Wednesday, November 16, 2016

यू आर माय सनशाईन

    
मागच्या आठवड्यापासून इथे 'डे लाईट सेव्हिंग' सुरु झालं. की संपलं? कळत नाही. हे म्हणजे डोळ्याची दूरदृष्टिता म्हणजे कसे जवळचे दिसत नाही त्या टाईप मध्ये आहे असे मला वाटते. मिळत असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा म्हणून उन्हाळ्यात सर्व घड्याळे एकेक तास पुढे केली जातात. आणि अर्थातच थंडीत पुन्हा मागे. म्हणजे काय तर साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका रविवारी मध्यरात्री २ दोन वाजलेले असताना, २ वाजलेत असं म्हणायचंच नाही, १ वाजलाय म्हणायचं आणि त्यामुळे सकाळी तुम्ही रोज ६ वाजता उठत असाल तर त्यादिवशी त्याच वेळेला तेव्हा सात वाजलेले असणार. आणि थंडीत संध्याकाळी ५ वाजता सूर्यास्त होत असेल तर तो ४ वाजताच होणार. जाऊ दे. जास्त स्पष्टीकरण देत नाही. मलाच कसंबसं समजलंय.
         पण या वेळेच्या बदलाने होतं काय तर, घरातील सर्व घड्याळ (फोन सोडून) स्वतः बदलावी लागतात. बरेचवेळा जी वेळ आहे ती योग्य आहे का बदलायची राहिलेय हे कळत नाही. सकाळी उठून पोरांना एक तास पुढे किंवा मागे रुटीन लावावं लागतं. मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वेडीच झाले होते. म्हणलं सर्व घड्याळातील वेळ बदलायची? तर नुसती घडयाळे नाहीत, ट्रेन, बस यांच्या वेळा, ऑफिस हे सर्व तर झालंच. पण अमेरिकेतील या बदलाने तिकडे ऑफशोअरला काम करणाऱ्या भारतातील लोकांनाही पुढे मागे करावे लागते. प्रत्येक सर्व्हर, सिस्टीमचे घड्याळ बदलायचे तेही दर सहा महिन्यांनी आणि बदललेल्या दुसऱ्या दिवशी सर्व नॉर्मल चालू आहे असेच वागायचे. मला तर अजूनही अवघड जातं ते.
        पण सर्वात जास्त त्रास मला याचा होतो तो थंडीत. एकतर आधीच दिवस छोटा झालेला असतो. थंडी वाढलेली असते आणि त्यात अचानक दुपारी ४ वाजताच एकदम अंधार पडायला लागतो. ऑफिसातून कितीही लवकर निघा, बाहेर पडताना अंधार आहेच. त्यामुळे जणू दिवस संपूनच गेलाय असं वाटतं. मुलांना बाहेर खेळण्यासाठी असेही पूरक वातावरण नसते त्यात अंधाराची भर. थंडी आणि अंधार यातून घरी पोहोचल्यावर भूक लागल्यावर खूप खाल्लेही जाते. व्यायाम वगैरे साठी अजिबात उत्साह नसतो. मस्त गरम चहा, नास्ता घेऊन पांघरुणात बसून टीव्ही बघावा असं वाटतं. अशा वेळी माणूस घरात एकटा राहत असेल तर 'डिप्रेशन' येण्याच्या शक्यता अजून वाढतात. शिवाय वजन वाढते ते वेगळेच.
       बर्फ पडू लागल्यावर दिवसा काचेतून दिसणारं ऊनही निरुपयोगी होतं. मला नेहमी प्रश्न पडायचा हे चित्रपटात बर्फ आणि ऊन कसं काय दाखवत असतील. आता प्रत्यक्षात पाहिल्यावर कळतंय की ऊन नुसतं नावाला असतं. तापमान कमीच असतं त्यामुळे बर्फ वितळतच नाही. हे सर्व अनुभवल्यावर आणि त्यानंतर भारतात राहिल्यावर मला दोन गोष्टी लक्षात आल्या. १. आपल्याकडे भारतात 'सूर्य प्रकाश' आणि पूरक तापमान किती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे.  २. आणि आपण त्याचा किती कमी प्रमाणात उपयोग करून घेतो.
         योगामध्ये आपल्या पूर्वजांनी जे सूर्याचे नमन केले आहे ते अतिशय योग्य आहे असे मला पटू लागले आहे. सुरुवात करायची तर, सूर्यप्रकाश नसल्याने ज्या त्वचेच्या व्याधी किंवा व्हिटॅमिन डी चा अभाव हे इथल्या लोकांत जाणवते ते भारतात कमी होऊ शकते. लहानपणी थंडीत आजोबा आम्हाला सकाळी उन्हांत बसायला सांगायचे त्यांच्यासोबत आम्हीही 'उन्हं खातं' बसायचो. :) पण आजकाल आपण सूर्यप्रकाश नुसता बघायलाही बाहेर थांबत नाही. सकाळी उठून चालत जाणे तर दूरच. इथे बॉस्टन किंवा जिथे थंडी ६-६ महिने असते अशा ठिकाणी मुलांचे खेळावरही परिणाम होतो. त्यांना कुठे खेळायला न्यायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. भारतात आपल्याला पाऊस आणि कडक उन्हाळा सोडला तर जवळजवळ ८ महिने व्यायामाला पूरक वातावरण असते. तरीही मुलांच्या खेळांकडे कमी लक्ष असते (निदान इथल्या मुलांच्या तुलनेत तरी). बाहेर मुले खेळताना दिसणेही तसे पूर्वीपेक्षा कमीच आहे. पण व्यायाम आणि एखादा नीट शिकलेला खेळ यांचे प्रमाण अजून कमी.
       तसेच शेतीचेही आहे. शेतकऱ्यांच्या गरिबीमुळे आणि नवीन प्रकल्पांच्या अभावामुळे असलेल्या सूर्यप्रकाशाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेत नाहीये असे वाटते. इथे लोकांना थंडीत भाज्या परदेशातून आयात कराव्या लागतात. आमच्या घरात सध्या एक तुळस आहे, तिला मी आता घरात ठेवले आहे आणि रोज सकाळी जमेल तसे उन येईल त्या त्या जागी तिला फिरवत राहते. पण तेही आता पुरेसे वाटत नाहीये आणि मला बहुदा 'प्लांट लाईट' आणावा लागणार आहे. ज्यातून सूर्यप्रकाशासारखे किरण तिला मिळतील. अनेक लोकांना असे रोपे टिकवताना पाहून वाटते मी भारतात असताना का इतकी निष्काळजी राहिले? तेव्हाही थोडे लक्ष लावून झाडे जागवायला हवी होती.
       इथे अनेक वेळा बाल्कनीत कपडे वाळत घातलेत म्हणजे भारतीय असणार असे जोक मी ऐकलेत. आणि मलाही कधी वाटायचं की जाऊ दे ते कपडे ड्रायर लाच टाकावेत. उगाच कशाला बाल्कनीत कपडे? पण मी भारतात कपडे धुवायचे मशीन बघत असताना ड्रायर पाहिला त्यात कपडे वाळवण्यासाठी आणि धुण्यासाठी मिळून ३ तास लागणारे सायकल होते. म्हणजे किती ती इलेक्ट्रिसिटी वाया. गेल्या २-३ वर्षात माझ्या लक्षात आलं आहे की खरंच इतका सूर्यप्रकाश उपलब्ध असताना का मी तो ड्रायर वापरायचा हट्ट करायचा? आणि इतकी वीजही वाया? आपल्याकडे हा एक रिसोर्स आहे त्याचा वापर करून घेतलाच पाहिजे आणि त्यामुळे मला तसे कपडे वाळवणे अतिशय योग्य वाटते. आपल्याकडे अजून सोलर प्लॅण्टही अजून व्हायला हवेत ज्याने त्याची पूर्ण क्षमता वापरली जाईल.
      उन्हाचा आपल्या शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होतो. जसे पावसाळी वातावरण उदास करते तसेच ऊन प्रसन्न करते. सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या खिडकीतून किंवा बाल्कनीत येणारे ऊन कितीतरी उत्साह देऊन जाते. पण किती जण ते अनुभवण्यासाठी लक्ष देतात? कारण आपण ऊन गृहीत धरतो असे मला वाटते. आज नाही पाहिले, उद्या असेलच. त्यात कडक उन्हाच्या त्रासाचाही भाग असतो थोडा, पण जाणीवपूर्वक सूर्यप्रकाश अनुभवणे खूप कमी झाले आहे असे वाटते. इथे लोकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यामुळे मिळेल तेंव्हा ते त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. खरंच आपण अनेकदा मुलांना किंवा जवळच्या व्यक्तीला म्हणतो, you are my sunshine'.  म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला सूर्यप्रकाशाइतकीच आनंद देते, उजेड देते आणि आपल्याला प्रसन्न करते. त्यामुळे मी तर म्हणते 'Sunshine is our sunshine'. आणि आपण त्याची किंमत करायला शिकलं पाहिजे, लवकरच  !!

विद्या भुतकर.

Tuesday, November 15, 2016

Monday, November 14, 2016

कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे

        परवा रात्री घरी येत असताना जुनी गाणी गाडीत लावली आणि खूप वर्षांनी 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो' ऐकलं. एकूणच घर-संसाराच्या गराड्यात बऱ्याच गोष्टी हरवल्यात असं वाटतं त्यातली ही एक. आठवणीने जगजीतची गाणी ऐकलीत असं झाल्याला कित्येक वर्षं लोटलीत. खूप वर्षांनी जुनं काहीतरी मिळाल्याचा आनंद होताच पण त्यासोबत एक उदासीही. यावेळी तो जगात नाहीये ही जाणीव होत राहिली. कितीही प्रयत्न केला तरी त्या गाण्याचा पलीकडे जाऊन त्याची उणीव भासत होती. अगदी 'RIP जगजीत' म्हणून अनेक पोस्ट दिसल्या होत्या ना? तेव्हा पण ते तितकं जाणवलं नसेल. 
         खरंतर मीच जाणवून घेतलं नव्हतं. आजही फक्त एकच समाधान आहे की जगजीत सिंगची एक का होईना कॉन्सर्टला जाऊन आले आहे. जवळून ते भारलेलं वातावरण पाहिलं, अनुभवलं आहे. ते केलं नसतं तर मात्र किती रुखरुख राहिली असती माहित नाही.
        गेल्या काही वर्षात जवळच्या अनेक व्यक्ती गेल्यात. त्यात सर्वात जवळचे आजोबा. यातल्या कुठल्याच व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मी नव्हते. आता हे चांगलं की वाईट हे माहित नाही. कारण त्या त्या व्यक्तीला आपण शेवटचे भेटलोय किंवा त्यांना खरंच निरोप दिलाय असं जे म्हणतात ना त्यातलं काहीच नाही. त्यामुळे होतं काय की आजही त्यांच्या आठवणी येतात तेंव्हा ते केवळ फक्त खूप दिवस भेटलो नाहीये इतकाच विचार करून. आजोबा, मामा, मामी, आत्या यांचे रेफरन्स संदीपशी बोलताना अजूनही तसेच येतात. पण कधीतरी असेच कुठल्यातरी क्षणी ते या जगात नसल्याची जाणीव होते आणि उदास वाटत राहतं.
       खरंच आपण इतके व्यस्त झालेलो असतो की या अशा आठवणी क्वचितच मनाला थांबवून ठेवतात. अर्थात अजून जवळच्या व्यक्तीही असतात ज्यांची पदोपदीही आठवण येत राहते. पण तरीही आपण मनाला कुठेही काहीही जाणवू देत नाही. आणि जाणवलं तरी ते तसंच धरून बसायला तितकी उसंत नसते. पण असे कधीतरी एखादं गाणं, प्रसंग, खायचा पदार्थ, सवयी, सणवार... यातले काहीतरी घडते आणि त्या व्यक्तीची आठवण करून देते. जगजीत सिंगचं गाणं खूप दिवसांनी ऐकल्यावर तसंच वाटलं. त्याच्यासोबत आणि बाकीही आठवणी...
       त्यात आणि आजकाल 'तुम बिन-२' मधलं 'कोई फरियाद' सध्या येत राहतं रेडियोवर आणि त्यात तोच जगजीतचा आवाज...'कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे....' कधी कधी त्याला गाऊ देते, आठवणीत जाऊन येते. पण कधी धीरच होत नाही आणि पुढचं गाणं सुरु करून टाकते. दिवस तसेच जात राहतात.... पण शब्द सोडत नाहीत... 'कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे.... जागते जागते एक उम्र कटी हो जैसे.......'   

ही पोस्ट अशाच मनात असलेल्या अनेक फिर्यादींसाठी ....... 
 
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, November 11, 2016

'सगळं ठीक आहे ना?'




विद्या भुतकर.

https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Thursday, November 10, 2016

निनावी

खरंच कधी कधी काही नात्यांना काय नाव द्यावं कळत नाही. अनेकवेळा त्यातली जी गंमत आहे, जे प्रेम आहे, जो अर्थ आहे तो त्यांना नाव देऊन पूर्ण नाहीसा करून टाकतो आणि मग त्या नाव दिलेल्या नात्यांकडून असलेल्या अपेक्षाही त्याच्यासोबत येतात. नाही का?



विद्या भुतकर.


Wednesday, November 09, 2016

ट्रिक ऑर ट्रीट

       परवा हॅलोवीनला मुले ट्रिक ऑर ट्रीट ला जाऊन आली. पहिल्या १० चॉकलेटनंतर त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याला इतके चॉकलेट्स मिळाले आहे. त्याचे हावभाव बघून खरंच मजा वाटत होती. अजून दोनेक तासात त्याची आक्खी बकेट भरली आणि सर्व चॉकलेट्स घरी आले. दरवर्षी ते सर्व ठेवून टाकणे आणि त्याची विल्हेवाट लावणे मोठं कष्टाचं काम असतं. थोडे एका पिशवीत घालून बाहेर काढून ठेवले होते. त्यातलेच मग कधी हट्ट केला तर द्यायचे असे चालू आहे. आणि कधी कधी खूप छान वाटते जेव्हा ती पिशवी समोर असूनही  काढून आणून स्वनिक आम्हाला विचारतो की 'मी हे खाऊ का?' .
          आजकाल मुलांना गोळ्या, बिस्किटे, चिप्स हे इतक्या सहजपणे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसते की साधे किराणा आणायला गेल्यावरही एकतर त्यांची रडारड होते किंवा आम्हाला समोर दिसणारे चॉकलेट किंवा बिस्कीट घ्यावे तरी लागते. सुदैवाने मुले बरेचवेळा ऐकतात. पण प्रत्येकवेळी शक्य होत नाही. आणि जसे जसे ते मोठे होत आहेत, त्यांना समजावणे किंवा नकार देणे अवघड जात आहे. त्यात शाळेत मुलांच्या डब्यात कधी कधी अगदीच 'जंक फूड' येते, तेव्हा 'मला का ते मिळत नाही?' यावर उत्तर देणे अवघड जातेय. एक-दोन वेळा आम्ही स्वनिकला मग डब्यात जेवणासोबत चिप्सही दिले होते. बरं, पुढे जाऊन याच सर्व गोष्टी वाढदिवसालाही मिळतात. चिप्स, चॉकलेट हे प्रत्येक पार्टीत असतेच. त्यातून बाहेर पडणे अजूनच अवघड जातेय.
        घरी असताना बरेचदा त्यांना जे खातोय ते योग्य का आहे हे समजावून सांगतो. इतके की एक-दोन वेळा मी काहीतरी विसरले असताना स्वनिकने मला 'बदाम खाण्याचा' सल्ला दिला. :) सुदैवाने त्यांना सलाड आणि फळे खूप आवडते. तरीही मी केलेल्या भाज्या, वरण, चपाती खाणे अगदी तिखट जेवणही करणे यात थोडे वाद होतात. पण त्यांना आता वेगवेगळे सूप, सलाड, भाज्या आवडत आहेत. कधी सान्वी डाळ भाताची खिचडी करायला सांगते किंवा स्वनिक भेंडीची भाजी. अशावेळी आपण जे त्यांना शिकवत आहोत त्याचा खूप आनंद होतो. पण त्यासाठी तितकाच पेशन्स ठेवावा लागतो.
       परवाच मी डब्यात दिलेला चपातीचा रोल तसाच परत आला. त्यात सान्वीनेही पावभाजी खायला नाटक केले. हे सर्व इतके वैतागवाणे होते की चिडचिड झाली खूप. डब्यात दिलेले बरेचसे जेवण तसेच परत आल्यावर किती आणि काय समजवायचे असा प्रश्न पडतो. कधी ते मोठे होतील आणि स्वतःची काळजी घेतील या विचार वैताग येतो. काळ मात्र मला एक मोठा आनंदाचा धक्का मिळाला.  डबा पूर्ण संपलेला होता. म्हटले काय विशेष आज? स्वनिकने शाळेत माझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवले होते. कार्ड मध्ये लिहिले होते, "Aai tu best cook aahe". :) तेही त्याने मराठी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटले मी केलेला पास्ता आवडतो म्हणून त्याने लिहिलेय कि काय? तर म्हणे,"तू परवा केलेलं वरण खूप छान झालं होतं म्हणून मी हे ग्रीटिंग केलं तुझ्यासाठी".
       आता एक आई म्हणून मला झालेला आनंद तर होताच.  पण अनेकदा त्यांच्या न खाल्लेल्या डब्याकडे पाहून होणारी चिडचिड, त्यांना अनेक भारतीय पदार्थातील असलेला आनंद ना समजणं, चॉकलेट-चिप्स, जंक फूड पासून वाचवण्यासाठी कष्ट घेणे इ यावरून खूप दमायला होते. पुढे जाऊन कधी त्यांना आपल्या जेवणाची किंमत राहील का असे वाटतेही. त्यात कधी कधी हे असे क्षण मात्र एक नवीन आशा नक्कीच देतात, पुढेही योग्य ते करत राहण्याची. :) त्यांना योग्य-अयोग्य शिकवण्यासाठी कितीही ट्रिक्स वापराव्या लागल्या तरी चालेल हे अशी ट्रीट  मिळणार असेल तर. होय ना?

विद्या भुतकर.

Tuesday, November 08, 2016

बाबा अभ्यास घेतात तेंव्हा

          आज काल संदीप सानूचा अभ्यास घ्यायला लागलेला आहे. मी जेवण बनवत असताना तेव्हढाच वेळी कामी लागतो आणि माझ्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त पेशन्स आहे म्हणून खरंतर त्याला हे काम दिलेलं असतं. पण गेल्या काही दिवसांच्या अनुभवातून मला एक ट्रेंड लक्षात आला आणि बऱ्याचशा अभ्यास घेणाऱ्या बाबांचा, इन्कलुडींग आमचे. :) आमची अभ्यास घेण्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. खरंतर शाळेतून अक्ख्या वर्षभरासाठी 'नो होमवर्क' पॉलिसी अवलंबली आहे म्हणे. तरी आम्ही आमच्या परीने थोडं फार घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अभ्यास करून घेण्यासाठी योग्य पध्द्त कुठली यावर माहितीचा धागा काढला पाहिजे. पण तोवर ही यादी तरी देते:
१. अभ्यासाला घे म्हटलं की पोराने लगेच घेतलं पाहिजे. (इथे आईला माहित असतं की आपलं पोरगं काही एका शब्दात ऐकणारं नाहीये.) थोड्या दिवसात मग, 'हे बघ असं असतं हजार वेळा सांगूनही ऐकत नाही लगेच बसायला' असं आईला ऐकून घ्यावं लागतं.
२. मूळ विषय सोडून एरवी कसे ते पोर आपण सांगितलेलं अजिबात ऐकत नाही यावर आईला आणि पोराला दोन चार शब्द ऐकावे लागतातच. पुढे अभ्यासाला बसताना पोराने कधीही पेन्सिल, वही इ साहित्य एकत्र घेतलेलं नसतं. त्यावरून पेन्सिल घेतली का? खोडरबर घेतलंस का? असे प्रश्न चढ्या आवाजात होतात.कधी अभ्यास करताना पेन्सिल तुटलीच तर मग ते पोर शार्पनर शोधायला म्हणून पळून जातं ते १० मिनिट येत नाही. कारण ते जागेवर सापडलं नाही म्हणून अजून ऐकून घ्यावं लागणार असतं.
३. एकदाचं पोर जागेवर बसलं की अभ्यास सुरु झाल्यावर सर्वात पहिली सूचना येते,"नीट बस. पाठीला पोक काढून बसू नकोस. लोळू नकोस."
४. वैतागून पोर सरळ बसलं की पुढची सूचना,"जरा पेन्सिल नीट धार की, काय ते अक्षर ?". एकतर इथे पोराने पेन्सिल कशीही धरली तरी त्यातून फक्त अक्षर उठतंय ना इतकंच पाहतात. त्यात मग ती वाकडी का सरळ हे कोण बघणार?
५. पाच वेळा पेन्सिलीची सूचना झाल्यानंतर खरा अभ्यास सुरु होतो. जरा कुठे पहिलं गणित झालं की,"हा सांग १८+९ मध्ये १८ मध्ये टेन्स (दहाच्या जागी किती) आणि वन्स किती आहेत? पोराने हवेत पाहिलं की," ते काय हवेत दिसत आहेत का? लिही, १८ची फोड, १-१०, ८-१. नीट नवीन ओळीत लिही.
६. हेच कधी इंग्रजी असेल तर, बोल मोठ्याने बोल. स्पष्ट बोल, वर छताकडे बघू नकोस. किती वेळा सांगितलं आहे लगेच लिहायचं, नुसतं हवेत बघत बसू नकोस.
७. पोराने लिहायला सुरुवात केली की आमच्याकडे एक प्रॉब्लेम होतो. पोरींचे केस डोळ्यावर येतात. मग, केस का मोकळे सोडलेत? जरा नीट बांधत जा की. मग आईकडे मोर्चा वळतो," जरा हिच्या केसांचं काहीतरी कर. नाहीतर कापून आण. पोरीने रबर शोधून आणून केस बांधेपर्यंत ५ मिनिटं जातात.
८. सगळं होईपर्यंत जेवायची वेळ झालेली असते. पोराला कंटाळाही आलेला असतो. "बरोबर टीव्ही बघताना झोप येत नाही. अभ्यास करायला लागलं की झोप येते लगेच. " हे ऐकून घ्यावं लागतं.
९. कधी जेवणाच्या निमित्ताने का होईना पोराची सुटका होते किंवा कधी आई-बाबांचंच कसं पोराला बिघडवलं आहे यावरून जोरात भांडण सुरु होतं आणि मधल्या मध्ये पोर पळून जातं.

मी अभ्यास घेते तेंव्हाही काही ग्रेट होतं असं नाही. पण मी थोडी माहिती वाचली होती त्याप्रमाणे सुरुवातीचे तयारी करायचे चे प्रॉब्लेम आहेत ते सोपे आहेत. उगाच पेन्सिल, पेपर, खोडरबर घेणे किंवा नीट बसणे यासारख्या गोष्टीत ठराविक ठिकाणी सर्व सामान ठेवणे, नियमित बसायची,नीट जागा असणे इ असेल तर सुरुवातीचे बरेच वाद कमी होतात.. नवऱ्याला तेही सांगून झाले आहे पण काही ना काही होतेच. अर्थात हे सर्व किस्से एकाच दिवशी होतात असं नाही पण या यादीतील एक तर होतोच बाबा अभ्यास घेतात तेंव्हा. बरोबर ना?  :)

विद्या भुतकर.

Monday, November 07, 2016

Live in the moment

       मागच्या आठवड्यात 'ऑफिसातल्या पाट्या' बद्दल लिहिताना विचार करत होते की ते जुनं ऑफिस काही इतकंही जवळचं नव्हतं की त्याची आठवण यावी. केवळ एकंच वर्ष तिथे झालेलं आणि असेही इतके छोटे डेस्क होते की याच्यापेक्षा दुसरे काहीही चालेल असं वाटलं होतं. आणि आता इतके वर्षात थोडी का होईना नवीन ऑफिसची क्रेझ तशी कमी झालेली असेल असंही वाटत होतं. त्यामुळे आपण अगदीच 'कूल' असल्यासारखे आज मी ऑफिसच्या नवीन बिल्डिंगला गेले. ट्रेनमधून उतरल्यावर जातानाच एकदम वाटलं, 'अरे मागच्या ऑफिसला २-३ मिनिटंच चालायला लागत होतं. आता १० मिनिटे लागत आहेत. :('  नकळत माझ्या तुलना सुरु झाल्या होत्या.
        आता गेल्यावर नवीन ऑफिसच्या निमीत्ताने मस्त नाश्ता ठेवला होता. नवीन डेस्कवर एकेक छान फूलही ठेवलेलं होतं. कितीही नाही म्हटलं तरी बाकीच्या मैत्रिणींसोबत तिथल्या नवेपणात मीही हरवून गेले. बाथरूम कुठे, कॅफे कुठेय, कसा आहे, नवीन बिल्डिंगच्या आजूबाजूला काय काय आहे? म्हणजे मी कितीही नाही म्हटलं तरी जुन्या बिल्डींगच्या आठवणी आणि तुलना होतंच होत्या आणि त्यासोबत नवीन बिल्डिंगच्या नवेपणाचं कौतुकही वाटत होतं. प्रत्येक मैत्रीण ऑफिसला कशी पोहोचली, कुणी कुणाला सोडलं, इथपासून अगदी ऑफिस सुटेपर्यंत मैत्रिणींच्या डेस्कवरील वेगवेगळ्या फुलांचे फोटो काढून त्याचं एक कोलाजही बनवलं. एकूण काय मी कितीही निरुत्साह दाखवला तरी या बदलाचा माझ्यावर नक्कीच परिणाम झाला होता. पण तो मान्य करायला मला तिथे एक दिवस घालवावा लागला.
         आम्ही शिकागोला असताना आमच्या बिल्डिंगमध्ये अनेक लोकांशी ओळखी झाल्या. अनेकदा आम्ही पॉटलक करायचो. नुकतंच लग्न झालेलं आणि अशा संसारी गोष्टी करायची सवय नव्हती, किंवा तेव्हा मुलंही नव्हती त्यामुळे मुलांचे विषय आले की आपण काय करणार असे प्रश्नही पडायचे. या सगळ्या लोकांच्या त्या त्या भेटी इतक्या खास असतील हे मात्र ते तिथून निघून गेल्यावर जाणवलं. आजही दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या पार्ट्या आणि गम्मत आठवत राहते. पण ते जाणवायला बाकी ठिकाणी राहून बघायला लागलं. ते इतके स्पेशल असतील हे तेव्हा जाणवलं असतं तर कदाचित अजून जास्त भेटलो असतो. असे अनेक वेळा त्या त्या ठिकाणी राहत असताना तिथल्या अनेक चांगल्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या ज्या तिथून निघाल्यावर जाणवल्या.
        आजही एक हुरहूर वाटली होती ती म्हणजे त्या जुन्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या बाहेरचा एक आवडता व्ह्यू होता, त्याचा फोटो काढला नाही. कदाचित तिथे परत जाऊन काढताही येईल पण प्रत्येक वेळी अशी संधी मिळेल असं नाही. तीच गोष्ट बॉस्टनची झाली आहे. इथे येऊन साधारण दीडेक वर्ष झालंय आणि अजूनही पुण्यातल्या आठवणी येत राहतात आणि बॉस्टन 'आपलं' वाटत नाही. कदाचित त्याची किंमत कळायला इथून बाहेर पडायला लागेल. 'live in the moment' किंवा जे आहे त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे, इ इ कितीही वेळा बोललं आणि कितीही मान्य असलं तरी प्रत्यक्षात ते स्वीकारणं, अंमलात आणणं किती कठीण आहे नाही? कितीही ठरवलं तरी आहे ते सोडून मागच्या आठवणीत आणि पुढच्या स्वप्नांत मन जातंच. असो, सध्यातरी आजचं ते फुलांचं कोलाज पोस्ट करतेय, आज काहीतरी छोटंसं पण आनंद घेऊन केलेलं.

विद्या भुतकर.

Sunday, November 06, 2016

फसलेले क्षण

           थोड्या दिवसांपूर्वी एका कॉन्फरन्स साठी गेले होते. तिथे एक मॅनेजर आली होती जिने पांढरास्वेटर घातला होता काळे पोकळ गोल असलेला आणि डार्क पिंक पॅन्ट(फुशिया म्हणतात तो). एकदम भारी दिसत होतं कॉम्बिनेशन. तिकडे मोठ्या लोकांची भाषणं सुरु झाल्यावर रिकामटेकडं डोकं त्या ड्रेसवर खिळलं. हातांना काही चाळा म्हणून मी पेपरवर ते काळे गोल गोल काढत बसले आणि मनात विचार आला असा एखादं चित्र कॅनवासवर काढलं तर? पांढऱ्या शुभ्र कॅनवासवर काळे गोळे( एकदम पेनाने रेघोट्या काढल्यासारखे) आणि १/४ हिस्सा फुशिया रंगाचा. एकदा डोक्यात आल्यावर ते ट्राय करायचा विचार पक्का झालाच. दिवाळीमुळे वेळही मिळत नव्हता. शेवटी दिवाळीचा फराळ करून संपल्यावर थोडा वेळ मिळाला आणि मी ते चित्र काढून बघितलंच. :) 
          एकतर ऍक्रिलिकमध्ये जो मला फुशिया वाटत होता तो कॅनवास वर वेगळाच निघाला. कॅनवास कितीही व्हाईट दिसत असला तरी त्याच्यावर आपण ब्रशने दिलेला व्हाईट वेगळाच असतो त्यामुळे तेही दोन चार हात मारले. आता ते काळे गोल कशाने काढायचे हा प्रश्न होता. पेन्सिलने सुरु केले तर थोडे फिकट आले. रोल पेन काही कॅनवास वर उठेना मग सरळ स्केचपेनने काढले. आता एकूण जे चित्र तयार झाले ते मी मनात काढलेल्या इमेजपेक्षा अगदीच सामान्य होतं. कितीही वेळा कितीही तऱ्हेने पाहिलं तरी ते सामान्यच होतं. :) ते काढल्यावर अजूनही दोन चार काढून पाहायचा विचार होता पण सध्या हा निकाल पाहून धीर होत नाहीये. 
         हे माझं पाहिल्यान्दाच झालं नाहीये. अनेकवेळा एखादी रेसिपी डोक्यात येते आणि ती माझ्या डोक्यात एकदम भारी दिसत असते. सर्व सामान आणून तसे कधी एकदा बनवतेय असं होतं. फार क्वचितवेळा खरंच अगदी मनात आहे तसं प्रत्यक्षातही येतं. अनेकवेळा अगदीच प्रयत्न फसतो तर काही वेळा 'ठीक होती' म्हणत पुढच्या वेळी करायचा हुरूपही राहतो. अनेकवेळा एखादं गाणं गातानाही एखादी गिरकी किती छान घेतलीय म्हणत तोंड उघडलं की संपलं. डोक्यात असलेली ती ट्यून बाहेर पडताना वेगळीच झालेली असते. थोडं हिरमुसलं होतं मन की आपल्याला ते येत नाहीये म्हणून. पण तिथेच थांबत नाही. पुन्हा कधी असंच छान गाणं लागलं की पुन्हा प्रयत्न करतंच. 
       कधी, आपल्याला एखाद्या प्रिय व्यक्तीला मनातलं सांगायचं असेल तर मनात अनेक विचार येतात. असं बोलू की तसं बोलू? आता विचार करा मी ही वाक्ये लिहितेय जी एखाद्याला मोठ्याने बोलून दाखवायची आहेत,"मला ना तू खूप आवडतेस. तुझ्यासोबत असताना कसं एकदम मोकळं, कम्फरटेबल वाटतं. आपण सोबत असताना दुसऱ्या कुणाचीच गरज नाहीये असं वाटतं. " मला खात्री आहे की ही आणि अशी अनेक वाक्यं कधी ना कधी आपल्याला कुणालातरी बोलायची असतात.. पण प्रत्यक्षात बोलताना मात्र काहीतरी वेगळंच होतं. ते शब्द डोक्यात कितीही पर्फेक्ट वाटत असले तरी बाहेर पडताना वेगळेच वाटतात आणि मग ते बोलणं लांबतंच. अगदी कुणाला सॉरी म्हणतानाही किंवा एखाद्या जवळच्या मित्राला समजावून सांगताना, कितीही योग्य वाटले तरी ते विचार बाहेर पडताना हवे तसे येतातच असं नाही. मग कधी थोडी धावपळ होते तर कधी ब्रेक-अप. :) 
         हे सर्व विचार, ही वर म्हणाले ती गाणी किंवा एखादी रेसिपी केव्हा एकदा बाहेर पडेल असं होतं तेव्हा त्यातून काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. आणि तो केलाच पाहिजे असं मला वाटतं. एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी थोडी रिस्कही घेतली पाहिजे. पण बरेचदा असे मनात येणारे विचार नेगेटिव्हही असतात. एखाद्यावर असणारा प्रचंड राग, एखाद्या नातेवाईकाला पुढच्या वेळी भेटल्यावर सुनावायची एखादी गोष्ट, टोमणा, मनात शंभर वेळा रिपीट केलेलं असतं. "अजून एकदा ते असं करू देत मग मी सोडणार नाही, बोलणारंच" असं स्वतःला हजार वेळा बजावलेलं असतं. आणि एखादा असा क्षण येतोही जिथे आपण खरंच ऐकवतो आणि फसलेल्या त्या रेसिपीसारखे किंवा बेसुऱ्या गाण्यासारखे ते बाहेर पडलेले शब्द चुकीचे वाटतात आपले आपल्यालाच. कितीही झालं तरी ते शब्द परत येणार नसतात. मनात कितीही राग असला तरी समोरच्या माणसाचा खरंच तो हेतू नसतो किंवा असला तरी प्रत्यक्षांत कुणी असे आपल्याला बोलेल अशी त्यांनी अपेक्षा केलेली नसते. 
       तो एक क्षण अनेक वर्षांची मैत्री तोडायलाही कमी करत नाही मग. त्यात कधी मग जवळचे नातेवाईक असतात तर कधी आई-वडील आणि आपली मुलंही. हे असे फसलेले क्षण कितीही केलं तरी आयुष्यभरासाठी डोक्यात राहतात आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्याही. अशा वेळी मात्र दुरुस्तीची संधी क्वचितच मिळते. माझ्या फटकळ किंवा चटकन राग येण्याच्या स्वभावामुळे असे क्षण मीही मोजलेत आणि त्यांची किंमतही. त्यामुळे बाकी गोष्टीत कितीही प्रयोग केले तरी या अशा बोलण्याच्या बाबतीत मात्र प्रयोग नकोत असं मला वाटतं. त्यासाठी थोडा धीर धरावा लागतो, किंवा मनात आतून चिडचिड करून घेते किंवा संदीपला, आईला वगैरे सांगते. पण रागाने फटकळ बोलून पश्चातापाच्या यादीत अजून काही भर घालायची नाही असं ठरवतेय. हळूहळू प्रयत्न करतेय ते क्षण येऊ न देण्याचा. बघू कितपत जमतेय. पण तोवर गाणी, रेसिपी आणि चित्रं मात्र नक्कीच काढत राहणार कितीही चुकले तरी. :) 



विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
      

Friday, November 04, 2016

पानगळ

सध्या आक्खा गाव या रंगांत बुडालेला आहे. रोज वावरताना हीच झाडे नियमित दिसत असतात पण अचानक एके दिवशी त्यांचे रंग डोळ्यात भरू लागतात. कधी कधी चुकून ड्राइव्ह करताना मी रस्त्यात थांबून जाईन की काय असं वाटतं. कित्येक वेळा रस्त्यात गाडी बाजूला लावून काही फोटोही काढले. आता तर काय घराजवळच हे असं सुंदर जंगल दिसत आहे. त्यामुळे कितीही फोटो काढले तरी मन भरत नाहीये. भारतातल्या उन्हाळा, हिवाळा पावसाळा यांची मजा वेगळी आणि ही अशी रंगान-श्रीमंत सुंदर पानगळ वेगळी. झाडांवर पिकल्यानंतर , साध्या बारीक पावसाच्या सरीनेही किंवा वाऱ्याने झडून जातील इतकी नाजूक. आज आहे तर उद्या नाही. जोवर आहे तोवर तुम्हीही पाहून घ्या. :)






 

Monday, October 31, 2016

स्वप्ना आणि सत्या-भाग ५ "तर..... तर ....." :)

तो: परवा लाईट बिल भरलंस ना?
ती: अर्रर्रर्रर्रर्रर्र .....सॉरी विसरले.
तो: किती वेळा आठवण करून द्यायची?
ती: ए मला नाही लक्षात रहात असलं सगळं.
तो: म्हणूनच तर सांगतोय.
ती: पण मी बाकी बघतेच ना?
तो: मग हे पण करायचं. तुला आठवण राहावी म्हणून मुद्दाम तेव्हढं एकंच काम सांगितलंय. बरं, तेही ऑनलाईन भरायचं असतं. स्वतः जायलाही लागत नाही.
ती: बरं, भरते आज.
तो: काही गरज नाहीये. काल शेवटची तारीख होती. मी भरून टाकलं कालच.
ती: (लाडाने) थँक्यू !!
तो: मी आहे म्हणून चाललंय सगळं !
ती: तर तर .... :)
तो: असू दे.. असू दे..पुढच्या वेळी भर वेळेत नाहीतर कॅण्डल लाईट डिनर करावं लागेल.
ती: हो डिनरवरून आठवलं, आज संध्याकाळी अंजू येणार आहे.
तो: ओह. आज येणार आहे का?
ती: असं काय करतोस? मी किती वेळा सांगितलं तुला. आज लवकर घरी ये.
.
.
.
.
.
. .
ती: (संध्याकाळी) अरे येताना पनीर आण म्हणून सांगितलं होतं. आणलंस का?
तो: अर्रर्रर्रर्रर्रर्र विसरलो.
ती: कितीवेळा आठवण करून द्यायची?
तो: सॉरी, मला असल्या गोष्टी लक्षात रहात नाहीत.
ती: मग रिमायंडर लावायचा ना? आज पनीरच करायचे होते जेवायला. मला फिरून जावं लागतं डेअरीकडे.
तो: मग आता?
ती: आता काय? मी येते घेऊन येताना.
तो: सॉरी ! सॉरी !!
ती: नशीब मी विचारले तरी.
तो: थँक्यू.
ती: असू दे असू दे ! मी आहे म्हणून चाललंय सगळं.
तो: तर..... तर ..... :)

सत्यातले साथीदार असे असताना, स्वप्नातला 'परफेक्ट' साथीदार कुणाला हवाय?

विद्या भुतकर.

Thursday, October 27, 2016

५० शेड्स ऑफ शंकरपाळ्या

         दरवर्षी दिवाळीला फराळ म्हणजे चर्चेचा विषय असतो. तो चघळण्यासाठी तितकाच चिवट चिवडा, स्प्रिंग चकली किंवा दगड लाडू पाहिजे. :) लहान असताना कुणाकडून काय काय खायला आलंय आणि त्यातलं काय काय बरोबर जमलं आणि काय फसलं यावरही गप्पा व्हायच्याच. पण तेव्हा त्यावर लिहायला काही स्कोप नव्हता. आता आहे तर लिहितेच ना. तर दरवर्षी प्रमाणे यावेळीही दोन लाडू (रवा, बेसन), शंकरपाळ्या (गोड, तिखट), चकली आणि चिवडा हे माझ्या लिस्टवर असतं. आणि गेले १० वर्षे करूनही त्यासाठी मला त्याच्या रेसिपी, मोजमाप नेटवर पहावंच लागतं. त्यातल्या त्यात सर्वात सोपी आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे शंकरपाळ्या असं मला वाटतं. आणि यावर्षी मुलांनी माझ्या आईच्या हातच्या शंकरपाळ्या नुकत्याच खाल्लेल्या असल्याने, "aaji is the best shakarpali maker" असं वाक्यही पोरीने टाकलं होतं. त्यामुळे त्या चांगल्या जमणं गरजेचं होतं. नाहीतर पोरं लगेच,"आजीसारख्या झाल्या नाहीत म्हणून खाणार नाही' म्हणायलाही कमी करायची नाहीत. 
        तर दिवस सोमवारचा आणि वेळ रात्री १०.३० ची. म्हणजे थकव्याची परिसीमा. पण पुढे बरीच कामे असल्याने त्यादिवशी ते करणं भाग होतं. नेटवर मोजमाप बघून पीठ, दूध, साखर, मोहन सर्व व्यवस्थित घेतलं. छान घट्ट मळलेही. मधेच एक विचार आला, या पिठात सर्व काही आहे जे केक मध्ये घातलं जातं. थोडी बेकिंगपावडर घालून बेक करून बघाव्यात. पीठ इतकं छान झालं होतं की त्याच्या मस्त फुललेल्या शंकरपाळ्या होणार यात मला कणभरही शंका नव्हती. शिवाय लोकांच्या अनेक पोस्टमध्येही मी 'बेक्ड शन्करपाळ्यांचे' फोटो पाहिले होते. आता आपल्याला एकदा ओव्हर-कॉन्फिडन्स आला की बस ! एकदम जोर येतो सर्व करायला. त्यामुळे नुसते एक-दोन लाट्या नाहीत तर ४-५ लाट्या लाटून माझ्याकडे असलेल्या दोन ट्रे मध्ये शंकरपाळ्या ओव्हनमध्ये ठेवायच्या असं ठरवलं. आणि हो, त्यात माझा नवरा होताच बरोबर. त्याने ओव्हन प्री-हीट करून घेतला. एका ट्रेला त्याने भरपूर तूप लावले आणि माझ्या ट्रेला मी थोडे कमी लावले होते. एक ट्रे जरा पातळ होता तर दुसरा एकदम जाडजूड. 
         आम्ही मस्त अरेंज करून त्या लाट्या ट्रे मध्ये ठेवल्या आणि ट्रे ओव्हनमध्ये. २० मिनिटे १८० डिग्री ला ओव्हन लावला. पाचेक मिनिटात एकदम भारी केकसारखा वास येऊ लागला. एक फोटोही काढून घेतला. आता सक्सेस स्टोरी लिहायला तो कामात आला असता ना? संदीप ओव्हनचा लाईट लावून समोरच बसून राहिला. त्याला हळूहळू शंकरपाळ्या फुलत आहेत असंही वाटू लागलं. आमचा प्लॅन तयार झाला होता. पुढचे निम्मे पीठही असेच ओव्हनला लावून द्यायचे आणि मग तासभर टीव्ही बघत बसायचा. :) आत्ताशी ११ वाजले होते. 
         १५ मिनिटात थोडा जळाल्यासारखा वास येत होता म्हणून ओव्हन उघडून पाहिला, तर त्या पातळ ट्रे मधील शंकरपाळ्या खालून करपत होत्या. आम्ही घाईने त्या काढून घेतल्या. आणि हो, ओव्हन छोटा असल्याने दोन्ही ट्रे एकाच लेव्हलला बसत नव्हते. तो पातळ ट्रे वरच होता त्यामुळे त्याला हीट जास्त लागत असेल. तर आम्ही घाईने तो ट्रे बाहेर काढला. तूप लावलेली ट्रेची बाजू बरीच जळली होती. संदीप म्हणे,"जाऊ दे, थोड्या वरच्या अंगाला भाजल्या गेल्यात." :) असे असले तरी, हा पहिला लॉट अगदीच वाया गेला नव्हता. थोड्या लालसर झाल्या होत्या आणि कडक इतकेच. मी तर म्हणाले, "चहात पडल्या आणि भिजत घातल्या तरी मऊ पडणार नाहीत याची गॅरंटी आहे". :) एक चांगले होते, चव एकदम मस्त होती. एखादे कडक बिस्कीट असावे तसे. त्या अजिबात फुगल्या नव्हत्या, किंवा कुरकुरीत नव्हत्या. त्यामुळे उरलेल्या पिठाच्या तळूनच करायच्या असे ठरले. 
           आम्ही भांड्यात तेल घालून तापेपर्यंत त्या जाड ट्रे मधील लॉट बघत होतो. तो ट्रे जाड असल्याने पीठ अजूनही कच्चे वाटत होते थोडे. त्याला ओव्हनमध्ये वरच्या जाळीवर ठेवून, आम्ही तापलेल्या तेलात नवीन लॉट तळायला टाकला. आता इथे थोडा वेळ होता. म्हटले, ओव्हनमध्ये दुसरा लॉट खरंच चांगला वाटत आहे पण थोडा रंग सफेद आहे अजूनही. म्हणून मग मी फक्त दोनच मिनिट का होईना 'ब्रॉईल' सेटिंगवर ठेवते असे म्हणले. आता हे ब्रॉईल सेटिंग काय आहे? तर ओव्हनच्या वरच्या कॉइल्स तापून जरा जास्त तापमानात लवकर रंग आला असता. पण त्याची आणि माझी जुनी दुश्मनी आहे. प्रत्येक वेळी जसे दूध लक्ष नसताना उतू जाते तसे मी ठरवूनही ब्रॉईलला लावलेले काही ही असो, मी २ मिनिटंच असे ठरवून ते विसरून जाते आणि मग जळालेले टोस्ट, ब्रेड, केक असे पदार्थ पदरी पडतात.संदीप बिचारा त्यांचे जळालेले भाग खरडून, उरलेला पदार्थ गोड मानून खातोही. :)
          तर यावेळीही मी लक्षात ठेवून ब्रॉईल सेटिंगला दोनच मिनिट लावायचे म्हणून ओव्हन सुरु केला आणि भांड्यातल्या शंकरपाळ्या तळायला सुरुवात केली. कुठलेही काम मनापासून करणे हा माझा स्वभावच असल्याने, तळण्याच्या नादात खाली जोरदार धूर येऊन त्या ओव्हनमधल्या शंकरपाळ्या बिचाऱ्या करपून गेल्या. माझ्यावर चिडचिड करत, नवऱ्याने परत तो लॉट ओव्हनमधून काढला. त्या वाचण्याचा काही स्कोप नव्हताच. पण.....त्यांच्या नादात इकडे तेलात टाकलेल्याही जास्त जास्त लाल होऊन गेल्या होत्या. नक्की कुठली आग आधी विझवायची हे सुचत नव्हते. त्यात बाहेर थंडी असल्याने खिडक्या बंद होत्या. उगाच धुरामुळे फायर अलार्म वाजून अजून दुसराच त्रास नको म्हणून तिकडेही खिडक्या उघडायच्या कामाला नवऱ्याला लावले. एकूण काय, गोंधळ नुसता. 
       आता ओव्हनमधले सर्व लॉट संपले होते. तेलातील पहिलाही जळून गेला होता. तेलातल्याचा आणखी वेगळाच प्रॉब्लेम होता. पिठात थोडी बेकिंग पावडर आणि तूप असे दोन्हीही असल्याने त्या मस्त तेल पीत होत्या. त्यासाठी मग थोड्या पातळ लाटायचे ठरवले. आणि तेलही थोडे जास्त गरम करून घेतले म्हणजे जास्त वेळ तेलात राहणार नाहीत. पण त्याचसोबत त्या तेलात फुटू नयेत याचीही काळजी घ्यायची होतीच. नुसते नाटक. एकेक लाटीला वेगळे वेगळे प्रयोग करत सर्व शंकरपाळ्या संपल्या. सर्व संपेपर्यत खरंच ५० शेड्स झाल्या असतील. पण 'फेअर न लव्हली' सारखे वेगळे शेड शोधून त्याचा फोटो काढत बसले तर नवऱ्याने वेड्यात काढले असते. आता दोघेही चिडणे किंवा वैतागणे याच्या पलीकडे गेलो होतो. :) भराभर आवरून १२-१२. ३० ला झोपायला गेलो. सोप्या सोप्या वाटणाऱ्या या पदार्थाने बराच व्याप झाला होता. 
         दुसऱ्या दिवशी पोरांना दाखवल्या तर म्हणे, "हे असे का दिसत आहेत?'. म्हटलं, चॉकलेट शंकरपाळ्या आहेत, खायच्यात का?" दोघांनाही खायला दिल्या आणि दोघांनाही त्याची चव आवडली. कडक किंवा खुशखुशीत हे समंजण्याचे त्यांचे अजून वय नाहीये त्यामुळे आम्ही वाचलो. स्वनिकला तर इतक्या आवडल्या की संध्याकाळी दोन वेळा मागून घेतल्या आणि मला मिठीही मारली 'फॉर बेस्ट शंकरपाळी'. :) त्यामुळे गोष्ट कशीही असली तरी शेवट गोड झाला होता. :) पुढच्या वेळी बेकिंग वगैरेंच्या नादाला न लागता सरळ तळून करायच्या असा कानाला खडा लावला. :) दुसऱ्या दिवशी नवऱ्यानं विचारलं की 'चकली बेक करायची आहे का?" मी मुकाट्याने तेलाचे भांडे काढून घेतले तळायला. :) 

त. टी. - इथे थोडे फोटो देत आहे. तुम्हीच शेड्स मोजून घ्या. तुमच्याही अशा काही पदार्थांच्या गोष्टी जरुर सांगा. कारण दिवाळी त्यांच्याशिवाय दिवाळी होत नाही.  आणि हो, Please dont judge my cooking skills by this story. अजून भरपूर आहेत. :D 

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/




काय आवडतं तुला ?


Tuesday, October 25, 2016

नेकी कर फेसबुक पे डाल

          थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, पणत्या रंगवून विकण्याचा प्रयोग करणार होते म्हणून. पणत्या विकण्याचा प्रयोग करण्यामागे दिलेल्या अनेक कारणांमध्ये अजून एक कारण होतं. ते पूर्ण झाल्यावरच बोलायचं म्हणून थांबले होते. पणत्या रंगवण्यात आनंद मिळत होताच तरी त्या विकून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची तुलना नकळत माझ्या नोकरींशीही होत होती. खरंच त्यात इतका वेळ घालवावा का हे कळत नव्हतं. त्यांची क्वालिटी चांगली असली तरीही लोक त्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतील का हाही विचार येत होता मनात. पुढे जाऊन माझा त्यात खरंच फायदा होता का? आणि २०० रुपये शेकड्याने मिळणाऱ्या पणत्यातून जिने त्या घडवल्या तिला काहीच फायदा नाही. असे असताना त्यातून मी पैसे कमावणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न मनात येत होतेच.
           पण हे सर्व नाहीसे झाले कारण त्यातला हेतू. मागच्या वर्षी एका मैत्रिणीने तिने बनवलेल्या पणत्या विकून आलेले पैसे दान केले होते. त्यामुळे यावेळी आमचाही तोच विचार होता. हेतू निश्चित असला ना मग बाकी सर्व गोष्टी फिक्या वाटतात. आता फक्त एकच हेतू होता, ज्या संस्थेला आम्हाला देणगी द्यायची होती त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी. अर्थात तरीही ज्यांना पणत्या खरंच आवडल्या आहेत त्यांनाच तो हेतू आम्ही सांगितला होता. कारण त्याची जाहिरात करून त्या मला विकायच्या नव्हत्या. एकेक करत २३०$ च्या पणत्या विकल्या गेल्या. यात झालं काय की अनेकदा मला वाटायचं की कशाला लोकांना पुन्हा विचारायचे किंवा नवीन पणत्यांचे फोटो टाकायचे? या सर्व विचारांना मागे सारून एकच विचार पुढे होता, जितके जास्त विकल्या जातील तितकी जास्त मदत आपण करू शकतो. त्यामुळे काही सोशल ग्रुपवर पण मी पणत्यांचे फोटो आणि त्यांचे दर दिले. ऑफिसमध्ये विचारायला मन थोडं कचरत होतं पण म्हटलं,"कुठे आपल्याला ते आपल्यासाठी विकायचेत?" त्यामुळे तिथेही मैत्रिणींना विचारले. ज्यांना आवडल्या त्यांनी आवर्जून मागून घेतल्या. आता घरी फक्त डझनभर पणत्या राहिल्यात. त्या घरी वापरेनच.:)
          कुणाला वाटेल हे सर्व सांगायची काय गरज आहे? एखादी ५ किमी ची रेस पळल्यावर १० फोटो टाकतो आपण. बाकी कुठं गेलो, काय खाल्लं त्यावर १००. मग यावर का नाही लिहायचं? दोनेक वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने आम्हाला सांगितलं, तिच्या आईच्या ७५ व्या वाढदिवशी तिने एक चांगले काम केले. सिंधुताई सपकाळ यांच्या मुलींच्या आश्रमातील एका मुलीचे शैक्षिणक पालकत्व घेतले आहे. वर्षातून त्या मुलीच्या शाळेसाठी लागणार खर्च ती करते. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या कामाबद्दल मला माहिती झाली. सासवड जवळच्या एका गावात असलेला तो मुलींचा आश्रम. त्यानंतर माझ्या अजून एका मैत्रिणीने तिच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी तिथे देणगी दिली. त्यांच्याकडून त्या आश्रमाबद्दल ऐकून जायची, काहीतरी करायची इच्छा झाली.
        दोन वर्षांपूर्वी तिथे गेलो तेंव्हा तिथल्या मुली, त्यांची स्वच्छता, कॉलेजसाठी जाणाऱ्या मुलीची धावपळ आणि तिची शिक्षणासाठीची जिद्द सर्वच प्रेरणादायी होतं. तिथे असणाऱ्या शिलाईच्या मशीन आणि पिशव्या शिवण्याचा, विकण्याचा उद्योगही पाहिला. आपण त्यांना कोणत्या प्रकारे मदत करू शकतो हा एकच विचार तेंव्हा मनात येत होता. कपडे, पैसे, स्टेशनरी, मुलांचे शैक्षिणक पालकत्व किंवा एकरकमी देणगीमुळे त्यांचे एखादे मोठे कामही मार्गी लागू शकते असे अनेक पर्याय समोर आले. सध्यातरी आम्ही एकहाती रक्कम देण्याचा पर्याय अवलंबला आहे. पण खरंच करण्यासारखं खूप आहे आणि लोक कमी असं वाटलं. आणि हो, माझ्या मैत्रिणीने मला त्यांच्या कामाबद्दल सांगितले म्हणून मी काहीतरी करू शकले. मग मी बाकी लोकांना सांगून त्यांच्याकडून काही चांगले झाले तर का नाही? म्हणून हा उपद्व्याप.
        कालच माझी ती मैत्रीण, पणत्यांचे आलेले आणि आमच्याकडून थोडे असे पैसे संस्थेत जाऊन देणगीची रक्कम देऊन आली. दिवाळीच्या आधी हे काम व्हावे अशी खूप इच्छा होती. ती जाऊन आल्यावर, अशा कामासाठी लोकही किती उत्साह दाखवतात असं वाटून गेलं. आपण इथून विचारल्यावर तिकडे कुणीतरी हे करतंय हेही भारीच ना? तिच्यासोबत बाकीच्यांनीही मग पैसे, कपडे, मिठाई जमेल तसं दिलं. आज तिच्याकडून तिथले फोटो मिळाले आणि खूप भारी वाटलं. आपण केलेल्या कामाने कुणाचे तरी काही चांगलं झाल्याचं समाधान. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पणत्या विकत घेतल्या त्यांनाही ते फोटो दाखवले आणि त्यांनाही तोच आनंद मिळाला. तर एकूण काय, तुम्हालाही खरंच काहीतरी करायची इच्छा झाली तर जरूर कळवा त्या संस्थेला. त्यांचा नंबर माझ्या एका फोटोत दिसेलच. आणि हो, त्यांचा मुलांचाही आश्रम आहे पुण्यात. तुमच्याकडून काही भलं झालं तर बाकीच्यांनाही जरूर सांगा. त्याचं समाधान तुम्हालाही मिळेलच.
           माझी मैत्रीण म्हणते ते बरोबर आहे, अशा कामात विचारायची लाज कशाला बाळगायची आणि लोकांना सांगायचीही? "नेकी कर फेसबुक पे डाल", बरोबर ना ? आता पुढच्या वेळी पणत्यांच्या उद्योगाला अजून हुरूप येणार आहे हे नक्की. :)
सर्वाना शुभ दीपावली !

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


तुझा अबोला


Thursday, October 20, 2016

दिवाळी येतेय ....

दिवाळी येतेय त्यामुळे घरात सर्वांचीच घाई, गडबड, खरेदी, सफाई, फराळाची तयारी चालू असेल असं गृहीत धरतेय. :) यावर्षीच्या पणत्यांचे काम एकदाचे उरकले. त्यासाठी गेल्या दोन तीन दिवसांच्या पोस्टना कल्टी द्यावी लागली. पण पुढे बरीच कामं आहेतच, दिवाळीची. लगेचच फराळाचे सामान घेऊन आलो. दरवर्षी निदान चार पाच पदार्थ तरी बनवण्याचा प्रयत्न असतोच. अनेकदा मित्र-मैत्रिणी म्हणतातही, "तू अजूनही फराळ करतेस? कशाला पण?" बरं, असंही नाही की मला सर्व उत्तम बनवता येतं.दरवर्षी आपण नव्याने फराळ शिकतोय असं वाटतं. त्यामुळे दरवेळी मी वेगवेगळ्या रेसिपी ऑनलाईन बघते आणि फराळ बनवते.तसाच यावेळीही सुरु केला आहे. 
           ही पोस्ट लिहितानाच व्हाट्स अँप वर एक पोस्ट वाचली, दिवाळीला आपण काय काय करायचो आणि आता कशी त्यातली काहीच गम्मत नाहीये. पण मला वाटतं की गम्मत असणे किंवा नसणे हे आपल्याच हातात आहे ना? आजच बेसन भाजत असताना, स्वनिकने त्याचा वास घेतला आणि म्हणाला, "याचा वास खरंच लाडूसारखा येत आहे. आपण कधी बनवणार लाडू?". त्याला हेही आठवत होते की मागच्या वर्षी लाडू वळताना त्यांनी मदत केली होती. त्यामुळे यावर्षी त्यांना त्याचीही उत्सुकता आहे. एकूण काय, घरात रव्या-बेसनाचे खमंग वास, ताज्या गरम दळून आणलेल्या भाजणीचा वास, मैत्रिणींनी एकमेकांना,"तुझं काय काय करून झालं गं?" हे विचारणं, हे सर्व आपल्याच हातात आहे. मग उगाच आपण लहान असताना दिवाळी कशी होती आणि ती आता कशी मिळत नाही यावर का रडायचे? 
          आजच मुलांना लाडूसाठी वेलदोडे सोलून द्यायला सांगितले. एकदम मन लावून करत होते. आपल्याला जशा दिवाळीच्या आठवणी आहेत, तशाच त्यांनाही मिळतीलच, नाही का? एका मित्राला विचारले की फराळाचे काय? तर म्हणाला, त्यातले निम्मे काम मलाच करायला लागेल. मग त्यात काय चूक आहे? करायचं निम्मं काम ! आयतं हातात आलेलं ताट चांगलं वाटतच कुणालाही. पण स्वतः राबून बनवलेल्या फराळाचा आनंद वेगळाच. आणि तो मुलांनी आवडीने खाल्ला तर अजूनच आनंद. आणि खरंच, त्यात थोडेफार प्लॅनिंग असले की पटकन होऊन जाते सर्व. 
       एकतर आता माझ्या यादीत, रवा लाडू, बेसन लाडू, चिवडा, चकली, तिखट आणि गोड शंकरपाळ्या साधारण यातले पाच पदार्थ तरी होतातच. दोघेही थोडे जागून, कधी शनिवार-रविवारी बसून काम उरकतो. मुलं मदत करतातच. शिवाय दिवाळीच्या दोन आठवडे आधी रवा आणि बेसन भाजून ठेवून देते. म्हणजे ऐनवेळी लाडूसाठी पाक घालून किंवा साखर घालून वळून घेता येतात. चकली साठी भाजणी शक्यतो विकत आणते किंवा मैदा आणि मूग डाळीचीही करते कधी कधी. त्यासाठी सर्व मसाले (तिखट, मीठ, ओवा, हळद, धणे-जिरे पूड ) तयार करून ठेवते. या गोष्टी रोजच्या कामासोबत एकेक करून होऊन जातात. मग एका शनिवार-रविवारी बसून सर्व काम उरकून घ्यायचं. ते दोन दिवस जरा कंटाळा येतो. पण पुढे महिनाभर मस्त वाटतं फराळ खायला(हो महिनाभर होईल इतका करते. ) आणि हो मी सुरुवात केली तेव्हा माझ्याही यादीत एक-दोन पदार्थच होते. पण ती हळूहळू मोठी होत आहे. 
        दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालणे, रांगोळी काढणे, पणत्या लावणे, आकाशकंदील लावणे ही सर्व छोटी मोठी कामं करण्यातही वेगळाच उत्साह असतो. उगाच आपण आता दु:खी आहोत म्हणत, 'गेले ते दिवस' टाईप पोस्ट फॉरवर्ड करण्यात काहीच साध्य होत नाहीत हे खरंय. त्यापेक्षा आपण त्यातले काय काय करू शकतो आणि याचा विचार करून त्याचा आनंद दघ्यावा आणि मुलांनाही द्यावा असं मला वाटतं. असो. माझा फराळ बनवून झाला की फोटो टाकतेच. तोवर, तुमचीही तयारी चालू राहू दे ! तोवर हे पणत्यांचे काही फोटो.









विद्या भुतकर.

Sunday, October 16, 2016

'आई' झाल्यावर......पुढे काय?

         आजकाल 'दिवस गेले' म्हटलं की इंटरनेटवर ढिगाने माहिती मिळते. भरपूर पुस्तकेही आहेत. शिवाय मी तर शिकागो मध्ये असताना एक-दोन टीव्ही सिरीयलही बघायचे. त्यामुळे मला वाटते की आपल्या आईपेक्षा आपल्याला डिलिव्हरीच्या आधी बरीच माहिती मिळालेली असते. पण 'आई' झाल्यावर पुढे काय? यावर कुणीच कधीच मला सांगितलं नव्हतं जे मला वाटतं बोलणं गरजेचं होतं. यातील बरीचशी माहिती कुठेतरी मिळेलही पण मला मात्र त्या अनुभवातूनच जावे लागले होते. काही अनेक मैत्रिणींना पाहून लक्षात आले आहेत. कदाचित हे सर्व मुद्दे वाचून कुणी काही माझ्याबद्दल मत बनवलं तर मी काही करू शकत नाही. यातील काही अगदीच व्यक्तिगत वाटतील पण बोलणं गरजेचं आहे.

१. सर्वात पहिली गोष्ट मला आठवते ती म्हणजे माझ्या डिलिव्हरी नंतर, कितीतरी वेळ (अगदी गुंगीत असूनही ) मला वाटत होते की, आपले पहिले बाळ झाले आहे आणि मला झोप का येतेय? एक दोन वेळा हॉस्पिटलच्या बेबी-केअर मधेही ठेवले आणि तेच वाटत राहिले. आज परत फिरून पाहताना वाटतं की, त्या वेळी मी स्वतःच इतकी दमलेली होते. त्यात हे विचार नसते केले तरी चालले असते. सर्व प्रोसेसमध्ये इतके परिश्रम झालेलं असतात की बाळाची कुणी काळजी घेत असेल तर उगाच स्वतःला 'वाईट आई' असे लेबल लावून घ्यायची काहीच गरज नाहीये. त्यासाठी सर्वाना भरपूर संधी मिळतातच.
२. लगेचच आता बाळाला द्यायला दूध कसे येणार असा प्रश्न पडतो. आणि यात बाळाला प्यायला काय ही भीती सर्वात जास्त असते. पुन्हा एकदा, हा काही नळ नाही की सुरु केला की पाणी येईल. त्यामुळे जो काही वेळ त्यासाठी लागत असेल तो घ्यावा. त्यासाठी स्वतःला काळजीत टाकायचे नाही. नंतर तेच दूध थांबवावे कसे हाही प्रश्न पडेल. तोवर बाळाला देण्यासाठी अनेक पर्याय असतात. ते नक्की वापरावे.
३. घरी आल्यावर बाळाला कुठे ठेवायचं, आपण कुठे झोपायचं यात वेळ जातोच. पण तोवर हॉस्पिटलमध्ये कुणीतरी असतं काही लागलं तर सांगायला. पण घरी आल्यावर काय अशी थोडी काळजी असतेच. पण अशावेळी, बाळाला फक्त दूध द्यायचे, ढेकर द्यायचा आणि स्वतःही खूप खायचे प्यायचे इतकेच लक्षात ठेवायचे. कारण त्या वयात बाळ २०-२२ तास झोपतंच. पण तितकेच ते दिवस खूप दमवणारेही असतात. आपलं आयुष्य आता असंच असणार का अशी एक भीतीही वाटतेच. तर उत्तर आहे, नाही ! मला वाटतं की पहिले २-३ महिने थोडे दमवणारे असतातच. पण हळूहळू बाळाचे रुटीन बदलत जाते आणि आपल्यालाही त्याची कल्पना येते. इतकेच लक्षात ठेवायचे की हे सुरुवातीचे दोनेक महिने शांतपणे काढायचे.
४. आता हे सर्व होत असताना, अतिशय हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. त्यामुळे अनेकदा उगाच चिडचिड होते, रडू येणे, कणकण येणे हे होतेच. अशावेळी जे वाटतंय ते सरळ सांगून टाकायचे. 'आई' म्हणून अगदी प्रत्येकवेळेला  'भारी' वाटलंच पाहिजे असे नाही. हे सर्व होणे साहजिक आहे, पण ते स्वतःजवळ ठेवणे हे जास्त त्रासदायक आहे.
५. दूध यायला लागल्यावर, छाती भरून येते आणि अशावेळी खूप गरम व्हायला लागते. अशा वेळी बाळाला दूध देणे किंवा काढून घेणे किंवा अंघोळ करून घेणे असे अनेक उपाय करू शकता. मुख्य म्हणजे, थोडे दिवस उंच उशी घेऊन मान आणि वरचा भाग थोडा उंच ठेवणे यामुळे झोपेत होणार त्रास कमी होतो.
६. बाळाला सांभाळणे, त्याला स्वीकारणे, त्याला नावाने हाक मारणे या सर्व गोष्टी एकदम येत नाहीत. कुठलीही व्यक्ती स्वीकारायला थोडासा का होईना वेळ लागतो. तसेच आहे हेही. "आई" म्हणून आपण लगेच एक "महान" व्यक्ती होऊ शकत नाही. त्यात मग, बाळ रडत असताना घाईने का होईना चार घास खाऊन घेणे, त्याला कुणी बघत असेल तर झोपून जाणे यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. मी वाचले होते, As a new parent, accept all help you get. आणि ते बरोबरही आहे.
७. आता बाळाला स्वीकारणे हा एक भाग आणि आपल्या नवऱ्याला बाळासोबत वाटून घेणे हा दुसरा भाग. अनेकवेळा असेही वाटू शकते की नवरा आपल्यापेक्षा बाळाकडेच जास्त बघत आहे. मला असे वाटते की हेही वाटणे साहजिक आहे. त्यासाठी काही वाटलं तर हक्काने नवऱ्याला सांगावं. उगाच माझ्या मनात असे विचार येऊच कसे शकतात असे वाटून स्वतःला त्रास का करून घ्यायचा?
८. तीच गोष्ट जवळच्या बाकी व्यक्तींची. आपल्या आई किंवा सासूलाही या सर्व गोष्टी आठवत असतातच असे नाही. त्यात जुने-नवे, योग्य-अयोग्य असे अनेक वाद होतात. पण त्यातून शांतपणेच मार्ग काढायला हवा. कुणीही कुणाचेही वाईट चिंतत नाही हे डोक्यात ठेवायला हवे.
९. सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे पहिले मूल होण्याच्या आधीचा काळ केवळ दोघांचा असतो. त्यामुळे उठून कुठेही कधीही फिरून आले. एखाद्या कार्यक्रमाला, सिनेमाला जाऊन आले. यामध्ये खुपसा विचार करायला लागत नाही. पण आता घरात बांधल्यासारखे होते. आपले आयुष्य असेच जाणार की काय असे विचारही येतात. कधी कधी तुमच्या मित्र- मैत्रिणी तुमच्याशिवाय बाहेरही जातात. तेव्हा वाईट वाटणे साहजिक आहे. पण हे सर्व तात्पुरते आहे हे लक्षात ठेवायचे. बाळ थोडे मोठे झाले की त्याला घेऊनही(किंवा कुणी सांभाळणारे असेल तर सोडूनही) आपण जाऊ शकतो हे डोक्यात ठेवले पाहिजे. Its not end of the world.
 १०. आपल्या मानसिकतेसोबत, शारीरिक बदलही खूप होत असतात. छाती ओघळले, स्तनांचा आकार वाढणे, पोटाची कातडी गोळा होणे हे सर्व होतेच. त्यात इतक्या सर्व गोंधळात केसांवर कंगवा फिरवायलाही वेळ नसतो. मग कधी चुकून जुना ती शर्ट घालून पाहिला की अजून वाईट वाटते. आपण आधी कसे दिसत होतो आणि आता कसे दिसतो यावरून. जे बदल होत आहेत ते बदलू शकत नाही. पण त्यातून बाहेर यायला अनेक पर्याय आहेत आणि ते लवकरच करता येतीलही. पण बाळ दोन महिन्याचंही नाही आणि आधीच वाढलेल्या वजनाची काळजी करायची, हे योग्य नाही. कालांतराने (म्हणजे साधारण बाळ सहा महिन्याचे झाल्यावर) आपण व्यायाम, डाएट इ करून मूळ रूपात येऊ शकतो. हे मी दोनही मुलांच्या वेळी अनुभवले आहे.
 ११. नोकरी वर कसे जाणार, काही आठवतही नाहीये इ वाटते. पुन्हा एकदा ते साहजिक आहे. पण बाळ तीनेक महिन्याचे झाल्यावर एकदा ऑफिसला गेले की सर्व आठवते आपोआप. आणि हो, Its not end of your career !

          खूप बोलले. मला खात्री आहे अजूनही काही मुद्दे राहिले असतीलही. पण जे आहेत ते मांडायचेच होते. अनेकदा, केवळ माझ्यासारखं अजून कुणीतरी आहे हेही कळलं तरी पुष्कळ असतं. म्हणून हा प्रपंच. यात बाळाबद्दल जास्त काही लिहिले नाही कारण त्याचा विचार आपण करतच असतो. पण त्याचसोबत आपण आपलाही विचार केला पाहिजे. मला वाटतं की, आजपर्यंत आपण ऐकलेल्या, पाहिलेल्या 'आई' च्या इमेज मध्ये आपण बसत नाहीयेत अशी भीतीही वाटायला लागलेली असते. 'आई म्हणून मी इतकी स्वार्थी विचार का करतेय' असं वाटून उगाच त्रास करून घ्यायचा नाही इतकंच सांगायचं आहे.
       बाळ झाल्यानंतर नऊ महिन्यानी पुन्हा एकदा आपण आपल्याकडे पूर्वीसारखे बघण्याचा प्रयत्न करतो. पण तोवर अनेक बदल झालेले असतात. पण म्हणून आपण अचानकपणे कुणीतरी दुसरी व्यक्ती होऊ शकत नाही. ते बदल स्वीकारायला वेळ द्यायला हवा. आणि जे आपल्याला वाटतंय ते वाटूनही घ्यायचं.  हळूहळू आयुष्य पूर्वीसारखं नसलं तरी त्या पहिल्या तीन महिन्यापेक्षा बरंच सुधारतं. पुन्हा एकदा, Its not end of the world ! :) तोवर All The Best.  :)

पोस्ट जवळ जवळ संपलीच असे वाटत असतानाही काही डोक्यात होतेच, ते असे. आई होणे हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, पण अनेकवेळा अनेकजणी त्याला 'कारण' बनवतात, बऱ्याच गोष्टींपासून वाचण्यासाठी. एखादे काम करायचे नसेल किंवा त्याला थोडे जरी प्रयत्न लागणार असतील तर, 'अगं, मुलांमुळे कुठे जमतंय?' असं कारण काढू नका. It shouldnt become an excuse to run away from things. उलट आपण त्यांना सोबत घेऊन अजून काही करून शकतो यातून जी शक्ती मिळते ती जास्त चांगली असते. मला तरी वाटते की मी आई झाल्यापासून जास्त स्ट्रॉंग झाले आहे. असो. थांबतेच आता. पुन्हा कधी तरी अजून याच मुद्द्यावर काही असेल तर नक्की लिहीन. तुम्हाला कुणाला असेच काही अनुभव आले असतील तर नक्की सांगा. आणि ही पोस्टही आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.

विद्या भुतकर.

Thursday, October 13, 2016

सणवार आणि खादाडी

मला ना कधी कधी आपण खूप भारी आहोत असं वाटतं. म्हणजे अगदी नवऱ्याला "तुला कधी शोधूनही अशी बायको मिळाली असती का?" हा प्रश्न तर दिवसातून एकदा तरी विचारतेच. त्यात मग मुलांच्या शाळेची एखादी गोष्ट आठवणीत ठेवलेली असो वा घराच्या एखाद्या कोपऱ्यात कुठे बारीकशी वस्तू शोधून दिलेली असो. कारण काहीही पुरतं. आणि त्यात परवा दसऱ्याला घरी पुरणपोळी, कटाची आमटी केली. मग तर काय बोलायलाच नको. आठवडाभर चांगले जेवण नाही झाले तरी चालेल इतकं भारी झालं जेवण. पोरांनाही खूप आवडल्या पोळ्या.
       संध्याकाळी सहाला सुरु करून नऊच्या आत जेवणही करून घ्यायचे म्हणजे काही खायचे काम नाहीये. :) असो. कौतुक पुरे. एकतर तो ऑफिसचा दिवस, त्यात इथे व्हाट्स अप वर येणारे मेसेज सोडले तर सण आहे असं वाटण्यासारखं काहीच नाही. मग घरी जाऊन काही विशेष करण्याचा उत्साह कुठून येणार? पण ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मला मागे मी एकदा बनवलेल्या पुरणपोळीची आठवण झाली. २००८ मध्ये केली होती. :) त्यानंतर आताच. तर तेव्हा माझे जेवण बनवण्याचा स्पीड आणि कौशल्य दोन्हीही कमीच होते. अगदी थोडीच डाळ घातली होती. गूळ कोरडा असल्याने खिसून घेता येत नव्हता आणि कडक होता त्यामुळे फुटत नव्हता. म्हणून मी डोकं चालवून तो सर्व गूळ मायक्रोवेव्हमध्ये घातला. म्हटलं वितळून जाईल जरा. आता मला काय माहित काय होते ते. ३०-४० सेकंदात तो ताडताड उडून मायक्रोवेव्ह आतून काळा पडला होता. ते घर सोडताना तोही लोकांना देऊन आलो. विकत कोण घेणार? 
         तर यावेळी मी अशा चुका करणार नव्हते. त्यात गूळ मिक्सरमध्ये मस्त बारीक होतो हेही कळलं होतं. त्यामुळे डाळ बरोबर शिजली, गूळ बरोबर झाला, पुरणही थंड झाल्यावर बरोबर झाले. सगळ्यात महत्वाचे, एकही पोळी फुटली नाही. मग इतके सर्व झाल्यावर भारी वाटणारच ना? शेजाऱ्यांनाही दोन ज्यादा पोळ्या केल्या. पोरांना कळत नव्हतं नक्की काय आहे आज? मग मी साध्या शब्दात स्वनिकला सांगत होते. म्हटलं, "चांगले आणि वाईट यांची लढाई झाली तर कोण जिंकलं पाहिजे?". त्याने बरोबर उत्तर दिलं. म्हटलं,"बरोबर. म्हणून आज सगळे सेलिब्रेट करत आहेत. The win of Good over Bad." त्याला ते पटलं. त्याने सानुलाही नंतर तेच प्रश्न विचारून तिला समजावून सांगितलं. कधी कधी एखादी संध्याकाळ 'साध्या पासून एकदम किती स्पेशल होऊन जाते ना? 
         आम्ही तसे बरेच सण करतोच. पण त्यासोबत हे खायचे पदार्थ केल्याने किती फरक पडतो ना? त्याच दिवशी मी आणि माझी ऑफिसमधली शेजारीण बोलत होतो. ती मला सांगत होती की तिने त्या रविवारी भजी केल्या होत्या. म्हणाली,"मुलांना खूप मस्त वाटलं खायला. आपल्याला आपल्या आई-वडिलांनी सर्व दिले म्हणून आपल्याला माहित झाले. आपण तब्येतीच्या नादात या सर्व गोष्टी करत नाही. मग मुलांना कसे मिळणार ना?" मला ते पटलेही. अर्थात भजी करायला कुणाला खास कारण लागेल असे नाही. त्यात मुलांचे निमित्त असेल तर मग काय? पण खरंच, आम्हालाही आई अनेकदा पापड, कुरवड्या तळून द्यायची. फराळ, पुरणपोळी आणि दिवाळीचे अनेक पदार्थ, त्यांनी केले म्हणून आपण चाखले. परवा सानूने पोळी आणि दूध खाल्ले तर किती छान वाटले. आता आमच्या खायच्या यादीत अजून भर नक्की पडणार आहे. :) 
त. टी.: कृपया पोळीचे डाळ -गूळ इ चे माप विचारू नये. सर्व अंदाजे घातले होते. :D
विद्या भुतकर.