती दुसऱ्या दिवशी सकाळपासून. गावात कुठेतरी सकाळी ५.३० च्या भोंग्याला गणपतीची गाणी सुरु होतात. माझं आवडतं गाणं म्हणजे,'गणराज रंगी नाचतो,नाचतो....'. त्या गाण्यांबरोबर दिवसाची सुरुवात होते. पुढचे दोन दिवस गणपतीची आरती आणि त्यासोबत अजून एक काम असतं ते म्हणजे, फराळाचे पदार्थ. गौरीच्या आरासेसाठी आई अनेक पदार्थ बनवते. त्याचा फोटो टाकतेच आहे मी खाली. तिसऱ्या दिवशी मी वर लिहिलंय तसं गौरीचं आगमन होतं.
भाकरी-शेपूची भाजी,वरण भात असं जेवण झाल्यावर आई कामाला लागते. गौरींना बसवायचं,सजवायचं. आमच्या घरच्या गौरी उभ्या असतात. मग अडीच-तीन पुट उंचीच्या गौरी उभ्या करताना आई त्यांना सहावारी साडी कशी नेसवते हे पाहण्यासारखं असतं. मागच्या वेळी मी व्हिडीओ शूटींग घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अगदीच अमेरिकन व्हर्जन आहे सगळ्या गोष्टी करण्याचं. मग कॅमेरा सोडून मी नुसतं बघत बसले. साडी नेसलेल्या गौरी गणपतीच्या दोन्ही बाजूनी उभ्या राहिल्या की या सणाची खरी शोभा येते. मग यावेळच्या साड्य़ांमध्ये गौरी कशा दिसतात हे बोलण्यात, बघण्यातच जास्त मजा येते. तर हा झाला गौरींचा पहिला दिवस. दुसरा दिवस त्यांचा लाड करण्याचा. त्यादिवशी पुरण्पोळीचा नैवेद्य असतो. पोळ्यांचा स्वयंपाक होईपर्यंत आणी खाऊन झाल्यावर सगळे अगदी पेंगुळलेले असतात, पण मुख्य काम तर बाकीच असतं, सवाष्णींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रण देण्याचं. रडत-खडत का होईना आम्हा बहिणींपैकी एक घराच्या एका बाजूला तर दुसरी दुसऱ्या बाजूला जाऊन सगळ्यांना आमंत्रण देऊन येतं असू. त्यातच एखादी आपलं काम पण करून घ्यायची. म्हणणार, आता बरीच कामं आहेत, त्यामुळे तुमच्या घरी सांगायला काही येता येणार नाही, तूच तुमच्या आईला पण सांग आमच्याकडे या म्हणून.
सगळी आमंत्रणं देऊन आल्यानंतर मग घरी येऊन आमची नटण्यासाठी घाई असायची. मग साडी नेसायची की नाही, कुठली नेसायची, कोण हळदी-कुंकू लावणार, कोण अत्तर लावणार इ. आधीच ठरवून घ्यायचो. तोपर्यंत संध्याकाळ्चे पाच वाजलेले असायचे आणि आई अजून स्वत:च आवरते आहे तोवर बायका घरी यायला सुरुवात व्हायची. दादांचं त्यानंतर काही कामं नसायचं त्यामुळे ते आणि आजोबा अंगणात खुर्ची टाकून बसलेले असायचे. :-) आई म्हणायची की त्यादिवशी गौरींचं तेज काही औरचं असतं. आणि मलाही ते पटलंय. त्या नेहमीच्याच मुखवट्यांवर काही वेगळेच तेज वाटायचं. सगळ्या जणी कौतुकाने आरास, गौरींच्या साड्या, फराळाचे पदार्थ यांच्यावर गप्पा मारत संध्याकाळ भुर्रकन निघून जाते. रात्री कंटाळून झोपायला जाताना त्या दोघींकडे एकदाचं शेवटंचं बघणं अपरिहार्य असतं. जेवण झाल्यावर आई त्यांची 'दॄष्ट'ही काढते. :-) आणि हो आमचीही, आम्ही पण गौरायाच नाही का? :-)
पाचव्या दिवशी सकाळी आई मुखवटे उतरवून ठेवते आणि घर एकदम भकास वाटायला लागतं. संध्याकाळी आरती करून, त्यांब्यातील गौरी आणि गणपती विसर्जन होतं आणि एक प्रकारची उदासी मनात येते. खरंच आपल्या घरी कुणी पाहुणे आले होते आणि ते गेले आहेत असं वाटायला लागतं.मी १२वी नंतर गणपतीला घरी गेले पण गौरी घरी आणण्याचा मान तोपर्यंत माझ्या छोट्या बहिणीकडे गेला होता. :-( दोन वर्षांपूर्वीही मी घरी होते गणपतीला पण गावात जाऊन सर्वांना आमंत्रण द्यायला काही मी गेले नाही. अर्थात कित्येक घरात आज्या जाऊन काकूंची बढती सासूपदावर झाली असल्याने, नवीन सुनांनी तुम्ही कोण म्हटलं की बरं वाटत नाही ना. जे कोणी घरी आले त्यांना भेटले,बोलले आणि पूर्ण संध्याकाळ ते जुने दिवस आठवत राहले. ह्म्म्म... असो.तेव्हाचाच एक गौरी-गणपतीचा फोटो.
चार दिवसांपूर्वी काही विशेष घडतंच नाहीये असं म्हणलं खरं पण आमच्या पार्क बटरफील्ड अपार्टमेंटमधे गेल्या २-४ दिवसांपासून धावपळ सुरु झाली आहे, गणपतीच्या स्वागताची? खासकरून GT च्या घरचा गणपती मागच्या वर्षी ज्या जोशात साजरा झाला त्यामुळे तर अजूनच. GT म्हणजे आमचे शेजारी. मागच्या वर्षी १० दिवस संध्याकाळी आम्ही जवळ-जवळ १५-२० लोक असायचॊ आरतीला त्यांच्या घरी. मग कुणी म्हणणार आज प्रसाद मी करते गं, तर कधी ५ आरत्या म्हणायच्या की ७ अशी डिस्क्शन्स पण व्हायची. खूप वर्षांनी असा गणेशोत्सव साजरा झाला होता. पण स्वत:च्या घरी मी काही केलं नव्हतं. का? माहीत नाही. या वर्षी मात्र मला सर्वांकडे पाहून जोर चढलाय. आज हरताळका आहेत. घरी गणपती बसवणार नाहीये पण पूजा,आरती करणं, मोदक वनवणं हे तरी करू शकते ना? :-) बघू कसा होतोय कार्यक्रम ते. जमलं तर लिहिनंच त्याबद्दल...तोपर्यंत...गणपती बाप्पा.....मोरया.....
-विद्या.

Tuesday, September 11, 2007

मग? अजून काय विशेष?

काही महिन्यांपूर्वी,मी जेव्हा बऱ्यापैकी नियमितपणे लिहित होते, एका ओळखीच्या माणसाने मला मेल केली होती,"छान लिहीतेस गं तू. मला माहीत नव्हतं. बाकी काय? आजकाल ऑफिसमध्ये बराच रिकामा वेळ दिसतोय, एव्हढं लिहायचं म्हणजे.." सॉलिड चिडचिड झाली होती माझी. त्याला कौतुक करायचं होतं की टोमणा मारायचा होता हे अजूनही माहीत नाही. :-) पण गेल्या काही दिवसांत कामाचा ताण खरंच वाढल्यामुळे लिहिणं जमलंच नाही, त्यामुळे 'त्या' मेलची आठवण झाली. :-) तसं नुसतं काम हेच काही कारण नाहीये, द्यायची म्हटलं तर बरीच आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'कंटाळा'. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा. घरात शेजारी पडलेली वस्तू उचलायचा कंटाळा, जेवण बनवायचा कंटाळा, उत्साहाने फिरायला जायचा कंटाळा, अगदी कुठली मोठी गोष्ट घडली तरी त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचाही कंटाळा.... आणि बराच काही. असो.
आजकाल कुणाशी बोलताना एका प्रश्नाची भीती वाटत राहते,"मग? अजून काय विशेष?" काय विशेष असणार कप्पाळ? दर दोन दिवसात काय विशेष होणार?
तसं आजकाल काही विशेष घडतंही नाही म्हणा.आमचे दादा त्यांची डायरी लिहितात तसं,
"आज सकाळी ८ ला उठले. आवरून ९.३० ला ऑफिसला पोचले. संध्याकाळी ६.३० ते ८ ला जिमला जाऊन आले. रात्री स्वयंपाक,जेवण, टिव्ही इ. उरकून लवकर झोपी गेले. "
बरं अगदीच ताणायचा म्हणला तर हे असं.....मी आज उशीरा उठले की लवकर, एखादा नवीन ड्रेस घातला. तो चांगला दिसला आणि कुणी compliments दिल्या तर (आजकाल तेही कमीच असतं म्हणा, :-) ) ऑफिसमध्ये एखादी मिटींग होती तिला (नेहमीप्रमाणे) उशीरच झाला, किंवा मॅनेजरने (नेहमीप्रमाणे) कशी कटकट केली, त्यानंतर घरी आल्यावरही जिमला जायचा कसा कंटाळा आला होता किंवा हिंमत करून गेलेच असेन तर अंग कसं दुखत आहे. मग आज कालची भाजी शिल्लक आहे की भाजी आणण्यापासून तयारी. बरं त्यातही रोज नवीन काय बनवणार. काही बनवलंच तर अजून २ मिनीटं ते कसं बनवलं यावर गप्पा.
बस्स....झाला एक दिवस, एकच दिवस काय,महिना, वर्षं काय, अशीच म्हणायची. म्हणजे या सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं घडणं आवश्यक आहे लिहिण्यासाठी असं वाटलं.दोन आठवड्यांपूर्वी मग ओरलॅंडोला गेलो होतो. म्हटलं चला जरा ब्रेक मिळेल नेहमीच्या कामातून.तिथं गेल्यावर जाणवलं की हा ब्रेक वगैरे जो म्हणतात तो फक्त निमित्त आहे कामाची टाळाटाळ करायचं, मला कुणी महिन्याभराचा ब्रेक दिला तरी परत आल्यावर माझी तीच ती जुनी रोजीनिशी सुरु होईल. :-) असो. तर तिथे गेल्यावरही जी काही उत्सुकता जाणवायला हवी ती मला वाटली नाही. त्यात एक दिवस Sea World ला गेले होते, आता मला माशांबद्दल किती उत्सुकता असेल सांगायलाच नको. एखाद दुसरा माशांचा खेळ पाहिल्यावर होता तो उत्साह ही सरला. मग त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर भटकणे, नासा,केनेडी स्पेस सेंटरला जाऊनही ठिकठाक वाटलं. माझ्या या असल्या निरस वर्णनात कुणाला रस असेल, अगदी मलाही नाहीये.पण त्या ट्रीपनंतर मला जे काही डोक्यात आलं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करून बघते जमतंय का.
१. कुणाच्या डायरीबद्दल असं बोलणं बरं नव्हे पण दादांच्या २५ वर्षांच्या डायऱ्या केवळ चार ओळींच्या दिनक्रमात संपून गेल्या. मग मलाच काही तरी वेगळं हवं असण्याची इच्छा का, आणि ते मिळत असतानाही त्याला असमाधानाची झालर का? अगदी प्रत्येक emotion (भावना हा शब्द योग्य वाटला नाही म्हणून emotion) शब्दात टाकायची जबरदस्ती का? म्हणजे दादांनाही काही तीव्र विचार मनात आले असतील, पण त्याबद्दल लिहिलं नाही म्हणून त्यांची डायरी थांबली नाही, मग माझीच का? त्यांनाही अनेक संकटं आली पण तरीही त्यांची डायरी थांबली नाही, मग मलाच का प्रत्येक छोट्या गोष्टींचाही बाऊ करायची हौस? जरा कुठे खुट झालं की मला homesickness,sadness,nervousness, depression येतं. आणि मलाच त्यातून ब्रेक घ्यायची इच्छा का? एकदा मी घरी फोनवर बोलताना म्हटलं, मला खूप बोअर होतंय. आई तेव्हा जे म्हणाली ते मला अजूनही विसरता येत नाही. बरं ती ते अगदी सहजपणे म्हणाली होती, टोमणा म्हणून नव्हे. आई म्हणाली, "मघाशी पिंकीचा फोन आला होता, तीही म्हणे बोअर होतंय, आता तुला बोअर होतंय. आम्हालाच बोअर व्हायलाही वेळ नाहीये. उद्या कडधान्य साफ करून औषध लावून ठेवायचंय, परवा ते पिंकीला भेटायला जायचं म्हणताहेत, ....इ.इ." आणि विचार करताना मला खरंच असं जाणवलं की या दोघांनी कधीच मला कंटाळा आलाय,किंवा बोअर होतंय म्हणून सांगितलं नाहिये. मग सगळं व्यवस्थित चालू असतानाही मलाच का 'बोअर' होतं?
२. एकदा मी मावशीला फोन केला होता. म्हटलं काय चाललंय? मावशी म्हणे आईसक्रिम खातेय, येतेस का खायला? :-) तिच्या आवाजातही आईसक्रिम खाण्यातला आनंद जाणवत होता.माझी मावशीही पन्नाशीची असेल, म्हणजे हा निरागस आनंद काही वयासोबत कमी होत नाही हेही खरंच ना. एकीकडे मी छोट्या गोष्टींवर जास्तच विचार करतेय आणि त्याच्याविरुद्ध पूर्वी जसा एखाद्या लहानशा गोष्टीतून आनंद मिळायचा तो गमावतेय.
३. बरं छोट्या जाऊ दे, काही मोठं झालं तरी मला कितीसा फरक पडतॊ? देशाची परिस्थिती कशी आणि राजकारण कसं आहे यावर बोलण्याचा माझा हक्कही नाहीये, पण व्यक्तिगत आयुष्यात तरी मला कशाने फारसा फरक पडतो? प्रमोशन मिळाल्याचा आनंदही एखादा दिवस टिकला असेल. तसंच या ट्रीपमध्येही. मला आधी वाटायचं लोक किती सही असतात, सगळीकडे फिरून घेतात, डिस्नेला जातात, नासाला भेट देतात, इकडे-तिकडे जातात. शिकागो डाउनटाऊनमध्ये पहिल्यांदा मी जेव्हा आले तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले होते, आणि रात्री झोपल्यावरही डोळ्यासमोर प्रत्येक इमारत येत होती. पण त्याच्या तुलनेत आता मी बरीच स्थिरावलेय म्हणायचे. जसा आनंद तसंच दु:खं, थोड्यावेळासाठीचं. फारतर एखादा दिवस-अगदीच एखादा आठवडा, मग मी परत माझ्या साच्यात.
४. या सगळ्यात एक चांगली गोष्टही कळाली, माझ्या जिवंतपणाचं एक लक्षणच म्हणा ना. ट्रीपला जायचं म्हणल्यावर कृष्णाला भेटणं तर नक्की होतंच. गेल्या अनेक वर्षात भल्याबुऱ्या प्रसंगात त्याने सोबत केली, पण आजकाल त्याच्याशीही बोलणं कमी झालं आहे. तरीही त्याला भेटायचंच होतं. त्याला सांगितलं की बाबा आम्ही तुझ्या राज्यात येतोय, भेटशील का आम्हाला? पण एक-दोन आठवड्यात त्याने सांगितलं की मला वीकेंडला काम असेल, त्यामुळे आपण भेटू शकतो, पण मी गाडी चालवून तिकडे येऊ शकत नाही. अजून एक चिडचिड. आता एव्हढ्या जवळ आलोय, तर दोन तास गाडी चालवायला काय जातं याचं? असा विचार करून तर वाटलं ,मी पण का जाऊ तिकडे मग? इतक्या आधी सांगूनही त्याने असं केलं, इ.इ. त्याच्याकडे जायला निघालो त्यावेळी पण मी चिडलेले नव्हते पण काही खूप आनंद पण नव्हता. पण....
त्याच्या बिल्डींगच्या फाटकातून आत जाताना त्याचा तो दात काढलेला चेहरा दिसला आणि मला जाणवलं की ...काही नाती कधीच बदलत नाहीत....कितीही वर्षे,कितीही दूर रहा तुम्ही.....त्याला बारीक झालेला पाहून तर डोळ्यांतलं पाणी आवरणं अवघड झालं होतं. त्याच्याबरोबरचा अख्खा दिवस भुर्रकन उडून गेला.दुसऱ्या दिवशी भेटायचं असं ठरवूनही भेट झाली नाही आणि परतल्यावर ती रुखरुख लागून राहीली की नीट भेटच झाली नाही.....
असो. अजूनही असेच काही मुद्दे असतील पण अजून तरी ते गुंत्यातून बाहेर पडले नाहीयेत.आता हे सगळं मुद्दे टाकून लिहायची काय गरज? पण ही विचारांची गुंतवळ एकदा सोडवायचीच होती. लिहायच्या आधी वाटत होतं की हे लिहायचंय, ते लिहायचंय,पण प्रत्यक्षात सुरुवात केल्यावर जाणवतं की मलाच माहीत नाहिये काय लिहायचंय ते आणि मग गाडी Reverse मध्ये जाऊन मला नक्की काय वाटतंय यावर येते. असं करत अनेकदा लिखाण अर्धवट टाकून दिलं. पण आज कदाचित थोडं फार तरी समजलंय असं वाटतंय. हम्म्म....आज तरी पोस्ट करून टाकते म्हणजे एक उत्तर राहील आज कुणी परत विचारलं की ....'मग? अजून काय विशेष?'...
-विद्या.

Monday, August 06, 2007

आवडतं काम?

सोमवारी सकाळी ९ च्या आत ऑफीसमध्ये येऊन बसलेय. म्हटलं चला अजून एक प्रयत्न करून पहावा, तुझ्यासारखं बनण्याचा. का? त्याचं एक कारण थोडीच आहे, पण मी तुझं कौतुक कशाला करू. :-) असो. तर बरेच दिवस तुला सांगावं म्हणत होते, अरे, तुला तो 'रॉड फार्मर' आठवतोय ना? आठवेलच म्हणा, रोज १०० मेल करून तू त्याला नको करून सोडलं होतंस. तर तो किती खडूस आहे हे तुला माहीत आहेच. मी केलेली एखादी मेल किंवा मेसेज तो ढूंकूनही बघत नाही. अशा या रॉडने परवा चक्क तुझ्याबद्दल विचारलं आणि तुझं कौतुकही केलं. म्हणे, 'I liked that guy'. अरे? म्हणजे आम्ही कामे करणारे लोक काहीच नाही? बरं तू इथे असताना तरी तो कुठे नीट बोलायचा तुझ्याशी? आणि आता तू नसताना म्हणे,'I liked that guy'. असो. तर मुद्द्याचा भाग असा की तू असं काय बरं केलं होतंस या माणसाला पटवायला? :-(
तुला वाटेल मी कामंच नाही करत तर मग असंच होणार ना? पण अरे मला वाटतं की हे कामंच किती बोअर आहे.मला ज्या technology वर काम करायचं ते तर आजतागायत मिळालं नाही. आणि इथल्या मॅनेजर बरोबर तर अजूनच त्रासदायक. त्यामुळे अगदी नको वाटतं बघ वेळेवर ऑफिसमध्ये यायला, काही काम मन लावून करायला. मी दिवसभर नुसताच टाईमपास करत बसते. मित्र-मैत्रिणींशी गप्पा, मेल, फोन, मोठा लंच ब्रेक इ. कामाबद्दल म्हणशील तर, तेही करते तसं बऱ्यापैकी, पण अगदीच शेवटच्या क्षणाला. जोपर्यंत गळ्याशी येत नाही तोपर्यंत आराम करते, मग थोडीफार धावपळ आणि I am done. तशा काही खूप तक्रारी नसतात माझ्याबद्दल(किंवा मला तरी असं वाटतं) तरीही दिवसाच्या शेवटी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपण पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत असं वाटतं. तुला खरं सांगते, माझं आवडतं काम असतं तर मी नक्की मन लावून केलं असतं. (पण आजकाल तर असं वाटतं की आवडतं काम मिळालं तरी मला ते करायला जमेल की नाही माहीत नाही. बरं, या 'आवडत्या कामाची' व्याख्या तरी काय नक्की? माहीत नाही. Oracle, Java, की अजून काही? )
मला सांग, तुला आवडायचं का इथलं काम, नाही ना? तरीही मग कसं केलंस तू ते? बघ ना, अगदी त्या कंटाळवाण्या मिटींग्स, MS Word आणि Excel मधले documents? किती नीरस काम आहे ते, पण तू ते केलंसच आणि ते ही इतकं व्यवस्थित.तुझे ते सर्व नीट ठेवलेले documents नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही. तू एव्ह्ढा मन लावून का काम करायचास ते मला आजपर्यंत कळलं नव्हतं. अरे, या अशा कंपन्यांमध्ये नुसते दिखाऊ कामे चालतात, कुणी खऱ्या कामाला किंमत देत नाही. तरीही तू करत राहिलास. म्हणजे 'कर्मण्येवाधिकारस्ये, मा फलेषु कदाचन' हे वचन अगदी रोज पाळत होतास की. मला वाटलं होतं की शेवटी काय झालं, तुला इथून गेल्यावरच तुला तुझं आवडतं काम मिळालं ना? तुझ्या कष्टांची योग्य ती किंमत मिळाली ना? पण...
पण...त्यादिवशी रॉडने तुझं नाव घेतल्यावर कळलं की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंच होतं, फक्त ते तुला माहीत नव्हतं आणि मलाही.... आवडतं काम असेल तर काय रे, ते तर सगळेच करतात, पण जे असेल ते काम मनापासून करणारे तुझ्यासारखे कमीच...होय ना?
-विद्या.