Tuesday, May 24, 2016

Have we stopped trying?

        काल आमच्या पुण्यातल्या शेजारच्या काकू आम्हाला इथे भेटल्या, अमेरिकेत मुलाकडे आलेल्या. अगदी जायच्या एक दिवस आधी का होईना त्या आल्या. अगदी थोडा वेळ का होईना आमच्याकडे थांबल्या आणि साधं का होईना जेवण आम्ही एकत्र केलं. :) त्यांचे आम्हाला भेटण्याचे प्रयत्न पाहून मला छान वाटलं. जुन्या काळची आठवण झाली जेव्हा लोक केवळ 'या गावावरून जात होतो' म्हणून आठवणीने भेटायला यायचे. त्यांच्यासाठी घाईने केलेलं जेवण, त्या छोट्या भेटी, या गोष्टींची किंमत आता कळते, नाही का? रोज फेसबुकवर दिसणारे मित्र एकाच गावात असले तरी भेट होत नाही. परगावाहून किंवा परदेशातून येऊनही लोकांच्या एका गावात भेटी होत नाहीत.अजूनही कित्येकदा आपण आपल्या आई-बाबांना म्हणतो की नाही की,"तुम्ही कशाला आता हे मधेच काढताय? " . हेच ते, जे ते लोक अजूनही करत राहतात आणि आपण मात्र 'कशाला?' म्हणून प्रयत्न सोडून देतो. 
           अनेकदा कुणी असं गावात आलं असेल तर त्यांना वेळ नाही असं तरी कारण असतं किंवा आपल्याला त्यांना भेटायला जायचा वेळ नसतो. या अशा भेटी रोज होत नसतात. मग एखाद्या दिवशी आपल्या रोजच्या कामातून जरा वेळ काढायलाही आपल्याला का जमत नाही? बरं भेटायचं जाऊ दे, फोन करणे, मेसेज करणे याही गोष्टी शक्य का होत नाहीत ? खरंच आपण इतके बिझी झालोय का? की आपण प्रयत्न करायचे बंद केले आहे? Have we stopped trying?   मी पुण्यात असताना अनेक वेळा मैत्रिणींशी भांडले आहे की, उद्या आपण सगळे एकाच गावात असू याची खात्री नाही. त्यामुळे आता वेळ आहे तोवर खूप वेळा भेटून घेऊ. आज त्या भेटी आठवल्या की त्यासाठी केलेली सर्व भांडणं योग्य होती असं वाटतं. खरंच जर उद्या आपल्याला अशी भेटायची संधी कदाचित मिळणार नाही किंवा आता अशी संधी मिळत आहे तर आपण आपले पूर्ण प्रयत्न केलेच पाहिजेत असं आपल्याला का वाटत नाही? आपण खरंच खूप काही गृहीत धरतो का?
           हीच गोष्ट आता एखाद्यासाठी काही विशेष करण्याची आहे. आपले आई-वडील किंवा मामा -मावशी वगैरे अजूनही आपल्या लहानपणीच्या आवडी काय होत्या त्या लक्षात ठेवून तसं काही करण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्याकडून तितके मात्र होत नाही. होत नाही म्हणजे काय ? तर त्या ठराविक गोष्टीसाठी केले पाहिजे तितके प्रयत्न करत नाही. माझ्या ग्रुपवरच्या काही मैत्रिणी आहेत. कितीही सांगितले तरी दोन शब्द बोलत नाहीत ग्रुप वर. आणि सोशल मिडिया, फोन यांची सवय काही खूप चांगली आहे असं नाही.  पण जवळच्या मैत्रिणी म्हणून आठवड्यातून एकदा तरी मेसेज करूच शकतो ना? आणि त्यानंतर मग कारणे सांगण्यात वेळ जातो. आणि हो हे सर्व मी दुसऱ्या कुणाला असे उद्देशून बोलत नाहीये. यात माझा स्वत:चाही दोष आणि सहभाग आहे. मीही अनेकवेळा आळस केला आहे किंवा अजून थोडे प्रयत्न केले असते तर चालले असते असे वाटते. 
        कालच्या भेटीमुळे अनेक विचार मनात आले त्यावरून हे लिहिलेलं. :) आता या सुट्टीत माझे पूर्ण प्रयत्न करायचं ठरवलं आहे. बघू काही फरक पडतो का? 

विद्या भुतकर.

No comments: