Tuesday, November 24, 2020

कोथिंबीर चिरणे: एक कला

         दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला. म्हणजे तसे दुपारीच जेवणानंतर दोन लाडू, तीन वाजता तिखट शंकरपाळी आणि लोणचं , चहानंतर तिखट हवं म्हणून चकली वगैरे झाली. मग कंटाळा आला. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाला तिखट जाळ चिकन रस्सा बनवायचं ठरवलं. चिकन बनवून झालं. म्हटलं नवऱ्याने ताजी कोथिंबीर आणलीय ती चिरून टाकावी वरुन. कोथिंम्बीर चिरायला घेतली आणि नेहमीचा विचार परत डोक्यात आला. तर प्रश्न असा की, 'तुम्हाला छान कोथिंबीर चिरता येते का?'. बरं, कोथिंबीर चिरतात, कापत नाहीत. गळा कापतात. :) असं नवऱ्याला ऐकवूनही झालंय. तर तुम्हाला छान कोथिंबीर चिरता येते का? मला येत नाही. कितीही ताजी, कोवळी जुडी आणली तरी ती पटकन धुवून चिरेपर्यंत ती ओली असल्याने त्यावर काळे वण उठतात.  नवऱ्याला चीर म्हणावं तर त्याच्या हातून तर तिचा खूनच बाकी असतो. 
         पण अनेकांकडे मी छान धुवून, सुकलेली, एकसारखी चिरलेली पानं भाजीवर पाहते तेंव्हा मला फार मत्सर वाटतो. खिचडीवर, ढोकळ्याच्या फोडणीतली, सुरळीच्या वडीवरची, मसालेभातावरची कोथिंबीर पाहिली की किती छान वाटतं. पण कदाचित इंग्लिश मध्ये म्हणतात तसं, I am not a कोथिंबीर person. मुळात ती कला माझ्यात नसावीच. कारण अनेक वर्षं तर आणलेली कोथिंबीर वाया जाईपर्यंत फ्रिजमध्ये तशीच राहायची. मी कधीकधी वाया जाऊ नये म्हणून खोबरं- कोथिंबीरचं वाटण करुन ठेवायचे. तरीही कधी वेळेला पोह्यांवर पेरायला कोथिंबीर आहे असं झालं नाही. आणि असली तरी ते खाल्ल्यानंतर माझं लक्षात येई की अरे कोथिंबीर राहिलीच. अगदी काल कढीवरही राहूनच गेली. 
        एकूणच माझ्या आवड आणि आळस या दोन्ही मध्ये तडजोड म्हणून मी मागच्या वर्षी, नवीन वर्षाचा संकल्प केला की यावर्षी कमीत कमी कोथिंबीर वाया घालवायची. माझ्या संकल्पासाठी नवऱ्यानेच जुडी आणली की त्यातलं पाणी उडेपर्यंत कागदावर पसरुन ठेवायला सुरुवात केली. मग त्यानेच तिचे देठही खुडून छान डब्यातही ठेवली. माझं काम फक्त वेळेत वापरायचं. :) (असो आईही म्हणतेच की फार लाडावलेय मी.) तर एकूण या संकल्पाचा या वर्षी कोविड मध्ये फायदा झाला. जवळजवळ तीन आठवडे वाया न घालवता कोथिंबीर वापरली मी!! आहे कुठं? त्याची पुढची पायरी म्हणजे ही कोथिंबीर चिरण्याची कला. ती कधी शिकणार काय माहित? कदाचित त्यासाठी सुगरणच असायला हवं. तुमच्याकडे टिप्स असतील तर त्याही सांगा. 
         तर प्रत्येकवेळी कोथिंबीर चिरताना हे विचार डोक्यात येत राहतात. आज लिहूनच टाकले. कधी कधी वाटतं आयुष्य असल्या फुटकळ विचारातच जायचं. असो. :) आज चिकनवर मस्त पेरलीय कोथिंबीर. खाऊन घेते. :) 

विद्या भुतकर. 


Wednesday, July 08, 2020

ऑनलाईन शाळा आणि मी

आज पहाटे जाग आली आणि परत झोप लागेना. असे दिवस माझ्या आयुष्यात विरळच. :) बरेच दिवस झाले लिहायचं होतं पण जमलं नाही. म्हटलं आता लिहीत बसावं. सकाळच्या शांततेत लिहीत बसण्यात एक वेगळाच आनंद आहे. 

तर भारतात आता शाळा सुरु झाल्या आणि आमच्या संपल्या. सर्वांकडून त्यांचे ऑनलाईन शाळेचे अनुभव ऐकत होते. म्हटलं आपलेही लिहावे. मी एक त्रासदायक आई आहे असं मला वाटतं. पोरांची शाळेत असताना थोडीफार सुटका व्हायची तीही आता नाही. :) काही महिन्यांपूर्वी मी एक पोस्ट लिहिली होती की लॉकडाऊन मध्ये सुरुवातीलाच मी एक वेळापत्रक तयार केलं होतं पोरांसाठी. अगदी शाळेत असतं ना तसंच. पण ते फार काळ टिकलं नाही. आमच्या इथे ऑनलाईन शाळा अशी नव्हतीच. फक्त आठवड्यातून वर्गांची दोन किंवा तीनदा मीटिंग. बाकी सर्व असाईनमेंट होत्या. दोन पोरांच्या बाबतीत निरनिराळे अनुभव आले. सान्वीची पाचवी होती आणि स्वनिक दुसरीला. 

सान्वीला बऱ्यापैकी अभ्यास दिलेला होता पण ती मोठी असल्याने तिला सांगून तिने ऐकलंय असं होत नव्हतं. मग मी ठरवलं की मागे लागायचं नाही. पहिल्या आठवड्यात तिने टाळाटाळ केली. मग शेवटचे तीन दिवस संध्याकाळी उशिरा अभ्यास करत बसली. त्यामुळे तिला आपण खूप काम करतोय असं वाटत होतं. ( हे मोठ्यांच्या बाबतीतही होतं , घरुन काम करत असल्याने दुपारी जरा रखडलं की रात्री उगाच जागरण होतं आणि दिवसभर आपण ऑफिसचं कामच करतोय असं वाटू लागतं. )

मग दुसऱ्या आठवड्यात मी तिला सांगितलं की दुपारी ४ नंतर शाळा नसते त्यामुळे जो काही अभ्यास आहे तो ४ च्या आधी करायचा. ४ नंतर लॅपटॉप मिळणार नाही. आता मी इतकंच सांगून सोडून दिलं. आई मागे लागत नाहीये म्हटल्यावर तीही निवांत. असे चार दिवस गेले आणि तिला एकदम जाणवलं की खूप काम बाकी आहे. तिने मागूनही मग चार नंतर लॅपटॉप दिला नाही. शेवटचे दोन दिवस फार घाई झाली तिची. 

तिसऱ्या आठवड्यात तिला कळलं की सुरुवातीपासूनच कामाला लागलं पाहिजे. म्हणून तिने स्वतःच यादी करुन वेळेत होमवर्क करायला सुरुवात केली. पण अर्थात त्यातही थोडं बाकी राहिलंच. आणि आता दुपारी चार नंतर लॅपटॉप मिळणार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे शुक्रवारी २-३ असाइनमेंट बाकी असतानाही तिने सोडून दिलं. म्हटलं, "असं चालणार नाही. जे काही बाकी आहे ते शुक्रवारी उशिरापर्यंत बसून करावं लागेल. शुक्रवारी movie night होणार नाही."

एकूण चौथ्या आठवड्यापासून सर्व रांगेला लागलं. सोमवार आला की ती स्वतःच कामाची यादी करू लागली आणि शुक्रवारी दुपारच्या आत काम कसं संपेल याचं स्वतःच प्लांनिंग करु लागली. मोठ्या मुलांना त्यांच्या कामाची जबाबदारी आली की ऑनलाईन शाळा जरा सोपी जाते. 

स्वनिकच्या बाबतीत मात्र हे पाळणं अवघड होतं. एरवी शाळेत स्वतःहून सहभाग घेणारा मुलगा पण इथे त्याला काही मोवीवेशन नाहीये असं वाटत होतं. असाइनमेंट पूर्ण झाल्यावर टीचर कडून एखादी ओळ कमेंट यायची तितकीच. त्यामुळे बरेचदा मीच त्याच्या मागे लागून ऍक्टिव्हिटी पूर्ण करुन घेतल्या. त्यात निदान २० मिनिटं वाचन २० मिनिटं गणित आणि २० मिनिट लिखाण इतकं होतं. बाकी टाईमपास असाइनमेंट होत्या ज्या करायला मी मध्ये मध्ये मदत केली. फक्त एक नियम पाळला की त्यालाही ४ नंतर लॅपटॉप नाही. कधी कधी मी उगाच सर्व अभ्यास पूर्ण झाला पाहिजे असा हट्टही सोडून दिला. दुसरी तर आहे. एखादी असाइनमेंट राहिली तर जाऊ दे. नाही का? (त्यावरुन शाळेतून मेल आली ही गोष्ट निराळी, पण चालतंय की कधीतरी. ) तर हे असं अभ्यासाचं. 

दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम वाढलाय यावर बाकी लोकांशी चर्चा होत होती. मला स्क्रीन टाईम पेक्षा त्यांचं posture कसं आहे याची जास्त काळजी वाटते. शाळेत टेबलची उंची कमी असते. मुलांसाठी योग्य असते. आणि ते बसतानाही ताठ बसलं जातं . घरात प्रत्येकवेळी ते टेबलपाशी बसतातच असं नाही. मुलं लॅपटॉप घेऊन गादीवर बसली की मी अनेकदा त्यांना पाठीच्या मागे उशी लावून दिलीय किंवा मांडीवर उशी दिलीय लॅपटॉप ठेवायला. म्हणजे मान जास्त वाकली जात नाही. स्वनिक डाईनिंग टेबल बसत असेल तर त्याची उंची कमी पडते. त्यामुळे खांदे उंच करुन टाईप करावं लागतं. तर त्याला बसायला सीटखाली अजून एक उशी दिलीय. सोफ्यावर वाकून बसले की 'सरळ बस' म्हणून आठवण करुन देते. लॅपटॉप नसेल आणि फोनवर असाइनमेंट बघत असाल तर फोनकडे फार वेळ वाकून बघायला लागत नाहीये ना याकडे लक्ष द्यायला लागत. अनेकदा टेबलची उंची जास्त असते. तेंव्हा पाव बराच वेळ लटकत राहतात. तेव्हा त्यांच्या पायाखाली स्टूल किंवा काहीतरी देणं आवश्यक आहे. मला वाटतं या गोष्टींकडे सतत लक्ष देणंराहणं गरजेचं आहे. 

दिवसा शाळेच्या वेळात टीव्ही नाही हे सांगितलं होतं. त्यामुळे टीव्हीवरून वाद जरा कमी झाले. या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे दुपारी जेवण झाल्यावर आणि संध्याकाळी जरावेळ हालचाल करायला सांगत होते. बरेचदा ते दारातच सायकल चालवत बसायचे. काही ना काही व्यायाम झालाच पाहिजे ना. :) असो. पुढचे काही महिने हे असंच राहणार आहे. त्यामुळे शक्यतो एक रुटीन राहिलेलं चांगलं. कधी कधी फार वैताग येतो, थकायला होतं, पण सध्या काही पर्याय नाही. आमच्याकडे  सुट्टी असल्याने निवांत आहे. बाकी भारतात सर्व आई-बाबांना ऑल द बेस्ट. :) 

विद्या भुतकर. 

Sunday, May 03, 2020

नक्षी

आज दुपारी छान ऊन पडलेलं म्हणून आम्ही दोघं चकरा मारत होतो. घराजवळ काही रंगीत रानफुलं दिसतात. दगडांवर उगवलेली. त्यांचे रंग फार आवडतात मला. आज त्यांच्याकडे पाहताना मला आठवलं मी शाळेत असताना निरनिराळी फुलं, पाकळ्या, पानं वही-पुस्तकांत ठेवायचे. निरनिराळ्या गुलाबांच्या पाकळ्या, झेनियाची फुलं, वगैरे. अनेकदा त्या सगळ्यांची पुस्तकांत इतकी गर्दी व्हायची की दर चार पानांआड काही ना काही असायचंच. त्यामुळे एक पुस्तक फुगून जाड झालेलं आठवतंय. बरेचदा मग मैत्रिणीसोबत काही पाकळ्यांची, फुलांची अदलाबदल करायचो. 
नवऱ्याला त्याबद्दल सांगताना तो म्हणे,"त्यांचं करायचा काय?". 
मलाही तोच प्रश्न पडला आणि एकदम आठवलं, त्याची ग्रीटिंग्ज बनवायची होती मला. एखादं केल्याचं आठवतंय. पण छान पाकळ्या एकमेकांवर नीट डिंकाने जोडून त्यांचं फूल, मग पानं वगैरे लावून बनवलेलं ग्रीटिंग. त्यालाही मग आठवलं,"हो, आम्ही पिंपळाचं पान ठेवायचो. वडाचं वगैरे मोठं पान असलं की मस्त जाळी तयार होते थोड्या दिवसांनी." 
म्हटलं,"हो मग त्या जाळीवरुन वॉटर कलरने रंग लावून हलकेच ते जाळीदार पान उचललं की सुंदर चित्र तयार होतं कागदावर." 
हे कविता, गाण्यांमध्ये वगैरे म्हणतात ना 'पुस्तकात जपलेलं फूल', वगैरे. प्रेमात ते काही केलं नाही पण त्यापेक्षा शाळेतल्या त्या फुलं, पाकळ्या जपण्याच्या आठवणी जास्त प्रिय वाटल्या. आजकाल करतं का कुणी असं? माझ्या पोरांना तरी नाही माहित हे सर्व. म्हणून मग घराजवळची काही रंगीत फुलं आणली आणि एका जाड, जड पुस्तकात ठेवली. कधी त्याची गुळगुळीत, नाजूक, सुंदर नक्षी बनते बघू. :) सान्वीला कळत नव्हतं आई काय करतेय. तिला ती थोड्या दिवसांनी दाखवायची आहेत. 

विद्या भुतकर. 


Wednesday, April 29, 2020

डिप्लोमे From युट्यूब युनिव्हर्सिटी

      मागच्याच आठवड्यात आमचं पावपुराण ऐकवलं. पण निरनिराळे पदार्थ बनवण्यात फेल होणे सोडून बाकीचीही कामं होतीच की. त्यात सुडोकु शिकणे आणि ते सोडवताना झोप लागल्यावर दोन तासापेक्षा जास्त न झोपणे, कॅरम खेळताना पोरांसमोर शायनींग मारणे, टिव्हीवर एकेका सिरियलीचा फडशा पाडणे अशी महत्वाची कामेही होतीच. पण या सगळ्या गोष्टीही किती करणार ना? त्यातल्या त्यात शनिवार, रविवारी अजूनच बोअर व्हायला होतं. 
थोड्या दिवसांपूर्वी एक दिवस स्वनिक म्हणाला,"मला सारखं काहीतरी कानात आहे असं वाटतंय. आणि प्रत्येक वेळी हात लावला की कळतं की माझे केसच आहेत ते." 
त्याचे कल्ले ८० च्या दशकातल्या हिरोसारखे झाले होते. मग म्हटलं, चला कात्रीने तेव्हढेच कापून टाकू. मागे एकदा बाबाने घरी केस कापण्याचा प्रकार केला होता, त्याचा त्याने धसका घेतला होता. त्यामुळे मीच ते काम पार पाडलं. 
         पण इतक्यातच थांबलो तर कसं चालेल ना? युट्यूब युनिव्हर्सिटीतून एकेक डिप्लोमे मिळवायचं ठरवलं. रोज नवीन काहीतरी शिकायला हवंच ना? पूर्वी कधीतरी नवऱ्याने घरी आणलेलं केस कापायचं किट होतंच.
स्वनिकला म्हटलं, "चल की तुझे केस कापू घरी. तितकेच दोन तास टाईमपास होईल." नवरा तर काय तयारच होता.
आम्ही दोघेही मागे लागलोय म्हटल्यावर तो बिचारा पळून बेडखाली लपून बसला. 
मी जरा प्रेमाने त्याला म्हटलं, "हे बघ किती दिवस दुकानं बंद असतील माहित नाही. परत अजून वाढले तर नीट कापताही येणार नाहीत. त्यापेक्षा आताच करु." शेवटी तो कसाबसा तयार झाला.
        मी आणि नवरा लगेच टीव्ही वरच युट्यूब लावून नीट सर्व व्हिडीओ बघायला लागलो. एका क्षणाला नवऱ्याचा जोश इतका अनावर झाला की त्याने व्हिडीओ पूर्ण व्हायच्या आतच बाथरुममध्ये सेटअप लावायला सुरुवात केली. मी मात्र तग धरुन पूर्ण व्हिडीओ पाहिला. आपलं असंच असतं. तोवर नवऱ्याने बाथरुममध्ये पूर्ण सेटअप  करुन ठेवला. पोरगं बिचारं घाबरुन स्टुलावर बसलं. 
        (तर प्रोसेस अशी की प्रत्येक कटरला वेगवेगळे नंबर. जितका छोटा नंबर तितके बारीक केस कापले जाणार. अर्थात हे कदाचित सर्वांना माहित असेल. मला पहिल्यांदाच कळलं.) यामध्ये दोन अप्रोच होते. एक बॉटम -अप म्हणजे, मागचे केस मशीनच्या नंबर १,२,५ ने कापत जायचं, बाजूचे ही त्या त्या लेव्हलच्या नुसार कापायचे आणि वरचे कात्रीने थोडे मोठे ठेवून कापायचे. कानाच्या बाजूचे वगैरे वेगळ्या नंबरच्या मशीनने. दुसरा अप्रोच म्हणजे टॉप-डाऊन. वरुन मोठ्या नंबरचे मशीन फिरवून खाली बारीक करत आणायचं. आणि मग खालचे बारीक करायचे. आम्ही पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये मुळातच अप्रोच वेगवेगळे होते. त्यामुळे बराच वेळ कुठून सुरुवात करायची यावरच वाद झाला. 
आता याच्यामध्ये मी आयुष्यात पहिल्यांदाच असं मशीन हातात धरत होते त्यामुळे पोराच्या जीवाची काळजी होतीच. म्हणून मी जरा नमतं घेतलं. (नवऱ्याने हे आधी केलेलं पण त्या भयानक कट बद्दल न बोललेलं बरं.) तर शेवटी आम्ही दोघांनी एकेक बाजू निवडली. नवरा मागचे छोटे छोटे करत वरपर्यंत सरकत होता. दुसऱ्या बाजूने मी. पहिल्या पाच मिनिटांतच स्वनिकने विचारलं,"झालं का?". त्याला दटावून गप्प बसवलं.
           जिथे दोन नंबरचे केस एकत्र येतात तिथले नीट कसे मिक्स करायचे यावर आमचे थोडे वाद झाले. पण अजून वाद झाले तर अंगावरचे केस घेऊन स्वनिक बाहेर पळून गेला असता. म्हणून जसे जमतील तसे कापले. वरचे केस नीट भांग पाडता येतील असे हवे होते. पण नवरा म्हणाला," हे बघ १६ नंबरने कापून घेऊ आणि मग बघू. ". आता मला काय माहित १६ नंबर काय ते? मी आपला फिरवला. तर हे... भराभर सगळे केस छोटे झाले. आता ते पाहून कळलं की यात कात्रीने कापायला काही राहिलं नाहीये. केस कापले गेल्यावर काय बोलणार? दोन तास मारामाऱ्या करुन शेवटी ठीकठाक केस कापले होते. बाथरुमभर बारीक बारीक पडलेले केस. ते गोळा करुन, सर्व साफ होईपर्यंत पुरे झालं. पोराची अंघोळ झाल्यावर चिडचिड करुन झाली की किती बारीक कापलेत वगैरे. टाईमपास झाला आणि शिवाय अजून दोनेक महिने तरी परत केस वाढणार नव्हते. 
         पोरावर प्रयोग झाल्यावर मी जरा कॉन्फिडन्ट झाले होते. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात परत बोअर झालं.  आणि नवऱ्याचे केस कापू असं ठरवलं. म्हणून परत व्हिडीओ पाहिले. एक दोनदा मी मशीन सुरु केल्यावर नवरा घाबरत होता. 
म्हटलं, नक्की काय प्रॉब्लेम आहे?'. 
तर म्हणे, ' तू चुकून माझ्या भुवया उडवल्यास तर?'. 
मी म्हटलं, 'अरे डोकं कुठे, कपाळ कुठे आणि भुवया कुठे?'. 
        पण तरी त्याला टेन्शन होतंच. माझ्या ओव्हर कॉन्फिडन्सची त्याला जास्त भीती वाटते. मी उत्साहाच्या भरात पाच नंबरने एका बाजूला खालून केस कापायला सुरुवात करुन  कानाच्या वरपर्यंत कापून टाकले आणि एकदम टेन्शन आलं. वर तो पाच नंबर खूपच बारीक वाटत होता. मग परत वादावादी. शेवटी नऊ नंबरने कानापासून वरचे केस कापले. त्यामुळे एका बाजूचे थोडे पाच, बाकी नऊ, मग खाली सात असे करत कापत राहिले. पण तो तेव्हढाच एक बारीक केसांचा पॅच राहिला होता ना? वरचे केस भांग पडल्यावर तो लपतोय ना याची खात्री करुन घेतली आणि मग जरा जिवात जीव आला. पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस आहे. उगाच नेमका तेव्हा असे भयानक कापलेले केस बरे दिसले नसते ना? म्हणून इतकी चिंता. पण सुटलो. बऱ्यापैकी चांगला कट झाला होता. तेही रक्त न सांडता वगैरे. 
          तर असं हे आमचं केशपुराण. माझं एक बरं होतं. भारतातून येतानाच पतंजलीची मेहंदी वगैरे आणलेली असल्याने तशी मी निवांतच होते. काय एकेक गोष्टीचा विचार करायला लागतोय सध्या. नाही का? पण पहिल्या थोड्या दिवसांतच मला कळलं की बाकी काही झालं नाही तरी माझ्या भुवया मात्र लवकरच करिष्मा कपूर आणि मग क्रूरसिंग सारख्या होणार होत्या. मग फोटोंचं काय ना? वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस... आता काय करायचं म्हणून मी घरात सर्वात पहिला तो केस उपटायचा चिमटा शोधून काढला. म्हटलं, फक्त नवीन आलेलेच उपटून काढायचे आहेत ना? सोप्पंय ! 
         मी एक दिवस आरशासमोर उभी राहून एकेक केस उपटायला लागले सुरुवात केली. च्यायला ! पहिल्याच केसाला डोळ्यांत टचकन पाणी आलं. शिवाय कुठला डोळा बंद करुन कुठला उघडायचा हेही पटकन कळत नव्हतं. म्हटलं हे काय खरं नाय. पण हिंमत करुन चार पाच केस काढले. मग ठरवलं रोज इतकंच करायचं. फक्त ४-५ केस. असंही काम काय होतं? एकदा तर एकेक करुन केस काढून माझ्या भुवयांना मधेच टक्कल पडल्याचं स्वप्नही पडलं होतं. तेव्हापासून जरा हाताला आवर घातलाय. बाकी डाव्या डोळ्याला जरा अवघड जातं डाव्या हाताने चिमटा धरुन ओढणे वगैरे. पण जमतंय. सर्वात गंमत म्हणजे, ते उभे राहिलेले, वाढलेले केस कात्रीने कापतात ना, ते आरशात बघून कसं करायचं हे कळत नाही. त्यात डाव्या हाताने कात्री चालतही नाही. आता कधीतरी डाव्या हाताची कात्रीही आणावी म्हणतेय. रोज मी आरशासमोर उभी राहिले की नवरा विचारतो, "झालं का कोरीवकाम?".  त्याला काय माहित, आमच्या शाळेच्या मैत्रिणींच्या ग्रुपचॅट वर किती कौतुक झालं माझ्या भुवयांचं? या सगळ्या आयडिया मी त्या मैत्रिणींनाही दिल्या पण त्या काय ऐकत नाय. म्हटलं तुम्हांला तरी सांगाव्यात. 
         तर हे असं ! पुढच्या दोन महिन्यांत अजून कुठकुठले डिप्लोमे मिळतील सांगेनच तुम्हांला. तुमचेही चालूच असतील की !

विद्या भुतकर. 

Monday, April 27, 2020

गव्हाचा शिरा

आज संध्याकाळी ८ वाजताच स्वयंपाक, जेवण, भांडी, सगळं उरकून झालं होतं. आता इथे काही लोकांसाठी ते फारच उशिरा असेल पण आमच्यासाठी लवकरच. थोडा वेळ पोरांसोबत एक कॅरमचा गेम खेळायचा होता, पण त्यालाही वेळ होता. काय करायचं म्हणून म्हटलं चला आज गव्हाचा शिरा/सांजा बनवू. मग पुढचा अर्धा पाऊण तास ते सगळं करण्यात गेला. आता रात्री उशिरा इतका गोड शिरा खायचा की नाही याबद्दल दुमत आहे. पण निदान तयार तरी आहे. त्यासाठी माझं म्हणणं असतं इतकं लवकर उरकायलाच नको. नाहीतर हे असले उद्योग सुचतात. असो. 
        तर हे नेहमीचंच. आईकडे बरोबर ९ वाजता जेवायला बसायचो. दूरदर्शनवर बातम्या संपून ९ वाजताचा कार्यक्रम पाहण्यासाठीची ती वेळ. अर्ध्या पाऊण तासात जेवण उरकून व्हायचं. पुढे दीडेक तासांत अभ्यास, सोबत विविधभारतीची गाणी आणि झोप. आयुष्याची इतकी वर्षं हे रुटीन पाळलेलं. कॉलेजला आले तेव्हा अनेकजणी ७ वाजताच जेवायला जायच्या. तर काही पावणेआठ-आठला. मला मात्र कितीही ठरवलं तरी लवकर जमायचं नाही. आणि कधी गेलेच मैत्रिणींसोबत तर रात्री हमखास भूक लागायची. मेसच्या काकू कितीदा तरी ओरडायच्या. मी एकटीच सर्वात शेवटीराहिलेली असायची. पण उशिरा जाण्यात मजाही असायची. बरेचदा सगळ्यांसाठी केलेली भाजी संपून जायची त्यामुळे काकू काहीतरी नवीन बनवत असायच्या. त्यांच्या हातची तव्यावरची भरलेली वांगी आजही आठवतात. आणि तशीच परत कधी मिळालीही नाहीत आणि जमलीही. कधी त्यांच्याशी गप्पाही व्हायच्या निवांत. त्यांची एक छोटीशी ती खोली, एरवी पोरींनी भरलेली असायची. ती एकदम शांत व्हायची. इतक्या उशिरा म्हणजे पावणेनऊ, नऊला जेवूनही रात्री गप्पा मारत बसलं की भूक लागायचीच. मग घरुन आणलेला चिवडा वगैरे खात अनेकदा मैत्रिणींशी गप्पा व्हायच्या. कॉलेजला असताना एका मैत्रिणीच्या घरी जायचे. त्यांच्याकडे संध्याकाळचं जेवण लवकर व्हायचं. अनेकदा मला रात्री परत भूक लागायची तिच्याकडे. 
        पुढे मुंबईत असताना रात्री उशिरापर्यंत शिफ्ट असायची त्यामुळे अनेकदा रात्री बारा वाजताही जेवलेय. पण ते संध्याकाळी ७ पेक्षा बरंच वाटायचं. पुढे अमेरीकेत आल्यावर कळलं की इथले लोक किती लवकर जेवतात, संध्याकाळी ६-६.३० वाजताच. त्यांची मुलंही ८-८.३० झोपून जातात. मीही अनेकदा प्रयत्न केला हे असं करायचा. पोरांनाही लवकर जेवायला देऊन ८-८.३० ला झोपवायचा. पण ते काही जमत नाही. अनेकदा पोरंही संध्याकाळी ७ वाजता जेवण झाल्यावर रात्री ९-९.३० वाजता,'आई भूक लागली' म्हणून मागे लागलीयत. तेच कशाला, मीही लवकर जेवण झालं तर परत रात्री त्याची भरपाई म्हणून उलट अजून जास्तच खाल्लं जातं. हे असं असलं तरी एक मात्र खरं. रात्री ९ वाजता जेवण म्हणजे खूपच उशीर होतो. विशेषतः तुम्ही तास दोन तासांत झोपत असाल तर अजूनच. निदान तीनेक तास तर पाहिजेत जेवण पचायला. तेव्हापासून एक सुवर्णमध्य साधलाय. पावणेआठला जेवण सुरु करुन नऊपर्यंत भांडी वगैरे सर्वच उरकायचं. म्हणजे मग रात्रीची भूकही लागत नाही आणि खूप उशिराही खाल्लं जात नाही. 
         आज तो शिरा केला त्यावरुन हे सगळं लिहिण्याचं निमित्त. असो. शिरा खायचा की नाही हे अजूनही ठरवलं नाहीयेच. :) 

विद्या भुतकर. 

Thursday, April 23, 2020

फसलेल्या पावाची कहाणी

गेल्या काही दिवसांत निरनिराळ्या फूड ग्रुप्स वर लोकांच्या पाककलेचं दर्शन चालू आहे. त्यात ब्रेड, पाव वगैरे घरी बनवून ते किती छान बनलेत असे एकेक फोटो पोस्ट करायचं पेवच फुटलेलं आहे. पूर्वी मी अनेकदा घरी पाव (वडापावचे पाव) बनवण्याचे प्रयत्न केले आहेत. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक रेसिपी तंतोतंत कृतीत उतरवणारे आणि दुसरे माझ्यासारखे स्वतःच्या आयडिया त्यात घुसवणारे. तर पूर्वी जेव्हा मी पाव बनवण्याचे प्रयत्न केले त्यात बटर कमी टाकणे, मैद्याच्या ऐवजी थोडी कणिक वापरणे, पाण्याचे माप खूप जास्त आहे असं वाटून कमीच पाणी घालणे असे अनेक प्रकार केले आहेत. अनेक बॅचेस पिठाचे गोळे वाया घालवल्यानंतर एक दिवस मी जिद्दीने नवीन यीस्ट चे पाकीट घरी आणले आणि तंतोतंत कृती पाळून एकदम भारी पाव बनवले होते. आता एकदा पाव नीट बनल्यानंतर माझा जीव शांत झाला आणि उरलेली यीस्टची पाकिटं तशीच पडून राहिली होती. आणि इथेच आजची पोस्ट सुरु होते. 
            सध्या लॉकडाऊनमध्ये घरातील ब्रेड संपल्यावर आणि विशेषतः ते नवनवीन ब्रेडचे फोटो पाहून माझ्यात एकदम पुन्हा पाव बनवण्याची खुमखुमी आली. म्हटलं तीन पाकिटं आहेत जुनी, प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? म्हणून मी एक दिवस बसून दोन-चार रेसिपी पाहिल्या आणि मनात मला योग्य वाटेल ते प्रमाण ठरवून घेतलं(हे असंच असतं आपलं) आणि सुरुवात केली. आता पूर्वीचा अनुभव असल्याने मी लगेच पाणी कोमट करुन त्यात यीस्ट घालून ठेवलं. सानुला 'त्याला हात लावू नकोस' म्हटलं तरी तिने ते पाणी मिसळलंच. आता ते मिश्रण काही बरे वाटेना. पण प्रयत्न करायलाच हवेत. म्हणून मी दिलेल्या मापाच्या दुप्पट मैदा घेतला आणि मळले. ते आपटून, खूप मळून त्या कणकेतले ग्लुटेन वाढवणे वगैरे सर्व प्रकार झाले. दोन तास ठेवले तरी काही पीठ फुगले नाही. म्हटलं इतक्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं? 
           त्या कणकेचे मोठे गोळे करुन ६ गोळे लाटले आणि पिझ्झा बेस बनवून ओव्हन मध्ये टाकून भाजले. तरीही खूप कणिक शिल्लक होती. त्यांच्याही लाट्या लाटून घेतल्या. पण थोड्या पातळ केल्या आणि ओव्हनमध्ये भाजायला ठेवल्या. आता त्यांचे फुगून मस्त 'नान' होतील अशी माझी अपेक्षा होती. पण बाहेर आले तोवर चांगलेच कडक झाले होते. मग आम्ही ते तुकडे करुन दुसऱ्या दिवशी पोरांना चिप्स म्हणून खायला दिले. त्या पिझ्झाच्या बेसवर भाज्या घालून पिझ्झा बनवले. बिचारी पोरं ! त्यांना काय माहित पिझ्झा इतका चिवट का लागतोय ते? पण दोघांनीही आवडीने पिझ्झा आणि दुसऱ्या दिवशी चिप्सही खाल्ले. इतकं झालं तरी माझी खाज अजून गेली नव्हती. पाव कुठे बनले होते? 
            म्हणून दुसऱ्या दिवशी परत निम्म्या मापाने परत यीस्ट ऍक्टिव्हेट करुन पीठ मळून घेतलं. नवरा म्हणे मग काल पण कमी घ्यायचीस ना? म्हटलं असं कसं? यालाच म्हणतात कॉन्फिडंस ! तर मी मळलेलं पीठ पुन्हा दोन तास ठेवलं. ते काही फुगलं नाही. म्हटलं आजच्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं? शेवटी डोकं लावून छोले बनवले आणि त्या कणकेचे मस्त भटुरे तळले. आयुष्यात कधी मी अशा पुऱ्या केल्या नव्हत्या त्यामुळे जरा धावपळ झाली. पण ते पार पडलं. तळायला तेल काढलंच आहे तर म्हटलं हातासरशी भजीही करुच ना. म्हणून मग कांदा भजी, मिरची भजीही झालीच. पोरांना जाम आवडले छोले-भटुरे आणि सोबत आमरस( मँगो पल्प). अगदी दोघांनी येऊन मिठी मारली मला. म्हटलं चला अजून एक दिवस निघाला. 
          पुढचे ४-५ दिवस मी कसेबसे काढले पण इच्छा काही जाईना . त्यात अजून लोकांचे नवीन वडापावचे फोटो येत होतेच. अनेकदा वाटलं आपलं यीस्ट जुनं आहे म्हणून होत नसेल. पण ऑनलाईन ऑर्डर दिली तरी ती मे मध्ये मिळणार होती. तोवर मला कुठे धीर? शेवटी मी म्हटलं, बहुतेक मी पाणी गरम करुन घेते ते खूप गरम होत असेल त्यामुळे यीस्ट मरत असेल. म्हणून थर्मामीटर घेऊनच बसले. पाण्याचं तापमान योग्य इतकं झाल्यावर यीस्ट घालून ऍक्टिव्हेट केलं. आता नेहमीपेक्षा जास्त बरं दिसत होतं ते. हे सर्व चालू असताना आमच्या ब्रेड बनवता येणाऱ्या एका मित्राला फोनही केला. त्यांनी यीस्ट नसेल तर बेकिंग सोडा घालून ब्रेड कसा बनवायचा याची रेसिपीही दिली. म्हटलं या कणकेच्या गोळ्यांचं काही झालं नाही तर त्यातच बेकिंग सोडा घालून बेक करु. काय बिघडतंय? नेहमीप्रमाणे कणिक आहे तशीच राहिली. मग मी ठरवलं होतं तसं त्यात बेकिंग सोडा टाकला आणि ओव्हनला लावलं. पण त्यातून कसलातरी भयानक वास येऊ लागला. (कदाचित सोड्याचा). मग जीवावर दगड ठेवून तो दगडासारखा झालेला गोळा फेकून दिला. 
          आता माझी हिंमत पूर्णपणे खचली होती. पण पुढच्या आठवड्यात आमच्या ब्रेड बनवणाऱ्या मित्रांनी घरी ब्रेड बनवला होता त्याचे फोटो पाहिले आणि पुन्हा माझे हात खाजवायला लागले. मग त्यांनी ज्या यीस्टने तो सुंदर ब्रेड बनवला होता, त्यातलंच थोडं मला बरणीत आणून दिलं. म्हटलं आता हे ऍक्टिव्ह यीस्ट आहे. याने आधीच ब्रेड नीट बनलेला आहे म्हणजे माझाही होईलच. म्हणून पुन्हा मी हिम्मत केली. यावेळी मैद्याचं नवीन पाकीट फोडलं. पण तरी नुसताच मैद्याचा ब्रेड कसा करायचा म्हणून एक कप गव्हाचं पीठ घातलं. त्यांनी दिलेल्या प्रोसेसप्रमाणे मळलेली कणिक रात्रभर ठेवायची होती. मी आपली मळून ठेवून टाकली. रात्री १ वाजता मला खाली जाऊन बघायची इच्छा होत होती. नवरा म्हणे गप झोप. शेवटी सकाळी उठून लहान पोराच्या उत्सुकतेने मी तो कणकेचा गोळा पाहिला. पण त्यात ढिम्म फरक पडलेला नव्हता. इतकी चिडचिड झाली. मी तर दुपारच्या जेवणाला सँडविच करणार होते, स्वतः बनवलेल्या ब्रेडचं. शेवटी तो गोळा आहे तसाच ओव्हनमध्ये टाकला. म्हटलं जे होईल ते होईल.  
           आता ते ब्रेड फुगणार तर नव्हता. तरीही wishful thinking ! पोरंही बिचारी दोन चार वेळा डोकावून गेली. तासाभराने बाहेर काढलेला ब्रेड म्हणजे विटेचा तुकडाच झाला होता. मारला तर जोरात खोक पडली असती डोक्याला. पण म्हटलं जाऊ दे ना. घट्ट तर घट्ट ब्रेड. वाया का घालवायचा? नवऱ्याला म्हटलं जरा स्लाईस करुन ठेव. आता सँडविच तर बनणार नव्हतं म्हणून जेवणासाठी दुसरं काहीतरी करावं लागलं याचा वैताग होताच. त्यात ब्रेड कापायला घेतलेल्या नवर्याने दमून विचारलं, निम्मा झालाय, उरलेला दुपारी करु का? त्याला म्हटलं मार खाशील. तर आता तो तुकडे केलेला ब्रेड कालपासून डब्यात पडलेला आहे. मी विचार करतेय टोमॅटो सूप बनवावं का? म्हणजे त्यात बुडवून थोडा मऊ पडेल, चावायला तितकाच बरा. Meanwhile  नवऱ्याने ऑनलाईन ऑर्डर मध्ये ६ ब्रेड मागवले आहेत. ते आलेत. त्यामुळे त्याला बहुतेक 'सुटलो !' असं वाटत आहे. पण घरात अजून एक जुनं यीस्टचं पाकीट आहे ते त्याला कुठे माहितेय? आणि माझ्यातली खाजही ! 
        तर हे असं आहे. माझासारख्या सुग्रणीला काय काय ऐकून घ्यावं लागतंय पोरांकडून, नवऱ्याकडून या ब्रेड आणि पावाच्या नादात. असो. आताच मी कुणीतरी टाकलेली काजुकतलीची पोस्ट पाहिली. अगदी १५ मिनिटांत झाली म्हणे. उद्या काजूकतलीचा प्रयोग नक्की ! :) तुमच्या कुठल्या रेसिपी फसल्या की नाही? की मी एकटीच त्यातली? 

-विद्या भुतकर. 

Monday, April 20, 2020

मिसळ

आज मिसळ केली होती, निवांतपणे एकेक काम उरकत. अशीही काही घाई नव्हती. जेवण मस्त झालं. पण चौघेच फक्त ना जेवायला. मागच्या वेळी केलेली तेव्हा दोन जवळच्या फॅमिली घरी होत्या जेवायला. दिवसभर पाणीपुरी, भेळ, मिसळ असं चालूच होतं. ते आठवलं. खरंतर असं काही करायचं असेल तर अगदी बनवतानाच कुणालाही फोन करुन, 'कुठे आहे? येताय का जेवायला?' असं फोन करुन विचारलं जातं. पाणीपुरी असेल तर नक्कीच. वांगी बनवली की शेजारी दिली नाहीत असं होतंच नाही. 
     दर एक-दोन आठवडयांनी वगैरे जवळची एक फॅमिली आणि आम्ही वीकेंडला भेटतो. काही खास नाही बनवलं तरी पिठलं-भात, साधं वरण वगैरे केलं तरी चालतं. आता पिठलं बनवत असतांना ते सोबत जेवायला नाहीत याची खूप आठवण होते. अनेकदा ऑफिसच्या दिवशी भेटणं जमत नाही, तेव्हा 'मी हे बनवलंय, देऊन जाते पटकन' असं म्हणून एका डब्यांत पाठवून दिलं. यालाही कित्येक दिवस लोटले. हे म्हणजे, साग्रसंगीत काही बनवलं नसतांनाही केवळ नुसत्या गप्पांसाठी केवळ जेवणाचं निमित्तमात्र. दिवस सरताहेत तसं हे सगळं जाणवत आहे. असो.
        ही आजची मिसळ, तुमच्यासोबत शेअर करते. :) 

विद्या भुतकर. 

Tuesday, April 14, 2020

भाजी घ्या भाजी SSS

दोन आठवड्यांपूर्वी, एका शनिवारी सकाळी नवऱ्याने अगदीच मनावर घेतलं.
म्हणाला, "कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत.  मी दुकानात जाऊन सामान घेऊनच येतो. "
मी आपलं हिंदी पिक्चरमधल्या सोशिक बहुप्रमाणे म्हटलं, " तू नको जाऊस बाहेर. आपण भागवून घेऊ आहे त्याच्यावरच."
अजून १० दिवस आरामात गेले असते, दूध, अंडी, ब्रेड होतं थोडंफार. पण त्याचंही म्हणणं बरोबर होतं, अजून पुढे काय परिस्थिती असेल माहित नाही. शेवटी मनावर दगड ठेवून मी 'हो' म्हणाले. बाहेर पडणं म्हणजे मोठया युद्धावर जाण्यासारखंच होतं. 
म्हटलं, 'ग्लोव्हज घालून जा'. 
तर म्हणाला, 'हो गाडीत आहेत'.   
आता गाडीत कुठले ग्लोव्हज तर ते जिममध्ये घालतात ना ज्यांची पुढची टोकं उघडी असतात ना? तसले  ! म्हटलं डोंबल ! असल्या ग्लोव्हजनी काय होणारे? म्हणून चांगले जाडजूड ग्लोव्हज दिले त्याला आणि म्हटलं, "उगाच इथे तिथे हात लावत बसू नकोस, लोकांपासून चार हात लांबच राहा, दोन चारच वस्तू घे आणि लगेच घरी ये.". हो ना, काय काय सूचना द्याव्या लागतात. एकवेळ चार वर्षाचं पोरगंही ऐकेल, पण नवरा ऐकेल तर शपथ. मी तर "डोक्यावर हेल्मेट घालूनच जा" म्हटलं असतं पण कारमध्ये असं हेल्मेट घातलेलं बरं दिसणार नाही म्हणून गप बसले.  शेवटी माझ्या सूचनांना कंटाळून निघून गेला बिचारा.
          खरं सांगायचं तर हा दुकानात गेला सामान आणायला की हजार फोन होतात आमचे. हे चालेल का, ते आणू का, हे विसरलेच होते ते पण आण वगैरे. पण उगाच सारखा बाहेरच्या वस्तूंचा हात फोनला लागायला नको म्हणून मी मूग गिळून गप्प बसून राहिले घरी. दोन तासांनी नवरा घरी आला तेव्हा एकदम धावपळ झाली माझी. म्हणजे हॉस्पिटलमधून बाळाला पहिल्यांदा घरी आणल्यावर होते ना तशी. त्याला कुठे ठेवायचं हे ठरलेलं असतं तरीही घरात आणलं की धावपळ होतेच. नवरा घरी आल्यावर तो कुठे कुठे हात लावतोय यावर बारीक नजर ठेवून होते मी. त्याने बऱ्याच पिशव्या एकेक करुन आणल्या. सॉलिड चिडचिड झालेली माझी. दोन चार गोष्टी आणायचं सोडून त्याने उगाच इतका पसारा आणला म्हणून. पोरांना इथे कुठेही हात लावायचा नाही म्हणून पिटाळलं होतं. त्यांनाही कळलं आईचा मूड काय आहे ते. 
         घरात एखादा फ्रिज डिलिव्हरी घेऊन आल्यावर कसं आपण त्याच्या मागे मागे करत, त्याला जागा दाखवत लगबगीनं जात असतो, तसं हातातलं सगळं सामान थेट एका कोपऱ्यात जाऊ दिलं. तिथेच ओळीने कागदाच्या पिशव्या टाकून त्यावर पसरायला लावलं. मग बराच वेळ आम्ही त्या सामानाकडे एकटक बघत बसलो, काय करायचं याचं म्हणून. सिमला मिरची सारख्या भाज्या तीन दिवस बाहेर राहतील का वगैरे चर्चा झाली. ब्रेड घरातल्या डब्यांत काढून ठेवून आवरण फेकून द्यायचं की वरचं कव्हर अल्कोहोल ने पुसून घ्यायचं यावर बराच विचार केला गेला. तीन दिवस हात लावता कुठलं सामान तसंच पडून द्यायचं ठरलं. उदा: पास्ता,सफरचंद, केळी, बटाटे, कांदे, वगैरे. किचन ओटा अल्कोहोल(Isopropyl Alcohol) टाकून पाण्याने पुसून घेतला आणि आता हळूहळू थोडं सामानं किचन ओट्यावर आणायला लागलो. प्रत्येक गोष्ट आणताना जणू नवऱ्याच्या हातात बॉम्बचं आहे असं त्याच्या मागे मागे फिरत होते. 
         ओट्यावर आणलेल्या वस्तू ज्या बॉक्समध्ये होत्या त्यांची कव्हर पुसून घेतली. त्यात ब्रेड, दुधाचे कॅन, चिकन, मश्रूमचे पॅक होते. ते पुसून एकेक करुन फ्रिजमध्ये ठेवलं. आता टोमॅटो, छोट्या रंगीत मिरच्या, वगैरे सरळ साबणाच्या पाण्यात घातलं आणि थोडा वेळ तसंच पडून दिलं. नंतर ते खळखळून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. कोथिंबीर उघडून, मोकळी करुन सुकू दिली दिवसभर. नवऱ्याचे, माझे दिवसभरात इतक्यांदा हात धुवून झाले. पोरांना नवीन सामानाकडे तीन दिवस अजिबात फिरकायचं नाही म्हणून सांगितलं. तीन दिवसांनी त्यातली फळं पुन्हा साबणाच्या पाण्याने धुवून काढली. अनेक जणांनी बेकिंग सोडा आणि गरम पाणी किंवा व्हिनेगर आणि मीठ कि काय असं सगळं दिलं होतं. पण मला काही ते जमलं नाही. परत नवऱ्याचं जॅकेट, ग्लोव्हज चार दिवस बाजूला ठेवले. त्याचा फोन वगैरे पुसून घ्यायला सांगितला. दिवस संपला तेव्हा पार दमून गेलेलो. त्यानंतर नवऱ्यावर चार दिवस नजर ठेवून होते हे सांगायला नकोच. :) (अगदी मी फोडणी टाकल्यावर तो शिंकला तरी.) 
       परवाही कारली, वांगी, दोडका वगैरे मागवलं होतं घरीच. शक्यतो आता पालेभाजी किंवा न धुता येणाऱ्या वस्तू आणतच नाहीये. तर पुन्हा सगळी प्रोसेस परत रिपीट. सगळं मार्गाला लागेपर्यंत नुसता घरात गोंधळ. कधी कधी वाटतं किती ते व्याप. हे सगळं किती सोपं होतं. ते तसं होतं तेव्हा कधी वाटलं नाही. कदाचित हे अती वाटू शकतं एखाद्याला. पण सध्या हे गरजेचं आहे. मी राहते ते राज्य देशात ३ नम्बरला आहे या केसेस मध्ये. म्हणजे पसरण्याची शक्यता अजूनच जास्त. असो. तुम्हीही जमेल तसं हे सर्व करत असाल ही अपेक्षा. जेव्हा सर्व सुरळीत होईल तेव्हा हेच सर्व करताना किती बरं वाटेल या विचारानं मी आताच सुखावलेय.  असो. बाकी घरात सामान असताना आणि नसताना फसलेल्या स्वयंपाकाच्या गोष्टी पुन्हा कधीतरी. :) 

विद्या भुतकर. 

Monday, April 13, 2020

साठा

     परवा थालीपीठ केली, भाजणीची. थालीपीठ भाजणीचंच करतात हे मलाही माहित आहे. पण इथे भाजणी बनवून किंवा विकत मिळत  त्यामुळे अनेकवेळा मी गव्हाचं, डाळीचं, तांदळाचं पीठ एकत्र करुन थालीपिठासारखं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या चवीनं अजूनच चिडचिड झाली. तेव्हापासून दरवर्षी भारतातून येताना जमेल तितकं भाजणीचं पीठ घेऊन येते. त्यातच थोडी कणिक, डाळीचं पीठ घालून वाढवते आणि थालिपीठं करते. निरनिराळ्या डाळी, तांदूळ भाजून बनवलेल्या त्या पिठाचा जो सुंदर वास असतो तो आणि चव याचा आनंद वेगळाच. खरंतर आई पूर्वी तळूनच करायची थालीपीठ, सोबत घरचं सायीचं दही किंवा लोणी आणि ठेचा ! बस ! :) आता ती खाल्याला बरीच वर्षं झाली. असो. 
        तर काय सांगत होते? थालीपीठ बनवतांना वाटलं करोना असो किंवा नसो, हे पुरवून वस्तू वापरायची सवय जुनीच. मी शिकागोहून भारतात शिफ्ट होणार होते तेंव्हा आईने दोन महिने आधीच विचारायला सुरुवात केली होती कुठल्या डाळी, किती तांदूळ, गहू भरुन ठेवायचंय. बाकीच्या हजार गोष्टी असताना मला कळत नव्हतं की हे वर्षाचं सामान आता भरायची काय गरज आहे? पण आम्ही गेलो तोवर आईने सर्व घेऊन, ८ मोठाले डबेही घेऊन ठेवले होते. आजही ते भारतात पडून आहेत. डाळी, तांदूळ वगैरे वर्षभराचं भरुन ठेवायची इथे कधी सवय नाही. तरी घरात कुठलीही बारीक सारीक गोष्ट कधीही लागू शकते हे अनुभवानं कळलेलं होतं. विशेषतः मीठ, पीठ, मसाले, डाळीचं पीठ, उसळी वगैरे भरुन ठेवायची सवय लागली हळूहळू. शिवाय अनेक ठिकाणी भारतीय भाज्या, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे आणायला लांब जावं लागायचं. त्यामुळे तेही ३-४ आठवड्याचं आणून ठेवायची सवय झालीय. पण या सगळ्यांपेक्षा जास्त मोठा साठा म्हणजे भारतातून आणलेल्या वस्तूंचा.
       दरवेळी भारतातून परततांना मोठं कामच ते. आवडीच्या वस्तूंची यादी बनवायची आणि त्या जमेल तितक्या घेऊन यायच्या इकडे आणि वर्षभर त्याच पुरवून वापरायच्या. त्यात हे भाजणीचं पीठही. दोंघाच्या आया फोनवर विचारुन ठरवणार की काय काय कोण कोण करतंय. भाजणी आईकडंची. ज्वारीचं पीठ कुणाला जमेल तसं. हळद, लाल तिखट हेही घरुनच आणलेलं. सासूबाईंच्या हातचं आंब्याचं, लिंबाचं गोड  लोणचं. सासरे समोरच्या डेअरीमध्ये जाऊन त्यांच्या दुधाच्या पिशव्या घेऊन लोणच्याच्या पाकिटांना हवाबंद पॅक करुन आणून देणार. ती पाकिटं अजून दोनचार टेप लावून आवरणं घालून बॅगेत ठेवायची. सासरचे नाचणीचे पापड. आईने एकांकडून मशीनवर बनवून घेतलेल्या शेवया, बिया काढून मीठ लावून ठेवलेल्या घरच्या चिंचां आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरचा काळा मसाला. आता या सगळ्यात कधी कधी विकत आणलेल्या चटण्या, मेतकूट वगैरेही असतंच. 
         हे सगळं करताना तिथे घरच्या सर्वांची तारांबळ चालू असते अगदी आम्ही इकडे येईपर्यंत. इथे आलं की ते सर्व सामान नीट आलंय ना बघून, काढून नीट डब्यांमध्ये कधी फ्रिजमध्ये ठेवलेलं असतं. गेल्या काही दिवसांत जेव्हा घरात काय काय सामान आहे बघायला लागलो तेव्हा या सगळ्या सामानाची परत हलवाहलव झाली. त्यात लोणच्याची दोन पाकिटं एका डब्यात मिळाली. दोन वर्षं पुरेल इतकं तिखट आणि हळद आहे. भाकरीचं पीठ, भाजणीचं पीठ, चटण्या, लोणची, पापड, शेवया, सगळंच गरज लागली तर वापरता येईल याचं एक मानसिक समाधान आहे. हा आमचा साठा आहे आणि सगळ्यांचं प्रेमही. आज पुन्हा एकदा सर्वांच्या त्या धावपळीची , प्रेमाची आठवण झाली. 

       काल चवीत बदल म्हणून ही थालिपीठं झाली आणि सोबत नव्याने सापडलेलं लोणचंही. आता फक्त हे सर्व लवकर निपटलं म्हणजे परत पुढच्या वर्षीसाठी सामान आणायला जाता यावं म्हणजे झालं. 

विद्या भुतकर. 

Thursday, April 02, 2020

गृहीत

        काल दुपारी स्वनिकला फोन देणार नाही म्हणून जोरात रागवून सांगितल्यावर तो निघून गेला. वाटलं नेहमीप्रमाणे रागाने दुसरं काहीतरी करत असेल. तर बेडवर पडून रडत होता. हे गेल्या तीन आठवड्यात दोनदा झालं. एरव्ही रडणं वेगळं पण हे हताश झाल्यासारखं होतं. घरी राहून कंटाळा आलाय, मित्र नाहीत खेळायला, रोजची शाळा, क्लास, काहीच नाही. अर्थात थोड्या वेळानं शांत झाला. पण त्याला पाहून वाईट वाटलं की या लहान पोरांनाही या सर्व गोष्टींचा त्रास होतोय आणि नक्की काय होतंय हे सांगताही येत नाही.
         थोड्या वेळानं मी चालायला बाहेर पडले. आणि विचार करुन अजूनच त्रास होऊ लागला. माझ्या लक्षांत आलं तोच कशाला मीही सगळं मिस करतेय. रोज सकाळची धावपळ, मिटींगच्या वेळा पाळणं, ट्राफिक, रोजचा ड्राईव्ह, गाडीत रेडिओवर चावून चोथा होणाऱ्या गोष्टी आणि त्यांना वैतागून लावलेली गाणी. एखादं आवडतं गाणं आणि त्यात हरवून जाणं. अगदी पोरांच्या डब्यासाठी काय करायचं पासून ऑफिसला जाताना काय कपडे घालायचे इथपर्यंत अनेक प्रश्न. हे सगळं आठवत चालत असतानाच फोनवर गाणी लावायला लागले आणि ऑफिसच्या शेवटच्या दिवशी ऐकत होते ते गाणं लागलं. त्यादिवशी दुपारी चालताना हे ऐकलेलं. त्याने अजूनच कसंतरी वाटलं.
          किती काय काय गृहीत धरतो ना आपण? रोज कंटाळवाण्या वाटणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींची, 'कधी एकदा सुट्टी मिळतेय' असं वाटणाऱ्या अनेक दिवसांची आज आठवण येतेय. मी हे सगळं लिहीत असताना स्वनिक जवळ आला 'काय करतेयस?' विचारत. त्याला जवळ घेऊन म्हटलं, "बाबू, it'll be all over soon. We'll be fine. ". हे मी त्याला सांगत होते की स्वतःला काय माहित?

विद्या भुतकर. 

Monday, December 09, 2019

.....तो जिन्दा हो तुम

     दोन आठवड्यांपूर्वी एका ट्रिपला जाऊन आलो. ५-६ दिवसांची ट्रिप होती. खरंतर मी आणि नवऱ्याने ठरवूनच कधी नव्हे ते आधी बुकिंग करुन वगैरे सर्व नीट केलं होतं, तेही दोनेक महिने आधी. ट्रीपला जायचे दिवस जवळ आले तसे उत्साहाने खरेदीही केली. ती जागाच तशी होती, कॅंकून, मेक्सिको. इथल्या थंडीतून मस्त गरम वातावरणात ५-६ दिवस मिळणार होते. स्विमिंग पूल, तिथलं जेवण, ऊन आणि बाकीही पोरांच्या साठी ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या. आणि इतकं सगळं असूनही मला मनात एकच भीती होती. दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात अशाच उत्साहाने डिस्नीला ट्रिपला गेलो होतो. आणि परत येताना पाठदुखीचा जो त्रास सुरु झाला तो सर्जरीवरच थांबला. आजवर कधी कुठे जाताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायची सवय नव्हती. मनात आलं की निघालं. कितीही लांबचा प्रवास, ड्राइव्ह असू दे. पण दोन वर्षांनी बाहेर पडताना मला भीती वाटत होती. 
       जातानाही सर्व गोळ्या, औषधं सोबत घेऊनच निघाले. तिथे पोचण्याचा प्रवास तरी नीट पार पडला होता.पहिला दिवसही वॉटर पार्क मध्ये छान गेला. पण दुसऱ्या दिवसाची मात्र मला जास्तच  काळजी होती. त्यादिवशी आम्ही झिप-लायनिंग, ऍडव्हेंचर कोर्स, स्पीड बोटिंग आणि स्नॉर्कलिंग हे सर्व करणार होतो. तिथे वेळेत पोहोचून झिपलायनिंगसाठी अंगावर साहित्य चढवलं आणि मला जबरदस्त भीती वाटू लागली. पोरं उत्साही असल्याने त्यांनाच पुढं केलं. मग हिंमत करुन दोर पकडला आणि तिथल्या लोकांनी ढकलल्यावर जे सुटले दोरावरून....... फक्त एक क्षणभर काय ती भीती वाटली पण पाण्यावर उंचावरुन जाताना एकदम भारी वाटत होतं. पहिल्या झिपलाईन वरुन नीट पोचल्यावर जरा बरं वाटलं. 
       पुढे ऍडव्हेंचर कोर्स होता. दोऱ्यांच्या जाळीला पकडून खालच्या लाकडी किंवा दोरीच्या गाठींवरुन पाय ठेवत पुढे जायचं होतं. ५ अडथळे पार करायचे होते. पोरं पटापट सरकुन पुढे जात होती आणि मी मात्र जपून पाय टाकत चालत होते. हो कुठे काय पाय मुरगळला वगैरे तर? गंमत म्हणजे माझ्या मागे दोन इथल्याच बायका ग्रुपमध्ये होत्या. त्यांचं वय निदान ५५ च्या पुढचं तरी होतं. आणि त्या निवांतपणे हे सर्व  सर्व अडथळे पार करुन जात होत्या. त्यांना पाहून मलाच थोडीशी लाज वाटली. आम्ही शेवटचा अडथळा पार करुन स्पीड बोटच्या टप्प्यावर आलो. तिथे चार ग्रुप होते. आम्ही चौघे एका बोटमध्ये. तिथल्या माणसाने त्याच्या मेक्सिकन इंग्लिशमध्ये आम्हाला सर्व सूचना सांगितल्या. तो पुढे जाणार, आम्ही चार ग्रुप त्याच्या मागेआपापल्या बोटीत. बोटीचा वेग कमी जास्त करणे, ती चालवणे या सूचना मी जमेल तशा ऐकल्या. कारण चालवणार संदीप होता. त्या गाईडच्या मागे बोट घेऊन आम्हाला समुद्रात जायचं होतं. 
        संदीप आणि सानू बोटीत पुढे बसले आणि मी, स्वनिक मागे. आणि ज्या वेगाने बोट सुसाट निघाली, मला वाटलं संपलं !  पाठीला प्रचंड दणके बसत बोट वेगाने गाईडच्या मागे जात होती. मला त्रास होतोय म्हणून संदीपने थोडा वेग कमी करायचा प्रयत्न केला. पण आम्ही ग्रुपच्या मागे पडत होतो. म्हणून नाईलाजाने परत वेगानं जावं लागलं. लाटांवरुन, लाटांचा बोटीला बसणारा धक्का चुकवत आम्ही २५ मिनिटं बोट चालवून पाण्यात पोहोचलो जिथे स्नॉर्कलिंग करायचं होतं. मी तर पोहचेपर्यंत इतकी घाबरुन गेलेले की घरी तरी नीट पोहोचू दे असं वाटून गेलं. 
         पाण्यात एका जागी बोटी लावून गाईडने आम्हांला तोंडाला लावायचे मास्क दिले. त्याने तोंडाने श्वास कसा घ्यायचा हेही सांगितलं. पायांत बदकासारखे चप्पल घातले. सानूला नेहमीप्रमाणे घाई. ती पाण्यात उतरली, पण श्वास घ्यायचं नीट जमेना म्हणून परत वर आली. म्हटलं आपण बघावं जमतंय का म्हणून मी पाण्यात उतरले आणि एकदम समुद्रांत उतरलोय हे जाणवलं. आजवर फक्त पूलमध्ये उतरलेली मी. दोन सेकंदांतच परत बोटीवर आले. पण त्या बोटीला धरुन वर चढताही येईना. त्या दुसऱ्या ग्रुपमधल्या वयस्कर बाईंनीच मला हातांना धरुन वर ओढलं. समोर दिसणारा किनारा, डोक्यावरचं ऊन आणि इतक्या जवळ येऊनही कोरल्स बघायला पाण्यांत उतरता येत नाही याची खंत जाणवत होती. 
        पुढच्या पाच मिनिटांत आमचा गाईड तिथे आला आणि म्हणाला, Do you need help?. म्हटलं हो हो. त्याने पाण्यात खाली घेतलं मला तरीही काही नीट जमेना. शेवटी उजव्या हाताला त्याने धरलं आणि कुठल्यातरी एका क्षणी मला ते तोंडाने श्वास घेणं जमायला लागलं. पण हात काही सोडायला जमेना. शेवटी त्या गाईडनेच मला हात धरुन पुढे नेलं, पाण्यांत. श्वास घेता येऊ लागला तशी मी पाण्याखाली डोळे घातले. दोनेक मिनिटांतच आम्ही कोरल्स बघू लागलो. आजूबाजूचे सर्व आवाज बंद झाले. फक्त माझा श्वास आणि पाण्याखाली दिसणारे कोरल्स आणि त्या गाईडचा हातातला हात. इतकंच जाणवत होतं. पुढे जाऊ तसे त्यानं मला बोट दाखवून माशांचा एक जत्था दाखवला. अगदी हात लागेल इतक्या जवळून कोरल्स पाहिले. ती शांतता, ते दृश्य अनुभवतांना मला एकदम जिंदगी ना मिलेगी दोबारा मधले ह्रितिक आणि कतरीना आठवले. घाबरलेल्या त्याला हात धरुन नेणारी ती आणि पुढे गेल्यावर अवाक नजरेने ते सुंदर दृश्य बघणारा तो. आपण हे अनुभवतोय यावर माझा विश्वास बसत नव्हता. लवकरच मी बोटीवर परत आले. संदीप आणि पोरांचं बघून होईपर्यंत थांबलो आणि परत धक्के खात बोटीने मूळच्या जागेवर आलो. 
      पण खरं सांगू का? परत येणं ही केवळ फॉर्मॅलिटी होती. त्या अख्ख्या दिवसांत अनेक वेळा मला वाटलं होतं की 'आपण हे केलं नाहीतरी चालेल ना. काय बिघडतंय?'.  पण भीती वाटत का होईना मी त्यादिवशी तिथल्या सर्व ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्या शेवटच्या टप्प्याला हवं ते अनुभवता आलं याचं समाधान आयुष्यभर राहील. अर्थात हॉटेलवर येऊन खाऊन, पिऊन मस्त झोप काढली ही गोष्ट निराळी. पण एका दिवसाकरता का होईना मी माझा 'जिंदगी ना मिलेगी ना दोबारा' चा  क्षण जागून घेतला होता. दोन वर्षं मनात असलेली भीती थोडी का होईना कमी झाली होती. 

"दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम

हवा के झोकों के जैसे आजाद रहना सीखो 
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो 
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें 
हर एक पल एक नया समां देखे ये निगाहें 

जो अपनी आँखोमें हैरानियाँ लेके चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम 
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो 
तो जिन्दा हो तुम. "

विद्या भुतकर. 

Tuesday, December 03, 2019

दों प्रकार के लोग

       इस दुनियामें दों प्रकार के लोग होते हैं ! असं म्हणून लोकांचे कितीतरी प्रकार आजवर ऐकलेत. तसे मला विचाराल तर माझ्याकडेच हजारेक प्रकार सांगता येतील. म्हणजे, परीक्षेच्या वेळी रात्री जागून अभ्यास करणारे, तर काही पहाटे उठणारे. खरेदीला गेल्यावर पटकन दोन चार वस्तू घेऊन टाकणारे तर तासंतास घेऊन एकही कपडा न निवडणारे. कसंही जेवायला दिलं तरी आनंदाने खाणारे(नवऱ्यासारखे), तर माझ्यासारखे चार वेळा गरम करावं लागलं तरी मनाला हवं तसंच खाणारे. असो तर एकूण काय की असे अनेक प्रकार. या दिवाळीत फराळ करताना लक्षांत आलं या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक शब्दश: रेसिपी आहे तशीच अंमलात आणून पदार्थ बनवणारे आणि दुसरे माझ्यासारखे नको तिथं स्वतःचं डोकं लावणारे. 
           दर दिवाळीत फराळ बनवायला सुरुवात केली की मी सर्व रेसिपीज बघून घेते. नव्याने ठरवते की यावेळी जसं लिहिलंय तसंच डिट्टो करायचं. पण होतं काय रव्याच्या लाडूंचं अगदी एक दोन वाट्यांचंच माप दिलेलं असतं. मला वाटतं अरे इतके कमी कसे करणार. मग तेच माप मी चारपट वाढवते. प्रमाण वाढवलं की त्यात साखरही एकदम ८ कप वगैरे होते. आता एकदम आठ कप साखर टाकायला नको वाटतं. त्यामुळे जे काही प्रमाण दिलंय त्याच्यात मी थोडी काटछाट करते. त्यामुळे मग पाक पातळ होणार किंवा कमी तरी होणार. असं करुन त्या लाडवांचं बिनसतंच. मग वैतागून मी आईला फोन करते. आईच्या हातचे रव्याचे लाडू म्हणजे एक नंबर. आई मात्र तिच्या ठरलेल्या वाट्यांचं प्रमाण मला सांगते. आणि माझी अजूनच चिडचिड होते. ते मापाने केलं असतं तर कशाला ना? रव्याचे लाडूच कशाला? बाकीच्या फराळाची पण तीच गत असते. चकली, चिवडा, शंकरपाळ्या. माझ्या दोनेक वर्षांपूर्वीच्या माझ्या चुकलेल्या शंकरपाळ्यांवर मला अनेक सूचना आल्या होत्या कमेंटमध्ये. पण मी ऐकेल तर ना? अनेक मैत्रिणी इतका छान फराळ बनवतात. कसं बनवतेस म्हटलं की डायरेक्त प्रमाणच सांगायला लागतात. आता त्यांना काय बोलणार? 
          फराळाचं जाऊ दे, माझ्या आईची ३० वर्षांपूर्वीची केकची रेसिपीही अजून तीच आहे. त्याच मापाने, त्याच भांड्यात, त्याच चवीचा भारी केक बनतो, अगदी जसा आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी बनायचा तसाच. हे माप प्रकरण बेकिंगच्या बाबतीत अजून जास्त त्रासाचं. मला अनेकदा ते पावभाजीचे पाव बनवून बघायचे होते. दरवेळी मी उत्साहाने सुरु करणार, मग त्यात बटर/यीस्ट काहीतरी कमी जास्त होणार. किंवा ते किती वेळ ठेवायचं वगैरे चुकणार. असं करुन मी तीन चार वेळा ते कणकेचे गोळे फेकून दिले. पण हे असं इतक्या वेळा चुकल्यावर एकदम रागाने मी अगदी दिलीय तशीच रेसिपी बघून केले आणि चक्क झाले ना राव, पाव ! लई भारी वाटलं. पण त्याचवेळी दोन डॉलरच्या पावसाठी मी इतका वेळ आणि कष्ट घालवू शकत नाही असंही वाटलं. चांगले पाव बनवल्याची ती पहिली आणि शेवटची वेळ. तर मुद्दा काय की हे बेकिंग वगैरे मधे खासकरुन दिलेलं प्रमाण आणि कृती जास्तच मन लावून पाळावी लागते. 
         लहानपणी आईला विचारलं मिठाचं प्रमाण सांग वगैरे तर म्हणायची मला नाही सांगता येत, अंदाजाने घालायचं. हे अंदाजपंचे धागोदर्शे कसं करायचं हे अनेक वर्षं कळलं नाही. पण आता सान्वी तेच प्रश्न विचारते आणि कळतं की एखादी रेसिपी बरोबर लिहिणं, सांगणं किती अवघड असतं. समोरच्या माणसाला काहीही येत नाही असं समजून प्रत्येक घटक, प्रत्येक कृती लिहून द्यायची. आणि ते सर्व जसंच्या तसं करुन समोरचाही एकदम बरोबर तसाच पदार्थ बनवणं. हे किती अवघड आहे आणि त्यांत margin of error किती आहे याची कल्पना आहे का? हे म्हणजे मी एखाद्या प्रोजेक्टसाठी स्पेसिफिकेशन लिहिणे आणि डेव्हलपरने ते तसंच्या तसं कोड करुन तो एकदम हवा होता "तसाच" सॉफ्टवेअर प्रॉडक्ट बनवणे याच्याइतकं अवघड आहे. बरोबर ना? मला असा एकदम शोध लागला की खूप आनंद होतो. तर एकूण काय की रेसिपी लिहिणे आणि त्या पाळणे हे कठीणच काम. पण हे पाळणाऱ्या माणसांचं किती बरं असतं. चुका कमी आणि चव एकसारखी प्रत्येकवेळी. 
         तर लेकीला अनेकदा पाहताना वाटतं ही का नियम पाळत नसेल? मी एखादी गोष्ट सांगतेय म्हणजे अनुभवातूनच सांगतेय ना? बाकी सगळे एखादी गोष्ट जशी सांगितलीय तशीच करत असताना, का तिला स्वतःलाच हवंय तसं करायचं असतं? सर्व माहिती दिलेली असतांना फक्त झापडं लावून, लिहून दिलेली गणितं करणं का हीला अवघड वाटतं? अशावेळी कधीकधी मला अशी नियम न पाळता स्वतःच्या मनाला योग्य वाटेल तशीच रेसिपी वापरुन पदार्थ बनवणारी मी आठवते. मग त्यात चुका होणारंच हे ठरलेलंच. नाही का? कधीतरी त्या चुकांतून धडे घेऊन तीही मान्य करेल की नियम पाळलेच पाहिजेत. किंवा तिला एखादी नवीन स्वतःची रेसिपी मिळेल. नाही का? असो. 
बाय द वे, तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता? 

विद्या भुतकर. 

Sunday, November 24, 2019

Win-Win

मागच्या आठवड्यात काही कपडे खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. थंडी वाढेल तसं बाहेर पडण्याचा आळस टाळून काही ना काही घेणं गरजेचं होतं.  लेकाला प्लेडेट (play date , इथे तो डोळे फिरवणारा स्माईली पाहिजे) ला सोडून दोन तासांत यायचं ठरवून बाहेर पडलो. एकतर खूप दिवसांनी असे फक्त खरेदीला बाहेर पडलो होतो त्यात लेकीला कधी नव्हे ते एकटीला घेऊन. सुरुवातीला दुकानांत गेल्यावर तिच्यासाठी न घेता माझी खरेदी सुरु केली. तरीही तिने कुरकुर न करता स्वतः मला काय चांगलं दिसेल ते सुचवायला सुरुवात केली. दोन चार झगमगीत कपडे मी पाहिले तर म्हणे,"आई तू हे असलं घालशील?". म्हटलं, का नाही? तिने तसा बराच वेळ संयम ठेवला. पुढे लेकाला घ्यायची वेळ झाल्याने मी आणि दोघीच उरलो. 

       म्हटलं चल आता तुझी खरेदी करु. मी सुचवेन त्यातलं बरंचसं ती नाहीच म्हणत होती. मग एकदा बोललीही," मला तुला प्रत्येकवेळी नाही म्हणताना वाईट वाटतंय, पण मला खरंच ते आवडत नाहीयेत." म्हटलं, असू दे चल अजून बघून पुढे.". मग एखादा कपडा कसा दिसतोय यावर हसत, 'हे काये?' वगैरे कमेंट करत आम्ही पुढे चालत राहिलो. मोजून दोन कपडे घेतले. दुसऱ्या दुकानात फिर फिर फिरुन तिने एक शर्ट उचलला. विकत घ्यायला जावं म्हटलं तर तिथे भली मोठी रांग होती. ती म्हणे,"आई मला या टॉपसाठी इतका वेळ उभं राहायची गरज नाहीये." असं म्हणून तो तिथेच ठेवून पुढे निघालो. तिला आता दोन तास फिरुन भूक लागली होती. तिचे आवडते 'प्रेत्झल (pretzels) घ्यायची माझी इच्छा नव्हती. म्हटलं,"तुला खरंच सांगते तो नुसता मैद्याचा गोळा असतो. त्यापेक्षा काहीतरी चांगलं खाऊ." ती नाईलाजाने हो म्हणाली. मग आम्ही माझा आवडता 'समोसा चाट' घेतला. तिने आधी समोसा खाल्लेला पण समोसा चाट खाल्लेलं नव्हतं. सोबत मँगो लस्सीही. 

        दोघी मग एका ठिकाणी निवांत बसून एकाच प्लेटमधून समोसा चाट खाऊ लागलो. भुकेला काय? पण 'खूप भारी लागतंय' म्हणाली. ती ते मन लावून खात असताना मी तिला सांगायला लागले. म्हटलं,"प्रत्येकवेळी खूप किंमत असलेली वस्तूच चांगली असते असं नाही. उलट तू आज्जीला सांग एखादी साडी छान आहे म्हणून ती तुला सांगेल तिने कशी कमी दरात चांगली साडी घेतली ते. आपल्याला आवडली वस्तू तर त्याची किंमत बघायची नाही. उलट कमी असेल तर 'इट्स गुड डील' म्हणून आनंद मानायचा. प्रत्येकवेळी ब्रँड बघायला तू अजून लहान आहेस. blah blah ..... " मी बोलत राहिले ती खात ऐकत राहिली. परत येताना म्हणालीही,"खूप मजा आली आज आपणच खरेदीला जायला." 

       बरं गोष्ट इथेच संपत नाही..... :) लेकाची बाजू आहेच ना? हिला जितका खरेदीमध्ये उत्साह आणि संयम तितका हा उतावीळ आणि कंटाळलेला. दोन दिवसांनी सान्वी क्लासला गेलेली असताना त्याला घेऊन खरेदीला गेलो. तर याचं गाडीतच सुरु झालं,"मला कशाला घेऊन जाताय, मी शाळेत असताना का जात नाही? तुम्ही खूप वेळ लावता. बाबांचे कपडे घ्यायला माझं काय काम?...." तोंड वाकडं करुनच मॉलमध्ये आला. थोडा वेळ झाल्यावर निवळला तेव्हा मी बोलायला सुरुवात केली. 
म्हटलं, "चल बाबा कपडे ट्राय करताहेत त्यांना अजून काही चांगलं दिसतं का बघू. " त्याला विचारुन दोन टी शर्ट उचलले. त्यानेही कुठला रंग चांगला वगैरे सांगितलं, बाबाला एक शर्ट 'टाईट आहे, पुढचा साईज घे' म्हणून सांगितलं. 
बाबा ट्रायल रुममधे असताना मी लेकाला म्हटलं, "बाबू तुला सांगू का काय होतं? तू आता कंटाळा करशील हे कपडे घ्यायला. पण उद्या तू मोठा झाल्यावर तुझ्या गर्लफ्रेंड सोबत गेलास शॉपिंगला तर काय करशील?".
हे ऐकल्यावर त्याने कान टवकारले. "
म्हटलं," तुला कपड्यातलं काही माहीतच नसेल. तू बाहेर आपला फोन घेऊन बसशील. आणि ती म्हणेल हा किती बोअरिंग माणूस आहे." 
यावर हसला आणि पुढची खरेदी एकदम सुरळीत झाली. :) अगदी दीदीसाठी लिपग्लॉस घ्यायचा का यावर चर्चाही झाली आमची. निघताना स्टारबक्स दिसलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचा आवडता केकपॉप तिथे होता ना? नवराही खुश होऊन एक केकपॉप त्याच्यासाठी घेऊन आला. 
म्हटलं,"हे बघ याला म्हणतात win-win. तुला खाऊ मिळाला आणि आम्हांला चांगले कपडे. " म्हणे,"हो ५०-५० ना?". म्हटलं,"५०-५० मधेही, you lose 50%. Win-Win मध्ये दोघांचाही फायदा असतो, नुकसान नसतं." अशा गप्पा करत घरी परतलो. 

          यावर विचार करताना वाटलं, दोन्ही पोरं आपलीच. पण ते आपल्यासोबत एकटेच असताना जे बोलणं होतं ते किती वेगळं आणि खास असतं. ती जवळीक वेगळीच. आणि याहीपेक्षा, रोज अभ्यास, शाळा, क्लासेस आणि चांगलं वागायचं वळण लावणं या सगळ्या नियमांच्या गराड्यात आपण त्यांचे लाड करायचं विसरुनच जातो. ते हे असे एकटे सोबत असतांना जास्त जाणवतं. नाही का? 

अरे हो, सांगायचंच राहिलं, परत येताना स्वनिक म्हणे,"आई खरंच असे लोक असतात? जे आपल्या बायको-गर्लफ्रेंड सोबत खरेदीला जात नाहीत?". म्हटलं, किती भोळं ते पोरगं माझं. आता त्याला काय सांगणार? :)


विद्या भुतकर. 

Sunday, November 10, 2019

आमच्या काकू

        एका खांद्यावरुन दुसऱ्या बाजूला कमरेवर लटकणारी छोटी पर्स घेऊन, साडीचा पदर खोचूनच किंवा पिनेने नीट लावून, पायांत काळ्या थोडीशी उंची असलेल्या चपला घालून, डोळ्यांवर गोल आकाराच्या भिंगाचा आणि सोनेरी काड्यांचा चष्मा लावून काकू नेहमी कुठे ना कुठेतरी जाण्याच्या घाईत असतात. वेळ, काळ यांचा त्यांच्या गतीशी काहीही संबंध नसतो. त्यांचा जोश तितकाच. संध्याकाळी बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये टाकलेल्या बेंचवर शक्यतो बाकी काकूंसोबत बसलेल्या दिसतील. आता 'काकू' सारखा बहुप्रचारी शब्द सापडणार नाही. का तर लग्नं झालं की पुतण्यांकडून आपोआप मिळणाऱ्या 'काकू' पदापासून माझ्यासारख्या दोन मुलांची आई असलेल्या काकू पर्यंत आणि तिथून पुढे 'आजी'च्या आधीच्या वयाच्या सर्व बायका म्हणजे काकू ! आता एखादी, दुचाकी चालवत रिक्षाला आडवी जाणारी 'ओ काकू !' वेगळी. पण आमच्या या 'काकू' म्हणजे दोन मोठ्या मुलांची आजी असूनही पोरांच्या वयाचा उत्साह असणाऱ्या काकू. काय नाव देऊया त्यांना? नको राहू दे.

         तर काकू देशस्थ. रंग सावळा, उंची ५.३ असावी. केस करडे- सफेद. कपाळावर ७ सेंटीमीटर व्यासाची गोल टिकली आणि एक बारीकशी रेघ. हातात २-४ काचेच्या बांगड्या. डोळ्यावरचा चष्मा वर सरकवण्यासाठी नाकाचा शेंडा अधूनमधून आपोआप वर जातो. काकूंना खळखळून हसताना पाहिल्याचं मला आठवत नाहीये. आवाज भारदस्त पण थोडा किनरा. त्यामुळे त्या प्रेमाने बोलत असल्या तरीही चिडल्यात की काय असं वाटावं. बिल्डिंगच्या आवारात त्यांचा वावर नेहमी जाणवत राहतो त्या समोर असल्या किंवा नसल्या तरीही. प्रत्येकवेळी भारतात गेल्यावर, दिसल्या दिसल्या की , 'काय गं? कधी आलीस?' आणि पुढे 'आमचा मुलगा काय म्हणतो?" हे ठरलेलं. काकूंसाठी बिल्डिंगमधल्या सर्व माझ्यासारख्या मुली (बरं बायका म्हणू) म्हणजे त्यांच्या सुना आणि त्यांचे नवरे हे काकूंची मुलं. मागच्यावेळी घरात दुपारी मी सोफ्यावर पडलेली असताना काकू घरी आल्या आणि 'माझा लेक किती काम करतो बघा !' हे ऐकून घ्यायला लागलं. खरं सांगू का? काकूंच्या या बोलण्याचा राग येत नाही. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, तो ओळखला की मग त्याच्या वागण्याचं वाईट वाटत नाही. तसंच काहीसं काकूंबद्दल झालं.

         बिल्डिंगमध्ये राहायला आल्यावरच अशा कुणी काकू आहेत हे कानावर पडलं होतं. त्यांच्या गोष्टीही ऐकलेल्या. म्हणे सकाळच्या वेळी रोज एक माणूस एक लिफ्ट अडवून ठेवायचा. लिफ्टच्या दारात सामान ठेवून हा प्रत्येक फ्लोअरवर फिरणार. एकतर सकाळी पोरांची शाळांची घाई, दूध वगैरे आणायची लोकांची घाई. मग एक दिवस काकू थांबून राहिल्या कोण हा माणूस आहेबघायला आणि मग त्याला रागावल्याही. कधी पोरं दुपारी जास्त आरडाओरडा करायला लागली की काकू रागावणार हे नक्की. एक दोनदा पोरांना म्हटलंही बाकी 'जाऊ दे निदान २-४ या वेळात तरी गाड्या खेळू नका. म्हणजे मला थोडं तरी बोलता येईल.'. प्रत्येक गोष्टीत 'काकू काय म्हणतील?' याच्यावर बोलणं व्हायचंच. हळूहळू या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन काकूंना आणि काकूंचं कामही पाहायची संधी मिळाली आणि त्यांचं कौतुक वाटू लागलं.

        बिल्डिंगच्या प्रत्येक सणात त्यांचा उत्साह आणि सहभाग ठरलेला. गणपतीच्या साधारण ३-४ आठवडे  आधीच 'कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या मुलांची नावं द्या' असा मेसेज व्हाट्सअपवर आला की आपापल्या मुलाचं नाव मुकाट्याने लगेच सांगून टाकावं. 'नंतर नावं घेतली जाणार नाहीत' अशीही सूचना त्यात असतेच. अगदी मीही इथून पोरांची नावं आधीच देऊन टाकायचे. एकदा काकू अशाच बिल्डिंगखाली भेटलेल्या. म्हणाल्या,'अरे इतक्यांदा सांगूनही लोक का देत नाहीत आधी नाव? रात्री १०च्या आत सर्व कार्यक्रम संपवावा लागतो. मग एखाद्याला मिळालं नाही परफॉर्म करायला तर वाईट नाही का वाटणार त्या पोराला?'. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. पोरांचं जाऊ दे, एकदा आमचंच ठरलं की सगळ्या जणींनी डान्स करायचा. मी तर म्हटलं, 'लंडन ठुमकदा' वरच करु. तिथंच नाचायलाही सुरुवात केली होती मी. मग कळलं की त्यातले शब्द, अर्थ वगैरे बघून ते कॅन्सल केलंय. असंही होऊ शकतं हे मला माहीतच नव्हतं. खरंतर, बाहेर, 'टिव्हीवर इतक्या गोष्टीं मुलं बघत असतात तर या गाण्यांनी काय होतंय असं मला वाटलं होतं'. तसा काकूंशी वादही घालण्याचा प्रयत्न केला होता मी. पण इतक्या वर्षात ती बिल्डिंगची पॉलिसी बदललेली नाहीये आणि आता मला त्याचं कौतुकही वाटतं. आजही लंडन ठुमकदा ऐकलं की गाण्यापेक्षा काकूंची आठवण जास्त येते.

          दवाखान्यात सिनियर सिटीझन रुग्णांची सेवा करायला जाणे, जवळच्या आश्रमासाठी मदत करणे किंवा कुणाला करायची असेल तर ती सुचवणे, मुलांसाठी संध्याकाळी खालीच पार्किंगमध्ये संस्कारवर्ग घेणे हे सर्व काकू नियमित करतात. मुलांसाठी पुस्तकपेटीही सुरु केली होती काकूंनी. पण प्रत्येकवेळी पुस्तकं देणं-घेणं त्यांचा हिशोब ठेवणं अवघड होऊ लागलं म्हणून त्यांनी ती बंद केली. मुलींसाठी स्वरक्षणासाठी काही क्लासेसही घेत होत्या. म्हणजे त्या स्वतः नाही पण त्यासाठी लागणारी सर्व अरेंजमेंट करणे त्यांच्याकडेच. गणपतीतलं लेझीम आणि मुलांचं नाटक बसवणं हेही त्यांच्याकडेच. ८-९वी च्या मुलांना एकत्र आणून एखादं काम करवून घेणं ही सोपी गोष्ट नाही.यावर्षी वृक्षारोपणही केलं मुलांसोबत. नंतर स्वनिक घरी येऊन सांगत होता 'झाड कसं लावतात याची प्रोसेस'. दिवाळीसाठी मुलांचं पणत्या रंगवण्याचं वर्कशॉप घेणं, गोपाळकाल्यासाठी मेसेज करणं, प्रत्येक कामाला स्वतः हजर राहणं, होळीच्या वेळी सर्व पोळ्या होळीत न घालता त्यांचं वाटप करणं, अशी अनेक कामं काकू सतत करत राहतात. त्यांना 'कंटाळा येत नाही का?' असं विचारायची माझी हिंमत नाही. ते तसं त्यांच्याकडे पाहून वाटतही नाही. बरं नुसतं मुलांसाठी नाही तर त्यांच्या सिनियर ग्रुपसोबतही बऱ्याच कार्यक्रम करत राहतात.

       होतं काय, जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या ठामपणे एखाद्या मोठ्या सोसायटीत, ५०० च्यावर लोकांच्या घोळक्यात एखादं काम आग्रहाने करते तेंव्हा त्याला बोलणारे, त्या नावडणारेही असतातच. काकू मात्र हे सर्व माहित असूनही, शक्य होईल तितक्या लोकांचा विचार करुन काम करत राहतात. ते करण्यासाठीही एक खमक लागते अंगात, ती त्यांच्याकडे आहे. आणि त्याचंच मला जास्त कौतुक वाटतं. मी त्यांना एकदा विचारलं, "काकू तुम्ही कुठे होतात इथे यायच्या आधी?". बहुतेक त्यांनी ठाणे किंवा वाशी वगैरे काहीतरी सांगितलं. नक्की आठवत नाही. म्हणजे त्यांचं ५०-५५ वर्षाच्या आधीचं आयुष्य पुण्याच्या बाहेरच गेलं. इथे त्या मुलगा, सून, नातींसोबत राहतात. नातीच्या अभ्यासाचं, क्लासेसचं वगैरे आवर्जून बघतात. मी काकांना कधी पाहिलं नाही. किंवा कुणी सांगितलं असेल तरी ते कसे दिसतात हे आता आठवत नाही. काकूंच्या समोर मला कदाचित बाकी कुणी दिसलंच नसेल.

            दोन वर्षांपूर्वी मी इथेच असतांना फोनवरुनच मला बातमी कळली की 'काका गेले'. नेमका तेंव्हाच सून आणि नाती उन्हाळ्याच्या सुट्टीला परदेशी आलेल्या. काकूंनी तिकडे बिल्डिंगमध्ये ओळखीच्या दोन-तीन जण आणि मुलासोबत जाऊन सर्व कार्य उरकलं, कशाचाही जास्त बाऊ न करता. 'आपण रोज काही परदेशात असे जात नाही आणि ती इकडे येऊन काय होणार होतं?' असं म्हणून सुनेला सुट्टी सोडून यायचा हट्टही केला नाही. मला या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटत राहिलं. पण हिंमत होत नव्हती विचारायची. मग मागच्या वेळी म्हटलंच काकूंना, की 'काकू असं कसं तुम्ही सर्व मॅनेज केलं?'. त्या म्हणे, "जे व्हायचं ते झालं होतं. मग इतका खर्च करुन ती बहिणीकडे गेलेली, कशाला परत बोलवायचं? आणि बाकी लोक असतील बोलणारे, अगदी मी रडले की नाही रडले हेही म्हणणारे. मला नाही जमत ते लोक आले सांत्वनाला की उगाच रडायचं. आमचा ३८ वर्षांचा संसार. ते गेल्यावर मला वाईट वाटणारच ना? ते मी बाकी लोकांना कशाला दाखवू? माझं मन मी बाकी गोष्टीत रमवते." त्यावर पुढे बोलायचं काही राहिलं नव्हतं. अशा महत्वाच्या, भावनिक वेळी संयम दाखवून योग्य तो निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि तितकाच नंतर माझ्याशी झालेला भावनिक संवाद. त्यांच्याशी झालेल्या त्या पाच मिनिटांच्या बोलण्यानंतर काकूंबद्दल वाटलेला आदर अजूनच वाढला होता.

         १५ ऑगस्टला बिल्डिंगमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तिथल्याच एखाद्या काका-काकूंना बोलावलं जातं. दोनेक वर्षांपूर्वी काकू प्रमुख पाहुणे होत्या. त्यांच्याबद्दल जी माहिती सांगितली होती तोच कागद मी जपून इकडे घेऊन आले होते. तो कुठंतरी हरवला. मग लिहायचं राहिलंच. अनेकदा त्यांचा विचार आला की चिडचिड व्हायची लिहिता येत नाही म्हणून. मग म्हटलं, असंही त्यांचा जन्म कुठला, शिक्षण आणि बाकी सर्व माहितीपेक्षा त्यांचं व्यक्तिमत्वच त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी पुरेसं आहे, नाही का? तर अशा आमच्या काकू. रागावून का होईना काम करवून घेणाऱ्या, पोरांवर गोंधळ करतात म्हणून रागावल्या तरी तितक्याच प्रेमाने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या.  काकू जेव्हा त्यांचे फोटो काढल्यावर 'माझे फोटो कधी पाठवशील?' असं म्हणतात तेव्हा त्यांच्यातही एक लहान मूल दिसतं आणि मला हसू येतं. मी तिथे नसले तरीही बिल्डिंगच्या व्हाटसऍप ग्रुपवर काकूंचं वास्तव्य जाणवत राहतं. त्यांच्या सूचना, सुचनापत्रकं, नवीन उपक्रम, त्यांचे, त्यांच्या कामाचे फोटो हे नियमित येत राहतं. आजही तिथे गेले की समोर गेटमधून ती पर्स लटकवून चालत येणाऱ्या काकू दिसल्या की आपण पुण्यात आलोय, आपल्या बिल्डिंगमध्ये आलोय हे जाणवतं. त्या आमच्या तिथल्या घराची एक ओळख आहेत. 


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, November 04, 2019

मित्रं ! (कथा)

"येल्लो रिच ! कैसी है रे तू? ", रिचाने फोन उचलताच तिला बोलायची संधीही न देता भाविन ओरडला.
"क्या रे गुज्जू कैसा है?", तीही त्याच आवेशात बोलली.
        बरेच महिने झाले होते त्यांना बोलून, मेबी वर्षही. नवीन नंबर पाहून ती जरा साशंक होती पण त्याचा आवाज ओळखायला वेळ लागला नव्हता. एके काळी एकाच ऑफिस, एकाच टीममध्ये काम करायचे ते. दोन-अडीच वर्ष एकत्र काम केलं होतं त्यांनी. कितीतरी दिवस त्यांच्या दोघांच्या अफेयरच्या गप्पा व्हायच्या ऑफिसमध्ये. हे सगळं माहित असूनही त्यांचं पुढे काही झालं नव्हतं. तो ऑनसाईट गेल्यावर बोलणं कमी होत होत बंदच झालं होतं. पण जुन्या मित्रांशी पहिल्या वाक्यातच गप्पा सुरु होतात आणि मधली सर्व वर्ष जणू गायब होतात. आजही तसंच झालं होतं.    
"कहां है आज कल?आज मेरी याद कैसे? ", तिने विचारलं.
"बस चल रहा हैं.  Got back from onsite finally !", त्याने जराशा निराश आवाजात सांगितलं.
"का रे? तुझं ते एक्सटेन्शनचं नाही झालं का?", तिला जास्त वेळ हिंदीत बोलायला जमायचं नाही, तेही त्याला मराठी येतं हे माहित असताना.
"Yeah, they didn't want to file my extension. खूप फाईट मारली. नहीं माना मॅनेजर. It was tough yaar, coming back after 6 years. पूरा गाड़ी, सामान सब बेचके आना पड़ा. ", भाविन.
त्याच्या अक्सेन्टमधे फरक जाणवला होता तिला.
"हां रे. पण इथेही चांगलं आहेच की काम.", तिने त्याला समजावलं. त्याला कधी असं निराश झालेलं पाहिलं की ती आपोआप तिच्या समजण्याच्या रोलमध्ये जायची, तिच्याही नकळत.
"हां, मैने अप्लाय करना चालू कर दिया है. अभी मैं यहाँ नहीं रह सकता ज्यादा दिन.", भाविन बोलला.
"इतक्यात सुरु पण केलंस? तू पण ना? तुला आयुष्यात चैन पडायची नाही कुठे. जरा घरी रहा की. तिकडेही दोन चार प्रोजेक्टवर फिरत राहिलास.", ती जोरात बोलली.
"तेरेको को तो पता हैं ना. मुझे बोअर होता हैं एक जगह रुकना. अभी हैद्राबाद में हैं नेक्स्ट वीक interview. ", तो बोलला.
"अच्छा? कुठेंय?", ती.
"अमेझॉन मध्ये. ", तो.
" वाऊ ! भारीच रे. तू इतक्या पुढे  मारामाऱ्या करतोस म्हणूनच इतक्या opportunities मिळतात  तुला. अरे, अमेझॉन मध्ये अमोघ पण आहे.", ती म्हणाली.
"अमोघ कौन?", त्याने विचारलं.
"तू ऑनसाईट गेल्यावर टीममध्ये आला होता ना? थोडेच दिवस होता तो. वर्षभर वगैरे असेल. पण तोही हुशार आहे एकदम. मागच्या वर्षी त्याला अमेझॉन मध्ये जॉब लागलाय. तुला रेफरल साठी विचारु का?", तिने सिरियसली विचारलं.
"नै रे, छोड लोंग ऐसें भाव नहीं देते. तू इतनी भोली है, तेरेको कुछ समझ नहीं आता. ", त्याचा कुणावरही विश्वास नव्हता, कधीच.
"अरे खरंच. चांगला आहे तो खूप. मलाही इथे असतांना खूप मदत केली होती त्याने. ", ती म्हणाली.
"हां क्योंकी तू लड़की हैं.", तो मजेत बोलला.
"चूप ! कुछ भी ! सुन सच मैं. मैं उससें बात करती हूँ. तुझं रहायचं वगैरे काय तिथे?", तिने विचारलं.
"नहीं पता. देखता हूँ. बाकी एक दो जगह भी हैं कॉल्स.", तो बोलला.
"बरं, मी सांगते तुला अमोघशी बोलून त्याला माहित असेल तुझ्या पोस्टबद्दल. ", ती तरीही बोललीच.
त्यालाही माहित होतं ही ऐकणार नाहीये. मग त्यानंही 'हो' म्हणून सोडून दिलं.
बराच वेळ गप्पा मारुन झाल्यावर तिने फोन ठेवला. इतक्या दिवसांनी त्याच्याशी बोलून छान वाटत होतं तिला. जुने दिवस आठवत कितीतरी वेळ तिचं मन तिथेच रेंगाळलं.

---------------

अमोघ अगदीच वर्षभर सोबत होता. पण त्या दिवसांत बरीच मदत झाली होती त्याची. घरचे प्रॉब्लेम्स, रुममेटची भांडणं, तिचं शिफ्टींग या सगळ्यांत त्याने तिला मनापासून साथ दिली होती. तो हैद्राबादला शिफ्ट झाल्यावर थोडे दिवस तिला खूप एकटं वाटलं होतं. दोनेक दिवसांनी तिने त्याला फोन लावला होता. 
"हां अमोघ, रिचा बोलतेय. बिझी आहेस का?", तिने अमोघला विचारलं.
"अरे काय नशीबच उजाडलं आमचं आज. बिझी तुमच्यासाठी? मॅडम तुमच्यासाठी आपण नेहमीच रिकामे असतो. बोला काय म्हणताय?", अमोघ चेष्टेनं बोलला.
"गप रे. काय म्हणतोस? कसा आहेस? तुला तर काय माझी आठवण येत नाही. म्हटलं आपणच फोन करावा. ", ती बोलली. 
"तसं काही नाही. इथे जरा जास्तच बिझी आहे पण. कधी कधी वाटतं मुंबईला परत यावं. ", तो बोलला. 
"का रे? मला तर असंही दुसरीकडे कुठे करमणार नाही. पण तुला काय झालं?", तिने विचारलं. 
"विशेष काही नाही. तुला माहितेय मला असं पटकन लोकांशी बोलायला, मिक्स व्हायला जमत नाही. त्यात इथलं कल्चर वेगळं, जेवण, काम सगळंच. एनीवे, तू सांग. किती दिवस तिथे राहणार आहेस? रुममेट बदलली असेलच. ", त्याने विचारलं. 
ती हसून 'हो'  म्हणाली. आणि मग बराच वेळ तीच बोलत राहिली. अमोघ कमी बोलायचा आणि जास्त ऐकायचा. तीही मग आपोआप तिच्या मनातलं सगळं सांगत राहायची. मधेच तिने भाविनचा विषय काढला. खरंतर या आधीही त्याने त्याच्याबद्दल इतकं ऐकलं होतं. तरीही तो नेहमीप्रमाणे ऐकत राहिला. 

"बघशील का रे रेफरलंच?", तिने विचारलं. 
तो 'हो' म्हणाला. "त्याला हवं असेल तर त्याने चार दिवस इथे रहायलाही माझी हरकत नाही. Give him my number and let him know.", अमोघ पुढे बोलला. त्याचा स्वभाव कसा आहे हे तिला माहितंच होतं. 
"Thanks Amogh. सांगते त्याला.", ती फॉर्मल बोलली. 
"थँक्स काय? मॅडम तुमच्यासाठी काय पण !", या त्याच्या वाक्यावर ती हसली. बराच वेळ बोलून तिने फोन ठेवून दिला. अमोघशी बोलल्यावर नेहमीच हलकं वाटायचं तिला. 

---------------------------

दोनेक आठवडयांनी रिचाला भाविनचा फोन आला. 
"रिच ! पैले Congrats बोल ! ", त्याचा आवाज ऐकून तिला कळलं होतं नोकरी लागली असणार. 
"क्यों रे? शादी फिक्स कर दी क्या तेरी? तेरे पिछे पडे है घरवाले. ", तिने विचारलं. 
"चूप बे ! नौकरी लग गयी आपुन की. ", तो एकदम खूष होता. 
"अमेझॉन?", तिने विचारलं. 
"नहीं रे. वो तो नहीं हुवा लेकिन अच्छी हैं ये भी.", त्याने सांगितलं. 
मग बराच वेळ त्याचा रोल, पगार, ऑफिस सगळं सगळं त्याचं बोलून झालं. ती ऐकत राहिली. 
शेवटी शेवटी मात्र जरा सिरीयस होत तो बोलला. 
"अरे वो तेरे अमोघ से मिला था मैं. उसने बोला रेहने के लिये. लेकिन मैं रुका नै.", भाविन. 
"का रे काय झालं?", रिचा. 
"पता नहीं यार. अजीब था बंदा. एकदम सिरीयस था. मुझे हमेशा लगता था तेरेको वो अच्छा लगता हैं. इसलिये मुझे देखना भी था उसको. पर जब वो तेरे बारे में बोलने लगा ना, बिलकुल अच्छा नहीं लगा.", भाविन बोलला. 
"म्हणजे ? अच्छा मतलब?", तिचा चेहरा पडला होता. 
"मतलब तेरे बारे में रिस्पेक्ट से बात नहीं कर रहा था. तेरा आज तक कोई बॉयफ्रेंड फिक्स क्यों नहीं हुआ. तेरा वो रुममेट का पंगा चलता रहता है. सब बोल रहा था. ", तो बोलत राहिला. 
"हां त्याला माहितेय माझं  राहण्याचं नाटक झालेलं. पण तरी असं बोलणार नाही रे तो. त्यानेच तर मदत केली होती मला. " ती बोलली. 
"वो नहीं पता मुझे. लेकीन यार पता चल जाता हैं बंदा कैसा है. मुझे तो वो बिलकुल अच्छा नहीं लगा. इसलिये फिर रुका नहीं वहा.", त्याने तिला सांगितलं. तिचं खरंतर मन उडून गेलं त्या बोलण्यातलं. वाटलं, त्याला मत्सर वाटला असणार नक्कीच अमोघ बद्दल. तसाही भाविन एखाद्या लहान मुलांसारखाच वागतो. एकदा अमोघला विचारायची इच्छा झाली होती. पण हिंमत नाही झाली जाब विचारायची. इतका चांगला मित्र आपला. असं कशाला वागेल. जाऊ दे ना, त्याला विचारण्यात अर्थ नाही म्हणून दिवसभर मनात राहिलेले ते विचार तिने सोडून दिले. 

---------------------

दोनेक दिवसांत रिचाला अमोघचा फोन आला होता. तिने 'घ्यावा की नाही' विचार करत फोन उचलला. तिच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह नव्हता. आज कधी नव्हे ते अमोघ बोलत होता आणि ती ऐकत होती. 
"अगं तुझा तो मित्र भाविन आला होता. ", तो म्हणाला. 
"हां, हो का? काय म्हणाला मग?", तिने विचारलं. 
"काय म्हणणार? जरा क्रॅक आहे का तो? त्याला मी सांगितलं दोन चार वेळा 'राहायला चल' म्हणून तर आला नाही. मग आम्ही बारमध्ये भेटलो एका. मीही म्हटलं बघावं कोण आहे हा भाविन. तू तर इतकं कौतुक करत असतेस त्याचं. दारुचे दोन राऊंड झाल्यावर बोलायला लागला तुझ्याबद्दल. पण खरं सांगू तू जितकं त्याच्याबद्दल प्रेमानं बोलतेस ना त्यातलं थोडंही त्याच्यामध्ये दिसत नव्हतं. मला नेहमी वाटायचं तुमचं प्रेम आहे म्हणून. पण तुझ्याबद्दल बोलताना एक प्रकारचा तुच्छपणाच दिसत होता त्याच्या बोलण्यांत. तू काय करत असतेस, कशी वागतेस, कशी राहतेस, अजूनही त्याच नोकरीत आहेस.....  प्रेम जाऊ दे, तुझ्याबद्दल आदर वगैरेही नाहीच....... ". 

अमोघ बोलत राहिला पण तिला यापुढचं काहीच ऐकू आलं नाही. 

समाप्त.

विद्या भुतकर. 

Sunday, November 03, 2019

हा नियमच आहे

सान्वीला तिच्या होमवर्कवरुन रागावताना, मधेच स्वनिक रिकामा फिरताना दिसला तर त्यालाही ओरडले,"काय रे, झाला का अभ्यास?". 
त्यावर त्याने,"हो केव्हांच झालाय."म्हणून तितक्याच आवेशात सांगितलं. 
त्यामुळे मला जरा राग आवरता घ्यायला लागला. 
तर तो पुढे म्हणे,"दर वेळी तू एका मुलाला ओरडताना दुसऱ्यालाही रागवलंच पाहिजे असं काही नाहीये. "
म्हटलं,"बाबू, तुला माहित नाहीये का? हा नियमच आहे."
तो म्हणे,"काय रूल?"  
मी म्हटलं,"एका मुलाला आईवडील रागवत असतील तर दुसऱ्यानं मुकाट्यानं अभ्यासाला लागावं. आम्ही तरी असंच करत होतो. आजी आबा एकाला ओरडत असले की बाकी सगळे अभ्यासाला लागत होतो. त्यामुळं तू ही मला उलटं उत्तर न देता मुकाट्यानं कामाला लाग. पाहिजे तर बाबांना विचार. कळलं ना? " 

त्यानंही ऐकून घेतलं. ('असा अन्याय सहन कसा करुन घ्यायचा तुम्ही' वगैरे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतेच.) 

आजचा दिवस निपटला होता पण यापुढे मलाच जपून राहायला लागणार हे नक्की. 
:) 


विद्या भुतकर. 

Monday, October 28, 2019

दिवाळी !

        लेक मोठी व्हायला लागली. सणासुदीला तिला तयार होताना निरखून पहायला लागली होती. कधी कपडे निवडतांना सुचवू लागली.  हे चप्पल नको, तुझ्या ड्रेससोबत हे बूट्स घाल असं हक्कानं सांगायला लागली. तर कधी 'कुठल्या काळातले कपडे घालतेस गं आई?' असे टोमणेही मारायला लागली होती. तिच्या वळवून नीट केलेल्या केसांना हात लावून पाहू लागली होती. 'माझेही असेच सेट कर' म्हणून हट्ट करू लागली. कधी तिच्या ओठांना लावलेली लिपस्टिक पाहून, 'मलाही मेकअप करायचा' म्हणून रुसू लागली. आणि हे सगळं ती जवळून पाहतांना तिला मात्र एकच भीती होती.... 

          शाळेत, कॉलेजमध्ये असताना आईनं अनेकदा हे करू नको, असे कपडे नको, असं वागणं नको, बोलणं नको ऐकवलेलं, अडवलेलं. पण हेही आठवायचं की सणासुदीला आवर्जून आई तिला आवरून द्यायची. लांब केसांची छान वेणी घालून द्यायची. गौरी गणपती, सत्यनारायण पूजेला आपल्या आधी तयार करून, कधी आपलीच साडीही नेसवून द्यायची. हळदी कुंकवाला आलेल्या बायकाही, "कसं तुम्ही पोरींचं इतकं छान आवरता' म्हणून कौतुक करायच्या. दिवाळीला फराळाची धावपळ करून ड्रेस शिवायची. आणि हे सगळं असूनही तिला अनेकदा आईशी वाद घालतांना, तिने कशाला नकार दिल्यावर वाटलेलं, "तू मुद्दाम माझं आवरत नाहीस. तुला माझ्यापेक्षा जास्त छान दिसायचं असतं ना?". 

         वाढत्या वयात कधीतरी आपल्याच आईबद्दल वाटलेली असूया आणि राग अनेकदा मनात घोळलेला. तो प्रसंग खरंच घडला की आपण हे केवळ मनातल्या मनातच बोललो हेही आठवत नव्हतं. इतक्यांदा विचार केलेले ते क्षण घडले की तिच्याच मनाचे खेळ होते हेही तिला आठवत नव्हतं. आणि प्रत्यक्षात तोंडातून बाहेर पडले नसले तरीही मनात आतवर रुतलेले. आणि यातून मनात आलेली एकच भीती..... माझ्या लेकीलाही असंच वाटेल का माझ्याबद्दल.               

         हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली हे कळल्यावर गुंगीत तिने एकच वाक्य बोललेलं,"आता आपल्याला तिच्यासाठी ते क्यूट ड्रेस विकत घेता येतील." एक तो दिवस आणि आता? परवा दिवाळीला ती साडी नेसताना, दागिने घालतांना लेक पहात होतीच. म्हणाली, "मलाही लिपस्टिक लावून दे. हे गळ्यातलं घालून दे." "लिपस्टिक वगैरे लावायचं तुझं वय नाहीये अजून" या वाक्यावर लेकीनं तोंड मुरडलं. 'गळ्यात नको घालूस हे. तिथे १५ मिनिटांत माझ्याच हातांत आणून देशील." ती साडीच्या निऱ्या करत बोलली. आणि या वाक्यावर पुट्पुट कानी आली,"मला माहितेय तुला माझ्यापेक्षा छान दिसायचंय." 

         आपण अनेकदा ठरवतो 'हे असं झालं तर मी अशी वागणार. असं बोलणार. अजिबात रडणार नाही. वगैरे वगैरे' . आणि तरीही लेकीचे शब्द ऐकून ती निऱ्या सोडून थबकली. आजवर त्या आईला बोललेल्या/न बोललेल्या वाक्यांचं ओझं डोक्यावर जड झालं. गळा दाटून आला आणि ती बोलली," तुला माहितेय मीही अशीच माझ्या आईला बोलले होते. खूप वाईट वाटलं होतं तिला. आणि मला आजवर वाईट वाटतं की तुझ्या आजीला मी असं बोलले. कारण ती नेहमीच मी छान दिसावं, राहावं म्हणून प्रयत्न करायची. तुझ्यासाठी मीही अनेक गोष्टी करते. तू माझी लेक आहेस. तुला खरंच वाटतं का मला असं वाटत असेल? ". लेक थांबली, मग थोडी शरमली, नरमली आणि हसली. राहील का तिच्या लक्षांत माझ्यासारखंच अनेक वर्ष? काय माहित. पण तिला ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. आईला सांगायची हिम्मत झाली नाही निदान लेकीला तरी सांगू शकली म्हणून. 

विद्या भुतकर. 


Wednesday, September 25, 2019

What made you smile today?

       आज दुपारी फोनमधले फोटो चाळत बसले होते. (हो, मी असलेही उद्योग करत बसते, रिकाम्या वेळात.) यावेळी भारतात असताना काढलेल्या अनेक फोटोंमधला एक फोटो पाहिला आणि छान वाटलं. तो फोटो पोस्ट करावा म्हटलं आणि त्याचं टायटल सुचलं, "This made me smile today." 
         मागच्या वर्षीपर्यंत रोज ट्रेनने प्रवास करत होते तेव्हा अनेक छोट्या गोष्टी पाहून असं वाटायचं. कधी ट्रेनमधलं एखादं पोस्टर, एखादं प्रेमात चाळे करणारं तरुण जोडपं तर कधी बाबासोबत डाउनटाउनला जाऊन परत घरी निघालेलं, दमलेलं छोटं मूल. आणि या अशा अनेक गोष्टी पाहून वाटायचं, "This made me smile today." आज फोटोला टायटल देताना हे आठवलं. होतं काय की दिवसभरात एखाद्या गोष्टीवरुन वैताग आला, चिडचिड झाली, दिवस अख्खा खराब गेला याची अनेक कारणं असू शकतात, असतात. पण हे असं हसवणारं, हसू खुलवणारं एखादंच. पण ते जाणवून घेतलं पाहिजे. नाही का? नाहीतर, असे अनेक क्षण येऊन निघूनही जातात आणि आपण त्या एका खराब गेलेल्या मीटिंगचाच विचार करत बसतो. 

खरंतर, उगाच 'ग्यान' देत बसत नाही, मला काय म्हणायचंय ते कळलं असेलच. 

तर आज इतरांनाही विचारावंसं वाटलं, "What made you smile today?"

विद्या भुतकर. 

Wednesday, September 18, 2019

गिलहरियाँ

       या महिन्यांत पोरांची शाळा सुरु झाली. सुरु झाली एकदाची !  तीनेक महिन्यांच्या सुट्टीनंतर आम्ही सुटलो. खरंतर इथे नवीन वह्या-पुस्तकं, युनिफॉर्म या कशाचंच कुणालाच सोयरं सुतक नसतं. तरी मी आणि नवरा आपलीच शाळा सुरु झाल्याच्या उत्साहात असतो. तीनेक आठवड्यांपूर्वी, 'युनिफॉर्म नाहीत तर निदान नवीन चार कपडे तरी घ्यावे' म्हणून रविवारी दुपारी बाहेर पडलो. त्याच दिवशी स्वनिकने नवीन टुमणं सुरु केलेलं. या पोरांना रोज मागे लागायला काहीतरी कारण कसं मिळतं? त्याला कुठलातरी व्हिडीओ गेम हवा होता. आम्ही घेणार नाही ही खात्रीच त्यामुळे 'दोन महिन्यांनी वाढदिवसाला तरी घ्या असं' आतापासूनच सुरु केलं होतं. नेहमीप्रमाणे या सगळ्याकडे 'वेळ येईल तेव्हा बघू' म्हणून मी दुर्लक्ष करतच होते. 
      तर मी काय सांगत होते? हां, आम्ही कपडे घ्यायला बाहेर पडलो आणि स्वनिकने बोलायला सुरुवात केली,"आपण असं करू शकतो का? आपण घरातले काही विकू शकतो." 
घरातल्या वस्तू विकायच्या म्हटल्यावर मात्र मी कान टवकारले, "म्हटलं काय विकणार? "
स्वनिक,"आमचे जुने toys विकू शकतो."
आणि इथेच माझी वाद घालायची खुमखुमी जागी झाली. 
मी,"म्हणजे एकतर मी तुमच्यासाठी खेळणी घ्यायची. ती तुम्ही खेळणार नाहीच. शिवाय आपण १० डॉलरला घेतलेलं खेळणं तू  समजा  ५ ला विकलंस, तरी ५० टक्के नुकसानच ना?". 
हे त्याला पटलं. 
त्याने दुसरा पर्याय सांगितला," मग आम्ही तुमच्यासाठी काहीतरी काम करतो. Like getting plates for dinner, clean-up, अशी. आणि तुम्ही आम्हाला पैसे द्या."
मला मजा यायला लागली होती. 
म्हटलं,"बाबू ही कामं तर तुम्ही घरी राहता म्हणजे केलीच पाहिजेत. तुम्ही मदत केली तर त्यासाठी पैसे का द्यायचे?". 
माझ्या या युक्तिवादावर तो वैतागला. चिडून म्हणाला,"मग आम्हाला कसे पैसे मिळणार? मी काय तुमच्यासारखा जॉब पण करू शकत नाही. "
मला जरासं वाईट वाटलं. त्याचं म्हणणं बरोबर होतंच. I could understand his frustration. इतक्यात कपडे घ्यायला जाणार ते दुकान आलं. पण विषय सोडून जाता येणार नव्हतं. इतक्या वेळ गप्प असलेल्या नवऱ्याने  यावर थोडी फिलॉसॉफी सांगण्याचा प्रयत्न केला. 
तो म्हणाला,"हे बघ, तुम्ही काही चांगलं काम करता ना तेंव्हा ते आमच्या हार्टच्या गुड अकाउंट मध्ये जातं. तुला त्यासाठी पैसे मिळवायची गरज नाही. फक्त चांगलं काम करा." 
आता यातलं आमच्या पोरानं फक्त कामाचं ऐकलं. तो म्हणे,"हां आपल्याकडे मनी बँक आहे. त्यात पैसे जमवू." 
पैसे हातात द्यायची इच्छा नसल्याने मग आम्ही फक्त चांगल्या कामाच्या चिठ्ठ्या त्यांच्या बरणीत टाकायचं ठरवलं. आता हा संवाद दुकानात पोचला होता. कुठल्या रंगाची आणि आकाराची पँट त्याला बसते हे बघत असताना, मधेच याचं सुरु होतं. 
"माझे आणि दीदीचे पॉईंट एकत्र करायचे. गेमसाठी ५८ लागतील, मग फक्त २९-२९ मिळायला हवेत.  "
मी, "का पण? दीदीला व्हिडीओ गेम नको असेल तर? तिला दुसरं काही हवं असेल तर? "
तो,"ओके आपण दीदीचं अकाउंट वेगळं करू पण आम्ही आम्हाला पाहिजे तर एकत्र करू शकतो. "
मी,"बरं."
तो,"पण ५८ पॉईंट झाले की लगेच गिफ्ट घ्यायचं. बर्थडे ची वाट बघायची नाही." असं आमचं negotiation चालूच होतं. 
मधेच नवरा,"बस की, बच्चे की जान लोगी क्या?" वगैरे कमेंट टाकत होता. चार कपडे घेऊन घरी परत आलो. आता इतकं ठरलं होतं की 'चांगलं काम केलं की पॉईंट मिळणार'. मग चांगलं काम म्हणजे काय? घरी आल्यावर दप्तर जागेवर ठेवलं, डबा धुवायला टाकला, १ पॉईंट. होमवर्क न सांगता केलं, १ पॉईंट, पियानो प्रॅक्टिस, कराटे प्रॅक्टिस एकेक पॉईंट. गणिताचे दोन पॉईंट... असं करत गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरात पॉईंट्सनी धुमाकूळ घातलाय. पोरांनी एक चार्ट बनवला आणि त्यावर आम्हाला विचारुनच पॉईंट्स लिहिले. 

      दीदी मोठी असल्याने आणि तिचा या सिस्टीम (आणि आईबाबांवर) अजिबात विश्वास नसल्याने ती फारसा उत्साह दाखवत नव्हती. स्वनिकने मात्र स्वतःच काम शोधून 'मी सर्वांचे शूज आत ठेवले तर पॉईन्ट मिळेल का? ' वगैरे कामही करून टाकली. आता उद्यापर्यंत त्याचा हा तक्ता पूर्ण होईल. तर त्यांचं असं ठरलंय की या दोन तक्त्यांचे पॉईंट घेऊन व्हिडीओ गेम आणू आणि पुढचा तक्ता पुस्तकांसाठी ठेवू. 'खरंच हे पूर्ण केलं तर आपली आवडती पुस्तकंही विकत घेता येतील' या कल्पनेनं दीदीही एकदम आनंदात आहे. त्यांचा ठरवलेलं काम पूर्ण  करत असल्याचा आनंद,  आईबाबांच्या मागे लागण्याची चिकाटी, पुढेही काय काय करु शकतो याचा विचार आणि उत्साह पाहून मलाही आता ही अशीच सिस्टीम माझ्यासाठी बनवायची इच्छा होतेय. समोर एक ध्येय ठेवायचं, ते पूर्ण करायला कष्ट करायचे. ते पूर्ण झालं की नवीन ध्येय ..... 

विद्या भुतकर. 

Monday, July 29, 2019

रिज्युम

      माणसाला कधी आपण किती क्षुद्र आहोत हे जाणवून घ्यायचं असेल ना तर त्याने रिज्युम लिहिला पाहिजे. मग तुम्ही नवीन कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण असा किंवा कितीही वर्षांचा अनुभव असलेले. एक कागद आपल्याला किती पटकन वास्तवात आणू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला रिज्युम. आजवर मी  इतके प्रकारे आणि इतक्या तऱ्हेने, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर रिज्युम लिहिलेले आहेत की फक्त रिज्युमच्या फॉरमॅटचंच एक पुस्तक छापून झालं असतं. (ही जरा अतिशयोक्ती झाली म्हणा, तरीही.) प्रत्येकवेळी मला वाटायचं की, 'अरे आपण नवीनच आहोत अजून. काहीतरी चुकतंय, काहीतरी कमी पडतंय.' पण परवा '१७ वर्षं' लिहितानाही तसंच वाटलं आणि म्हटलं हे दुखणं काही जाणार नाही, ते आता कायमचंच.
      खरंच, इथे ब्लॉग, गोष्टी वगैरे लिहिण्यापेक्षा रिज्युम कसा लिहायचा हे शिकले असते तर पोटापाण्याचा प्रश्न मिटला असता. सिरियसली, आपलं आख्ख आयुष्य दोन-चार पानांतच कसं काय लिहिणार? बरं तेही असं की समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की 'अरे काय भारी आहे रे हा माणूस! आपल्याला अशाच माणसाची गरज आहे कंपनीत.' दुसऱ्या माणसाच्या हातातले ते पहिले पाच सेकंद ठरवणार आपलं आख्ख दोन चार पानांवर लिहिलेलं आयुष्य चांगलं कि वाईट?  
       बरं प्रयत्न करायला हरकत नाही, काहीतरी भारी लिहिण्याचा स्वतःबद्दल. इकडून, तिकडून ढापून लिहा हवं तर. पण या दुखण्याचं मुख्य लक्षण हे की तुम्ही दुसऱ्या कुणाचा रिज्युम पाहिलात की तो एकदम भारी वाटेल. आणि तोच, तसाच आपला लिहिला तर एकदम फालतू. खरं सांगायचं तर कॉलेज मध्ये , किंवा त्यानंतर पहिले काही वर्षं रिज्युम लिहिला तेंव्हा कदाचित इतका विचार करायचे नाही मी. कदाचित आपण आपल्याबद्दलचे गैरसमज वागवत फिरत असतो ते सर्व आपोआप त्या कागदावर उतरत जातात. पण जसं वय वाढेल तसं 'आपल्यापेक्षा जगात कितीतरी भारी लोक आहेत.' हे कळलं की संपलं ! कितीही चांगली technology, certifications, college, नोकऱ्या सगळं एका कागदावर मांडलं तरीही जे त्यांत नाहीये याची जाणीव वयासोबत आलेली असते. मग ती कॉलेजमधली आक्रमकता आपोआप कमी होते आणि अजूनच क्षुद्र वाटायला लागतं. 
       कधी वाटतं की नुसत्या कागदावर कसं कळणार तो माणूस कसा आहे ते? आपण किती बदलत गेलेले असतो, कॉलेजपासून वय वाढेल तसे. मग मी काय करते एकदम कोरी पाटी करते. ब्रँड न्यू डॉक्युमेंट ओपन करायचं आणि मोठ्या जोमाने सुरुवात करायची. आणि तिथंच सगळं चुकतं. स्वतःबद्दल पहिल्या दोन ओळी लिहितानाच हात थांबून जातो. 'मी काय आहे?', 'मी कोण आहे?', 'माझं आयुष्यात ध्येय काय आहे?' असे गहन प्रश्न पडायला लागतात. म्हणजे एखाद्याला ध्यानधारणा करुनही असले प्रश्न पडणार नाहीत जे त्या पहिल्या दोन ओळी लिहिताना पडतात. मग पुढे येते 'स्किल्स समरी'. शाळेपासून आजवर इतकं शिकलो, इतका अभ्यास केला, निरनिराळे उद्योग केले. पण 'स्किल' म्हटलं की वाट लागते. वाटतं आपल्यापेक्षा कितीतरी हुशार लोक आहेत या क्षेत्रात, मग आपलं स्किल ते काय? 
      जसं जसं प्रोजेक्टबद्दल लिहायला लागू तसं एकदम स्मृतीभंश झाल्यासारखं होतं. कितीतरी वेळा उशिरापर्यंत थांबून, शनिवार-रविवारी, कधी रात्री सपोर्टचे कॉलही घेतले असते. पण हे सगळं 'चांगल्या' शब्दांत कसं लिहिणार? उशिरापर्यंत थांबलात म्हणजे कोडिंग येत नव्हतं की प्लॅनिंग चुकलं होतं? की स्कोप बरोबर नव्हता?आयला हजार भानगडी. मुख्य म्हणजे जसं वय वाढेल तसं पानांची संख्या वाढायला लागते. तेही चालत नाही. सगळं दाटीवाटीने दोनेक पानांत बसलं पाहिजे. मग शब्द शोधा, त्यांचे अर्थ शोधा, ते योग्य जागी वापरा. आणि हे सगळं करुन समोरच्या माणसाला ते कळायलाही हवं आणि तरी भारी वाटायला हवं. इतक्या त्या अटी. गंमत म्हणजे, शाळा, कॉलेज आणि ज्यात ऍडमिशन मिळवण्यासाठी, पास होण्यासाठी मारामारी केलेली असते ते सगळे दिवस फक्त एका ओळीत संपून जातात. पहिली नोकरी, त्यातले मित्र-मैत्रिणी, अनुभव, प्रत्येक ठिकाणचा पहिला दिवस, शेवटचा उदास दिवस, या सगळ्या फक्त तारखा बनून जातात आणि नावांच्या पाट्या. 
       तर असा हा रिज्युम. बरं हा फक्त नोकरीसाठीचा झाला. लग्नाच्या कागदावर यातले संदर्भ अजूनच फिके होत जातात. तिकडे दुसऱ्याच गोष्टींना महत्व दिलं जातं. तिथे नोकरी म्हणजे फक्त एक आकडा असतो आणि फारतर लोकेशन. एकूण काय सर्व हिशोब हे असे कागदावर मांडायचे म्हणजे घोळच नुसता. ते सिमेटरी मध्ये लिहितात ना प्रत्येकाच्या नावासमोर, 'Daughter of, Wife of , Mother of' ती शेवटची समरी आयुष्याची आणि जन्म व मृत्यूची तारीख. या दोन तारखांच्या मधलं आयुष्य कुठे लिहिणार? 

विद्या भुतकर.