Thursday, September 22, 2016

दोन फाटे

कधी कधी जवळच्या व्यक्ती नकळत दुरावतात. जसे आपण नवीन आधार शोधतो, तसेच त्यांनाही नवीन कुणीतरी मिळून जातंच. पण म्हणून जुन्या आठवणी इतक्या सहज थोडीच जातात? 
 

दोन फाटे कधी फुटले कळलंच नाही 
एका रस्त्यावरुन जाताना 
अचानक जाणवलं, आपलं काहीतरी हरवलंय 
खूप दूरपर्यंत येताना. 

ते वळणही दिसेनासं झालंय 
मागे वळून पाहताना,
जिथे आपण दुरावलो होतो 
नव्या मार्गावरून जाताना. 

या नव्या गर्दीत 
इव्हढं मात्र नक्की कळलंय,
कुठेतरी, काहीतरी चुकलंय
एकमेकांना समजून घेताना. 

आज असं वाटतंय 
नव्या दिशा, नव्या आशा 
नवे सोबती मिळाले 
नवे अनुभव घेताना. 

 पण हे सर्व अनुभवताना 
कधीतरी आठवण येते 
त्या जुन्या वळणाची,
आपल्या पहिल्या भेटीची. 

प्रश्न पडतो मनाला,
तुला येईल का अशी 
कधी माझी आठवण 
तू इतरांसोबत जाताना?

विद्या भुतकर. 

No comments: