Thursday, May 11, 2017

पक्याचा मोबाईल- भाग १

       दोन हातात पाच पाच किलोच्या कापडी पिशव्या धरून माय खोलीवर आली. तिच्या हाताच्या गट्ट्यानाही गट्टे पडले असतील. मालकीणबाईंच्या घरातून रेशनिंगचे तांदूळ, ज्वारी, डालडा घेऊन यायचं म्हणजे लै वैताग यायचा तिला. एकतर दरासाठी घासाघीस. मग वजनात काटछाट आणि हे सगळं कमी का काय म्हणून त्यांच्या बागेतलं गवतबी काढायला लागायचं. घरी येऊन भाकरी करंस्तोवर जीव घाईला यायचा. पोराला पन आवडायचं नाय तिनं त्यांच्याकडनं आणलेलं. "घरची ज्वारी असताना त्याला काय सोनं लागलंय का?" तो तिला विचारायचा. घरची ज्वारी न्हाई म्हटलं तर चार पैसं जास्त द्यायची. राशनची कदी खडा कुडा असला तर काढून साफ करून घ्यायची पन दर तरी कमी असायचा. 'तेव्हढंच चार पैसं जमत्यात, तुला नाय कळायचं', तिने अनेकदा पोराला समजावलं होतं.
        खोलीत आली तर अंधारबुडुख सगळा. पक्या अजुनपन आला नव्हता. 'मुर्दा बसवला त्याचा, नुस्ता गावभर बोंबलत फिराय पायजे' मनातल्या मनात त्याला एक शिवी दिवून तिनं दिवाबत्ती केली. देवाजवळ हात जोडलं आन कामाला लागली. स्टो पेटवला तर नीट लागंना, शेवटी पिन मारून जरा घाण काढली आन मग कसा विस्तू पेटला. डब्याच्या तळाशी असलेलं ज्वारीचं पीठ परातीत घिऊन मळून त्राग्यानं दोन चार भाकरी थापल्या. 'आला की लगी जेवाय मागंल आन जनावर गत गपागप खयील' तिच्या डोक्यातला राग वाढतच होता. आजून जरा उशीर झाला तर त्याला भाकरीच्या जागी तिचं पायतानच खायला लागनार हुतं. त्याच्या नशिबानं तो टपकला. धाडकन दार उघडून डायरेक ताट घिऊन जेवाय बसला. समोरच्या पातिल्यातली आमटी वाटीत घेतली आन भाकरी मोडून सुरुवात केली. माय त्याच्याकडं बघतच बसली. त्याच्या काटकुळ्या बारीक अंगावर मांस कधी चढायचं? केसं तर कोंबडीच्या खुराड्यागत झाली होती. आला तसा दहा मिन्टात तीन भाकरीचा त्यानं फडशा पाडला.  

"जरा दमानं खा की. कुत्रं मागं लागल्यागत का खायल्यास?", त्याची भूकभागल्यावर तिनं रागानं विचारलं. 

"मला रातच्या पिच्छरला जायचंय पोरं वाट बघायलीत." त्याने ताट तसंच टाकलं. मोरीत हातावर उगा पानी घेतल्यासारखं केलं आन पायतान घालून निघायला लागला. आता मात्र मायेचा पारा चढलाच. भाकऱ्या सोडून तशीच उठली आन त्याला शर्टाला धरून तसाच आत खेचला. माय इतक्या रागात आल्यावर आपलं काय खरं नाय हे त्याला बी ठाव होतं. 

"अगं असं काय करायलीस? ९ चा शो हाय. स्टार्टींन बुडल माजी.", पक्या बोलला तशी खाडकन त्याच्या गालावर एक बसली. 

"मी हितं जीव घायकुतीला इस्तवर काम कर्तो आन तू पिक्चर बघ मेल्या. कितींदा म्हनलं कामावर ये, नायतर शेतावर बघ, तुला काय पन करायला नकु. आन वर पिच्छर्ला पैसं कोन देतंय तुज्या?"

"अमल्या देतुया तुला नाय मागनार" तो वैतागून बोलला. 
त्याच्या शर्टावरचा हात अजून तसाच होता तितक्यात बाहेरनं शिट्टी ऐकू आली. तसं त्याला राहवना. 

"आजचा दिवस जातो. परत काय म्हनशील ते कर्तो." त्यानं विनवणी केली. पन आज माय लैच चिडली हुती. 

"तुला शिकायला पाठवला तर नुसतं दिवसभर हुंदडत असतुस. त्या पुस्तकाच्या पैशापारी लोकांची कामं करायला लागत्यात मला पन तुला त्याचं काय बी पडलं नाय." तिच्या शब्दाचा मार चालूच होता. तिकडं अजून एक शिट्टी आली आन त्यानं मान सोडवून घेतली आणि धावत सुटला. रागानं माय थरथरली.

"तू घरी कसा येतुस बगतो", जोरात वराडली. 

तिला रागानं उभं राहवना मग मट्कन बसली बराच येळ डोक्याला हात धरून. समोर भाकरी आमटी पडलेली पन भूक बी गायब झाली. तसंच तांब्याभर पानी पिऊन ती लवंडली. रात्री कधीतरी पक्या हळूच दार उघडून आत आला. तिला कांबरून घातलं आन तिच्याशेजारी झोपून गेला. 

सकाळी मायला जागा आली तर पक्या उठून चार घागरी पाणी आणून बादल्या भरून ठेवत हुता. त्यानं स्टो पेटवून तिच्यासाठी पानी गरम केलं, अंघोळबी झालेली. तिला काय कळंना हे काय चाललंय. 

ती उठून बसलेली दिसली तसा पक्या तिच्याशेजारी बसला म्हनला,"माये चुकलं माझां काळ रातच्याला. उगा तुला तरास दिला परत असं नाय करनार, तुजी शप्पत.". 
तीबी सकाळी कशाला उगा चिडायचं म्हनून गप बसली. 
"बर जाऊ दे" म्हनाली. 
तिनं चूळ भरून चा ठेवला. त्यानं बशीतनं चहा सुरुक्कन वडला. तिच्याकडं बघत हळूच म्हनला,"माय मला एक मोबाइल पायजे." 
"काय?" तिनं तसा मोबाईल पायला हुता पन हे काय आपल्यासारक्याचं काम नाय हे तिला पुरतं ठावं होतं. 
"ही असली थेरं कराय पैका कुटून आननार?" तिनं विचारलं. 
बोलू का नको करत त्यानं कोपऱ्यातल्या ज्वारीकडं बोट दाखवलं. तिनं डोक्यावर हात मारून घेतला. 
"काय करावं रं देवा तुजं? माज्याच नशिबाला असलं पोर का घातलास?", तिनं देवाला दोश लावला. 
"समद्या पोरांकडं हाय मोबाइल. मी तरी किती कळ काडू?" त्याचा चेहरा बोराएवढा झाला. 
"आरं कधी कामाला लागलं म्हनून ठेवल्या ती पोती. उद्या दुसरं काय हाय आपल्याकडं? रोजचा भाजीपाला विकून दिवस कसाबसा काढतूय. तुजा तर कशाला हात नाय. त्या एवढ्या तुकड्यात काय काय करनार मी एकटी?"
"मी कर्तू मदत तुला. बास मला फकस्त मोबाईल घेऊन दे."
तो ऐकना मग ती म्हनाली,"मलाच वीक आता."
"मी म्हनलं ना मी करतो मदत तुला.", त्यानं विनवलं. 
"एक काम कर तूच जा मार्केटयार्डात पोती घिऊन, काय मिळालं ते घे त्याचं काय करायचं ते कर. परत माज्याकडं यीऊ नगंस." ती दमली व्हती. 
"मी करतो समदं तू चिंता नकु करुस",  पक्या. 
"जा निघ घरातनं", ती वराडली. 

पक्या एकदम उडी मारून उठला. सायकलवर टांग मारून मित्राकडं गेला. माय कामाव निघताना तिला पक्या आन अमल्या पोती त्याच्या गाडीवर बाजूला लावताना दिसलं. 
"काय करू रं या पोराचं?" तिनं परत पांडुरंगाला विचारलं. 
पक्यानं ती पोती कशीतरी गाडीवरनं मार्केट यार्डात नेली. तिथं ही गर्दी उसळलेली. लोकं नुसती आरडत-वरडत हुती. त्यानं एकाला विचारलं,"ज्वारी हाय?"
"मग?"
"कुठं विकायची?"
"किती टन हाय?", त्यानं विचारलं. 
"नाय ठावं." 
"मग आदी वजन करून आना." 
"वजन कुठं करायचं?"
"आरं काय डोसकं फिरवायलायस सकाळ सकाळी. जा बरं हितनं." 

मग पक्या मार्केटयार्डभर फिरला. एकानं सांगितलं म्हनून गेला तर भली मोठी रांग लागलेली. दोनच वजनकाटे आनी इतकी मानसं. तरी तसाच भर उन्हात उभा राह्यला पक्या. अमल्या तर वैतागला व्हता. आजून किती येळ लागनार रं" विचारून पक्याला जीव नकुसा करून टाकला त्यानं. कसाबसा नंबर लागला त्याचा. अडीच एक पोती भरली सगळी ज्वारी. त्याचा चेहरा पार सुकून गेला हुता.

"तिकडं रेट लावलेत बघा जा", म्हनून मागच्या माणसानं त्याला सांगितलं.  

धावत धावत दर पायला पन हिशोब कुटला येतोय त्याला? पयल्या वर्षी मायकडून ते कॅल्सी-पाल्सी ला पैशे घेतले आन उडवले पन. त्यात इतका मोटा हिशोब त्यानं जल्मात केला नव्हता. २५० किलो ज्वारी २५ च्या दरानं किती पैशे मिळतील असं लैच डोकं खाजवलं. अमल्यानं तर आधीच माघार घेतली. परत शोधत त्यानं ते गणित करायचं मशीन आनलं. इतक्या वर्षात आज त्याला त्याचा वापर काय असतो ते कळलं होतं.  

      "सा-साडेसा हजार येतील म्हनत्यात.", पक्यानं अमल्याला सांगितलं. अमल्याला काय पन पडली नव्हती. पन इतक्या पैशात साधाच फोन येनार त्ये त्याला पक्कं मायती हुतं. तो बोलला तसा पक्याचा चेहरा आजून पडला. शेजारीच उभ्या असलेल्या एका शेतकऱ्यानं त्यांना सांगितलं,"शेरात जावा दर जास्ती यील. दीडपट तरी मिळलं. मला नाय जमत इतक्या लांब जायला. तुमी पोरं हाय जाऊन या की." 
पक्याला ते लगेच पटलं. आता ही बोचकी न्यायची कशी? दोघांनी परत तीन फेऱ्या मारून स्टँडवर पोती नेली. अमल्याला काय पुढं जमत नव्हतं मग त्यानं मंग्याला फोन केला. बस आली तशी मंग्या आन पक्यानं एकेक करून पोती टपावर चढवली आन गाडी निघाली. अमल्या तिथंच थांबला आन पक्या नव्या मित्राला घिऊन पुढं निगाला हुता. 

क्रमश: 
विद्या भुतकर. 

Wednesday, May 10, 2017

मिळून सारे जण


एक्सरसाईज पोस्ट अलर्ट ! :) गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी झाली आणि आमच्या गावात वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे रस्त्यावर पळणारे, सायकलस्वार, वॉकर ते अनेक लोक दिसू लागले. त्यात आमचीही भर होतीच. गावातूनच एक मोठा सायकलसाठी रस्ता आहे. तिथे मोठ्या गाडयांना जाण्याची परवानगी नसल्याने व्यायामासाठी तो चांगला रस्ता आहे. शिवाय आजूबाजूने दाट झाडी त्यामुळे उन्हाळ्यात तर तिथे अजूनच थंड वाटते. आम्हीही मुलांना शनिवारी, रविवारी सायकली घेऊन तिकडे जातो. किंवा कधी आमच्या रनिंगला ही तिथेच असतो. 
      गेल्या काही दिवसांत अनेक वेळा वेगवेगळ्या वेळी निरनिराळे लोक मला तिथे दिसले. त्यात मग दोन समवयस्क मैत्रिणी, कधी एखादे आजी आजोबा नातवाला चालायला किना सायकल चालवायला घेऊन आलेले दिसले. एकदा एक वडील पळत होते आणि छोटी मुलगी शेजारून सायकल चालवत होती. अनेकवेळा अगदी छोट्या बाळांना स्ट्रोलर मध्ये ठेवून तो स्ट्रोलरच पळवत नेणाऱ्या आया पाहिल्या. माझे आवडते म्हणजे काही आजी आजोबा दोघेच जाताना पाहणे. यात फार क्वचितच दोघे सोबत दिसतात. एक जण नेहमी पुढे आणि दुसरा सावकाश मागून येणार. मग पुढे गेलेला थांबून मागच्यांची वाट पाहणार. एकदम ग्रुपने जाणारे सायकलस्वार तर खूपच पाहिले. 
       आता हे सर्व सांगायचा मुद्दा असा की सोबत कुणी असेल व्यायाम करायला तर खरंच फरक पडतो. मी रनिंग सुरु केले तेंव्हा संदीप घरी राहून मदत करायचा. पण दोघांचे सुरु झाले तेव्हा जास्त चांगले वाटू लागले. आम्ही सोबत पळत नाही, तर आलटून पालटून मुलांना सांभाळतो आणि दुसरा पळायला जातो. तर अशा वेळी आपला साथीदार मदतीला आहे ही भावना सुखकारक असतेच पण घरीही गप्पा मारताना तो अजून समान धागा असतो बोलायला. 'आज तुझे किती मैल झाले?', 'स्पीड किती होता?' किंवा 'पाणी जास्त पी' अशा अनेक गोष्टी बोलता येतात. काही त्रास होत असेल  तर सांगूही शकतो. त्यामुळे मला वाटतं की घरात एकाच व्यक्तीने व्यायाम करण्यापेक्षा सोबत करावा म्हणजे जास्त फायदा होतो. केवळ नवराच नाही तर आपल्या प्रिय मैत्रिणी असतात, ऑफिसमधले लोक असतात. एकमेकांशी तुलना करून, चढाओढ, खेळीमेळीची स्पर्धा यातून खूप काही मिळवता येऊ शकतं. आमच्या पुण्याच्या बिल्डिंगमध्ये ३-३ जणींचे ग्रुप होते. त्यांना नेहमी मी संध्याकाळी वेगाने चालताना पाहायचे. खूप छान वाटायचं. :) 
      दुसरा मुद्दा असा की फक्त मोठ्यांनीच हे करण्यापेक्षा मुलांनाही त्यात सहभागी करून घ्यायचं. अनेकदा मुलं खेळत असताना आणि आई-वडील गप्पा मारत आहे असे होते. त्यापेक्षा मुलांच्या सोबत आपणही पळायचे किंवा सायकल चालवायची. किंवा त्यांना पकडायला सांगायचे असे अनेक गोष्टी करू शकतो. मुलं मोठी असतील त्यांच्याशी तुलनाही करू शकतो. सायकल, पळणे, स्विमिंग अशा अनेक प्रकारात. योगासने हेही एक चांगलं माध्यम आहे मुलांना सोबत घेऊन व्यायाम करायला. 
     अनेक पालक मुलांना सर्व क्लासेस लावतात पण स्वतः मात्र व्यायाम करत नाहीत. हे अतिशय अयोग्य वाटते. अनेकवेळा शनिवार-रविवारी मुलांना घेऊन मुव्ही किंवा बाहेर जेवायला जातो. त्यापेक्षा खेळायला जावं. शनिवारी लवकर उठून बागेत फिरायला न्यावं. पुण्यात शनिवार-रविवारी हॉटेल्सना प्रचंड गर्दी असते. सकाळी व्यायामाला मात्र त्याच्या १ टक्काही नाही. मी या तक्रारी आधीही केल्या आहे किंवा हेच मुद्दे मांडले आहेत. पण सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वजण बाहेर पडलेले दिसतात. मुलांना निरनिराळे क्लासेस असतात. पण या सुट्ट्यांमध्ये त्यांच्यासोबत आई-वडिलांनीही व्यायामात भाग घ्यावा असे मला वाटते. एकदा सुरुवात झाली की हळूहळू याच गोष्टी नियमित केल्या जातात आणि त्यांची मुलांना चांगली सवय लागू शकते. असो. 
       तुम्हीही करून बघा नक्की हे प्रयोग आणि मला सांगा यांनी फरक पडतो की नाही. हे आम्ही चौघे सायकलस्वार. :) 


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, May 09, 2017

तो एक क्षण

      गेलं जवळजवळ वर्षभर पोरांनी त्यांना शाळेसाठी घेतलेले शूज बरेच नीट वापरले. निदान नवे घ्यायची वेळ तरी आली नव्हती. (आता हे वाक्य लिहिताना जाणवतंय की ४ आणि ७ वर्षाच्या मुलांसाठी तेच एक मोठठं काम आहे आणि आई-वडील म्हणून कदाचित थोडं जास्त श्रेय त्यांना आम्ही दिलं पाहिजे. असो. ) अजून दोन महिन्यांनी शाळा सुरु होत असल्याने नव्या खरेदीची तयारी सुरु झाली होती. यात स्वनिक डे-केअर मधून शाळेत जाणार असल्याने त्याच्यासाठी अजून उत्साहाची गोष्ट.  

     तर झालं असं, दुकानात त्याच्यासाठी शूज बघताना त्याला 'स्पायडरमॅन' चे रंगीत लाईट लागणारे शूज दिसले. निदान मला तरी ते बटबटीत वाटले. आणि आता त्याच्या साईजमध्येही असेही लाईट असलेले शूज मिळणं अवघड होत होतं. म्हणून मी नाईलाजाने त्याला म्हटलं"बाबू तुला आता शाळेत घालायचे आहेत ना हे शूज मग कशाला लाईटचे बघतोस? तू आता बिग बॉय झाला ना?"

त्याने पटकन मान हलवली आणि माझ्या हातात असलेले थोडे मोठ्या मुलांसारखे वाटणारे शूज पायात घालून बघायला तो लगेच तयार झाला. तो ते घालून बघत असतानाच मला त्याच्या आकाराचे लाईटचे शूज दिसले आणि मी आनंदाने त्याला ते दाखवले. पण ते नाकारून लाईट नसलेले शूज त्याने घेतले होते. 

त्या एका क्षणात त्याचं मन पक्कं झालं होतं. आणि आई म्हणून मला मात्र अतिशय वाईट वाटलं होतं. 'तू बिग बॉय आहेस ना?' , 'तू मोठी झाली ना आता?' या अशा वाक्यांनी किती मोठी जबाबदारी आपण त्यांच्यावर देतो याचं वाईट वाटलं आणि त्या एका क्षणात मोठ्या झालेल्या आमच्या बाळाचंही. दुसऱ्या दिवशी  सकाळी उठल्या क्षणी तेच  शूज घालून तो घरभर नाचला तेंव्हा थोडं बरं वाटलं. पण तो एक क्षण येऊन गेला होता आणि आमचे 'लाईटचे शूज' कायमचे निघून गेले होते. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, May 08, 2017

तुझा माझा खेळ रंगला(अंतिम भाग)

     त्याच्या त्या अदबीने बोलण्यांत, धावपळ करण्यात तिला उगाचच एक लाचारी दिसत होती. तो सतत मान खाली घालूनच बोलत असल्याने त्याचा चेहरा तसा पाहिलाच नव्हता. पण त्याला ते असं झोपलेलं पाहून तिला पहिल्यांदाच त्याचा चेहरा कसा आहे ते दिसलं. त्याच्या चेहऱ्यावर ती लाचारी नव्हती, उलट एक तजेला होता. कष्टाच्या खुणा चेहऱ्यावर, हातांच्या कोपऱयांवर, सुकलेल्या ओठांवर, भेगा पडलेल्या पायांवर दिसत होत्या. ती त्याला तिथेच सोडून स्वयंपाकघरात गेली आणि एक पेला घेण्यासाठी फडताळाला हात लावला आणि शेजारचा पेलाही खाली आला. त्याच्या आवाजाने दचकून उठत धावत पळत तो तिच्यामागे आला आणि पलटणाऱ्या तिला धडकला. ती कावरीबावरी झाली आणि 'पाणी' इतकंच बोलून दूर उभी राहिली. त्याने घाईने तिला पाणी दिलं आणि 'उठवायचं की बाईसा' असं तिला म्हणाला. ती पाणी पिऊन तिथून आवरायला निघाली आणि तोही त्याच्या खोलीत गेला. 

       ती अनेक वर्षांनी आपल्या खोलीत गेली होती. तिथे तिच्या भल्या मोठ्या संदुकींतून तिने आपले लहानपणीचे कपडे चाळले. ते घालताना आईसोबत केलेल्या गप्पा तिला आठवल्या आणि अचानक काहीतरी आठवून ती शेजारच्या खोलीत गेली. तिथे अशाच अजून दोन संदुकी होत्या. तिने त्यातली लुगडी काढली. एकेका शालूवरील कशिदाकारी, नक्षी, एकेक रेशमी धागा पाहिला. त्यांना हात फिरवून, कधी गालांना लावून तर कधी त्यांचा सुगंध घेऊन त्या न्याहाळत बसली. त्यातीलच एक रेशमी शालू उचलून ती आंघोळ करायला गेली. ती तयार होऊन आली तेव्हा तो तयार होऊन दिवाणखान्यातील पसारा आवरत होता. मोठ्या आईसाहेबांची लुगडी नेसलेल्या तिला पाहून तो थोडासा बावरला पण तिच्या मोहक चेहऱ्याकडे पाहून हलकेसे हसलाही. 

ती दिवाणावर बसली आणि तिने त्याला विचारलं,"कंटाळा नाही येत तुला एकटं राहायचा इथे?"
तो थबकला आणि मालकीण बाईंना खरं सांगायचं की नाही याचा विचार करत क्षणभर थांबला. पुढे बोलला,"हां कधी कधी येतो कटाळा. पण काय करणार? आयुष्यभराचं कामच हाय माझ्यासाटी. "

"म्हणजे?", तिने विचारलं. 

"मोठा किस्सा हाय तो सांगीन कधीतरी " असं म्हणून तो तिथून निघून गेला. 

ती त्याचाच विचार करत बसली होती. आपल्या  कामासाठी तिने पुन्हा वह्या काढल्या, कागदपत्रं चाळायला सुरुवात केली. दोन दिवस सतत हाच कार्यक्रम चालला. 

एक दिवस असेच बागेत फिरताना तिला तो गवत खुरप्याने काढताना दिसला. फुलांना न्याहाळत आपलं काम करत होता. ती तिथे थांबली आणि म्हणाली,"मला ऐकायचा आहे तुमचा किस्सा. माझं कामच आहे ते. मला सगळा इतिहास लिहायचा आहे आमच्या घराण्याचा". 
तिने त्याचा हात धरून त्याला "सांग ना आत्ताच" असा हट्ट धरला. आयुष्यात ज्यांच्या चेहऱ्याकडे वर मानेने पाहिलं नाही त्या मालकांनी असा हात धरावा? त्याला एकदम घाबरल्यासारखं झालं. पण तिच्या हातातून आपला हात सोडवणं त्याला जमणार नव्हतं. तिने त्याला आपल्या शेजारी खुर्चीत बसवलं आणि विचारलं,"हां सांगा आता."
त्याचा नाईलाज झाला. 

"लई वर्षाआधीची गोष्ट हाय. म्हंजे २०० वर्षांपूर्वी आसल. माझ्या खापरपंज्याचं राज्य आणी तात्यासायबांच्या पंज्याचं राज्य शेजारी शेजारी हुती. आमचा खापरपंज्याचं वय झालं हुतं. एका लढाईत त्यांची हार झाली. आमच्या खापरपंज्याला पकडून तुमच्या पंज्यासमोर हजर केलं आन माझ्या पंज्याला पन. म्हाताऱ्याचं वय झालंच हुतं पन आपल्या पोराचा जीव लई प्यारा त्यास्नी. म्हाताऱ्याने आपला मृत्यूदंड सिवकारला पन पोराला माफी द्यायला सांगितली. तुमच्या पंज्यानं बी मोट्या मनानं माफ केला पन एका अटीवर. आमचं आख्खा खानदान या खानदानाचा गुलाम राहील. तवापासुन त्या घरान्याचं रूप पालटलं, ती इंग्रज बी गेलं पन माजी गुलामी काय संपली नाही. चार पिढ्या गेल्या. आमच्या घरातल्या पुरुषांनी लग्नं केली पन मला माज्या पोराला गुलाम नाय करायचं. मजा जनम जाईल तो पत्करला पन पोराचा नको. " 

त्याच्या डोळ्यातलं दुःखं तिला दिसत राहिलं. आपण हे सर्व त्याच मालकासमोर बोलत आहे तो विसरून गेला. तिने पुन्हा एकदा त्याचा हात धरला आणि आपण बोलून मोठी चूक केली असं त्याला वाटलं. 

ती निर्धाराने बोलली,"मी आज या घराण्याची वारस म्हणून तुझी या गुलामीतून मुक्तता करते. यापुढे तू माझी चाकरी नाही करायची."
तो गडबडला. "मग मी सोडून जाउ? असं कसं? मालकांना नाय चालायचं हे सगळं."
"तू त्यांची चिंता नको करुस. मी आजच त्यांना पत्र लिहिते याबद्दल. "
तिच्या आश्वासक स्वरात त्याला एक नवी उमेद दिसली. तरीही इतक्या वर्षाची गुलामी सोडून अचानक काय करणार हा प्रश्न त्याला होताच. 
तो म्हणाला,"एक काम करतो मालकांचं उत्तर येस्तोवर थांबतो."
ती 'चालेल' म्हणाली. तो उठून मेजावर ठेवलेला तिचा पेला उचलून नेऊ लागला आणि तिने त्याला थांबवलं. 
"मी समर्थ आहे माझी कामं करायला. आमच्या घराण्याच्या इतिहासातलं एक पान मिळालं आज मला. धन्यवाद."

तिच्या या बोलण्यावर त्याला काही उत्तर सुचेना. इतक्या वर्षाची गुलामी कशी काय सुटणार? खरंच असं होणार? यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. आजपर्यंत अनेक वर्षं या महालाची देखरेख करत एकटाच राहिलेला तो आयुष्याची उमेद हरवून बसला होता. ती पुन्हा नव्याने जागवण इतकं सोपं नव्हतं. 

संध्याकाळी स्वयंपाक करताना तिने त्याला विचारलं,"ब्रेड कुठे आहे?"

त्याने तर ते काय असतं हे कधीच पाहिलं नव्हतं. 

"डबल रोटी?" तिने त्यातल्या त्यात समजेल असा प्रश्न विचारला पण तेही त्याला माहित नव्हतं. मग त्याने केलेली भाकरी भाजी खाऊन तिने दिवस काढला. 
"मला उद्या बाजारात घेऊन चल, मी बघते मिळते का."
त्याने मान हलवली. 

        दुसऱ्या दिवशी मोठ्या बाईसाहेबांची अजून एक रेशमी शालू नेसून ती तयार होती, त्याच्यासोबत बाजारात जायला. आज स्वतःचं सर्व काम अगदी पाणी तापवायचंही तिनेच केलं होतं. पण त्यासाठी लागणारी लाकडं मात्र त्यालाच आणावी लागली होती. बंब पेटवण्यासाठी तिने केलेली धडपड पाहून त्याला तिचं कौतुक वाटलं आणि काळजीही. त्यानेही जरा साफ असलेला पायजमा, सदरा आणि टोपी घातली होती. तिच्या उत्साहाचं त्याला खूप कौतुक वाटत होतं. एव्हढ्या घरंदाज स्त्रीसोबत जाण्याची त्याची पहिलीच वेळ होती, मुख्य म्हणजे यावेळी तो नोकर म्हणून जात नव्हता. बाजारात तिने अनेक गोष्टी पाहिल्या, त्या काय काय आहेत याचं वर्णन केलं. रस्त्यात दिसणाऱ्या एका गजरेवालीकडून एक सुंदर गजरा घ्यायचा हट्टही तिने केला. पण उगाच बाईसाहेबांच्या भोवती गर्दी जमू नये म्हणून तो तिला घेऊन लवकरच घरी परतला. प्रत्येक ठिकाणी तिची काळजी घेताना पाहून तिला मनातून खूप आनंदही होत होता. 

      पुढचे काही दिवस ते दोघे एकमेकांना समजून घेत राहिले. त्याने तिच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा अंथरावा तर तिने रोज नवीन शालू नेसून त्याला छान नटून दाखवावं. गेल्या काही पिढ्यांमध्ये घडलेली अनेक राजकारणं, किस्से, गावातील गप्पा तो तिला रंगवून सांगत असे. तर लंडनमध्ये आपल्या राहणीमानाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, खाण्यापिण्याबद्दल,  तिच्या शिक्षणाबद्दल ती त्याला सांगत होती. तिच्या मनातलं प्रेम आता जास्तच व्यक्त होऊ लागलं होतं. त्याने कितीही संयम ठेवला तरी तिच्या प्रेमाला त्याच्याकडूनही नकळत उत्तर दिलं जात होतं. आपण आपल्या मनाला उगाच असं वाहू देतोय याची त्याला भीती वाटत होती. तर दुसऱ्या कुणाशी लग्न करावं लागलं तर काय याची तिला. 

     एक दिवस सकाळी तिचा चेहरा खूप रडवेला झाला होता आणि तिच्या हातात एक कागद होता. तिच्या चेहऱ्याकडे पाहून तो घाबरला. त्याने तिला खुणेनेच विचारलं,"काय झालं?".
ती रडत सांगू लागली,"तात्यासाहेबांचं पत्र आलंय. मी तुझ्याबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्राचं उत्तर दिलंय. मुलगी म्हणून इतकंही करण्याचा हक्क नाही मला? योग्य-अयोग्य काय ते कळतं आता मला. लंडनमध्ये किती पुढारलेला आहे समाज. हे असं मागासलेली वृत्ती किती काळ जपणार आपण?". 

तिच्या आवाजात कळवळा होता. तो तिला म्हणाला,"असू द्या. माझंच नशीब म्हणायचं. तुमी चिंता करू नका. मी राहीन आयुष्यभर हितच. "

त्यावर तिने त्याचा हात धरला आणि त्याच्या खांदयावर डोके ठेवून ओक्सबोकसी रडू लागली. 

"मी नाही तुला हे असं गुलामीचं आयुष्य देऊ शकत." ती बोलली. 

त्याचा हात तिच्या डोक्यावरून फिरत राहिला. दिवसभर ते दोघेही मनात तेच विचार घेऊन होते. शेवटी तिने निर्णय घेतला आणि त्याच्याकडे आली आणि निग्रहाने म्हणाली,"मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आयुष्य तुझ्यासोबत काढायचं आहे." 

तो तिच्या इतक्या तडकाफडकी निर्णयाने बावरला होता. तिचा हात पहिल्यांदाच त्याने स्वतःहून हातात घेतला 
आणि पुढे बोलणार इतक्यात दरवाज्याचा आवाज झाला. तिला त्याच्या मनात काय आहे जाणून घ्यायचं होतं. 'तू बोल पुढे' असं ओरडून सांगायचं होतं. पण...... 

...... तो आवाज त्या दोघांच्याही ओळखीचा होता. दोघेही काळजी सोडून थोडंसं हसले आणि उडत जाऊन दिवाणखान्यातल्या दोन फुलदाण्यांमध्ये बसले. दोघेही समोर होणारी गंमत पाहू लागले. 

 ....... दादासाहेब एका हातात एक डबा आणि दुसऱ्या हातात पाणी घेऊन आले होते. त्यांनी प्रत्येक खोलीच्या उंबऱ्यावर दहीभात ठेवला आणि पाणी शिंपडलं. त्यांनी तिच्या फोटोचा हार बदलला. तिथे समोर अगरबत्ती लावली. घरात वेगवेगळ्या ठिकाणी पेले, ताटं पसरली होती, ती त्यांनी आवरून ठेवली. तिच्या खोलीतील दोन्ही संदूक बंद करून ठेवल्या. आईसाहेबांच्या लुगड्यांच्या घड्या करून ती पुन्हा संदुकीत ठेवली. कितीतरी वेळ आवरलेल्या खोल्यांमधून फिरत राहिला. 

      आज चाळीस वर्षं झाली. त्या रात्री तात्यासाहेब स्वतः आले होते. त्यांच्या समोर त्यांनी दोघांना हातात हात धरून बसलेलं पाहिलं होतं. तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी दिवाणखान्यातल्या बंदुकीने दोघांनाही गोळ्या घातल्या. दोघेही बागेत पुरले गेले. त्याचं उत्तर ऐकण्यासाठी आसुसलेली ती आणि त्याच्या हातातून सुटणाऱ्या तिच्या हातांचा स्वर्श दोन्हीही तसेच अपूर्ण राहिले होते. गेली चाळीस वर्षं दोघेही नव्याने सुरु करून पुन्हा तोच खेळ खेळत आहेत. मोजून महिन्याभराचा खेळ तो. दादासाहेब आले की बंद पडायचा. त्यांच्या हताश चेहऱ्याकडे पाहून दोघांनाही हसू फुटत असे. ते निघून गेले की खेळ पुन्हा सुरु होई. गेटच्या बाहेर मात्र चाळीस वर्ष झाली एक पाटी तशीच अडकून होती,"प्रॉपर्टी विकणे आहे."

समाप्त. 


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, May 07, 2017

तुझा माझा खेळ रंगला - भाग १ (कथा )

        ती त्या भल्या मोठ्या लोखंडी दारासमोर उभी राहिली आणि अभिमानाने समोरून पाहिलं. आत दूरपर्यंत जाणारा खडीचा रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूनी वाढलेली आंबा, गुलमोहर, वडाची मोठाली झाडे आपल्या सावलीने जणू ती वाट घरापर्यंत नेऊन पाहोचवत होती. रुंद खांद्यांनी उंच मान करून रुबाबात उभा असलेला त्यांचा खानदानी बंगला. बंगला कुठे? मोठा महाल होता तो, काळ्याकुट्ट मोठमोठाल्या दगडांनी त्याची एक एक भिंती अभेद्य करून ठेवलेली.भिंतीच्या आजूबाजूने एकदम लागून असलेल्या गुलाबांच्या रोपांनी जणू काटेरी कुंपण बनवलं होतं. त्यावर बहरलेली लाल, सफेद, गुलाबी फुलं तिने कितीतरी वेळ न्याहाळली. वर मान करून पाहिले तर उंच तटबंदी तिला दिसली. त्यातून आतलं काही नजरेस पडणं अशक्यच होतं. खाली दारात एक भलं मोठ्या अर्धवर्तुळात फरशी बसवलेली होती. तिथेच दोन लाकडी खुर्च्या ठेवलेल्या होत्या. त्यांच्या हातावरचं नक्षीकामही तिने जवळून पाहिलं. पुढे येत व्हरांड्याच्या लाकडी दरवाजावरील कोरीव काम न्याहाळलं. दरवाज्याच्या उजव्या बाजूला दोन दगडांत तिच्या आजोबांचं आणि वडिलांचं नाव कोरलेले तिने अभिमानाने वाचलं. आपल्या पूर्वजांच्या या मालकी हक्काच्या घराकडे आणि समोरच्या बगीच्याकडे पाहत तिने लोखंडी कडी वाजवली.
    
    दार उघडण्याची वाट पहात तिने पदर सरळ केला, हातातल्या रुमालाने चेहऱ्यावरचा घाम पुसला. डोळ्यावरचा काळ चष्मा पुन्हा एकदा पुसून हातातल्या पर्समध्ये ठेवला. उन्हाने तिचा मूळचा गुलाबी चेहरा अजूनच लाल झाला होता. पायातल्या चपला धुळीने खराब झाल्या म्हणून तिची चिडचिड झाली होती. कधी एकदा आत जाऊन आराम करतेय असं तिला झालं होतं. त्यात मघाशी बेल वाजवूनही अजून दार उघडलं नव्हतं. तिने वैतागून जोरात कडी वाजवली आणि तितक्यात दार उघडलं. समोर एक सहा फुटी तरुण उभा होता. त्याचा चेहरा उन्हाने चांगलाच रापलेला होता. धावत आल्याने अजूनही त्याचा श्वास जोरात चाललेला आणि जाडसर सफेद कपड्याच्या आतूनही त्याची कसलेली छाती जाणवत होती. त्याच्या रुंद खांद्यावर एक मळका कपडा दिसत होता. खाली मळका पायजमा होता.

त्याने अदबीने तिची माफी मागितली आणि विचारलं,"इतक्या उन्हाचं एकट्या आलासा बाईसा? टेशनात आलो असतो की न्यायला." तिने रागाने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला आणि सरळ दिवाणखान्यात चालत गेली. त्याने तिच्यामागून जात पुन्हा विचारले,"पाणी, सरबत काय आणू?"
यावर मात्र तिचा संताप अनावर झाला आणि ती म्हणाली,"कशाला? चांदणंच पडलंय ना बाहेर?".
तिच्या कुत्सित प्रश्नाने तो खजील झाला आणि "आलोच" म्हणत घाईत माजघरात गेला.

     ती एका खुर्चीत ढासळली. इतक्या उन्हाची, कष्टाची सवय नव्हती तिला. खुर्चीत पडल्या पडल्या तिने वर उंच छताकडे पाहिलं. छतावरही अतिशय सुंदर कलाकारी केली होती. दिवाणखान्यातल्या दगडी खांबांवर असलेली नक्षी तिने न्याहाळली. भल्या मोठ्या भिंतीवर लावलेल्या फोटोंमधून दिसणारे तिचे पूर्वज तिने पुन्हा एकदा पाहिले आणि लहान असताना त्यांची भीती वाटायची तशीच तिला आजही वाटली. तिने नजर जमिनीवर आणली. पायाखाली असलेल्या काळ्या फरशीच्या थंड स्पर्शाने तिचे पाय सुखावले. अधे मध्ये दिसणाऱ्या रंगीत फरशा पाहून तिला लंगडी खेळायची इच्छा झाली. तिने पटकन पदर खोचला आणि साध्या फरशा सोडून रंगीत फरशीवर उड्या मारायला सुरुवात केली. मधेच एका फरशीवर दुरून झेप घेताना तो तिथे आला आणि तिच्या धक्क्याने त्याच्या हातातली थाळी खाली पडली तर त्याच्या धक्क्याने ती स्वतःच कोलमडली.
"अवो अवो बाईसा जपून" म्हणत त्याने तिला उठण्यासाठी हात पुढे केला पण तो डावलून ती स्वतःच उभी राहिली.

        तो तिच्या अल्लडपणाला हसणं टाळून आपले पितळेचे पेले आणि थाळी उचलू लागला. ती हिरमुसली आणि पुन्हा खुर्चीत जाऊन बसली. तो पुन्हा माजघरात. दमली असल्याने बसल्या जागी तिची तशीच झोप लागून गेली. बऱ्याच वेळाने जाग आली तेंव्हा तिच्या अंगावर एक मऊ शाल पांघरलेली होती. ती शाल तशीच गुंडाळून ती बाहेर आली. उन्हं उतरतीला आली होती. ती बाहेर खुर्चीवर येऊन बसली. तो आतून धावत आला आणि म्हणाला,"कायतर खावा की बाईसा. तशाच झोपला दुपारपासनं. तुम्ही बसा मी घेऊन येतो खायला."
ती तो येईपर्यंत बागेत फिरु लागली. लाल गुलाबाच्या चार पाकळ्या तोडून तिने त्या बोटांनी चुरगळल्या आणि ओठांवर घासल्या, मग ओठ पुन्हा एकमेकांवर घासले आणि त्या पाकळ्यांचा वास घेऊन त्या फेकून दिल्या.
तो एका वाडग्यांत गरम गरम शिरा आणि एका पेल्यात पाणी घेऊन आला. खुर्ची समोरच एका मेजावर त्याने दोन्ही ठेवले. तिला भूक लागलीच होती. पण शिरा पाहून तिची अजूनच चिडचिड झाली.
"इथे चहा नाही का हो मिळत?", तिने कुत्सितपणे विचारले.
"च्या? त्ये कायबा?", त्याच्या अडाणीपणावर हसून ती खाली बसली आणि खाणार तर तिच्या लक्षात आले आणि म्हणाली,"चमचा? ते तरी माहीत आहे ना तुम्हाला?"
त्याने जीभ चावली आणि तो पुन्हा पळत माजघरात गेला. ती तोवर बागेत फेऱ्या मारू लागली. अनेक वर्षांनी ती पुन्हा या गावात, महालात आली होती. लहान असतानाच्या तिच्या त्या पळापळीच्या, गजऱ्यांच्या, बागेतल्या चिंचा-बोरांच्या अनेक आठवणी आणि सोबतच आईचीही. ती विचारात असतानाच तो परत आला होता. त्याने वाटीत चमचा ठेवला आणि 'बाईसा' म्हणून हलकेच हाक मारली. भुकेल्या पोटी तिने तो शिरा गपागप खाऊन टाकला. तो तिथेच उभा आहे हे तिला जाणवलंच नव्हतं. 
त्याने विचारलं,"आणखी आणू?". ती 'हो' म्हणाली.   

         त्याच्या परत पळत जाणाऱ्या आकृतीकडे पहात उभी राहिली. लंडनमध्ये या सगळ्या ऐशोआरामाची सवय बरीच कमी झाली होती. पण जन्मजात ज्या सवयी अंगवळणी पडतात त्या परत यायला वेळ लागत नाही. त्याने आणलेला शिरा खाऊन ती बागेत फिरू लागली. तिथल्या झाडांमध्ये, दगडी पुतळ्यांमध्ये तिचं बालपण गेलं होतं. आईसाहेब वारल्या आणि ती,तिचा भाऊ पोरके झाले. त्यांतच भारतात स्वातंत्र्य का काय त्याने तात्यासाहेब चिंतीत होते. इकडे इंग्रजही देश सोडून चालले होते. इतक्या सगळ्या काळजीत मुलांचे काय हा प्रश्न तात्यासाहेबांना पडला होता. अचानक आई वारलेली आणि त्यात आपल्या माणसातून उठून परदेशात गेलेल्या ताईसाहेबांना एकदम जग नकोसं झालं होतं. 

         ते वयच लवकर सर्व विसरून जाण्याचं होतं. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिथली भाषा, सवयी, जेवण सर्व अंगवळणी पडलेलं. आता लग्नाचं वय झालं तसं त्या परत आल्या होत्या. इंग्रज निघून गेले, संस्थानं खालसा झाली, राजेशाही संपली तरी सवयी, पैसा, राजेपण सर्व तसंच होतं. तिकडे सर्वजण त्यांच्या लग्नासाठी स्थळ बघत असताना या मात्र आपल्या जुन्या महालात येऊन राहिल्या होत्या. आपल्या पुर्वज्यांचा इतिहास स्वहस्ते लिहायला. आपण 'शिकलेल्या शिक्षणाचा काहीतरी फायदा झालाच पाहिजे' असा त्यांचा हट्ट पडला आणि तात्यासाहेब नाईलाज झाले. गेल्या काही वर्षांपासून केवळ सांभाळणारा माणूस ठेवलेला. तिथे जाऊन कशी राहणार ही चिंता त्यांना होती पण तिला नाही. तिथे गेल्यावर तिला आपल्या घरी आल्यासारखं वाटलं होतं. अंधार पडला तशी ती दिवाणखान्यात जाऊन काहीतरी वाचत बसली. त्याने आपलं काम चालू ठेवलं. 
"जेवायला येताय ना?" त्याने विचारलं आणि तिची तंद्री भंग पावली. दिवाणखान्यात अनेक कागद पसरलेले होते. जुने फोटो, कागदांचे काही गठ्ठे ठेवलेले होते. तिने त्याला जेवण जागेवरच आणून द्यायला सांगितलं. बराच वेळ ते ताट तसंच पडून राहिलं. ती वाचण्यात गुंग होऊन गेली होती. ततिचे ताट उचलण्याची वाट पहात त्यालाही माजघरात झोप लागून गेली होती. 

         ती सकाळी उठली तेंव्हा तिला आपण कसे, कधी झोपलो याची आठवण झाली. पसरलेले कागद, फोटो सर्व गोळा करून एका जागी तिने ठेवलं. चालत चालत ती माजघरात आली आणि त्याच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या कोवळ्या किरणांतून तसाच फरशीवर पहुडलेला तो तिला दिसला. त्याचा चेहरा किती निरागस आहे तिने मनातल्या मनात विचार केला. त्याला उठवावं असं तिला वाटलं नाही. कितीतरी वेळ ती तशीच त्याला बघत एका कोपऱ्यात उभी राहिली. 
स्वयंपाकघरात 
क्रमशः 
        
विद्या भुतकर. 

Thursday, April 27, 2017

माझा मराठी बाण (बाणा)

डिस्क्लेमर:
या पोस्टमधील सर्वच पात्रे काल्पनिक नसली तरी प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत आणि जे काही साधर्म्य तुम्हाला वाटत असेल ते केवळ योगायोग समजावे.
(हे असले फुसके डिस्क्लेमर देऊनच मराठी बाण्याचे आपण बारा वाजवत आहोत असे वाटते. मराठी माणसाने कसं ताठ मानेनं लिहावं. एखादा नवीन डिस्क्लेमर शोधला पाहिजे खास मराठी माणसासाठी. असो..त्यावर पुन्हा कधीतरी. )

बाकी विनोदी पोस्ट बद्दलचे डिस्क्लेमर आहेतच. आपापल्या विनोदबुद्धी नुसार ही पोस्ट समजून घ्यावी.
                    -------------------------------------------------------------------------------------------

तर झालं असं..... एका रविवारी नवऱ्याच्या साऊथ इंडियन मित्राच्या घरी असताना त्याच्या आईने निरागसपणे विचारलं,"रोज चपाती बनाते हो क्या?". आता हा प्रश्न हजार वेळा अनेक साऊथ इंडियन व्यक्तींनीं विचारला असल्याने मी,"हो" म्हणून सांगितलं. नाहीतर आधी मी भाकरी, भात, चकोल्या, थालीपीठ, धिरडं, डोसा  आणि अजून १० पदार्थांची नावं तरी सांगायचे. पण माणसाने समोरच्याला अपेक्षित उत्तर दिलं की पुढचा त्रास कमी होतो हे मी शिकलेय. मी 'हो' म्हणल्यावर ऑंटीचे डोळे मोठे झालेच. 
'बरा बाई तुला उरक असतो कामाचा' अशा टाईपचा लुक देऊन त्यांनी पुढचा प्रश्न विचारला,"तो पनीर और क्या क्या बनाते हो सब्जी?"
आता हे मात्र अतीच झालं हे माझ्या नवऱ्याला कळलं होतंच. मी चिडून काही बोलणार इतक्यात तो म्हणाला,"ऑंटी आपका सांबर अच्छा था." आपलं कौतुक ऐकून ऑंटी खूष झाल्या आणि मग पुढचा तासभर दुधी, कारलं, तोंडली आणि कुठले कुठले सांबर त्यांना बनवता येतात यावर माहिती मिळाली. 

गाडी बसताच मी सुरु होणार हे नवऱ्याला माहित होतंच.
"काय रे हे साऊथ इंडियन लोक? यांना कर्नाटकच्या वरचे सर्व नॉर्थ इंडियनच वाटतात. पनीर म्हणे. तू विषय बदललास म्हणून नाहीतर चांगली यादी ऐकवली असती मी.... दोडका, पावटा, घेवडा, चुका, अंबाडी, चाकवत....." माझा स्पीड बघून नवरा बिचारा शांत बसलाच. 
मी पुढे बोलत राहिले,"सारखं काय 'आपलं रोज चपाती बनवता का' विचारायचं? मी म्हणते का त्यांना रोज राईस बनवता का म्हणून?". 
"अगं पण ते खरंच रोज राईस खातात..." नवऱ्याने जोक मारण्याचा प्रयत्न केला.
"तू गप्प बस. मला वैताग आलाय सारखं आपलं सांगायचा की महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेला येतो, उत्तरेला नाही."
"जाऊ दे ना?",नवरा. 
"जाऊ दे ना काय? या असल्या मवाळ भाषेमुळेच मराठी माणूस महाराष्ट्रातूनही नाहीसा होत आहे. आणि इथे तर आपण मेले अमेरीकेत."
"आता अमेरिकेनं तुझं काय वाकडं केलंय?", नवरा.
"तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही बघ. मराठी माणसाचं अस्तित्व म्हणून काही राहिलं पाहिजे का नाही? अमेरिकेत सुद्धा तेच. बास आता पुढच्या वेळी ऑंटी मला बोलल्या तर भारताचा नकाशाच घेऊन बसणार आहे सोबत. आईशप्पथ."
"हे बघ, आता आईला मध्ये कशाला आणतेस?", नवरा. 

    यावर मात्र माझी तलवारच काढायची बाकी राहिली होती. घरी येऊन चरफडत ऑंटीनीच दिलेली इडली चटणी पोरांना भरवून, भरपेट खाऊन मी झोपून गेले.
     
      दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही सर्व मैत्रिणी जेवायला निघत होतो. त्यात एक पंजाबी मुलगी होती. मॅडम आपल्या पंजाबी भाज्या, कल्चर आणि बऱ्याच गोष्टी सांगत होत्या.
"हमारे यहां तो रोज पराठे होते ही है नाश्तेमें. आलू, गोबी, दाल, अलग अलग टाईप के. पता नहीं तुम लोग रोज राईस कैसे खाते हो."
हेSSSSS म्हणजे माझ्या कालच्या ताज्या जखमेवरचं मीठच होतं. मग काय? सोडते काय तिला?
म्हटलं,"हम पश्चिम भारत में रहते है, साऊथ नहीं. हम भी रोज चपाती खाते है. " आता माझा टोन ऐकून,'हिच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही' हे तिला कळलं होतंच. पण जेवतानासुद्धा तिला मी मराठी पदार्थांची नावं ऐकवायला सुरुवात केली. मला त्यांचे पदार्थ माहित असतील तर त्यांना का नाही? अडाणीपणाची हद्दच झाली ही. 
"'पिठलं' पता है क्या तुमको?", मी विचारलं.
'पीटला'? तिने विचारलं. माझ्या पिठल्याला तिच्या त्या प्रश्नाने क्षणार्धात पिटलं होतं. 
मग एकदम आठवलं,"पुरणपोळी तो तुमको पता होगा?".
ती म्हणाली,"हां, वो मीठा पराठे जैसा होता है ना? ". 
'तुमचा जन्म पराठ्यांतच जायचा' हे मनातच म्हणून आणि मनातच म्हटलंय ना ही खात्री करेपर्यंत तिकडे एका कर्नाटकी मैत्रिणीने तोंड उघडलं,"अरे दॅट इज आवर ओबट्टू. वी मेक इट विथ ऑल पर्पज फ्लॉर". 
चिडचिड नुसती. माझ्या पुरणपोळीचं तिने बोबट्टू केलं ना? बराच वेळ मग थालीपीठ, चकुल्या, भरलं वांगं आणि अजून काय काय सांगत बसले. तोंडाला कोरड पडली बोलून बोलून. पण महाराष्ट्राचा एखादा प्रसिद्ध पदार्थ काही यांच्या पदरात पडेना.  शप्पथ सांगते, आज पुण्यात असते ना? तर चितळ्यांच्या माव्याच्या, तिळाच्या पोळ्या आणि दोन चार बाकरवाड्यापण तोंडावर मारून आले असते त्या पंजाबीणीच्या. खरंच, मराठी माणसाचं मराठीपण टिकवल्याबद्दल चितळ्यांच्या अभिमानानं ऊर भरून आला माझा.

        घरी येताना गाडीत बसले की मी सुरु झाले. नवऱ्याला म्हटलं, "तुला सांगते आपण ना मराठी माणसं....". माझी गाडी तिथेच अडकलीय कळून चुकलं बिचाऱ्याला. काय करणार तोही मराठी नवरा. ऐकून घेतलं त्याने हो... 
मी पुढं बोलले,"आपण मराठी माणसं ना स्वतःच्या जेवणातही कमीच पडलो बघ. आता हे साऊथ इंडियन लोकांनी कसं त्यांचं जेवण जगप्रसिद्ध केलं आहे? इडली, डोसा आणि राईस. बास तीन शब्दांत संपले. तिकडे नॉर्थला पराठा, PBM आणि CTM म्हंटले की झाले."
"PBM?", नवरा.
"पनीर बटर मसाला रे आणि चिकन टिक्का मसाला. ही नावे सांगितली की कसं नॉर्थ इंडियन पदार्थ आहेत ते कळून जातं. त्यात समोसा आहेच. पण आपल्या पदार्थाना ना काही मान-सन्मान ना आयडेंटीटी. अर्थात त्याला आपणच दोषी आहे. मी तर म्हणते मी आता डोसा आणि पनीर सर्व बंदच करणार आहे बनवायचं. "

माझ्या बोलण्यावर मागे बसलेल्या आमच्या इंग्रजाळलेल्या पोरांनी भोंगा पसरला,"That's not fair आई!!!!".
त्यांना बघून वाटलं,'आधी यांनाच सुधारलं पाहिजे'. पण सध्या दुसरा लढा लढत असल्याने ते 'आई' म्हणत आहेत यावरच समाधान मानून गप्प बसले आणि नवऱ्याशी बोलायला लागले. 

म्हटलं,"मराठी माणसाला आयडेंटिटीच नाही काही. तू सांग बरं, एखाद्याला आपल्या फेमस पदार्थाचं नाव सांगायचं तर काय सांगशील? इथे कसे ते इटालियन लोकांनी पिझ्झा जगभर नेला. या अमेरिकन लोकांचं बर्गरही पोचलं भारतात. पण आपल्याकडे काय आहे? आठवतंय? आपलं उगाच थालीपीठाची रेसिपी सांगावी लागते." दुपारची माझी हिंदीमध्ये 'थापण्याची' रेसिपी सांगण्याची कसरत आठवून कसंतरी झालं परत. 
माझा मराठीचा कळवळा पाहून जरा गंभीर होऊन नवऱ्याने सहभाग घेतला,"असं कसं म्हणतेस तू? आपल्याकडे असते ना सुरळीची वडी, पाणीपुरी, पावभाजी."
"हे बघ, तुझं ना भूगोलच कच्चं आहे.", मी वैतागले आणि 'हिच्याशी बोलण्यात अर्थ नाही' हे समजून नवराही. पण ऑफिसमध्ये लीडच्या रोलसाठी मला सर्वांना कसे समजून घेतले पाहिजे हे नुकतंच कळलं(कळवलं) होतं. त्यामुळे मी जरा समजुतीचा पावित्रा घेतला. नाहीतर मी सोडते का? 
" अरे, पाणीपुरीला इतकं युनिव्हर्सल केलं आहे लोकांनी आणि शिवाय प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव वेगळं. त्यामुळे ती 'आपली' म्हणता येत नाही रे. नाहीतर ते बॉंगाली येतील लगेच 'आमोर पुचका' म्हणत. खांडवी, खमण आणि पावभाजी म्हणजे एकदम गुजराती. त्यावर मराठीचा ठप्पा नाहीये ना.  मराठी म्हणजे कसं एकदम भारदस्त पाहिजे. नुसतं नाव घेतलं तरीआपली ओळख पटली पाहिजे."
आता नवराही विचार करू लागला किंवा मी अजून त्याच्या भूगोलाची परीक्षा घेईन असे वाटल्याने गप्प बसला असेल. घरी गेल्यावर त्याने पुरी भाजी, श्रीखंड, मिसळ, वडापाव अशी नावं घेतली. मीही मग कुठले कुठले पदार्थ खास मराठी आहेत याचा विचार करू लागले. वाटलं, आपणच आपली पब्लिसिटी करत नाही. 'नाहीतर भारतात सगळीकडे ढाबे आणि उडपी हॉटेल सारखे 'झुणका-भाकर' केंद्रही झाले असते' असं मला ठाम वाटू लागलं.
        पुढच्या काही आठवड्यात ऑफिसमध्ये पॉटलक करायचं ठरलं आणि मी विसरून गेलेल्या मुद्द्याने पुन्हा डोकं वर काढलं. बिचारा नवरा आताशी कुठं 'सुटलो' असा विचार करत असणार. पोरांनाही मी नाईलाजाने इडली आणि पालक पनीर करून दिलं होतं एकदा. त्यामुळे पोरंही बिचारी खुश होती. असं निवळलेलं वातावरण असताना हे 'पॉटलक' निघालं होतं. तुम्हाला सांगते, डोकं फुटायची वेळ आली विचार करून. आपल्या राज्याची संस्कृती दाखवणारा एखादा पदार्थ कसा बनवायचा? खूप राग आला त्यावेळी 'मराठी लोकांचा'. एक साधी रेसिपी तुम्ही जगाला देऊ शकला नाही? काय हे? म्हणे अटकेपार झेंडा रोवला. 
      बरं त्यात इथे मदतीला कुणी नाही, त्यामुळे ती पुरणपोळी करणं म्हणजे पुढचे पाच दिवस घरच्यांची उपासमार. शिवाय आपल्याला आली पण पाहिजे ना? नाहीतर 'आ बैल मुझे मार' व्हायचं. यात बाकीही बऱ्याच अटीही होत्याच. त्यादिवशी ऑफिसला पटकन करून नेता आलं पाहिजे, गरम करायला किंवा वाढायला, डब्यातून न्यायला सोपं पाहिजे. शिवाय अमेरिकेत त्यातलं सर्व साहित्य मिळायला हवं. डोळ्यासमोर त्या पंजाबीणीचे सामोसे तरळत होते आणि तिकडे इडल्या. 
       एका संध्याकाळी नवरा म्हणाला,"एक काम कर वडा-पाव नाहीतर मिसळपाव बनव. चांगली आयडिया आहे की नाही?" त्याच्या कल्पनेवर मीही खूष झाले. पण यात एकच गडबड होती ती म्हणजे 'पावाची'. 
"आपले मराठमोळे मावळे काय पाव बनवायला बेकरीमध्ये थोडीच गेले होते? ", माझ्या या युक्तिवादावर नवऱ्याने फक्त घर सोडून जायचं बाकी राहिलं होतं. 
मी म्हटलं तसं नवऱ्याला,"अरे तू विचार कर ना? ते समोसे बेकरीतुन थोडीच आणत असतील पंजाबी लोक? एकदम घरगुती पदार्थ पाहिजे. ऑथेंटिक."
"आपण तर बुवा बेकरीतूनच आणतो समोसे", नवऱ्याने परत टाकला होता. 
नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष करुन मी पुन्हा विचार करायला लागले. रात्री वरण फोडणी टाकताना त्याच्यात हिरव्या मिरच्या घालत होते आणि एकदम आठवलं,"ठेचा". तो आर्किमिडीज पण इतका ओरडला नसेल तितक्या जोरात नवऱ्याला हाक मारली मी. 
"अरे, मिळाली मिळाली रेसिपी मिळाली." मी ओरडले. त्यानेही 'सुटलो' चा निःश्वास टाकत आनंद व्यक्त केला. 
दुसऱ्याच दिवशी मग इंडियन स्टोअर मध्ये जाऊन मी अर्धा किलो मिरच्या आणल्या, होय अर्धा किलो. किती डॉलर झाले ते विचारू नका. आणि तेही एकदम तिखट 'थाई चिली'. इथल्या त्या अमेरीकन मोठ्या, कमी तिखट असलेल्या नाही हं. पिशवीतल्या इतक्या मिरच्या बघून पोरं घाबरली होती. आधीच वरणातल्या मिरच्यांनी त्यांना पिडलं होतं त्यात इतक्या मिरच्या. शिवाय आपली आई 'मराठीपण' संचारल्यावर कशी असते ते त्यांना चांगलंच ठाऊक होतं. एकदा झणझणीत मिरचीचं पिठलं त्यांना खाऊ घातलं होतं मी. मग काय सोडते काय? 

       सगळ्यांत आनंदाची गोष्ट म्हणजे त्या ठेच्याला कष्टही कमी होते. एकदा मिरच्या परतून ठेवल्या की झालं. पोळ्या-बिळया लाटायची गरज नव्हती. 'आपल्या पुरणपोळीला आपण केवळ आळशीपणामुळे डावलत आहे' अशी थोडी मनात लाज वाटली स्वतःचीच पण आधी लगीन कोंढाण्याचं होतं.. पोळ्या काय सणाला केल्याच असत्या. घरी येऊन उत्साहाने मिरच्या निवडल्या. तेलात भरपूर लसूण, जिरे, मिरच्या आणि कोथिंबीर घालून परतून घेतलं. वाह..... काय ठसका उठला होता म्हणून सांगू. खोकणाऱ्या पोरांनी फक्त इमर्जन्सीसाठी '९११' कॉल लावायचं बाकी ठेवलं होतं. पण मी माघारी हटणार नव्हते. एखादा आलाच पोलीस विचारायला तर त्यालाही त्याच मिरच्यांची धुरी दिली असती मी. नाद नाय करायचा. 

      आता परतलेले सर्व मिश्रण, मिरच्या ठेचणे हेच काम बाकी राहिलं होतं. खलबत्यात त्या घातल्या आणि पहिल्या बुक्क्यालाच एक मिरची फटकन फुटून डोळ्यात उडाली. झाला ना घोळ. नेहमी.... मी हे अशी उत्साहाच्या भरात उद्योग करते. नळाखाली जाऊन भराभरा थंड पाणी डोळ्यांवर मारून घेतलं. डोळे लाल झालेच होते पण नशीब उघडले तरी. आता एक मावळा घायाळ झाल्यावर दुसऱ्याला पुढाकार घेणं भागच होतं. नवरा मेकॅनिक इंजिनियर असल्याने जरा हुशार होता. माझी अवस्था बघून त्याने सेफ्टी गॉगल घातले आणि (बहुदा मनातल्या मनात मला शिव्या देत) मिरच्या चांगल्याच ठेचल्या. मी एका डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवून ललिता पवार स्टाईलमध्ये लक्ष ठेवून होतेच. हातात ग्लोव्हज घालून सगळा ठेचा एकत्र करून नवऱ्यानेच एका डब्यात काढला. मी म्हटलं त्याला,"काय तू असा सेफ्टी गॉगल आणि ग्लोव्हज घालणारा मराठी माणूस?" पण माझ्या ललिता पवार पेक्षा तो बराच म्हणायचा. सगळा ठेचा डब्यांत पाहून मला एकदम टेन्शन आलं ना? अर्ध्या किलो मिरच्यांचा इतकुसाच ठेचा झाला होता. माझं त्यापेक्षाही छोटं झालेलं तोंड पाहून त्रासलेल्या नवऱ्याने भरभरून मिठी मारली आणि दामटून झोपवलंही. 

       जाम टेन्शन मला त्या पॉटलकचं. आमच्या दाक्षिण्यात्य मैत्रिणीने ह्या भल्या मोठ्या डब्यांत इडली आणि सांबर आणलं होतं, कुणी छोले, कुणी पनीर (तेच आपलं PBM हो), पंजाबी मॅडमनी सामोसे आणलेच होते आणि शिवाय कचोरीही. 'भलतीच दाखवायची हौस' असा मेसेजही मी माझ्या नवऱ्याला केला. या सगळ्यांत एका कोपऱ्यात माझा ठेच्याचा डबा बिचारा दबून बसला होता. माझा चेहराही पडलाच होता. लोकांना आपल्या मराठी प्रांताची माहिती देण्यासाठी तो पुरेसा वाटत नव्हता. जेवायच्या वेळी सगळ्या टाईपचे राईस आणि बाकी लोकांचे पदार्थ घेऊन प्लेट तुटायची वेळ आली. एका कोपऱ्यात ठेचाही घेतला. सर्व घेऊन जेवायला बसलो आणि मॅडमनी विचारले,"सामोसा खाया क्या? कैसा बना है?". सामोशाच्या तोबरा भरूनच मी मान हलवली. काय बोलणार ना? तिने पुढे विचारलं,"तुमने क्या बनाया है?". 
मी माझ्या ताटातल्या एका कोपऱ्यातला थोडासा ठेचा तिला दाखवला. तिने एकदम भाजीसारखा उचलला. तरी मी म्हटलं तिला,"अरे वो तिखा है बहोत".
"मै खाती हूँ रे" म्हणत तिने तो तोंडात टाकला. मी बघतंच बसले. आमच्या अक्ख्या जन्मात कधी कुणी इतका ठेचा तोंडात टाकला नव्हता. पुढच्या क्षणाला अख्ख्या फ्लोअरला ऐकू जाईल अशी किंकाळी ऐकू आली आणि माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. इडलीच्या घासाबरोबर ते पट्कन लपवलं मी. मग पंजाबी आणि तिकडे साऊथ इंडियन मैत्रीण दोघीही पाणी घ्यायला पळाल्या. त्यांच्या भराभरा पडणाऱ्या भारदस्त पावलांनी फ्लोअर दणाणून गेला. 'क्या हुआ?' असं म्हणायचीही संधी त्यांनी मला दिली नव्हती. घटाघटा १-२ बाटल्या पाणी त्यांनी ढोसलं आणि डोळे पुसत टेबलवर येऊन त्या बसल्या. इतक्यात त्या सर्व प्रकाराची बातमी पसरली होती. मागे राहिलेल्या ठेच्याला आता सेलेब्रिटीचं रुप आलं होतं. सर्वानी एकमेकाला धोक्याची सूचना देत कणभर का होईना चव घेण्यापुरता ठेचा ताटात घेतला होता. हा हा म्हणता, गुगलवर १०००-२००० सर्च तरी आले असतील 'ठेचा' वर. त्या पंजाबीणीच्या अहंकाराला माझ्या ठेच्याने चांगलंच ठेचलं होतं. मी आपली हा सगळा प्रकार ठेचा तोंडी लावत पाहून घेतला. 

घरी जाताना चाटून पुसून खाल्लेला तो डबा दाखवून सर्व प्रसंग नवऱ्याला सांगितला. म्हटलं, "आयुष्यात विसरणार नाहीत मी कुठली आहे ते....".  धारातीर्थी पडलेल्या मैत्रिणी आणि मराठी ठेच्याने अमेरिकेत मराठ्यांचं गाजवलेलं नाव यासर्वांनी जाम खूष झाले मी. माझा मराठी बाण कसा बरोबर बसला होता. एक गड सर केला होता. आता फक्त त्या 'आँटी' बाकी होत्या. :) 


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
       

Monday, April 24, 2017

कथा - व्यथा कढीपत्त्याची

       मला आमच्या जवळच्या इंडियन स्टोअर मध्ये मिळणारी एका ठराविक ब्रँडची (डाएट) भेळ मिक्स आवडते. डाएट हे फक्त नावाला लिहिलेलं असावं कारण शेव वगैरे भरपूर असते. पण नेहमीच्या चिरमुऱ्यांपेक्षा ते जास्त कुरकुरीत लागतात त्यामुळे मी तेच पाकीट हट्टाने आणते.  ते खरेतर फक्त फोडणी टाकलेले चिरमुरे, शेव आणि फरसाणअसतात. घरी आणून त्यात मग कांदा, टोमॅटो, कैरी, गोड चिंचेची चटणी मिक्स करून मस्त भेळ बनते. आठवड्यातून २-३ वेळा तरी एक वाटीभर खाल्ले जाते. परवा असाच खाऊन झाले आणि थोड्या वेळाने बहुदा ओठांवर त्यातला एक कढीपत्त्याच्या कण तसाच राहिला असावा, तो तोंडात आला आणि बराच वेळ कढीपत्त्याची चव रेंगाळत राहिली. :) किती अगदी इतकासा तो कण पण किती चविष्ट.
       तर कढीपत्त्याच्या नावाबद्दल मला एक शंका आहे. आयुष्याची अनेक वर्षे मला असंच वाटत आलं की कढीमध्ये घालतो म्हणून त्याला 'कढीपत्ता' म्हणतात. त्यामुळे शिकागोमध्ये असताना कढीपत्ता मिळाला नाही म्हणून अनेक वेळा मी कढी केली नाही.  पण पुढे जेव्हा काही ठिकाणी विना कढीपत्त्याची कधी मी खाल्ली तेव्हा मला जरा धक्काच बसला. :) अनेक उत्तर-दक्षिण भारतीय लोकांना 'करीपत्ता' म्हणताना ऐकले तेव्हापासून मनात ही शंका निर्माण झाली. 'कढीपत्ता' की 'करीपत्ता'?  पण मग 'करी' हे तर इंग्रजी नाव झालं? त्यापेक्षा  कढीपत्ता हे जास्त भारतीय वाटतं. असो. कुणाला याचं उत्तर माहित असेल तर जरूर सांगा.
       भारतात असताना कधी कढीपत्त्याची किंमत जाणवली नाही जितकी अमेरिकेत. एकतर आईकडे दारातच मोठं झाडं आहे(रोप नाही झाड). अनेकदा तर आई तेल भांड्यात टाकून फोडणीसाठी पानं तोडायची. अर्थात आम्हाला त्यासाठी पळायला लावलं की चिडचिड होणारच आमची. पण दारातच असल्याने कधी त्याची कमतरता वाटली नाही. आणि दुसरे म्हणजे पुण्यात  भाज्या आणायला एकतर गेलं तर तिथे भाजीवाल्या मावशी दोन काड्या तशाच देऊन टाकायच्या. त्यामुळे कढीपत्त्याची जुडी कधी विकत घ्यावी लागली नाही. पण इथे मात्र मोजून २-३ काड्या असलेल्या एका प्लास्टिक पिशवीची किंमत १ डॉलर. सढळ हाताने वापरायची सवय असल्याने एका पाकिटात काही होत नाहीच. त्यामुळे कमीत कमी ३ तरी घेऊन यायचीच. कधी मुळातच थोडे खराब असलेली पानं अजून काळी पडून जातात म्हणून मग थोडे दिवस धुवून पुसून पेपरमध्ये गुंडाळून डब्यात घालून फ्रिजमध्येही ठेवत होते. पण इतक्या शिस्तीत काम नियमित केलं तर काय ना? कधीतरी खराब होतातच. तर कधी  ऐनवेळी संपली तर अजून चिडचिड.
      यावर उपाय म्हणून मग मागच्या ट्रिप मध्ये ताजा छान वासाचा बराच कढीपत्ता धुवून सुकवून तेलात परतून आईंनी डब्यात भरून दिला. तेव्हापासून कधी ऐनवेळी संपला तर निदान सुकलेली २-४ पाने का होईना टाकता येत आहेत. आता तोही संपून जाईल. तर हे असं कढीपत्ता पुराण. आता इतकं काय सोनं लागून गेलंय त्याला असे वाटेल. पण आपल्या काही ठराविक पदार्थांना त्याच्याशिवाय चव नाही. सर्वात पहिले म्हणजे, मस्त भरपूर आले, लसूण आणि कढीपत्ता घातलेली कढी. त्यानंतर नंबर येतो तो वरण किंवा आमटीचा. केवळ हळद, हिंग, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता असला तरी किती चव येते साध्या वरणाला. आमटीचे तर मग विचारून नका. पुरणपोळी सोबतच्या कटाच्या आमटीमध्ये तर भरपूर कढीपत्ता पाहिजेच. आजकाल मी छोले भिजवून उकडून त्यांना केवळ जिरे मोहरी,लाल तिखट, कढीपत्ता, चाट मसाला याची फोडणी देते त्यातही आले लसूण कांदा टोमॅटो यातले काहीही नसते. तरीही स्नॅक किंवा दुपारच्या जेवणात ते सुके छोले खूप छान लागतात, केवळ कढीपत्यामुळे.

      दुसरे महत्वाचे पदार्थ म्हणजे भडंग आणि चिवडा. खरपूस भाजलेला कुरकुरीत कढीपत्ता त्यात हवाच. तोही भरपूर. प्रत्येक घासासोबत त्याचा बारीक तुकडा तरी तोंडात आला पाहिजे. पोहे, उपीट, फोडणीची पोळी, फोडणीचा भात यातही आलाच. बटाट्याची भाजी, दहीभात यासर्वांत बाकीच्या सामग्रीसोबत आपलेही वेगळेपण तो जाणवून देतोच. शेंगदाण्याच्या चटणीमध्येही छान लागतो. टिपिकल महाराष्ट्रीय पदार्थांत कढीपत्ता घालायचे हे तर ठरेलेलंच असायचं. पुढे अनेक लोकांशी ओळखी झाल्या तसे अजून तो आवडू लागला. खांडवी किंवा ढोकळ्यावर असलेल्या फोडणीमधून त्याची चव अजूनच खुलते असं वाटतं.
       अनेक दक्षिण भारतीय मॆत्रिणीमुळे नवीन पदार्थ शिकले. इडली-डोसा सोबत खोबऱ्याच्या चटणीवर घालायच्या फोडणी मधला कढीपत्ता, पुढे जाऊन टोमॅटो आणि शेंगदाणे असलेली चटणीही बनवू लागले. त्यात कढीपत्ता बारीक होऊन जातो त्यामुळे पूर्ण चटणीलाच त्याची चव असते. लेमन राईस, पुलिहोरा, बिसीबेळे, चटणी पावडर, पोंगल अशा अनेक पदार्थांची ओळख झाली आणि त्यातला कढीपत्ता आवडू लागला. सर्वात मोठा बदल होता तो म्हणजे मांसाहारी जेवणात. आमच्याकडे घरी कधीही अंडाकरी किंवा चिकनमध्ये कढिपत्ता मी खाल्ला नव्हता आणि कधी घालणारही नाही. पण एका मित्राकडे नारळाचे दूध, हिरव्या मिरच्या, भरपूर काळे मिरी आणि कढीपत्ता घातलेली अंडाकरी खाल्ली एकदा. आणि ती इतकी आवडली की बासच. तेंव्हपासून मीही तशी थोडी कमी तिखट करी बनवते. त्यातही कढीपत्ता हवाच. वर उत्तरेकडे मात्र पनीर, बटर चिकन किंवा छोले वा दाल माखनी मध्ये तो दिसला नाही आणि मीही कधी घालणार नाही.
     तर असा अनेकवेळा वापरला जाणारा कढीपत्ता रोजच्या स्वयंपाकाचा मुख्य घटक. मी पुण्यात असताना एक रोपटं लावलं होतं आणि ते थोडं वाढलंही होतं. त्याची काही पानं खुडल्यानंतर मात्र त्याची तितकीशी वाढ झाली नाही. बॉस्टनला येताना ते सोडून यावं लागलं. :( इथे काही ती रोपं लावणं थंडीमुळे जमत नाही. पण तरीही जो काही विकत आणेन अगदी सोन्यासारखा त्याचा पुरवून वापर करते. :) आज पोस्ट लिहितानाही काही पदार्थांची नावं आठवून तोंडाला पाणी सुटलं. :) पोस्ट लिहून झाल्यावर पुनः एक वाटी भेळ मिक्स घेऊन बसले. :) रात्री हे भरीत आणि कढी बनवली. मुलीने जेवण झाल्यावर येऊन मिठी मारली. म्हणाली,"जेवण तिखट होतं पण मस्त होतं." एकूण काय कढीपत्याने आजचा दिवस सार्थकी लागला. :)  

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/





Sunday, April 23, 2017

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई

       सुंदर चित्रं काढता न येणं, गाण्यासाठी आवाज चांगला नसणं या दोन  गोष्टी करता आल्या असतं तर..... असा विचार लाखो वेळा मनात येऊन गेला, अगदी लहान असल्यापासून. आमच्या शाळेत रांगोळी प्रदर्शन आणि स्पर्धा असायची. तिथे आपल्याच वर्गातल्या मुला-मुलींनी काढलेली सुंदर रांगोळी, सूर्यास्ताच्या वेळी पाण्यात दिसणारी बोट आणि त्याचं परफेक्ट प्रतिबिंब पाहून चॅन वाटायचंच पण आपल्याला हे जमत नाही याचं दुःखही. चित्रकलेच्या बाकी मुलांची वही पाहूनही तेच वाटायचं. 
        पहिल्या नोकरीत सेट्ल झाल्यावर एक मोठी चित्रकलेची वही, रंग सर्व घेऊन आले. त्या वहीची कल्पना मात्र मला स्वतःलाच खूप आवडली होती. प्रत्येक पानावर एक चित्र काढायचं बॅकग्राऊंडसाठी आणि त्यावर एक पुढे एक कविता. मोठ्या उत्साहाने त्यात अनेक कविता लिहिल्या. अनेक वर्षे ती सोबत घेऊन फिरलेही भारत, अमेरिका कॅनडाला. पुण्यात राहिलो तेव्हा मात्र ती तिथेच घरी ठेऊन आले. एका भारतवारी मध्ये त्यातली उरलेली पानेही पूर्ण केली. ती वही संपली तेंव्हा फार समाधान वाटलं अनेक वर्षांनंतरही ती वही पूर्ण करू शकले आणि दुःखही त्यात नवीन पान जोडता न येण्याचं. 
         शिकागो मध्ये असताना नवीनच वेड होतं, पेन्सिल स्केच शिकायचं. मग दोनेक पुस्तकं, अनेक पेन्सिलीचा सेट, असे सर्व घेऊन आले. त्यात थोडे स्केचेस काढलेही. पण या सर्व गोष्टी वेळेच्या प्रवाहात मागे पडून जायच्या. नोकरी बदल, मुलं झाली किंवा काय तर ब्लॉग लिहायला सुरुवात केली किंवा पळायला... अशा अनेक कारणांत नियमितपणे चित्रकलेवर कधी भर दिलाय असे झालेच नाही. पेन्सिल स्केच बद्दल कधीतरी ब्लॉग पोस्टही लिहिली एक. पण हौस काही टिकली नाही. पुढे काही वर्षांनी पुण्यात असताना मायबोलीवर जलरंग कार्यशाळेच्या पोस्ट वाचण्यात आल्या. त्या पाहून मग पुन्हा नवीन जलरंग, हँडमेड पेपर, ब्रश हे साहित्य व्हिनस मधून घेऊन आले. त्या कार्यशाळेच्या पहिल्या चारेक भागांपर्यंत नियमित शिकण्याचा प्रयत्नही केला. त्यापुढे काही नियमितपणा टिकला नाही आणि नेहमीप्रमाणे तेही बंद पडले. 
         आता तिथेच असताना दिवाळीच्या वेळी मैत्रिणीने दिवे रंगविण्याची कल्पना दिली आणि ते काम जोमाने सुरु झालं. गेले तीनेक वर्ष दिवाळीत पणत्या रंगविणे नियमित चालू आहे. त्यावरून छोटे फ्लॉवरपॉट रंगवून त्यांचा सेट बनवायची कल्पनाही सुचली. त्याप्रमाणे दोन रंगविलेही. अजून ४-५ बाकी आहेत पण तोवर दिवाळी आली आणि ते काम मागे राहिलं. मागच्या वर्षी काही अडल्ट कलरिंग पुस्तके घेऊन आले होते. त्यातही मन थोडे रमले. पण रंग भरण्यापेक्षा चित्र काढणे जास्त आवडत आहे असे वाटले. सोपे वाटले म्हणून वारली पेंटींगचाही प्रयत्न केला. एक छान वारली पेंटिंग बनवायचा विचारही आहे. थोड्या दिवसांपूर्वी मंडला डिझाईनचे कॅनवास बनवायची कल्पना सुचली आणि तेही करून पाहिलं. त्याचे मोठं कॅनवास बनवायचे होते तेही पूर्ण केले. बरेच दिवसांपासून daisy चे चित्रं काढायचे होते. गेल्या ५-६ दिवसांत लिहायचे सोडून ते करत बसले. आता ते पूर्ण झाल्यावर जरा शांत वाटत आहे. 
        या सर्वातल्या एकेकाचे फोटो इथे शेअर करतेय. एक तर नक्की आहे की अनेक चित्रकार, कलाकार मी पाहिले आहेत त्यामुळे मला त्यांच्यापुढे अगदीच सामान्य वाटते. पण त्याचसोबत चित्रांची, रंगांची नेहमी भूल पडते. आपणही प्रयत्न करावेत असं वाटत राहतं. आज पोस्ट लिहिताना जाणवलं की गेल्या १२-१४ वर्षांत वेळ मिळालाय तेंव्हा काही न काही करण्याचा प्रयत्न नक्की केलाय. या कलेशी नक्कीच काहीतरी नातं आहे माझं. अनेक मोठ्या कलाकारांसारखे खूप सुंदर जमत नसल्याने कल्पनाशक्ती आणि कलाकृती मर्यादीत राहतेच. ती मर्यादा नेहमी जाणवत राहते. प्रश्न असा आहे की या इच्छेचं काय करायचं? ती इच्छा पुन्हा पुन्हा वर येतेच. 

      खरंच पुढे काय शिकता येईल, एखादी दिशा कशी देता येईल यावर कुणी काही सुचवले तर खूपच छान होईल. अर्थात जे काही करायचे ते आठवड्यातून २-३ तास देता येईल असे हवे. त्यात सलगता आणि प्रगती दोन्हीही पाहता आले पाहिजे असे वाटते. तुमच्या सूचना जरूर सांगा. :) कदाचित हे असं अधे मध्ये काही न करता एक मार्ग मिळेल अशी अपेक्षा आहे. :) 
      अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या केवळ योग्य दिशा नसल्याने राहून जात असतील. तुमच्याही अशा काही आवडी असतील त्यांनाही काही दिशा द्यायची असेल तर अशी यादी जरूर करून बघा. कदाचित तुम्हालाही उत्तर मिळेल. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/





Monday, April 17, 2017

काळ्यावरचं सोनं

       थोड्या दिवसांपूर्वी मायकल्स(Michaels) नावाच्या माझ्या आवडत्या आर्ट आणि क्राफ्ट दुकानात कॅनवास सेलवर होते. तेही मोठे. आता सध्या वेळ असल्याने हौस म्हणून ५-५ कॅनव्हासचे २ सेट आणले. शेजारीच नवऱ्याला काळ्या रंगाचे कॅनवास दिसले आणि तेही एकदम मोठे आणि स्वस्त. १८*२४ इंचाचे. थोड्या दिवसांपूर्वी मंडल डिझाईन लहान आकाराच्या कॅनवास वर काढून पहिले होते. तेव्हापासून मोठे करायचे इच्छा होती. मग काळ्या रंगाचे ४ कॅनवास घेऊन आले. यात मोठं फायदा हा होता की मागच्या वेळी काळा रंग देण्यातला बराच वेळ आणि रंग वाचला. लगेचच डिझाइन्स सुरु करता आले. पेन्सिलने आधी काढून त्यावर ब्रशने रंगवले. पण यावेळीही आधीसारखाच प्रॉब्लेम आला तो म्हणजे सोनेरी रंगाच्या मागून काळा कॅनवास दिसतोच. रंगाचे ३ हात दिले तरी अजूनही थोडे फिकट वाटत आहे. थोड्या दिवसांनी हुरूप आला तर अजून १-२ हात पुन्हा देईन पण सध्या इतकेच. :) घरात भिंतीवर लगेच टांगून टाकले. :)

        मोठा कॅनवास आणि बारीक डिझाईनमुळे थोडं दमायला झालं. पण एकदा सुरु केलं की एकदम तंद्री लागते. करत राहावंसं वाटतं. दमल्यासारखं वाटतं ते बंद केल्यावरच. ५ दिवसात साधारण पूर्ण झाले. खूप छान अनुभव आला. माझ्यासारख्या बेसिक चित्रकलाही येत नसलेल्या लोकांसाठी चांगले आहे हे असे वाटले. एकदा वर्तुळं काढली की झालं. एकदम सोपे आकार काढून चांगला परिणाम साधता येतो. स्वतः काहीतरी केल्याचा आनंद आहेच.

विद्या भुतकर.




Sunday, April 16, 2017

मैं अकेला ही चला था.....

     शनिवारी, यावर्षीची बॉस्टन ऍथलेटिक असोशियनची पहिली रेस झाली ५किमी अंतराची. यावर्षी १० किमी आणि हाफ मॅरॅथॉनही आहे. याला खरेतर रेस म्हटलंच नाही पाहिजे. कारण मला कुठेही पहिले बक्षीस मिळवायचे नसते. अर्थात हवे असले तरी ते काय जमणार नाहीये. :) इथे भले भले लोक सुसाट वेगाने पळत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करणे हे ध्येय नाहीच मुळी भाग घेण्याचे. पण तरीही आपलं लोक म्हणतात म्हणून 'रेस' म्हणायचं. तर ही ५किमीची रेस शनिवारी पार पडली. आता हे अंतर तसं फार जास्त वाटत नाही आणि नसतंही. शिवाय यावेळी ती सकाळी ९.३० वाजता होती त्यामुळे पोहोचायचं टेन्शन नव्हतं. त्यामुळे तसं निवांतच म्हणायचं.
      पण यावेळी भाग घेताना एक वेगळी मजा होती बाकी लोकांच्या सोबतीची. मागच्या वर्षी मी आणि संदीपच होतो फक्त. शहरात नवीन होतो, अजूनही नवीन ओळखी होत होत्या. यावेळी रजिस्ट्रेशन सुरु झालं तेंव्हाच मी ऑफिसमध्ये काही लोकांना आठवण करून दिली तर संदीपने त्याच्या ऑफिसमधील काही मित्रांना. त्यातील ५ जणांना तर रजिस्टर केलेही त्याच दिवशी. बाकीही अजून ४-५ मित्र-मैत्रिणींना आठवणीने विचारले आणि त्यांनीही रजिस्टर केले होते. बरं त्यातील एकीने तर पुढे जाऊन अजून तिच्या ४-५ मैत्रिणींना रजिस्टर करायला सांगितले. असे करत करत आमच्यासोबत अजून १२-१५ लोक तरी येणार होते.
     जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान एक तर बाहेर थंडी आणि बर्फ त्यामुळे बरेच जणांनी सराव केला नाही किंवा ज्यांनी थोडाफार केला त्यांचे पाय दुखायला लागले. काहींनी सराव करताना पाय का दुखत आहे, काय केले पाहिजे वगैरे विचारले. पण एकूण रेसच्या दिवसापर्यंत काही लोक तर नक्कीच गळून पडले. एक दोघांना आदल्या दिवशी बोलून 'चलाच' म्हणून आग्रहही केला. आता हे असे आग्रह करण्यात जरा टेन्शन असतं कारण उगाच कुठे काही दुखापत झाली तर? असा विचार असतो. पण हेही माहित असतं की एकदा तिथे पोहोचलं की सर्व ठीक होईल. फक्त ट्रॅकपर्यंत पोहोचायचा प्रश्न असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आग्रह कसा करायचा हे अवघडच गणित असतं. अर्थात ते आपल्या जवळच्या मित्रांनाच हे करू शकतो. 
      तर हे सर्व झाल्यावर आम्ही एकूण रेसच्या दिवशी १२ जण होतो. त्यातील ३ लोकांनी फक्त याआधी ५किमी रस मध्ये भाग घेतला होता. बाकी सर्वांना हा अनुभव नवीनच होता. त्यामुळे ट्रेनमध्ये जाताना किंवा कारमधून एकत्र जाण्यात अगदी ट्रीपला जाण्यात असतो तशी मजा वाटली. रेसच्या पार्कमध्ये गेल्यावरही बरेच जण नवीन असल्याने बॅग कुठे चेकइन करायची, कुठे उभे राहायचे, काय करायचे अशा साध्या गोष्टी होत्या पण त्या नव्या लोकांना सांगताना मजा येत होती आणि त्यांनाही अगदी कुणीतरी अनुभवी लोक सोबत असल्याचं समाधान. :) सर्वांचा उत्साह ओसंडून वाहात होता. रेसच्या आधी फोटो काढणे, अपलोड करणे, टॅग करणे वगैरे सर्व झालेच. रेस सुरु झाली आणि संपलीही. सर्वानीच त्यांच्या स्वतःच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या स्पीडने पूर्ण केली. 
       रेस संपल्यावर तर मग काय, मेडल घेऊन, टीशर्ट घालून एकेकाचे 'सोलो' मग ग्रुपचे असे अनेक फोटोसेशन झाले. ज्यांची ती पहिली रेस होती ते तर अजून खूष होते, ज्यांना जायचे की नाही अशी शंका वाटत होती तेही आलो या आनंदात होते. सर्व उरकून घरी निघालो. जातानाही जे लोक कारने सोबत आलो होतो ते सर्व सोबत होतो. नेहमीप्रमाणे मित्रांच्या घरी मुले होती. तिथे मैत्रिणीच्या आईनी छान स्वयंपाक केलेला होता. जेवण करून घरी येऊन गाढ झोप काढली. दिवसभर मनात एक वेगळंच समाधान होतं. मी आणि संदीपने दोघांनी या वर्षीच्या रेसला सुरुवात झाली याचं आणि आपल्यासोबत बाकी लोकांनाही या अनुभवाचा आनंद घेता आला याचं. 
      मी पुण्यात असताना किंवा इथे आल्यावर, जमेल तेंव्हा अनेक मित्र मैत्रिणींना व्यायामाचा किंवा पळण्याचा आग्रह करते. पुण्यात असताना केलेल्या एका रेसबद्दल पोस्टही लिहिली होती. कधी कधी वाटतं, 'जाऊ दे ना कशाला पाहिजे? आपण करतोय ते बास आहे. कशाला लोकांना आग्रह करायचा?'. पण प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी माझ्या मित्र मैत्रिणींनी अशा रेस मध्ये भाग घेतला त्यांनी नंतर मला आवर्जून सांगितले की 'बरं झालं गेले/गेलो ते'. या अशा अनेक अनुभवानंतर वाटतं,'जे केलं योग्यच केलं. मी आणि संदीप आता नियमित पळतो. त्यामुळे त्या दिवशीचं ते वातावरण,  रेसच्या नंतर मिळणारं समाधान, त्यासाठी ठरवून केलेला सराव हे तसं ओळखीचं झालं आहे. तोच आनंद बाकी लोकांनाही मिळावा आणि तो वाटता यावा हे तर अजूनच खास. खरंच ते स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही हे नक्की. म्हणूनच हा सर्व खटाटोप. 
      कधी कधी वाटतं याबद्दल लिहायचं की नाही? उगाच 'आपणच किती ग्रेट' टाईप्स लिहिल्यासारखं वाटतं. पण यातूनही कुणाला तरी पुन्हा व्यायामाची, पळायची इच्छा झाली तर तेही चांगलेच आहे. म्हणून प्रत्येक रेसनंतर आवर्जून पोस्ट लिहिते. प्रत्येकवेळी काहीतरी खास त्यात असतंच. यावेळचीही खास झाली ती आमच्या बॉस्टनमधल्या मित्र-मैत्रिणींमुळे. :) बॉस्टनमध्ये राहून जमा होत असलेल्या गोतावळ्याचं ते प्रतीक होतं. पुढच्या वर्षी अजून लोक सोबत असतील अशी अपेक्षा आहे. :) त्यादिवशी ग्रुप फोटो काढताना राहून राहून तो शेर आठवत होता,
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गये और कारवां बनता गया"
- मजरूह सुलतानपुरी

खरेच,"कारवां बनता गया". 
         
विद्या भुतकर. 

Friday, April 14, 2017

माझा सायकल प्रवास

       आमच्या घराजवळ एक सायकल ट्रेल आहे. एक जुनी रेल्वे लाईन होती ती काढून तिथे सायकलिंग साठी चा रस्ता बनवला आहे, मस्त सलग १० मैलापेक्षा जास्त लांबपर्यंत आहे. आम्ही मुलांना सायकली घेऊन त्यांच्यामागे रनिंग करत जातो. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नवऱ्याला सायकल घ्यायची होती. यावर्षी त्याची घेतली आणि मी एकटीच राहिले होते. थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठीही सायकल घेऊन आलो. काय माहित पण सायकल घेतानाही उगाच जमेल की नाही अशी शंका येत होती. एकतर माझी उंची कमी आणि सायकल चालवून बरीच वर्षं झाली आहेत. विकत घेण्यासाठी चालवून बघतानाही नीट जमत नव्हती. पण किंमत, उंची, रंग अशा महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊन टाकली. पुढच्या रविवारी आम्ही ट्रेल वर गेलो मुलांसोबत अनेक वर्षांनी सायकल चालवली.  सायकल चालवायला सुरुवात केली आणि खूप भीती वाटली. अजूनही तशी थोडी भीती वाटत आहेच. गियर वगैरे बदलता येत नाहीये, इ. पण सुरुवात झाली आहे. आजची पोस्ट माझ्या गेल्या अनेक वर्षातल्या सायकल स्वाऱ्यांबाबत. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर जरूर सांगा. :) 
        आयुष्यात उंची कमी असल्याचे अनेक तोटे आहेत हे अनेकवेळा जाणवले आहे. पण सर्वात जास्त पहिल्यांदा वाटले ते सायकल शिकताना. कमी उंचीमुळे सायकलवरून खाली कधी पाय टेकणार नव्हतेच. साधारण ६-७वीत असताना सायकल शिकलीच पाहिजे असे वाटले. तोवर बऱ्याच मुलींकडे वर्गात स्वतःच्या सायकली होत्या आणि त्यांना त्या चालवताही येत होत्या. माझ्याकडे दोन्हीही नव्हते. मी आणि माझी मधली बहीण सुट्टीच्या दिवशी वडिलांची सायकल घेऊन घराच्या मागे असलेल्या मोठ्या खाजगी रस्त्यावर जायला लागलो. एकतर ती जेन्टस सायकल, त्या दांडीच्या मधून पाय घालून शिकणे म्हणजे अवघडच. त्यात पडताना धरायलाही बहीणच, म्हणजे मोठं कुणी नाही. 'एकदा पेडल मारायला यायला लागलं की झालं आली सायकल' इतकंच ध्येय होतं. दोघी मिळून किती वेळा पडलो असू माहित नाही. त्यात आजूबाजूला घाणेरीची झुडपं गेलं की त्यात झुडूपातच. पण कशीबशी शिकलो. 
        आता सातवीत मला सायकल यायला लागली. मला नेहमी वाटायचं की लेडीज सायकल असेल तर किती नीट चालवत येईल. अनेक वेळा शाळेतल्या मैत्रिणीची सायकल दुपारच्या सुट्टीत मागून घेऊन चालवायची. कधी ती हो म्हणेल कधी नाही. हळूहळू मला नीट जमायला लागल्यावर मी घरी सायकल घ्यायचा हट्ट धरला. उत्तर 'नाही' होतं. एकदिवस मी अगदीच रागाने जेवण न करता एका खोलीत दार बंद करून बसून राहिले, दिवसभर. :) आता वाटतं किती बावळटपणा होता. असं केलं माझ्या मुलांनी तर मीही नाहीच म्हणेन. पण त्या रात्री शेवटी कुणी ऐकत नाही म्हणून खोलीतून बाहेर आले. माझ्या रुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून आजोबांनीं हळूच बोलावलं. म्हटले,"सायकल नाही पण घड्याळ घेऊ तुला." :) मग एक दिवस जाऊन आम्ही एक सेकंडहँड घड्याळ घेऊन आलो. :) (त्याचं पुढे काय झालं आठवत नाहीये. ) पण ते आयुष्यातलं पहिलं घड्याळ मिळालं. असो.  तरीही सायकलचा हट्ट होताच. तोही आजोबानी पूर्ण केला. 
    सायकलचा हट्ट पूर्ण व्हायला जरा वेळ लागला. तेव्हा मी आठवीत होते. आजोबांच्या ओळखीच्या माणसाकडूनच ती घ्यायची होती. मी त्यांना म्हटले, "मला बाकीच्या मुलींसारखी BSA ची सायकल हवी आहे". त्यांच्यादृष्टीने ऍटलासची सायकलच बेस्ट होती, एकदम टिकाऊ. :) त्यामुळे तीच घ्यायचे ठरले. त्यात दोनच पर्याय होते, २२ इंच आणि २४ इंच, मला छोटीच घ्यावी लागणार होती. ज्यादिवशी घ्यायची म्हणून दुकानात गेलो तर त्या माणसाने आणली नव्हती. मग अजून एक दिवस वाट पहावी लागली. अशा वेळी एक दिवस वाट पाहणे म्हणजे किती त्रासदायक असते ते कळते. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आजोबांसोबत जाऊन ती सायकल घेऊन आलो. काळी कुळकुळीत नवीन कोरी सायकल! कधी एकदा दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन जातेय असं झालं होतं. :) आता दुसऱ्या कुणाची सायकल चालवायची गरज नव्हती. हवी तेंव्हा, हवी तितका वेळ चालवता येणार होती. 
         दुसऱ्या दिवशी आवरून शाळेला निघणार तर दादा म्हणाले," सायकल चालवत नेऊ नकोस." 
मी रागाने विचारले,"का?"
तर म्हणे, 'मला सायकल गर्दीत चालवायची सवय नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी धडपडेन म्हणून हातात धरून चालत घेऊन जा' असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात मी ते ऐकलं नाहीच. :) पण आई-वडील म्हणून त्यांना तेंव्हा किती काळजी असेल हे आता जाणवत आहे. लवकरच मी नियमित सायकल घेऊन शाळेत जाऊ लागले. कधी गावात जाऊन सामानही आणू लागले. गावातल्या बसस्टँड जवळून सायकल नेताना भीती वाटायची, एकतर गर्दी आणि तिथे असणारा उतार. हळूहळू त्याच्याही सवय झाली. आता साधारण ४-५ महिने झाले असतील सायकल घेऊन. एकदा तोंडी परीक्षा देऊन घरी येत असताना घराच्या समोर मी रस्ता क्रॉस केला आणि क्षणभर कळलेच नाही, काय झाले होते. 
       मागून येणाऱ्या एका बाईकने मला जोरात धक्का मारला होता. आणि घराच्या गेटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मी कुठेतरी उडून पडले होते. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मातीत माझा चेहरा पूर्णपणे घासला गेला आणि पुढे मग मला हॉस्पिटलमध्ये कसे नेले वगैरे काही आठवत नाही. दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवून कुठे डोक्याला मार लागला नाहीये ना हे पाहिले आणि सोडून दिले. जी काही दुखापत झाली होती ती बरीचशी चेहऱ्यालाच होती. चेहऱ्यावर बरेच खरचटले होते, सूज होती. मला पाहायला वर्गातल्या सर्व मुली आल्या होत्या हे नक्की आठवतं. :) अनेक दिवस घरी राहून मग पुन्हा शाळा सुरु झाली. परीक्षा जवळ आल्या होत्या. ऊनही वाढलं होतं. लागलेल्या ठिकाणी उन्हाच्या झळा अजूनच त्रासदायक वाटायच्या. त्या परीक्षेला सायकलने गेले की नाही हे काही आठवत नाही. पण गेले असेन तर माझा हट्टच असेल तो. :) 
       पुढच्या वर्षी,९वीत पुन्हा सायकलस्वारी सुरु झाली. पण यावेळी सोबत लहान भाऊ होता. त्याची पहिली होती. 'शाळेत जायचे नाही' म्हणून तो हट्ट करायचा. त्याला शाळेत नेण्याची जबाबदारी माझीच. तिथेही आजोबांचं म्हणणं,"याला मागे बसवून सायकल चालवू नकोस. मागे बसव आणि तू चालत सायकल हातात धरून ने". काय लाड नुसते नातवाचे. :) पण हे असे अपवाद वगळता, सायकल आता एकदम सुरळीत चालू होती. ९वी-१०वी संपली आणि जुनियर कॉलेज मध्ये सायकलचे वेगळे पर्व आले. कॉलेज थोडे घरापासून दूर होते. (तीनेक किमी असेल पण तेव्हा ते खूप वाटायचे.) कॉलेजमध्ये आमचा मुलींचा एक चांगला ग्रुप जमला. मग आम्ही गावातून वेगवेगळ्या दिशांनी आपल्या बाजूला असलेल्या मैत्रिणीला घेऊन निघायचो. वाटेत कुठे भेट झाली की सगळ्या मिळून कॉलेजला. परत येतानाही एकत्र निघायचे आणि जिथून वेगळे होणार त्या ठिकाणी बराच वेळ गप्पा मारत रस्तातच उभे राहायचे. एकत्र जाताना अगदी रस्ता अडवूनच जायचो म्हणा ना. सायकलवरून जातानाही अनेक गप्पा व्हायच्या. तेंव्हाच्या त्या गप्पा आणि स्वप्नं वेगळीच होती. 
      पुढे इंजिनियरिंगला गेल्यावर वाटले सायकल सुटली. पहिल्या सेमिस्टर मध्ये चालतच सगळीकडे जायचो. पण कॉलेज खूप मोठं(तेंव्हा तरी वाटायचं). त्यात रूमवर यायला, जेवायला जायला इ बरंच चालावं लागायचं. म्हणून मग लवकरच घरून सायकल घेऊन आले. यावेळी बहिणीची छोटी रंगीत सायकल घेऊन आले होते. मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही अनेकदा माझ्या त्या सायकलवर डबलसीट जायचो. आम्हाला 'फिशपॉन्ड' पडला होता त्या वर्षी,"सोने की सायकल....". :) तेव्हा सायकल होती तर वाटायचे आपल्याकडे बाईक(स्कुटी) हवी. पण तीही चालवता येत नव्हतीच. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षात मित्राची MTB सायकल चालवायची भारी हौस होती. सगळीकडे घेऊन जायचे, मेसवर वगैरेही. भारी वाटायचे ती सायकल चालवायला. :) माझ्यामते बंडखोरीचं एक रूप होतं ते. अमुक एक प्रकारचीच सायकल का चालवायची असं काहीसं. असो.              कॉलेजची चार वर्षं संपली आणि सायकलचा प्रवासही संपला. नोकरी लागल्यावर गाडी घेतली आणि पुन्हा कधी सायकल चालवली नाही. मुलांना घेतली तेंव्हाही कधी वाटलं नाही आपल्यालाही हवी म्हणून. सानुला दोन वर्षांपूर्वी शिकवायला सुरुवात केली. तिला हळूहळू यायला लागलीही. पण एक दिवस लक्ष नसताना सायकलवरून पडून हात मोडून घेतला. हाड मोडले होते आणि तिच्या सर्जरीच्या वेळी उगाचच तिला शिकवली असं वाटलं. तिला भूल देत असताना पाहून खूप रडू आलं होतं. अजूनही ती चालवताना भीती वाटतेच. आता ती भीती कशी घालवायची माहीत नाही. माझ्या आई-वडिलांनी माझ्या अपघातानंतर मला कशी चालवू दिली काय माहित. मला तर जाम टेन्शन येतं. आयुष्याचं चक्र म्हणतात ते हेच असावं. :)
        तर असा मोठा प्रवास माझ्या सायकलस्वारीचा. तो सगळा आठवला तो नवीन घेतलेल्या सायकली मुळे. शाळेत, कॉलेजमध्ये सायकल चालवताना एक वेगळं विश्व् मिळालं होतं. एक प्रकारचं स्वातंत्र्य, आपलं दप्तर मागे लावून वाऱ्यासोबत जोमाने पुढे जायचं, उतारावरून सुसाट जायचं, रात्रीही काही सामान लागलं तर पटकन आणून द्यायचं. तिथपासून ते आताच्या भित्र्या 'आई'पर्यंत मोठाच प्रवास घडला.आता, भित्री आई ते पुन्हा त्या मोकळ्या, मनसोक्त जगणाऱ्या मुलींपर्यंत पुन्हा कधी येते काय माहीत.  :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


        

Wednesday, April 12, 2017

बाब्या मी इंजिनियर आहे !

मुलांना आपली आई नेहमीच कमी हुशार वाटते बहुतेक, निदान बाबांपेक्षा. म्हणजे आई म्हणून तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या कुशलतेत कधीही संशय नसतो. पण तेच एखादे खेळणे फिक्स करायचे किंवा टीव्ही, लॅपटॉप, किचकट खेळणी अशा गोष्टींचा विषय येतो तेंव्हा मात्र बाबाच भारी असतो. आता अर्थात आमच्याकडे तसे होऊ देण्यात माझाही हात आहेच.
एकदा संध्याकाळी ऑर्डर केलेले एक खेळणे घरी आले. आता पोरांना ते लगेच सुरु करायचे होते. मी आपली जरा निवांत टीव्ही बघत बसलेले असताना ते सर्व करायची माझी इच्छा नव्हती.
मी म्हटले, "मला नाही माहित त्यात काय घालायचे आहे."
स्वनिकने लगेच खेळणे चेक करून सांगितले, "त्यात बॅटरी लागणार आहेत" आणि स्वतःच स्क्रू-ड्रायव्हर घेऊन आला आणि AA बॅटरीही. आता नाईलाजाने टिव्ही बंद करून मला ते उघडावं लागलंच. त्यात पाहिलं तर AAA बॅटरी लागणार होत्या. त्या कुठे शोधणार, मग आठवले घरात वर लावलेल्या कागदाच्या दिव्यांमध्ये आहेत. म्हटले,"त्या वरच्या दिव्यापर्यंत माझा हात पोचणार नाही, बाबा आले की बघू."
आता माझे प्रयत्न आणि उत्साह पाहून त्याला कळलेच की बाबा आल्याशिवाय हे असलं काम होणार नाही.
शेवटी बाबा आल्यावरच त्यांचं काम झालं. 
      आपापली कामं वाटून घेतल्याने बरेच वेळा मी स्वयंपाक करताना संदीप मुलांचं आवरत असतो. किंवा त्यांना खेळायला बाहेर घेऊन जातो. अशा अनेक वेळा मी जेवण बनवत असताना तोच मुलांची खेळणी जोडणे इत्यादी कामं करतो. परवा मात्र हद्दच झाली. स्वनिकला काहीतरी टिव्हीवर लावायचे होते आणि त्यात काय सूचना लिहिल्या आहेत हे मी वाचेपर्यंत तो ओरडून रिकामा,"आई, प्रेस द स्मार्ट हब बटन, सिलेक्ट वेब ब्राऊझर, सिलेक्ट वेब ब्राऊजर". त्याचं ओरडणं ऐकून शेवटी मी म्हणाले,"बाबू जरा थांब, मी इंजिनियर आहे." 
अर्थात त्याचा माझ्यावर विश्वास नव्हताच. त्यामुळे तो पुढे बोललाच,"बाबा आले की करतील, जाऊ दे". 
       तर या अशा घटनांतून एक गोष्ट मला जाणवते की घराप्रमाणे मोठ्या माणसांची कामं तशी वाटून घेतली जातात आपल्या सोयीप्रमाणे.पण त्यातून मुलांचे आपल्या आई-वडील, आजी आजोबा यांच्याबद्दल किती सहज ग्रह निर्माण होतात? मुलीला लहान असल्यापासून माहितेय की (कुठलीच)आजी दुचाकी गाडी चालवत नाही, फक्त आजोबा चालवतात. तिचा तो ग्रह दूर करण्यासाठी एक आजी दाखवाव्या लागल्या मला पुण्यात. :) एकदा असेही झाले की मुलाना वाटत होते बाबांना जेवण बनवताच येत नाही. खरंतर, आम्ही दोघे असताना अनेकवेळा त्याने बनवलेही आहे पण आता कामाच्या वाटणीत स्वयंपाक करणे(भाजी फोडणी टाकणे आणि पोळ्या) माझ्याकडे असल्याने त्यांचा तसा ग्रह होणे स्वाभाविक आहे. तर मग त्यानंतर अनेकवेळा सॅन्डविच, सॅलड किंवा अंडाकरी असे ठराविक पदार्थ असले की संदीप करतो(मला काय तेव्हढेच बरे आहे!) आणि मुलेही त्याला मदत करतात. 
       माझ्यासारख्या अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण त्यातील किती जणींच्या मुलांना माहित असते की आपली आई काय करते? तिचं शिक्षण काय आहे? तिचे कलागुण काय आहेत? आमच्या मुलांना माहित आहे की मी लिहिते, चित्रं काढते, (त्यांच्यादृष्टीने) चांगला स्वयंपाकही करते. पण त्यापलीकडे बाहेरच्या जगात काय काम करते, कुणाशी बोलते, माझ्या कामामुळे लोकांना कसा फायदा होतो किंवा त्यांचे कुठले काम होते, हे सहज समजेल अशा भाषेत का होईना मुलांना सांगितले पाहिजे असं मला वाटत आहे सध्या. तसं मी सुरुही केलं होतं. अशी माहिती असल्याने मुलांच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टीत नक्की फरक पडेल. 
      बरं, नुसती आपल्या कामाची कल्पना देऊन उपयोग नाही. तर आपल्या घरातील कामांची अदलाबदलही करून पाहिली पाहिजे. म्हणजे, कधी गाडी चालवून कुठे जायचे असताना नवरा शेजारी आहे आणि मी गाडी चालवतेय किंवा तो जेवण बनवत आहे आणि मी त्यांचे ट्रेन ट्रॅक लावत आहे( हे अवघड आहे कारण ट्रेन ट्रॅक नवऱ्यालाच जास्त आवडतात पण आपलं उदाहरण) किंवा एखादी छोटी गोष्ट दुरुस्त करणे इत्यादी.  यामुळे मुलांच्या मनातील आई किंवा बाबा म्हणून एक जी प्रतिमा निर्माण होत असते लहान वयात त्यात आपण त्यांचे सर्व पैलू दाखवणं गरजेचं आहे असं वाटू लागलं आहे. 
      मागच्या आठवड्यात मी जेवण बनवत असताना मुलं आणि नवऱ्याने एक खेळणं जोडलं. माझ्या पोळ्या चालू असल्याने मी काही गेले नाही. थोड्या वेळाने त्या खोलीत गेल्यावर स्वनिकने मला दाखवलं आणि विचारलं,"तुला माहितेय का ही ट्रेन कशी चालते?". म्हटलं,"हो, ते ट्रॅक मॅग्नेटिक आहेत." माझं उत्तर ऐकून बराच वेळ आ वासून उभा राहिला, मग मी मोठ्याने म्हणाले,"बाब्या मी इंजिनियर आहे !". :) प्रत्येक आईने काही इंजिनियर असायची गरज नाही पण आपले सर्व गुण मुलांसमोर नक्की आणले पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? :) 

विद्या भुतकर.  
   

Monday, April 10, 2017

स्वर्गसुख

       सुट्टीच्या दिवशी सकाळ सकाळी ऊन घरात आलं. अजूनही थंडी होतीच तशी. उठून उत्साहाने मस्त झाडून घर साफसूफ केलं. सगळ्यांची तब्येत जरा नाजूकच होती. मग गरम गरम मुगाच्या डाळीची साधी खिचडी बनवली. तूप आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत परत परत घेऊन, पोटभरून खाल्ली. आणि सकाळी आवरलेल्या गादीवर,अंगावर पांघरूण घेऊन, बाहेरून येणाऱ्या उन्हाला पडद्यांनी अडवत, आडवी झाले . भरलेल्या पोटाने, डोळे जड झाले. उघडायचं म्हंटलं तरी पापण्यांवर मणामणाचे दगड बसले होते.
        कधीतरी कुठल्यातरी क्षणी झोप लागून गेली. जाग आली तेंव्हा ३ तास उलटून गेले होते. पोरांनी एकदाही उठवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी काय केलं हेही माहीत नाही. उन्हं उतरतीला आली होती. आळस द्यावा तितका कमीच. उठल्यावर एकदम अनेक वर्षांनी अशी मस्त झोप झाल्यासारखं वाटलं. गरम गरम चहा घेतला आणि जागी झाले.
        खरंच, स्वर्गसुख यापेक्षा अजून काय असतं?

विद्या भुतकर.

Thursday, April 06, 2017

अविस्मरणीय प्रसंग

कधी कधी एकदम साधेच पण अविस्मरणीय प्रसंग घडतात. आज असाच एक किस्सा पुन्हा डोक्यात आला, साधारण तीनेक वर्षांपूर्वी घडलेला. 
     रात्रीचे अकरा वाजलेले, रविवारी रात्री आम्ही पुण्यात वारजे पुलाखालून सर्व्हिस रोडने घराकडे येत होतो. रस्ता तसा बऱ्यापैकी सुनसान झालेला. मुलंही पेंगुळलेली. त्यात पाऊस जोरदार चालू होता, नेहमीपेक्षा जरा जास्तच. सर्व्हिस रोड तेव्हा छोटाच होता. आता थोडा वाढवलेला आहे. तर त्या रस्त्यावरून गाड्याच पाण्यातून इतक्या वेगाने जातात. तिथे चालायचे म्हणजे तारांबळच. अशातच आम्हाला एक वयस्कर जोडपे त्या रस्त्यावरून चालत जाताना दिसले. काकांच्या हातात बॅग आणि काकूंची पर्स असेल. दोघेही छत्री घेऊन कसेबसे पाण्यातून वाट काढत चालले होते. 
       त्या पुलापासूनच्या सर्व्हिस रोड पासून जवळच्या सोसायटींमध्ये जायला रिक्षावाले नाही म्हणतातच. हो म्हणाले तर एक-दोन किलोमीटर साठी खूप पैसे मागतात. त्यात असे सामान घेऊन असले लोक तर परगावचे आहेत ओळखून अजून जास्त. हे आम्हाला माहित होतेच. आता या दोघांकडे लक्ष जाण्याचे कारण म्हणजे, त्यांच्याकडे, त्यांच्या पेहरावाकडे पाहून एकदम संदीपचे आई-बाबा, म्हणजे माझे सासू सासरे वाटावे इतके साम्य होते. त्यांच्या वयात, कपड्यात, इ. मुख्य म्हणजे तेही असेच गावाहून येताना उतरले की रिक्षा करणार नाहीत. बसची वाट बघतात, तिथून स्टॉप पासून चालत येतात. त्यामुळे या दोघांना बघून आम्हाला कळले की हेही असेच रिक्षाला नाही म्हणून चालत आले असणार. 
      आम्ही त्यांचा विचार करत त्यांना क्रॉस केले. त्यांच्या बद्दल बोलतच 'थांबवूया का?' असा विचार करून लगेचच गाडी थांबवली. मागे येऊन त्यांना विचारले,'तुम्हाला कुठे जायचे आहे? सोडतो म्हणून'. तर काका म्हणाले,'अरे नाही तुमची गाडी ओली होईल'. आजही ते वाक्य आठवलं की खूप विचित्र वाटतं. माणसे इतकी साधीही असू शकतात? म्हटले,'असू द्या हो काका'. मग मी काकांना कारमध्ये पुढच्या सीटवर बसवून मागे आले. मागच्या सीटवर मुलांच्या कारसीट लावलेल्या होत्या. त्यामुळे मागे ३ च लोकांना बसता येत होते. मुलाला मांडीवर घेऊन मीच त्याच्या कारसीट मध्ये बसले. म्हटलं, ५-१० मिनिटांचा तर प्रश्न आहे. त्यांना जिथे जायचे ती सोसायटी घरापासून ५ मिनिटेच पुढे होती. त्यांना सोडून मागे यायचे म्हटले तर त्यांना तेही वाईट वाटत होते की आम्हाला मागे फिरून यावे लागेल. काय लोक असतात ना? 
     आत बसल्यावर आम्हाला वाटले तेच त्यांनी सांगितले, रिक्षावाले कसे नाटक करतात, यायला तयार होत नाहीत,इ. त्यांच्या बोलण्यावरून शंका आली म्हणून विचारले तर ते धुळ्याचे होते, म्हणजे संदीपला अजून जवळचे. त्याने त्यांना विचारले नाव काय? त्यांनी आडनाव सांगितले तर, तो म्हणाला, याच आडनावाचा माझा एक मित्र होता कॉलेजला. त्याचं नाव त्याने सांगितलं तर कळलं, ते त्या मित्राचेच आई-वडील होते... काय योगायोग ना? आता कॉलजला परगावी असल्यावर प्रत्येकाचे आई-वडील माहीत असतातच असं नाही. त्यामुळे ते ओळखीचे नसणे शक्य होतं. पण ते असे या पद्धतीने भेटणं? योगायोगच होता तो. त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये सोडलं तर म्हणाले मुलगा अमेरिकेतच असतो, आम्ही राहतो इथे कधी कधी या सोसायटीमध्ये. 
       त्यांना सोडून परत येताना विचार करत होतो, पैसे हा प्रश्न नसतोच मुळी. मुलगा, ते सुस्थितीत असूनही  कुणीतरी ज्यादा पैसे रिक्षासाठी घेत आहे ते त्यांना पटत नव्हतं. त्यासाठी मग पावसात भिजत यायला लागलं तरी चालेल. तसेच माझ्या घरी, संदीपच्या घरी छोटया छोट्या गोष्टींवरून ही अशी तत्त्वं पाहिली आहेत. वाटले, या अशा छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी त्यांच्या पिढीच्या पुढे पास होतील का? आपण हे रिक्षाचे दर पटत नाही म्हणून भिजत चालत येऊ का? आणि दुसरं म्हणजे, आपल्या पिढीला आई-वडिलांनी शिकवलं म्हणून त्यादिवशी त्या काका काकूंना विचारण्यासाठी थांबलो, गाडीत घेऊन आलो. त्यामुळेच आपल्या मित्राच्या आई-बाबांना मदत केल्याचं समाधान लाभलं. यापुढच्या पिढीकडे ते गुण येतील का? 

खरंच काही किस्से असे अविस्मरणीय असतात. :) 

विद्या भुतकर.

माझा लेख लोकमतच्या ऑनलाईन ऑक्सिजन पुरवणीमध्ये

माझा लेख लोकमतच्या ऑनलाईन ऑक्सिजन पुरवणीमध्ये. इथे जरूर वाचा. :) जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचणे, आपले अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना पळण्यासाठी, व्यायामासाठी प्रोत्साहित करणे हे सर्वच एका पोस्टने होते. :)
 इथे पेजवरच्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच मला नेहमी विश्वास येतो सतत लिहिण्याचा. तुमच्या नियमित प्रोत्साहनासाठी  धन्यवाद.
विद्या भुतकर.

http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=4918

Monday, April 03, 2017

ओल्या हरभऱ्याची भाजी

         काही दिवसांपूर्वी 'स्वप्नाळू' नावाच्या कथेमध्ये या भाजीचा उल्लेख केला होता आणि काही प्रतिक्रिया आल्या की या भाजीची पाककृती नक्की सांगा. खरंतर मलाच ती भाजी इतकी आवडते आणि गेल्या अनेक वर्षात ती खाल्ली नाहीये त्यामुळे मलाही ती बनवायची संधीच होती. अनेक ठिकाणी ओला हरभरा शोधला पण इथे जे मिळतात ते डहाळे अगदीच दिसायला मोठे असले तरी आत बरेच छोटे दाणे होते. आणि तसे महागही. मागच्या आठवड्यात एक दिवस थोडे ओले हरभरे आणून आज सोलून त्याची भाजी करायचे ठरवले. अगदीच कमीदाणे निघाले. तसे झाले तर पर्याय म्हणून मी फ्रोजन सेक्शनमधून एक पिशवीही घेतली होतीच. नाईलाजाने तीच वापरावी लागली. कारण बरेचसे दाणे मुलीने सोलताना आणि भाजल्यावर खाऊन टाकले. :) असो. तर ही भाजी लहान असताना थंडीत खायचो. खूप म्हणता येणार नाही. कारण बरेचदा आईने हरभरा आणला तरी सोलून भाजी करण्याइतपत दाणे शिल्लक राहायचेच नाहीत. त्यातून ठरवून ठेवून भाजी करण्याचे प्रसंग तसे कमीच आहे. पण माझी ही आवडती भाजी आहे. :)

साहित्य: 
ओले हरभऱ्याचे दाणे साधारण २ वाट्या ,
जिरे, मोहरी, तेल, हळद, हिंग
लसूण पाकळ्या ३-४,
एक कांदा,
कांदा-लसूण मसाला २-३ चमचे( मसाला नसेल तर लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला)
शेंगदाण्याचा भरडलेला कूट(एकदम बारीक पेस्ट नको)
मीठ, साखर चवीनुसार

कृती:
     हरभऱ्याचे दाणे एका पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घेतले. त्यात थोडा जास्त वेळ गेलामाझ्या इंडक्शन स्टोव्हमुळे. सहसा १०-१५ मिनिट भाजावे. दाण्यांवर काळपट डाग दिसू लागतात. माझे फ्रोजन दाणे मुळातच काळे होते त्यामुळे ते अजून काळपट दिसू लागले. दोन्ही दाण्यांचे फोटो दिले आहेत खाली.
भाजलेले हरभरे थोडे थंड करून खलबत्त्यात ठेचून घ्यावेत. माझ्याकडे खलबत्ता वापरात नसल्याने मी मिक्सरमध्येच २-३ पल्समध्ये फिरवून बंद केले.
पॅनमध्ये तेल तापल्यावर जिरे, मोहरी हिंग घातले. त्यात लसूण खरपूस भाजून घ्यायचा.
मग कांदा परतून तो भाजल्यावर त्यात हळद, धनेजिरे पूड, तिखट किंवा कांदा-लसूण मसाला घालायचा.
तिखट परतल्यावर लगेच त्यात भरडलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. आमच्याकडे कूट जरा सढळ हातानेच पडतो.
कूट परतताना तो जळू नये याची काळजी घ्यावी.
त्यात ४ काप पाणी घालून उकळावे. पाणी उकळत असतानाच त्यात मीठ साखर घालून हलवावे.
भाजीतले पाणी उकळले की शेवटी भरडलेले हरभऱ्याचे दाणे घालावे.
भाजी झाकण बंद करून थोडा वेळ आणि पाणी जास्त झाले असल्यास उघडून शिजू द्यावी. दाणे हिरवे असल्यावर शिवाय आधी भाजून घेतल्याने भाजी लवकर शिजते. फोडणी ते भाजी साधारण २०-२५ मिनिटात होते. भाजीत थोडे पाणी राहू द्यावे, एकदम पातळही नको. रसरशीत भाजी चांगली लागते. थोडे तेल जास्त असेल तर अजून छान कट येतो. पण तो नसला तरी चवीत फरक पडत नाही.

मी भाकरी, पीठ-कूट घातलेली मेथीची भाजी आणि भाकरी केली होती. एकदम मस्त झाली. :) तुम्हीही करून बघा.




विद्या भुतकर.

Sunday, April 02, 2017

मंडला(मंडळं) डिसाईन

       मला एक गोष्ट लक्षात आलीय, बोलायला पैसे पडत नाहीत. अर्थात आधी एकदा म्हटलं होतं तसं माझ्या नोकरीत बोलायचेच पैसे मिळतात. पण अनेकवेळा अनेक मैत्रिणींशी अशाच गप्पा मारताना काहीतरी कल्पना सुचतात, कुणी त्यांना काय करायचं आहे हे सांगतं, मग मीही चार थापा मारून घेते. त्यातला आवडता विषय म्हणजे इंटेरीयर डिसाईन, चित्रकला, इ. त्यातल्या त्यात लोकांना घरात बदल सुचवताना मला तर अजिबातच पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या एखाद्या भिंतीवर काय चांगलं दिसेल किंवा कसा सोफा योग्य असेल असे अनेक सल्ले मी वरचेवर देत असते. तर हे असंच एक दिवस गप्पा मारताना एका मैत्रिणीने मला सांगितलं की तिला कॅनव्हासवर चित्र काढून ते तिच्या हॉलमध्ये लावायचे आहेत. त्यासाठी तिने 'Mandala designs' चा विचार केला आहे. 
       आता असे काही नवीन शब्द माझ्यासमोर बोलले की मी लगेच सुरूच झाले, ते काय असतं, कसे काढतात, कसे दिसतात, इ. इ. तिने मग मला गुगलून काही चित्रं दाखवली. ते पाहून म्हटलं, हात्तेच्या हे तर आम्ही शाळेत चित्रकलेला ही काढायचो. वर्तुळात रिपीट केलेले आकार आणि तेही एकदम एकसमान. शाळेत ती वर्तुळ काढून एकसारखे आकार काढून चित्र पूर्ण करायचा बराच उत्साह होता. त्या मैत्रिणीने दाखवलेले बरेच कॅनवास सोपे वाटले. त्यातच मेहेंदीचे डिसाईनही होते. पिंटरेस्ट वर बरेच प्रकार पाहिले. एकदा का हे असं खूप डोक्यात घुसलं की मग ते पूर्ण केल्याशिवाय राहवत नाही. 
        सुरुवातीला प्रयोग म्हणून मी ८ बाय १० च्या छोट्या कॅनव्हासवर हे काढून पाहिले. जितकं सोपं ते वाटत होतं अर्थात ते तितकं सोपं नव्हतंच. एकतर वर्तुळं काढायला घरात काही साहित्य नव्हतं. मग वेगवेगळ्या आकाराचे वाट्या, ग्लास, प्लेट घेऊन पेन्सिलने वर्तुळं आधी काढून घेतले आणि त्यावर कॅनवास रंगल्यावर पुसलेही गेले. :( मग परत वर्तुळं काढली. ब्रशने बारीक बारीक एकसारखे आकार काढताना जरा डोळ्याला ताण पडला. कदाचित मी चित्रकार वगैरे नसल्याने असेल. बाकी पहिलं बरंच एकसारखं छान आलं. 
        म्हणून अजून एक प्रयोग म्हणून त्यात मेहेंदीचे डिसाईन काढून पाहिले. मला काळ्या रंगावर सोनेरी काहीतरी काढून बघायचं होतं. माझ्या एक लक्षात आलं की काळ्या रंगावर सोनेरी कलाकुसर कितीही छान दिसेल असं वाटलं तरी काळ्या रंगावर कुठलेही रंग उठून दिसायला ते परत परत गिरवून काढायला लागले. त्यामानाने सोनेरी रंगावर निळा जास्त सोपा गेला होता. दोनीही ठिकाणी मी ऍक्रिलिक रंग वापरले आहेत. ऑफसेण्टर डिसाईनसाठी आता मोठे कॅनवास घेऊन एका टाईपचे २ किंवा ३ बनवून हॉलमध्ये ठेवता येतील असा विचार आहे. ते प्रत्यक्षात कधी होईल माहित नाही. तोवर हे केलेल्या दोन कॅनव्हासचे फोटो. तुम्हीही हे प्रयोग केले असतील तर नक्की सांगा. https://en.wikipedia.org/wiki/Mandala ही विकीची लिंक अधिक माहितीसाठी.
       सहज मैत्रिणीशी बोलता बोलता असं काहीतरी माहित झालं आणि प्रयोग करून बघता आलं याचा फार आनंद वाटला. असेच कधीतरी मैत्रिणीने बोलता बोलता दिवाळीच्या मातीचे दिवे रंगविण्याबद्दल सांगितलं आणि ते ही प्रकरण बरंच पुढे गेलं होतं. तेव्हपासून मला कळलं आहे की हे अशा गोष्टीत जितकी माहित मिळेल तितकी कमीच असते. त्यातून पुढं काय शिकता येईल नेम नाही.


विद्या भुतकर.