Thursday, September 15, 2016

हट्ट आणि हक्क

        मी पुण्याला जायचे म्हणल्यावर आधीच बऱ्याच मित्र-मैत्रिणींना सांगून ठेवले होते मला काय काय खायचे आहे. त्या यादीमध्ये दुकानातून आणलेले, बाहेर जाऊन खायचे आणि खास घरी बनवलेले  असे सर्व पदार्थ होते. त्यामुळे आम्ही पोचलो त्याच दिवशी सगळ्या भेटायला आल्या तेव्हा माझ्यासाठी जिलेबी आणली होती, वडापाव आणले होते. उगाच भेटल्यावर ही आधी विचारेल 'जिलेबी कुठाय?' म्हणून आधीच सर्व घेऊन आल्या होत्या. :) मग काय पुढचे ५-७ दिवस पुरवून पुरवून खाल्ली. मैत्रिणींशी बोलत असतानाच आमचे अजून एक शेजारी मित्र येऊन गेले. तिथे मग पुण्यात कुठली 'जिलेबी' फेमस आहे यावर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मग त्या 'फेमस' दुकानातून अजून जिलेबी आणि सामोसेही आणले. :) एकूण काय आल्या आल्याच माझी चंगळ चालू झाली होती. :)
      मी आमच्या शेजारच्या काकूंनाही सांगून ठेवले होते की त्यांच्या हातचे चिकन, दाबेली हे सर्व खायचे आहे. श्रावण सुरु होत होता त्यामुळे त्यांनी लवकरच बेत ठरवून चिकन आणि कोंबडीवडे केलेही. मध्ये थोडे दिवस जमले नाही पण त्यांनी स्वतः विचारून दाबेलीचा बेत ठरवून तो पार पाडला. (दाबेली वरून आठवलं, तो मसाला आणायचा राहिलाच ! :( ) असो. तर त्या दिवशी नेमका लाईट गेले होते दिवसभर. पण तरीही जमेल तशी तयारी करून सुरुवात केली आणि नशिबाने लवकरच लाईट आले आणि मस्त दाबेली खायला मिळाली. कुणाकडे पाणीपुरी, चिकन हे सर्व झालेच. एका मैत्रिणीची ईद चुकली होती तर शीरखुर्मा बनवला आणि बिर्यानीही. एका फॅमिली सोबत छोटीशी ट्रिप काढून वडापाव, सँडविचेस हे सर्व खाऊनही झाले. आता हे सर्व लिहायचा हेतू सर्वांना जळवण्याचा नाहीये तर त्या गोष्टी परत परत आठवण्याचा आहे. :)
      कितीही झाले तरी बऱ्याचशा गोष्टी राहूनही गेल्या. त्या आता पुढच्या ट्रिप मध्ये आधी खाऊन घेणार. :) पण खरंच घरात तुम्ही स्वतः जर मुख्य जेवण बनवणारी व्यक्ती असला तर नेहमी असे वाटते, 'स्वतःच्या हातचं खाऊन कंटाळा आलाय'. विशेषतः मला दोन्ही मुलांच्या प्रेग्नसीत वाटायचं, कुणी तरी छान जेवण आयतं बनवून द्यावं. आणि त्यात हट्टाने मागून घेता आलं तर अजूनच उत्तम. पण अशा खूप कमी संधी येतात इथे. अर्थात ज्या मिळतात त्या मी सोडत नाही, तरी...बरं इथेच नाही एकूणच, घरातील मुख्य जेवण बनवणारी व्यक्ती, जी जास्त करून स्त्रीच असते, तिला तिच्या हातचं खाऊन कंटाळा येतोच. अशा वेळी कुणी हक्काची मित्र-मैत्रीण जे असे आपले हट्ट पुरवतील असे असतील तर किती सुख आहे ना?
       मुलांच्या बाबतीत, त्यांना आई-सासू यांच्याकडून नेहमीच कौतुक केलं जातं किंवा आग्रहाने त्यांची आवड पाहिली जाते. शिवाय बायको आहेच. :) पण आपल्याला तसे मर्यादितच पर्याय असतात. माहेरी जेव्हा जाईल तेव्हा मिळणार, सासरी हट्टाने मागून काही करून मिळेल असं सासर असेल तर उत्तमच, पण प्रत्येकालाच ते मिळतं असं नाही. (सासूबाईंनी आमच्यासाठी शेवभाजी करून दिली होती. :) ) हे झाले दोन पर्याय. तिसरा म्हणजे नवरा खुद्द. जेवण बनवता येणारा आणि बनवण्यात पुढाकार घेणारा नवरा असेल तर मग बासच !! पण आजकाल सासर माहेर दोन्हीही जवळ नसेल आणि असले तरी आपल्या जवळच्या मैत्रिणीकडे हक्काने मागणे यात एक वेगळीच आपुलकी असते. नवराही जेवण बनवणारा नसेल तर मग हे असे मित्र मैत्रिणी देवासारखे वाटतात. होय ना? मुख्य म्हणजे हे इतके हक्काने मागण्याइतके सर्वच लोक प्रिय असतात असं नाही. त्यामुळे ज्यांना आपण हक्काने विचारू शकतो ते नक्कीच जवळचे असतात. आणि मला असे मित्र-मैत्रिणी, शेजारी आहेत याचा खूप आनंदही आहे. :) 
       कितीही जुने वाटले तरी मला हे विचार अजूनही पटतात की, कुणासाठी तरी आवडीचे जेवण बनवणे, हक्काने बनवून घेणे किंवा एखादा असा हट्ट पुरवणे ही एक प्रेम व्यक्त करण्याची रीत आहे. आणि आजही ती तितकीच प्रिय आहे. होय ना? आता माझ्या कडून कुणाला हक्काने काही हवं असेल तर तेही बघावं लागेल ही गोष्ट वेगळी. पण मला असं खायला मिळणार असेल तर, मी त्यासाठीही तयार आहे. :)


विद्या भुतकर.

No comments: