Thursday, May 05, 2016

Important thing is.....

         काल सानूच्या शाळेत मिस्टरी रीडर म्हणून गेले होते. आता ते काय असतं? तिच्या वर्गात पालकांनी जाऊन अर्धा तास कुठलेही २-३ पुस्तके वाचायला जायचे. त्या मुलाला माहित नसणार की आज आपले कुणी शाळेत येणार आहे. त्यामुळे समोर आपल्या आई-बाबा किंवा आजी आजोबाना पाहून त्या त्या मुलांना नक्कीच आंनद होत असणार. शाळा सुरु होऊन आता वर्ष होत आलं तरी आम्ही काही गेलो नव्हतो. एक तर सोमवार ते शुक्रवार मध्ये कधीतरी दुपारी १-२ वाजता काम सोडून कसे जाणार? त्यामुळे काही होत नव्हतं. आणि गेल्या काही महिन्यापासून सानूने विचारायला सुरुवात केली होती अर्थात तिचे तरी काय चुकीचे होते? प्रत्येकवेळी तिला वाटायचे की आपले आई बाबा कुणीतरी येतील आणि प्रत्येकवेळी निराशा झाली असणार. आपली मुलं कितीतरी अशा निराशा असूनही इतकी आनंदात राहतात नाही का? 
        शेवटी यावेळी ठरवून गेले शाळेत. दुपारी पोचले तर मुले वर्गात नव्हती. ती आल्यावर सर्व एकदम माझ्याशी बोलायला लागले. सान्वी खुश होतीच. एका मुलाने तिला एक खुर्ची आणून दिली. म्हटले या छोट्या खुर्चीत बसायचे मी? तर माझ्यासाठी मोठी आणि सानूसाठी छोटी अशा दोन खुर्च्या होत्या. आम्ही दोघींनी मिळून वाचायचे होते. तिला नक्कीच खास वाटत असणार. मी आपली घरातली त्यातल्या त्यात छोटी दोन तीन पुस्तकं घेऊन गेले. आम्ही वाचायला सुरु केले पण मधेच एकाने बोलायला सुरुवात केली,'आम्ही एकदा माझ्या काकांकडे जेवायला गेलो तर तिथेही मी जादू पहिली आहे.' म्हटले, बरं. आम्ही वाचत होतो, त्यात एकाने विचारले आम्हाला चित्र दिसत नाहीये. मग मी पुस्तक तिरकं करून वाचू लागले. चुकून एक जरी पान राहिलं तर ते मला चित्र दाखवायला सांगत होते. सानुचे काही शब्द चुकत होते. मी ठीक करून पुढे सांगत होते. 
        थोडा वेळ झाला आणि मुलांनी वळवळ करायला सुरुवात केली. म्हटलं यांना बोअर होतंय वाटतं म्हणून आम्ही एक chapter नंतर दुसरे पुस्तक सुरु केले. त्यातही बडबड चालूच होती. सानुने त्यांना मध्ये शुक शुक केले, टीचरने शांत बसायला सांगितले. कसेतरी एकेक पान पालटत आम्ही शेवटच्या पानावर आलो आणि बेल वाजली. घाईतच ते पान वाचून आम्ही संपविले. आमची वेळ संपली होती, सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सुट्टी झाली. घरी येताना सानू म्हणाली,'आई तू पुस्तक का बदललेस?'. मी म्हटलं,'अगं तुझ्या चुका होत होत्या. ती मुलंही हालचाल करत होती. मला वाटलं सर्वांना बोअर होतंय. म्हणून बदललं.' तर म्हणाली,' अगं ते सर्व असंच करतात. तू कशाला बदललेस? मध्ये मध्ये उठतात किंवा पाणी पितात. बरं असू दे, Important thing is you came. And thats what matters. I am very happy." तेंव्हा मला जाणवलं, त्या मुलांना किंवा टीचरला काय वाटलं याने मला काहीच फरक पडायला नको होता. महत्वाचं होतं की सानूची इतक्या दिवसाची इच्छा पूर्ण झाली होती. :)
         कधीकधी आपणही नको त्या गोष्टींवर इतका विचार करतो की त्याच्याहून महत्वाचं काय होतं हे लक्षातच येत नाही. होय न? :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: